Tuesday, March 14, 2017

थुकरटवाडीची रंगीबेरंगी हवा... दै. दिव्य मराठीच्या १२ मार्च २०१७च्या रसिक पुरवणीत चला हवा येऊ द्या या मालिकेतील कलाकारांची डॉ. नीलेश साबळे यांनी शब्दांनी रंगविलेली अर्कचित्रे..

 डॉ. नीलेश साबळे

 ---
 सागर कारंडे


 ---
 श्रेया बुगडे



 ---
भारत गणेशपुरे व कुशल बद्रिके
 ----
भाऊ कदम
-----
चला हवा देऊ द्या या मालिकेची यशस्वी टीम
--







दै. दिव्य मराठीच्या १२ मार्च २०१७च्या रसिक पुरवणीत चला हवा येऊ द्या या मालिकेतील कलाकारांची डॉ. नीलेश साबळे यांनी शब्दांनी रंगविलेली अर्कचित्रे..

थुकरटवाडीची रंगीबेरंगी हवा...


शब्दांकन - समीर परांजपे

प्रथेप्रमाणे वर्षातून एकदाच होळी-रंगपंचमी साजरी होते, मात्र झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षभर हास्याची धुळवड रंगत असते. डॉ. निलेश साबळेकृत या कार्यक्रमात प्रत्येक कलावंत निराळा, त्याची अिभनयाची खासियत निराळी. पण, त्यांना एका सूत्रात बांधण्याचे अवघड कार्य दर कार्यक्रमागणिक साबळे साधत असतात. डॉ. साबळेंच्या नजरेला प्रत्यक्षात हे कलावंत दिसतात तरी कसे, त्यांची कोणती स्वभाववैशिष्ट्ये त्यांना भावून जातात आणि त्यातून त्यांचे म्हणून कसे आगळे अर्कचित्र आकारास येत जाते, याचीच ही होलिकोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारी शाब्दिक गोळाबेरीज. खास ‘रसिक’च्या वाचकांसाठी...
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-rasik-team-writes-about-chala-hawa-yeu-dya-show-5548748-PHO.html?seq=1
‘चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या...डोक्याला शॉट नको, हवा येऊ द्या...हे टायटल साँग खरं तर याच नावाच्या विलक्षण लोकप्रिय मालिकेचं. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ असं काही रसिकांच्या मनात घर करून बसलंय, की त्यातील थुकरटवाडी हे गाव जणू काही आपलंच गाव आहे, असाच समस्त प्रेक्षकवर्गाचा पक्का विश्वास आहे. थुकरटवाडीतील सरपंच, त्यातील गावकरी असे सारे सारे लोक म्हणजे, मोहात पाडणारी अर्कचित्रेच आहेत.. ती शब्दांच्या माध्यमातून चितारली डॉ. निलेश साबळे याने. तोच तर या थुकरटवाडीचा खरा कर्ताधर्ता आहे. तोच या वाडीचा, त्यातील वाडीकरांचा खरा दिशादर्शक आहे. त्यामुळे एकदा का भट्टी जमली की, विनोदाचे चौकार, षटकार हाणले जातात ते याच थुकरटवाडीतून. मैदानातला रसिक मग जल्लोश करतो, त्यातल्या एकेक अदांवर. भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे असे एकेक कसलेले खे‌ळाडू आणि त्यांचा कर्णधार निलेश असे मिळून जो काही धुमधडाका लावतात, त्याचे नाव ते. हा सगळा सामना जिथे नेहमी रंगतो ती जागा म्हणजे, मुंबईच्या वेशीवरच्या मीरारोड उपनगरातला एक स्टुडिओ. तिथे अवतरलेल्या थुकरटवाडीत ‘दिव्य मराठी’ जाऊन पोहोचला तेव्हा लगबग सुरू होती, होळीनिमित्त सादर होणाऱ्या रंगीबेरंगी विशेष कार्यक्रमाची. सेटच्या आजूबाजूच्या खोल्या एकदम फुल होत्या. प्रत्येक कलाकारासाठी राखीव खोली. तिच्या दारावर या कलाकाराचे नाव डकवलेली कागदी पट्टी. एका खोलीतून एखादा असिस्टंट हातातून विविध प्रकारचे विग घेऊन दुसऱ्या खोलीत जातोय... तर कपडेपटवाला