Sunday, July 31, 2016

निरुप्पुडा! निरुप्पुडा!! (रजनीकांत - कबालीवरील माझा लेख), दै. दिव्य मराठी ३० जुलै २०१६, रसिक पुरवणी



सुपरस्टार रजनीकांत याचा कबाली हा चित्रपट झळकला त्या पहिल्या दिवशी मुंबईतील अरोरा टॉकिज येथे सकाळचा सहाचा शो पाहून मी तेथील वातावरणावर एक लेख दै. दिव्य मराठीच्या ३१ जुलै २०१६च्या अंकातील रसिक या रविवार पुरवणीत लिहिला. त्या लेखाची टेक्स्ट, वेबपेज व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjpe-artic…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/31072016/0/6/
----
स्लग : टॉक ऑफ द टाऊन
------------------
हेडिंंग : निरुप्पुडा! निरुप्पुडा!!
------------------
बायलाइन : समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
------------------
इंट्रो : चमत्काराचे सगळे पेटंट बहुधा एकट्या रजनीकांतच्या नावावर जमा आहेत. म्हणूनच १००-२०० कोटींच्या कमाईसाठी बॉलीवूड धडपडत असताना पहिल्या चार दिवसांतच बहुचर्चित ‘कबाली’ने तब्बल ४०० कोटींची कमाई केली...या चमत्कारापुढे दिपून जाऊनच कदाचित विधानसभा अधिवेशन काळात रजनीकांतला महाराष्ट्रभूषण हा मानाचा पुरस्कार देण्याची मागणी पुढे आली...पाठोपाठ भारतरत्नचा आग्रह लावून धरला गेला... खरं तर "कबाली' प्रदर्शित होऊन आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेलाय, तरी "रजनीमॅनिया' ओसरायचं काही नाव घेईना... पण प्रत्यक्षातलं रजनीवेड असतं तरी कसं, याचा पहाटेच्या शोला हजेरी लावून टिपलेला हा सांग्रसंगीत इितवृत्तांत...
------------------
ब्लर्ब : बाल्कनीतला प्रेक्षक हा स्टाॅलच्या प्रेक्षकापेक्षा अधिक महागडे कपडे घालणारा, उंची मोबाइल वापरणारा, आपापल्या गाड्यांतून आलेला आहे, हे स्पष्टपणे डोळ्यांना िदसत होते. पण थलैवाच्या अॅक्शनला आणि संवादांना दाद देताना हे स्टाॅल, बाल्कनीचे झंजटच मिटले होते...
------------------
मुंबईतील माटुंगा पूर्व येथे द्रुतगती महामार्गाच्या वाटेतच एका गोलात वसलेलं महेश्वरी उद्यान... या उद्यानाहून थोडे पुढे गेले की, शीवच्या दिशेने उजव्या अंगाला आहे, सिंगलस्क्रीन अरोरा सिनेमा. नाव ‘अरोरा’ पण इथे मक्तेदारी दाक्षिणात्य चित्रपटांची. पहाटे तीन वाजल्यापासून या ‘अरोरा’च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाक्षिणात्य वाद्ये धुमधडाक्यात वाजवली जात होती... उत्साही तरुणांचा घोळका जिवाची कुर्वंडी करून नाचत होता... अंतराअंतराने दणक्यात फटाके फुटत होते...सोबत रोशणाई... फटाके... जणू दोन महिने आधीच दिवाळी आली होती... मध्येच कोणीतरी आरोळी ठोकायचा... थलैवा, थलैवा... मग तरुणांचा घोळकाही चित्कारायचा, थलैवा... थलैवा... ‘थलैवा’ या तामीळ शब्दाचा अर्थ आहे नेता, महानायक... गेल्या तीन दशकांपासून हा शब्द तामिळींसह सारे दाक्षिणात्य प्रजानन एकाच व्यक्तीसाठी वापरतात आणि तो म्हणजे, नन अदर दॅन रजनीकांत... द बाॅस...!
