Monday, January 30, 2017

‌Baburao Arnalkar - बाबूराव अर्नाळकरांचा रहस्यभेद - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी, रसिक पुरवणी दि. २९ जानेवारी २०१७


 प्रख्यात रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर






 चित्रकार सतीश भावसार - यांनीच निवडक बाबुराव अर्नाळकर या पुस्तकाचे संपादन केले आहे.



 स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा निवडक बाबुराव अर्नाळकर या ग्रंथाबाबतचा अभिप्राय

----
अर्नाळकर यांच्या काही रहस्यकथा पुस्तकांची मुखपृष्ठ





ख्यातनाम रहस्यकथाकार बाबुराव अर्नाळकर यांच्या साहित्यकामगिरीचा सर्वंकष आढावा घेणारे निवडक बाबुराव अर्नाळकर हे पुस्तक राजहंस प्रकाशनाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध झाले. या पुस्तकाची निर्मिती, संकल्पना याचा प्रवास नेमका कसा झाला याविषयी सदर पुस्तकाचे संपादन करणारे नामवंत चित्रकार सतीश भावसार यांच्याशी जो संवाद साधला, त्यावर आधारित मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या रसिक या रविवार पुरवणीत २९ जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झाला आहे.त्या लेखाची वेबपेज, टेक्स्ट लिंक व जेपीजी फोटो सोबत दिेले आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-samir-paranjpe-article-about-writer-buburao-arnalkar-5515468-PHO.html?seq=1
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/29012017/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/29012017/0/4/

 --------------
बाबूराव अर्नाळकरांचा रहस्यभेद
----
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----------
इंट्रो- साहित्याचा जागर जेथे एकेमेळी होतो, तो प्रसंग म्हणजे मराठी साहित्य संमेलन. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे ३ ते ५ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नवीन पुस्तकांचेही आगमन होत आहे. त्यातील राजहंस प्रकाशनाच्या सतीश भावसार संपादित ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’ या पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया उलगडून सांगणारे हे रसाळ निवेदन...
------------
१४८० रहस्यकथा लिहिल्याने गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड‌्समध्ये अत्यंत सन्मानाने नोंद झालेले पहिले मराठी साहित्यिक...रहस्यकथा व ललित साहित्यप्रकारातील पुस्तके असा ग्रंथसंभार लक्षात घेतला तर त्यांच्या पुस्तकांची संख्या भरते तब्बल १८००... इतका बहुप्रसवा व विश्वविक्रम करणारा लेखक असूनही त्यांना मराठी साहित्याच्या प्रथम श्रेणीच्या साहित्यिकांमध्ये कधीच मानाची जागा मिळाली नाही. ही उपेक्षा हयात असताना व मृत्यूनंतरही कायम राहिली...
सटवाईने ज्यांच्या ललाटी हे असे भाग्य लिहून ठेवले, ते होते रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर. (ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावचे ते मूळ रहिवासी. जन्मदाखल्यावरचे त्यांचे खरे नाव चंद्रकांत सखाराम चव्हाण. पण ते कोणाच्याच ध्यानात येण्याचे काही कारणच नाही!)
नाही चिरा नाही पणती इतकी नक्कीच बाबूराव अर्नाळकरांच्या साहित्याची वाईट अवस्था मात्र झाली नाही. १९४०च्या दशकापासून सुरू झालेल्या त्यांच्या साहित्यलेखनाचा प्रवास डोळ्यांच्या विकारामुळे १९७०च्या दशकात विराम पावला. या ३०-३५ वर्षांच्या काळात बाबूरावांना रहस्यकथाकार म्हणून वाट्याला आली कोणालाही हेवा वाटावी अशी विलक्षण लोकप्रियता. त्यांच्या एकेका पुस्तकाच्या दोन दोन हजार प्रती दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत हा हा म्हणता खपून जात. हे इतके भाग्य साहित्यचंद्र वगैरे असलेल्या ना. सी. फडकेंपासून साहित्यसूर्य असलेल्या आचार्य अत्रे या समकालीनांनाही लाभले नव्हते.
आता ही सगळी माणसे काळाच्या पडद्याआड गेली आहेत. पण तुम्हा-आम्हाला आजही फडके, अत्रे यांची पुस्तके सहजी बघायला मिळतात. आजही त्यांच्या काही पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या निघतात.चांगलेच आहे. जे काही संचित आहे ते जपलेच पाहिजे. पण मग बाबूराव अर्नाळकरांच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या काढाव्या, हे एक-दोन प्रकाशकांनाच वाटत राहते. बाबूरावांची १८०० पुस्तके छान संग्रहित करून ठेवली आहेत, असे एकही जाणते ग्रंथालय या उभ्या-आडव्या महाराष्ट्रात नाही! पण हे राज्य एकांड्या शिलेदारी करणाऱ्या वेड्यांचे जरूर आहे.त्यातूनच भव्यदिव्य कामे उभी राहिली आहेत. वि. का. राजवाडेंपासून किती किती नावे घ्यावीत!