शूटिंगसाठी लागणाऱ्या कपड्यांना इमानेइतबारे ‘इस्तारी’ करतोय. तर बाकीचे असिस्टंट सारखे काही ना काही कामात गुंतलेले. अशी सगळी धावपळ-पळापळ सुरू असताना अचानक एका खोलीतून भाऊ कदम बाहेर आला. इथे-तिथे डोकावून पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने भारत गणेशपुरे आपल्या वऱ्हाडी बोलीत कोणाला तरी काही सूचना देऊन घाईघाईने सेटच्या दिशेने मार्गस्थ झाला. पण श्रेया बुगडे मात्र अभ्यासू मुलीसारखी आपल्या खोलीत संवाद पाठ करत बसलेली. थुकरटवाडीची चावडी अजून फुलायची होती. पण त्यातील सगळ्याच गावकऱ्यांचे लक्ष होते, स्टुडिओतील एका खोलीकडे... ती खोली होती, निलेश साबळेची. नुकताच एका आजारातून बरा झालेला निलेश पूर्वीच्याच उत्साहाने कामाला लागल्याचे सेटवर दिसतच होते. पण दुसरीही गोष्ट जाणवत होती. जगात सगळीकडे डॉक्टर इतरांची काळजी घेतात, इथे इतर लोक एका डॉक्टरची मनापासून काळजी घेत होते...
१८ ऑगस्ट २०१४ रोजी ‘चला हवा येऊ द्या’चे प्रसारण सुरू झाले. ‘फू बाई फू’च्या यशानंतर निलेश साकारत असलेला हा दुसरा कार्यक्रम. कार्यक्रमाचा आत्मा फक्त आणि फक्त निखळ विनोदाचा. यात सादरीकरण करण्याआधी काही तालमी होतातच, पण जास्त भर उत्स्फूर्ततेवरच. लेखी स्क्रीप्टपेक्षा अलिखित हावभावांचे महत्त्व अधिक. त्यामुळे पहिल्या काही भागांनंतर या कार्यक्रमाने कधीच मागे वळून बघितले नाही. आतापर्यंत ‘हवा’चे २७८ भाग प्रक्षेपित झालेत. हा म्हटला तर सुखद चमत्कारच.
असे सगळे मनात साठवत निलेश साबळेला आम्ही गाठले. हेतू हा की, ‘रसिक’च्या होळी विशेषांकासाठी थुकरटवाडीत धमाल उडवणाऱ्यांची शाब्दिक अर्कचित्रे त्यांनी रंगवावी. मग काय, ‘चला हवा येऊ द्या’चा एकेक मोहरा... त्यांच्या गमतीजमती, आठवणी, अभिनयाच्या लकबी याबद्दल निलेश भरभरून बोलला आणि त्यातूनच आकारास येत गेली, ‘चला हवा येऊ द्या’ची कुणाच्याही नजरेस न पडणारी अर्कचित्रात्मक दुनिया...
--------------
झोपाळू भाऊ अभिनयाला जागतो!
भाऊची रात्रीची झोप नीट झालेली असली तर सकाळी भाऊ एकदम फ्रेश असतो. मग दिवसभर तो अभिनयाचे असे लाजवाब फटके मारतो की, एखाद्या ग्रेट बॅट‌्समनशीच त्याची तुलना होईल. पण जेव्हा कधी अशी बिकट स्थिती असेल,  त्या दिवशी तो स्टुडिअोत सेटला लागून एखाद्या खोलीत जाऊन तास-दोन तास तरी झोप काढतोच काढतो...
रंगाने सावळा, चेहऱ्यावर निष्पाप भाव असलेला भालचंद्र उर्फ भाऊ कदम भूमिका साकारायला उभा राहिला, की टाळ्यांचा कडकडाट हा ठरलेलाच. पण हा भाऊ प्रचंड विसराळू आहे. भाऊची रात्रीची झोप नीट झालेली असली तर सकाळी भाऊ एकदम फ्रेश असतो. मग दिवसभर तो अभिनयाचे असे लाजवाब फटके मारतो की, एखाद्या ग्रेट बॅट्समनशीच त्याची तुलना होईल. पण जर त्याची झोप झाली नसेल, तर मग भाऊचा हाच उत्साह कुठे गायब होतो माहीत नाही. जेव्हा कधी अशी बिकट स्थिती असेल, त्या दिवशी तो स्टुडिअोत सेटला लागून एखाद्या खोलीत जाऊन तास-दोन तास तरी झोप काढतोच काढतो. त्यामुळे बराच वेळ तो दिसला नाही की समजायचे, भाऊ झोपी गेलेला आहे. अशीच एक दिवस गंमत करायची म्हणून आम्ही त्याला अजिबात झोपू दिले नाही. काही ना काही कारण काढून जागे ठेवण्याचा प्रयत्न केला, पण पठ्ठा निर्धाराचा पक्का. त्याने