Friday, March 7, 2014

मिग-२१ला बाय बाय! ( दै. दिव्य मराठी - २८ आॅगस्ट २०११)


भारतीय हवाई दलातील ‘उडत्या शवपेटिका’ असा बदलौकिक प्राप्त झालेली मिग-२१ जातीची विमाने आता जुनाट व अद्ययावत तंत्रज्ञानदृष्ट्याही पिछाडीला पडलेली असल्याने ती वर्ष २०१५-१६ पर्यंत ताफ्यातून काढून टाकण्यात येणार आहे. त्याविषयी मी दै. दिव्य मराठीमध्ये २८ आॅगस्ट २०११ रोजी लिहिलेला हा लेख.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-mig-21-bye-bye-2385372.html
----------- 

 मिग-२१ला बाय बाय!
--------
- समीर परांजपे
-----------
भारतीय हवाई दलातील ‘उडत्या शवपेटिका’ असा बदलौकिक प्राप्त झालेली मिग-२१ जातीची विमाने आता जुनाट व अद्ययावत तंत्रज्ञानदृष्ट्याही पिछाडीला पडलेली असल्याने ती वर्ष २०१५-१६ पर्यंत ताफ्यातून काढून टाकण्यात येणार आहे. मिग-२१ विमानांचे शेवटचे स्क्वाड्रन २०१७मध्ये ताफ्यातून काढण्यात येईल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री एम. एम. पालम राजू यांनी नुकतीच दिली. मिग-२१ विमानांची जागा एसयू-३० एमकेआय, स्वदेशी बनावटीची लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट, मिडियम मल्टिरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट, पाचव्या पिढीतील फायटर एअरक्राफ्ट (एफजीएफए) ही विमाने घेणार असल्याचे वृत्त झळकल्यानंतर मिग-२१ विमानांविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याचप्रमाणे १२६ एम-एमआरसीए ही नवी विमाने हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी डासॉल्ट राफेल आणि युरोफायटर टायफून या कंपन्यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या विमानांच्या निर्मितीसंदर्भात या वर्षाच्या अखेरीस करार केला जाण्याची शक्यता आहे. मिग-२१ विमानांना होत असलेले अपघात व त्यात होणारा वैमानिकांचा मृत्यू हा नक्कीच गंभीर विषय आहे. या अपघातांत मरण पावलेल्या वैमानिकांच्या नातेवाइकांनी तसेच काही संरक्षणतज्ज्ञांनी मिग-२१ विमानांचा दर्जा, तसेच त्यांच्या देखभालीमध्ये हवाई दलाकडून होत असलेली हेळसांड याकडे लक्ष वेधल्यानंतर हा राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा झाला होता. या निमित्ताने मिग-२१ विमानासंदर्भातील काही वेगळ्या बाजू मांडण्याचा प्रयत्न इथे केला आहे.
मिग-२१ विमानांना हवाई दलाच्या ताफ्यातून काढून टाकणे आवश्यक आहे, असे सार्वजनिक लेखा समितीने २१ मार्च २००२ रोजी संसदेला सादर केलेल्या आपल्या २९व्या अहवालामध्ये नमूद केले होते. कोणत्या गोष्टींच्या आधारे या समितीने हा निष्कर्ष काढला होता हे कळायला मार्ग नाही. १९९१ ते २००० या कालावधीत सुमारे २३८.४९ कोटी रुपये मूल्य असलेली २२१ मिग-२१ विमाने अपघातग्रस्त झाली व त्यामध्ये १०० वैमानिक मरण पावले, अशी आकडेवारीही या समितीने उद््धृत केली असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की या काळात इतक्या मिग-२१ विमानांना अपघात झालेले नाहीत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील मिग-२१सह विविध जातींच्या विमानांना १९९१ ते २००० या कालावधीत झालेल्या एकूण अपघातांची संख्या २२१ इतकी असावी. सार्वजनिक लेखा समितीने आपल्या अहवालात कदाचित हेच म्हटले असेल; पण प्रसारमाध्यमांनी वृत्त देताना आकडेवारीचा घोटाळा केला आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दलात केवळ मिग जातीची मिग-२१ हीच विमाने नसून त्याशिवाय मिग-२३, मिग-२७, मिग-२५, मिग-२९ या जातीचीही विमाने आहेत. एफएल, एम, बीआयएस ट्रेनिंग, ग्राउंड अ‍ॅटॅक व एअर डिफेन्स या प्रकारच्या मिग-२१ विमानांचा भारतीय हवाई दलामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. मिग विमाने मूळ रशियन बनावटीची असून त्यातील एफएल जातीची मिग-२१ विमाने १९६६ ते १९७० या काळात, एम जातीची मिग-२१ विमाने १९७० ते १९७३ या कालावधीत, तर बीआयएस जातीची मिग-२१ विमाने १९७७-१९८५ या कालावधीत भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आली.