रजनीकांतचा बहुप्रतीक्षित ‘कबाली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, त्या पहाटेचे हे आख्यान. अरोरा टॉकीजच्या मुख्य प्रवेशद्वारावर डाव्या हाताला ‘कबाली’मधील सुटाबुटातल्या रजनीकांतचा तब्बल ५५ फुटी कटआऊट‌ लावलेला... त्या भव्य कटआऊटला सॉलीड लायटिंग केलेली... त्यावरून सकाळी पाच वाजता एका चाहत्याने पुष्पवृष्टी केली. तशी प्रवेशद्वारासमोर बेभान नाचणाऱ्या चाहत्यांच्या डोक्यात ही फुले पडली... त्यांनाही धन्य वाटले. एकाने या या कटआऊटला साष्टांग नमस्कार केला. ‘जय थलैवा’, ‘निरुप्पुडा’ (हे कबालीतलं गाजलेलं गाणं. निरुप्पुडा याचा अर्थ, आग) असे जवळजवळ ओरडतच त्याने त्या कटआऊटसमोर सोबत आणलेला नारळ फोडला. त्यातील पाणी कटआऊटच्या चारी अंगाला फेरून, मग नारळाचा नैवेद्य दाखविला. कटआऊटला निरांजनाने ओवाळले... आपल्या भक्ताची ही निर्मम भक्ती पाहून कटआऊटरूपी तो रजनीकांत देव प्रसन्न झालेला, तिथे उपस्थित असलेल्या साऱ्यांनाच जाणवला बहुतेक. त्यामुळेच की काय, दाक्षिणात्य वाद्यांचे आवाज अधिकच दणक्यात घुमू लागले... लोकही नाचता नाचता घुमू लागले, रजनीकांतच्या प्रेमात...
रजनीकांतवर त्याच्या चाहत्यांचे जे प्रेम आहे, ते काही वेळेस वेडाच्या सीमारेषेला स्पर्श करून येते. दाक्षिणात्य संस्कृतीत सारेच भडक... कपड्याचे रंगही, वागण्याची तऱ्हाही आणि चित्रपटही... पण त्यातही एक लोभस आक्रस्ताळेपणा भरलेला असतो, त्यांच्या जगण्यात. ‘कबाली’चा पहिला खेळ बघायला आलेले जे सात-आठशे चाहते होते, ते असेच भडक रंगात न्हालेले... रामुलू नावाचा प्रेक्षक त्यातलाच एक. त्या दिवशी सकाळच्या सहाच्या खेळाचे काढलेले तिकीट तो सर्वांना दाखवत होता. तो म्हणाला, ‘मी मूळचा तामीळनाडूचा. शिर्डीत कामाला असतो. थलैवाचा कबाली बघायचाच, म्हणून खास शिर्डीहून आलोय मुंबईत. आज सहाचा खेळ बघणार, मग नऊचा, मग बाराचा... तीन खेळ लागोपाठ बघितले की, माझे कान, डोळे तृप्त! हवा तेवढा रजनीकांत मनात साठवून घेणार... आणि पुन्हा शिर्डीत माझ्या कामावर हजर होणार... आज खास सुट्टीच काढलीये...’ तो हे बोलत असतानाचा त्याचा मित्र रामकृष्णन तिथे आला... त्या दोघांचेही तामीळमध्ये काही बोलणे झाले. तो मित्रही मग तिन्ही खेळांची तिकिटे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवू लागला...
पण हेच कशाला, ‘अरोरा’बाहेर त्या िदवशी पहाटे तीनपासूनच रजनीकांतप्रेमींची लगबग सुरू होती. त्यातील अतिउत्साही प्राण्यांनी एका फ्लेक्सवर मधोमध रजनीकांतला विराजमान करून त्याच्या भोवती आपल्या छायाचित्रांची रांगोळी काढली होती. त्यावर ‘वेलकम रजनीकांत अँड हिज फॅन्स’ असे लिहिलेले होते. काही फ्लेक्स जरा वेगळे होते. फॅन्सच्या जागी धारावी भागातील तामीळ संघटनांच्या स्थानिक नेत्यांची नावे व फोटो त्या फ्लेक्सवर होते. त्यांनीही रजनीकांत व चाहत्यांना वेलकम केलेले होते. रजनीकांतचा चित्रपट बघायला जाणे म्हणजे, सत्यनारायणाच्या पूजेसारखा किंवा एखाद्या देवाच्या उत्सव-महोत्सवासारखा माहोल करून टाकला होता या फॅन मंडळींनी... मराठी, हिंदी चित्रपट पाहायला येणाऱ्यांना हे सारे वातावरण अगदीच नवीन...त्यामुळे काही जण नाक मुरडत होते, तर काही जण नाक खुपसत होते.