असेच एकांडे शिलेदार होते बाबूराव अर्नाळकरांचे जीवश्चकंठश्च मित्र विभाकर कर्वे. बाबूराव गिरगावमध्ये राहात होते तेव्हापासून या मैत्रीची सुरुवात झाली.विभाकर कर्वेंनी आपल्या कुटुंबाच्या भरणपोषणाकरिता रेल्वेमध्ये निवृत्तीपर्यंत ज्या निष्ठेने नोकरी केली, त्याच निष्ठेने दुसरे कामही केले ते म्हणजे बाबूरावांच्या पहिल्या पुस्तकापासून ते शेवटच्या पुस्तकापर्यंत सर्व पुस्तके त्यांनी मनापासून वाचली. एकदा नाही दोनदा, तीनदा... तसेच अर्नाळकरांच्या १८०० पुस्तकांचा एकहाती संग्रह केला विभाकर कर्वे यांनी अगदी प्रेमाने...बाबूरावांबद्दल जाणून घ्यायची ज्यांना असीम ओढ लागली होती, त्या प्रख्यात चित्रकार सतीश भावसार यांच्यासाठी विभाकर कर्वे मार्गदर्शक बनले बाबूराव नावाच्या दीपस्तंभाकडे नेणारे... ही सारी वाटचाल सुरू होती गेली पाच वर्षे. त्यातूनच सतीश भावसार यांनी संपादित केलेला निवडक बाबूराव अर्नाळकर हा डबल क्राऊन आकाराचा ७०० पानांचा ग्रंथराज राजहंस प्रकाशनाच्या वतीने लवकरच प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकाला प्रख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांची प्रस्तावना आहे.बाबूराव अर्नाळकर यांचे व्यक्तिमत्त्व व लेखनपैलूंविषयी कुमार केतकर, रत्नाकर मतकरी, अभिराम भडकमकर, अंबरिश मिश्र अशा दहा नामवंतांनी आपापले अनुभव लेखबद्ध केले आहेत. तसेच लता मंगेशकर यांनीही अर्नाळकरांविषयी लिहिले आहे.बाबूरावांच्या १८०० पुस्तकांपैकी पहिल्या ५०० पुस्तकांमधून दहा पुस्तके निवडून ती या ग्रंथात छापण्यात आली आहेत. त्यात जसे ‘चौकटची राणी’ हे बाबूरावांचे पहिले पुस्तक आहे, तसेच सुवर्णकाराचे रहस्य आणि अजून आठ पुस्तके... ही दहाही पुस्तके या एकाच मोठ्या पुस्तकात पाहता-वाचता येतील...त्याशिवाय बाबूराव अर्नाळकरांची चरित्रात्मक ओळख करून देणारा एक लेख, बाबूरावांना त्यांच्या वाचकांनी पाठविलेली काही पत्रे, असे बरेच काही रंजक नि रोमांचक ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’मध्ये असेल...
‘निवडक बाबूराव अर्नाळकर’पर्यंतचा जो प्रवास झाला, त्याविषयी बोलते करावे,म्हणून चित्रकार सतीश भावसार यांच्याकडे मोर्चा वळविला. सुमारे पाच हजार पुस्तकांची मुखपृष्ठे तयार केलेला हा दिग्गज कलावंत.अनेक लेखक, प्रकाशक अजमावलेला माणूस. पुस्तक सजवता सजवता संपादनाच्या जंजाळात कसा सापडला?सतीश भावसार सांगू लागले, ‘डिटेक्टिव्ह रामराव, धनंजय, सुदर्शन, फु मांचू यांसारखे सुमारे १०० मानसपुत्र बाबूराव अर्नाळकरांनी आपल्या रहस्यकथांमधून जन्माला घातले अाहेत. त्यातील जास्त नावाजले गेलेले म्हणजे झुंजार, काळा पहाड असे चार-पाचच. बाबूरावांच्या कादंबऱ्यांनी माझ्या मनाचा कब्जाच घेतला होता. १९८६मध्ये पुण्याहून चित्रकलेचे पदवी शिक्षण घेऊन पुढील वाटचालीसाठी मुंबईत आलो.पुस्तकांची व चित्रकलेशी संबंधित कामे कालांतराने मिळत गेली. आयुष्य स्थिरावत गेले. पण या कामाच्या धबडग्यातही बाबूराव अर्नाळकरांच्या लेखनाने मला घातलेली मोहिनी काही केल्या उतरायला तयारच नव्हती.’
