Sunday, December 10, 2017

तमाशा जगवणारा माणूस - मधुकर नेराळे, दै. दिव्य मराठी 3 डिसेंबर 2017 - समीर परांजपे


दै. दिव्य मराठीच्या 3 डिसेंबर 2017च्या रसिक या रविवार पुरवणीमधे प्रसिद्ध झालेला माझा लेख. या लेखाचा मजकूर, वेबपेज लिंक व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/rasik/244/03…/0/4/
---
तमाशा जगवणारा माणूस
------------------------------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----------------
इंट्रो : मधुकर नेराळे म्हणजे तमाशा कलेचा ज्ञानकोश. त्या कलेविषयी नुसते पढतपांडित्य असलेला हा गृहस्थ नाही तर प्रत्यक्ष त्या मैदानात उतरून तमाशा कला जिवंत राहावी म्हणून झगडलेली ही असामी आहे. नेराळे यांना राज्य शासनातर्फे विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने मधुकर नेराळे यांच्याशी साधलेला हा सहजसंवाद.
------------------------------
‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुनाची?’ ही लावणी कुठेही ऐकली तरी ओठांवर नाव येत, ते विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचेच. त्यांनी ही लावणीच काय तर संपूर्ण तमाशा कलाच अजरामर केली. अशा या खऱ्या अर्थाने तमाशासम्राज्ञी ठरलेल्या विठाबाई नारायणगावकर यांच्या नावे महाराष्ट्र शासनाने सुरु केलेला जीवनगौरव पुरस्कार यंदाच्या वर्षी तमाशा कलेच्या वृद्धीसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे हनुमान तमाशा थिएटरचे चालक मधुकर नेराळे यांना जाहीर करण्यात आला. तमाशा कलेत जीव ओतणाऱ्या कलावंतांच्या नावे असलेला पुरस्कार तमाशा कलेसाठी जीव पाखडणाऱ्या व्यक्तीला प्रदान होणार असल्याने जणू एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. 
मधुकर नेराळे म्हणजे तमाशा कलेचा ज्ञानकोश. त्या कलेविषयी नुसते पढतपांडित्य असलेला हा गृहस्थ नक्कीच नाही. तर प्रत्यक्ष त्या मैदानात उतरून तमाशा कला जिवंत राहावी म्हणून झगडलेली ही झपाटलेली असामी आहे. त्यामुळे तत्वज्ञान व व्यावहारिक ज्ञान यांचा सुरेख संगम साधणारे त्यांचे तमाशाविषयक अनुभव ऐकणे म्हणजे बहर आणि बहार असा दुहेरी मामला आहे.
ज्यांच्या नावे त्यांना पुरस्कार जाहीर झाला, त्या विठाबाई नारायणगावकरांच्या आठवणींपासूनच संवाद सुरुवात झाली. मधुकर नेराळे गतस्मृतींना उजाळा देत सांगू लागले, `विठाबाई या तमाशा कलेतील कलंदर व्यक्तिमत्व. लावणी सादर करताना त्या स्वत:च्याच विश्वात हरवून ज्यायच्या. बापू मांग नारायणगावकर हे विठाबाईंचे वडील. त्यांचा स्वत:चा तमाशा फड होता. भाऊंच्या निधनानंतर मात्र विठाबाईंनी स्वत:चा तमाशा फड उभा केला. माझ्या वडिलांचाही एकेकाळी तमाशाफड होता. त्यामुळे भाऊ बापू मांग नारायणगावकरांपासून विठाबाईंपर्यंत साऱ्यांचेच नेराळे कुटुंबियांशी स्नेहाचे संबंध होते.'
`मी लहानपणी पं. राजारामजी शुक्ल यांच्याकडे काही वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले होते. मला गाण्याचे अंग आहे हे विठाबाईंना माहिती होते. कधी त्यांचा रंगभवनमध्ये कार्यक्रम असेल तर त्या मला हातात माईक देऊन एखादी लावणी गायला सांगायच्या. त्या लावणीवर स्वत: अदाकारी सादर करायच्या. विठाबाई नारायणगावकर असो किंवा महाराष्ट्रातील कोणताही तमाशा फड त्यांना मदत करणे हे मी माझे कर्तव्यच समजत आलेलो आहे. विठाबाईंना मी कधीही आर्थिक मदत केलेली नाही. मात्र त्यांना कधी मुंबईत असताना त्यांच्या फडासाठी काही सामान लागले, वस्त्रेप्रावरणे लागली तर ती ते आमच्याकडून घेऊन जात असत. काम झाले की ते सामान त्या परत आणून देत.'
`एकदा मी दिल्लीला काही कामासाठी गेलो असताना संगीत नाटक अकादमीत गेलो होतो. तेथील गृहस्थांना मला बघताच आनंद झाला. ते म्हणाले की, आम्ही विठाबाई नारायणगावकरांना अकादमीचा पुरस्कार देण्याचे ठरविले आहे पण त्यांचा पत्ताच आमच्याकडे नाही! तो तुम्ही द्याल का? मलाही ही बातमी ऐकून आनंद झाला. मी संगीत नाटक अकादमीला विठाबाई नारायणगावकरांचा नारायणगावचा पत्ता दिला मग त्यांना पुरस्काराचे अधिकृत पत्र संगीत नाटक अकादमीने पाठविले. संगीतकार भास्कर चंदावरकर हे संगीत नाटक अकादमीवर होते. त्यांनी अकादमीच्या पुरस्कारासाठी विठाबाईंचे नाव सुचविले होते हे नंतर मला कळले. संगीत अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मी नारायणगावला विठाबाईंकडे गेलेलो असताना त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कार सोहळ्यासाठी मी दिल्लीला त्यांच्याबरोबर यावे. पण त्यांनी या सोहळ्यासाठी स्वत:च्या कुटुंबियांना सोबत घेऊन जावे असे नम्रपणे सांगून मी त्यांना नकार दिला.'
विठाबाईंच्या नावाने राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार एका वर्षी त्यांच्या कन्या मंगला बनसोडे करवडीकर यांनाही मिळाला होता ही आठवण करुन देताच मधुकर नेराळे यांच्या चेहऱ्यावर आनंदछटा उमटली. विठाबाईंच्या आठवणींमध्ये रंगलेला हा संवाद आता महाराष्ट्रातील तमाशा कलेची परंपरा व सध्याची स्थिती या विषयावर आला होता. 
मधुकर नेराळे यांचे वडिलोपार्जित हनुमान तमाशा थिएटर असल्याने वयाच्या पाचव्या वर्षापासून तमाशासोबत नेराळे यांची नाळ आपोआप जोडली गेली. त्यांच्या या थिएटरमध्ये १९६५ ते १९९४ पर्यंत अनेक तमाशा फडांनी रसिकांना मोहविले आहे. सन १९६९ मध्ये मधुकर नेराळे यांनी जसराज थिएटर ही संस्था स्थापन करुन तिच्या मार्फत ‘गाढवाचं लग्न’, ‘आतून किर्तन वरुन तमाशा’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘उदे गं अंबे उदे’, ‘एक नार चार बेजार’, ‘पुनवेची रात्र’, ‘काजळी’ या सारख्या वगनाटयांचे सादरीकरण केले. मुंबई महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे लोककलेचे व लावणीचे यशस्वी कला प्रदर्शन केले. १९९० ते १९९६ पर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या शिबिरांतून त्यांनी सुमारे १५० हून अधिक तमाशा कलावंत घडविले आहेत. अनेक तमाशा कलावंतांना कारकिर्द सुरु करण्यासाठी मोलाची मदत केली आहे. लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्याबरोबर रंगमंचावर काम करण्याची संधी मधुकर नेराळे यांना संधी लाभली होती. हे सारे अनुभव गाठीशी बांधून मधुकर नेराळे तमाशाचे वर्तमान व भविष्य याकडे पाहात असतात.
मधुकर नेराळे सांगू लागले, ‘तमाशा कलावंतांचे आर्थिक प्रश्न आहेतच पण सरकारी जे नियम आहेत तेही अडथळा बनून उभे आहेत. त्या नियमांपैकी रात्री १० वाजता लाऊडस्पीकर बंद करणे हा एक मोठा अडथळा आहे. तमाशाच्या फडाचे तंबूमध्ये जे कार्यक्रम चालतात तिथे लाऊडस्पीकर लावले तरी त्याचा आवाज बाहेर जातोच ना. हे लाऊडस्पीकर रात्री दहा वाजता बंद करायलाच हवेत म्हणून पोलिसांनी केलेली दादागिरी सहन करावी लागते. मग पोलिसांना मॅनेज करुन कसातरी तो तमाशा फडाचा कार्यक्रम दहानंतर पुढे चालवायचा असे सगळे करावे लागते ही सध्याची मोठी समस्या आहे. दुसरी समस्या आहे ती म्हणजे तमाशा फडाच्या प्रत्येक दिवसाचे लायसन्स वेगळे काढावे लागते. परफॉर्मन्स लायसन्स, तिकिट सेलिंग लायसन्स, प्रिमायसेस लायसन्स असे बरेच असते. आम्ही मागे मागणी केली होती की, तिकिट सेलिंग लायसन्स हे एकाच जिल्ह्यामध्ये अख्ख्या जिल्ह्याचे द्यावे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिकिट सेलिंग लायसन्स वेगळे काढावे लागते त्याऐवजी अख्ख्या जिल्ह्याला दिल्यानंतर ते कुठेही चालण्यासारखे आहे. परफॉर्मन्स लायसन्स जिथे कार्यक्रम असतो त्या तहसीलदाराकडून काढून घ्यावे लागते हे ठीक आहे. पण तिकिट सेलिंग आणि प्रिमायसेस लायसन्स जे आहे ते अख्ख्या जिल्ह्याचे एकाच ठिकाणी द्यावे किंवा महाराष्ट्रातून अशी लायसन्स मिळण्याची एकाच ठिकाणी सोय व्हावी. म्हणजे त्याकरिता जे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लायसन्स काढावी लागतात, त्याच्यासाठी जी माणसे गुंततात, पैसा अडकतो व शेवटी पैसा दिल्याशिवाय लवकर काम होतच नाही ते सारे व्याप वाचतील. कारण तमाशाचे कार्यक्रम कसे आहेत की जरी आधी ठरवलेले असले तरी ऐनवेळी कार्यक्रमाचे ठिकाण बदलले की प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नव्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम करावे लागतात. तिथे लायसन्स नसतेच. मग त्यासाठी पुन्हा सरकारी अधिकाऱ्याला जाऊन भेटायचे म्हटले की भ्रष्टाचार आलाच. या साऱ्या मागण्या सरकारकडे करुनही १५ वर्षे झाली पण त्याचा विचार काही झाला नाही.'
नेराळे म्हणाले `तमाशा कलावंत आणि फड मालक असे दोन वेगवेगळे घटक दिसतात पण १९५७ पर्यंत ते एकत्र होते. त्यावेळी ते सहकारी तत्वावर तमाशा चालवायचे. म्हणजे जे काही उत्पन्न येईल ते सगळेजण सारखे वाटून घ्यायचे. पण १९५७ नंतर फड मालक व कलावंत हे वेगवेगळे घटक झाल्याने कलावंत हे पगारी झाले. फडमालक कलावंतांना पगार देणार व त्यांना कामाला ठेवणार. तमाशा फडांचा सीझन असतो त्यात त्यांचा २१० दिवस धंदा असतो म्हणजे दसऱ्यापासून अक्षयतृतीयेपर्यंत. ते त्याप्रमाणे आपल्या कार्यक्रमांचे नियोजन करतात. या २१० दिवसांमध्ये कलावंतांना जो पगार मिळतो त्यात हे २१० दिवस सोडल्यानंतर उरलेले जे दिवस आहेत त्यातील चार महिने म्हणजे पावसाळ्यात तमाशा फडांचे कार्यक्रम होत नाहीत. गणेशोत्सवाच्या का‌ळात दहा पंधरा दिवस झाले कार्यक्रम झाले तर. त्यामुळे या चार महिन्यांसाठी तमाशा फड मालक कलावंतांना जी रक्कम देत असतात त्याला तमाशा क्षेत्रात उचल असे म्हणतात. ती रक्कम फेडायची असते. दसऱ्यापासून ते अक्षयतृतीयेपर्यंतच्या २१० दिवसांमध्ये जो पगार कलावंतांना मिळतो त्यातून ही उचल रक्कम फेडायची असते. पण ही रक्कम कलावंतांकडून फेडली जात नाही. म्हणून पुढच्या वर्षासाठी पुन्हा कलावंतांना रक्कम द्यावी लागते. असे केल्यामुळे तमाशा फड मालकाकडून घेतलेल्या पैशाचे ओझे कलावंतांच्या डोक्यावर वाढत जाते. या सगळ्या दुश्चक्रामुळे त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलावंतांना वेठबिगारासारखे राबविले जाते. त्या कलावंतांच्या कलात्मक गुणवत्तेचे अस्तित्व लक्षात ठेवले जाते. या कलावंतांना कायद्याचे कोणतेही आर्थिक संरक्षण नाही. जे तमाशा फडमालक आहेत हे कलावंतांमधूनच आलेले असतात. तमाशा फड मालकांकडेही पैशाची फार सोय नसते. मग २०१ दिवसांतले जे यात्रेचे कार्यक्रम असतात ते तमाशा फड मालक ठेकेदारांना िवकतात. त्याच्या बदल्यात ते अॅडव्हान्स रक्कम ठेकेदारांकडून घेतात. हीच रक्कम तमाशा फड मालक कलावंतांना वाटतात. त्यामुळे तमाशा फड मालकाकडील रक्कमही त्यामुळे जवळजवळ संपुष्टात येते. त्यामुळे दरवर्षी ठेकेदाराकडून पैसे मिळाले तर तमाशा फड मालक कलावंतांना पैसे वाटू शकतो. ही तमाशा फड मालकाची अवस्था असते. त्यामुळे नरेंद्र तिडके कामगारमंत्री असताना आम्ही कामगार मंत्रालयाला एक कायदा करायला सांगितला होता. त्यावेळी मी तमाशा कला-कलावंत विकास मंदिर या संस्थेचा कार्याध्यक्ष होतो, अजूनही आहे. त्या कायद्यासंदर्भातील प्रस्तावात आम्ही म्हटले होते की, तमाशा कलावंतांना बारमाही पगार मिळावा म्हणजे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायला बरे पडेल. आठ महिने काम करुन त्यांना बारा महिन्याचा पगार कसा देणार? आठ महिन्यामध्ये कलावंतांना एकही सुट्टी देत नाहीत. या कलावंतांना आठवड्यातून शनिवार व रविवार अशी सुट्टी धरली तर आठ महिन्याचे ६४ दिवस सुट्टीचे होतात म्हणजे दोन महिन्यापेक्षा थोडे जास्त. त्यामुळे आठ महिन्यांसोबतच या दोन महिन्यांचा कलावंतांना अतिरिक्त पगार देण्यात यावा. शेवटी कलाकार हे कामगार म्हणूनच धरले जातात. त्यामुळे त्यांना आठवड्यातून सुट्टी ही त्यांना मिळालीच पाहिजे. आता उरलेले अजून दोन महिने. त्यात गणेशोत्सवाचे १५ दिवस कार्यक्रम होतात. त्यावेळी कार्यक्रम कितीही होवो कलावंतांना त्या महिन्याचा पगार द्यावा आणि फड मालकाला मिळालेल्या आर्थिक फायद्यातून उरलेल्या अजून एक महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा. असे चार महिन्याचे चार पगार वाटून दिले तर कलावंतांना तमाशा फड मालकाकडून उचल घेण्याची गरज पडणार नाही. यासाठी कायदा करावा व कलावंतांना संरक्षण द्यावे. शेवटी माणूस कायद्याला घाबरतो. पण त्यावेळच्या सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे तमाशा फडमालक व कलावंतांना आर्थिक संरक्षण नाही. आताच्या राज्य सरकारने हा कायदा करायला हवा. '
तमाशा क्षेत्रातील लोकांसाठी असलेला विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार पुरस्कार फक्त तमाशा क्षेत्रातील लोकांनाच का दिला पाहिजे, इतर क्षेत्रातील लोकांना का द्यायचा नाही असा वाद यंदाच्या वर्षी सुरु होता. त्याबाबत मधुकर नेराळे म्हणाले की, या वादाशी मी सहमत नाही. तुम्ही लता मंगेशकर पुरस्कार नाट्य परिषदेच्या माणसाला द्याल का? लोककलावंतांना द्याल का? मग तमाशा क्षेत्रातील पुरस्कार तमाशा क्षेत्रातल्याच लोकांना का द्यायचा नाही? त्यामुळे यंदा याबाबत झालेला वादच चुकीचा होता असे माझे स्पष्ट मत आहे.
मधुकर नेराळे हे पठ्ठे बापूराव साहित्य संगीत लोककला अकादमीचे सदस्य व अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे कार्याध्यक्षही आहेत. नेराळे यांनी यंदा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. तमाशा कलेविषयी बोलताना ते एखाद्या तरुणाच्या उत्साहाने बोलतात. त्यांच्या या बोलण्याला एक वजन आहे कारण त्यांनी तमाशासाठी खूप महत्वाचे कार्य केले आहे. या समर्पित व्यक्तिच्या पाया पडून तेथून जाणे मग साहजिकच होते नाही का?

