Wednesday, December 17, 2014

निखळ (निखिल) रत्नपारखी व त्याची नाट्य(भक्ती) - (प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार निखिल रत्नपारखी व त्याची सहचारिणी व अभिनेत्री भक्ती रत्नपारखी यांचा कलापरिचय)



निखळ (निखिल) रत्नपारखी व त्याची नाट्य(भक्ती)
----------
(प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार निखिल रत्नपारखी व त्याची सहचारिणी व अभिनेत्री भक्ती रत्नपारखी यांचा कलापरिचय)
--------------
बेगम मेमरी, आठवण गुलाम हे नाटक बघायचे, बघायचे आहे म्हणताना काहीना काही कारणामुळे राहूनच जातेय...हे नाटक त्यातील आशय, विषय आणि सादरीकरणासाठी बघायचे आहे. नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे, नाटककार जयंत पवार यांनी या नाटकाविषयीची लिहिलेली परीक्षणे वाचल्यानंतर नाटकाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. हे नाटक बघायचे आहे प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, लेखक निखिल रत्नपारखी, त्याची सहचारिणी भक्ती रत्नपारखी, माझी बेस्ट फ्रेंड व कुशाग्र कलाकार लतिका गोरे व अन्य कलावंतांच्या नाटकातील अदाकारीसाठी...हे नाटक बघूनच निखिल व भक्ती या नाट्यवेड्या दांपत्याबद्दल लिहावे असे वाटत होते. मात्र ते होऊ शकले नाही. पण त्यामुळे काही अडत नाही. निखिल असो वा भक्ती हे काही याच नाटकामुळे माहिती झाले असे नाही.
निखिल रत्नपारखी हा मुळ पुण्याचा. नाट्य, चित्रपट, मालिका, जाहिरातींतील नेमके मुल्यवान रत्न कोणते व नुसतेच खडे कोणते याची पारख निखिलला आता चांगलीच झाली आहे. पण त्याचा हा प्रवास तसा सोपा नव्हता. तो पुण्यातील समन्वय या नाटकगटामध्ये सक्रिय झाला. तिथे त्याने राजीव नाईक लिखित साठेचं काय करायच?, विजय तेंडुलकर लिखित मसाज या नाटकांमध्ये कामे केली. कोवळी उन्हे या नावाने विजय तेंडुलकरांचे सदर एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असे. त्याच्यावर आधारित नाट्याविष्कार समन्वय संस्थेने निर्मिला होता. त्याचा दिग्दर्शक होता संदेश कुलकर्णी. त्यात निखिल अफलातून परफाँर्मन्स द्यायचा. त्यातील अभिनेत्याचा कस लागायचा तेव्हा. पुण्यामधील नाट्यक्षेत्रामध्ये काही एक कामगिरी बजावल्यानंतर कोणत्याही कलाकाराला मुंबईचे वेध लागतात. तसे निखिलला लागले यात नवल नाही. एक व्यावसायिक अभिनेता म्हणून कारकिर्द करण्यासाठी तो या शहराच्या रोखाने निघाला. मुंबईत एका जाहिरीतीची संकल्पना विकसित करत असताना जाहिरातीच्या निर्मात्यांना त्यात काम करण्यासाठी हवा तसा कलाकार मिळत नव्हता. त्यावेळी त्यांच्या मनात निखिल भरला. त्याने या जाहिरातीत काम केले. तिथून सुरु झाला त्याचा मुंबईतील व्यावसायिक कलाकार म्हणून खर्या अर्थाने प्रवास. सर्वाधिक जाहिरातींत झळकलेला मराठी कलाकार म्हणून निखिलची नोंद घ्यावी लागेल. थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे १५० जाहिरातींमध्ये निखिलने काम केले आहे. तो दिसायलाही गोंडस आहे म्हणून बहुतेक सार्या जाहिरात निर्मात्यांचा तो लाडका असावा. तो जाहिरातींतील लाडके व्यक्तिमत्वच बनला. कालांतराने महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्वही त्याला चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर साकारायला मिळाले. जाहिरातींसाठीच बनलाय निखिल अशी त्याची प्रसिद्धी होऊ लागली. त्याची दुसरी बाजू अशी की, जाहिरातींमध्ये खूप व्यस्त झाल्यामुळे त्याने व्यावसायिक नाटके तशी खूप कमी केली.
त्याने केलेले पहिले व्यावसायिक नाटक म्हणजे रत्नाकर मतकरी लिखित आम्हाला वेगळ व्हायचयं. या नाटकाचे निर्माते होते सुयोग संस्था. त्या नाटकानंतर तो बराच काळ व्यावसायिक नाटकांकडे वळला नाही. कारण साधे होते. तो जाहिरातींमध्ये व्यस्त होता अत्यंत.