"बाबूराव अर्नाळकरांची पुस्तके मी लहानपणापासूनच वाचत होतो. मुंबईत आल्यानंतर त्यांची पुस्तके मिळवून ती वाचण्याचा सपाटा आणखीन वाढला. त्यांना प्रत्यक्षात कधी भेटण्याचा योग मला आला नाही. मात्र बाबूराव अर्नाळकरांच्या पिढीतील कोणी व्यक्ती भेटली की मी हमखास त्यांच्याकडे बाबूरावांच्या पुस्तकांचा विषय काढायचो. मग ते गृहस्थ त्या पुस्तकांच्या आठवणीत रंगून जायचे. कोणाकडे बाबूरावांच्या रहस्यकथांची २०० पुस्तके संग्रही असायची, तर कोणाकडे ४०. पण ती निगुतीने त्यांनी जपून ठेवलेली असायची.त्यातला एखादा अर्नाळकरांना आपण कसे भेटलो, त्यांच्याशी काय बोललो, याच्या आठवणी सांगण्यात रंगून जायचा.बाबूरावांविषयी जी जी माहिती मिळेल ती मी गोळा करत होतो. तो ध्यासच लागला होता.'भावसारांचे विचारभाव शब्दांतून व्यक्त होत होते.
‘२०१२मधील गोष्ट असेल. काही कामानिमित्त मुंबईतील प्रभादेवी येथे लोकवाङ‌्मय गृह या प्रकाशनसंस्थेच्या कार्यालयात गेलो होतो. तिथे अरुण शेवते,प्रकाश विश्वासराव व मी गप्पा मारत बसलो होतो. त्या वेळी लोकवाङ‌्मय गृहच्या एका कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल बोलणे चालू होते. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा कोणाला बोलवायचे, असा विषय निघाला.मी चटकन बोलून गेलो की, बाबूराव अर्नाळकर आज असते तर मी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले असते. माझे हे उद्गार ऐकून विश्वासराव व शेवते यांना आश्चर्य वाटले. मग मी त्या दोघांना बाबूराव अर्नाळकरांबद्दल माझ्याकडे जी जी माहिती होती ती सांगत राहिलो. बाबूराव अर्नाळकर या विषयाने मला पछाडले आहे, हे लक्षात येताच ‘लोकवाङ‌्मय गृह’च्या प्रकाश विश्वासरावांनी मला या विषयावर पुस्तक लिहिण्यास सांगितले व त्यासाठी एक वर्षाची मुदतही दिली. मला हे सारे अकल्पितच होते.माझे सारे
व्याप सांभाळून अर्नाळकर यांच्यावर पुस्तक लिहिण्यासाठी माहिती गोळा करायच्या धडपडीला लागलो. दादरमध्ये पुस्तकांचे दुकान असणारे वसंत तेंडुलकर यांनी मला अर्नाळकरांचे मित्र विभाकर कर्वे यांचा कल्याणचा पत्ता दिला. कर्वे यांच्याकडे बाबूरावांच्या आठवणी व त्यांच्या पुस्तकांचा जो खजिना गवसला त्यामुळेच ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’ हे पुस्तक होऊ शकले.या कामगिरीची खास नोंद घेण्यासाठी विभाकर कर्वे यांची माहिती देणारे एक स्वतंत्र पानच या पुस्तकात िदलेले आहे. ‘लोकवाङ‌्मय गृह’ने हा प्रकल्प सुचविल्यानंतरची पुढील तीन वर्षे माझ्याकडे अर्नाळकरांविषयी पुरेशी माहिती जमा होऊ शकली नव्हती. मात्र विभाकर कर्वेंची भेट झाल्यानंतर मिळालेल्या माहितीमुळे अर्नाळकरांवर भलाथोरला ग्रंथ होईल, असा विश्वास बळावू लागला.’ भावसार गतआठवणींमध्ये रंगून गेले.
बाबूराव अर्नाळकरांच्या कोणत्याही कामात अडथळ्यांची शर्यत ही ठरलेलीच.त्यांच्यावरील पुस्तकदेखील त्याला अपवाद का ठरावे? हा प्रकल्प ज्या ‘लोकवाङ‌्मय गृह’ने सुचवला होता, त्यांनीच कालांतराने अर्नाळकरांवरील मोठ्या पृष्ठसंख्येचे पुस्तक छापणे शक्य नाही, असे कळवले. सतीश भावसारांनी मग एकच केले. त्यांनी अर्नाळकरांविषयी जे जे जमविले होते, ते सारे बासनात गुंडाळले व कपाटात ठेवून दिले. त्या मजकुराला कदाचित पुन्हा उजेड दिसणारच नाही, या भावनेने. वर्षभरापूर्वी भावसार काही कामानिमित्त राजहंस प्रकाशनाच्या कार्यालयात गेले होते. गप्पा मारताना दिलीप माजगावकरांनी त्यांना विचारणा केली, ‘नवीन काय करताय?’भावसार म्हणाले, ‘अर्नाळकरांविषयी खूप काही जमवले होते...’ यावर माजगावकर म्हणाले, ‘जे जमवले आहे ते सारे आम्हाला द्या.’ मग राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ.सदानंद बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘निवडक बाबूराव अर्नाळकर’ या पुस्तकाला आकार येऊ लागला...त्यामुळे या पुस्तकाला अजून काही चांगले पैलू जोडले गेले... ते प्रत्यक्ष पुस्तकात पाहायला मिळतीलच...’