पृथ्वी थिएटर : शशी कपूर यांच्या नाट्यप्रेमाचे वास्तवरुप - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी 5 डिसेंबर 2017



प्रख्यात अभिनेते शशी कपूर यांची याद जागविणारा हा मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या 5 डिसेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची वेबपेज लिख तसेच मजकूर व जेपीजी फाइलही सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/256/05122017/0/11/
------
पृथ्वी थिएटर : शशी कपूर यांच्या नाट्यप्रेमाचे वास्तवरुप
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
शशी कपूर यांच्या चित्रपटांतील योगदानाबद्दल नेहमीच बोलले जाते पण त्यांनी रंगभूमी समृद्ध व्हावी म्हणून जे प्रयत्न केले त्याविषयी सांगणे आवश्यक आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेते पृथ्वीराज कपूर यांच्याकडून राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर या तीनही मुलांना चित्रपट व नाटकाचा सांस्कृतिक वारसा मिळाला. त्यापैकी राज व शम्मी कपूर हे चित्रपटांमध्येच जास्त रमले. मात्र शशी कपूर यांनी चित्रपट व नाटक या दोन्ही क्षेत्रांत महत्वाचे योगदान दिले. 
पृथ्वीराज कपूर यांनी अनेक चित्रपटांत काम केलेले असले तरी त्यांचे पहिले प्रेम नाटकांवर होते. त्यामुळे १९४४ साली पृथ्वी थिएटर ही नाटक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी दौरे काढून नाटक करीत असे. पृथ्वी थिएटर नाटक कंपनी १६ वर्षे चालली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशातील युवकांनी सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणारी नाटके पृथ्वीराज कपूर सादर करीत असत. त्याचबरोबर हिंदु व मुस्लिम यांच्यात बंधुभाव नांदावा म्हणून पृथ्वीराज कपूर यांनी सादर केलेल्या पठाण या नाटकाचे शेकडो प्रयोग तेव्हा झाले होते. मात्र नंतरच्या काळात चित्रपटांचा इतका बोलबाला सुरु झाला की, नाटक कंपन्यांचे वैभवाचे दिवस ओसरु लागले. त्यामुळे अखेर पृथ्वी थिएटर ही नाटक कंपनी बंद करुन पृथ्वीराज कपूर आपले सारे लक्ष चित्रपटांवर भूमिका करण्यावर केंद्रित केले. 
आपल्या पृथ्वी थिएटर या नाटक मंडळीला हक्काची वास्तू हवी असे स्वप्न पृथ्वीराज कपूर यांनी कायमच उराशी बाळगले होते. त्यासाठी त्यांनी १९६२ साली जुहू येथील एक प्लॉट लीजवर घेतलेला होता व तिथे ते एक तात्पुरता रंगमंचही उभारला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे पृथ्वीराज कपूर यांना पृथ्वी थिएटरची कायमस्वरुपी वास्तू उभारण्यासाठी जोमाने प्रयत्न करणे शक्य झाले नाही. पृथ्वीराज कपूर यांचे २९ मे १९७२ रोजी निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेमके काय करावे असे विचार कपूर मंडळी करीत होती. ज्या वर्षी पृथ्वीराज कपूर यांचे निधन झाले त्याच वर्षी नेमके त्यांनी थिएटर बांधण्यासाठी घेतलेल्या प्लॉटच्या लीजची मुदत संपत होती. जुहू येथील तो प्लॉट कपूर घराण्यातील लोक विकत घेतील का अशी विचारणा झाल्यानंतर शशी कपूर व जेनिफर कपूर पुढे आले. पृथ्वीराज कपूर यांचे थिएटर बांधायचे स्वप्न आपण पूर्ण करायचे असा मनाशी निर्धार करुन तो प्लॉट शशी कपूर यांनी विकत घेतला. 
वेद सेगन या वास्तुविशारदाने रंगभूमीच्या साऱ्या गरजा लक्षात घेऊन पृथ्वी थिएटरच्या वास्तूचा आराखडा तयार केला. त्यानूसार जुहू चर्च मार्गावरील पृथ्वी थिएटरची वास्तू बांधली गेली. या थिएटरच्या वास्तूची बांधणी होत असताना त्यावर शशी कपूर यांच्या पत्नी जेनिफर कपूर बारीक लक्ष ठेवून होत्या. ५ नोव्हेंबर १९७८ पासून पृथ्वी थिएटरची वास्तू रंगभूमीच्या सेवेत रुजू झाली. नाट्यधर्मींच्या सेवेसाठी नुसते थिएटर बांधले म्हणजे आपले उत्तरदायित्व पूर्ण झाले असे मानणाऱ्यांतले शशी व जेनिफर दोघेही नव्हते. या थिएटरमध्ये रंगभूमीला पोषक ठरतील असे नवेनवे प्रयोग होत राहिले पाहिजेत ही जाणीव पहिल्यापासून या दोघांनी तेथे कार्यरत असणाऱ्या लोकांमध्ये रुजविली. श्री पृथ्वीराज कपूर मेमोरियल ट्रस्ट अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची स्थापना करुन हिंदी नाटके व परफॉर्मिंग आर्टला जास्तीत जास्त लोकांसमोर नेण्याचा उद्देश शशी कपूर व जेनिफरने ठेवला. हे काम पृथ्वी थिएटरच्या मार्फत त्यांनी जोमाने केले.
जेनिफर कपूर यांनी पृथ्वी थिएटरच्या संचालनात संपूर्ण लक्ष घातले होते. १९८४ सालापर्यंत जेनिफर यांनी या थिएटरचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. शशी कपूर हे पृथ्वी थिएटरचे व्यवस्थापकीय संचालक होते. पण जेनिफर यांच्या निधनानंतर थिएटरचे दैनंदिन कामकाज त्यांचा मुलगा कुणाल कपूर व संजाना कपूर पाहू लागले. 
पृथ्वी थिएटरची स्थापना झाल्यानंतर सादर झालेल्या पहिल्या नाटकांमध्ये गो. पु. देशपांडे लिखित उध्वस्त धर्मशाळा या नाटकाच्या हिंदी रुपांतरणाचा समावेश होता. त्यामध्ये नासीरुद्दीन शाह, ओम पुरी, बेंजामिन गिलानी यांनी काम केले होते. त्यानंतर इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनने (इप्टा) सादर केलेले व एम. एस. सत्यू यांनी दिग्दर्शित केलेल्या बकरी या हिंदी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला होता. पृथ्वी थिएटरने स्थापनेपासूनच नेहमीच वेगळ्या धाटणीच्या व प्रयोगशील नाटकांना प्रोत्साहन दिले आहे. पृथ्वी थिएटर सुरु झाले त्यावेळी मराठी रंगभूमीवरही प्रयोगशील प्रवाह वाहातच होते. पण मुंबईत इंग्रजी नाटकांचा दक्षिण मुंबई परिसरात जास्त बोलबाला होता. गुजराती रंगभूमीवर फार्सनी धुमाकूळ घातला होता. या सग‌ळ्यातून वेगळी वाट काढून पृथ्वी थिएटरने हिंदी नाटकांना सक्रिय मदत केली. आपले नाट्यगृह इतरांपेक्षा कमी भाडे आकारुन शशी व जेनिफर कपूर हिंदी नाट्यकर्मींना उपलब्ध करुन देत असत. त्यामुळे १९७०च्या दशकात मुंबईत हिंदी नाटकांमध्ये जे प्रयोगशील वातावरण तयार झाले त्यात शशी व जेनिफर कपूर यांचाही सहभाग होता असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. १९८३ साली पृथ्वी थिएटरला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जो नाट्योत्सव झाला त्यात या कालावधीत पृथ्वी थिएटरमध्ये जी सर्वोत्कृष्ट नाटके सादर करण्यात आली होती ती पुन्हा दाखविण्यात आली. नाटकांशी असलेले या थिएटरचे प्रेम इतके आगळे होते की अगदी जेनिफर कपूर यांचे निधन झाले त्या दिवशीही नाट्यगृह बंद न ठेवता त्या दिवशीही तिथे नाटकांचे प्रयोग झाले. 
१९९०च्या सुरुवातीला शशी व जेनिफर कपूर यांची मुलगी संजना हिने पृथ्वी थिएटरच्या कामकाजात लक्ष घालायला सुरुवात केली. अर्थात तिला शशी कपूर यांचे मार्गदर्शन लाभत होतेच. त्यातूनच संजना कपूरने पृथ्वी प्लेअर्स व लिटल पृथ्वी थिएटर्स (बालरंगभूमीिवषयक उपक्रम) असे दोन उपक्रम सुरु केले. पृथ्वी थिएटरच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने एक विशेष टपाल तिकीटही काढले. आज पृथ्वी थिएटरमध्ये दरवर्षी विविध नाटकांचे ५४० शोज होतात. तेथील नाट्यमहोत्सवात कधी कधी मराठी नाटकेही सादर होतात. विविध भाषांतील रंगभूमीवरचे प्रवाह आपल्या रंगमंचावर यावेत यासाठी पृथ्वी थिएटरचे संचालक धडपडत असतात. त्यांना ही दूरदृष्टी शशी व जेनिफर कपूरमुळे. त्यांच्या नाट्यप्रेमाची ज्योत जिथे अखंड तेवत असते त्या पृथ्वी थिएटरच्या वास्तूलाही शशी कपूर यांच्या निधनाने नक्कीच गदगदून आले असेल.