निखिलला लेखणीचीही देणगी आहे. तो एक असा कलाकार आहे की ज्याला नाटक लिहिता येत, ते कस साकारायचे हे तो दिग्दर्शक म्हणून पाहू शकतो. आणि प्रत्यक्ष रंगमंचावर तो त्या नाटकातील भूमिकाही उत्तम वठवू शकतो. हे थ्री इन वन पॅकेज त्याने सर्वप्रथम वापरले ते टाँम अँड जेरी या नाटकात. त्याने हे नाटक लिहिले. दिग्दर्शित केले व त्यात भूमिका करुन प्रेक्षकांनाही रिझविले.असा बहुगुणी अवलिया बर्याच वर्षांनी रंगभूमीला लाभलाय. अगदी हेच त्याने पुन्हा सगळे केलेय बेगम मेमरी आठवण गुलाम या नाटकात. तो या नाटकात सर्व पात्रांबरोबर प्रेक्षकांसमोर येतो, दिग्दर्शक म्हणून स्वत:सह सर्व कलाकारांना रंगमंचावर वावरायला लावतो व लेखक म्हणून नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधतो. हे नाटक विनोदी असले तरी नाटकाचा बाज खूप वेगळा आहे असे माझ्या मित्रपरिवारातील ज्यांनी ज्यांनी बघितले त्यांनी आवर्जून सांगितले आहे. मी एक दुर्देवी जीव ज्याला हे नाटक बघण्याची संधीच अजून मिळत नाहीये.
निखिल रत्नपारखी याने काही चित्रपटांत कामे केली. त्यामध्ये ओ माय गाँड, मोड, घो मला असला हवा, तेरे बिन लादेन, नारबाची वाडी, गोळाबेरीज असे काही चित्रपट आहेत. ते बहुतेक चित्रपट मी बघितलेले आहेत.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावरच असलेल्या गोळाबेरीज या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची भूमिका निखिल रत्नपारखीनेच साकारली होती. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यापेक्षाही हा विनोदी चित्रपट झाला होता. या चित्रपटात नेमके कधी काय घडत राहाते याची गोळाबेरीज व्हायच्या ऐवजी गोळावजाबाकी होऊन या चित्रपटाचे क्षितिज आक्रसले आणि हा चित्रपट झारापकन (क्षमस्व झपकन) आपटला. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य कधी असे पडले नव्हते इतका त्यांच्यावरचा चित्रपट अपयशाच्या खोल दरीत पडला. नायकाच्या भूमिकेत असलेल्या निखिल रत्नपारखीच्या या चित्रपटाविषयी नेमक्या भावना काय आहेत माहित नाही पण अशा चित्रपटांमध्ये पुन्हा त्याने काम करु नये ही विनंती. हा चित्रपट बघण्याच्या भीषण अनुभवाला सामोरे जाऊन जो सुखरुप पुन्हा चित्रपटगृहाबाहेर आला होता तो खरा भाग्यवान प्रेक्षक...मी प्लाझामधून सहीसलामत बाहेर पडलो होतो हा चित्रपट पाहून....म्हणून आज हे लिहू शकतोय...
निखिलच्या समग्र कलाकारकिर्दीचा आलेख इथे मांडणे शक्य नाही. पण तो एक मनस्वी कलाकार आहे व यशस्वी आहे. त्याच्या या यशामागे नाट्यभक्ती आहे. म्हणजे नाट्यही आहे आणि भक्ती (त्याची पत्नी) जिला आपण अभिनेत्री भक्ती रत्नपारखी म्हणून ओळखतो ती. भक्ती ही पुण्यातलीच. त्यामुळे पुणेकर मुलालाच तिची पहिली पसंती असणे स्वाभाविक होते. निखिलला वरल्यानंतर ती देखील आता मुंबईत त्याच्या समवेत येऊन आपली कलाकारकिर्द उजळ करीत आहे. मुळात भक्तीने पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेटर या प्रायोगिक नाट्यसंस्थेतून तिने काही नाटकांत कामे केली. त्याआधी स्पर्धांमध्ये काही एकांकिकांत कामेही केली, आणखी एका नाट्यसंस्थेतून भक्तीने विजय तेंडुलकर मित्राची गोष्ट या कथेवर आधारित एकांकिकेत काम केले. होते. सवाईच्या स्पर्धेत चेतन दातारच्या नाटकातही तिने भूमिका केली. आसक्त ही संस्था आहे ना त्यांच्याबरोबर फक्त तू नावाचे नाटक एक नाटक तिने केलेल. मोहित टाकळकरने हे नाटक दिग्दर्शित केले होते. खुप वेगळा अनुभव होता हा तिच्यासाठी...भक्ती रत्नपारखीचे पहिले व्यावसायिक नाटक म्हणजे दुर्गाबाई जरा जपून. हे नाटक विजय केंकरेनी दिग्दर्शित केले होत टाँम अँड जेरी नाटकात तिने निखिलला असिस्ट केले होते. आता तिचे नवेकोरे नाटक बेगम मेमरी आठवण गुलाम हे रंगभूमी गाजवते आहे. त्या शिवाय भक्ती रत्नपारखीने कंपनी, ओ माय गाँड, देऊळ अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.माझी अभिनय कारकिर्द खूप मोठी नाही असे ती सांगत असली तरी तो तिचा विनम्रपणा आहे.