भावसारांना अजून खूप काही सांगायचे होते बाबूराव अर्नाळकरांविषयी, त्यांच्या लेखनाविषयी; पण कुठेतरी सीमा असावीच लागते. काळा पहाड, झुंजार या मानसपुत्रांचे रचयिता बाबूराव अर्नाळकरांवर प्रसिद्ध होणारे पुस्तकच जणू आता या विषयाची मैफल जनमानसात रंगवणार असल्याने आम्ही दोघांनी अर्नाळकरांवरील गप्पा आटोपत्या घेतल्या...

------
उकल अर्नाळकरी शैलीची...
बाबूराव अर्नाळकर हे मूळचे वसई तालुक्यातील अर्नाळा गावचे. पुढे रहस्यकथा लिहिताना हेच गाव त्यांच्या टोपणनावात अगदी फिट्ट बसले.लहानपणापासूनच त्यांना लेखनाची आवड. नाटके लिहावीत, त्यात काम करावे, असाही खाक्या. त्यामुळे चंद्रकांत सखाराम चव्हाण असे मूळ नाव असलेल्या या मुलाला नाटकमंडळींत बाबू या नावाने हाक मारली जायची. पुढे हाच बाबू "बाबूराव' झाला लेखक म्हणून.बाबूरावांनी नाटके लिहिली आहेत, ललित साहित्यही लिहिले आहे. इतकेच काय, "वैतरणाच्या तीरावरून' नावाचे आत्मचरित्र त्यांनी लिहायला घेतले होते.ते अपुरे राहिले. त्याची पंधरा-वीस पानेच आज उपलब्ध आहेत. "मनोरंजन'मासिकात "सतीची समाधी' नावाची बाबूरावांनी आयुष्यात पहिल्यांदा लिहिलेली कथा प्रसिद्ध झाली. त्या कथेचे कौतुक साक्षात नाथ माधवांनी केले होते.ही कथा वाचून गिरगावात व्ही. आर. प्रभू(अभिनेता बबन प्रभू यांचे वडील) यांचा छापखाना होता. त्यांनी बाबूरावांना एक पुस्तक लिहायची विनंती केली. त्यातून बाबूरावांनी "चौकटची राणी' हे पहिले पुस्तक लिहिले. व्ही. आर. प्रभू यांनी काही मुलांना हाताशी धरून या पुस्तकाची रस्त्यावर उभे राहून विक्री करण्याचे अनोखे तंत्र अवलंबले, ते कामाला आले.अवघ्या दोन महिन्यांत चौकटची राणीच्या ५०० प्रती संपल्या. मग सिलसिला सुरू झाला तो अखंड रहस्यकथा लेखनाचा.प्रभू यांनीच अर्नाळकरांची पहिली काहीशे पुस्तके छापली आहेत. त्यानंतर मग अर्नाळकर अन्य प्रकाशकांकडे वळले.बाबूराव अर्नाळकर महिन्यातून चार ते पाच रहस्यकथांची पुस्तके लिहीत असत.त्या प्रत्येक पुस्तकाचे त्यांना मिळणारे मानधन मात्र अगदीच अल्प होते. त्यामुळे गिरगावमध्ये चश्म्याचे दुकान उघडून त्यांनी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविला होता. एडगर वॉलेस हा रहस्यकथाकार त्यांचा आवडता.बाबूरावांच्या पहिल्या काही पुस्तकांवर वॉलेसच्या शैलीची छाप स्पष्ट दिसते. पण त्यातून अर्नाळकर लवकरच बाहेर आले.त्यांना त्यांची शैली गवसली. झुंजार,काळा पहाड आदी त्यांचे मानसपुत्र गिरगाव, ग्रँटरोडपासून ते अख्ख्या मुंबईत जिथे जिथे आपले कारनामे करीत भ्रमण करीत तो परिसर ते आपल्या कादंबऱ्यातून जिवंत करू लागले.झुंजार महाल शोधण्यासाठी त्यांचे वाचक हातात रहस्यकथेचे पुस्तक घेऊन गिरगावपासूनचा परिसर पालथा घालू लागले. अर्नाळकरांच्या कथानायकांना चित्ररूप देऊन जिवंत केले ते प्रख्यात चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी. हा रहस्यकथांचा डौल काही वेगळाच होता...