जिंगलचा जादूगार - लुईस बँक्स - दै. दिव्य मराठी दि. १० डिसेंबर २०१७. - समीर परांजपे

लुईस बँक्स या भारतीय जाझ संगीतक्षेत्रातील पितामहाबद्दल त्यांचे मित्र व संगीतकार अशोक पत्की यांच्याशी संवाद सांगून त्यावर आधारित मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या १० डिसेंबर २०१७च्या रसिक पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची वेबपेजलिंक व टेक्स्ट व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-HDLN-sameer-paranjape-write-about-louis-baoks-5765555-PHO.html
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/10122017/0/4/
---
जिंगलचा जादूगार
--
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
लुईस बँक्स म्हणजे भारतीय जॅझ संगीताचे पितामह. पाश्चिमात्य संगीतावर विलक्षण प्रभुत्व असलेल्या लुईस यांनी आपल्या संगीताने त्यांनी रसिकांना व स्वत:ला चिरतरुण ठेवले. अशा या असामीच्या वयाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या बातमीवर अनेकांचा विश्वास बसला नाही. पण ते खरे होते. त्यानिमित्त मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात अनेक नामवंत गायक-वादकांनी आपली कला सादर करुन लुईस बँक्सच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीला मानाचा मुजरा केला. त्या लुईस बँक्स यांच्या सांगितिक कारकिर्दीबद्दल त्यांचे मित्र संगीतकार अशोक पत्की यांच्याशी साधलेला हा संवाद.
---
`मिले सूर मेरा तुम्हारा...' या साडेतीन मिनिटांच्या जिंगलचे सूर निनादू लागले दूरदर्शनवरुन १९८८ साली. सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला या गाण्याने. मिले सूर मेरा तुम्हाराचे मुळ कडवे हिंदीतून लिहिले होते प्रसून पांडे यांनी. तेच कडवे आणखी १२ भाषांत अनुवादित करण्यात आले. विविध भाषांमध्ये नामवंत गायकांनी आळवलेल्या `मिले सूर मेरा तुम्हारा' या जिंगलची मुळ भैरवीतील चाल बांधली होती प्रख्यात संगीतकार अशोक पत्की यांनी. ही जिंगल जेव्हा सुरू होते तो प्रारंभीचा वाद्यमेळ, प्रत्येक भाषेतील कडव्यामध्ये येणारा तसेच हे गाणे जेव्हा अंतिम चरणापर्यंत येते तेव्हा कानावर पडणारा वाद्यसाज ही म्युझिक अॅरेंजमेंटची सगळी किमया होती लुईस बँक्स यांची. त्यांचे संगीतातील कर्तृत्व विविधांगी आहे. लुईस बँक्स म्हणजे जिंगल्सचा जादूगार. लुईस बँक्स म्हणजे भारतीय जॅझ संगीताचे पितामह. पाश्चिमात्य संगीतावर विलक्षण प्रभुत्व असलेल्या लुईस यांनी आपल्या संगीताने त्यांनी रसिकांना व स्वत:ला चिरतरुण ठेवले. अशा या असामीच्या वयाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या बातमीवर अनेकांचा विश्वास बसला नाही. पण ते खरे होते. त्यानिमित्त मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात उस्ताद झाकिर हुसेन, शंकर महादेवन, शिवमणी, रवी चारी, राकेश चौरसिया, जीनो बँक्स, श्रीधर पार्थसारथी, शेल्डन डिसिल्व्हा आणि कार्ल पीटर्स आदी नामवंतांनी आपली कला सादर करुन लुईस बँक्सच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीला मानाचा मुजरा केला.
`मिले सूर मेरा तुम्हारा' असे लुईस बँक्सबरोबर ज्यांचे सुरेल नाते जुळले ते संगीतकार अशोक पत्की यांची सांगितिक वाटचाल एकमेकांना समांतर अशीच आहे. अशोक पत्की यांनी आजवर दहा हजार जाहिरातींच्या जिंगल्स तयार केल्या तर लुईस बँक्स यांनी पंधरा हजार जाहिरातींच्या जिंगल्स. अशोक पत्की लुईस बँक्स यांच्या नादमयी आठवणी सांगू लागले `मिले सूर मेरा तुम्हारा या जिंगलच्या १३ भाषांतील कडव्यांचे ध्वनिमुद्रण पूर्ण झाले. सगळ्या भाषांतील कडव्यांचे तुकडे आम्ही रेकॉर्ड केले होते. हे सारे मग लुईस बँक्स यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या जिंगलचे पहिल्यापासून टेक ऑफ घेणे व तिला क्लायमेक्सला नेऊन सोडणे हे काम लुईस बँक्सनी अप्रतिमरित्या केले आहे. प्रत्येक भाषेतील कडव्यांना चपखल बसेल असे म्युझिक अॅरेंजमेंट त्यांनी केले. या जिंगलसाठी जर तुम्ही मला शंभर गुण देणार असाल तर लुईस बँक्स यांना दोनशे गुण दिले पाहिजे. एखादे कमळ फुलते त्याप्रमाणे त्यांच्या म्युझिक अॅरेंजमेंटने ही जिंगल बहरली आहे.'
`लुईस हे मुंबईत येण्यापूर्वी कोलकातात हॉटेलमध्ये जॅझ बँडमध्ये वाजवायचे असे मला कळले होते. मनोहरीसिंग हे आर. डी. बर्मन यांचे अॅरेंजर होते. ते व लुईस बँक्स हे नातेवाईक. मनोहरीसिंग यांनी लुईसना मुंबईत आणले. तेव्हा आर. डी. बर्मन यांचा जमाना होता. आर. डी. बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गाण्यांमधे वाद्यवादन करण्याचे काम लुईस करु लागले. मीही आर.डी. कडे दहा वर्षे काम केले आहे. शोलेपर्यंत मी आरडीकडे होतो. आरडीकडेच माझी लुईस बँक्सशी ओळख झाली. मला स्वतंत्रपणे जिंगल करण्याचे काम मिळाले की मग लुईसला सांगायचो की जरा माझ्याकडे वाजवायला ये. तेव्हा या वाद्यवादनाचे मानधन मिळायचे साडेसातशे रुपये. १९८०चा हा काळ होता. तेव्हा ही मानधनाची रक्कम मोठीच होती. लुईस काय किंवा फ्रँको, झरीन दारुवाला, हरिप्रसाद चौरसिया असे त्यावेळचे अनेक वादक माझ्याकडे काम करायला प्रेमाने तयार व्हायचे. लुईस बँक्सचे यांचे वैशिष्ट्य असे की ते पाश्चिमात्य संगीतात माहिर होते. संगीतात जे जे नवीन तंत्रज्ञान यायचे ते बँक्स लगेच आत्मसात करायचे. पाश्चिमात्य वाद्य कसे वाजवायचे हे शिकण्यासाठी लोक लुईस यांच्याकडे आवर्जून यायचे. बँक्स सिंथेसायझरची कॉड कसे देतात हे पाहाणेही खूप काही शिकवून जायचे. लुईस बँक्स व केरसी लॉर्ड हे आर.डी.कडे सिंथेसायझर वाजवायचे. लुईस बँक्स यांना संगीतातल्या नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. आपल्याला पाश्चिमात्य संगीत उत्तम येते या गोष्टीवरच ते समाधानी राहिलेत असे कधी झालेले नाही. त्यांना आपल्याकडील संगीताचे ज्ञान दुसऱ्यांना देण्यात आनंद वाटतो. मीही त्यावेळी थोडेफार सिंथेसायझर वाजवायचो. त्यावेळी मग ते मला आवर्जून सांगायचे की सिंथेसायझरची अमुक एक कॉड वाजविली की हा स्वर मिळतो, दुसरी कॉड वाजविली की अजून वेगळा स्वर मिळतो वगैरे...जेव्हा ते मी संगीत दिलेल्या जिंगलमध्ये वाद्यवादनासाठी यायचे तेव्हा आवर्जून विचारायचे की ही जिंगल कोणत्या रागात बनविली आहे? कोणत्या पद्धतीने ती गायली जाणार आहे? लुईस बँक्स हे ज्या जिज्ञासूपणे हे प्रश्न विचारायचे त्याचे कारण त्यांची विनम्रता व सतत वेगळे शिकत राहाण्याचा स्वभाव. नाहीतर एखादा म्हणाला असता की, मला या जिंगलमध्ये वाजविण्याचे अमुक इतके पैसे मिळत आहेत. मी कशाला बाकीच्या चौकशा करीत बसू? पण असा व्यवहारी विचार लुईस बँक्स यांनी कधीच केला नाही. या सगळ्या गुणांमुळे आम्हा दोघांची चांगली गट्टी जमली होती.'
अशोक पत्की सांगत होते ` एकदा लुईस बँक्सना मी म्हटले की माझ्या जिंगलसाठी तुम्ही वाजवता. खरे तर तुम्हाला तुमच्या कामाचे जास्त पैसे मिळाले पाहिजेत पण माझे बजेटच कमी असते. मी तुम्हाला वाद्यवादनाचे इतर नामवंत देतात त्याप्रमाणे दोन ते तीन हजार रुपये मानधन देऊ शकत नाही. त्यावर लुईस बँक्स मला म्हणाले त्याची चिंता करु नका. मी तुमच्यासाठी वेळप्रसंगी मोफतही काम करेन. पण त्यांच्याकडून कमी पैशात काम करुन घेणे मलाही आवडत नव्हते. त्यामुळे नंतर मी त्यांना वाजविण्यासाठी बोलाविण्याचे कमी केले. मी संगीत दिलेल्यापैकी किमान १०० जिंगलमध्ये तरी लुईस बँक्स यांनी वाद्यवादन केले असेल.'
`लुईस बँक्स व वनराज भाटिया यांना पाश्चिमात्य संगीताबद्दल लेक्चर देण्यासाठी अमेरिका, इंग्लंड अशा अनेक देशांत बोलाविले जाते. भारतीयांसाठी ही बाब निश्चितच अभिमानाची आहे. लुईस बँक्स यांचा स्वभाव गोड आहे. ते कुणाशीही स्पर्धा करत नाही. सिंथेसायझर वादनाचे त्यांनी मला स्वत: बोलावून धडे दिले. हा त्यांचा मोठेपणा आहे. दुसऱ्याला शिकविण्यात त्यांना आनंद वाटतो. अशा या सुस्वभावी माणसाला आमच्या संगीतक्षेत्रात काही लोकांनी खूप छळले आहे. आता मी त्यांची नाव घेत नाही. दुसरा कोणी येऊन आपल्या पुढे जाऊ नये म्हणून मत्सरी लोकांकडून असा त्रास एखाद्याला दिला जातो. लुईस बँक्स उत्तम सिंथेसायझर वाजवतात अशी किर्ती पसरलेली होती. पूर्वी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत वादकांची रिहर्सल व्हायची. अकरा वाजता गायक किंवा गायक यायचे. तोपर्यंत वादकांनी नाश्ता वगैरे करुन घेण्यासाठी त्यांना स्टुडिओबाहेर जाऊ दिले जायचे. हे सगळे वादक बाहेर गेले की कोणीतरी लुईस बँक्सच्या सिथेंसायझरचे एखादे बटन बदलून ठेवायचा. त्यामुळे त्या वाद्याचा आवाज बदलायचा. सेटिंग बदलायचे. लुईस बँक्स रडवेले होतील इथपर्यंत असा त्रास काही जणांनी त्यांना दिला. त्यामुळे नंतर लुईस बँक्सनी फिल्म लाईनच काही काळ सोडून दिली होती. आपले काहीतरी स्वतंत्र करायला हवे या विचाराने मग ते जिंगल्सकडे वळले. तेथे त्यांनी जे भव्य काम केले ते आज आपल्यापुढे आहे.'
`आजही कोणतीही जिंगल वाजून संपली की एक सिग्नेचर ट्यून येते. तिचे चार नोट वाजतात. ती लुईस बँक्स यांनी तयार केली आहे. लुईस बँक्सचा स्वभावही चांगला आहे, वादनही चांगले आहे. अशा गुणांमुळे लोक त्यांना मान देतात. आताच्या संगीताचे बिघडलेले स्वरुप बघून लुईस बँक्सनाही नक्कीच त्रास होत असेल. आता नवीन तंत्रज्ञानामुळे संगीतातही सगळे रेडिमेड मिळते आहे. त्यामुळे क्रिएटिव्हीटी मारली जात आहे.' असे सांगून अशोक पत्की यांनी या संवादाला पूर्णविराम दिला. लुईस बँक्स व अशोक पत्की हे दोघेही प्रसिद्धीपराड्मुख. काहीसे अबोलही. या दोघांमधील स्नेहबंध जाणून घेताना कधी त्यात गुंतून व गुंगून गेलो हे कळलेच नाही.
हमारा लुईस बँक्स...
भारतीय जॅझ संगीतातील गॉडफादर असा ज्यांचा गौरव होतो त्या लुईस बँक्स यांनी संगीतकार म्हणून या क्षेत्रातील प्रत्येक बाजू आत्मसात केली आहे. चित्रपटांच्या गाण्यांची रचना ते ध्वनिमुद्रण यांपासून सर्वच अंगांमध्ये ते वाकबगार आहेत. पण त्यांची संगीत जगातला ओळख आहे ती ‘की-बोर्ड किंग’ म्हणून. इंडीपॉप, प्रागतिक आणि समकालीन जॅझ तसेच इंडो जॅझ फ्युजनमध्ये त्यांनी लीलया काम केले आहे. ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन झालेला लुईस बँक्स यांनी ज्या जाहिरात जिंगल्स बनविल्या त्यातील गोल्ड स्पॉट- द झिंग थिंग, कॅडबरी– क्या स्वाद है, हमारा बजाज यांसारख्या जाहिरातींच्या जिंगल खूपच लोकप्रिय झाल्या होत्या. बँक्स यांनी हम, हुकुमत, बरसात, डुप्लिकेट, औजार, दिव्यशक्ती आणि सुर्यवंशी आदी चित्रपटांसाठी पार्श्वसंगीत तयार केले आहे. चित्रपट, टीव्ही मालिका आणि टीव्ही टॉक शो, जाहिराती, नाटके, राष्ट्रीय एकात्मता चित्रपट, लघुपट आणि फॅशन शो यांसारख्या वैविध्यपूर्ण माध्यमांमध्ये काम करणारे ते एकमेव संगीतकार आहेत. ही कलात्मक कामगिरी पाहून `हमारा लुईस बँक्स...' असेच प्रत्येक रसिकाला त्यांच्याबद्दल वाटत असेल हे नक्की.