कोणीही हुडकून काढू नये, म्हणून आमच्या नकळत जागा बदलली. सेटच्या पाठी अंधाऱ्या जागेत ठेवलेल्या एका टेबलावर भाऊ ढाराढूर झोपी गेला. इतर वेळी हा झोपप्रिय भाऊ एखाद्या माणसाला समोर बसवून त्याला सलग अर्धा तास हसवत ठेवू शकतो. सोप्पे नाही हे. त्याची विनोदाची कपॅसिटी प्रचंड आहे. मी तुम्हाला सांगतो, थुकरटवाडीतले आमचे सगळे कलाकार वाटतात प्रथमदर्शनी लोककलाकार, पण इंग्रजी कॉमेडीच्या पुढेही जायची त्यांची ताकद आहे.
भाऊने १९९१मध्ये अॅक्टिंग करिअरला सुरुवात केली. नाटकांतून तो पुढे आला. ‘फू बाई फू’मधून भाऊला मिळाली खरी ओळख... भाऊ तसा साधा सरळ अभिनय करणारा इसम. त्याला विनोदी भूमिका कशा जमतील, असा प्रश्न तेव्हा अनेकांच्या मनात असायचा. पण भाऊच्या अभिनयक्षमतेवर गाढा विश्वास होता माझा. म्हणूनच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमासाठी जुळवाजुळव सुरू झाली तेव्हा त्यात भाऊ पाहिजेच, ही खूणगाठ मी मनाशी बांधली होती. भाऊचे वैशिष्ट्य हे की, त्याला दोन ओळींच्या मध्ये अभिप्रेत असलेला विनोद बरोबर कळतो. हे जे ‘बिटविन द लाइन’ आहे, ते भाऊने जास्तीत जास्त पडद्यावर साकारावे, म्हणून माझे प्रयत्न असतात. त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावातून तो विनोद विलक्षण बोलका करतो. त्यामुळे दोन ओळींतील विनोद पकडू शकेल, असेच संवाद मी भाऊसाठी लिहितो. ती फार मोठी मोठी वाक्य नसतात. एखादे वाक्य संपले की, पुढे कंसात आता भाऊ अमुक अमुक पात्राकडे नुसते बघतो, असे मी लिहून ठेवतो. ते वाचून भाऊला बरोबर कळते, की त्या जागी आपल्याला नेमके काय करायचे आहे ते. अगदी खरं सांगायचं, तर ‘चला हवा येऊ द्या’मधील सर्व कलाकारांत मला भाऊ कदमचा अभिनय अधिक भावतो. कोणत्याही भागाचे एडिटिंग करताना भाऊच्या भूमिकेचा भाग मी पुन:पुन्हा रिवाइंड करून बघतो, त्याच्या विनोदाची मजा लुटतो. विनोदी कलाकार म्हणून भाऊला ‘चला हवा येऊ द्या’ने उदंड प्रसिद्ध केले, हे जगाला ठाऊक आहे; पण सेटवर वावरतानाही भाऊच्या वागण्यातून विनोद होतात, हे आमचे आम्हीच जाणतो...
----------------
हास्याचे 'कुशल'-'भारत' अभियान...
‘चला हवा येऊ द्या’मधील कोणत्या कलाकारात खऱ्या अर्थाने लहान मूल दडलेले आहे, असा सर्व्हे झालाच तर उत्तर एकच येईल, कुशल बद्रिके! आणि समोरच्या कलावंताकडून लाफ्टर नाही आला की, जाम टेन्शनमध्ये येऊन पाय फैलावून उभा राहतो तो म्हणजे भारत गणेशपुरे. दोघांचे दोन ढंग,
दोन तऱ्हा...
‘चला हवा येऊ द्या’मधील कोणत्या कलाकारात खऱ्या अर्थाने लहान मूल दडलेले आहे, असा सर्व्हे झालाच तर उत्तर एकच येईल, कुशल बद्रिके! कुशल बद्रिके!! कुशल बद्रिके!!! कुशलला शारीर हावभावांतून विनोदनिर्मिती करणे उत्तम जमते. तेही अभिनयाचा आब व रुबाब राखून. पण तो आहे प्रचंड धसमुसळ्या. पाठीच्या दुखण्यातून बरा झालाय नुकताच; पण तरीही सतत धडपडत राहील, छोटे छोटे फ्रॅक्चर करून घेत राहील, याची फुल गॅरंटी. कुशलला विनोद कुठून नि कसा बाहेर काढावा, हे नीट कळते. आता हा एक प्रसंग बघा. एका कार्यक्रमात गायक आदर्श शिंदेला बोलावले होते. अँकरिंग करताना माझ्या लक्षात आले की, आदर्शसारखाच साधारण दिसणारा एक जण प्रेक्षकांत बसलेला आहे. त्या