Monday, March 24, 2014

शिवशाहीच्या इतिहासाचा ‘निनाद’ - लोकसत्ता - १६ आॅगस्ट २००९



या लेखाचे लोकसत्ता वेबसाइटवरील पेज



इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर यांच्यासमवेत पुणे येथील सिंहगडची भ्रमंती केली तो क्षण.






छत्रपती शिवाजी महाराज व मराठेशाहीच्या इतिहासलेखनाची व इतिहासकारांची एक मोठी परंपरा आहे. त्याच प्रभावळीतले इतिहासकार निनाद बेडेकर यांच्या वयाला उद्या १७ ऑगस्ट २००९ रोजी ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानंतरच्या वर्षभरात निनाद बेडेकर महाराष्ट्रातील ६१ किल्ल्यांवर युवक व गडप्रेमींना घेऊन भ्रमंती केली तसेच गडांचे जतन, इतिहासाबद्दल जागृती निर्माण केली. कवी भूषणाने शिवरायांवर केलेल्या काव्यातील सौंदर्यस्थळे उलगडून दाखविणे तसेच शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य अशा विषयांवर पुस्तके लिहिण्याचा बेडेकर यांचा मानस होता. शिवस्मरणाने भारलेले उत्तम लेखक व फर्डा वक्ता असलेले निनाद बेडेकर यांच्याशी केलेली मी मनमोकळी बातचीत केली होती. ही सविस्तर मुलाखत दैनिक लोकसत्तामध्ये १६ आॅगस्ट २००९ रोजी प्रसिद्ध झाली होती. या मुलाखतीची लिंक मी पुढे दिली आहे. तसेच हा लेख लोकसत्ताच्या वेबसाईटवर ज्या लिंकला आहे त्याच्या पानाची जेपीजी फाईल वर दिली आहे.
 