पुण्यातला कलावंत इतका नम्र असतो यावर विश्वासच बसत नाही. नाट्य, चित्रपट, मालिका क्षेत्रात अखिल स्तरावरचा कलाकार म्हणून निखिल रत्नपारखी भविष्यात आणखी पुढे यावा व त्याने जसे जाहिरात क्षेत्र व्यापले आहे (व्यापले आहे असे निखिलच्या शारीरव्यापकतेकडे बघून लिहिलेले नाही) तशी अभिनयकलेची बाकीची क्षेत्रेही आपल्या कसदार लेखन, दिग्दर्शन, अभिनयाने व्यापून टाकावीत हीच सदिच्छा. त्याची नाट्यभक्ती व सहचारिणी भक्ती या त्याच्यावर प्रसन्न आहेतच. अभिनयातील या दोन रत्नांवर पारखी नजर ठेवून लिहिल्याचा आव जरी मी आणलेला असला तरी तो काही खरा नाही....हे या दोन रत्नपारखींना बरोबर लक्षात येईल. भक्तिभावाने त्यांचा आता निरोप घेतो. नाहीतर ते माझी पारख एक रत्न (व्यंगात्मक अंगाने) अशी करतील,,,,,हाहाहा
- समीर परांजपे.
paranjapesamir@gmail,com

Tuesday, December 2, 2014

सूर्व्या उगवलाय ....म्हणजे समीर रमेश सुर्वे....श्री पार्टनर चित्रपटाचा गाजलेला दिग्दर्शक...



सूर्व्या उगवलाय ....म्हणजे समीर रमेश सुर्वे....श्री पार्टनर चित्रपटाचा गाजलेला दिग्दर्शक...त्याच्या सहवासाच्या या माझ्या काही अघळपघळ नोंदी...अपयशाला आईबाप नसतात, यशाला असतात असे सांगणार्यांना सूर्व्या कळण्यासाठी,,,,,,
----------------
किती पण कोंबडे झाका, सूर्व्या उगवलाय असे गावात कधी कधी ऐकायला मिळायचे. अर्थ नाही लागायचा तेव्हा. त्यासाठी शहराचाच दरवाजा खुला व्हावा लागला. दादर पश्चिमेला बबन चहावाला नावाचे एक मोठे प्रकरण २००७ सालापर्यंत असायचे. त्यांचे साम्राज्य रात्री नऊ ते सकाळी सात पर्यंत चालायचे. त्यांच्या साम्राज्यातले चहा प्यायला येणारे मानकरी म्हणजे नाना पाटेकर, सतीश पुळेकर आणि पत्रकारितेतले दिग्गज अंबरीष मिश्र आणि असे असंख्य मान्यवर. त्यात मी आपला कोपर्यात कुठेतरी अंग चोरुन. बबनरावांकडे चहा प्यायला संवेदना परिवार या नाटकग्रुपचे बरेचसे सदस्य यायचे. त्यांची ओळख १९९५ साली झाली. त्यात एक त्यावेळी हडकुळा असलेला, दाढीचे खुंट वाढलेला, पौराणिक नाटकात ठेवतात तसे कानावर येतील इतके डोईवरचे केस राखलेला पोरगाही होता. मराठी भाषा लालबाग, परळच्या बोलीशी जवळीक साधणारी, पण डोळे, शारीरभाव खूप काही सांगू पाहाणारे. सांगण्याचा आशय अर्थवाही होता की निरर्थक इतका काही मी त्याच्या जवळ गेलो नव्हतो. तो एकांकिका, लिहितो, दिग्दर्शित करतो, भूमिका करतो असे हळुहळु त्याच्याशी बोलायला लागल्यानंतर कळायला लागले. कधीमधी तो त्याच्या दोस्तांबरोबर रुईया काँलेजच्या नाक्यावर यायचा तेव्हा तिथेही आमच्या भेटीगाठी व्हायच्या. कारण आँफिसनंतर रात्रीपर्यंत मी नाक्यावर पडीक. आताही कधीकधी असतो...
आता एकदम ट्रान्सफर सीन.......
श्री पार्टनर हा चित्रपट...तो मी पाहिला...त्याच्या दिग्दर्शकाचे नाव पाहिले समीर रमेश सुर्वे...नाव वाचले आणि आठवू लागले हाच तो पोरगा...मी व तो बबन चहावाल्यांकडे कधीमधी भेटायचो. काहीबाही बोलायचो. मग तो संवेदना परिवारात मश्गुल, मी माझ्या नादात...होय हाच तो समीर रमेश सुर्वे. प्रख्यात साहित्यिक व. पु. काळे यांच्या प्रसिद्ध पार्टनर या कादंबरीवर श्री पार्टनर हा चित्रपट दिग्दर्शित करणारा. श्रीपार्टनर हा चित्रपट त्यातील अभिनय, कथेचा गर आणि सुज्ञ दिग्दर्शन यामुळे गाजला. आणि मग या मराठी चित्रपटसृष्टीने दखल घेतली...
सूर्व्या (म्हणजे समीर रमेश सुर्वे) उगवलाय....उपेक्षेने प्रशंसेचे कोंबडे कितीही झाकून ठेवायचे येथील अनेकांनी ठरविले तरी सूर्व्या उगवलाच...