गेल्या काही दशकांमध्ये भारतीय हवाई दलातील विमान अपघातांच्या प्रमाणात घट झाली असल्याचा निष्कर्ष ‘कॅग’च्या जून २०००च्या अहवालात नोंदविण्यात आला होता. दर १०,००० उड्डाण तासांमागे १९९१ ते १९९७ या कालावधीमध्ये लढाऊ विमान अपघातांचे प्रमाण १.५९ वरून ०.८९ इतके कमी झाले आहे. आणि मिग-२१ विमानांना होणा-या अपघातांचे प्रमाण ३.५३ वरून १.८९ इतके कमी झाले आहे. मिग-२१ विमानाला होणारे अपघात दुर्दैवी आहेतच; पण एक तांत्रिक बाब लक्षात घेतली पाहिजे की सिंगल इंजिन असलेल्या लढाऊ विमानांना अपघात होण्याचा धोका अधिक असतो. लढाऊ विमानांना होणारे अपघात टाळता कसे येतील, याचा जगातील सर्वच देशांच्या हवाई दलांकडून विचार सुरू असतो. त्याला भारतीय हवाई दलही कसे अपवाद असेल? त्यामुळे भारतीय हवाई दलावर प्रसारमाध्यमे व काही तज्ज्ञांकडून होणा-या आरोपांची वस्तुस्थितीच्या पातळीवर शहानिशा करून घेणे आवश्यक बनले आहे.
भारतीय हवाई दलातील मिग-२१ विमानांना झालेल्या अपघातांपेक्षा मिग-२३ व मिग-२७ या विमानांना झालेल्या अपघातांची संख्या अधिक आहे. मिग-२१ विमानांच्या सांगाड्यातील दोषांमुळे सदर विमानाला अपघात झाल्याचे एकही उदाहरण अद्याप समोर आलेले नाही. हवाई दलाच्या ताफ्यातील मिग-२१ विमानांच्या कार्यक्षमता व आयुष्यमानाबाबत हवाई दल, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (हाल), नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी यांच्या तज्ज्ञांनी, या विमानांच्या रशियन उत्पादकांच्या सहकार्याने चिकित्सक पाहणी केली होती. त्यानंतर या विमानांचे आधुनिकीकरण करून त्यांचे आयुष्यमान व कार्यक्षमता वाढविण्यात आली. जी मिग-२१ विमाने १९६०च्या दशकाच्या मध्याला बनविण्यात आली होती व त्यांचे ३५ वर्षांचे आयुष्यमान सरल्याने ती विमाने हवाई दलाच्या ताफ्यातून याआधीच बाद करण्यात आली आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ विमानांच्या आराखड्यांमध्ये मिग-२१ विमानाच्या आराखड्याचा समावेश असून ती सर्वाधिक वापरात असलेली विमाने आहेत.
मिग-२१ विमानांना झालेले अपघात मुख्यत्वे मानवी चूक, तांत्रिक दोष, पक्ष्यांनी दिलेली धडक या तीन कारणांमुळे होतात. त्यापैकी ४० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले आहेत. पुढचा मुद्दा हा तांत्रिक दोषांचा आहे. मिग-२१ विमानातील इंजिनामध्ये काही तांत्रिक   दोष जरूर होते. मात्र, हालच्या तज्ज्ञांनी त्यावर सखोल संशोधन करून व मूळ उत्पादकांच्या मदतीने हे दोष दूर केले आहेत. पक्ष्यांनी विमानांना धडक दिल्यानेही अनेकदा अपघात होतात. प्रवासी वाहतूक करणारी विमाने तसेच लष्करी विमाने या दोघांनाही ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते. इंजिनाच्या भागात पक्ष्याने धडक दिली तर बाका प्रसंग उद््भवतो. त्यामुळे इंजिनाच्या कार्यात अडथळे निर्माण होऊन परिणामी विमान कोसळण्याचाही धोका असतो. आपल्या ताफ्यातील मिग-२१ बीआयएस विमानांपैकी १२५ विमानांच्या अद्ययावतीकरणाचा प्रकल्प भारतीय हवाई दलाने राबविला. मिग-२१ विमानांना होणा-या अपघातांमागील कारणांमध्ये हवाई दलातील विमानांच्या देखभालीतील गैरव्यवस्थापन हे एक कारण असल्याचे सांगितले जात असले तरी तेच मुख्य कारण आहे का हे पाहावे लागेल. कारण तांत्रिक दोष असलेली विमाने घेऊन वैमानिकांना उड्डाण करण्यास जगातील कोणतेही हवाई दल परवानगी देत नाही. मात्र, यासंदर्भात भारतीय हवाई दलाच्या व्यवस्थापनात जर काही त्रुटी असतील तर त्या तातडीने दूर होणे आवश्यक आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातून मिग-२१ विमाने भविष्यात काढून टाकण्यात येतील; मात्र या विमानांच्या निमित्ताने झालेले वादविवाद त्यापुढील अनेक वर्षे सर्वांची सोबत करीत राहतील...
----------

No comments:

Post a Comment