शिवशाहीच्या इतिहासाचा निनाद


- समीर परांजपे



महाराष्ट्राला केवळ भूगोल नाही दैदीप्यमान इतिहासही आहे, असे म्हणण्याची एक परंपरा आहे. महाराष्ट्रातील मध्ययुगीन इतिहास हा विविध प्रकारच्या संघर्षाने भरलेला व भारलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली स्वराज्य स्थापना, त्यांनी उभारलेले किल्ले, गनिमी काव्याचे तंत्र वापरून केलेल्या लढाया हे सर्व रोमांचकारी आहेच. शिवरायांनंतरही मराठी साम्राज्याचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर झाला. १८१८ साली मराठेशाही इंग्रजांनी बुडविली. त्याला कारणीभूत ठरले ते अत्यंत अत्याचारी असे पेशवे आणि सत्तेच्या कैफात राहिलेले भ्रष्ट आचारी मराठा सरदार! नव्या युगाचा मंत्र व शत्रूची चाल हीच त्यांना कळली नाही. गेल्या ४०० वर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेवून महाराष्ट्रात अनेक आदर्श उपक्रम रचले गेले तसेच त्यांच्या नावाचा गैरवापर करून आपली तुंबडी भरणारे व मराठी माणसांना अजून संकुचित करून ठेवणारे अनेक नेतेही पैदा झाले. छत्रपती शिवराय हे फक्त मराठ्यांचेच असा प्रचार सुरू झाला तर उच्चवर्णीय इतिहासकारांनी शिवरायांना गोब्राह्मण प्रतिपालकबनवून त्यांना एका विशिष्ट जातीचे संरक्षक बनविले!
सुसंस्कृत महाराष्ट्रात हे सारे का चालले आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनंतर इतका उत्तम आयकॉन कोणी निर्माणच झाला नाही का? छत्रपती शिवराय यांच्याबद्दल व महाराष्ट्रातील कोणत्याही घटनेबाबत इतिहासकारांना सध्या चिकित्सा करणे कठीण होऊन बसले आहे. इतिहासकार काय प्रतिपादन करतो यापेक्षा त्याची जात कोणती यातच काही जणांना रस असतो. अशाने तटस्थ इतिहास लेखन कधीही होऊ शकणार नाही. महाराष्ट्रात वा. सी. बेंद्रे, प्रबोधनकार ठाकरे, त्र्यं. ज. शेजवलकर, ग. ह. खरे, पा. वा. काणे, न्या. महादेव गोविंद रानडे, वि. का. राजवाडे, शंकर नारायण जोशी अशा अनेक महान इतिहासकारांनी परंपरा आहे. शिवाय ग्रँड डफसारखा ब्रिटिश इतिहासकारांनीही शिवाजी महाराजांविषयी लिहून ठेवले आहे. ब्रिटिश इतिहासकारांनी जेत्याच्याभूमिकेतून महाराष्ट्राचा इतिहास मांडताना शिवरायांबद्दल अनुदार उद्गार काढले असून ते क्षम्य नाहीत. परंतु राष्ट्रीयदृष्टिकोनातून इतिहासलेखन करणाऱ्या इतिहासकारांनी छत्रपती शिवरायांची थोरवी नेटकेपणाने मांडली आहे. शिवरायांनंतर मराठी साम्राज्याचा आणखी झालेला विस्तार व कालप्रवाहांनुसार या राज्यात शिरलेल्या वाईट प्रवृत्ती यांचेही परखड चित्रण केले आहे. इतिहासलेखनात सबल्टन हिस्ट्रीम्हणजे समाजातल्या तळागाळातल्या कष्टकरी- कामकरी लोकांच्या दृष्टिकोनातून इतिहास लिहिणे असा एक प्रवाह आहे. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शरद पाटील यांसारख्या विद्वानांनी घेतलेला वेध हा सबल्टन हिस्ट्रीचाच प्रकार आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी शाहिरी परंपरा जोजवत शिवरायांचा इतिहास सांगितला. विद्यमान काळात गजाननराव मेहेंदळे हे इतिहासकार शिवरायांवर अतिशय परिश्रमपूर्वक ग्रंथनिर्मिती करीत आहेत.