अखेर पावणेसहा वाजता अरोराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील लोखंडी जाळी हलली आणि बाहेर इतका वेळ दबा धरून बसलेला थलैवाप्रेमी जमाव तीराच्या वेगाने आतमध्ये शिरला. ज्याच्याकडे त्या खेळाचे तिकीट होते, तो प्रत्येक जण दहा एक मिनिटांत आपापल्या जागेवर चित्रपटगृहात स्थिर झाला. माहोल इतका भारावलेला की, मीडियाच्या प्रतिनिधींनाही ‘अरोरा’च्या व्यवस्थापनाने सहाच्या खेळाला चित्रपटगृहात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला... सहा वाजायला काही सेकंदच उरले होते... आतापर्यंत फक्त पांढराफटक असलेला समोरचा पडदा विविध रंगांनी उजळू लागला. चित्रपटाची श्रेयनामावली सुरू झाली... तामीळ चित्रपट पाहात होतो... पडद्यावर काय अक्षरे व संवाद उमटतात, काहीच कळत नव्हते. पण श्रेयनामावलीत रजनीकांतचे नाव आल्यावर प्रेक्षकांनी त्याच्या नावाने जो गिल्ला केला, त्याला तोड नव्हती. श्रेयनामावली संपली... मलेशियाच्या तुरुंगातून सुटका झालेला माफिया म्हणजे, रजनीकांत पडद्यावर अवतरण्याचा तो क्षण जवळ आला... आधी तो पाठमोरा दिसला, मग त्याचे हात, मग त्याच्या चेहऱ्याचा थोडासाच भाग... आणि हा हा म्हणता अख्खा रजनीकांत पडद्यावर अवतरला... आणि चित्रपटगृहामधल्या वेड्यापिशा प्रेक्षकांमध्ये जो उन्माद संचारला, तो अवर्णनीय होता... टाळ्या, शिट्ट्यांनी चित्रपटगृह दणाणून गेले... रजनीकांतने पहिला संवाद म्हणताच पुन्हा जोरजोरात शिट्ट्या. ही अशी शिट्ट्याबिट्ट्यांची उधळण पिटातील प्रेक्षकांची मक्तेदारी, असे आम्हा पामरांना वाटत होते... पण रजनीकांतचे सगळेच निराळे... त्याचा पिटातील (पक्षी : स्टॉलमधील) व बाल्कनीतील प्रेक्षक फक्त तिथल्या खुर्चीत बसतो म्हणून तो त्या श्रेणीतला प्रेक्षक म्हणायचे, बाकी या प्रेक्षकाची प्रतवारी एकच ती म्हणजे, रजनीवेडे... बाल्कनीतला प्रेक्षक हा स्टाॅलच्या प्रेक्षकापेक्षा अधिक महागडे कपडे घालणारा, उंची मोबाइल वापरणारा, आपापल्या गाड्यांतून आलेला आहे, हे स्पष्टपणे डोळ्यांना िदसत होते. पण थलैवाच्या अॅक्शनला आणि संवादांना दाद देताना हे स्टॅाल, बाल्कनीचे झंजटच मिटले होते... या प्रेक्षकांत महिलावर्गही लक्षणीय संख्येने होता, तेही सकाळी सहाच्या शोला. मुंबईमधील चित्रपटखेळांच्या माहोलमध्ये हे चित्र आक्रित वाटावे असेच...
अरोरा हे मुंबईत दाक्षिणात्य चित्रपट झळकण्याचे माहेरघर... या चित्रपटगृहाची इमारत जुनीपुराणी... इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या दुकानांची अवस्था न्यायालयीन खटल्यांमुळे जीर्णशीर्ण झालेली... पण ‘कबाली’ लागणार म्हटल्यावर चित्रपटगृहाच्या आतील भिंतीवर रंगांचे दोन हात फिरले, मोडक्या आसनांची डागडुगी झाली... स्क्रीन नवीन बसविण्यात आला... इतके दिवस दुर्लक्षित असलेली म्हातारी, तिला लॉटरी लागताच घरातल्या सगळ्यांची लाडकी व्हावी, तसे झाले अगदी ‘अरोरा’चे. ‘कबाली’चा सकाळी सहाचा खेळ सुरू असताना पडद्याच्या पुढे जी थोडी मोकळी जागा असते, तिथेच डाव्या अंगाला कोपऱ्यात एक साठीचा गृहस्थ प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसला होता. कोणीतरी खास असावा. त्याला चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांपैकी कोणी मध्येच चहा आणून देत होते, तर कोणी समोसा... उत्सुकतेने पुढे जाऊन विचारले की, तुम्ही चित्रपटगृहाच्या मालकांपैकी आहात का? ते गृहस्थ ‘नाही’ म्हणाले. ते एवढेच म्हणाले, “मी डिस्ट्रिब्युटर आहे...’
त्यांना विचारले की, ‘कबाली कसा वाटतोय?’
ते म्हणाले, ‘पैसा वसूल’...
वितरक असो वा प्रेक्षक, रजनीकांतच्या बहुतेक चित्रपटांना तो हेच म्हणतो... पैसा वसूल...!!!