समीर सुर्वेला बघून हा सरळमार्गी असेल असे वाटतच नाही. कायम वाकड्या मार्गाने जाणार...म्हणजे वाकड्यात नाही शिरणार. पण सरधोपट सरळ मार्ग त्याला आवडतच नाही. तो वाकड्या मार्गाने जाऊन सरळ यश खेचून आणतो पण त्यासाठी मोठी किंमतही मोजतो. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी आपल्या घरातील सोनेनाणे प्रसंगी गहाण ठेवून चित्रपट काढले इतकी त्यांना या गोष्टीची असोशी होती. फाळके यांची असोशी माहिती आहे सगळ्यांना पण सर्वस्व पणाला लावून जे चित्रपट उभे करतात त्या पूर्वजांचा समीर हा खरा वारसदार आहे. श्री पार्टनर हा चित्रपट बनविण्यासाठी सगळ्या प्रकारचे सहकार्य देऊ अशी आश्वासने देणार्यांपैकी बरेचजण मध्येच हात सोडून निघून गेले. पण समीर आपली वाट चालत राहिला. कर्जाचे मोठे डोंगर खांद्यावर पेलून त्याने श्री पार्टनर हा चित्रपट पूर्ण केला. व झळकवलाही. या चित्रपटाला जे यश मिळाले ते त्यातील कलाकार, तंत्रज्ञांचे होतेच पण यशाच्या या गौरीशंकराच्या शिखरावर बसण्याचा मान फक्त समीर सुर्वेलाच आहे.
आता तो चार्ली या ब्लँक हाँरर काँमे़डी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात गुंतलाय... .भरत जाधव. नेहा पेंडसे. विजय पाटकर असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत....हा चित्रपट करताना येणार्या समस्यांनाही समीर हसत हसत सामोरा जातोय. हा चित्रपटही खूप वेगळा होणार आहे हे मी त्याचे चित्रीकरण, प्रोमो बघून आत्ताच सांगतो....
मराठी असो वा हिंदी चित्रपटसृष्टीचा एक उसुल आहे. अपय़शाला आईबाप नसतात, यशाला असतात...श्रीपार्टनर जोवर पूर्ण होत नव्हता तोवर समीर रमेश सुर्वे हा अश्वत्थाम्यासारखा भळभळती जखम घेऊन फिरायचा. पार्टनर पूर्ण झाला तेव्हा समीरचा आत्मा शांत झाला. चित्रपट बनविण्यासाठी काढलेल्या कर्जाचे डोंगर चढत असतानाही हा पुन्हा चार्ली चित्रपटात गुंतला. शेवटी चित्रपट करणे, बघणे, काढणे ही एक नशा आहे. त्या नशेच्या अमलात प्रेक्षक म्हणून मी राहाणार आहेच. त्याचबरोबर रसिकांवर समीर रमेश सुर्वे याचा सुरु असलेला दिग्दर्शकीय अमलही असा बराच काळ टिकू दे. समीर सुर्वे व मी काहीवेळा रुईया काँलेज नाका किंवा दादर स्टेशनला उभे राहूनही गप्पा मारल्या आहेत भररात्री. पण त्या अंधारातही माझ्या डोळ्यासमोर काजवे नव्हे तर हा सुर्व्याच चमकायचा....
मी काय लिहिणार आहे हे त्याला आधी सांगण्याचा प्रश्न नाही.. समीर रमेश सुर्वे हा मराठीतला प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक आहे...त्याच्याकडे मराठी, हिंदी चित्रपटांतील मान्यवरांनी, वितरकांनी, फायनान्सरनी बारीक लक्ष द्यायला हवे. समीर सुर्वे प्रसिद्धीच्या मागे धावत नाही म्हणून चित्रपटसृष्टीतील इतर लोकांनी अशा गुणवानांच्या मागे स्वत:हून धावणे सोडून द्यायचे असा याचा अर्थ होत नाही.....या लोकांनी किमान एवढे तरी करावे, उगवलेल्या सूर्व्याकडे बघावे....
- समीर परांजपे

शेखर सरतांडेल की शेखरसर तांडेल? ---------- (जोशी की कांबळे, निर्माल्य, माय डिअर यश या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल याच्या व्यक्तित्वाचा वेध या पोस्टमध्ये घेतला आहे.)


शेखर सरतांडेल की शेखरसर तांडेल?
----------
(जोशी की कांबळे, निर्माल्य, माय डिअर यश या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल याच्या व्यक्तित्वाचा वेध या पोस्टमध्ये घेतला आहे.)
-----
शेखर सरतांडेल किंवा शेखरसर तांडेल
तुम्ही शेखरच्या नावाचा असा दोन्ही प्रकारे उच्चार केलात तरी तो तुम्हाला सारखाच वाटेल.
कारण शेखर सरतांडेल म्हटले की नजरेसमोर येतो अव्वल चित्रपट दिग्दर्शक
शेखरसर तांडेल म्हटले की आठवतो रचना संसद या महाविद्यालयात फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रम स्वत:च्या मेहनतीतून, निढळ्या घामातून उभा करुन विद्यार्थी घडविणारा शिक्षक.
तुम्हाला जसा तो दिसत असेल तसा तुम्ही त्याला त्या त्या प्रमाणे उच्चार करुन हाक मारु शकता.
महेश मांजरेकर यांच्या सोबत निदान, वास्तव अशा सुमारे आठ हिंदी व आई या मराठी चित्रपटांमध्ये चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून कामगिरी बजावणारा शेखर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील माहोलला एकदम सरावलेला.
इतक्या समृद्ध अनुभवानंतर शेखर स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनात उतरला.