Saturday, December 2, 2017

नव्या रुपातील `टुरटूर' नाटक सादर करणार मुंबई विद्यापीठातील अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे विद्यार्थी - दिव्य मराठी - २९ नोव्हेंबर २०१७ - समीर परांजपे



दै. दिव्य मराठीच्या दि. 29 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. तिची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/beed/251/291…/0/7/
---
नव्या रुपातील `टुरटूर' नाटक सादर करणार मुंबई विद्यापीठातील अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टसचे विद्यार्थी
- पुरुषोत्तम बेर्डेच करणार दिग्दर्शन, २२ व २३ डिसेंबर रोजी विद्यापीठात होणार प्रयोग
- २५ कलाकारांमध्ये एका फ्रेंच युवतीचाही समावेश
- समीर परांजपे
मुंबई, दि. 29 नोव्हेंबर - लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, विजय कदम आदी कसलेल्या कलाकारांनी गाजविलेले व पुरुषोत्तम बेर्डे यांनी लिहिलेले, दिग्दर्शित केलेले `टुरटूर' हे नाटक आता मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस या विभागातर्फे नव्या कलाकारांच्या संचात लवकरच सादर केले जाणार आहे. या नव्या रुपातील टुरटूर नाटकाचे दिग्दर्शन पुरुषोत्तम बेर्डेच करीत असून नव्या प्रयोगांत चक्क एक एक फ्रेंच मुलगीही भूमिका करीत आहे.
यासंदर्भात लेखक व दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी सांगितले की, टुरटूर हे तरुणांचे नाटक आहे. १७ फेब्रुवारी १९८३ रोजी मुंबईच्या गिरगावमधील मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यगृहात या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शक, संगीत अशा अनेक आघाड्या मी एकट्याने सांभाळल्या होत्या. त्यानंतर पुढच्या बारा वर्षांत टुरटूर या नाटकाचे सुमारे ८०० प्रयोग तरी झाले असतील. हे नाटक खूप गाजले होते. या नाटकातील मूळ प्रयोगांत ११ कलाकार व २ गायक, वादक यांचा समावेश होता. आता मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस विभागातील मास्टर ऑफ थिएटर आर्ट््स या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकणारे २५ विद्यार्थी नव्या रुपातील टुरटूर या नाटकात काम करीत आहेत. त्या विद्यार्थ्यांपैकी मार्गारिटा मरिन्कोला ही फ्रेंच विद्यार्थीनीही या नाटकात एक भूमिका करणार आहे. आजच्या काळातील तरुणांना ज्या गोष्टी प्रिय आहेत, त्यांचा उल्लेख नव्या रुपातील टुरटूरच्या प्रयोगांत असणार आहे. विद्यापीठातील या विद्यार्थी कलाकारांनाच घेऊन टुरटूर या नाटकाचे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर करायचे की नाही हे अजून काही ठरविलेले नाही असेही पुरुषोत्तम बेर्डे पुढे म्हणाले.
मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्टस या विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मंगेश बनसोड यांनी सांगितले की, मास्टर ऑफ थिएटर आर्ट््सच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून टुरटूर हे नाटक करीत असले तरी त्याचे सादरीकरण आम्ही व्यावसायिक रंगभूमीवर जसा दर्जेदार प्रयोग करतात तसेच करणार आहोत. येत्या २२ व २३ डिसेंबर रोजी नव्या रुपातील टुरटूर या नाटकाचे प्रयोग मुंबई विद्यापीठातील ओपन थिएटरमध्ये करण्यात येणार आहेत.
सांस्कृतिक देवाणघेवाणीचा आगळा अविष्कार
मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट््स या विभागात सांस्कृतिक देवाणघे‌वाण हा उपक्रम प्रथमच राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने फ्रेडरिको गार्सिया लोर्का याने लिहिलेल्या ब्लडवेडिंग या नाटकाच्या कोकणी रुपांतरित नाटकाचा प्रयोग गोवा कला अकादमीतर्फे मुंबई विद्यापीठाच्या अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट््समध्ये सादर केला जाईल. तर अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट््सतर्फे टुरटुरचा प्रयोग पणजी येथील गोवा कला अकादमीमध्ये २ जानेवारी सादर करण्यात येईल.

Thursday, November 30, 2017

वर्तमानातील घटनांशी नाळ जोडणारे जुन्या मराठी नियतकालिकांतील लेख वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरु केली `पुनश्च' वेबसाइट व अॅप - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी २८ नोव्हेंबर २०१७

दै. दिव्य मराठीच्या 28 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेजलिंक व मजकूर, जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/28112017/0/5/
---
वर्तमानातील घटनांशी नाळ जोडणारे जुन्या मराठी नियतकालिकांतील लेख
वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरु केली `पुनश्च' वेबसाइट व अॅप
मराठी साहित्यविश्वात होतोय प्रथमच असा अभिनव प्रयोग
- समीर परांजपे
मुंबई, दि. 28 नोव्हेंबर - मराठी साहित्यविश्वामध्ये अनेक नियतकालिके, वर्तमानपत्रे प्रसिद्ध होत आहेत. त्यामध्ये तत्कालीन विषयांवर जे प्रसंगोपात लेख प्रसिद्ध झालेले असतात ते कालांतराने नजरेआड होतात. जुन्या काळातील असे उत्तमोत्तम लेख जर विद्यमान परिस्थिती किंवा घटनांनाही लागू पडत असतील तर ते लेख शोधून मराठी वाचकांसमोर आणावेत या विचाराने ठाण्याच्या किरण भिडे यांनी `पुनश्च' या नावाने अॅप वwww.punashcha.com ही वेबसाइट नुकतीच सुरु केली आहे. अशा प्रकारची संकल्पना व या संकल्पनेवरील वेबसाईट व अॅपचा प्रयोग मराठी साहित्यविश्वात प्रथमच होत आहे.
यासंदर्भात `पुनश्च'चे संचालक किरण भिडे यांनी `दिव्य मराठी'ला सांगितले की, जुने पण कालसुसंगत साहित्य जे लेखक आणि संपादक यांनी खूप मेहनतीने तयार केलेले असते ते आज कुठेतरी धुळीत, रद्दीत, ग्रंथालयांच्या कपाटात पडून आहे ते वाचून त्यातले निवडक लेख युनिकोडमध्ये टाईप करून ऑनलाईन आणणे. असे उत्तमोत्तम साहित्य जास्तीतजास्त चोखंदळ वाचकांपर्यंत वेबसाईट आणि द्वारे पोहोचवणे. लेखकांना थेट वाचकांशी जोडून देणे आणि त्यांना नुसताच `मान' नाही तर 'धन'पण मिळेल हे पाहणे. वाचकांच्या प्रतिक्रिया सरळ लेखकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांनी दिलेले उत्तर वाचकापर्यंत हे उद्देश पुनश्च ही वेबसाइट व अॅप सुरु करण्यामागे आहेत.
ते पुढे म्हणाले की, अनेकदा विद्यमान स्थितीमध्ये असे काही प्रसंग घडतात की त्या प्रसंगांशी नाळ जुळेल असे लेख पूर्वी कोणत्यातरी नियतकालिकात किंवा वर्तमानपत्रांत येऊन गेलेले असतात. उदाहरणार्थ पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला याबद्दल अलिकडेच मोठा वाद रंगला. त्या अनुषंगाने नियतकालिकांचे काही मागचे अंक चाळता प्रसाद या मासिकाचा १९६८ सालचा ऑगस्ट महिन्याचा अंक हाती आला. तो गणेशोत्सव विशेषांक होता. त्यात पहिला गणेशोत्सव असा लेख मिळाला. त्यात खूप वेगळी माहिती होती. तो लेख आम्ही `पुनश्च' या उपक्रमाच्या वेबसाइट व अॅपवर झळकवला. तो लेख जुना असूनही आजच्या परिस्थितीलाही लागू पडणारा असल्याने वाचकांनी त्याचे स्वागतच केले. बालगंधर्वांच्या बाबतचा एक लेख असाच आम्हाला विचित्र विश्व या नियतकालिकाच्या १९८५ सालच्या अंकात मिळाला. बालगंधर्वांची अखेर असे त्या लेखाचे शीर्षक होते व तो लिहिला होता वसंत वैद्य यांनी. बालगंधर्वांच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त तो लेख `पुनश्च'वर दिल्यानंतर त्या जुन्या लेखाचेही वाचकांनी भरभरुन स्वागत केले.
किरण भिडे पुढे म्हणाले की, विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे यांच्यातील जुन्या लेखांना अतिशय महत्वाचे संदर्भमूल्य असते. ताज्या घटनांशी नाळ जोडणारे हे जुने लेख त्याच वेळी वाचकांसमोर आणले तर त्याची खुमारीही वेगळी असते. जुन्या लेखांचा शोध घेतल्यानंतर त्या लेखाचे लेखक ह्यात असतील तर आम्ही त्यांचा हा लेख वेबसाइट व अॅपवर झळकविण्यासाठी लेखी परवानगी घेतो व त्यांना योग्य ते मानधनही लगेच पाठवून देतो. जर एखाद्या लेखाचा लेखक ह्यात नसेल तर त्याच्या वारसांकडून परवानगी मिळविण्याचा प्रयत्न करतो. तेही शक्य न झाल्यास तशी नोंद त्या लेखाखाली केली जाते. जर त्यातून वारसदारांचा शोध लागला तर त्यांना या लेखापोटी योग्य मानधन पोहचविले जाते. `पुनश्च'ची वेबसाइट व अॅप याचे सदस्य होणाऱ्या प्रत्येकाकडून वार्षिक शंभर रुपये एवढेच शुल्क आकारण्यात येते.
बॉक्स
लेखांच्या विषयानुरुप दिल्या जातात व्हिडिओ लिंक्स व शब्दार्थही
नव्या पिढीतील बहुसंख्य मुले मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमातून शालेय व पुढील शिक्षण घेत असतात. या युवा वर्गाला वर्तमानातील घडामोडींशी नाळ जोडणारे जुने लेख वाचायला प्रोत्साहित करावे यासाठी पुनश्च वेबसाइट व अॅपने काही नावीन्यपूर्ण गोष्टी केल्या आहेत. जुन्या नियतकालिकातील एखादा लेख जर पुनश्चवर प्रकाशित करण्यात आला तर त्यातील काही मराठी शब्दांचे अर्थ उलगडणारी लिंक या शब्दाच्या लगतच दिली जाते. त्याचबरोबर जो विषय असेल त्याच्याशी संबंधित व्हिडिओ किंवा वेबसाइटची लिंक लेखाच्या जोडीने समाविष्ट केली जाते. जेणेकरुन वाचकाला त्या विषयाचे सर्वंकष आकलन व्हावे. डिजिटल माध्यमामुळे हे सारे करता येणे शक्य असल्याने वाचकही उत्तम संदर्भमूल्य असलेले हे जुने लेख आवडीने वाचतील असे `पुनश्च'च्या किरण भिडे यांनी सांगितले.
दरवर्षी वाचायला मिळतील १०४ लेख
पुनश्च या वेबपोर्टल व अॅपवर वाचकांना वर्षभरात १०४ लेख वाचता येतील. या वेबपोर्टल व अॅपच्या माध्यमातून सभासद वाचकांना दर बुधवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून दोन लेख वाचावयास मिळतील. पुनश्चने चार आठवड्याचे म्हणजे आठ लेखांचे एक वेळापत्रक बनवलं आहे. वर्षात ५२ आठवडे असतात म्हणजे तेरा वेळा हे वेळापत्रक रिपिट होईल. पुुनश्चने मराठी ललित लेखनाचे ढोबळमानाने ८ प्रकार केले आहेत. (१) अनुभवकथन (२) चिंतन (३) व्यक्ती/संस्था परिचय (४) कविता/पुस्तक/चित्रपट/कला रसास्वाद (५) अर्थकारण/ राजकारण/ समाजकारण ( धर्म/अध्यात्म, जाती, अंधश्रद्धा, महिला इ. ) (६) कथा, स्वमदत लेख, स्थललेख, मृत्युलेख, उद्योग (७) आरोग्य/ शिक्षण/ पर्यावरण/ पालकत्व/ खेळ/ मराठी भाषा (८) खुला ( प्रासंगिक, मन/ मेंदू/ विज्ञान/ तंत्रज्ञान इ. मधील संशोधन वगैरे ).