तीन तासांचा तो चित्तचक्षुचमत्कारिक रजनीखेळ पाहून बाहेर आल्यानंतर ‘अरोरा’च्या बाहेर पहाटे पाचला पाहिली होती तशीच गर्दी नऊच्या खेळाला जमलेली दिसली. सहाचा खेळ पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांपैकी एकेकाला धरून प्रतिक्रियेच्या विटेवर उभे करण्याची घाई न्यूज चॅनेल, न्यूज वेबसाइट व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना लागलेली दिसली. त्या गर्दीतून वाट काढत चित्रपटगृहाबाहेर येत असतानाच अरोराचे मालक नंबीराजू भेटले. इतर वेळेला तुळतुळीत दाढी केलेले हे गृहस्थ त्या दिवशी ‘कबाली’मध्ये सुटाबुटातला पांढरी दाढीधारी रजनीकांत जसा दिसतो, अगदी तशा वेषात चित्रपटगृहात हजर होते... शहाणा वेडा म्हणतात तो हाच... येत्या दोन आठवड्यांचे सारे शो फुल आहेत, असे ते खूप अभिमानाने सांगत होते...
नंबी राजन सांगत होते, ‘रजनीकांत ज्या स्टाइलने डायलॉग म्हणतो, ज्या वेगाने-आवेगाने अभिनय करून शत्रूला चारीमुंड्या चीत करतो, ते प्रेक्षकांना भावतेच; पण रजनीकांतचा सोशल कनेक्ट जबरदस्त आहे. प्रेक्षकांशी त्याची नाळ इतकी घट्ट जुळली आहे की, ते त्याला देवच मानतात. म्हणून तर त्याच्या कटआऊटवर दुधाचा अभिषेक होतो, त्याची आरती केली जाते... त्याची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा प्रेक्षकांनीच निर्माण केली व त्यांनीच ती जपून ठेवली. अख्ख्या ‘कबाली’ चित्रपटात तू एक तरी असे दृश्य बघितलेस का की, रजनीकांतला दुसऱ्या खलनायकाने थोबाडीत मारली आहे किंवा जीवघेणी मारहाण केली आहे... असे एक जरी दृश्य चित्रपटात दिसले ना तर रजनीकांतला मारणाऱ्या कलावंताला प्रेक्षक वास्तवात इतका बुकलतील की, तो खलनायक पुन्हा चित्रपटात काम करूच शकणार नाही.’
‘रजनीकांतचा एखादा चित्रपट तोट्यात गेला तर तो आपल्या मानधनात कपात करून ती उरलेली रक्कम त्या चित्रपटाच्या वितरकाला देतो व जगवतो. अनेकांच्या लग्न, घरच्या इतर कार्यांमध्ये रजनीकांतकडून गाजावाजा न करता मदत पोहोचती झालेली असते. आपल्या ६५ वर्षांच्या आयुष्यात रजनीकांतने अशी हजारो, लाखो घरे जोडली, म्हणूनच तो अशा सुपरसुपरस्टारपदी विराजमान झालाय की ते स्थान अढळच आहे.’ नंबी राजन यांना किती सांगू, किती नको, असे होत होते...
सकाळी सहाच्या खेळाला उपस्थित राहून निघालो. नंतर दिवसभर बातम्या येतच राहिल्या की, प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकरही ‘अरोरा’मध्ये कबाली बघून गेला वगैरे वगैरे...वस्तुत: ‘कबाली’ची पटकथा ही कोणत्याही सर्वसामान्य मारधाडपटासारखीच. रजनीकांतचा अभिनयही चालू कॅटॅगरीतला... पण तरीही ‘अरोरा’मध्ये रजनीकांत जो काही दशांगुळे वर उरलेला बघायला मिळाला त्याला अक्षरश: तोड नव्हती...
--------------

Wednesday, July 13, 2016

रेल्वेच्या इतिहासाचे साक्षीदार - दै. दिव्य मराठीच्या १३ जुलै २०१६च्या अंकात लेख प्रसिद्ध.