त्याने स्वत:;च्या बळावर दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट म्हणजे जोशी की कांबळे...चित्रपटाच्या शीर्षकातच सामाजिक धग आहे. अत्यंत ज्वालाग्रही विषय पण त्या चित्रपटाची कथा अतिशय नेमकेपणाने लिहिली होती प्रख्यात समीक्षक श्रीधर तिळवे यांनी. या कथेला चित्रपटाच्या रुपात आकार देताना अतिशय संयत हाताळणी शेखरने केली होती. जातीवर आधारित आरक्षण व्यवस्था हा म्हटले तर खूप चर्चेचा विषय. त्या विषयाच्या बाजूने आणि विरोधात बोलणारे यांची संख्या सम असेल. पण जातीव्यवस्थेतून निर्माण झालेल्या विषमतेवर जोशी की कांबळे चित्रपटात खूप मार्मिक भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटाची कथा काय हे रहस्य येथे उलगडण्यापेक्षा तो मिळवून बघणे हे जास्त सकस अनुभव देणारे आहे. जोशी की कांबळे या चित्रपटाने अनेकांच्या डोक्याला चांगल्या अर्थाने झिणझिण्या आल्या. आणि शेखर सरतांडेल प्रगल्भ दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत प्रस्थापित झाला.
शेखर सरतांडेल आणि माझी ओळख १९८९ साली झाली. ती ही रुईया नाक्यावर. त्यावेळी मी काँलेजमध्ये शिकत होतो. आणि शेखर हा प्युअर नाकाईट झालेला होता. तो मुळचा सिडनहँम काँलेजचा. तेथून बी. काँम. ची पदवी घेतल्यानंतर तो जे. जे. स्कूल आँफ आर्टस् मध्ये पार्टटाईम पेंटिंग व फोटोग्राफीच्या कोर्ससाठी दाखल झाला. तेथून त्याच्यातील विविध कलांना बहर आला. जे.जे. तसेच रुईयासाठी त्याने अनेक एकांकिका स्पर्धांना संगीत देण्याचे काम केले. त्यानंतर तो काही एकांकिकाच्या दिग्दर्शनातही गुरफटला. एखाद्या एकांकिकेत त्याने कामही केले. त्याची दोस्ती कँमेर्याशीही होतीच. नाटकाच्या माहोलमधून त्याने बाहेर पडून दुरदर्शनवर कँमेरामन म्हणूनही दीड एक वर्ष काम केले. त्यानंतर काही जाहिरात एजन्सीमध्येही कँमेरा हाताळला. मालिकांच्या काही कामातही तो गुंतला होता. तो सविस्तर तपशील इथे महत्वाचा नाही. महत्वाचे हे आहे की, शेखर स्वत:ला सतत तपासत होता. आपला अवकाश नेमका कुठे आहे याचा धांडोळा घेत होता.
त्यातूनच पुढे त्याला महेश मांजरेकर भेटले. व वास्तव, अस्तित्व, निदानसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्ये महेश यांचा चीफ असिस्टंट डायरेक्टर बनून शेखर स्वत:लाच सापडत गेला.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची देवकी ही कथा. या चित्रदर्शी कथेवर चित्रपट बनविण्यासाठी काही मान्यवरांनी कर्णिक यांच्याकडे कथा मागितली होती. पण काही कारणाने त्या कथेवर चित्रपट होण्याचे योग येत नव्हते. शेखर सरतांडेलला ही कथा भावली. त्याने या कथेचा स्क्रीनप्ले तयार करुन तो कर्णिक यांना दाखविला. तो पाहून कर्णिकांनी अत्यंत मोकळ्या मनाने या कथेवर चित्रपट बनविण्यास शेखरला परवानगी दिली. देवकी या कथेचे शीर्षक चित्रपट बनविताना झाले निर्माल्य. मामी इंटरनँशनल फेस्टिव्हलमध्ये निर्माल्य या चित्रपटाने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाने आणखी काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माननीय उपस्थिती लावली. हा चित्रपट रसिकांनाही सुखावून गेला.
शेखर त्यानंतर वळला आँटिस्टिक मुले व त्यांना निगुतीने वाढविणार्या त्यांच्या पालकांच्या मनोविश्वाकडे. आँटिस्टिक मुलगा व त्याचे आईबाबा हे चित्र रंगविताना बाबा अशा मुलाची जबाबदारी कदाचित सहजी टाळू शकतो. पण आपला असा हा मुलगा वाढविण्याचे आव्हान आई पेलते व त्या मुलाला चांगले दिवस दाखविते हा गाभा असलेला माय डिअर यश शेखर सरतांडेलने दिग्दर्शित केला. तो चित्रपट पाहून अनेकांना आँटिस्टिक या विकाराचे स्वरुप खर्या अर्थाने कळले. या चित्रपटात लोकेश गुप्ते, सुखदा यश यांच्या भूमिका टची होत्या. आँटिस्टिक असलेल्या लहान मुलाचे काम अथर्व बेडेकरने केले होते. त्याच्यावर मानसोपचार करणार्याचे काम उमेश कामतने केले होते. या चित्रपटाने शेखरला अधिक प्रगल्भ दिग्दर्शकाच्या यादीत नेऊन बसविले.