दिवशी भूमिकेची गरज म्हणून प्रेक्षकांत बसलेल्या कुशलला स्टेजवरूनच खुणेने ते सांगितले. तसेच दाढीवर हात फिरवल्यासारखे हावभावही केले. त्यावरून लगेच मला काय म्हणायचे आहे, ते कुशलला कळले. त्या प्रेक्षकाला तो लगोलग मेकअपरुपमध्ये घेऊन गेला. आदर्शसारखे कपडे त्याला कपडेपटातून मिळवून घालायला लावले. दाढी पेन्सिलीने रंगवली. आणि मग शूटिंग सुरू असतानाच एका क्षणी येऊन हात दाखवून ‘ऑल इज रेडी’ असा इशारा मला केला. मी तत्काळ आदर्श शिंदेला सांगितले की, आम्हाला असे कळलेय की, इथे अजून एक आदर्श शिंदे आहेत. त्या वेळी त्या प्रेक्षकाला आम्ही स्टेजवर आणले. त्याला पाहून आदर्श शिंदे अवाकच झाला. त्याला विश्वासच बसेना, की ही सगळी आयत्या वेळची तयारी आहे म्हणून... कुशल हा असा आहे. मला काय हवे, ते त्याला बरोबर कळते. नजरेचा इशारा तो उत्तम जाणतो.  कुशल बद्रिकेची ही तऱ्हा, तर आमच्यातला सिनिअर अभिनेता भारत गणेशपुरेचा अभिनय ही दुसरी तऱ्हा. म्हणजे काय तर, एखाद्या प्रसंगाला सुरुवात झाली आणि त्यात भारतच्या पहिल्या काही संवादांना समोरच्या कलाकाराने योग्य दाद दिली नाही, लाफ्टर आला नाही, की भारतला जाम टेन्शन येेते. आपण जे करतोय ते समोरच्यापर्यंत बरोबर पोहोचते का? हा विचार त्याला सतावू लागतो. मग भारत पाय फैलावून उभा राहतो. तसे दिसले की ओळखू येते की, तो आता सॉल्लिड टेन्शनमध्ये आहे. अगदी ‘फू बाई फू’पासून भारत माझ्याबरोबर काम करतोय. त्याच्या भूमिकेचे संवाद लिहून देताना कधी पल्लेदार वाक्य असली तरी भारत पाठांतराला एकदम बाप आहे. तो ती वाक्ये वाचून काही मिनिटांतच मनात घोळवतो आणि भूमिकेत आरपार शिरतो. मी त्याला लेखकाचा फेवरिट नट म्हणतो.
आपल्या वऱ्हाडी बोलीने तो थुकरटवाडीचा अख्खा माहोलच बदलून टाकतो. उत्स्फूर्त विनोदाची जाण असली तरीही त्याचा तो अतिरेक नाही करत. हीच त्याची दर वेळी खासियत ठरते...
----
रेयाला नाही उपमा आणि सागरला नाही मर्यादा...
श्रेयाला विनोदाचा अफलातून सेन्स आहे. मी तिला एकही संवाद लिहून दिलेला नसतो. फक्त त्या भूमिकेत मला काय अपेक्षित आहे, हे मी थोडक्यात लिहिलेले असते. श्रेया जितकी भन्नाट आहे, तितकाच सागर कारंडेही अफलातून अवलिया आहे. कोणतीही भूमिका हिडीस दिसता कामा नये, असे एक दिग्दर्शक म्हणून माझे मत आहे. या मताचा तो पुरेपूर आदर करतो...
‘अब मै आपसे एक प्रश्न पुछती हूँ’ असे इंग्रजा‌‌ळलेल्या हिंदीत समोरच्या माणसाला मोठ्ठाल्या आवाजात धारेवर धरणारी महिला पत्रकार दिसली की, ‘चला हवा येऊ द्या’चे प्रेक्षक म्हणतात की, आली आली, बरखा दत्त आली. ती ओरिजिनल बरखा दत्त असणे शक्य नसतेच, पण ती असते श्रेया बुगडे. मी म्हणतो, विनोदाची उत्तम जाण असलेल्या अभिनेत्री तशा कमीच आढळतात, पण श्रेयाला विनोदाचा अफलातून सेन्स आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये ती ज्या ज्या भूमिका करते, त्यांचे वैशिष्ट्य काय माहितीये? मी तिला एकही संवाद लिहून दिलेला नसतो. फक्त त्या भूमिकेत मला काय अपेक्षित आहे, हे मी थोडक्यात लिहिलेले असते. ती ते वाचते. स्वत:चे संवाद स्वत:च तयार करते. ते उत्स्फूर्त असतात. पण ते कथानकात चपखलपणे सामावूनही जातात. तिचा हा आग्रह कधीच नसतो