दै. दिव्य मराठीच्या १३ जुलै २०१६च्या अंकात संपादकीय पानवर प्रासंगिक या सदरात मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची टेक्स्ट व वेबपेज लिंक तसेच मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurang…/…/13072016/0/6
http://divyamarathi.bhaskar.com/…/EDT-sameer-paranjape-arti…
---
रेल्वेच्या इतिहासाचे साक्षीदार
-----------------
- समीर परांजपे
--------------
हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी मनाचाही वेग मोडी, मग कैची हत्ती घोडी... भारतात आगगाडीच्या आगमनाचे स्वागत करणारी एक कविताच गोविंद नारायण माडगावकर यांनी ‘मुंबईचे वर्णन’ या आपल्या पुस्तकात ‘कटाव’ या शीर्षकाखाली उद््धृत केली आहे. ब्रिटिशांनी भारतातील आपले साम्राज्य अधिक मजबूत होण्यासाठी तसेच दळणवळण वेगाने होण्यासाठी आगगाडी म्हणजेच रेल्वेचे जाळे विणले. १६ एप्रिल १८५३ रोजी बोरिबंदर ते ठाणे यादरम्यान भारतातील पहिली रेल्वेगाडी धावली. ती जीआयपीआरचीच होती. ब्रिटिश संसदेने मंजूर केलेल्या कायद्यानुसार ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेची (जीआयपीआर) स्थापना १ ऑगस्ट १८४९ रोजी करण्यात आली होती. या घटनेला येत्या १ ऑगस्टला १६७ वर्षे पूर्ण होतील. जीआयपीआर रेल्वेच्या रूपाने भारताला दळणवळणाची जी नवसंजीवनी मिळाले त्या रेल्वेचे महत्त्व आजतागायतही तितकेच कायम आहे. पुढे जीआयपीआरचे १९५१ मध्ये मध्य रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. पण जीआयपीआरचा इतिहास हे भारताच्या विकासातील लखलखीत पान आहे. या इतिहासाशी निगडित दुर्मिळ कागदपत्रे, दस्तऐवज व्यवस्थित जतन करून ठेवणे आवश्यक होते. याची नेमकी जाण असल्याने जीआयपीआरशी निगडित सुमारे १०० ऐतिहासिक व दुर्मिळ कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. देशातील पहिली गाडी जिथून प्रथम धावली त्या बोरीबंदर स्थानकाचे पुढे व्हिक्टोरिया टर्मिनस (व्ही.टी.) असे नामकरण झाले. काही वर्षांपूर्वी व्ही.टी.चे छत्रपती शिवाजी टर्मिनस (सी.एस.टी.) असे पुनर्नामकरण झाले. त्या स्थानकात साजरा करण्यात आलेल्या हेरिटेज आठवड्यादरम्यान अलीकडेच ही १०० कागदपत्रे मध्य रेल्वेने महाराष्ट्र राज्याच्या मुंबईतील पुराभिलेखागाराकडे जतनासाठी सुपूर्द केली. मुंबईतील फोर्ट विभागातल्या एल्फिन्स्टन काॅलेज इमारतीमध्ये हे पुराभिलेखागार आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जीआयपीआरने देशाच्या विकासात कोणती महत्त्वाची भूमिका बजावली याचे दर्शन या कागदपत्रांतून होते. त्याचप्रमाणे जीआयपीआरने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, या रेल्वेने महसूल मिळवण्यासाठी त्या वेळी प्रकाशित केलेल्या नियतकालिकांचे अंक, अशा गोष्टींचा या कागदपत्रांमध्ये समावेश आहे. जीआयपीआरच्या अधिकाऱ्यांनी लंडनच्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांतून अनेक ऐतिहासिक संदर्भाचाही उलगडा होत जातो. या कागदपत्रांतील जी अगदी जुनी आहेत त्यांचे लॅमिनेशन केले जाईल. जी कागदपत्रे, नियतकालिके अगदीच जीर्ण झाली आहेत, त्यांना स्पर्श न करता त्यांचे विशेष स्कॅनरद्वारे स्कॅनिंग व डिजिटलायझेशन करण्यात येईल. म्हणजे या कागदपत्रांचे अजून तुकडे पडणार नाहीत. दस्तऐवज किंवा जुनी हस्तलिखिते, पुस्तके यांच्या जतनीकरणासंदर्भात आपल्या देशामध्ये तसा आनंदीआनंद आहे. त्यामुळे जीआयपीआरच्या दस्तऐवजांचे योग्य जतन होणार, ही घडामोड म्हणजे थंड वाऱ्याच्या झुळुकेसमानच अाहे. याआधीही मध्य रेल्वेने १२ मार्च १९९७ रोजी जीआयपीआरच्या संदर्भातील सुमारे पंधरा हजारांवर पृष्ठसंख्या असलेली कागदपत्रे मुंबईतील पुराभिलेखागार कार्यालयाकडे जतनासाठी सुपूर्द केली होती.
