Thursday, November 30, 2017

वर्तमानातील घटनांशी नाळ जोडणारे जुन्या मराठी नियतकालिकांतील लेख वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरु केली `पुनश्च' वेबसाइट व अॅप - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी २८ नोव्हेंबर २०१७

दै. दिव्य मराठीच्या 28 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेजलिंक व मजकूर, जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/28112017/0/5/
---
वर्तमानातील घटनांशी नाळ जोडणारे जुन्या मराठी नियतकालिकांतील लेख
वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरु केली `पुनश्च' वेबसाइट व अॅप
मराठी साहित्यविश्वात होतोय प्रथमच असा अभिनव प्रयोग
- समीर परांजपे
मुंबई, दि. 28 नोव्हेंबर - मराठी साहित्यविश्वामध्ये अनेक नियतकालिके, वर्तमानपत्रे प्रसिद्ध होत आहेत. त्यामध्ये तत्कालीन विषयांवर जे प्रसंगोपात लेख प्रसिद्ध झालेले असतात ते कालांतराने नजरेआड होतात. जुन्या काळातील असे उत्तमोत्तम लेख जर विद्यमान परिस्थिती किंवा घटनांनाही लागू पडत असतील तर ते लेख शोधून मराठी वाचकांसमोर आणावेत या विचाराने ठाण्याच्या किरण भिडे यांनी `पुनश्च' या नावाने अॅप वwww.punashcha.com ही वेबसाइट नुकतीच सुरु केली आहे. अशा प्रकारची संकल्पना व या संकल्पनेवरील वेबसाईट व अॅपचा प्रयोग मराठी साहित्यविश्वात प्रथमच होत आहे.
यासंदर्भात `पुनश्च'चे संचालक किरण भिडे यांनी `दिव्य मराठी'ला सांगितले की, जुने पण कालसुसंगत साहित्य जे लेखक आणि संपादक यांनी खूप मेहनतीने तयार केलेले असते ते आज कुठेतरी धुळीत, रद्दीत, ग्रंथालयांच्या कपाटात पडून आहे ते वाचून त्यातले निवडक लेख युनिकोडमध्ये टाईप करून ऑनलाईन आणणे. असे उत्तमोत्तम साहित्य जास्तीतजास्त चोखंदळ वाचकांपर्यंत वेबसाईट आणि द्वारे पोहोचवणे. लेखकांना थेट वाचकांशी जोडून देणे आणि त्यांना नुसताच `मान' नाही तर 'धन'पण मिळेल हे पाहणे. वाचकांच्या प्रतिक्रिया सरळ लेखकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांनी दिलेले उत्तर वाचकापर्यंत हे उद्देश पुनश्च ही वेबसाइट व अॅप सुरु करण्यामागे आहेत.
ते पुढे म्हणाले की, अनेकदा विद्यमान स्थितीमध्ये असे काही प्रसंग घडतात की त्या प्रसंगांशी नाळ जुळेल असे लेख पूर्वी कोणत्यातरी नियतकालिकात किंवा वर्तमानपत्रांत येऊन गेलेले असतात. उदाहरणार्थ पहिला सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला याबद्दल अलिकडेच मोठा वाद रंगला. त्या अनुषंगाने नियतकालिकांचे काही मागचे अंक चाळता प्रसाद या मासिकाचा १९६८ सालचा ऑगस्ट महिन्याचा अंक हाती आला. तो गणेशोत्सव विशेषांक होता. त्यात पहिला गणेशोत्सव असा लेख मिळाला. त्यात खूप वेगळी माहिती होती. तो लेख आम्ही `पुनश्च' या उपक्रमाच्या वेबसाइट व अॅपवर झळकवला. तो लेख जुना असूनही आजच्या परिस्थितीलाही लागू पडणारा असल्याने वाचकांनी त्याचे स्वागतच केले. बालगंधर्वांच्या बाबतचा एक लेख असाच आम्हाला विचित्र विश्व या नियतकालिकाच्या १९८५ सालच्या अंकात मिळाला. बालगंधर्वांची अखेर असे त्या लेखाचे शीर्षक होते व तो लिहिला होता वसंत वैद्य यांनी. बालगंधर्वांच्या ५० व्या स्मृतिदिनानिमित्त तो लेख `पुनश्च'वर दिल्यानंतर त्या जुन्या लेखाचेही वाचकांनी भरभरुन स्वागत केले.
किरण भिडे पुढे म्हणाले की, विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे यांच्यातील जुन्या लेखांना अतिशय महत्वाचे संदर्भमूल्य असते. ताज्या घटनांशी नाळ जोडणारे हे जुने लेख त्याच वेळी वाचकांसमोर आणले तर त्याची खुमारीही वेगळी असते. जुन्या लेखांचा शोध घेतल्यानंतर त्या लेखाचे लेखक ह्यात असतील तर आम्ही त्यांचा हा लेख वेबसाइट व अॅपवर झळकविण्यासाठी लेखी परवानगी घेतो व त्यांना योग्य ते मानधनही लगेच पाठवून देतो. जर एखाद्या लेखाचा लेखक ह्यात नसेल तर त्याच्या वारसांकडून परवानगी मिळविण्याचा प्रयत्न करतो. तेही शक्य न झाल्यास तशी नोंद त्या लेखाखाली केली जाते. जर त्यातून वारसदारांचा शोध लागला तर त्यांना या लेखापोटी योग्य मानधन पोहचविले जाते. `पुनश्च'ची वेबसाइट व अॅप याचे सदस्य होणाऱ्या प्रत्येकाकडून वार्षिक शंभर रुपये एवढेच शुल्क आकारण्यात येते.
बॉक्स
लेखांच्या विषयानुरुप दिल्या जातात व्हिडिओ लिंक्स व शब्दार्थही
नव्या पिढीतील बहुसंख्य मुले मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमातून शालेय व पुढील शिक्षण घेत असतात. या युवा वर्गाला वर्तमानातील घडामोडींशी नाळ जोडणारे जुने लेख वाचायला प्रोत्साहित करावे यासाठी पुनश्च वेबसाइट व अॅपने काही नावीन्यपूर्ण गोष्टी केल्या आहेत. जुन्या नियतकालिकातील एखादा लेख जर पुनश्चवर प्रकाशित करण्यात आला तर त्यातील काही मराठी शब्दांचे अर्थ उलगडणारी लिंक या शब्दाच्या लगतच दिली जाते. त्याचबरोबर जो विषय असेल त्याच्याशी संबंधित व्हिडिओ किंवा वेबसाइटची लिंक लेखाच्या जोडीने समाविष्ट केली जाते. जेणेकरुन वाचकाला त्या विषयाचे सर्वंकष आकलन व्हावे. डिजिटल माध्यमामुळे हे सारे करता येणे शक्य असल्याने वाचकही उत्तम संदर्भमूल्य असलेले हे जुने लेख आवडीने वाचतील असे `पुनश्च'च्या किरण भिडे यांनी सांगितले.
दरवर्षी वाचायला मिळतील १०४ लेख
पुनश्च या वेबपोर्टल व अॅपवर वाचकांना वर्षभरात १०४ लेख वाचता येतील. या वेबपोर्टल व अॅपच्या माध्यमातून सभासद वाचकांना दर बुधवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून दोन लेख वाचावयास मिळतील. पुनश्चने चार आठवड्याचे म्हणजे आठ लेखांचे एक वेळापत्रक बनवलं आहे. वर्षात ५२ आठवडे असतात म्हणजे तेरा वेळा हे वेळापत्रक रिपिट होईल. पुुनश्चने मराठी ललित लेखनाचे ढोबळमानाने ८ प्रकार केले आहेत. (१) अनुभवकथन (२) चिंतन (३) व्यक्ती/संस्था परिचय (४) कविता/पुस्तक/चित्रपट/कला रसास्वाद (५) अर्थकारण/ राजकारण/ समाजकारण ( धर्म/अध्यात्म, जाती, अंधश्रद्धा, महिला इ. ) (६) कथा, स्वमदत लेख, स्थललेख, मृत्युलेख, उद्योग (७) आरोग्य/ शिक्षण/ पर्यावरण/ पालकत्व/ खेळ/ मराठी भाषा (८) खुला ( प्रासंगिक, मन/ मेंदू/ विज्ञान/ तंत्रज्ञान इ. मधील संशोधन वगैरे ).

Monday, November 27, 2017

स्वरांचे शिवधनुष्य! - वैशाली भैसणे-माडे - मुलाखतकार - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. २६ नोव्हेंबर २०१७च्या रसिक पुरवणी