पण बाबूराव अर्नाळकरांच्या या कामगिरीची मराठीतील मठाधिपती साहित्यिक व समीक्षकांनी फारशी दखल घेतली नाही. त्यांना रहस्यकथाकार म्हणून कायमच दुय्यम स्थान दिले. ही खंत नक्कीच बाबूरावांच्या मनात होती. त्यांचा जन्म ९ जून १९०६चा. बाबूराव अर्नाळकरांना डोळ्यांचा विकार जडल्याने त्यांचे लेखन १९८८-८९च्या कालावधीत कायमचे बंद झाले होते. त्यांचा मृत्यू झाला ४ जुलै १९९६ रोजी. त्यांना पाच मुले, तीन मुली. त्यापैकी आता दोन मुली, एक मुलगा हयात आहेत. बाबूराव अर्नाळकरांच्या आठवणी जशा त्यांच्या परिवाराकडे आहेत तशाच त्यांच्या असंख्य आठवणी त्यांच्या हजारो वाचकांच्या मनातही आहेत. त्या सगळ्यांचेच स्मरणरंजन आहे "निवडक बाबूराव अर्नाळकर' पुस्तकात.
-----------------
अर्नाळकरांची कीर्ती सांगती लतादीदी...
बाबूराव अर्नाळकर आणि मंगेशकर कुटुंबीयांमध्ये स्नेहबंध होते. मुंबईत ग्रँटरोड पश्चिमेला १९व्या शतकामध्ये नाना शंकरशेठ यांनी बांधलेलेे शंकराचे देऊळ आहे. या देवळाच्या परिसरात पूर्वी धर्मशाळा होती. गंधर्व नाटक मंडळीचा मुंबई दौरा असेल तेव्हा त्या नाटक कंपनीचा मुक्काम याच देवळाच्या शेजारी असलेल्या धर्मशाळेत असे. या देवळाशेजारीच जी एक चाळ होती त्यामध्ये मंगेशकर कुटुंब त्यांच्या संघर्षकाळात वास्तव्य करून होते.मंगेशकर कुटुंबीय राहात होते त्या खोलीच्या शेजारीच बाबूराव अर्नाळकर राहात होते. बाबूरावांची मुलगी उषा व लता मंगेशकर त्या वेळी लहानग्या होत्या.त्या दोघी एकत्रित गाणे शिकायला जायच्या. चित्रकार सतीश भावसार यांना ही माहिती कळताच त्यांनी "निवडक बाबूराव अर्नाळकर' या पुस्तकासाठी लतादिदींच्या आठवणी मिळविण्यासाठी मंगेशकरांचे निकटवर्तीय असलेल्या विविध व्यक्तींच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले. पण ते फलद्रूप ठरले नाहीत. लता मंगेशकर यांच्याकडून आठवणी किंवा अभिप्राय मिळण्याची वाट बघत मधल्या काळात चार महिने पुस्तकाचे कामही थांबविण्यात आले होते. इतके या मजकुराचे महत्त्व या ग्रंथाचे संपादक व प्रकाशकांना वाटत होते! खूप प्रयत्न करूनही काहीही होत नाही, असे लक्षात आल्यानंतर एक दिवस सतीश भावसार त्यांच्या दादरच्या कार्यालयात आले असताना त्यांच्या डोक्यात एक विचार चमकून गेला. भावसार यांनी लता मंगेशकर यांना एक पत्र लिहायला घेतले.त्यात "निवडक बाबूराव अर्नाळकर' या पुस्तकामध्ये नेमके काय काय असणार आहे, याविषयी सविस्तर माहिती नमूद केली. त्याचबरोबर तुमच्या अर्नाळकरांविषयीच्या आठवणी किंवा अभिप्राय द्यावा, अशी विनंती या पत्रात भावसारांनी केली. पत्र लिहून झाल्यावर ते तातडीने लता मंगेशकर यांच्या पत्त्यावर कुरिअरने पाठवून दिले.
पत्र पाठवून दोन दिवस उलटले असतील. तिसऱ्या दिवशी भावसार यांच्या घरचा फोन खणखणला. भावसार तेव्हा घरी नव्हते. त्यांची मुलगी सानिकाने हा फोन घेतला. "मी लता मंगेशकर बोलतेय'... पलीकडून आवाज आला. "भावसारांचे पत्र मिळाले. त्यानुसार मी अभिप्राय लिहून ठेवलेला आहे. तुम्ही माझ्या घराच्या जवळपास येणार असाल तर ते पत्र कृपया स्वत: येऊन घेऊन जा किंवा तुम्हाला शक्य नसेल तर मी ते तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पाठविण्याची व्यवस्था करते.' असे साक्षात लतादीदी पलीकडून सांगत होत्या. हा फोन ठेवल्यानंतर सानिकाने आपल्या वडलांना सतीश भावसारांना फोन करून लगेच ही सारी माहिती दिली.