Monday, November 27, 2017

स्वरांचे शिवधनुष्य! - वैशाली भैसणे-माडे - मुलाखतकार - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. २६ नोव्हेंबर २०१७च्या रसिक पुरवणी

दै. दिव्य मराठीच्या दि. २६ नोव्हेंबर २०१७च्या रसिक पुरवणीत प्रख्यात गायिका वैशाली भैसणे-माडे यांची मी घेतलेली ही मुलाखत.
---
स्वरांचे शिवधनुष्य!
----------
- वैशाली भैसणे-माडे
---
(शब्दांकन : समीर परांजपे)
--
लतादिदी मंगेशकर यांचे गाणे, त्यांचे करिअर, त्यांचे आयुष्य या साऱ्या गोष्टी त्यांच्यानंतरच्या पिढ्यांतील प्रत्येक गायिका अभ्यासत आल्या आहेत. खरंतर लता मंगेशकरांना आदर्श मानूनच अशा शेकडो गायिकांचे करिअर घडले आहे. हे करताना त्यांचे गाणे, त्यांचे आयुष्य यांचा अभ्यास ज्या ज्या गायिकांनी केला, त्यामध्ये मीही एक आहे. दीदींनी जो खडतर प्रवास केला, अफाट मेहनतीने जे यश मि‌‌ळविले, त्याला खरंच तोड नाही. त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि दैवी सुरांनी, पार्श्वगायनातील हे सर्वोच्च स्थान प्राप्त केले , ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते आहे.
माझ्या लहानपणी रेडिओवर कार्यक्रम चालायचे, त्यातून लतादीदींचे गाणे प्रथम ऐकायला मिळाले. लताबाई, आशाबाई, महम्मद रफी, किशोरकुमार, मन्ना डे आणि अशा अनेक गायक-गायिकांंची गाणी त्यावेळी माझ्या कानावर पडायची. पण, स्त्री गायिका म्हणून गाणे सादर करणाऱ्या त्या सर्वोत्कृष्ट गायिका असल्यामुळे मला लतादीदींबद्दलच अधिक आकर्षण वाटायचे. त्यांची गाणी ऐकताना खूप सहज वाटायची, पण गाताना ती अवघड व क्लिष्टही असायची. दीदींच्या गाण्यांची चाल इतकी सोपी वाटते, पण ते गाताना ती चाल आपण त्याच प्रमाणात का गाऊ शकत नाही, असे मला कायम वाटायचे. पण नंतर मला उमगले, लता मंगेशकर हे एक अभ्यासक्षेत्र आहे. हे अभ्यासक्षेत्र एखाद्या पीएच. डी.चा स्वतंत्र विषय होऊ शकते इतके व्यापक आणि खोल आहे. माझ्यापुरते बोलायचे, तर मी जेव्हा अभ्यास या दृष्टीने त्यांचे गाणे ऐकत गेले, तेव्हा त्यातून बऱ्याच गोष्टी शिकले. माइकवर गाणे, लाइव्ह गाणे, स्टेजवर गाणे, रेकॉर्डिंगच्या स्टु़डिओतले सर्व टेक्निक सांभाळून गाणे, या विविध प्रकारांमधील लतादीदी किती वेगळ्या आहेत, या गोष्टी अभ्यासातून मला थोड्याफार कळायला लागल्या. ही माझी प्रक्रिया अजूनही सुरु आहे.
लतादीदींनी गायलेल्या मराठी गाण्यांपैकी माझे अत्यंत आवडते मराठी गाणे म्हणजे ‘मालवून टाक दीप चेतवून अंग अंग' आणि लतादीदींच्या हिंदी गाण्यांपैकी माझे सर्वात आवडते गाणे म्हणजे ‘लग जा गले'. आता हे कबूल करायला हरकत नाही. लतादीदींची जी अतिशय कठीण गाणी आहेत, ती गायला अजूनही मी घाबरते. ‘लग जा गले' हे गाणे जो कोणी ऐकतो, तो सहज मंत्रमुग्ध होतो. मी हे गाणे यापूर्वी किमान एक हजार वेळा तरी विविध प्रसंगी गायले असेन. पण इतक्या वेळा गावूनही मला त्या गाण्याची भीती वाटते. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर लता मंगेशकरांची गाणी गाणे, हे शिवधनुष्य पेलण्यासारखे अवघड आहे. आणखी एक उपमा देते की, लतादीदींची गाणी म्हणजे, हिऱ्याची मोठी खाण आहे. त्यातून तुम्हाला पाहिजे, तो हिरा निवडा, असे जर कोणाला सांगितले, तर तशी निवड करणे खरंच अशक्य आहे.
लतादीदींच्या गाण्यातील हरकती, आलाप, ताल, सूर अशा साऱ्याच गोष्टी अफाट ताकदीच्या आहेत. त्यांच्यासारखे गाणे हे सहजशक्य नाही. त्या ज्या पद्धतीने गाणे गातात, ते गणित मला असे वाटते, आजतागायत कोणालाही जमलेले नाही. कॉपी सगळे करतात, पण लतादीदींसारखे गाता येणे, खरंच खूप अवघड आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली’ हा दीदींचा एक अल्बम आहे किंवा ‘अभंग तुक्याचे’ असा एक अल्बम आहेत. हे दोन अल्बम जरी ऐकले तरी लक्षात येते, की लताबाईंना स्वरसम्राज्ञी का म्हणतात ते! दीदी गाताना संगीत वादकांबरोबर गाण्याचे, त्यांचे जे गणित असते, ते काही जगावेगळे आहे. तो मेळ फक्त आणि फक्त लता मंगेशकरच साधू शकल्या आहेत. मी माझे गुरुजी सुरेश वाडकरांकडे जेव्हापासून गाणे शिकायला जाऊ लागले, तेव्हापासून ते मला लतादीदींच्या गाण्यांची अनेक वैशिष्ट्ये सांगत आले आहेत. ते म्हणतात, संगीतवादक व गायक यांचा जो अजोड मेळ लतादीदी गाणे गात असताना दिसतो हे आणि हे फक्त एकच देवी करु शकते, त्या म्हणजे लतादीदी!
लतादीदींना अनेक जण माँ असेही म्हणतात. अशा प्रसंगी मला वाटते, लता मंगेशकरांकडून आजच्या गायिकांनी काय घ्यावे तर तो, त्यांचा विनम्रपणा आणि त्यांचे गाणे जगणे. एखादे गाणे म्हणणे आणि गाणे बोलणे, हे दोन्ही वेगळे आहे. दीदी गाणे गाण्यापेक्षा, गाणे बोलतात, म्हणजे, त्या गाण्यातील शब्दांच्या भावना इतक्या जिवंत करतात की, गाण्यात वर्णन केलेला अनुभव ते ऐकणाऱ्याच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहातो. लतादीदी गाणे बोलतात, ते याअर्थी. त्यांचे गाणे बोलण्याची ही शैली खूप छान आहे.
एखादे दुसऱ्या भाषेतले गाणे, जेव्हा आपल्याला गायला संधी मिळते, तेव्हा ते असे गावे की त्या भाषेतल्या ऐकणाऱ्या लोकांना ते गाणे त्यांचे वाटावे. लतादीदींनी मराठी, हिंदी गाणी गायलीच , पण त्याचबरोबर इतर अनेक भाषांत त्यांनी गाणी गायली आहेत. दीदींचे उर्दूूचे उच्चार अतिशय चपखल आहेत. इतर भाषांत गाताना त्या भाषेत, त्या शब्दांचा जसा उच्चार होतो, तशाच पद्धतीने तो उच्चार करण्यासाठी दीदींनी अफाट अभ्यास केला आहे. सगळ्याच गायिका गातात, पण उच्चारांमध्ये जर का थोडीशी जरी कमतरता असली, तर कसे वाटते माहिती आहे? एखादी नवरी खूप छान नटून बसली आहे. तिचा साजशंृगार झाल्यावर सर्वात शेवटी तिच्या कपाळावर बिंदी लावली गेली, की तिचा तो मेकअप किंवा साज पूर्ण होतो. तसेच गाण्यातील उच्चारांचेही आहे. उच्चार व त्या शब्दांतील भावना जर त्या भाषेच्या वळणानुसारच तशाच्या तशा गायिकेच्या गळ्यातून उतरल्या, तर त्या गाण्याला पूर्णत्व येते. दीदी कोणत्याही भाषेतले गाणे गायल्या, तरी त्या भाषेचे जे वळण आहे, त्यानुसार होणाऱ्या उच्चारणाला सर्वोच्च महत्व देतात. लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा अभ्यास करताना मी ही गोष्ट खूप अनुसरली. 
अशा या श्रेष्ठ गायिकेला भेटण्याची संधी दोन वेळा आली होती, पण काही कारणाने ती हुकली. तरी मी त्यांची निस्सिम अनुयायी राहणारच आहे. त्यांचे आयुष्य माझ्यासाठी आदर्श आहे. ते आदर्शच राहणार आहे. खरंतर मी त्यांचा जेव्हापासून माग घ्यायला लागले तेव्हापासून, जसे त्यांचे गाणे फॉलो केले, तसे त्यांचे आयुष्यसुद्धा फॉलो केले. लता मंगेशकर यांचा आदर्श ठेवून आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकतो का? त्याचे उत्तर माझ्या मनाने ‘हो’ असे दिले. आता, लतादीदींना मानाचा मुजरा करणारा, त्यांच्याच गाण्यांचा एक कार्यक्रम मी करावा, असे मनात आहे. अजून तो योग काही कारणाने आलेला नाही. पण भविष्यात मी असा कार्यक्रम नक्कीच करणार आहे, कारण माझ्या आदर्शाचे मला अशारितीने ऋण फेडायचे आहे...