दै. दिव्य मराठीच्या दि. २६ नोव्हेंबर २०१७च्या रसिक पुरवणीत प्रख्यात गायिका वैशाली भैसणे-माडे यांची मी घेतलेली ही मुलाखत.
---
स्वरांचे शिवधनुष्य!
----------
- वैशाली भैसणे-माडे
---
(शब्दांकन : समीर परांजपे)
--
लतादिदी मंगेशकर यांचे गाणे, त्यांचे करिअर, त्यांचे आयुष्य या साऱ्या गोष्टी त्यांच्यानंतरच्या पिढ्यांतील प्रत्येक गायिका अभ्यासत आल्या आहेत. खरंतर लता मंगेशकरांना आदर्श मानूनच अशा शेकडो गायिकांचे करिअर घडले आहे. हे करताना त्यांचे गाणे, त्यांचे आयुष्य यांचा अभ्यास ज्या ज्या गायिकांनी केला, त्यामध्ये मीही एक आहे. दीदींनी जो खडतर प्रवास केला, अफाट मेहनतीने जे यश मि‌‌ळविले, त्याला खरंच तोड नाही. त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि दैवी सुरांनी, पार्श्वगायनातील हे सर्वोच्च स्थान प्राप्त केले , ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते आहे.
माझ्या लहानपणी रेडिओवर कार्यक्रम चालायचे, त्यातून लतादीदींचे गाणे प्रथम ऐकायला मिळाले. लताबाई, आशाबाई, महम्मद रफी, किशोरकुमार, मन्ना डे आणि अशा अनेक गायक-गायिकांंची गाणी त्यावेळी माझ्या कानावर पडायची. पण, स्त्री गायिका म्हणून गाणे सादर करणाऱ्या त्या सर्वोत्कृष्ट गायिका असल्यामुळे मला लतादीदींबद्दलच अधिक आकर्षण वाटायचे. त्यांची गाणी ऐकताना खूप सहज वाटायची, पण गाताना ती अवघड व क्लिष्टही असायची. दीदींच्या गाण्यांची चाल इतकी सोपी वाटते, पण ते गाताना ती चाल आपण त्याच प्रमाणात का गाऊ शकत नाही, असे मला कायम वाटायचे. पण नंतर मला उमगले, लता मंगेशकर हे एक अभ्यासक्षेत्र आहे. हे अभ्यासक्षेत्र एखाद्या पीएच. डी.चा स्वतंत्र विषय होऊ शकते इतके व्यापक आणि खोल आहे. माझ्यापुरते बोलायचे, तर मी जेव्हा अभ्यास या दृष्टीने त्यांचे गाणे ऐकत गेले, तेव्हा त्यातून बऱ्याच गोष्टी शिकले. माइकवर गाणे, लाइव्ह गाणे, स्टेजवर गाणे, रेकॉर्डिंगच्या स्टु़डिओतले सर्व टेक्निक सांभाळून गाणे, या विविध प्रकारांमधील लतादीदी किती वेगळ्या आहेत, या गोष्टी अभ्यासातून मला थोड्याफार कळायला लागल्या. ही माझी प्रक्रिया अजूनही सुरु आहे.
लतादीदींनी गायलेल्या मराठी गाण्यांपैकी माझे अत्यंत आवडते मराठी गाणे म्हणजे ‘मालवून टाक दीप चेतवून अंग अंग' आणि लतादीदींच्या हिंदी गाण्यांपैकी माझे सर्वात आवडते गाणे म्हणजे ‘लग जा गले'. आता हे कबूल करायला हरकत नाही. लतादीदींची जी अतिशय कठीण गाणी आहेत, ती गायला अजूनही मी घाबरते. ‘लग जा गले' हे गाणे जो कोणी ऐकतो, तो सहज मंत्रमुग्ध होतो. मी हे गाणे यापूर्वी किमान एक हजार वेळा तरी विविध प्रसंगी गायले असेन. पण इतक्या वेळा गावूनही मला त्या गाण्याची भीती वाटते. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर लता मंगेशकरांची गाणी गाणे, हे शिवधनुष्य पेलण्यासारखे अवघड आहे. आणखी एक उपमा देते की, लतादीदींची गाणी म्हणजे, हिऱ्याची मोठी खाण आहे. त्यातून तुम्हाला पाहिजे, तो हिरा निवडा, असे जर कोणाला सांगितले, तर तशी निवड करणे खरंच अशक्य आहे.
लतादीदींच्या गाण्यातील हरकती, आलाप, ताल, सूर अशा साऱ्याच गोष्टी अफाट ताकदीच्या आहेत. त्यांच्यासारखे गाणे हे सहजशक्य नाही. त्या ज्या पद्धतीने गाणे गातात, ते गणित मला असे वाटते, आजतागायत कोणालाही जमलेले नाही. कॉपी सगळे करतात, पण लतादीदींसारखे गाता येणे, खरंच खूप अवघड आहे. ‘ज्ञानेश्वर माऊली’ हा दीदींचा एक अल्बम आहे किंवा ‘अभंग तुक्याचे’ असा एक अल्बम आहेत. हे दोन अल्बम जरी ऐकले तरी लक्षात येते, की लताबाईंना स्वरसम्राज्ञी का म्हणतात ते! दीदी गाताना संगीत वादकांबरोबर गाण्याचे, त्यांचे जे गणित असते, ते काही जगावेगळे आहे. तो मेळ फक्त आणि फक्त लता मंगेशकरच साधू शकल्या आहेत. मी माझे गुरुजी सुरेश वाडकरांकडे जेव्हापासून गाणे शिकायला जाऊ लागले, तेव्हापासून ते मला लतादीदींच्या गाण्यांची अनेक वैशिष्ट्ये सांगत आले आहेत. ते म्हणतात, संगीतवादक व गायक यांचा जो अजोड मेळ लतादीदी गाणे गात असताना दिसतो हे आणि हे फक्त एकच देवी करु शकते, त्या म्हणजे लतादीदी!
लतादीदींना अनेक जण माँ असेही म्हणतात. अशा प्रसंगी मला वाटते, लता मंगेशकरांकडून आजच्या गायिकांनी काय घ्यावे तर तो, त्यांचा विनम्रपणा आणि त्यांचे गाणे जगणे. एखादे गाणे म्हणणे आणि गाणे बोलणे, हे दोन्ही वेगळे आहे. दीदी गाणे गाण्यापेक्षा, गाणे बोलतात, म्हणजे, त्या गाण्यातील शब्दांच्या भावना इतक्या जिवंत करतात की, गाण्यात वर्णन केलेला अनुभव ते ऐकणाऱ्याच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहातो. लतादीदी गाणे बोलतात, ते याअर्थी. त्यांचे गाणे बोलण्याची ही शैली खूप छान आहे.
एखादे दुसऱ्या भाषेतले गाणे, जेव्हा आपल्याला गायला संधी मिळते, तेव्हा ते असे गावे की त्या भाषेतल्या ऐकणाऱ्या लोकांना ते गाणे त्यांचे वाटावे. लतादीदींनी मराठी, हिंदी गाणी गायलीच , पण त्याचबरोबर इतर अनेक भाषांत त्यांनी गाणी गायली आहेत. दीदींचे उर्दूूचे उच्चार अतिशय चपखल आहेत. इतर भाषांत गाताना त्या भाषेत, त्या शब्दांचा जसा उच्चार होतो, तशाच पद्धतीने तो उच्चार करण्यासाठी दीदींनी अफाट अभ्यास केला आहे. सगळ्याच गायिका गातात, पण उच्चारांमध्ये जर का थोडीशी जरी कमतरता असली, तर कसे वाटते माहिती आहे? एखादी नवरी खूप छान नटून बसली आहे. तिचा साजशंृगार झाल्यावर सर्वात शेवटी तिच्या कपाळावर बिंदी लावली गेली, की तिचा तो मेकअप किंवा साज पूर्ण होतो. तसेच गाण्यातील उच्चारांचेही आहे. उच्चार व त्या शब्दांतील भावना जर त्या भाषेच्या वळणानुसारच तशाच्या तशा गायिकेच्या गळ्यातून उतरल्या, तर त्या गाण्याला पूर्णत्व येते. दीदी कोणत्याही भाषेतले गाणे गायल्या, तरी त्या भाषेचे जे वळण आहे, त्यानुसार होणाऱ्या उच्चारणाला सर्वोच्च महत्व देतात. लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा अभ्यास करताना मी ही गोष्ट खूप अनुसरली. 
अशा या श्रेष्ठ गायिकेला भेटण्याची संधी दोन वेळा आली होती, पण काही कारणाने ती हुकली. तरी मी त्यांची निस्सिम अनुयायी राहणारच आहे. त्यांचे आयुष्य माझ्यासाठी आदर्श आहे. ते आदर्शच राहणार आहे. खरंतर मी त्यांचा जेव्हापासून माग घ्यायला लागले तेव्हापासून, जसे त्यांचे गाणे फॉलो केले, तसे त्यांचे आयुष्यसुद्धा फॉलो केले. लता मंगेशकर यांचा आदर्श ठेवून आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकतो का? त्याचे उत्तर माझ्या मनाने ‘हो’ असे दिले. आता, लतादीदींना मानाचा मुजरा करणारा, त्यांच्याच गाण्यांचा एक कार्यक्रम मी करावा, असे मनात आहे. अजून तो योग काही कारणाने आलेला नाही. पण भविष्यात मी असा कार्यक्रम नक्कीच करणार आहे, कारण माझ्या आदर्शाचे मला अशारितीने ऋण फेडायचे आहे...