हे दिवस गेल्या वर्षीच्या नवरात्रौत्सवातील होते. सतीश भावसार व त्यांची मुलगी सानिका लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. दीदींनी त्यांचे आगतस्वागत केले. "निवडक बाबूराव अर्नाळकर' या ग्रंथासाठी आपला अभिप्राय लिहिलेले पत्र भावसार यांच्या हाती सुपूर्द केले. भावसार यांना कृतकृत्य वाटले त्या वेळी. या अभिप्रायात लतादीदींनी लिहिले आहे की, "रहस्यकथा लेखक बाबूराव अर्नाळकरांबरोबर आम्हा मंगेशकरांचा, खास करून आमची आई"माई' हिचा परिचय होता. तिच्यामुळे आम्हा भावंडांना बाबूरावांच्या रहस्यकथा वाचण्याची आवड निर्माण झाली. धनंजय,छोटू, झुंझार, काळा पहाड या रहस्यकथा आम्ही वाचलेल्या आहेत. आपण निर्माण करीत अाहात त्या ग्रंथाला आम्हा मंगेशकर भावंडांच्या मनापासून शुभेच्छा!'
लता मंगेशकर यांनी बाबूराव अर्नाळकर यांच्याविषयी जो अभिप्राय दिला तो सारा प्रसंगच सतीश भावसार यांच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यामुळे ही आठवण सांगताना चित्रकार सतीश भावसार हरखून गेले होते.
अर्नाळकरांचा धनंजय व सी. रामचंद्र
लती मंगेशकर व सी. रामचंद्र यांनी संगीत क्षेत्रात खूप मोठी एकत्रित कामगिरी केली आहे. दोघांनाही बाबुराव अर्नाळकर हे लेखक आवडायचे. बाबुराव अर्नाळकर यांच्या कादंबरीवर आधारित धनंजय नावाचाच एक मराठी चित्रपट आला होता. त्या चित्रपटाला संगीत दिले होते सी. रामचंद्र यांनी व धनंजयचीच भूमिकाही त्यांनीच केली होती. तेच या चित्रपटाचे निर्मातेही होते. सी. रामचंद्र दिसायला देखणे, सहा फुटाहून अधिक उंचीचे. मात्र त्यांच्या रुपाची जादू मात्र हा चित्रपट यशस्वी करु शकली नाही. `जीवाच्या सखीला कितीदा पुकारु, किती साद घालू, किती हाक मारु' हे सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेले व महेंद्र कपूर, उषा मंगेशकर यांनी गायलेले सुश्राव्य गाणे हीच काय ती धनंजय या चित्रपटाची लोकांच्या मनात राहिलेली आठवण. हे गाणे आता यू ट्यूबला रसिकांना ऐकायला मिळते पण ऑडियो स्वरुपात. त्या गाण्याचा व्हिडिओ यूट्यूबवर अजून तरी अपलोड झालेला नाही.
-------

Tuesday, January 10, 2017

माणदेशातल्या महिलांच्या जिद्दीची गोष्ट - समीर परांजपे - मधुरिमा, दै. दिव्य मराठी १० जानेवारी २०१७



मुंबईत ५ ते ८ जानेवारी २०१७ या कालावधीत भरलेल्या माणदेशी महोत्सवाबद्दल दिव्य मराठी या वृत्तपत्रात मधुरिमा या महिलाविषयक पुरवणीमध्ये दि. १० जानेवारी २०१७ रोजी मी लिहिलला हा लेख. त्या लेखाचा पूर्ण मजकूर, जेपीजी फाइल, वेब आणि टेक्स्ट लिंकही पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjape-writ…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/m…/246/10012017/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/m…/246/10012017/0/7/
---------------------------------
माणदेशातल्या महिलांच्या जिद्दीची गोष्ट
-------------------------------------------
-समीर परांजपे
-------------
‘झाड येलाचं,झाड बेलाचं,झाड सुरूचं,झाड पेरूचं
करकरा लवं बाई मोगरा जाई’
जात्यावरील या ओवीचे सुस्वर निघत होते केराबाई सरगर यांच्या मुखातून.त्या गात असलेल्या ओव्या रेकॉर्ड करून घेण्यासाठी सात-अाठ जण आपले स्मार्टफोन त्यांच्यासमोर घेऊन उभे तेही अदबीने.लहानपणापासून ऐकलेल्या या ओव्या केराबाईंच्या मनीमानसी होत्याच,पण आता त्यांचा हा स्वर गुंजतो आहे माणदेशी फाउंडेशनने सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावी सुरू केलेल्या माणदेशी तरंग वाहिनी म्हणजे कम्युनिटी रेडिओ स्टेशनवरून.त्या या रेडिओ केंद्राच्या आरजे म्हणून प्रसिद्ध आहेत!आता वय वर्षे ५५ असलेल्या केराबाई सरगर लहानपणापासून पुणे,मुंबई रेडिओ केंद्र ऐकायच्या.त्यांनाही असे वाटायचे की,आपला आवाज रेडिओत आला पाहिजे.तो आवाज सरतेशेवटी माणदेशी तरंग वाहिनीतून ऐकायला मिळाला.हा चमत्कार होता,माणदेशी फाउंडेशनने त्या भागात महिला सक्षमीकरणासाठी जे प्रयत्न केले त्यातून घडलेला.माणदेशी फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील रवींद्र नाट्यमंिदर संकुलामध्ये नुकताच माणदेशी महोत्सव आयोजिण्यात आला होता.त्यात केराबाई सरगर यांचा टेराकोटा भांड्यांचा स्टाॅल होता.त्या स्टॉलवरच‘जात्यावरच्या ओव्यांची ध्वनिमुद्रण परिषद’भरली होती!