की, मला छान छान दिसायचे आहे वगैरे. जी भूमिका येईल ती उत्तमपणे करणे, हे तिचे वैशिष्ट्य. आता ती अधूनमधून महिला पत्रकाराची भूमिका साकारते ती ज्या कुणा व्यक्तीचे निरीक्षण करून तिने बेतली आहे, ते सारे अफलातूनच आहे. म्हणजे, ती जी कोण मूळ महिला पत्रकार आहे, तिच्या बोलण्याचे, हावभावांचे बेअरिंग अचूक पकडून तिचा भास आपल्या भूमिकेतून उभा करणे सोपे नसते. त्यामुळे श्रेयाला तिच्या उत्तम अभिनयाचे श्रेय द्यायलाच हवे.
----
अफलातून अवलिया :
सागर कारंडे
हे झालं श्रेयाचं. ती जितकी भन्नाट आहे, तितकाच सागर कारंडेही अफलातून अवलिया आहे. माझ्या मते, सागर कारंडे हा उत्तम नकलाकार आहे. बऱ्याचदा कलाकार कोणत्याही कार्यक्रमात नकला करायला तयार होत नाहीत. कारण मग त्याच्या स्वत:च्या अभिनयापेक्षा लोक त्याला इतरांची नक्कल करण्याची फर्माईश करतात. त्यात आपली ओळख हरविण्याचा धोका कोणत्याही कलाकाराला वाटणे साहजिक आहे. पण सागर कारंडेला असे अडथळे थांबवू शकत नाहीत. नकला करणे, हे त्याला बिनमहत्त्वाचे वाटत नाही. उत्स्फूर्त कविता करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यातील एका नेत्याची सागर कारंडे करत असलेली नक्कल विलक्षण लोकप्रिय आहे. नकला करणे ही पण खायची गोष्ट नाही. त्यासाठी जबरदस्त निरीक्षणशक्ती लागते. ती सागरकडे आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ या एकेकाळी लोकप्रिय झालेल्या मराठी सिनेमामध्ये साडी नेसलेली दोन पुरुष पात्र आहेत. अनेक नाटकांत पुरुष स्त्री भूमिका करताना आढळतात. पण सागर कारंडेला जेव्हा प्रथम साडी नेसवून भूमिका करण्यास सांगितले तेव्हा ती कशी साकार होईल, याबद्दल तो स्वत:च साशंक होता. पण जसजसा त्याच्या स्त्री भूमिकेला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद द्यायला सुुरुवात केली, तसतसा त्याचाही आत्मविश्वास बळावला. तो स्त्री भूमिका करताना खूप काळजी घेतो. त्याची भूमिका पातळी सोडून कधीच वाहवत गेली नाही. साडीमध्ये तो स्वत:ला चांगले कॅरी करतो, तसेच दिसतोही चांगला. कोणतीही भूमिका हिडीस दिसता कामा नये, असे एक दिग्दर्शक म्हणून माझे मत आहे. या मताचा तो पुरेपूर आदर करतो.  जोडीला सागर जेव्हा पोस्टमन बनून येतो आणि ख्यातनाम व्यक्तीला उद्देशून अरविंद जगतापने लिहिलेले पत्र वाचतो, त्या क्षणी तो जमलेल्या समस्त प्रेक्षकांना अक्षरश: हेलावून टाकतो. आता खरे तर दोन वर्षांहून अधिक काळ झाला. या कार्यक्रमांतील पात्रांचा लोकांचा कंटाळा यायला हवा होता; पण तसे होताना दिसत नाही. याचा अर्थ, आम्ही त्यातील ताजेपणा टिकविण्यात यशस्वी झालो आहोत, असाच तर असतो...
---
 झपाटलेला निलेश
निलेश एकदम हाडाचा दिग्दर्शक. त्याला बरोबर माहीत असते, कोणत्या कलाकाराला काय द्यायचे, पडद्यावर काय साकारायला सांगायचे ते... प्रचंड कामसू असलेल्या निलेशला सतत काही वेगळे सुचत असते. एकदा मनात संकल्पना आली की, ती कधी पडद्यावर साकारतोय, असे त्याला होऊन जाते. तो जेव्हा कधी शूटिंगला बोलावतो, आम्ही हजर असतो तिथे. तो कामाने झपाटलेला गृहस्थ आहे. त्याला दिग्दर्शन, एडिटिंग असे सगळेच करायचे असते. अशा वेळी प्रकृतीकडेही लक्ष देत नाही तो फारसे...
- भारत गणेशपुरे