शेखर सरतांडेलवर मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक व अभिनेता म्हणून जो अमीट ठसा आहे तो राजा परांजपे यांचा. त्यांच्या जगाच्या पाठीवर, ऊन-पाऊससारख्या चित्रपटांवर बोलताना शेखर अजिबात थकत नाही. राजा परांजपे हे त्याचे आवडते दिग्दर्शक हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कारण राजाभाऊ यांचे माझ्या पत्नीच्या माहेरुन नाते आहे. त्यांच्या पुण्यातील घरी मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा स्वर्गीय राजाभाऊंना विविध चित्रपटांसाठी मिळालेले पुरस्कार, मानपत्रे तेथे एका शोकेसमध्ये ठेवली आहेत ते पाहून मन सुखावते. राजाभाऊ यांच्या पु्ण्यातील घरात ग.दि. माडगुळकर, सुधीर फडके यांच्या मैफली होऊन अनेक गाणी लिहिली गेली आहेत. त्यांना तिथेच चाली दिल्या गेल्या आहेत. त्या सगळ्या आठवणी समोर उभ्या राहातात. शेखर जेव्हा राजाभाऊंबद्दल बोलतो तेव्हा मलाही राजाभाऊंची पुण्यातील ही वास्तू आठवायला लागते. शेखर हा उत्तम लेखकही आहे. त्याने आपल्या आयुष्यात वर्तमानपत्रासाठी पहिल्यांदाच लेख लिहिला होता तो म्हणजे दै. दिव्य मराठीसाठी. मराठी चित्रपटांना सरकारने दिलेल्या अनुदानासंदर्भातील हा परखड लेख होता.
रामदास बोट बुडाल्याच्या दुर्घटनेला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त काय लिहायचे असा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी शेखरच मदतीला धावून आला. शेखर सरतांडेलचे काका हे दर्यावर्दी हे खास मच्छिमारांसाठी मासिक चालवायचे. त्या दर्यावर्दी मासिकाने रामदास बोट बुडाल्यानंतर काही अप्रतिम लेख छापले होते. त्या जिवंत लेखांचा आधार घेऊन मी माझा लेख दै. दिव्य मराठीत लिहिला होता. व तसे लेखाखाली नमुदही केले होते.
शेखर सरतांडेल हा बोलण्यात खूप मिश्किल आहे. कधी कोणाची टोपी उडवेल सांगता येत नाही. माझीही तो कळत-नकळत गंमत करत असतो. शेखर आहे स्वभावाने उमदा...त्यामुळे तो व त्याच्या चित्रपटांबद्दल खूप उत्सुकता असते लोकांमध्ये.
शेखरबद्दल अनेक उत्तम गोष्टी सांगता येतील पण कुठेतरी थांबायला हे हवेच. शेखर आता काही दिवसांत एका महत्वाच्या प्रकल्पात सक्रिय होणार आहे. तो नेमका काय आहे हे प्रसारमाध्यमांतून आपल्याला योग्य वेळी कळेलच. शेखर तू विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेस. हे गुण तुझ्यात आलेत ते पेशाने शिक्षक असलेल्या आईवडिलांकडून. तुझे वडील नाटकात मुंबईत काम करायचे. तो कलेचा वारसा शेखर सरतांडेल याच्याकडे आलेला आहे. ती कला आता त्याच्या अंगवळणी पडली आहे.
त्यामुळे तुम्ही त्याला शेखर सरतांडेल म्हणा किंवा शेखरसर तांडेल, डोळ्यापुढे मूर्ती उभी राहाते ती एका कसलेल्या दिग्दर्शकाची...तीच ओळख तर त्याला प्रिय आहे आणि आम्हा त्याच्या फँन्सनाही... शेखरची गेली अनेक वर्षे ज्याच्याशी नाळ जुळली आहे तो रुईया काँलेजचा नाकाही या ओळखीला साक्षी आहे....त्या वास्तूलाच विचारा ती शेखरबद्दल अनेक किस्से सांगू लागेल...शेखर, तुझ्या भावी कारकिर्दीस माझ्या शुभेच्छा......
- समीर परांजपे
---------

चळवळ्या नार्वेकर (रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक चळवळ्या श्रीनिवास नार्वेकर याच्याबद्दल काहीबाही....)



चळवळ्या नार्वेकर
(रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक चळवळ्या श्रीनिवास नार्वेकर याच्याबद्दल काहीबाही....)
----
हवेत च कर आणि हवे तेच कर
अशा दोन जमाती असतात, काही तरी करु पाहाणार्यांच्या.
त्यापैकी पहिली जमात नुसती हवेतच इमले बांधत असते.
दुसरी जमात आपल्याला हवे तेच व तसेच करतानाही जमिनीशी नाते घट्ट ठेवून आपले मेणाचे किंवा शेणाचे जे काही असेल ते घर बांधते.
या हवे तेच कर जमातीमध्ये श्रीनिवास नार्वेकर मोडतो.
तो मुंबईतील गिरगावचा असला तरी वयपरत्वे सावंतवाडीमध्ये गेला...माणूस मोठा झाला की, कोकणात जातो. कोकणात तसा प्रत्येक माणूसच मोठा पण हा त्यांच्यातही मोठा...स्वकर्तृत्वाने..हे शेवटचे जास्त महत्वाचे आहे.
निखळ कलारसिक असलेल्या, सिनेमा, नाटक यांची उत्तम पारख व जाणकारी राखणार्या रमाकांत नार्वेकर यांचे हे सुपुत्र लहानपणी भयंकर भूमिकांमध्ये वावरायचे.