माझे लता मंगेशकर विद्यापीठ - संजिवनी भेलांडे - मुलाखतकार - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. २६ नोव्हेंबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. २६ नोव्हेंबर २०१७च्या रसिक पुरवणीत प्रख्यात गायिका संजीवनी भेलांडे यांची मी घेतलेली ही मुलाखत.
---
माझे लता मंगेशकर विद्यापीठ 
---
- संजीवनी भेलांडे
soulsanjivani@gmail.com 
---
(शब्दांकन - समीर परांजपे) 
--
लता मंगेशकर म्हणजे पवित्र, पाक, बेदाग शुद्धता. त्यांची सूरसाधना ही सर्वोत्कृष्टतेचे आदर्श उदाहरण आहे. त्या आदर्श आहेत. त्या विद्यापीठ आहेत. त्या महाग्रंथ आहेत. गाणे कसे म्हणावे या गोष्टीच्या त्या गीता, कुराण, बायबल, वेद, उपनिषद असे सारे काही आहेत. मुख्तसर सी बात है असे म्हटले तर त्या सरस्वतीचे रुप आहेत. त्या विशाल वृक्ष आहेत. त्या वृक्षाच्या छायेतली आम्ही आम्ही छोटी छोटी रोपटी आहोत. मला आठवते की लता मंगेशकरांच्या आवाज पहिल्यांदा रेडिओवरुन मी ऐकला. शनिवारी रविवारी शाळेला सुट्टी असायची. त्या िदवशी रेडिओवर रोज सकाळी साडेसात वाजल्यापासून संगीत सरिता, ठुमरी, विविध भारतीवर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, भुलेबिसरे गीत, गाणी लावून मी बसायचे. वाघ जसा टपून बसलेला असतो तसे टपून बसायचे. माझ्या मावशीने मला अमेरिकेहून एक टेपरेकाॅर्डर आणून दिला होता. लता मंगेशकर यांचे रेडिअोवर लागले की गाण की पटकन टेपरेकॉर्डचे बटन दाबायचे आणि ते गाणे रेकॉर्ड करायचे. मग ते गाणे रेकॉर्ड केलेली टेप रिवाईंड करायची, रिवाइंड करायची, मग रिवाईंड फॉरवर्ड असे करत करत त्या गाण्यामध्ये लतादिदिंनी विशिष्ट ठिकाणी जागा कशी घेतली आहे ती ऐकून त्याची प्रॅक्टिस मी करत असे. हे झाले की मग दुसरी एक ब्लँक टेप घ्यायची आणि ती टेपरेकॉर्डरमध्ये घालायची आणि मग अापण गायचे आणि ऐकायचे की ते गाणे लतादिदिंसारखे झाले की नाही झाले ते. असे करत करत मी लता मंगेशकर विद्यापीठामध्ये शिकले. त्यांचा तो खूप असा स्वच्छ स्वर नेहमी मन मोहवून टाकत असे. `ज्योती कलश झलके' या गाण्यातील लतादिदिंचा सुरुवातीचा आलाप किंवा `किस मोडसे जाते है'चा सुरुवातीचा आलाप सुरु झाला की तो सर्वांना भारुनच टाकतो. पूर्ण खोली भरुन जाते स्वरांनी. तो स्वर अत्यंत बिनचूक असतो. त्याचा असर होतोच होतो आपल्यावर. `आ जाने जा...' या गाण्यामध्ये त्या जो आ लावतात त्यात एवढी ताकद आहे की ऐकणाऱ्याचे सारे लक्ष ते स्वर वेधून घेतात. खरेतर ते आहे एक कॅब्रे गाणे. पण ते गाणे गाताना लतादिदी आपल्या आवाजातून ज्या भावना व्यक्त करतात, त्या गाणे ऐकणाऱ्यांपर्यंत पोहोल्याच पाहिजेत. दुसरा पर्ययाच नाही. काही दुसऱ्या गाण्यांची उदाहरणे द्यायची तर `जा मै तोसे नाही बोलू' या गाण्यामध्ये लतादिदींनी सुरांचा अभिनय सादर केला आहे. `जा मै तोसे नाही बोलू' हे एक वाक्य त्या गाण्यामध्ये १५ वेळा येते. दरवेळेला त्या वाक्याच्या चालीत व एक्स्प्रेशनमध्ये खूप व्हेरिएशन आहेत. कधी ते वाक्य रुसून तर कधी विनंती करुन म्हणायचे आहे. एका वाक्याचे किती भाव प्रकट झालेत या गाण्यात. अशी लताजींची कितीतरी गाणी आहेत की ज्यांचे व्हिज्युअल्स तुम्ही बघितलेले नसले तरी त्याची ऑडिओ ऐकताना दिदिंच्या आवाजातून त्या गाण्याची दृश्यात्मकता रसिकाला सहज कळून येते. इतक्या सहजशैलीने त्यात कोणतेही गाणे खुलवितात. मी शाळेत असल्यापासून लता मंंगेशकरांचीच गाणी गात अाले आहे. तेव्हांतर लताबाई म्हणजे कोण हे कळायचेही वय नव्हते. लताबाई माझ्यासाठी मापदंड आहेत. जसा रोज सूर्य उगवतो तसे रोज लता मंगेशकरांचे गाणे ऐकणे हे नित्यकर्तव्य होते व आहे. व्यक्ति व तिची कला यांच्यात कधीही गल्लत करु नये. लता मंगेशकर यांची जी गानकला आहे तीच आम्हा रसिकांसाठी लता मंगेशकर आहे. िचत्रपटात काम करणारे कलाकार, गायक संगीतकार यांच्या कलेशी रसिक म्हणून आपला अधिक संबंध असतो. तसाच असावा. अर्थात लतािददिंना मी भेटले तेव्हा आनंद झाला मला. त्यांना पहिल्यांदा मी एका लग्नासमारंभात भेटले होते. वीस वर्षांपूर्वीची घटना आहे ही. लता मंगेशकर या लिजंड आहेत. लतादिदींचा सूर हा अत्यंत फोकसने लागतो. `आप यू फासलोंसे गुजरते रहे, दिलसे कदमोंकी आवाज आती रही' या गाण्यामध्ये आप यूँ हे शब्द म्हणताना लतादिदींनी जे स्मित केलय ते लाजवाबच आहे. गाण्याचा जो माहोल आहे त्यानूसार लतादिदी गाताना भाव प्रकट करतात. त्यांच्या गाण्यात सुरांचा अभिनय आहे. प्रत्येक कलाकाराची संगीत जाणून घेण्याची एक क्षमता असते. ही क्षमता लतादिदींकडे अफाट आहे. त्यांची शब्दांची समज अफलातून आहे. जेव्हा मी गाणी गातो तेव्हा लता मंगेशकरांकडून आम्ही काय शिकलो तर हेच शिकलो की शब्दांचा अर्थ समजून त्यांना कसे भाव ओतायचे आणि तेही खोटे खोटे नाही. त्या पूर्ण गाण्याची, शायरीची सखोलता समजण्याची क्षमता आपल्यात आली पाहिजे. मीराबाईंच्या पदांचेच उदाहरण घेऊ. मीराची ओळख ही आत्म्याची आहे. मै आत्मन हूँ शरीर नही हूँ असे ती म्हणते. त्यामुळे पाचशे वर्षानंतरही मीराबाईच्या आत्म्याचा जो सुगंध आहे तो तिच्या पदांमधून सर्वांना जाणवतो. त्यामुळे मीराबाईची पदे लताबाईंसारख्या व्यक्तिने गाणे हे अत्यंत साहजिकच आहे. लतादिदिंचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आयुष्यभर स्वत:ची आयुष्य आपली ओळख म्हणजे आपली कला अशीच ठेवलेली आहे. लता मंगेशकर आज ७५ वर्षे गात आहेत. कोणत्या प्रोफेशनमध्ये ७५ वर्षे काम करतात हो? सांगा बरं. शक्यच नाही. एखाद्या अभिनेत्रीची अॅक्युचल कामाची वर्षे १० ते १२ वर्षे धरली तर सात पिढ्यांमधील अभिनेत्रींसाठी लता मंगेशकर यांनी गाणे गायलेले आहे. केवळ कर्तृत्वाच्या जोरावर लतादिदींनी एवढे नाव, यश मिळवले ही अपूर्व गोष्टच आहे. लता मंगेशकरांनी गायलेली मीराची गाणी लहानपणापासून मी ऐकत आले आहे. मी मीराच्या पदांचा इंग्रजीत अनुवाद केला. त्याचे पुस्तक मीरा अँड मी या नावाने प्रसिद्ध झाले आहे. मीराबाईंच्या अनुवादित केलेल्या रचना मी इंग्रजीतून गायले. एखाद्या गायिकेला जी गाण्याची भूक असते ती लतादिदींची गाणी गायल्याने पूरी होते. त्या गाण्यांमध्ये भावनाप्रकटीकरणाला पूरेपूर वाव असतो. खरचं काही उत्तम गायल्यासारखे वाटते. काही काळापूर्वी मी सचिन पिळगावकर यांच्याबरोबर पिकनिक अंताक्षरी हा कार्यक्रम एका चॅनेलसाठी केला होता. दूरदर्शनवर स्वर कवितेचे हा कार्यक्रम प्रवीण दवणे यांच्या बरोबर केला. माझ्या सर्व लाइव्ह शोजचे निरुपण मी स्वत: करते. मग तो शो मराठी, इंग्लीश, उर्दू या तीन भाषांपैकी कोणतीही असो. `लता 75' हा कार्यक्रम मी सादर करते. त्यात लतादिदींची निवडक गाणी मी म्हणते. ती लोकांना आवडतात कारण मूळ गाणीच फार सुंदर आहेत. लताबाईंच्या अनेक गाण्यांचे मी िचत्रीकरण बघितलेलेच नाही. `ये दिल और उनकी निगाहों के सायें' हे त्यांचे गाणे घ्या. या गाण्याचा व्हििडओ यूट्युबवर उपलब्धच नाही. कोण नायिका पडद्यावर गात आहे याची मला काहीही माहिती नाही. पण हे गाणे ऐकल्यावर तुम्ही आपसूक काश्मिरमध्ये पोहोचता. अशी