माझे लता मंगेशकर विद्यापीठ - संजिवनी भेलांडे - मुलाखतकार - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. २६ नोव्हेंबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. २६ नोव्हेंबर २०१७च्या रसिक पुरवणीत प्रख्यात गायिका संजीवनी भेलांडे यांची मी घेतलेली ही मुलाखत.
---
माझे लता मंगेशकर विद्यापीठ 
---
- संजीवनी भेलांडे
soulsanjivani@gmail.com 
---
(शब्दांकन - समीर परांजपे) 
--
लता मंगेशकर म्हणजे पवित्र, पाक, बेदाग शुद्धता. त्यांची सूरसाधना ही सर्वोत्कृष्टतेचे आदर्श उदाहरण आहे. त्या आदर्श आहेत. त्या विद्यापीठ आहेत. त्या महाग्रंथ आहेत. गाणे कसे म्हणावे या गोष्टीच्या त्या गीता, कुराण, बायबल, वेद, उपनिषद असे सारे काही आहेत. मुख्तसर सी बात है असे म्हटले तर त्या सरस्वतीचे रुप आहेत. त्या विशाल वृक्ष आहेत. त्या वृक्षाच्या छायेतली आम्ही आम्ही छोटी छोटी रोपटी आहोत. मला आठवते की लता मंगेशकरांच्या आवाज पहिल्यांदा रेडिओवरुन मी ऐकला. शनिवारी रविवारी शाळेला सुट्टी असायची. त्या िदवशी रेडिओवर रोज सकाळी साडेसात वाजल्यापासून संगीत सरिता, ठुमरी, विविध भारतीवर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, भुलेबिसरे गीत, गाणी लावून मी बसायचे. वाघ जसा टपून बसलेला असतो तसे टपून बसायचे. माझ्या मावशीने मला अमेरिकेहून एक टेपरेकाॅर्डर आणून दिला होता. लता मंगेशकर यांचे रेडिअोवर लागले की गाण की पटकन टेपरेकॉर्डचे बटन दाबायचे आणि ते गाणे रेकॉर्ड करायचे. मग ते गाणे रेकॉर्ड केलेली टेप रिवाईंड करायची, रिवाइंड करायची, मग रिवाईंड फॉरवर्ड असे करत करत त्या गाण्यामध्ये लतादिदिंनी विशिष्ट ठिकाणी जागा कशी घेतली आहे ती ऐकून त्याची प्रॅक्टिस मी करत असे. हे झाले की मग दुसरी एक ब्लँक टेप घ्यायची आणि ती टेपरेकॉर्डरमध्ये घालायची आणि मग अापण गायचे आणि ऐकायचे की ते गाणे लतादिदिंसारखे झाले की नाही झाले ते. असे करत करत मी लता मंगेशकर विद्यापीठामध्ये शिकले. त्यांचा तो खूप असा स्वच्छ स्वर नेहमी मन मोहवून टाकत असे. `ज्योती कलश झलके' या गाण्यातील लतादिदिंचा सुरुवातीचा आलाप किंवा `किस मोडसे जाते है'चा सुरुवातीचा आलाप सुरु झाला की तो सर्वांना भारुनच टाकतो. पूर्ण खोली भरुन जाते स्वरांनी. तो स्वर अत्यंत बिनचूक असतो. त्याचा असर होतोच होतो आपल्यावर. `आ जाने जा...' या गाण्यामध्ये त्या जो आ लावतात त्यात एवढी ताकद आहे की ऐकणाऱ्याचे सारे लक्ष ते स्वर वेधून घेतात. खरेतर ते आहे एक कॅब्रे गाणे. पण ते गाणे गाताना लतादिदी आपल्या आवाजातून ज्या भावना व्यक्त करतात, त्या गाणे ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोल्याच पाहिजेत. दुसरा पर्ययाच नाही. काही दुसऱ्या गाण्यांची उदाहरणे द्यायची तर `जा मै तोसे नाही बोलू' या गाण्यामध्ये लतादिदींनी सुरांचा अभिनय सादर केला आहे. `जा मै तोसे नाही बोलू' हे एक वाक्य त्या गाण्यामध्ये १५ वेळा येते. दरवेळेला त्या वाक्याच्या चालीत व एक्स्प्रेशनमध्ये खूप व्हेरिएशन आहेत. कधी ते वाक्य रुसून तर कधी विनंती करुन म्हणायचे आहे. एका वाक्याचे किती भाव प्रकट झालेत या गाण्यात. अशी लताजींची कितीतरी गाणी आहेत की ज्यांचे व्हिज्युअल्स तुम्ही बघितलेले नसले तरी त्याची ऑडिओ ऐकताना दिदिंच्या आवाजातून त्या गाण्याची दृश्यात्मकता रसिकाला सहज कळून येते. इतक्या सहजशैलीने त्यात कोणतेही गाणे खुलवितात. मी शाळेत असल्यापासून लता मंंगेशकरांचीच गाणी गात अाले आहे. तेव्हांतर लताबाई म्हणजे कोण हे कळायचेही वय नव्हते. लताबाई माझ्यासाठी मापदंड आहेत. जसा रोज सूर्य उगवतो तसे रोज लता मंगेशकरांचे गाणे ऐकणे हे नित्यकर्तव्य होते व आहे. व्यक्ति व तिची कला यांच्यात कधीही गल्लत करु नये. लता मंगेशकर यांची जी गानकला आहे तीच आम्हा रसिकांसाठी लता मंगेशकर आहे. िचत्रपटात काम करणारे कलाकार, गायक संगीतकार यांच्या कलेशी रसिक म्हणून आपला अधिक संबंध असतो. तसाच असावा. अर्थात लतािददिंना मी भेटले तेव्हा आनंद झाला मला. त्यांना पहिल्यांदा मी एका लग्नासमारंभात भेटले होते. वीस वर्षांपूर्वीची घटना आहे ही. लता मंगेशकर या लिजंड आहेत. लतादिदींचा सूर हा अत्यंत फोकसने लागतो. `आप यू फासलोंसे गुजरते रहे, दिलसे कदमोंकी आवाज आती रही' या गाण्यामध्ये आप यूँ हे शब्द म्हणताना लतादिदींनी जे स्मित केलय ते लाजवाबच आहे. गाण्याचा जो माहोल आहे त्यानूसार लतादिदी गाताना भाव प्रकट करतात. त्यांच्या गाण्यात सुरांचा अभिनय आहे. प्रत्येक कलाकाराची संगीत जाणून घेण्याची एक क्षमता असते. ही क्षमता लतादिदींकडे अफाट आहे. त्यांची शब्दांची समज अफलातून आहे. जेव्हा मी गाणी गातो तेव्हा लता मंगेशकरांकडून आम्ही काय शिकलो तर हेच शिकलो की शब्दांचा अर्थ समजून त्यांना कसे भाव ओतायचे आणि तेही खोटे खोटे नाही. त्या पूर्ण गाण्याची, शायरीची सखोलता समजण्याची क्षमता आपल्यात आली पाहिजे. मीराबाईंच्या पदांचेच उदाहरण घेऊ. मीराची ओळख ही आत्म्याची आहे. मै आत्मन हूँ शरीर नही हूँ असे ती म्हणते. त्यामुळे पाचशे वर्षानंतरही मीराबाईच्या आत्म्याचा जो सुगंध आहे तो तिच्या पदांमधून सर्वांना जाणवतो. त्यामुळे मीराबाईची पदे लताबाईंसारख्या व्यक्तिने गाणे हे अत्यंत साहजिकच आहे. लतादिदिंचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आयुष्यभर स्वत:ची आयुष्य आपली ओळख म्हणजे आपली कला अशीच ठेवलेली आहे. लता मंगेशकर आज ७५ वर्षे गात आहेत. कोणत्या प्रोफेशनमध्ये ७५ वर्षे काम करतात हो? सांगा बरं. शक्यच नाही. एखाद्या अभिनेत्रीची अॅक्युचल कामाची वर्षे १० ते १२ वर्षे धरली तर सात पिढ्यांमधील अभिनेत्रींसाठी लता मंगेशकर यांनी गाणे गायलेले आहे. केवळ कर्तृत्वाच्या जोरावर लतादिदींनी एवढे नाव, यश मिळवले ही अपूर्व गोष्टच आहे. लता मंगेशकरांनी गायलेली मीराची गाणी लहानपणापासून मी ऐकत आले आहे. मी मीराच्या पदांचा इंग्रजीत अनुवाद केला. त्याचे पुस्तक मीरा अँड मी या नावाने प्रसिद्ध झाले आहे. मीराबाईंच्या अनुवादित केलेल्या रचना मी इंग्रजीतून गायले. एखाद्या गायिकेला जी गाण्याची भूक असते ती लतादिदींची गाणी गायल्याने पूरी होते. त्या गाण्यांमध्ये भावनाप्रकटीकरणाला पूरेपूर वाव असतो. खरचं काही उत्तम गायल्यासारखे वाटते. काही काळापूर्वी मी सचिन पिळगावकर यांच्याबरोबर पिकनिक अंताक्षरी हा कार्यक्रम एका चॅनेलसाठी केला होता. दूरदर्शनवर स्वर कवितेचे हा कार्यक्रम प्रवीण दवणे यांच्या बरोबर केला. माझ्या सर्व लाइव्ह शोजचे निरुपण मी स्वत: करते. मग तो शो मराठी, इंग्लीश, उर्दू या तीन भाषांपैकी कोणतीही असो. `लता 75' हा कार्यक्रम मी सादर करते. त्यात लतादिदींची निवडक गाणी मी म्हणते. ती लोकांना आवडतात कारण मूळ गाणीच फार सुंदर आहेत. लताबाईंच्या अनेक गाण्यांचे मी िचत्रीकरण बघितलेलेच नाही. `ये दिल और उनकी निगाहों के सायें' हे त्यांचे गाणे घ्या. या गाण्याचा व्हििडओ यूट्युबवर उपलब्धच नाही. कोण नायिका पडद्यावर गात आहे याची मला काहीही माहिती नाही. पण हे गाणे ऐकल्यावर तुम्ही आपसूक काश्मिरमध्ये पोहोचता. अशी सहजरित्या तुम्हाला आपल्या कवेत घेणारी खूप गाणी आहेत. `हाये जिया रोए' या गाण्यातील रोए या शब्दांत आक्रंदनाचे भाव आहेत. ते लतादिदिंनी ज्या रितीने प्रकट केले आहेत त्याला तोड नाही. `दिलवर दिलसे दिलसे प्यारे' हे गाणे पडद्यावर अरुणा इराणी नाचत नाचत म्हणताना दिसते. त्या नायिकेच्या व्यक्तिमत्वाचा भाग होऊन पार्श्वगायन करणे हे वाटते तितके सोपे नाही. हे काम अत्यंत सहजपणे लता मंगेशकरांनी अनेक गाण्यांत केले आहे. आता आम्ही सारे जण ट्रॅक सिस्टिममध्ये गातो. आधी गाणे रेकॉर्ड होते. मग ते कुठच्या अभिनेत्रीसाठी आहे ते ठरते. पूर्वीप्रमाणे एका नायिकेसाठी खूप गाणी गाण्याची आता िचत्रपटात वेळच येत नाही. फिमेल ओरिएंटेड गाणीच सध्या फारशी नसतात. लतादिदींच्या गानकारकिर्दीला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या संगीताचे विद्यापीठच आहेत. या विद्यापीठात प्रत्येक होतकरु गायक-गायिकेने प्रवेश घेतला पाहिजे. शास्त्रीय संगीताची घराणी आहेत. तशी सुगम संगीताची घराणी नाहीत. त्यामुळे सुगम संगीतात एकच विद्यापीठ आहे ते म्हणजे लता मंगेशकर. लता बाईंचे गाणे हे घराणे आहे. त्यांचा आदर्श ठेवून गाताना त्यांच्या आवाजाची नक्कल कोणीही करु नये. लताबाईंचा स्वर, त्यांची शैली, सूराचा लगाव या गोष्टी बारकाईने अभ्यासण्यासारख्या आहेत. त्या अतिशय बिनचूक आहेत. १०० टक्के सूर लागणे म्हणजे काय याचा अनुभव घ्यायचा असेल तर लतादिदिंचे गाणे ऐकावे. लता मंगेशकर यांच्यासारखे गाणे म्हणजे वरच्या पट्टीत गाणे असे काही जणांना म्हणजे जे त्यांच्यासारखे गाऊ पाहातात त्यांना वाटते. काळी एकच्या वरच्या पट्टीच्या गाऊन वरचा सूर लावणे म्हणजे लता मंगेशकरांसारखे गाणे असा काहींचा समज झालेला असतो पण तो अयोग्य आहे. दिदिंच्या स्वराची शुद्धता आपल्यात आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. जिच्या गळ्यात सूर आहे अशी भारतातील प्रत्येक मुलगी एकलव्यासारखे लताबाईंचे गाणे शिकते. मी पण असाच त्यांच्या गाण्याचा अभ्यास केला आहे. भक्तीचा स्वर म्हटला की लतादिदिंचे अल्ला तेरो नाम हे गाणे आठवते. लोरी म्हणजे धीरे से आजा रे अखियनमे, भूपाळी म्हणजे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, रोमान्स म्हणजे `तेरे लिए पलकोंकी चादर ओढे' अशी समीकरणे अनेकांच्या मनात तयार झाली आहेत. याचे कारण लतादिदींचा मधुर स्वर. मधुबाला ते माधुरीपर्यंतच्या कित्येक पिढ्यांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ७५वर्षे झाली तरी एखाद्या व्यक्तीचे काम कसे तरुण राहाते हे पाहायचे असेल तर लतादिदिंच्या गाण्यांकडे पाहा. लतादिदींची गाणी गाताना मला खूप समाधान मिळते. गायनाबरोबरच मी म्युझिक कंपोझिंगला सुरुवात केली. हृदयनाथ मंगेशकर हे महान संगीतकार आहेत. त्यांच्या शैलीचा माझ्या म्युझिक कंपोझिंगवर खूप मोठा प्रभाव आहे. पण गाणे हृदयनाथ मंगेशकरांसारखे बनवावे हाच माझा प्रयत्न असतो. लतादिदींचा माझ्यासारख्या गायिकांवर जो प्रभाव आहे तो अमीट आहे. लतादिदी या एकमेवाद्वितीय आहेत.