दरो़डेखोर, जुलुम अशा कुलदीप पवार नायक असलेल्या चित्रपटांमध्ये नायकाच्या बालपणीची भूमिका श्रीनिवासने केलेली. त्यामुळे त्या भूमिका मोठ्या होऊन किती भयंकर कामे करतात हे सांगायला नको...
पण हा लहानपणी भयंकर भूमिका करणारा मुलगा पुढे अभ्यंकर चुकलो अभयंकर झाला.
एका ध्येयाने पछाडलेला ( अखिल जगात कोकणातच सर्वात जास्त संख्येने विविध प्रकारची भूते-खेते आहेत. त्यातील कोणत्याने याला पछाडले माहित नाही.) श्रीनिवास मग सावंतवाडीच्या कर्मभूमीत विविध रंग उधळू लागला म्हणजे नाट्यरंगांबद्दल बोलतोय मी...
सावंतवावाडीला असताना त्याने तिथे अर्धवेळ वार्ताहर म्हणून पत्रकारिता केली. (आणि आता त्याच्यावर हे लिहिणारा तर अर्धवट पत्रकार आहे.)
त्यानंतर नाट्यविलास नावाची संस्था काढून एकांकिकांचा संसार मांडला. त्या एकांकिका तो वेळप्रसंगी लिहित होता. दिग्दर्शित करीत होता. किंवा इतरांनी लिहिलेल्या एकांकिकांना दिग्दर्शनाचा साज चढवत होता.
सावंतवाडीसारख्या मुंबईपासून लांब असलेल्या ठिकाणी राहून नाट्यविलास वगैरे करणे तसे सोप्पे नाही.
अस्सल कोकण्याचे स्वप्न असते मुंबईत येऊन काहीतरी करणे....
पण या श्रीनिवासला ही स्वप्ने पडली नाहीत इतका तो तिथल्या जांभा दगडाशी व लाल मातीशी एकरुप झाला होता.
नाट्यहौस पुरवता पुरवता त्याने बालरंग नावाची संस्था काढली. लहान मुलांसाठी बालनाट्ये, तसेच शिबिरे असे भले जंगी उपक्रम सुरु केले. त्यानंतर बालरंग नावाचे मासिक काढून दीड-दोन वर्षे चालविले.
त्यानंतर गुढकथा लिहिण्याचा त्याला नाद लागला. या दाढी राखणार्यांचे तसेही सगळे गुढ असते. मग तो श्रीनिवास असेल, समीर सुर्वे असेल नाहीतर नरेंद्र मोदी...ही माणसे मोठी आहेत हे आपल्याला कळत असते, पण तरीही ती आपल्यासारखीच वाटत राहातात.
श्रीनिवासला दाढी असली तरी तिच्यात तिनका वगैरे काही नाही. सगळे सरळसोट...कोकणी माणूस...काय होणार दुसरे? गुढकथा लिहिण्यात प्रगती इतकी की त्याचे पुस्तक आले. रत्नाकर मतकरी खुश या कथांमुळे श्रीनिवासवर....
त्यानंतर त्याची नऊ इ-बुक्स आली. बुकगंगा यांनी दोन प्रकाशित केली तर विक्रम भागवत यांच्या सृजन पोर्टलवर ७ इ-बुक्स प्रसिद्ध झाली आहेत आजवर त्याची....श्रीनिवासला कार्यकर्ता तसेच लेखक म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. धडपड्या रंगकर्मीचा असा गौरव होणे उचितच असते. वर्तमानपत्र, मासिके, इ-मासिकांमधून जागतिक चित्रपट, राजकीय-सामाजिक विषयांवर श्रीनिवासने सटायरिकल स्तंभ लेखन केले आहे. त्याने लोकमत वृत्तपत्रात चालविलेल्या सदराचे सृजन'तर्फे इ-बुक प्रकाशित झाले.
कविता, साहित्य सर्वांपर्यंंत पोहोचावे यासाठी अभिवाचनाचे कार्यक्रमही करतो तो...
असे बरेच काही त्याच्या पोतडीत आहे. अरे हो सांगायचे राहिले जादूगार बनून त्याने जादूचे खेळही रसिकांसमोर सादर केले होते....
त्याच्या पोतडीत काय काय आहे याचा सगळाच तपशील इथे सांगत बसत नाही...त्यातील आशय व विषय महत्वाचा...
हा दाढीवाला मला २००२ सालानंतर भेटायला लागला. दादर पूर्वेच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मी काहीबाही वाचायला जायचो. तर तिथे श्रीनिवास खूप सारे वाचत बसलेला असायचा.
रामायण मालिकेतील साधूची भूमिका करणारा कलाकार रोज ग्रंथसंग्रहालयात येऊन बसतो असे त्यावेळी मी कोणाला तरी सांगितले होते.
संघर्षाचे दिवस असूनही त्याबाबत कधीच कटुता दिसली नाही त्याच्या तोंडी...
कोकणी माणूस...सहनशील असणारच...
मुद्दा हा की, आपल्या अटीवर तो नाटके, एकांकिका, चित्रपट, मालिका करीत राहिला....तद्दन व्यावसायिक होणे, पाणी घालून कलाकृती पातळ करणे त्याला जमले नाही....म्हणून मोठे यश जे व्यावहारिक दुनियेला हवेहवेसे वाटते ते मिळण्यास वेळ लागतोय याची त्याला खंतही नाही.