सहजरित्या तुम्हाला आपल्या कवेत घेणारी खूप गाणी आहेत. `हाये जिया रोए' या गाण्यातील रोए या शब्दांत आक्रंदनाचे भाव आहेत. ते लतादिदिंनी ज्या रितीने प्रकट केले आहेत त्याला तोड नाही. `दिलवर दिलसे दिलसे प्यारे' हे गाणे पडद्यावर अरुणा इराणी नाचत नाचत म्हणताना दिसते. त्या नायिकेच्या व्यक्तिमत्वाचा भाग होऊन पार्श्वगायन करणे हे वाटते तितके सोपे नाही. हे काम अत्यंत सहजपणे लता मंगेशकरांनी अनेक गाण्यांत केले आहे. आता आम्ही सारे जण ट्रॅक सिस्टिममध्ये गातो. आधी गाणे रेकॉर्ड होते. मग ते कुठच्या अभिनेत्रीसाठी आहे ते ठरते. पूर्वीप्रमाणे एका नायिकेसाठी खूप गाणी गाण्याची आता िचत्रपटात वेळच येत नाही. फिमेल ओरिएंटेड गाणीच सध्या फारशी नसतात. लतादिदींच्या गानकारकिर्दीला ७५ वर्षे पूर्ण झाली. त्या संगीताचे विद्यापीठच आहेत. या विद्यापीठात प्रत्येक होतकरु गायक-गायिकेने प्रवेश घेतला पाहिजे. शास्त्रीय संगीताची घराणी आहेत. तशी सुगम संगीताची घराणी नाहीत. त्यामुळे सुगम संगीतात एकच विद्यापीठ आहे ते म्हणजे लता मंगेशकर. लता बाईंचे गाणे हे घराणे आहे. त्यांचा आदर्श ठेवून गाताना त्यांच्या आवाजाची नक्कल कोणीही करु नये. लताबाईंचा स्वर, त्यांची शैली, सूराचा लगाव या गोष्टी बारकाईने अभ्यासण्यासारख्या आहेत. त्या अतिशय बिनचूक आहेत. १०० टक्के सूर लागणे म्हणजे काय याचा अनुभव घ्यायचा असेल तर लतादिदिंचे गाणे ऐकावे. लता मंगेशकर यांच्यासारखे गाणे म्हणजे वरच्या पट्टीत गाणे असे काही जणांना म्हणजे जे त्यांच्यासारखे गाऊ पाहातात त्यांना वाटते. काळी एकच्या वरच्या पट्टीच्या गाऊन वरचा सूर लावणे म्हणजे लता मंगेशकरांसारखे गाणे असा काहींचा समज झालेला असतो पण तो अयोग्य आहे. दिदिंच्या स्वराची शुद्धता आपल्यात आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. जिच्या गळ्यात सूर आहे अशी भारतातील प्रत्येक मुलगी एकलव्यासारखे लताबाईंचे गाणे शिकते. मी पण असाच त्यांच्या गाण्याचा अभ्यास केला आहे. भक्तीचा स्वर म्हटला की लतादिदिंचे अल्ला तेरो नाम हे गाणे आठवते. लोरी म्हणजे धीरे से आजा रे अखियनमे, भूपाळी म्हणजे घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, रोमान्स म्हणजे `तेरे लिए पलकोंकी चादर ओढे' अशी समीकरणे अनेकांच्या मनात तयार झाली आहेत. याचे कारण लतादिदींचा मधुर स्वर. मधुबाला ते माधुरीपर्यंतच्या कित्येक पिढ्यांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले. ७५वर्षे झाली तरी एखाद्या व्यक्तीचे काम कसे तरुण राहाते हे पाहायचे असेल तर लतादिदिंच्या गाण्यांकडे पाहा. लतादिदींची गाणी गाताना मला खूप समाधान मिळते. गायनाबरोबरच मी म्युझिक कंपोझिंगला सुरुवात केली. हृदयनाथ मंगेशकर हे महान संगीतकार आहेत. त्यांच्या शैलीचा माझ्या म्युझिक कंपोझिंगवर खूप मोठा प्रभाव आहे. पण गाणे हृदयनाथ मंगेशकरांसारखे बनवावे हाच माझा प्रयत्न असतो. लतादिदींचा माझ्यासारख्या गायिकांवर जो प्रभाव आहे तो अमीट आहे. लतादिदी या एकमेवाद्वितीय आहेत.

जैत रे जैतच्या वेळी सृजनाचे योग जुळले... - - लता मंगेशकर - (शब्दांकन - समीर परांजपे) - दै. दिव्य मराठी दि. 15 आँक्टोबर 2017



भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांची मी घेतलेली मुलाखत
----
भारतरत्न लतादिदी मंगेशकर यांची मी जैत रे जैत चित्रपटाच्या आठवणींसंदर्भात घेतलेली ही विशेष मुलाखत. हा सुवर्णयोग आला ती मुलाखत दै. दिव्य मराठीच्या दि. 15 आँक्टोबर 2017च्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाली आहे. तो मजकूर, जेपीजी फाइल व वेबपेजलिंक सोबत दिली आहे.
---
सृजनाचे योग जुळले...
------------------------
- लता मंगेशकर
------------------------
(शब्दांकन - समीर परांजपे)
-----
‘जैत रे जैत’ या कादंबरीवर आम्ही चित्रपट काढला. आप्पासाहेब दांडेकरांची ही अत्यंत आवडती कादंबरी होती. त्यामुळे निर्माती म्हणून उषाने (मंगेशकर) या कादंबरीवर चित्रपट बनविण्याची इच्छा आहे सांगितले. तेव्हा आप्पासाहेब अतिशय खुश झाले.
माझी आप्पांची ओळख तशी खूप जुनी. मी भगवद््गीता रेकॉर्ड केली तेव्हाची. त्यावेळी आप्पासाहेब घरी येऊन संस्कृत मला शिकवायचे. सगळी भगवद््गीता म्हणून दाखवायचे. मला म्हणायचे, म्हणून दाखवा, आता मला. मग संभाषण करायला लावायचे. त्यातल्या चुका लक्षात आणून द्यायचे. संस्कृत उच्चारांमधले दोष सांगायचे. आम्ही पहिल्यांदा घरी रिहर्सल करायचो. मग मी भगवद््गीतेतले अध्याय रेकॉर्ड करायचे.
आप्पा दांडेकरांशी आमचे असे स्नेहबंध होते. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या दोघांतला जिव्हाळ्याचा विषय होता. पुढे त्यांच्या ‘जैत रे जैत’ या कादंबरीवर आम्ही चित्रपट करायचे ठरविले, तेव्हा हृदयनाथ मंगेशकर यांनी त्या चित्रपटाचे संगीत करावे ,असेही ठरले. या चित्रपटात माझे एकच गाणे होते. ते म्हणजे,‘मी रात टाकली.' गाणे अतिशय सुंदर होते. पण हेच कशाला, सगळीच गाणी त्या सगळ्या वातावरणाला शोभेल अशीच होती. हा चित्रपट ठाकर या आदिवासी जमातीतील माणसांची गोष्ट सांगतो. जब्बार पटेल हा चित्रपट बनविताना एका गोष्टीवर ठाम होते ते, म्हणजे कथानकात जे आहे तेच शक्यतो, या चित्रपटात दाखवायचे. उगीचच नवीन काहीतरी ड्रेस तयार केलेत, ठाकरांच्या बोलीपेक्षा चित्रपटातील पात्रे वेगळेच, काही बोलत आहेत किंवा उगीचच भलत्या ठिकाणी डान्सचे गाणे घातले आहे असे जब्बार पटेल यांनी काहीही केले नाही. चित्रपटातील नृत्याच्या जागेत ठाकरांचे नृत्य घेतले. ठाकरांची जशी जीवनशैली आहे, तशीच चित्रपटात दाखविली. म्हणूनच चित्रपट उत्तम झाला. त्याला विश्वासार्हता आली.
‘जैत रे जैत’ या चित्रपटात चिंधी या नायिकेच्या भूमिकेत स्मिता पाटील होती. तिने आणि मोहन आगाशे यांनी खूपच छान काम केले. शांतारामबापूंचा नातू सुशांत रे याने लहानपणीच्या नाग्याची भूमिका केली होती. त्याचाही भाग स्मरणात राहणारा होता. या चित्रपटाशी जोडलेली एक गोष्ट सांगते. तो प्रसंग ऐकून, आम्हीही भयंकर घाबरलो होतो. ते म्हणजे, कर्नाळ्याला चित्रीकरणादरम्यान मोहन आगाशेे यांना खरोखर मधमाश्या चावल्या होत्या. त्याचा त्यांना खूप त्रास झाला होता. औषधोचारही घ्यावे लागले होते. अशा अडचणींवर मात करुन ज्या वास्तववादी पद्धतीने हा चित्रपट बनवायला हवा होता, तसाच जब्बार पटेल यांनी बनविला. हृदयनाथनी चित्रपटासाठी जी गाणी केली, ती अगदी त्या कथानकाला अनुरुप अशीच होती.
ना. धो. महानोर यांनी ही सर्व गाणी लिहिली. त्यांच्यासोबत पुढे मी‘माझ्या आजोळची गाणी' मी रेकॉर्ड केली . महानोर नेहमीच भावगर्भ गाणी लिहितात. माझ्या मते, ते फार मोठे कवी आहेत. ते आपल्या छोट्याश्या गावाला राहातात, शेती करतात. त्यांच्यामध्ये काव्याचा जो एक नैसर्गिक गुण आहे त्यातूनच त्यांच्यातील कवी घडला असावा. सरतेशेवटी, मी तर असे म्हणेन की, ‘जैत रे जैत’ या चित्रपटामध्ये प्रत्येक गोष्ट जुळून आली होती. त्यामुळेच हा चित्रपट खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरला.