केराबाईंशी संवाद साधताना त्या जुन्या आठवणींत रमल्या.‘सातारा जिल्ह्यातील माण तालुका म्हणजे सदानकदा दुष्काळी भाग.जे पेरले त्यातूनच जितके उगवले त्यातच भागवले,अशी अवस्था.या भागात ग.दि.माडगूळकर,व्यंकटेश माडगूळकर असे मोठमोठे लेखक होऊन गेले.व्यंकटेश माडगूळकरांनी‘माणदेशी माणसं’हे पुस्तक लिहून हा प्रदेश अमरच केला आहे.मात्र माण अजूनही दुष्काळी आहे.मी माण तालुक्यातील म्हसवडची.लहानपणापासून स्वत:चे काही करावे,अशी जिद्द होतीच.सामाजिक कार्यकर्ते चेतना व विजय सिन्हा यांनी स्थापन केलेल्या माणदेशी महिला बँकेने मला सहकार्याचा,कर्जाचा हात देऊ केला.त्यातून टेराकोटा भांड्यांचा व्यवसाय आम्ही अधिक वाढविला.हा आमचा परंपरागत व्यवसाय.आधी गाव,फार तर सातारा जिल्हा बाजारापर्यंत जाऊन विक्री करण्याची मजल होती.आता आम्ही महाराष्ट्रात व राज्याबाहेरही विक्रीसाठी जातो,’केराबाईंच्या डोळ्यांत हे सारे सांगताना कृतज्ञता दाटून आली होती.केराबाईंच्या टेराकोटा भांड्यांच्या स्टॉलवर त्यांचा मुलगा व सूनही होते.ही भांडी बनविण्यात केराबाई माहीर आहेत,हे सांगताना त्यांना विलक्षण अभिमान वाटत होता.ही एकाच स्टॉलवरची कथा नव्हती.या माणदेशी महोत्सवात सुमारे २० स्टॉल मांडलेले होते.प्रत्येक स्टॉलवर अशी कर्तृत्वगाथा व कर्तृत्वशालिनी ठळकपणे दिसत होती.माणदेशी फाउंडेशन व माणदेशी महिला बँकेचे काम आता फक्त सातारा जिल्ह्यापुरते नाही तर महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यांत व गुजरातमध्येही विस्तारले आहे.विविध महिला तसेच बचत गटांना आर्थिक साहाय्य करून त्यांना स्वत:चा उद्योग उभारण्यास प्रोत्साहन देणे,त्यांना तंत्रज्ञानकुशल बनविणे अशी मुख्य उद्दिष्टे या संस्थांनी आपल्या कामातून साध्य केली आहेत.
इथल्या एका स्टॉलवर मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेल्या विविध वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या.त्यामध्ये जेन,घोंगडी,बसकर,हसन,उशी,टोपी,मोपरेला अशा वस्तूंचा समावेश होता.या वस्तू मुंबईत एरवी दिसणं अशक्य,त्यामुळे अधिक बारकाईने बघितल्या गेल्या.तो स्टॉल होता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा गावच्या बिबि फातिमा कृषि महिला स्वयंसेवी सहबचत गटाचा.या गटाच्या अध्यक्षा बिस्मिल्ला हारून नदाफ यांचा तो स्टॉल.त्या मेंढीच्या लोकरीपासून बनविलेल्या वस्तूंची माहिती सांगत असताना मुंबैकर महिलांचा भोवती गराडा पडलेला.माहिती सांगून झाल्यावर पटापट विक्रीही झाली.बिस्मिल्ला म्हणाल्या,माणदेशी महिला बँकेने आमच्या बचत गटाला मदत केली व स्वत:च्या पायावर उभे केले.मुंबईत येण्याआधी केरळमध्ये एका प्रदर्शनात स्टॉल लावून या वस्तूंची विक्री केली व मुंबईत आलो,असे आत्मविश्वासाने बिस्मिल्ला यांनी सांगताच त्यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या पतीनेही आनंदाने त्यात आपला स्वर मिसळला.