हे सर्व इतक्या विस्ताराने सांगण्याचे कारण महाराष्ट्राच्या इतिहासकारांच्या परंपरेतील अजून एक वैशिष्टय़पूर्ण नाव म्हणजे निनाद बेडेकर. शिवरायांवरील त्यांचे चिकित्सक लेखन व उत्तम शैलीत दिलेली अभ्यासपूर्ण व्याख्याने यामुळे निनाद बेडेकर यांचे नाव दुमदुमत आहे. इंग्रजी कालगणनेनुसार १७ ऑगस्ट २००९ रोजी निनाद बेडेकर वयाची ६० वर्षे पूर्ण करून ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या पुढच्या वर्षभरात निनाद बेडेकर महाराष्ट्रातील युवा पिढीला गड-किल्ल्यांचा इतिहास समजून देण्यासाठी ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करणार आहेत. शिवाय इतिहास ग्रंथलेखनाचेही त्यांचे मनसुबे आहेत. हा वेगळ्या वाटेवरचा इतिहासकार आहे, जे शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून ते त्यावर लेखन करतात, भाषणे देतात. शिवाजी महाराज नव्या एमबीएपिढीला कळावे म्हणून शिवाजी महाराजांमध्ये व्यवस्थापकीयकौशल्य असा विषय घेऊन व्यवस्थापन संस्थांमध्ये इंग्रजीतून भाषणे देतात. नव्या युगातील मंत्र, अस्त्रांचा वापर करून शिवाजी महाराज हे व्यक्तित्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारे निनाद बेडेकर हे अशाप्रकारचे वेगळे इतिहासकार आहेत.
निनाद बेडेकर सांगतात, ‘‘पेशव्यांचे नातेवाईक असलेल्या सरदार रास्ते यांच्या घराण्याशी माझे नातेसंबंध आहेत. माझ्या आजीचे नाव गिरिजाबाई रास्ते. पुण्यातील शिवपुरी व नंतर रास्तापेठ असे नामकरण झालेल्या भागातील रास्तेवाडय़ात माझे बालपण गेले. रास्ते वाडा हा सरदार रास्तेंचा असल्याने तिथे कारकुनी फड, इच्छा-भोजन असा सगळा माहोल होता. रास्ते यांचे स्वत:चे सुसज्ज असे ग्रंथालय होते. हा काळ आहे १९५० ते १९५६ या दरम्यानचा.. रास्ते वाडय़ात इतिहासकार दत्तो वामन पोतदारांप्रमाणेच अनेक इतिहासकार येत असत. त्यांच्या होणाऱ्या चर्चामधून इतिहासासंदर्भात अनेक उत्तम गोष्टी कानावर पडत होत्या. मी पहिलीत शिकत असताना बाबासाहेब पुरंदरे लिखित दख्खनची दौलतहे पुस्तक वाचनात आले. त्यातील चित्रमयी शैलीने मला आकर्षून घेतले.’’
बेडेकरांचा विचार पुढे सुरूच राहतो. ‘‘१९६१ साली पानशेतचे धरण फुटले व पुण्यात मोठा पूर आला. मला चांगले आठवते त्यावेळी शाळा तीन-चार महिने बंद होत्या. या काळात बाबासाहेब पुरंदरे यांच्याबरोबर कोल्हापूर भागात जाणे झाले. तेथील विशाळगड, पन्हाळगड यांचे ऐतिहासिक महत्त्व बाबासाहेबांनी समजावून सांगितले. याच दौर्यात महाबळेश्वर, प्रतापगड अशी भ्रमंती झाली. शालेय जीवनात तसेच टेक्निकल स्कूल व पुढे मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा करीत असताना बाबासाहेब पुरंदरे व गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर गड-किल्ल्यांवर विशेष भ्रमंती केली. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत होतोच पण अशा भ्रमंतीतून तो इतिहास मनात अधिक रुजत गेला. गड-किल्ल्यांवर भ्रमंती करताना तेथील अवशेष, त्यांची बांधणी याबद्दल विवेचन करण्याकडे गो. नी. दांडेकर विशेष लक्ष देत असत. १९७१-७२ साली कमिन्समध्ये नोकरी लागली. त्यानंतरही सवंगडय़ांसह गडभ्रमंती सुरूच राहिली. मी चौथीत असताना ध्रुव वाचनालय काढले होते. पानशेतच्या पुरात हे ग्रंथालयही वाहून गेले, मात्र वाचनाची ओढ भविष्यातही कायम राहिली. शिवाजी महाराज, मराठा, मुघल साम्राज्य व इतर शाह्य़ा यांच्याविषयी स्वदेशी व विदेशी इतिहासकारांनी लिहिलेले दुर्मिळ ग्रंथात १६ व्या शतकापासून महाराष्ट्रात अनेक कारणांनी आलेल्या विदेशी प्रवाशांनी शिवाजी महाराज, मुघलांविषयी मते नोंदविलेली प्रवासवर्णने, अनेक मोठमोठे राजे-रजवाडे, बादशाह यांचे पत्रव्यवहार संकलित केलेले ग्रंथ अशा प्रकारची पुस्तके जमवायचा छंदच लागला. आजच्या घडीला माझ्या वैयक्तिक संग्रहात अशी ५ हजार पुस्तके आहेत. त्यातील बहुतांश दुर्मिळ आहेत.’’