नाचता येते म्हणून जगते.... - समीर परांजपे (बॉलिवूडमध्ये ज्या विदेशी नर्तक-नर्तिका येतात त्यांच्यावरील लेख)

असाच एक लिहिलेला लेख...(बॉलिवूडमध्ये ज्या विदेशी नर्तक-नर्तिका येतात त्यांच्यावरील लेख)
-----------------
नाचता येते म्हणून जगते.... 
-------------
- समीर परांजपे
---
`देसी गर्ल' हे दोस्ताना या हिंदी चित्रपटातले गाणे आठवतेय का तुम्हाला? प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम व अभिषेक बच्चन देसी गर्लच्या ठेक्यावर लयदार नाचत आहेत. देसी गर्ल प्रियांका चोप्रावर आपली नजर खि‌ळून राहातेय असे वाटतेय तोवर तिच्या मागे नाचणाऱ्या डान्सर्स मुलींवर आपली नजर खिळते. या डान्सर मुलींमुळे प्रियांका चोप्राचे भारतीयत्व अधिक ठसठशीतपणे अधोरेखित होते. कारण तिच्यामागे असणाऱ्या सुमारे ५० मुली असतात लख्ख गौरवर्णीय. त्या असतात विदेशी नर्तिका. बॉलिवूड चित्रपटातील एका गाण्यात इतक्या विदेशी नर्तिका असणे ही गोष्ट फारशी जुनी नाही बर का? देशी गर्ल गाणे असलेला दोस्ताना चित्रपट झळकला होता अवघ्या तीन वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ रोजी. या चित्रपटाच्या आधी आणि नंतरही हिंदी चित्रपटांतील बऱ्याच गाण्यांमध्ये या विदेशी नर्तिका आपली मोहक अदाकारी दाखविताना दिसतातच.
भारतात नृत्यकलेत निपुण असलेल्या मुली कमी आहेत का? तर अजिबातच नाही. मग या विदेशी नर्तिकांना बाॅलिवूड लाल गालिचे अंथरुन का बोलावते? 
हॉलिवूड, युरोप व अन्य प्रगत देशांतील चित्रपटसृष्टी तर बॉलिवूडपेक्षा अधिक पैसेवाली, जागतिक अपील असलेली वगैरे. मग या विदेशी मुली भारतात त्याही मुंबईमध्ये हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी का येत असाव्यात? असे अनेक प्रश्न देसी गर्ल गाणे बघताना मनात येत होते.
शोधा म्हणजे सापडेल असे म्हणतात. 
मुंबई असो किंवा भारतातील कोणतेही शहर, गाव घ्या. तिथे तुमच्या आमच्यासारखे निमगोरे किंवा सावळे लोक रस्त्यावरुन जात असतील तर फार तर तुमच्याकडे इतर लोक एक कटाक्ष टाकतील किंवा ढुंकूनही बघणार नाहीत. पण त्याच ऐवजी एखादा विदेशी गौरवर्णीय पुरुष किंवा महिला रस्त्याने चालली असेल तर लोक माना वळवून वळवून त्याच्याकडे बघतात.
कारण...
गोरी कातडीचा माणूस हा श्रेष्ठच असतो, तो आपल्यापेक्षा जास्त गुणवान असतो असा काहीसा समज आपण करुन घेतलाय. तो आजच नाही तर इंग्रजांची सत्ता देशाच्या बोकांडी बसायच्या आधीपासूनच तो इथे रुढ आहे. भारतच कशाला गौरेतर कोणत्याही देशांत हीच भावना सगळीकडे थोड्याफार फरकाने दिसेल. मग असे आहे तर मग या विदेशी नृत्यांगना अापला श्रेष्ठ देश सोडून या गौरेतर भारतवर्षातील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये यायला का इतक्या धडपडतात? त्या इथे येऊन नेमके काय करतात?
आपल्या मायदेशातून भारतातील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अशाच उडून यायला या विदेशी नृत्यांगना म्हणजे काही अस्मानी पऱ्या नाहीत. या विदेशी नृत्यांगनांना भारतातील चित्रपटांत कामे मिळवून देण्यासाठी मुंबईत बरेच एजंट्स आहेत. त्यांनी आपल्या कंपन्या रितसर स्थापन केल्या आहेत. या एजंट्सची कार्यालये आहेत जास्त करुन अंधेरी, मालाड, गोरेगाव या भागांमध्ये. त्यातीलच एक एजंट आहे विकी (नाव बदलले आहे)...त्याचा दूरध्वनी क्रमांक मिळाल्यानंतर बऱ्याचदा फोन केला. पण त्याच्यासाठी माझा मोबाइल नंबर ओळखीचा नसल्याने तो कदाचित उचलला गेला नाही. मग साधारण २२ व्या वेळा फोन केल्यानंतर त्याने फोन उचलला. त्याला एक संदर्भ सांगितला. ते नाव ऐकल्यावर तो विदेशी नृत्यांगना भारतात कशा येतात व त्यांच्या कामाचे नेमके स्वरुप काय असते याविषयी सविस्तर फोनवरच बोलायला तयार झाला.
विकी सांगत होता `२६ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. इस्टोनिया, लॅटव्हिया, लिथुआनिया, कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, बेलारुस, मोल्दोवा, युक्रेन, रशिया, आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया असे पंधरा देश त्यातून निर्माण झाले. यापैकी रशिया वगळता बहुतेक देशांत गरीबी आहे, बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे त्या देशांतील उत्तम नर्तिका असलेल्या मुली या वर्क व्हिसा मि‌‌ळवून भारतात बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी येत असतात.'
विकी सांगत राहिला ` सोव्हिएत रशियातून फुटून निघालेल्या देशांमध्ये आता तेथील काही लोकांनी अशा डान्सर रिक्रुटिंग एजन्सीज स्थापन केलेल्या आहेत की ज्यांच्याशी आम्ही संपर्कात असतो. या विदेशी एजन्सी त्यांच्याकडचे उत्तम नर्तक व नृत्यांगना यांची सविस्तर माहिती आम्हाला पाठवितात. कोणत्या चित्रपटात कोणत्या गाण्यासाठी किती विदेशी नृत्यांगना हव्यात याची माहिती निर्माता, दिग्दर्शक तसेच नृत्यदिग्दर्शकापर्यंत आमच्याकडे आधीच पोहोचलेली असते. त्यानूसार मग विदेशी एजन्सीशी संपर्क साधून आम्ही तितक्या नृत्यांगनांची निवड करतो. त्यांची रितसर कागदपत्रे भारतात सादर करुन त्यांना वर्क व्हिसा मिळवून देण्यासही मदत करतो. अशा पद्धतीने अत्यंत कायदेशीररित्या त्या बॉलिवूडमध्ये आपल्या नृत्याचे कसब दाखविण्यासाठी अवतरतात.'
`एखाद्या चित्रपटातील गाण्यासाठी कधी कधी एका गटात पाच ते सहा गौर नृत्यांगनांना त्यांच्या मायदेशातून बॉलिवूडमध्ये बोलाविले जाते. रशियाच्या सावलीतल्या देशांतील असल्यामुळे या मुलींना इंंंग्लिश भाषा चांगली येत असे नाही. त्या जेमतेम इंग्रजी बोलू शकतात. उत्तम नृत्याबरोबर बऱ्यापैकी इंग्रजी येणे हा पण त्यांच्यासाठी कदाचित बॉलिवूडमध्ये काम मिळविण्यासाठी पात्रता निकष ठरलाय असे वाटते' असे म्हणून आपल्याच विनोदावर विकी फोनवर हसला.
कझाकिस्तान, किरगिझस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, बेलारुस, मोल्दोवा, युक्रेन, रशिया, आर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया या देशांतून जास्त करुन विदेशी नृत्यांगना बॉलिवूडमध्ये नृत्यांगना म्हणून येतात. वर्क व्हिसा मिळाल्याने त्या भारतात विशेषत: मुंबईत तीन ते चार महिने राहातात. त्यांना त्यांच्या कामाचा पैका किती मिळतो? असा प्रश्न संभाषणादरम्यान दोनदा-तीनदा विचारला. त्यावर विकीने पटकन उत्तर दिले नाही. मग वेगळ्याच प्रश्नाला उत्तर देताना मध्येच त्याने काही आठवल्यासारखे केले व सांगू लागला ` या विदेशी नृत्यांगना वर्क व्हिसा व त्यांचे आवश्यक सामान घेऊन भारतात येतात. बाकी त्यांच्या सुरक्षिततेची, खाण्यापिण्याची, राहाण्याची सारी व्यवस्था आम्ही पाहातो. मुंबईतील अंधेरी, वर्सोवा, मालाड पश्चिम अशा काही भागांतील आलिशान इमारतींमध्ये या विदेशी नृत्यांगना सहा ते सात जणींच्या गटात एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहातात. हा फ्लॅट आम्हीच त्यांना भाड्याने मिळवून देतो. अर्थात या फ्लॅटचे भाडे त्यांनी त्यांच्याच कमाईतून भरायचे असते. पाच-सहा जणी एकत्र राहिल्याने त्यांचा इथे राहाण्याचा खर्चही विभागला जातो व त्यांचे पैसेही वाचतात. `
तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत बॉलिवूडच्या चित्रपटांत जितके काम असेल तितके त्या करतात. एका शिफ्टसाठी भारतीय नृत्यांगनांना जितकी रक्कम मिळते त्यापेक्षा साहजिकच थोडी जास्त रक्कम या विदेशी नृत्यांगनांना मिळते. आठ तासाची एक शिफ्ट असते. २००७ साली या विदेशी नृत्यांगनांना महिना १००० ते १६०० डॉलर इतके पैसे चित्रपट निर्मात्याकडून मिळायचे. पण आता दहा वर्षांनी चित्र खूप बदलले आहे. आता या विदेशी नृृत्यांगनांची दर महिन्याची कमाई प्रत्येकी सरासरी सुमारे ३००० डॉलरपर्यंत म्हणजे भारतीय रुपयांत साधारण एक लाख ९२ हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. या कमाईत दर महिन्याला थोडेवर खाली होऊ शकते. पण इथे भारतात कमाई करुन त्या जेव्हा त्या आपल्या देशात परत जातात तेव्हा तेथे उदरनिर्वाहासाठी त्यांना हे पैसे पुरेसे ठरतात.'
या विदेशी नृत्यांगना बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी येतात वगैरे ठीक आहे. पण त्यातील काही व्यसनीही असतात. काही अमली पदार्थांच्या तस्करीत सामील झाल्याचीही तुरळक उदाहरणे आहेत. काही जणीही वेश्याव्यवसायही करतात असे निदर्शनास आले होते. मात्र असे प्रकार या विदेशी नृत्यांगना करत नाही असे विकी असो वा तशाच एक दोन एजंटनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना सांगितले. कारण या विषयावर उघडपणे फारसे कोणी बोलत नाही. का ते माहित नाही? खरतर विदेशी नृत्यांगना भारतात चित्रपटात काम करण्यासाठी आणणे हा काही चोरटा धंदा तर नाही. पण या व्यवसायाभोवती या एजंटांनी गुढ वलय ठेवलेय हे मात्र खरे...
--
अंधेरी लिंक रोडवरची ओबेराॅय स्प्रिंग्स ही इमारत. या इमारतीत अलीकडेच कंगना राणावतने फ्लॅट विकत घेतला आहे. विपुल शहा, प्रीती सप्रू, शर्लिन चोप्रा, लव्हली सिंग असे अनेक सेलिब्रिटीज या इमारतीत राहातात. याच इमारतीत बेलारुसमधील पाच ते सहा नृत्यांगना एक फ्लॅट भाड्याने घेऊन एकत्र राहात आहेत असे कळले होते. त्यामुळे त्यांची भेट घेऊन त्यांची मुंबई, भारतातील जीवनशैली कशी आहे याची माहिती मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. परंतू ना या सोसायटीच्या गेटवरील सुरक्षा रक्षक धड माहिती द्यायला तयार होईना, ना एजंट तशी कोणतीही तयारी दाखवेना. `रिस्क नही लेना है मुझे असे तो म्हणत होता...' या विदेशी नृत्यांगनांचे मुंबईतील वावरणेही त्यांच्या एजंटच्या मार्गदर्शनानूसारच काटेकोरपणे चालते. चित्रीकरणाच्या ठिकाणाहून त्या थेट आपल्या फ्लॅटवरच परत येतात. त्यांच्या सुरक्षिततेची हमीही एजंटनेच घेतलेली असते. त्यामुळे त्याचे त्यांना ऐकावेच लागते. समजा चित्रीकरणाची कामे संपली की मुंबई किंवा गोवा अथवा कुलु मनाली सारख्या ठिकाणी एजंटमार्फत या नृत्यांगनांच्या प्रदेश भटकंतीची सोय केली जाते. एक प्रकारे त्या स्वेच्छेने त्या एका चौकटीतच वावरतात. भारतात यायचे, चित्रपटांत कामे करायची, पैसे मिळवायचे आणि परत जायचे एवढीच महत्वाची उद्दिष्टे बऱ्याच जणींची असतात. मग या विदेशी नृत्यांगना अंमली पदार्थांची तस्करी, वेशाव्यवसायात सापडतात कधी कधी ते कसे? असा प्रश्न मनात उरलाच होता...तर असेही काही गुन्हेगारी एजंट आहेत चित्रपटसृष्टीत...एवढेच उत्तर मला विकीकडून मिळाले...व तो विषय तिथेच संपला...
सोनी टीव्हीवर कपिल शर्मा शोमध्ये अधूनमधून विदेशी नृत्यांगना आपली अदाकारी सादर करताना िदसतात. म्हणजे आता बॉलिवूड चित्रपटच नव्हे तर भारतीय वाहिन्यांच्या कार्यक्रमातही त्यांच्यासाठी जागा निर्माण होऊ लागली आहे. बॉलिवूडप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही आता विदेशी नृत्यांगना दिसू लागल्या आहेत. लागण लागते अशा गोष्टींची लगेच. 
मग तरीही अजून एक मुद्दा राहातच होता की, विदेशी नृत्यांगनांबरोबर पुरुष नर्तक किती येतात भारतात? तर उत्तर आले शंभर विदेशी नर्तिका असतील तर चार पाच विदेशी पुुरुष नर्तक असे हे प्रमाण आहे. १८ ते २७ वर्षे याच वयोगटातील विदेशी नृत्यांगना भारतात चित्रपटात काम करण्यासाठी येतात. बेलारुसची कटासियार्ना िलएश्को या २७ वर्षांच्या नृत्यांगनेने त्याच्याकडे मागे व्यक्त केलेली प्रतिक्रिया विकी सांगत होता. ती म्हणाली होती ` भारतीय संगीत ऐकायला व समजून घ्यायला सोपे आहे पण जेव्हा तुम्ही त्या गाण्यावर नृत्य करायला जाता तेव्हा ते मात्र अवघड आहे. आम्हाला पाश्चिमात्य नृृत्याची सवय आहे. हिंदी गाण्यावर पाश्चिमात्य धर्तीचे नृत्य जरी करायचे असले तरी देखील त्याला भारतीय वळण मिळते. हिंदी गाण्यांचे लिपसिंकिंगसाठी उच्चारही समजून घ्यावे लागतात. कोरिओग्राफर नृत्याच्या ज्या स्टेप्स देतो त्या नीट करतानाच हिंदी गाण्याचे बोलही तोंडाने म्हणतोय असे दृश्य असेल तर मग मेहनत खूप करावी लागते. आमचा भारतातील अनुभव चांगला आहे. बॉलिवूडमधे काम करायला मिळाल्यानंतर आम्हालाही चांगली कमाई होते म्हणून तर येतो आम्ही इथे'
बॉलिवूडच्या चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार काम करतात म्हणून खूप आरडाओरड मनसे, शिवसेनेसह काही राजकीय पक्षांनी केली. आता त्या देशाचे कलाकार बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायचे खूपच कमी झाले आहे. विदेशी नृत्यांगनांना हिंदी चित्रपटातील गाण्यांमध्ये स्थान दिल्यामुळे आमच्या पोटावर पाय दिला जातोय अशी ओरड ज्युनिअर आर्टिस्ट असोसिएशनने केली. त्यामुळे विदेशी नृत्यांगनांना चित्रपटांत कामे देण्याचे प्रमाण काही काळ कमीही झाले पण त्यांना भारतात येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कारण त्यांच्याकडे असतो वर्क व्हिसा व काम करुन स्वत:ला जिवंत ठेवण्याची जिद्द. गोऱ्यांच्या कातडीचे फाजील आकर्षण आपण बाळगतो पण त्या नृत्यांगनांना त्यांच्या देशात असलेला गरिबीचा शाप हा त्यांचे भवितव्य काळे करत असतो. गोऱ्या कातडीमागील हे काळे भवितव्य आपण कधी पाहाणार आहोत की नाही? तेही मुंबईत आपल्या जवळच वावरत असते तेही आपण बघायला तयार होत नाही...कसले ग्लोबलाइज्ड झालोय आपण?
---
मायानगरीतील माया
मुंबईतील कुलाबा भागात गेलात तर तिथे सॅल्व्हेशन आर्मीसारखी स्वस्त दरातील काही गेस्ट हाऊसेस आहेत. भारतात आलेले व जीवाची मुंबई करण्यासाठी आलेले बरेच विदेशी पर्यटक तिथे राहातात. स्वस्त दरात रािहल्याने या पर्यटकांचे पैसेही वाचतात व त्यांना मुंबई जरा अधिक एन्जॉय करता येते. नेमके हे बॉलिवूडमधील निर्माता, दिग्दर्शकांना माहिती आहे. काही हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण विदेशात होते. त्या चित्रीकरणातील काही भाग जर चुकून किंवा तांत्रिक कारणाने राहून गेला असेल तर एवढा मोठा ताफा विदेशात नेऊन ते सारे चित्रीत करणे याची फार पैसा वाया जातो. मग त्यावर निर्मात्यांनी एक तोड काढली. हा जो उरलेला भाग आहे तो मुंबईतच सेट लावून चित्रीत केला जातो. त्यासाठी निर्मात्याची माणसे किंवा काही एजंटस् कुलाबा भागातील स्वस्त दरातल्या गेस्ट हाऊसेसमध्ये राहाणाऱ्या विदेशी लोकांशी संपर्क साधतात. त्यांना बॉलिवूडच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात काम करणार का विचारतात. त्यावर हे विदेशी लोक या चित्रपटात किंग खान (शाहरुख)किंवा सलमान खान आहे का म्हणून हटकून विचारणा करतात. तसे असेल तर त्यांच्यासाठी ते सोन्याहून पिवळे असते. तसे नसेल तरी ते बॉलिवूडच्या चित्रपटात आपण दिसणार या आनंदात एक-दोन दिवसांसाठी काम करायला तयार होतात. या विदेशी पर्यटकांना एका दिवसाचे साधारण १८०० रुपये व एका वेळचे जेवण दिले जाते. त्यांना गेस्ट हाऊसपासून ते चित्रीकरण स्थळापर्यंत त्यांना भाड्याच्या कारने नेले जाते व परत आणले जाते. यातूनही काही एजंट चांगले पैसे कमावतात. मग िवदेशी पर्यटकांकडून चित्रपटात करुन घेतले जाणारे काम हे जमावातील एखादा गोरा किंवा क्वचित आयटम साँगमधील विदेशी पाहुणा असेही काहीही असते....मुंबई ही अशी मायानगरी आहे तिची ही अशी विविध रुपे आहेत.

वरून भपकेबाज, आतून भोंगळ! - - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 22 आँक्टोबर 2017 ची रसिक पुरवणी