Saturday, March 11, 2017

पेनड्राइव्हतून पुस्तके वाचकांपर्यंत नेण्याचा बहरला नवा प्रवाह - दै. दिव्य मराठी दि. ११ मार्च २०१७- समीर परांजपे



दै. दिव्य मराठीच्या दि. ११ मार्च २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेली विशेष बातमी
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAH-MUM-news-about-encycl…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/11032017/0/4/
----
पेनड्राइव्हतून पुस्तके वाचकांपर्यंत नेण्याचा बहरला नवा प्रवाह
विश्वकोशाच्या २० खंडांच्या प्रयोगानंतर मिळाली चालना
- समीर परांजपे
मुंबई, दि. ११ मार्च
महाराष्ट्र राज्य मराठी िवश्वकोश निर्मिती मंडळाने बुकगंगा डॉट कॉमच्या सहकार्याने मराठी भाषा दिनी विश्वकोशाचे वीस खंड पेन ड्राइव्हमध्ये उपलब्ध करुन दिले. त्यामुळे हायस्पीड इंटरनेट सातत्याने उपलब्ध नसलेल्या राज्यातील अनेक ठिकाणच्या वाचकांना एक नवी सोय उपलब्ध झाली आहे. पेन ड्राइव्हमध्ये पुस्तके साठवून ती वाचकापर्यंत नेण्याचा एक नवा प्रवाह यानिमित्ताने सुरु झाला असून आगामी काळात त्याचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण होईल.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडे २० खंडांचा मजकूर तयार आहे. पण वीस खंडांपैकी काही खंड अद्याप पुस्तकरुपात प्रसिद्ध झालेले नाहीत. तसेच विश्वकोशाचे खंड जाडजूड असल्याने ते हाताळायलाही काहीसे अवघड होते. त्यामुळे या वीस खंडांच्या सहा सीडींचा संच मंडळाने तयार करुन घेतला होता. त्याचे वजन अवघे ४५० ग्रॅम इतके होते. तसेच या खंडांचा सर्व मजकूर https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/ या मंडळाच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. गावोगावीच्या लोकांकडे आता संगणकांची संख्या वाढत असली तरी हायस्पीड इंटरनेट सातत्याने उपलब्ध असेलच याची अजूनही खात्री नाही. त्यामुळे सीडी उपलब्ध असल्या तरी विश्वकोशाच्या वेबसाइटवर जाऊन ते खंड पाहाणे ग्रामीण भागांतील विद्यार्थी व इतर वाचकांना शक्य होत नव्हते.
यासंदर्भात बुकगंगा डॉट काॅमचे संचालक मंदार जोगळेकर यांनी सांगितले की, िवश्वकोशाच्या वीस खंडांचा मजकूर युनिकोड स्वरुपात चार जीबी क्षमतेच्या एका पेन ड्राइव्हमध्ये साठविण्यात आला असून तो वाचकाला ८०० रुपयांना देण्यात येतो. या पेन ड्राइव्हची एक वर्षाची गॅरेंटी असून तो एका वेळेस एका संगणकावर वापरता येतो. विश्वकोश मंडळाकडून ग्रंथालीमार्फत बुकगंगाला या पेनड्राइव्हचे तंत्रज्ञान विकसित करण्याचेम व वितरणाची जबाबदारी मिळाली आहे. या पेनड्राइव्हतील मजकूराची कोणी कॉपी करु नये किंवा पायरसी होऊ नये म्हणून बुकगंगाने त्यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. नव्या संगणकांमध्ये पेन ड्राइव्ह जोडण्याची तांत्रिक सोयही असते. तसेच सीडी, डीव्हीडीपेक्षा आता पेन ड्राइव्हमध्ये साठविलेल्या गोष्टी पाहाण्याकडे संगणक वापरकर्त्यांचा कल असल्याने विश्वकोशाचा प्रसार या नव्या माध्यमातून वाचकांपर्यंत अजून वेगाने होईल. भविष्यात संस्कृती कोश व अन्य प्रकाशनांची पुस्तके पेन-ड्राइव्हच्या माध्यमातून नेण्याचा बुकगंगाचा मानस आहे.
विश्वकोश साठविलेल्या पेनड्राइव्हला महाराष्ट्रातील अलिबाग, विदर्भ, कोकण, खानदेश, सांगली, सातारा व अमेरिकेतूनही मागणी आली अाहे. अलिबागमधील एका व्यक्तीने शाळेच्या मुलांकरिता विश्वकोशाचे शंभर पेनड्राइव्ह विकत घेतले आहेत. मराठवाड्यातूनही या पेनड्राइव्हबाबत विचारणा होत आहे. मराठी भाषा दिनी अनावरण झाल्यानंतर आजवर विश्वकोशाच्या सुमारे ४०० पेनड्राइव्हची विक्री झाली आहे. आपली पुस्तके अशाच प्रकारे पेनड्राइव्हतून गावोगावीच्या वाचकांपर्यंत नेता येतील का याची चाचपणी काही प्रकाशकांनीही बुकगंगा डॉट कॉमकडे केली आहे.

Sunday, March 5, 2017

उलट्या चश्म्याचा सरळ लेखक - तारक मेहता यांच्यावरील मी लिहिलेला लेख - दै. दिव्य मराठी दि. ६ मार्च २०१७ रसिक पुरवणी - समीर परांजपे