इतिहासलेखन ही काही सोपी प्रक्रिया नाही.’’ निनाद बेडेकरांनी आपले विवेचन पुढे सुरू ठेवले. ‘‘मध्ययुगीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी पर्शियन, अरेबिक भाषा येणे अत्यंत आवश्यक आहे. त्या काळातील आपल्या येथील बहुतांश पत्रव्यवहार याच भाषेत आहे. त्यामुळे या दोन भाषा मी आधी शिकून घेतल्या. त्याचा फायदा असा झाला की अस्सल पत्रे मुळाबरहुकूम वाचून त्यांचा नीटस अन्वयार्थ लावता येऊ लागला. इतिहासकारांमध्ये गजाननराव मेहेंदळे यांचा माझ्यावर सर्वाधिक प्रभाव आहे. शिवचरित्र लिहिण्यासाठी मेहेंदळे यांनी जे अफाट परिश्रम घेतले आहेत त्याला तोडच नाही. गजाननराव मेहेंदळे हे कोणतेही विधान करताना त्याच्या पुष्टय़र्थ अनेक तळटिपा देतात. त्यांचे विवेचन करतात. ही शास्त्रशुद्ध संशोधनाची पद्धत मला अत्यंत आवडते. मेहेंदळे यांच्याबरोबर शिवचरित्रासाठी सहाय्य करीत असताना आम्ही विविध शाह्य़ांची अस्सल पत्रे वाचली. त्यांचे संदर्भ शोधले. त्यामुळे नवीन गोष्टीही या शिवचरित्रात येऊ शकल्या. औरंगजेबाच्या ७०० पत्रांचा समावेश असलेल्या अदाब-इ-आलमगिरीचा थेट उपयोग आम्ही या शिवचरित्रात केला आहे. विविध पातशाह्य़ांची पत्रे ही शिकस्त लिपीत लिहिलेली असतात. ती लिपी वाचायला अत्यंत कठीण आहे. ती लिपीही मी शिकून घेतली. अरेबिक, उर्दू लिपीच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. त्या लिपीतील पत्रेही वाचायला शिकलो. इतिहासलेखनात प्रश्नयमरी सोर्सेस (प्रथम दर्जाची साधने) यांना फार महत्त्व असते. अशा या पत्रांच्या वाचनातून मी, गजानन मेहेंदळे, रवींद्र लोणकर या तिघांनी संयुक्तपणे आदिलशाही फर्मानहे पुस्तक साकारले. या पुस्तकाचे वैशिष्टय़ म्हणजे या पुस्तकातील छापलेल्या अस्सल पत्रांचे डीटीपी कामही आम्हीच केले आहे.’’
‘‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्यानंतर अनेक पराक्रमी पेशवे, मराठा सरदार यांच्या युद्धकौशल्य व नेतृत्वाचा अभ्यास देशांच्या लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये केला जातो. माझ्या माहितीप्रमाणे जगभरातील २० ते २५ देशांमध्ये छत्रपती शिवरायांच्या लष्करी पैलू व नेतृत्वाचा अभ्यास होतो. अमेरिकेतील लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये दोन लढायांची मॉडेल्स ठेवली आहेत. १६६९ साली शिवरायांनी अफझलखानाविरुद्धची प्रतापगडाजवळ केलेली लढाई व १७२९ मध्ये निजाम-उल-मुल्क याच्या विरोधात दुसऱ्या बाजीरावाने पालखेड येथे केलेली लढाई अर्थात प्रत्येक देशाचा लष्करी प्रशिक्षण अभ्यासक्रम हा गोपनीय असतो. त्यामुळे शिवरायांवर आणखी कुठे व कसा अभ्यास सुरू आहे ते तपशीलवार सांगणे कठीण आहे.’’
‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू आहेत. त्यांचे युद्धनेतृत्व, दुर्गबांधणी, आरमार, सैनिकी शिस्त, महसूल आकारणी अशा प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करून त्यावर लिहिणे व भाषणे करणे असा उपक्रम मी सुरू केला आहे.’’ निनाद बेडेकर सांगतात, ‘‘शिवाजी महाराजा’’चे व्यवस्थापन कौशल्य या विषयावर मी व्यवस्थापन शिक्षण संस्थांतून नव्या पिढीसमोर एमबीएसमोर भाषणे केली. शिवरायांच्या १८ ते १९ गुणांसंदर्भात आतापर्यंत अशा व्याख्यानांतून विवेचन केले. पण शिवरायांच्या व्यक्तित्वातील १०० गुणांपर्यंत आपला अभ्यास वाढविणे व त्यावर लेखन, भाषणे करणे असा माझा संकल्प आहे. शिवरायांच्या व्यवस्थापकीय कौशल्याचे सारसूत्र मांडणारे एक पुस्तक लवकरच लिहिणार आहे. या अंगाने महाराजांसंदर्भात नव्या पिढीच्या माहितीसाठी लेखन होणे गरजेचे आहे.’’ ‘‘महाराष्ट्रातील गड-किल्ले यांच्या बांधणीत वैविध्य आहे. देवगिरीचे यादव, बहामनी, आदिलशाही, मुघल, शिवाजी महाराज, पोर्तुगीज, इंग्रजांनी बांधलेले किल्ले असे नाना प्रकार त्यात आढळतील. उद्या १७ ऑगस्टला माझ्या वयाला ६० वर्षे पूर्ण होतील. त्यानंतरच्या वर्षभरात महाराष्ट्रातील ६१ किल्ल्यांवर युवा मंडळी व गडप्रेमींना घेऊन मी भ्रमंती करणार आहे. या किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगणार आहे. माझ्या सुहृदांनी स्थापन केलेल्या निनाद बेडेकर मित्रमंडळया संस्थेच्या माध्यमातून हा सर्व उपक्रम होईल. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातला एक तरी किल्ला या भ्रमंतीत असावा, असा कटाक्ष ठेवण्यात आला आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या समस्येमुळे चंद्रपूर, गोंदियासारख्या चार जिल्ह्यांतील किल्ले आम्हाला या यादीतून वगळावे लागले. नाशिक व ठाणे जिल्ह्यांत सर्वाधिक किल्ले आहेत. राज्यातील सर्वच किल्ल्यांचे उत्तम पद्धतीने कसे जतन व्हावे यावर नव्या पिढीचे लक्ष केंद्रित करण्याचा या किल्लेभ्रमंतीतून माझा प्रयत्न राहणार आहे.’’
‘‘नव्या पिढीतील अनेक मुले मला इतिहास संशोधनाच्या कामी मदत करतात. इंटरनेटवर शिवाजी महाराज यांच्यासंदर्भातील तसेच मराठा,मुघल साम्राज्य आणि अन्य पातशाह्यांबद्दल अनेक पुस्तके डाऊनलोड केलेली आहेत. अशा ६०० पुस्तकांची यादी एका मुलाने माझ्या हाती दिली. अशा इतिहासप्रेमींचे काही गट आम्ही तयार केले आहेत. ते शिवरायांच्या इतिहासाच्या विविध पैलूंवर काम करीत असतात. माझ्यावर शंकर नारायण जोशी यांच्या इतिहासलेखनाचाही प्रभाव आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने इतिहास लेखन कसे करावे हे त्यांच्या ग्रंथांतून मी शिकलो. त्यातूनच मी शर्थीचे शिलेदार, दुर्गकथा, शिवाजी महाराजांच्या ४० लढाया, समरांगण, साक्ष इतिहासाची, ऐतिहासिक कथा, थोरले राजे गेले सांगून, गजकथा, विजयदुर्गचे रहस्य आदी पुस्तके लिहिली. कवी भूषणाने शिवरायांची महती गायलेले काव्य मला मुखोद्गत आहे. या काव्यातील सौंेदर्य व अन्वयार्थ स्पष्ट करणारे एक पुस्तक लिहिण्याचा माझा विचार आहे. ते पुस्तकही लवकरच प्रकाशित होईल.’’ ‘‘शिवाजी महाराज व त्यांच्यानंतरच्या मराठा साम्राज्याबद्दल जर्मन, फ्रेंच, इटली, इंग्रजी, स्पॅनिश भाषेतील कागदपत्रांत अशा अनेक नोंदी आहेत की, ज्या अजून अनुवादित झालेल्या नाहीत. मध्यमयुगीन काळात या भाषांतील क्लिष्टता लक्षात घेता अनुवादाचे हे काम इतके सोपे नाही. भारतीय इतिहास संशोधन मंडळातर्फे मोडी लिपीचे वर्ग चालविले जातात. त्याला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यातून दुर्मिळ कागदांचे वाचन, संशोधन मोठय़ा प्रमाणावर होऊ शकेल. मिर्झाराजेंनी शिवरायांकडून पुरंदर तहाच्या वेळी ताब्यात आलेल्या २३ किल्ल्यांचे बनवून घेतलेले नकाशे अशाच प्रयत्नांतून आमच्या हाती लागले.
त्यामुळे सर्व २३ किल्ल्यांची नावे नक्की करणे शक्य झाले. इतिहासलेखन करणाऱ्यांपैकी सध्या विशिष्ट गटाच्या लोकांवर टीका केली जात आहे. ज्ञानाची भांडारे हल्ला करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो आहे. माझ्या मते ऐतिहासिक साधनांची अधिकाधिक माहिती मिळवून त्यांचे कठोर परीक्षण करून जो निष्पक्षपणे इतिहास लिहितो तो खरा इतिहासकार. त्याला कोणत्याही वर्ग, जाती, जमातीच्या बंधनात अडकवू नका.’’ निनाद बेडेकर कळकळीचे आवाहन करतात. आंतरराष्ट्रीय अभ्यास पद्धतीचा, नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून छत्रपती शिवराय व मराठेशाही संदर्भात इतिहासाचे परिशीलन गेली अनेक वर्षे करणारे निनाद बेडेकर यापुढेही भावी पिढय़ांना असेच मार्गदर्शन करीत राहतील. शिवशाहीच्या इतिहासाचा हा निनादसह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत यापुढेही असाच घुमत राहील!
paranjapesamir@gmail.com

No comments:

Post a Comment