बुरुड जमातीच्या बेबी हिरा जाधव.त्यांच्या स्टॉलवर बांबूपासून विणलेल्या टोपल्या,फुलदाणी,देव्हारा साफ करायचा साळुला अशा विविध वस्तू विक्रीला ठेवलेल्या होत्या.१५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंतच्या वस्तू इथे मांडलेल्या होत्या.नुसत्याच मांडलेल्या नव्हत्या तर त्या प्रत्यक्ष तिथे बनविणे सुरू होते.त्यामुळे वस्तू विकत घेणाऱ्यांना त्या बनविताना बघण्याचाही दुहेरी आनंद.
त्याच्या पुढचा स्टॉल होता तानाजी हनुमंत यादव यांचा.ते बोरीच्या झाडाच्या लाकडापासून बनवत होते रवी,लाटणी,तसेच किचन ओट्यावर आले वगैरे चेचण्यासाठी लागणारे लाकडी उपकरण.बटाटे मॅश करायला,पावभाजी बनवायला लागणारे लाकडी उपकरणही त्यांनी विकायला ठेवले होते.
राधाबाई चौघुले ही पाथरवट व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील महिला.तिच्या स्टॉलवर छोट्या छोट्या आकाराची जाती,पाटा-वरंवटा,खलबत्ते अशा अनेक वस्तू होत्या.मुंबैकर बायका जाती,पाटा-वरवंटा विकत घेत होत्या.जात्याची किंमत १५०० रु.पाटा-वरंवटा ५०० रुपयाला.राधाबाईंचा मुलगा अर्जुनने मस्त माहिती दिली.‘योगगुरु रामदेवबाबा सांगतात की,गरोदर महिलांनी जात्यावर दळले पाहिजे,त्यासारखा चांगला व्यायाम नाही.त्यामुळे गर्भवती महिला ही छोट्या आकाराची जाती विकत घेतात.पाटा-वरवंट्यावर वाटण करणे हेदेखील व्यायामाचा भाग म्हणून पाहिले जाते.या गोष्टींवर बनविलेल्या पदार्थांची चव वेगळीच;पण आता जाते,पाटा-वरवंटा या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे.’माणदेशी महिला बँकेने अर्थसाहाय्य देऊन ज्यांना स्वत:च्या पायावर उभे केले त्यात राधाबाईदेखील होती.या सगळ्या दगडी वस्तू आपल्याला लहानपणापासून तयार करता येतात,हे त्यांनी बोलक्या डोळ्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगावच्या श्रीराम स्वयंसाहाय्यता महिला बचत गटाच्या स्टॉलवर विक्रीला होती मातीची भांडी.मातीच्या तव्यापासून माठापर्यंत अनेक प्रकार.त्यांच्या किमतीही जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत.मुंबईत मातीचा माठ वापरणारे आता कमी उरलेत.त्यामुळे या प्रदर्शनात अशा काही वस्तू दिसल्या की,अजि म्या ब्रह्म पाहिले,अशी अवस्था होते.हे स्टॉल बघत असताना माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा यांची भेट झाली.त्या म्हणाल्या,‘माणदेशातील महिला उद्योजकांना या प्रदर्शनाद्वारे जगापुढे आणण्याचा हेतू होता.त्याशिवाय त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होता.’
या चार दिवसांच्या महोत्सवात अनेक महिला उद्योजक सहभागी झाल्या होत्या. त्यांनी घरगुती पद्धतीने तयार केलेल्या खाद्यपदार्थांपासून विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.माण तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या माणदेशी महिला बँक व सामाजिक कणा असलेल्या माणदेशी फाऊन्डेशनने या भागातील महिलांचे जे सक्षमीकरण केले तेही गाजावाजा न करता.असे प्रयत्न महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात रुजले,वाढले तर महिला विकास अधिक चांगला आकार घेईल.पण त्यासाठी जिद्द हवी.ती शोधायची असेल तर त्यासाठी दुष्काळी
ओळख असलेल्या माणदेशातल्या माणसांना भेटायला हवं.
sameer.p@dbcorp.in