जैत रे जैतच्या वेळी सृजनाचे योग जुळले... - - लता मंगेशकर - (शब्दांकन - समीर परांजपे) - दै. दिव्य मराठी दि. 15 आँक्टोबर 2017



भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांची मी घेतलेली मुलाखत
----
भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांची मी जैत रे जैत चित्रपटाच्या आठवणींसंदर्भात घेतलेली ही विशेष मुलाखत. हा सुवर्णयोग आला ती मुलाखत दै. दिव्य मराठीच्या दि. 15 आँक्टोबर 2017च्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाली आहे. तो मजकूर, जेपीजी फाइल व वेबपेजलिंक सोबत दिली आहे.
---
सृजनाचे योग जुळले...
------------------------
- लता मंगेशकर
------------------------
(शब्दांकन - समीर परांजपे)
-----
‘जैत रे जैत’ या कादंबरीवर आम्ही चित्रपट काढला. आप्पासाहेब दांडेकरांची ही अत्यंत आवडती कादंबरी होती. त्यामुळे निर्माती म्हणून उषाने (मंगेशकर) या कादंबरीवर चित्रपट बनविण्याची इच्छा आहे सांगितले. तेव्हा आप्पासाहेब अतिशय खुश झाले.
माझी आप्पांची ओळख तशी खूप जुनी. मी भगवद््गीता रेकॉर्ड केली तेव्हाची. त्यावेळी आप्पासाहेब घरी येऊन संस्कृत मला शिकवायचे. सगळी भगवद््गीता म्हणून दाखवायचे. मला म्हणायचे, म्हणून दाखवा, आता मला. मग संभाषण करायला लावायचे. त्यातल्या चुका लक्षात आणून द्यायचे. संस्कृत उच्चारांमधले दोष सांगायचे. आम्ही पहिल्यांदा घरी रिहर्सल करायचो. मग मी भगवद््गीतेतले अध्याय रेकॉर्ड करायचे.
आप्पा दांडेकरांशी आमचे असे स्नेहबंध होते. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या दोघांतला जिव्हाळ्याचा विषय होता. पुढे त्यांच्या ‘जैत रे जैत’ या कादंबरीवर आम्ही चित्रपट करायचे ठरविले, तेव्हा हृदयनाथ मंगेशकर यांनी त्या चित्रपटाचे संगीत करावे ,असेही ठरले. या चित्रपटात माझे एकच गाणे होते. ते म्हणजे,‘मी रात टाकली.' गाणे अतिशय सुंदर होते. पण हेच कशाला, सगळीच गाणी त्या सगळ्या वातावरणाला शोभेल अशीच होती. हा चित्रपट ठाकर या आदिवासी जमातीतील माणसांची गोष्ट सांगतो. जब्बार पटेल हा चित्रपट बनविताना एका गोष्टीवर ठाम होते ते, म्हणजे कथानकात जे आहे तेच शक्यतो, या चित्रपटात दाखवायचे. उगीचच नवीन काहीतरी ड्रेस तयार केलेत, ठाकरांच्या बोलीपेक्षा चित्रपटातील पात्रे वेगळेच, काही बोलत आहेत किंवा उगीचच भलत्या ठिकाणी डान्सचे गाणे घातले आहे असे जब्बार पटेल यांनी काहीही केले नाही. चित्रपटातील नृत्याच्या जागेत ठाकरांचे नृत्य घेतले. ठाकरांची जशी जीवनशैली आहे, तशीच चित्रपटात दाखविली. म्हणूनच चित्रपट उत्तम झाला. त्याला विश्वासार्हता आली.
‘जैत रे जैत’ या चित्रपटात चिंधी या नायिकेच्या भूमिकेत स्मिता पाटील होती. तिने आणि मोहन आगाशे यांनी खूपच छान काम केले. शांतारामबापूंचा नातू सुशांत रे याने लहानपणीच्या नाग्याची भूमिका केली होती. त्याचाही भाग स्मरणात राहणारा होता. या चित्रपटाशी जोडलेली एक गोष्ट सांगते. तो प्रसंग ऐकून, आम्हीही भयंकर घाबरलो होतो. ते म्हणजे, कर्नाळ्याला चित्रीकरणादरम्यान मोहन आगाशेे यांना खरोखर मधमाश्या चावल्या होत्या. त्याचा त्यांना खूप त्रास झाला होता. औषधोचारही घ्यावे लागले होते. अशा अडचणींवर मात करुन ज्या वास्तववादी पद्धतीने हा चित्रपट बनवायला हवा होता, तसाच जब्बार पटेल यांनी बनविला. हृदयनाथनी चित्रपटासाठी जी गाणी केली, ती अगदी त्या कथानकाला अनुरुप अशीच होती.
ना. धो. महानोर यांनी ही सर्व गाणी लिहिली. त्यांच्यासोबत पुढे मी‘माझ्या आजोळची गाणी' मी रेकॉर्ड केली . महानोर नेहमीच भावगर्भ गाणी लिहितात. माझ्या मते, ते फार मोठे कवी आहेत. ते आपल्या छोट्याश्या गावाला राहातात, शेती करतात. त्यांच्यामध्ये काव्याचा जो एक नैसर्गिक गुण आहे त्यातूनच त्यांच्यातील कवी घडला असावा. सरतेशेवटी, मी तर असे म्हणेन की, ‘जैत रे जैत’ या चित्रपटामध्ये प्रत्येक गोष्ट जुळून आली होती. त्यामुळेच हा चित्रपट खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.

नाचता येते म्हणून जगते.... - समीर परांजपे (बॉलिवूडमध्ये ज्या विदेशी नर्तक-नर्तिका येतात त्यांच्यावरील लेख)