तारक मेहता या प्रख्यात गुजराती लेखक महोदयाचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे साहित्यचित्र रेखाटणारा मी लिहिलेला हा लेख दै. दिव्य मराठीच्या दि. ५ मार्च २०१७च्या अंकातील रसिक या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. या लेखाची वेबपेज, टेक्स्टलिंक तसेच जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
---
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sameer-panjape-article-about-writer-tarak-mehata-5543154-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/05032017/0/4/
----
उलट्या चश्म्याचा सरळ लेखक
----
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी दैनंदिन मालिका प्रक्षेिपत होऊ लागली सब टीव्ही या वाहिनीवर. ती तारीख होती २८ जुलै २००८. या घटनेला येत्या जुलै महिन्यात होतील तब्बल नऊ वर्षे. विशेष म्हणजे आजवर या मालिकेतील विनोद ना कधी शिळा झाला, ना ही मालिका बघणारा रसिकवर्ग आटला. मालिका आहे हिंदीमध्ये. त्यात गुजराती कुटुंब मध्यवर्ती भूमिकेत असले तरी त्याच्या सोबतीला मराठी, शीख, दाक्षिणात्य अशी अठरापगड कुटुंबे आहेत. त्यांच्या संमिश्र जगण्यातून मालिकेचे मुख्य पात्र जेठालाल व त्याच्या आयुष्याचा गोफ विणला जातो. या लोकांचे सारे भावविश्व एकवटलेले आहे ते मुंबईमध्ये. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे आजवर अकराशेहून अधिक भाग प्रक्षेपित झाले, हेही एक भारीच प्रकरण आहे. तरीही मनात राहून राहून एक प्रश्न येतोच, की कोण आहेत तारक मेहता?
या प्रश्नाचे उत्तर अधिक ठळकपणे पुढे आले ते, १ मार्च रोजी. या दिवशी गुजरातीतील प्रख्यात साहित्यिक असलेल्या तारक मेहता यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. त्यांनी देहदान केलेले असल्याने मरणानंतरही ते समाजरूपातच मिसळून गेले. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका ज्यावर आधारलेली आहे ती गोष्ट म्हणजे, तारक मेहता यांचा एक स्तंभ. १९७२मध्ये ‘चित्रलेखा’ या गुजराती साप्ताहिकात तारक मेहता यांचा ‘दुनियाने उंधा चश्मा’ हा विनोदी स्तंभ सुरू झाला. रोजच्या जगण्यात आपल्या आजूबाजूला जी माणसे दिसतात, त्यांचे बारकाईने निरीक्षण करून ती माणसे आपल्या या स्तंभातून तारक यांनी पुन्हा एकदा चितारली. त्यांच्या वागण्यातले ताणेबाणे अचूक टिपताना त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदाचा सुखद शिडकावाही या स्तंभातून वाचकांवर होत असे. त्यामुळ‌े आपल्याच गोष्टी जरा उपरोधिक नजरेने मेहता जेव्हा सांगतात, तेव्हा त्या भलत्याच रोचक होतात, असा विश्वास वाचकांच्या मनातही जागा झाला. ‘दुनियाने उंधा चश्मा’मध्ये जेठालाल नावाचे एक पात्र येते. हे पात्र ज्यावरून बेतलेय, ती जेठालाल नावाची व्यक्ती वास्तवात आजही आहे.
‘चित्रलेखा’ या गुजराती साप्ताहिकाचे ज्येष्ठ प्रतिनिधी केतन मिस्त्री हे तारक मेहता यांच्या आठवणी सांगू लागले. ‘गुजरातीत अनेक नामवंत साहित्यिक होऊन गेले. गुलाबदास ब्रोकर यांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा बाज वेगळा होता. लघुकथा व इतर काही साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. तारक मेहता हे नुसतेच विनोदी लेखक नव्हते, तर बुद्धिचातुर्याची झालर त्यांच्या लिखाणाला होती. त्यांचा विनोद ‘इंटेलिजण्ट ह्युमर’ या वर्गात मोडणारा होता. त्याची जातकुळी चार्ली चॅप्लीनच्या कारुण्याची झालर असलेल्या विनोदासमान होती. किंबहुना एकाकी बालपणात चॅप्लिन हाच त्यांचा सखासोबती आणि आदर्श होता. म्हणूनही समाजाच्या भाव-भावनांचा आदर राखण्याचा संस्कार त्यांच्या लेखणीवर होता. त्याचमुळे गरिबीपासून नोटाबंदीपर्यंत कितीतरी ज्वलंत विषय हाताळले, पण एकदाही त्यांच्या लेखनाने कुणा व्यक्ती वा समूहाच्या भावना दुखावल्या नाहीत. चित्रलेखातील स्तंभावर बेतलेली हिंदी मालिका निर्मिली गेली, तिचे एक खास वैशिष्ट्य आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही टेलिव्हिजनच्या इतिहासातील एकमेव अशी मालिका, जिच्या शीर्षकात लेखकाचे नाव आहे. तब्बल ४५ वर्षे मेहतांनी ‘दुनियाने उंधा चश्मा’ हा स्तंभ लिहिला. आता त्यावरची मालिका कदाचित त्याहून अधिक वर्षे लोकप्रियता टिकवून ठेवेल!’