जीआयपीआरच्या आगगाडीने अलम मराठी साहित्यिकांना ही प्रेरणा दिली असून तो सांस्कृतिक दस्तऐवजही महत्त्वाचा आहेच. आगगाडी या विषयावर मराठीतील सर्वात पहिले पुस्तक ‘लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन’ हे होय. डाॅ. लाॅर्डनर यांच्या ‘रेल्वे इकाॅनाॅमी’ या इंग्रजी पुस्तकातील निवडक भागाचे कृष्णशास्त्री भाटवडेकर यांनी मराठी भाषांतर करून त्यातून ‘लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन’ हे पुस्तक १८५४ मध्ये म्हणजे आगगाडी धावू लागल्यानंतर लगेचच एक वर्षाने प्रसिद्ध करण्यात आले. मुंबईचे आद्य इतिहासकार गोविंद नारायण माडगावकर यांनी युनायटेड स्टुडंट्स असोसिएशन या संस्थेपुढे ‘आगगाडी’ या विषयावर १५ मार्च १८५८ रोजी दिलेले भाषण लोखंडी सडकांचे चमत्कार या नावाने पुस्तकरूपाने त्याच वर्षी प्रकाशित झाले. त्यानंतरही अनेकांनी रेल्वेवर मराठी पुस्तके व कविता लिहिल्या. आगगाडीला ‘चाक्या म्हसोबा’ म्हणून संबोधण्यात येत असे. १८५३ मध्ये आगगाडी सुरू झाल्यानंतर तिचे महत्त्व जनमानसात रुजायला लागले. अनेक जातींचे लोक, स्त्री-पुरुष हे सर्व एकत्रितपणे प्रवास करू लागले. आगगाडीने भारतीय समाजजीवनात अबोलपणे जणू क्रांतीच घडवली. रेल्वे जाळ्यात भारताचे समग्र दर्शन होते असे म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे. आधुनिक भारताला साजेशी बुलेट ट्रेन आता येऊ घातली आहे, पण जीआयपीआरचे ऐतिहासिक महत्त्व हे कायमच राहणार आहे.
(लेखक दिव्य मराठी मुंबई कार्यालयात उपवृत्तसंपादक म्हणून कार्यरत आहेत.)
paranjapesamir@gmail.com

Tuesday, July 12, 2016

हवामान बदलाचा फटका - दै. दिव्य मराठीच्या १२ जुलै २०१६च्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख



दै. दिव्य मराठीच्या १२ जुलै २०१६च्या अंकात संपादकीय पानवर प्रासंगिक या सदरात मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची टेक्स्ट व वेबपेज लिंक तसेच मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/EDT-sameer-paranjape-arti…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/12072016/0/6/
---
हवामान बदलाचा फटका
---
- समीर परांजपे
----- 
नैसर्गिक व मानवी कारणांमुळे हवामानात झालेले बदल व ग्लोबल वॉर्मिंग या दोन्ही गोष्टींचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील जीवसृष्टीवर होणे अटळच आहे. हवामानात झालेल्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती ओढवतात, त्याबरोबरच अनेक रोगांचा फैलावही होत असतो. जगभरात मलेरिया, डायरिया तसेच भयंकर उष्म्यामुळे निर्माण होणारे विकार यांनी ग्रस्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय झाली आहे. हवामानातील बदलामुळे २०३० सालापर्यंत जगभरात बळी पडणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी अडीच लाखांनी वाढ होत जाईल, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. भारतालाही या परिस्थितीचा मोठा फटका बसणार आहे. हवामान बदलामुळे भारतात नेमकी काय परिस्थिती उद््भवेल याचा स्वतंत्रपणे अभ्यास ऑक्सफर्ड विद्यापीठाने केला होता. त्यानुसार २०५० या वर्षी भारतात हवामान बदलामुळे सुमारे १ लाख ३० हजार लोक मरण पावतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबद्दलचा लेख “लॅन्सेट’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैद्यकीय नियतकालिकामध्ये या वर्षीच्या प्रारंभी प्रसिद्ध झाला आहे. जगभरात विविध उद्योगांतून जे विषारी वायू वातावरणात उत्सर्जित केले जातात, त्यामुळे हवामानात बदल होत असतात. १९९० मध्ये विषारी वायूंच्या उत्सर्जनाचे जे प्रमाण होते त्यात निम्म्याहून जास्त कपात २०५० पर्यंत करण्यात आली तरच हवामानामध्ये घातक बदल होण्याच्या प्रक्रियेवर योग्य नियंत्रण राखता येईल. या आव्हानाचा तातडीने मुकाबला करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेसह अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांनी तशी पावलेही उचलली. परंतु या प्रयत्नांना सर्वच देशांनी संपूर्ण सहकार्य केले आहे असे झालेले नाही. प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले असून जगातील प्रदूषणामध्ये हे देश मोठी भर घालत असतात. विकसनशील देशांमध्ये प्रदूषणाविरोधात पुरेशी जागृती अजूनही झाली नसल्याने तेथील उद्योगांतूनही विषारी वायू वातावरणात उत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रदूषणाबाबत प्रगत देशांनी सातत्याने विकसनशील देशांकडे आरोपी म्हणून बोट न दाखवता प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही प्रकारच्या देशांकडून कशी होईल याचा विचार केला पाहिजे. त्यासाठीच जागतिक आरोग्य संघटनेने हवामान बदलाच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालातील निष्कर्ष अधिक गांभीर्याने घेतले पाहिजेत.