असाच एक लिहिलेला लेख...(बॉलिवूडमध्ये ज्या विदेशी नर्तक-नर्तिका येतात त्यांच्यावरील लेख)
-----------------
नाचता येते म्हणून जगते.... 
-------------
- समीर परांजपे
---
`देसी गर्ल' हे दोस्ताना या हिंदी चित्रपटातले गाणे आठवतेय का तुम्हाला? प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम व अभिषेक बच्चन देसी गर्लच्या ठेक्यावर लयदार नाचत आहेत. देसी गर्ल प्रियांका चोप्रावर आपली नजर खि‌ळून राहातेय असे वाटतेय तोवर तिच्या मागे नाचणाऱ्या डान्सर्स मुलींवर आपली नजर खिळते. या डान्सर मुलींमुळे प्रियांका चोप्राचे भारतीयत्व अधिक ठसठशीतपणे अधोरेखित होते. कारण तिच्यामागे असणाऱ्या सुमारे ५० मुली असतात लख्ख गौरवर्णीय. त्या असतात विदेशी नर्तिका. बॉलिवूड चित्रपटातील एका गाण्यात इतक्या विदेशी नर्तिका असणे ही गोष्ट फारशी जुनी नाही बर का? देशी गर्ल गाणे असलेला दोस्ताना चित्रपट झळकला होता अवघ्या तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ रोजी. या चित्रपटाच्या आधी आणि नंतरही हिंदी चित्रपटांतील बऱ्याच गाण्यांमध्ये या विदेशी नर्तिका आपली मोहक अदाकारी दाखविताना दिसतातच.
भारतात नृत्यकलेत निपुण असलेल्या मुली कमी आहेत का? तर अजिबातच नाही. मग या विदेशी नर्तिकांना बाॅलिवूड लाल गालिचे अंथरुन का बोलावते? 
हॉलिवूड, युरोप व अन्य प्रगत देशांतील चित्रपटसृष्टी तर बॉलिवूडपेक्षा अधिक पैसेवाली, जागतिक अपील असलेली वगैरे. मग या विदेशी मुली भारतात त्याही मुंबईमध्ये हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी का येत असाव्यात? असे अनेक प्रश्न देसी गर्ल गाणे बघताना मनात येत होते.
शोधा म्हणजे सापडेल असे म्हणतात. 
मुंबई असो किंवा भारतातील कोणतेही शहर, गाव घ्या. तिथे तुमच्या आमच्यासारखे निमगोरे किंवा सावळे लोक रस्त्यावरुन जात असतील तर फार तर तुमच्याकडे इतर लोक एक कटाक्ष टाकतील किंवा ढुंकूनही बघणार नाहीत. पण त्याच ऐवजी एखादा विदेशी गौरवर्णीय पुरुष किंवा महिला रस्त्याने चालली असेल तर लोक माना वळवून वळवून त्याच्याकडे बघतात.
कारण...
गोरी कातडीचा माणूस हा श्रेष्ठच असतो, तो आपल्यापेक्षा जास्त गुणवान असतो असा काहीसा समज आपण करुन घेतलाय. तो आजच नाही तर इंग्रजांची सत्ता देशाच्या बोकांडी बसायच्या आधीपासूनच तो इथे रुढ आहे. भारतच कशाला गौरेतर कोणत्याही देशांत हीच भावना सगळीकडे थोड्याफार फरकाने दिसेल. मग असे आहे तर मग या विदेशी नृत्यांगना अापला श्रेष्ठ देश सोडून या गौरेतर भारतवर्षातील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यायला का इतक्या धडपडतात? त्या इथे येऊन नेमके काय करतात?
आपल्या मायदेशातून भारतातील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अशाच उडून यायला या विदेशी नृत्यांगना म्हणजे काही अस्मानी पऱ्या नाहीत. या विदेशी नृत्यांगनांना भारतातील चित्रपटांत कामे मिळवून देण्यासाठी मुंबईत बरेच एजंट्स आहेत. त्यांनी आपल्या कंपन्या रितसर स्थापन केल्या आहेत. या एजंट्सची कार्यालये आहेत जास्त करुन अंधेरी, मालाड, गोरेगाव या भागांमध्ये. त्यातीलच एक एजंट आहे विकी (नाव बदलले आहे)...त्याचा दूरध्वनी क्रमांक मिळाल्यानंतर बऱ्याचदा फोन केला. पण त्याच्यासाठी माझा मोबाइल नंबर ओळखीचा नसल्याने तो कदाचित उचलला गेला नाही. मग साधारण २२ व्या वेळा फोन केल्यानंतर त्याने फोन उचलला. त्याला एक संदर्भ सांगितला. ते नाव ऐकल्यावर तो विदेशी नृत्यांगना भारतात कशा येतात व त्यांच्या कामाचे नेमके स्वरुप काय असते याविषयी सविस्तर फोनवरच बोलायला तयार झाला.
विकी सांगत होता `२६ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. इस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, बेलारुस, मोल्दोवा, युक्रेन, रशिया, आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया असे पंधरा देश त्यातून निर्माण झाले. यापैकी रशिया वगळता बहुतेक देशांत गरीबी आहे, बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्या देशांतील उत्तम नर्तिका असलेल्या मुली या वर्क व्हिसा मि‌‌ळवून भारतात बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी येत असतात.'
विकी सांगत राहिला ` सोव्हिएत रशियातून फुटून निघालेल्या देशांमध्ये आता तेथील काही लोकांनी अशा डान्सर रिक्रुटिंग एजन्सीज स्थापन केलेल्या आहेत की ज्यांच्याशी आम्ही संपर्कात असतो. या विदेशी एजन्सी त्यांच्याकडचे उत्तम नर्तक व नृत्यांगना यांची सविस्तर माहिती आम्हाला पाठवितात. कोणत्या चित्रपटात कोणत्या गाण्यासाठी किती विदेशी नृत्यांगना हव्यात याची माहिती निर्माता, दिग्दर्शक तसेच नृत्यदिग्दर्शकापर्यंत आमच्याकडे आधीच पोहोचलेली असते. त्यानूसार मग विदेशी एजन्सीशी संपर्क साधून आम्ही तितक्या नृत्यांगनांची निवड करतो. त्यांची रितसर कागदपत्रे भारतात सादर करुन त्यांना वर्क व्हिसा मिळवून देण्यासही मदत करतो. अशा पद्धतीने अत्यंत कायदेशीररित्या त्या बॉलिवूडमध्ये आपल्या नृत्याचे कसब दाखविण्यासाठी अवतरतात.'
`एखाद्या चित्रपटातील गाण्यासाठी कधी कधी एका गटात पाच ते सहा गौर नृत्यांगनांना त्यांच्या मायदेशातून बॉलिवूडमध्ये बोलाविले जाते. रशियाच्या सावलीतल्या देशांतील असल्यामुळे या मुलींना इंंंग्लिश भाषा चांगली येत असे नाही. त्या जेमतेम इंग्रजी बोलू शकतात. उत्तम नृत्याबरोबर बऱ्यापैकी इंग्रजी येणे हा पण त्यांच्यासाठी कदाचित बॉलिवूडमध्ये काम मिळविण्यासाठी पात्रता निकष ठरलाय असे वाटते' असे म्हणून आपल्याच विनोदावर विकी फोनवर हसला.
कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, बेलारुस, मोल्दोवा, युक्रेन, रशिया, आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया या देशांतून जास्त करुन विदेशी नृत्यांगना बॉलिवूडमध्ये नृत्यांगना म्हणून येतात. वर्क व्हिसा मिळाल्याने त्या भारतात विशेषत: मुंबईत तीन ते चार महिने राहातात. त्यांना त्यांच्या कामाचा पैका किती मिळतो? असा प्रश्न संभाषणादरम्यान दोनदा-तीनदा विचारला. त्यावर विकीने पटकन उत्तर दिले नाही. मग वेगळ्याच प्रश्नाला उत्तर देताना मध्येच त्याने काही आठवल्यासारखे केले व सांगू लागला ` या विदेशी नृत्यांगना वर्क व्हिसा व त्यांचे आवश्यक सामान घेऊन भारतात येतात. बाकी त्यांच्या सुरक्षिततेची, खाण्यापिण्याची, राहाण्याची सारी व्यवस्था आम्ही पाहातो. मुंबईतील अंधेरी, वर्सोवा, मालाड पश्चिम अशा काही भागांतील आलिशान इमारतींमध्ये या विदेशी नृत्यांगना सहा ते सात जणींच्या गटात एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहातात. हा फ्लॅट आम्हीच त्यांना भाड्याने मिळवून देतो. अर्थात या फ्लॅटचे भाडे त्यांनी त्यांच्याच कमाईतून भरायचे असते. पाच-सहा जणी एकत्र राहिल्याने त्यांचा इथे राहाण्याचा खर्चही विभागला जातो व त्यांचे पैसेही वाचतात. `
तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत बॉलिवूडच्या चित्रपटांत जितके काम असेल तितके त्या करतात. एका शिफ्टसाठी भारतीय नृत्यांगनांना जितकी रक्कम मिळते त्यापेक्षा साहजिकच थोडी जास्त रक्कम या विदेशी नृत्यांगनांना मिळते. आठ तासाची एक शिफ्ट असते. २००७ साली या विदेशी नृत्यांगनांना महिना १००० ते १६०० डॉलर इतके पैसे चित्रपट निर्मात्याकडून मिळायचे. पण आता दहा वर्षांनी चित्र खूप बदलले आहे. आता या विदेशी नृृत्यांगनांची दर महिन्याची कमाई प्रत्येकी सरासरी सुमारे ३००० डॉलरपर्यंत म्हणजे भारतीय रुपयांत साधारण एक लाख ९२ हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. या कमाईत दर महिन्याला थोडेवर खाली होऊ शकते. पण इथे भारतात कमाई करुन त्या जेव्हा त्या आपल्या देशात परत जातात तेव्हा तेथे उदरनिर्वाहासाठी त्यांना हे पैसे पुरेसे ठरतात.'
या विदेशी नृत्यांगना बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी येतात वगैरे ठीक आहे. पण त्यातील काही व्यसनीही असतात. काही अमली पदार्थांच्या तस्करीत सामील झाल्याचीही तुरळक उदाहरणे आहेत. काही जणीही वेश्याव्यवसायही करतात असे निदर्शनास आले होते. मात्र असे प्रकार या विदेशी नृत्यांगना करत नाही असे विकी असो वा तशाच एक दोन एजंटनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना सांगितले. कारण या विषयावर उघडपणे फारसे कोणी बोलत नाही. का ते माहित नाही? खरतर विदेशी नृत्यांगना भारतात चित्रपटात काम करण्यासाठी आणणे हा काही चोरटा धंदा तर नाही. पण या व्यवसायाभोवती या एजंटांनी गुढ वलय ठेवलेय हे मात्र खरे...
--
अंधेरी लिंक रोडवरची ओबेराॅय स्प्रिंग्स ही इमारत. या इमारतीत अलीकडेच कंगना राणावतने फ्लॅट विकत घेतला आहे. विपुल शहा, प्रीती सप्रू, शर्लिन चोप्रा, लव्हली सिंग असे अनेक सेलिब्रिटीज या इमारतीत राहातात. याच इमारतीत बेलारुसमधील पाच ते सहा नृत्यांगना एक फ्लॅट भाड्याने घेऊन एकत्र राहात आहेत असे कळले होते. त्यामुळे त्यांची भेट घेऊन त्यांची मुंबई, भारतातील जीवनशैली कशी आहे याची माहिती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. परंतू ना या सोसायटीच्या गेटवरील सुरक्षा रक्षक धड माहिती द्यायला तयार होईना, ना एजंट तशी कोणतीही तयारी दाखवेना. `रिस्क नही लेना है मुझे असे तो म्हणत होता...' या विदेशी नृत्यांगनांचे मुंबईतील वावरणेही त्यांच्या एजंटच्या मार्गदर्शनानूसारच काटेकोरपणे चालते. चित्रीकरणाच्या ठिकाणाहून त्या थेट आपल्या फ्लॅटवरच परत येतात. त्यांच्या सुरक्षिततेची हमीही एजंटनेच घेतलेली असते. त्यामुळे त्याचे त्यांना ऐकावेच लागते. समजा चित्रीकरणाची कामे संपली की मुंबई किंवा गोवा अथवा कुलु मनाली सारख्या ठिकाणी एजंटमार्फत या नृत्यांगनांच्या प्रदेश भटकंतीची सोय केली जाते. एक प्रकारे त्या स्वेच्छेने त्या एका चौकटीतच वावरतात. भारतात यायचे, चित्रपटांत कामे करायची, पैसे मिळवायचे आणि परत जायचे एवढीच महत्वाची उद्दिष्टे बऱ्याच जणींची असतात. मग या विदेशी नृत्यांगना अंमली पदार्थांची तस्करी, वेशाव्यवसायात सापडतात कधी कधी ते कसे? असा प्रश्न मनात उरलाच होता...तर असेही काही गुन्हेगारी एजंट आहेत चित्रपटसृष्टीत...एवढेच उत्तर मला विकीकडून मिळाले...व तो विषय तिथेच संपला...
सोनी टीव्हीवर कपिल शर्मा शोमध्ये अधूनमधून विदेशी नृत्यांगना आपली अदाकारी सादर करताना िदसतात. म्हणजे आता बॉलिवूड चित्रपटच नव्हे तर भारतीय वाहिन्यांच्या कार्यक्रमातही त्यांच्यासाठी जागा निर्माण होऊ लागली आहे. बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही आता विदेशी नृत्यांगना दिसू लागल्या आहेत. लागण लागते अशा गोष्टींची लगेच. 
मग तरीही अजून एक मुद्दा राहातच होता की, विदेशी नृत्यांगनांबरोबर पुरुष नर्तक किती येतात भारतात? तर उत्तर आले शंभर विदेशी नर्तिका असतील तर चार पाच विदेशी पुुरुष नर्तक असे हे प्रमाण आहे. १८ ते २७ वर्षे याच वयोगटातील विदेशी नृत्यांगना भारतात चित्रपटात काम करण्यासाठी येतात. बेलारुसची कटासियार्ना िलएश्को या २७ वर्षांच्या नृत्यांगनेने त्याच्याकडे मागे व्यक्त केलेली प्रतिक्रिया विकी सांगत होता. ती म्हणाली होती ` भारतीय संगीत ऐकायला व समजून घ्यायला सोपे आहे पण जेव्हा तुम्ही त्या गाण्यावर नृत्य करायला जाता तेव्हा ते मात्र अवघड आहे. आम्हाला पाश्चिमात्य नृृत्याची सवय आहे. हिंदी गाण्यावर पाश्चिमात्य धर्तीचे नृत्य जरी करायचे असले तरी देखील त्याला भारतीय वळण मिळते. हिंदी गाण्यांचे लिपसिंकिंगसाठी उच्चारही समजून घ्यावे लागतात. कोरिओग्राफर नृत्याच्या ज्या स्टेप्स देतो त्या नीट करतानाच हिंदी गाण्याचे बोलही तोंडाने म्हणतोय असे दृश्य असेल तर मग मेहनत खूप करावी लागते. आमचा भारतातील अनुभव चांगला आहे. बॉलिवूडमधे काम करायला मिळाल्यानंतर आम्हालाही चांगली कमाई होते म्हणून तर येतो आम्ही इथे'
बॉलिवूडच्या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार काम करतात म्हणून खूप आरडाओरड मनसे, शिवसेनेसह काही राजकीय पक्षांनी केली. आता त्या देशाचे कलाकार बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायचे खूपच कमी झाले आहे. विदेशी नृत्यांगनांना हिंदी चित्रपटातील गाण्यांमध्ये स्थान दिल्यामुळे आमच्या पोटावर पाय दिला जातोय अशी ओरड ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनने केली. त्यामुळे विदेशी नृत्यांगनांना चित्रपटांत कामे देण्याचे प्रमाण काही काळ कमीही झाले पण त्यांना भारतात येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कारण त्यांच्याकडे असतो वर्क व्हिसा व काम करुन स्वत:ला जिवंत ठेवण्याची जिद्द. गोऱ्यांच्या कातडीचे फाजील आकर्षण आपण बाळगतो पण त्या नृत्यांगनांना त्यांच्या देशात असलेला गरिबीचा शाप हा त्यांचे भवितव्य काळे करत असतो. गोऱ्या कातडीमागील हे काळे भवितव्य आपण कधी पाहाणार आहोत की नाही? तेही मुंबईत आपल्या जवळच वावरत असते तेही आपण बघायला तयार होत नाही...कसले ग्लोबलाइज्ड झालोय आपण?
---
मायानगरीतील माया
मुंबईतील कुलाबा भागात गेलात तर तिथे सॅल्व्हेशन आर्मीसारखी स्वस्त दरातील काही गेस्ट हाऊसेस आहेत. भारतात आलेले व जीवाची मुंबई करण्यासाठी आलेले बरेच विदेशी पर्यटक तिथे राहातात. स्वस्त दरात रािहल्याने या पर्यटकांचे पैसेही वाचतात व त्यांना मुंबई जरा अधिक एन्जॉय करता येते. नेमके हे बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शकांना माहिती आहे. काही हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण विदेशात होते. त्या चित्रीकरणातील काही भाग जर चुकून किंवा तांत्रिक कारणाने राहून गेला असेल तर एवढा मोठा ताफा विदेशात नेऊन ते सारे चित्रीत करणे याची फार पैसा वाया जातो. मग त्यावर निर्मात्यांनी एक तोड काढली. हा जो उरलेला भाग आहे तो मुंबईतच सेट लावून चित्रीत केला जातो. त्यासाठी निर्मात्याची माणसे किंवा काही एजंटस् कुलाबा भागातील स्वस्त दरातल्या गेस्ट हाऊसेसमध्ये राहाणाऱ्या विदेशी लोकांशी संपर्क साधतात. त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात काम करणार का विचारतात. त्यावर हे विदेशी लोक या चित्रपटात किंग खान (शाहरुख)किंवा सलमान खान आहे का म्हणून हटकून विचारणा करतात. तसे असेल तर त्यांच्यासाठी ते सोन्याहून पिवळे असते. तसे नसेल तरी ते बॉलिवूडच्या चित्रपटात आपण दिसणार या आनंदात एक-दोन दिवसांसाठी काम करायला तयार होतात. या विदेशी पर्यटकांना एका दिवसाचे साधारण १८०० रुपये व एका वेळचे जेवण दिले जाते. त्यांना गेस्ट हाऊसपासून ते चित्रीकरण स्थळापर्यंत त्यांना भाड्याच्या कारने नेले जाते व परत आणले जाते. यातूनही काही एजंट चांगले पैसे कमावतात. मग िवदेशी पर्यटकांकडून चित्रपटात करुन घेतले जाणारे काम हे जमावातील एखादा गोरा किंवा क्वचित आयटम साँगमधील विदेशी पाहुणा असेही काहीही असते....मुंबई ही अशी मायानगरी आहे तिची ही अशी विविध रुपे आहेत.