दै. दिव्य मराठीच्या दि. 22 आँक्टोबर 2017 च्या रसिक या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा माझा लेख. त्या लेखाची वेबपेजलिंक व जेपीजी फाइल सोबत दिली आहे. 
https://m.divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjape-w…
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/rasik/244/22…/0/1/
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/rasik/244/22…/0/4/
-----
वरून भपकेबाज, आतून भोंगळ!
------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीस सत्तावन्न वर्षे पूर्ण झाली आहेत.संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की,आम्हाला मराठी राज्य निर्माण करायचे आहे.त्यांच्या या उद््गारामध्ये या राज्याच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न होते.मात्र,आता अतिशय परखडपणे सांगावे लागत आहे की,यशवंतरावांना अपेक्षित असा महाराष्ट्राचा विकास तर झालेला नाहीच,शिवाय या राज्याचा सांस्कृतिक विकासही खुरटलेला राहिला आहे.मराठी राज्य निर्माण करणे म्हणजे मराठी माणसांना केवळ आर्थिकदृष्ट्या समृृद्ध करणे असे नव्हे,तर मराठी संस्कृती,ललित कला आदींचाही उत्तम विकास त्यात अपेक्षित होता.पण दोन्ही आघाड्यांवर हाती फारसे लागलेले नाही.परिणामी,महाराष्ट्राची ओळख सांगणारा नेमका कलाप्रकार कोणता,याचे निश्चित उत्तर आजही आपल्याला सापडत नाही.
मुळात,मराठी संस्कृती म्हणून जे काही सध्या अस्तित्वात आहे,ते जतन करण्यासाठी मराठी माणूसही काहीअंशी बेफिकीर आहे.‘यथा राजा तथा प्रजा’याप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या लेखी सांस्कृतिक गोष्टी या त्यामुळे सर्वात दुर्लक्षित ठरत असतील तर त्याचा दोष सर्वप्रथम सर्वसामान्य मराठी माणसाकडे जातो.याचे कारण,त्याला आपल्या संस्कृतीतील अनेक चांगल्या गोष्टी टिकाव्यात,वाढाव्यात याचीच आस व आच नसेल तर या गोष्टी आचके देणारच.सर्वसामान्यांचा दबाव असेल तर सांस्कृतिक गोष्टींचे भरणपोषण सरकारकडून नीट होईल.मात्र,तसे होत नसल्याने या अनागोंदीचा सर्वाधिक फायदा २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकार सत्तेवर आले त्याला मिळाला आहे.या सरकारने विनोद तावडे यांच्याकडे सांस्कृतिक खाते(की अधिभार?)सोपवले आहे.तावडे यांच्याकडे शालेय शिक्षण,क्रीडा आणि युवा कल्याण,उच्च आणि तांत्रिक शिक्षण,अल्पसंख्याक विकास आणि वक्फ बोर्ड,मराठी भाषा विभाग आदी चार-पाच खात्यांचीही जबाबदारी दिलेली आहे.त्यामुळेच एकाच वेळी इतक्या खात्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या तावडे यांचे प्राधान्य खाते कोणते हा प्रश्नही इथे विचारता येतो.ते खाते सांस्कृतिक आहे,असे म्हणावे तर या खात्यात ते करत असलेला कारभार इतका दिखाव्याचा राहिलेला आहे की,त्यामुळे तावडे यांच्यासारखा सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्राला नकोच,अशी मागणी अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांना पुण्यात नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन करावी लागली.मराठी नाटक,चित्रपट,साहित्य या क्षेत्रांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.त्या मागण्यांची सांस्कृतिक विभाग गांभीर्याने दखल घेत नाही,हा जोशींचा मुख्य आक्षेप आहे.या आक्षेपात वजन असल्यामुळेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,नाट्य निर्माते,महाराष्ट्र साहित्य परिषद,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन सरतेशेवटी पुण्यात एल्गार केला. 
महाराष्ट्रातील साहित्य-सांस्कृतिक चळवळीला ठोस दिशा देण्यासाठी राज्य सरकारने २०१० मध्ये सांस्कृतिक धोरण तयार केले होते.त्याला तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मान्यताही दिली होती.मात्र,या धोरणातील काही महत्त्वाच्या तरतुदी अमलात आणायला काँग्रेस सरकारने अक्षम्य ढिलाई केली.हीच ढिलाई देवेंद्र फडणवीस सरकारनेही पुढे चालू ठेवली.यात जबाबदार मंत्री या नात्याने विनोद तावडे यांचाही सिंहाचा वाटा आहे.मागच्या काँग्रेस सरकारांकडेच याचा दोष जातो,अशी पळवाट या प्रकरणात तावडे यांना शोधता येणार नाही.शोधणे योग्यही नाही. 
प्रख्यात विचारवंत आ.ह.साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या सांस्कृतिक धोरणविषयक समितीने आपल्या अहवालात अनेक कल्पक योजना सुचवल्या होत्या.त्यात इंडॉलॉजीच्या धर्तीवर महाराष्ट्राचा अभ्यास करण्याकरिता मराठी बोली अकादमी,प्रत्येक महसुली विभागामध्ये एक कला संकुल,महाराष्ट्र ललित कला अकादमीची स्थापना,महाराष्ट्र प्रगत अध्ययन केंद्र,सांस्कृतिक समन्वय समिती,प्रमाणभाषा कोश,संतपीठ,परदेशांत अध्यासने अशा गोष्टींचा समावेश आहे.मात्र,२०१० मध्ये तयार झालेले महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण सात वर्षे उलटले तरी त्यातील काही महत्त्वाच्या तरतुदींची अंमलबजावणी झालीच नसेल तर त्याच्या आढाव्याचा,फेरआढाव्याचा प्रश्नच येतो कुठे?त्यातही सांस्कृतिक धोरणात ज्याचा उल्लेख आहे,तो राज्य सांस्कृितक निधीही स्थापन जरी करण्यात आला असला तरी तो इतका तोकडा आहे की त्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असो किंवा नाट्य संमेलन यांसारखे उपक्रम होऊच शकणार नाहीत.राज्यामध्ये लोकसाहित्य समिती नावाचा एक प्रकार अस्तित्वात आहे हे तरी सांस्कृतिक मंत्र्यांच्या गावी आहे का?याचे कारण या समितीला ना धड पुरेसा निधी मिळत ना तिच्याकडे धड मनुष्यबळ‌आहे ना कार्यालय.मराठी संस्कृती संवर्धनाबद्दलच्या अशा अनेक गोष्टी सांस्कृतिक खात्याने वाऱ्यावर सोडून दिल्या आहेत.किंबहुना,महाराष्ट्र येत्या १० वर्षांत सांस्कृतिकदृष्ट्या कसा प्रगती करत राहावा,राज्याचे सांस्कृतिक धोरण नेमके कसे असावे याकरिता कोणताही रोडमॅप या सरकारकडे दिसत नाही.बुलेट ट्रेन आणि मेट्रोचे रोडमॅप तयार असतील तर कला-संस्कृतीच्या भविष्यातील वाटचालीचे रोडमॅप का नकोत?हा सवालही इथे बिनतोड आहे. 
खरे तर विनोद तावडे यांनी सांस्कृतिक मंत्री म्हणून एकही काम तडीस नेले नाही,असे कोणाचेच म्हणणे नाही.त्यांनी गडकिल्ल्यांचे जतन,राज्य व बृहन्महाराष्ट्रातील सांस्कृतिक संस्थांना अनुदान,भाषा सल्लागार समिती,मराठी भाषाविषयक धोरण,युनिकोड फाँटची निर्मिती व वापर,दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन याबाबत काही चांगले निर्णय नक्कीच घेतले.पण या निर्णयांची नीट अंमलबजावणी झाली तरच त्याचे नेमके फलित काय हे समजू शकेल.वस्तुत:तावडे यांच्या कारभारात कुठेही सुसूत्रता नसल्याने या फलिताबाबतही जाणकारांच्या मनात साशंकताच आहे. 
नपेक्षा सांस्कृतिक मंत्री म्हणून मोठमोठ्या घोषणा करायची विद्यमान सांस्कृितक मंत्र्यांना सवय आहे.त्यांनी अशीच एक घोषणा घुमान येथे झालेल्या साहित्य संमेलनात केली होती की,साहित्य व नाट्य संमेलनाचे अनुदान दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जमा केले जाईल.ही घोषणा म्हणजे,शब्दांचे बुडबुडेच निघाले.नाट्य संमेलनाचे अनुदान सरकारकडून कधीच वेळेवर मिळत नाही.जे अनुदान आहे,तेही तोकडे आहे.विनोद तावडे यांच्या कारकीर्दीतला अनुभव असा आहे की,नाट्यसंमेलनाचे अनुदान सरकारकडून मिळते,ते संमेलन संपल्यानंतरच.ते अनुदानही सरकार नाट्यसंमेलन आयोजकांच्या हातात देते.‘जीएसटी'मुळे नाटकांचे तिकीट दर वाढले आहेत.प्रेक्षकांची संख्या रोडावली आहे.असे असेल तर नाट्य संस्था कशा जगतील?अशा अनेक अडचणी आमच्यासमोर आहेत.त्या वारंवार निदर्शनास आणून दिल्या तरी,त्या सोडवण्यासंदर्भात अनास्था दाखवली जाते,असा जो प्रहार मोहन जोशी यांनी केला,तो योग्यच म्हणायला हवा. 
मराठी नाटक व चित्रपट क्षेत्राचे जसे अनेक प्रश्न लोंबकळत पडले आहेत तसेच राज्यातील साहित्य संस्थांचे प्रश्नही मार्गी लागलेले नाहीत.साहित्य संस्थाच्या अनुदानात वाढ करण्याचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता.राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या‘साहित्य संस्थांना अनुदाने’या योजनेंतर्गत अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.विविध वाङ््मयीन उपक्रमांद्वारे मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासाचे कार्य करण्यासाठी प्रतिवर्षी प्रत्येकी रुपये पाच लाखाचे अनुदान प्रतिवर्षी प्रत्येकी रु.१० लाखापर्यंत वाढवण्यात आले.याचा लाभ साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत १)अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ,२)विदर्भ साहित्य संघ,नागपूर,३)मराठवाडा साहित्य परिषद,औरंगाबाद,४)महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे,५)मुंबई मराठी साहित्य संघ,मुंबई,६)कोकण मराठी साहित्य परिषद,रत्नागिरी,७)दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा,कोल्हापूर या सात साहित्य संस्थांना मिळणार आहे.ही तरतूद झाली असली तरी ती मुळात अपुरी आहे.याबाबत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाॅ.श्रीपाद जोशी यांनी घणाघाती टीका करताना म्हटले आहे की,‘साहित्य संस्थांच्या अनुदानात वाढ केल्याचे सांगण्यात येत असले तरी ही वाढ दहा वर्षांनंतर होत असल्याने ज्या प्रमाणात ती होत आहे,ती अतिशय तुटपुंजीच असून किमान २५ लाख एवढे तरी हे साहाय्य असावे,अशी मागणी होती.एवढ्या तुटपुंज्या वाढीसोबत गेल्या वेळेप्रमाणे या वेळी कोणत्याही नवीन अटी लादल्या जाणार नाहीत,अशी अपेक्षा आहे.एक लाख रुपयांमध्ये वाढ करून दहा वर्षांपूर्वी पाच लाख करताना अनेक अव्यावहारिक अटी लादल्या गेल्या,त्याला महामंडळाने विरोध केला होता.त्यामुळे त्या अटींशिवाय साहाय्य लाभत राहिले,हे लक्षात ठेवायला हवे.हे साहाय्य महामंडळाच्या व संबंधित संस्थांच्या कार्य व उद्दिष्टपूर्तीसाठी दिले जाते.हे कार्य मुळातच फार व्यापक असल्याने कोणत्याही नव्या अटी लादल्या जाऊ नयेत व नियत कार्यच करू दिले जावे,अशी अपेक्षा आहे.तसेच महामंडळाच्या समाविष्ट व संलग्न संस्था यांनादेखील वार्षिक तीन लाख रुपये स्वतंत्र साहाय्याची मागणी करणारा जो ठराव शासनाकडे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पाठवला आहे,त्याचाही विचार व्हावा अशीही अपेक्षा आहे.'
हे झाले साहित्य विश्वाबद्दलचे.परंतु,मराठी चित्रपट क्षेत्राच्या समस्यांबद्दल कुणीही बोलायला लागले की विनोद तावडे म्हणतात की,राज्यातील छोट्या गावांमध्ये चित्रपटगृहे उभारली जावीत यासाठी व्हिडिओ पार्लर ॲक्ट(सिनेमॅटोग्राफर ॲक्ट)अटींमध्ये दुरुस्ती केली.पूर्वी फक्त तळमजल्यावरच थिएटर होऊ शकत होते.ते बदलून आता कोणत्याही मजल्यावर थिएटर करण्यास परवानगी दिली.तसेच या थिएटरची आसन क्षमता ७५ पर्यंत मर्यादित होती ती १५० पर्यंत वाढवली.याचा मराठी चित्रपटांना नक्कीच फायदा होईल असे जर वाटत असेल तर तो सांस्कृतिक मंत्र्यांचा भ्रम आहे.याचे कारण मराठी चित्रपटांना पुरेशी चित्रपटगृहे मिळत नाहीत,ती चित्रपटगृह चालकांच्या आडमुठेपणामुळे.त्यांच्यावर राज्य शासनाचा व सांस्कृतिक खात्याचा वचकच नाही.
एकीकडे चित्रपटांना जे अनुदान दिले जाते,त्याचे काही निकष आहेत.त्या निकषांनुसार आपल्याला अनुदान मिळावे,म्हणून अनेक मराठी निर्माते अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून सरकारकडे धोशा लावत आहेत.राज्य सरकारने विशिष्ट श्रेणी मिळवलेल्या चित्रपटांनाच अनुदान द्यायचे ठरवले असल्याने ते प्रत्येकालाच मिळणे शक्य नसते.त्यामुळे या संदर्भातील जीआरमध्ये जो अनुदान शब्द आहे,त्याऐवजी विशेष आर्थिक साहाय्य असा शब्द वापरण्यात यावा,असा आग्रह अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने सरकारकडे धरला होता.मात्र,तसा बदल करायलाही सरकार तयार नाही.‘अनुदान’असा शब्द जर वापरायचा असेल तर त्याचा लाभ सर्वच मराठी चित्रपट निर्मात्यांना मिळायला हवा,हे महामंडळाचे म्हणणे योग्यच आहे.पण त्याकडे सांस्कृितक खाते दुर्लक्ष करते आहे.मराठी नाटके जिथेजिथे होतात,त्या नाट्यगृहांची अवस्था गंभीर आहे.कुचंबणा झालेल्या स्थितीत अनेक मराठी कलावंतांना नाट्यप्रयोग करावे लागतात.जीएसटीमुळे नाटकांच्या तिकिटांच्या दरांवर अतिरिक्त बोजा पडला आहे.पण कोणत्याही मागण्या केल्या की,अर्थ खात्याकडे बोट दाखवून गप्प केले जाते.मग त्यापेक्षा सांस्कृतिक खाते बरखास्त केले तर बिघडले कुठे?अर्थ खातेच अनुदानापासून अनेक कामे पाहत जाईल!
पुण्यात साहित्य-चित्रपट महामंडळांनी नोंदवलेल्या आक्षेपांना उत्तर देताना,विनोद तावडे यांनी आपल्या कारकीर्दीत काय काय कामे झाली याची एक जंत्री दिली आहे.त्यात‘सरस्वतीबाई फाळके मराठी फिल्म अर्काइव्हजचे कामकाज सुरू झाले असून यामध्ये जुन्या व दुर्मिळ चित्रपटांचे जतन केले जाईल,असे म्हटले आहे.शिवाय,कोल्हापूर चित्रनगरीच्या कामासाठी भरीव आर्थिक तरतूद व रखडलेली कामे मार्गी लावली.कोल्हापूर चित्रनगरी येथे २५ पेक्षा जास्त चित्रीकरण स्थळे निर्माण केली.चित्रीकरणासाठी राज्यभरातील विविध स्थळांचे लोकेशन कॉम्पेडियम प्रकाशित झाले. राज्यात चित्रीकरण करणे सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून एक खिडकी परवाना पद्धत सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले.मराठी चित्रपट निर्मात्यांच्या सुविधेसाठी पु.ल.देशपांडे अकादमी येथे अद्ययावत असा डी.सी.प्रोजेक्टर बसवण्याची प्रक्रिया सुरू केली.चित्रपट,नाट्य,साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंतांशी गप्पा साधून त्यांच्या आठवणी,त्यांचे जुने प्रसंग नवीन पिढीला समजावेत व त्याची ओळख व्हावी या दृष्टीने त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सुरुवात केली.'आदी गोष्टींचा उल्लेख आहे. परंतु,ही कामे महत्त्वाची असली तरीही पुरेशी नाहीत,हेही तितकेच खरे आहे. 
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशामध्ये लोककलेचा मोठा सहभाग आहे.दशावतार महोत्सव गेली सहा वर्षे होत नव्हता.तो परत सुरू करून सात दिवसांचा महोत्सव यशस्वीपणे पार पाडला,असा आपल्या कामगिरीचा एक पैलू विनोद तावडे यांनी सांगितला आहे.मात्र लोककला म्हणजे तेवढेच नाही. तीच गोष्ट वृद्ध व गरजू कलाकारांना देण्यात येणाऱ्या पेन्शनची.त्या पेन्शनच्या रकमेत वाढ केली,असे आवर्जून सांगण्यात येते,परंतु ती रक्कम दर महिन्याला त्या कलाकाराला मिळते का याची शहानिशा केली जात नाही.कोणा कलाकाराने चौकशी केली तर सध्या निधीचा तुटवडा आहे,अशी उत्तरे सांस्कृतिक खात्याकडून दिली जातात.
अशी जंत्री काढली तर खूप मोठी होईल.महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत वैचारिक प्रदूषण खूप झाले आहे.जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात योग्य आवाज उठवतात त्यांची वाटेल त्या पद्धतीने मानहानी केली जाते.ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती.हे वातावरण बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारमध्ये या गोष्टींची नीट काळजी वाहण्यासाठी सांस्कृतिक खात्याला स्वतंत्र मंत्री असणे नितांत आवश्यक आहे. 