मस्तमौला आहे तो....
त्याची अलीकडेच गाजलेली मालिका म्हणजे भेटी लागी जीवा
त्याच्याशी गप्पा मारताना तो अशा काही जीवघेण्या गप्पा मारतो की त्या भेटीत या गोष्टी मनाला लागतातच...
त्याला सिनेमा, नाटक, मालिंकामधील खोटेपणाची चीड आहे. तो कोकणी माणूस म्हणजे गुणसूत्रांमधूनच घेऊन आलेल्या वैशिष्ट्याप्रमाणे चळवळ्या असल्याने सतत नाटकाविषयी वेगळा विचार करत बसतो. सध्या आवाजाची संस्कृती सर्वांना नीट कळावी व त्यांनी ती अंगिकारावी म्हणून व्हाँइस कल्चरचे उत्तम प्रशिक्षणवर्गही घेतो...
मेडिकलपासून ते लिगल पर्यंत अनेक कंपन्यांच्या मजकूराचा अनुवाद करणे, अनेक जाहिरातींसाठी काँपीरायटिग करणे हे कुटिरोद्योग चालू असतात जगण्यासाठी ज्या दिडक्या लागतात त्यासाठी...महाराष्ट्रातील जे इंग्रजीतून मराठी किंवा मराठीतून इंग्रजी सहजसुंदर अनुवाद करणारे अव्वल दर्जाचे अनुवादक आहेत त्यात हे नार्वेकर महाशय आहेत. सध्या महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता वृत्तपत्रात अनेक बिल्डिंग प्राँजेक्टच्या जाहिराती येतात. त्यात त्या प्रकल्पांचा माहिती देणारा सुंदर मजकूर असतो. त्या मजकुराचे लेखन म्हणजे काँपीरायटिंग श्रीनिवासनेच केलेले असते.
बाकी उरलेला वेळ त्याचा कुटीलउद्योगात जातो. ते म्हणजे चित्रपट, नाटक. मालिका वगैरेंचे लेखन करण्यात...
त्याच्या आजवरच्या वाटचालीतील महत्वाचे मार्गदर्शक म्हणजे नाटककार प्र. ल. मयेकर...मुंबईच्या व्यावसायिक कलाक्षेत्रात नार्वेकरांचा श्रीनिवास नंतर कधीतरी प्रवेशता झालाच असता पण मयेकरांमुळे त्याचा हा प्रवेश लवकर झाला. मयेकरांबद्दल बोलताना तो हरखून जातो....ते त्याच्या डोळ्यातही दिसते.
एकांकिका, नाटक, चित्रपट, मालिका अशी विविध माध्यमे हाताळणारा श्रीनिवास नार्वेकर हा तत्ववादी आहे. त्यामुळेच त्याला परखडपणाचे वैभव लाभले आहे. त्या बळावरच ज्ञान मिळवून तो जागतिक चित्रपटांविषयी काँलम लिहू शकतो. असे दोन-तीन काँलम त्याने आधी वर्तमानपत्रात लिहिले आहेत.
अशा अनेक गोष्टी एकाचवेळी करुनही तो मनाने जितका नाटकाचा राहिला आहे. तेवढाच मालिका. चित्रपटांचाही राहिला आहे. चळवळ्या श्रीनिवास नार्वेकरला स्वस्थ बसवत नाही. अकाली पांढरी झालेली दाढी, डोक्यावरचे पांढरे केस यामुळे तो खूप स्काँलर वाटतो. मला बोलायला भ्या वाटते आणि त्याच्या विषयी अधिक लिहायला....
पण श्रीनिवास तू असाच चळवळ्या राहा...कारण असे लागते कुणीतरी धाक दाखविणारे...
तुझे उत्कर्षाचे दिवस आता सुरु झालेत (त्याच्या सहचारिणीचे नाव उत्कर्षा असे आहे). त्याची पत्नी डॉ. उत्कर्षा बिर्जेचे त्याच्याविषयीचे खास मत तिने ही पोस्ट वाचल्यानंतर दिले ते असे `ऑलटाईम परफ़ॉर्मर आहे तो ! कथा कविता गीत संगीत चित्र शिल्प ...काही असूदे त्याला रंगमंचीय अविष्कारच दिसत असतो !(तोही गिमिक्स विरहित !!)...पंतप्रधानांना पत्र ,Hana ची सूटकेस यांची रंगावृत्ती... कोकणी कवितांवर सादर केलेले रंगाविष्कार , voice culture .. यातली त्याची 'व्हिजन' मीही सहकर्मी म्हणून अनुभवलीय...अनुभवतेय म्हणून सांगावं वाटलं इतकंच !`. श्रीनिवासला या उत्कर्षांच्या दिवसात अधिक यश त्याच्या कामाच्या मेहनतीतून नक्कीच मिळणार यात शंकाच नाही.
श्रीनिवास तू आहेस तसाच मला आवडतोस. अशीच नाटके करत राहा...म्हणजे नाटकी वागणार्यांना त्यात कोणतीही भूमिका मिळणार नाही....चळवळ्या नार्वेकर असे तुला गावात म्हणत असतील...ते मी तुला इथे म्हणून घेतो. तुला शुभेच्छा.
- समीर परांजपे