हवामान बदलामुळे समुद्रपातळी वाढणे, सातत्याने येणारे पूर व चक्रीवादळे या नैसर्गिक आपत्तींचा धोकाही वाढतो. त्याचा परिणाम साहजिकच शेतीवर होत असतो. अन्नधान्याचा दर्जा घसरला तर त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होणे अटळ आहे. हवामान बदलामुळे रोगराईचा प्रसार होतो. ही रोगराई रोखण्यासाठी प्रत्येक देशाची आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्षम असतेच असे नाही. भारतासारख्या देशांत शहरी भाग वगळता ग्रामीण भागांमध्ये अजूनही पुरेशा अारोग्यविषयक सुविधा नाहीत. रोगराईचे संकट हे केवळ विकसनशील देशांप्रमाणेच अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही छळते आहे. मात्र तेथील आरोग्य यंत्रणा प्रगत असल्याने या रोगांमुळे बळी पडणाऱ्यांचे प्रमाण इतर देशांपेक्षा तुलनेने कमी आहे. काही प्रदूषणे अशी असतात की त्यांचा थेट विपरीत परिणाम लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध मंडळी तसेच अल्प उत्पन्नामुळे दोन वेळचे पोटभर अन्न मिळू न शकणाऱ्या लोकांवर होत असतो. ही संख्या भारतातही मोठी आहे. रोगराईचा सामना करण्यासाठी माणसांची प्रतिकारशक्ती वाढणे हेही गरजेचे आहे. त्यासाठी चांगला दर्जा असलेले अन्नधान्य पिकवणे व लोकांना ते उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. हवामानात होत असलेले बदल लक्षात घेऊन जगभरातच शेती करण्याच्या पद्धतीत बदल झाले पाहिजेत, असे शास्त्रज्ञांचे आग्रही मत आहे. या दृष्टीने भारतानेही आपल्या राष्ट्रीय कृषी धोरणात वेळोवेळी योग्य बदल करीत राहायला हवेत. हवामान बदलामुळे जगभरात पटकीसारख्या रोगांनी दरवर्षी काही लाख लोक मरण पावतात. डेंग्यू रोगाचा प्रसार कितीही उपाययोजना केल्या तरीही रोखता येणे शक्य झालेले नाही. हवामान बदलामुळे मानवी जीवनात जी उलथापालथ होते, ती एक प्रकारे राष्ट्रीय संपत्तीचीही हानी असते. संभाव्य महाशक्ती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारतासारख्या देशांनी हवामान बदलामुळे होणारे दुष्परिणाम हे राष्ट्रीय संकट मानून त्याच्या निवारणासाठी व्यवहार्य पावले उचलावीत. तसे करण्यासाठी नागरिकांमध्येही जागृती निर्माण करावी.
paranjapesamir@gmail.com
(लेखक उपवृत्तसंपादक आहेत.)

 

Sunday, July 3, 2016

अभिजाततेचे गानशिल्प...(वीणा सहस्त्रबुद्धे यांच्यावरील लेख - दै. दिव्य मराठी २ जुलै २०१६


दै. दिव्य मराठीच्या दि. २ जुलै २०१६ रोजीच्या अंकामध्ये प्रख्यात गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांच्यावर मी लिहिलेल्या लेखाची ही वेबपेज, टेक्स्टलिंक तसेच मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-samir-paranjape-column-on-gualher-family-5363310-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/02072016/0/6/
-------------------------
अभिजाततेचे गानशिल्प...