फटकळ नाना पाटेकरने अनेकदा घेतलाय `ठाकरेंशी' पंगा ! - - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 6 नोव्हेंबर 2017


दै. दिव्य मराठीच्या दि. 6 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. त्या बातमीची जेपीजी फाइल, वेबपेज लिंक व मजकूर पुढे दिला आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/sol…/…/06112017/0/3/
---
फटकळ नाना पाटेकरने अनेकदा घेतलाय `ठाकरेंशी' पंगा !
--
- समीर परांजपे
मुंबई, दि. 6 नोव्हेंबर - फेरीवाल्यांना मारहाण करणे चुकीचे आहे असे मत व्यक्त केल्यामुळे प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बरसले. दोघेही मनस्वी व परखड बोलणारे असल्याने त्यांच्यातील वादाचा खूप धुरळा उडाला आहे. नाना पाटेकरने आपल्याला खटकणाऱ्या गोष्टींवर नेहमीच मतप्रदर्शन करुन ठाकरे कुटुंबियांशी पंगा घेतला आहे व वादही ओढवून घेतले आहेत. राज ठाकरे यांच्याशी गेल्या काही वर्षांत नानाचा झालेला हा दुसरा वादाचा प्रसंग आहे.
प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असून त्यासाठी अन्न मिळविणे हे महत्वाचे असते. त्यासाठी काम करावे लागते. रस्त्यांवरील फेरीवाले हे अशा कष्टकऱ्यांपैकी असून, मोलमजुरी करुन ते आपली रोजीरोटी मिळवत असल्याने त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे असे मत नाना पाटेकर यांनी ३ नोव्हेंबर रोजी माटुंगा येथील व्हीजेटीआय कॉलेजच्या टेक्नोव्हॅन्झा फेस्टिव्हलमध्ये व्यक्त केले. त्यावर ४ नोव्हेंबर रोजी वांद्रे येथे मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नाना पाटेकरवर जोरदार टीका करताना म्हटले की, ज्या गोष्टीची माहिती नसेल त्यात नाना पाटेकर यांनी चोंबडेपणा करु नये. ते उत्तम अभिनेते आहेत, पण रस्त्यावर काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दात राज ठाकरेंनी त्यांना सुनावले आहे. नाना पाटेकरने थेट मनसेने फेरीवाल्यांवर छेडलेल्या आंदोलनाविरोधात निशाणा साधल्याने राज ठाकरे प्रचंड दुखावले गेले आहेत.
नाना पाटेकर व राज ठाकरे यांच्यात आधी म्हणजे २०११ सालीही वाद झाला होता. विलेपार्ले येथील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मनसेचे सरचिटणीस शिरीष पारकर यांनी नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी नाना पाटेकर यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक विधान केले होते. मराठी माणसाच्या भल्यासाठी राज व उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र यावे अशा पाटेकर यांनी केलेल्या विधानावर राज ठाकरे यांनी असे प्रत्युत्तर दिले होते की, नानाने नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये. मात्र हा वाद वाढणार नाही असे राज व नाना पाटेकर या दोघांनीही कटाक्षाने पाहिले. राज ठाकरे दरवर्षी नाना पाटेकर यांच्या घरी गणेशोत्सवासाठी जातातच पण २०११ साली नाना पाटेकर यांच्या वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे नाना पाटेकर यांच्या माटुंग्यातील घरी गणपती दर्शनासाठी गेले व त्यानंतर वादावर कायमचा पडदा पडला होता. २०११ साली नानाने `खुपसलेले नाक' व २०१७ साली नानाने केलेला `चोंबडेपणा' राज ठाकरे यांच्या नक्कीच जिव्हारी लागला आहे!
राज व उद्धव यांनी एकत्र यावे असे विधान करुन वाद ओढविल्यानंतरही गप्प बसेल तो नाना पाटेकर कुठला? तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुक झाली त्यावेळीही नाना पाटेकर यांनी राज व उद्धवबद्दल आपली मते पुन्हा मांडलीच. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती पाहता विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव व राज ठाकरे हे दोघे बंधू नक्कीच एकत्र येतील असे मत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी ८ ऑक्टोबर २०१४ रोजी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात व्यक्त केले होते. नाना पाटेकर म्हणाले होते की, राज आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंनी एकत्र यावे अशी माझी पहिल्यापासून मनोमन इच्छा आहे. पण ते एकत्र येत नव्हते. पण सध्या जी राजकीय स्थिती तयार झाली आहे त्यामुळे ते एकत्र येतील असे मला १०० टक्के नव्हे तर ३०० टक्के वाटते. दोघेही समंजस आहेत. पण त्यांच्या राजकीय भूमिका वेगळ्या होत्या. या दोघांतील कोण ऐकत नाही हे सांगणे कठीण आहे, कारण ऐकतील ते ठाकरे कसले? अशी फटकेबाजी नानाने केली. त्यावेळी नाना पाटेकर यांच्या वक्तव्यावर राज व उद्धव ठाकरे यांनी कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. 
नाना पाटेकर हा बाळासाहेब ठाकरे यांना मानायचा. ठाकरे यांचा मुलगा बिंदुमाधवने निर्मिलेल्या अग्निसाक्षी या चित्रपटात नानाने भूमिकाही केली होती. 1996च्या सुमारास ठाणे येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेत नाना पाटेकर शिवसेनेच्या व्यासपीठावरही गेला होता. हा स्नेहबंध असला तरी फटकळ नानाने शिवसेनेलाही वेळोवेळी अंगावर घेतलेच.
उद्धव व नाना यांच्यात एकदाच झाला होता वाद
उद्धव ठाकरे व नाना पाटेकर यांच्यात कधी फारसे वाद झडले नाहीत. पण शिवेसेनेच्या कार्यशैलीबद्दल नानाने चार वर्षांपूर्वी टीका करणारे एक विधान केले होते त्यावेळी मच्छराने फार भुणभुण करु नये अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला होता. 
बाळासाहेब ठाकरे यांनाही सुनावले होते खडे बोल
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्यामध्ये झालेल्या वादंगाने १९९६मध्ये महाराष्ट्र ढवळून निघाला होता. शिवसेना-भाजप युती महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या सरकारने ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार सुरू केला होता. पुलंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय युती सरकारने घेतला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या समारंभात महाराष्ट्राच्या त्या वेळच्या भयग्रस्त वातावरणाबद्दल व सामान्य माणसांच्या होलपटीबद्दल पु. ल. देशपांडे यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त केली होती व शिवसेना-भाजप सरकारवर टीका केली होती. पु.ल. देशपांडे यांची टीका जिव्हारी लागलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘झक मारली आणि यांना (पु. ल.)पुरस्कार दिला. हे पु. ल. की मोडका पुल’ अशी अभिरुचीहीन शाब्दिक कोटी शिवसेनाप्रमुखांनी केली होती. पुलंबद्दल अपशब्द बोलल्यामुळे शिवसेनाप्रमुखांवर टीका होत असताना त्याचसंदर्बात नाना पाटेकरही बरसला होता की, बाळासाहेब वेळीच जागे व्हा, अन्यथा एक दिवस लक्षात येईल की आपल्या मागे रांगेत एकही जण उरलेला नसेल...' नानाच्या या वक्तव्याने त्यावेळी शिवसेनाप्रमुख खूप चिडले होते. दुसऱ्या दिवशी नाना पाटेकरला त्यांनी मातोश्रीवर बोलावून घेतले व दोघांत दिलजमाई झाली.