तारक मेहता मुंबईत फिल्म्स डिव्हिजनमध्ये खूप मोठ्या पदावर कार्यरत होते. अतिशय कलासक्त माणूस. त्यांनी अनेक गुजराती नाटके लिहिली. पारशी रंगभूमीवरही त्यांनी मोलाचे योगदान दिले. किंबहुना पारशी रंगभूमीनेच त्यांचा दृष्टिकोन घडवला. त्यांचा मूळ पिंड नाटककाराचा होता. मॉलमॉलिएर-कॉफमन-बर्नाड स्लेड आदी युरोपीय नाटककारांच्या विनोदी शैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता, आणि सरळसरळ प्रभाव टाळून नवनिर्मितीची विलक्षण क्षमताही होती. त्याचमुळे त्यांच्या हातून लफरा सदन, मौसम छालके, सखा सैयारा आदी जबरदस्त विनोदी नाटके लिहून झाली. यातल्या "लफरा सदन'ने (लफडा सदन) मराठी रंगभूमीवर तुफान धुमाकूळ घातला होता. म्हणूनच नदीचा जसा प्रवाह तसा मेहता यांच्या लेखणीचा प्रवाहदेखील कायम ओघवता राहिला. त्यामुळे त्यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १९९५मध्ये ते निवृत्त झाले आणि मुंबईहून अहमदाबादला कायमचे राहायला गेले. मुंबईहून दूर गेले खरे, पण तिचे बहुपेडी बहुसांस्कृतिक रूप त्यांच्या मनात इतके ठसलेले व रुजलेले होते की, ते अहमदाबादमध्ये राहून मुंबईतील दुनिया रंगवू लागले.
तारक मेहता यांचे निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली. याचे कारण तारक मेहता हे मोदी यांचे अत्यंत आवडते लेखक होते. मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले, त्या वेळी त्यांची तारक मेहता यांनी चित्रलेखा साप्ताहिकासाठी अत्यंत सविस्तर मुलाखत घेतली होती. एक विनोदी लेखक मोदीसारख्या राजकारण्याची मुलाखत घेतो, इथपासूनच तिच्या आगळ्या वैशिष्ट्याला सुरुवात झाली होती. या मुलाखतीत मोदींना आवडणारी पुस्तके, संगीत, अन्य ललित कला, त्यांचे छंद अशा अनेक गोष्टींबाबत मेहतांनी त्यांना प्रश्न विचारले होते. मोदींमधील कलाप्रेमी माणूस शोधण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून केला गेला होता.
मेहता यांच्या ‘दुनियाने उंधा चश्मा’ या स्तंभामध्ये विविध पठडीची पात्रे होतीच. या स्तंभावर आधारित ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सुरू झाली तेव्हा तिच्यात आणखी पात्रांची भर पडली. त्यात मूळ रत्नागिरीचा पण मुंबईत स्थायिक झालेला आत्माराम तुकाराम भिडे व त्याची बायको, त्याशिवाय बिहारचा डॉ. हंसराज हाथी, जालंदरचा सरदार रोशनसिंग हरजितसिंग सोधी, चेन्नईचा कृष्णन सुब्रमणियम अय्यर व त्यांची बंगाली पत्नी, भोपाळचा अविवाहित पत्रकार पोपटलाल अशी विविध पात्रे जन्माला आली. सुंदरलाल, अब्दुल, रिपोर्टर रिटा श्रीवास्तव, नटवरलाल प्रभाशंकर उधईवाला, बागेश्वर दधुख उधईवाला, बावरी धोंडुलाल कानपुरिया, बबिता अशी अजून काही पात्रे. या साऱ्या पात्रांच्या परस्पर वर्तन व व्यवहारातून जी धमाल उडते, आयुष्याची मौज होते, कधी करुणामय प्रसंग येतात, ते सारे या मालिकेत चितारण्यात आले आहेत.
केतन मिस्त्री चित्रलेखामध्ये रुजू झाले, १९९८ रोजी. तेव्हापासून ते तारक मेहता यांच्या संपर्कात होते. मिस्त्री यांनी आजवर ‘चित्रलेखा’साठी सुमारे दीडशे व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यातील निवडक ३० उत्कृष्ट मुलाखतींचा समावेश असलेले ‘व्यक्तिविशेषनु शेषविशेष’ हे मिस्त्री यांचे पुस्तक अहमदाबादमध्ये २०१५मध्ये प्रकाशित झाले. आपल्या पुस्तकाची एक प्रत भेट देण्यासाठी मिस्त्री तारक मेहता यांच्या अहमदाबादमधील घरी गेले होते. त्या वेळी तारक मेहता यांनी अत्यंत उदारपणे मिस्त्री यांना सांगितले की, ‘माझा ग्रंथसंग्रह ठेवलेल्या खोलीत जा, तुम्हाला हवी ती पुस्तके घ्या.’ मिस्त्री यांनी मेहतांच्या ग्रंथसंग्रहातील आठ ते दहा पुस्तके निवडली व ही अमूल्य भेट मोठ्या आनंदाने घेऊन ते तेथून निघाले.
अगदी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातही ‘चित्रलेखा’मध्ये तारक मेहता यांनी आपला स्तंभ लिहिला होता. लेखकाचे वय कितीही झाले तरी मन तरुण लागते, तरच ते सतेज विचार करू शकते. तारक मेहता यांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय ८८ वर्षांचे होते, पण त्यांची विनोदी तैलबुद्धी मात्र अखेरपर्यंत तेजतर्रार होती. जगण्याची शैली अत्यंत सकारात्मक होती. तारक मेहता यांनी जसे सातत्यपूर्ण ‘चित्रलेखा’साठी लिखाण केले, तसेच भास्कर समूहाच्या दैनिक ‘दिव्य भास्कर’साठीही तितक्याच आपुलकीने काही काळ स्तंभलेखन केले.
२०१५मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. २०११मध्ये गुजराती साहित्य अकादमीचा साहित्य गौरव पुरस्कार, तसेच अलीकडेच रमणलाल नीलकंठ हास्य पारितोषिक प्रदान करून मेहतांना गौरवण्यात आले. प्रतिभावंताला पुरस्कार मिळणे हे त्याचा लौकिक वाढवतेच, पण त्याला मिळणारे लोकांचे प्रेम हे या सर्वाहूनही अधिक मोलाचे. आपल्या आजूबाजूच्या दुनियेकडे उपरोधिक चश्म्यातून बघून त्याचा नर्मविनोदी शैलीत वाचकांना उलगडा करून देणाऱ्या तारक मेहता यांचे अख्खे आयुष्य वाचकांनी भरभरून केलेल्या प्रेमाने भारून व भारावून गेले. तारक मेहतांनी जन्माला घातलेल्या या लोकविलक्षण दुनियेचे प्रतिरूप विश्वामित्रालाही निर्माण करता येऊ नये, इतके ते दुर्मीळ होते.