----------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-----
भारतीय शास्त्रीयसंगीत हा एक वटवृक्ष आहे. शास्त्रीय संगीतातील विविध घराणी ही या वटवृक्षाच्या शाखा आहेत. गेली अनेक शतके शास्त्रीय संगीतातील प्रत्येक घराण्याने आपले वैशिष्ट्य प्राणपणाने जपले आहे. कुमार गंधर्व यांच्यासारख्या गायकाने प्रत्येक घराण्यातील उत्तम ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करून नवतेचा जोरदार पुरस्कारही केला. किराणा घराण्याच्या पं. भीमसेन जोशी यांनी गायनातील पारंपरिकता जपत काही वेगळे प्रयोगही केले. गेली अनेक शतके भारतीय शास्त्रीय संगीत टिकले, वाढले ते अशाच गायकांमुळे. ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचीही नाळ याच परंपरेशी घट्ट जुळलेली होती. देशातील जी जुनी ख्याल घराणी आहेत त्यामध्ये ग्वाल्हेर घराण्याचा समावेश होतो. मुघल सम्राट अकबर याच्या कारकीर्दीत ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीला प्रारंभ झाला. उत्तर भारतातील शास्त्रीय गायकीचा बाज हा दक्षिण भारतातील गायकीपेक्षा काहीसा वेगळा आहे. या उत्तर भारतातील संगीताचे जन्मजात संस्कार वीणा सहस्रबुद्धे यांच्यावर झालेले होते. त्यांचा जन्म कानपूर येथे १४ सप्टेंबर १९४८ रोजी झालेला होता. वीणाताईंचे वडील प्रसिद्ध गायक शंकर श्रीपाद बोडस हे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते. वीणाताईंनी गायकीचे धडे वडील शंकर बोडस तसेच आपले वडील बंधू काशीनाथ बोडस यांच्याकडून घेतले होते. ख्यालगायकी भजनगायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या वीणाताईंनी आपली गायकी ही निव्वळ ग्वाल्हेर घराण्यापुरतीच मर्यादित ठेवली नव्हती. जयपूर किराणा घराण्यातील गायन पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्या गळ्यातून उतरवण्याचा ध्यासही त्यांनी घेतला होता. पंडित गजाननराव जोशी, पंडित वसंत ठकार, पद्मश्री बलवंतराय भट्ट यांच्या गायनाचा संस्कार वीणाताईंच्या गायनावर होता. त्यांनी आपल्या या गायनकळेची संथा आपल्या शिष्यांनाही दिली. त्यांनी अनेक शिष्य घडवले. त्यापैकी अंजली मालकर, सावनी शेंडे ही काही ठळक नावे. अंजली मालकर या वीणाताईंच्या सहवासात सुमारे वीस वर्षे होत्या त्यांच्याकडून मालकरांनी संगीत शिक्षण घेतले. काही गायक हे उत्कृष्ट सादरकर्ते असतात, परंतु ते उत्तम गुरू बनू शकत नाहीत. वीणा सहस्रबुद्धे या उत्तम गुरूही होत्या. पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठामध्ये त्या संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. सुमारे पाच वर्षे त्यांनी या विद्यापीठात संगीत अध्यापन केलेले होते. त्यांना केवळ गायनीकळाच अवगत होती असे नाही तर लहानपणी त्या कथ्थक नृत्यही शिकल्या होत्या. गायन, नृत्य अशा ललित कलांच्या संगमातून त्यांनी आपले आयुष्य समृद्ध केले होते. त्यांना शास्त्रीय संगीतातील अभिजाततेची विलक्षण ओढ होती. ही गायनी अभिजातता आपल्या गळ्यातून अवतरली पाहिजे या ध्यासाने त्या कायम आपला रियाज करीत असत. संगीतावर अशी निष्ठा असणारे गायक-गायिका नव्या पिढीत तुलनेने कमी आहेत. कारण झटपट पुढे जाण्याच्या स्पर्धेत बाजारू संगीताला आलेले महत्त्व. वीणा सहस्रबुद्धे यांनी कधीही संगीतातील तत्त्ववेत्त्याचा आव आणला नाही. आपल्यावर झालेल्या गायनसंस्कारांचा गवसलेला अर्थ त्यांनी अध्यापनातून गायकीतून आपल्या शिष्यांपर्यंत तसेच गानरसिकांपर्यंत पोहोचवला. १९६९ मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्या संगीत अलंकार झाल्या. पुढे १९७९ मध्ये त्यांनी कानपूर विद्यापीठामधूनच संस्कृत या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या सगळ्या शिक्षण संस्कारांची जोड देऊन त्यांनी आपली गायकी विकसित केली. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विकासासाठी पं. विष्णू नारायण भातखंडे, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. भास्करबुवा बखले आदींनी मोठे योगदान दिले आहे. जयपूर-अत्रोली घराण्याच्या गायिका श्रुती सडोलीकर-काटकर या सध्या उत्तर प्रदेशातील लखनौच्या भातखंडे संगीत विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून उत्तम कार्य करीत आहेत. उत्तर भारतातील संगीताशी मराठी शास्त्रीय गायकांची नाळ अशी जुळलेली आहे. त्या मालिकेतील वीणा सहस्रबुद्धे या महत्त्वाच्या दुवा होत्या. त्यांना २०१३ मध्ये राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. विविध देशांत त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले होते. संगीतातील अभिजाततेचा ध्यास घेतलेल्या वीणाताईंचे गायन म्हणून चिरस्मरणीय ठरले .
(लेखक उपवृत्तसंपादक आहेत.)