प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, नीरजा यांच्यासह आठ मराठी लेखिकांच्या १६ कथांच्या इंग्रजी व हिंदी अनुवादाचा आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे महत्वपूर्ण प्रकल्प - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 7 नोव्हेंबर 2017

दै. दिव्य मराठीच्या दि. 7 नोव्हेंबर 2017 रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/07112017/0/4/
----
प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, नीरजा यांच्यासह आठ मराठी लेखिकांच्या 
१६ कथांच्या इंग्रजी व हिंदी अनुवादाचा आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे महत्वपूर्ण प्रकल्प
- मराठी लेखिकांचे साहित्य राष्ट्रीय स्तरावर जावे हा उद्देश
- अनुवादाची पुस्तके प्रकाशित करणार साहित्य अकादमी 
- प्रा. पुष्पा भावे व नीरजा यांनी केली कथांची निवड 
- समीर परांजपे
मुंबई, दि. 7 नोव्हेंबर - इंग्रजी, अन्य विदेशी भाषा तसेच भारतीय भाषांतील लेखिकांच्या कथा, कादंबऱ्या व अन्य साहित्य मराठीत अनुवादित होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र मराठी लेखिकांचे साहित्य इंग्रजी व अन्य भारतीय भाषांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुवादित होत असल्याचे चित्र दिसत नाही. ही उणीव भरुन काढण्यासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राने प्रज्ञा दया पवार, प्रिया तेंडुलकर, मेघना पेठे, नीरजा यांच्यासह आठ मराठी लेखिकांच्या निवडक १६ कथांचा इंग्रजी व हिंदीमध्ये अनुवाद करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या कथांच्या अनुवादांची पुस्तके साहित्य अकादमी प्रकाशित करणार आहे.
मराठीतील समकालीन स्त्री-कथाकारांच्या कथांचे अनुवाद करून ते भारतीय पातळीवर हिंदी व इंग्रजीत प्रातिनिधिक संग्रहाच्या स्वरुपात प्रकाशित करता यावेत ज्यायोगे मराठीतील कथालेखिकांच्या लेखनाचा परिचय राष्ट्रीय स्तरावर व्हावा या उद्देशाने निवडक कथालेखिकांच्या कथा निवडण्यात आल्या. मेघना पेठे, प्रतिमा जोशी, प्रज्ञा दया पवार, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर, अभिनेत्री प्रिया तेंडुलकर, वंदना भागवत, मनस्विनी लता रवींद्र या आठ लेखिकांच्या निवडक कथा हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवादित होतील. या कथांची निवड प्रा. पुष्पा भावे आणि नीरजा यांनी केली आहे. 
या प्रकल्पासाठी कथा व अनुवादक निवडण्यासाठी व अनुवादाची प्रक्रिया ठरविण्यासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सहकार्याने गेल्या २१ व २२ मार्च रोजी माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातील अनुवाद सुविधा केंद्रात एक कार्यशाळा आयोजित केली होती. या अनुवाद कार्यशाळेत मराठी लेखिकांच्या कथांच्या अनुवाद-प्रकल्पावर प्राथमिक पण सखोल चर्चा झाली. परस्पर परिचय आणि पहिल्या टप्प्याचं काम सुरु करणं हा त्यामागचा उद्देश सफल झाला असं वाटतं. कथांच्या भाषांतरांबाबत सविस्तर चर्चा होऊन सोळा भाषांतरांचे वाटप झाले. सदर प्रकल्पाचे समन्वयन करण्याची जबाबदारी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राचे गणेश विसपुते यांनी स्वीकारली. आता येत्या डिसेंबर महिन्यात आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र साहित्य अकादमीच्या सहकार्याने एक चर्चासत्र आयोजिणार आहे. त्यात या कथांच्या केलेल्या अनुवादावर प्रदीर्घ चर्चा करण्यात येईल. प्रांतिक संदर्भ, संस्कृतीची वैशिष्ट्ये त्या मराठी कथेचा हिंदी व इंग्रजीत अनुवाद करताना योग्य रितीने उतरली आहेत का याचाही धांडोळा या चर्चासत्रात घेतला जाईल. सांगोपांग चर्चेनंतरच या आठही लेखिकांच्या कथांचे हिंदी व इंग्रजी अनुवाद साहित्य अकादमीकडे प्रकाशित करण्यासाठी सुपूर्द करण्यात येणार आहेत. केवळ हिंदी व इंग्रजीच नव्हे तर अन्य भारतीय भाषांमध्येही मराठी लेखिकांच्या कथांचे अनुवाद व्हायला हवेत यासाठी आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्र प्रयत्नशील आहे. 
या आहेत आठ मराठी लेखिकांच्या अनुवादित होणाऱ्या कथा
ज्या आठ मराठी लेखिकांच्या कथा इंग्रजीतून अनुवादित होणार आहेत त्या लेखिकेचे नाव, तिची कथा व अनुवादकाचे नाव यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. (१) मूळ लेिखका - मेघना पेठे - कथेचे नाव - `समुद्री चोहीकडे पाणी' (२) प्रतिमा जोशी - `जहन्नम' (३) प्रज्ञा दया पवार - `पेडिक्युअर', `तिघाडा' या दोन कथा (४) नीरजा - `श्रीकांत विनायक' या कथांचा इंग्रजी अनुवाद माया पंडित-नारकर या करणार आहेत. मेघना पेठेची अजून एक कथा `आस्था आणि गवारीची भाजी', मोनिका गजेंद्रगडकर यांच्या दोन कथा `आधार', `श्रद्धा' यांचा अनुवाद प्रदीप देशपांडे करतील. अभिनेत्री प्रिया तेंडुलकर हिची कथा `लग्न', वंदना भागवत यांच्या कथा `काफ्का, कामूज...', `शिट्टी' यांचा इंग्रजी अनुवाद ललिता परांजपे करणार आहेत. प्रिया तेंडुलकर यांची कथा `मा', प्रतिमा जोशी यांची कथा `नारिलता' यांचा इंग्रजी अनुवाद वंदना भागवत करतील. मनस्विनी लता रवींद्र यांच्या दोन कथा, नीरजा यांची `रत्नप्रभा जाधव वर्तमानपत्रातील बातमी होते तेव्हा' ही कथा यांचा इंग्रजी अनुवाद केट शॅलेट करतील. या आठही लेखिकांच्या १६ मराठी कथांचा हिंदी अनुवाद डॉ. दामोदर खडसे, प्रकाश भातंब्रेकर, रेखा देशपांडे आणि सुलभा कोरे हे मान्यवर करत आहेत.

अ ते ज्ञ या सर्व मुळाक्षरांचा वापर यमकात करुन मराठी गझल लिहिण्याचा झाला पहिल्यांदाच प्रयोग - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. 9 नोव्हेंबर 2017

दै. दिव्य मराठीच्या दि. 9 नोव्हेंबर 2017च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/09112017/0/4/
---
अ ते ज्ञ या सर्व मुळाक्षरांचा वापर यमकात करुन मराठी गझल लिहिण्याचा झाला पहिल्यांदाच प्रयोग
- `अमृताची पालखी' या ए. के. शेख लिखित गझलसंग्रहातील २२५ गझलांचे आहे ते मुख्य वैशिष्ट्य
- नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनात होणार या पुस्तकाचे प्रकाशन
- समीर परांजपे
मुंबई, दि. 9 नोव्हेंबर - गझलचा मुळ इतिहास हजार वर्षांचा असेल तर मराठी गझलचा इतिहास हा अवघ्या नव्वद वर्षांचा आहे. मराठी गझल अजून बाल्यावस्थेत असून तिच्या विकासासाठी नवनवीन प्रयोग होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने स्वर, व्यंजन आदिंनी मिळून अ ते ज्ञ पर्यंत जेवढी मुळाक्षरे आहेत, त्या सर्वांचा यमकामध्ये (काफिया रदिफ) वापर करुन मराठी गझल लिहिण्याचा पहिलावहिला प्रयोग मराठी साहित्यात प्रथमच ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख यांनी `अमृताची पालखी' या गझलसंग्रहातील सर्वच्या सर्व म्हणजे सव्वादोनशे गझलांमध्ये केला आहे. हे आगळेवेगळे वैशिष्ट्य असलेल्या या गझलसंग्रहाचे वाशी येथे ११ व १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनात प्रकाशन होणार आहे.
`अमृताची पालखी' या ए. के. शेख यांचा गझलसंग्रह गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात गझल सागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रख्यात गझलगायक भीमराव पांचाळे यांनी सांगितले की, स्वर, व्यंजन आदिंनी मिळून अ ते ज्ञ पर्यंत जेवढी मुळाक्षरे आहेत, त्या सर्वांचा यमकामध्ये (काफिया रदिफ) वापर करुन गझल लिहिण्याचे प्रयत्न उर्दूमध्येही खूप कमी झाले आहेत. त्यामुळे या प्रकारचा मराठी गझलेमध्ये जो प्रयोग होत आहे, त्याचे रसिक व जाणकारांनी स्वागतच करायला हवे.
"गझाला' म्हणजे हरिणीचे पाडस. त्या पाडसाइतकीच सुंदर म्हणून उर्दू काव्यरचनेला "गझल' हे नाव पडले. गझल ही इराणी सुंदरी आहे. ती मराठीत रुजवण्यासाठी कवी माधव पटवर्धन (ज्युलियन) यांनी "गज्जलांजली' हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर अनेक जण गझल लिहू लागले. कविवर्य व श्रेष्ठ गझलकार सुरेश भट यांच्या काळात काही जण मराठी गझला लिहू लागले होते. या पहिल्या फळीमध्ये ए. के. शेख, इलाही जमादार, नीता भिसे आदिंचा समावेश होता.
ए. के. शेख यांच्या `अमृताची पालखी' या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील प्रत्येक गझल कोणत्या छंदात, वृत्तात आहे त्याची माहिती त्या गझलेबरोबर दिलेली आहे. गझलेच्या पहिल्या शेरात तिचा आकृतिबंध स्पष्ट झाल्यानंतर, तिची ‘जमीन’ निश्चित झाल्यावर मग यमक उर्फ काफिया आपल्या वैशिष्ट्यांसह शेवटपर्यंत तोच कायम राहतो. काफियाचे शब्द बदलतात, पण त्याच्या अंमलबजावणीचा कायदा गझलेच्या शेवटापर्यंत तोच कायम राहतो. याचे अचूक भान या गझला लिहिताना ए. के. शेख यांनी बाळगले आहे. `अमृताची पालखी' हा गझलसंग्रह त्याच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे आगळा ठरणार असल्याने त्याचे प्रकाशन नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनात करण्याचे गझल सागर प्रतिष्ठानने ठरविले.
वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील नाट्यगृहात आयोजिलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांची निवड झाली आहे. विविध परिसंवाद, मुशायरे, गझलगायन या कार्यक्रमांनी बहरणाऱ्या नवव्या नवव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनामध्ये ए. के. शेख यांचे मराठी गझल लिहिण्यामध्ये पहिल्यांदाच आगळा प्रयोग केलेला `अमृताची पालखी' हा गझलसंग्रहही मानाचे स्थान राखून असणार आहे.
प्रफुल्ल भुजाडे यांच्या `मनाचा मौन दरवाजा' या गझलसंग्रहाचेही होणार प्रकाशन
ए. के. शेख यांच्या गझलसंग्रहाबरोबरच अमरावती जिल्ह्यातील प्रफुल्ल भुजाडे या मराठी गझलकाराचा `मनाचा मौन दरवाजा' हा गझलसंग्रहही या संमेलनात गझल सागर प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित करण्यात येईल. त्यामध्ये विविध प्रकारच्या गझला भुजाडे यांनी लिहिल्या आहेत.