Wednesday, December 17, 2014

निखळ (निखिल) रत्नपारखी व त्याची नाट्य(भक्ती) - (प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार निखिल रत्नपारखी व त्याची सहचारिणी व अभिनेत्री भक्ती रत्नपारखी यांचा कलापरिचय)



निखळ (निखिल) रत्नपारखी व त्याची नाट्य(भक्ती)
----------
(प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, नाटककार निखिल रत्नपारखी व त्याची सहचारिणी व अभिनेत्री भक्ती रत्नपारखी यांचा कलापरिचय)
--------------
बेगम मेमरी, आठवण गुलाम हे नाटक बघायचे, बघायचे आहे म्हणताना काहीना काही कारणामुळे राहूनच जातेय...हे नाटक त्यातील आशय, विषय आणि सादरीकरणासाठी बघायचे आहे. नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे, नाटककार जयंत पवार यांनी या नाटकाविषयीची लिहिलेली परीक्षणे वाचल्यानंतर नाटकाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. हे नाटक बघायचे आहे प्रख्यात अभिनेता, दिग्दर्शक, लेखक निखिल रत्नपारखी, त्याची सहचारिणी भक्ती रत्नपारखी, माझी बेस्ट फ्रेंड व कुशाग्र कलाकार लतिका गोरे व अन्य कलावंतांच्या नाटकातील अदाकारीसाठी...हे नाटक बघूनच निखिल व भक्ती या नाट्यवेड्या दांपत्याबद्दल लिहावे असे वाटत होते. मात्र ते होऊ शकले नाही. पण त्यामुळे काही अडत नाही. निखिल असो वा भक्ती हे काही याच नाटकामुळे माहिती झाले असे नाही.
निखिल रत्नपारखी हा मुळ पुण्याचा. नाट्य, चित्रपट, मालिका, जाहिरातींतील नेमके मुल्यवान रत्न कोणते व नुसतेच खडे कोणते याची पारख निखिलला आता चांगलीच झाली आहे. पण त्याचा हा प्रवास तसा सोपा नव्हता. तो पुण्यातील समन्वय या नाटकगटामध्ये सक्रिय झाला. तिथे त्याने राजीव नाईक लिखित साठेचं काय करायच?, विजय तेंडुलकर लिखित मसाज या नाटकांमध्ये कामे केली. कोवळी उन्हे या नावाने विजय तेंडुलकरांचे सदर एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असे. त्याच्यावर आधारित नाट्याविष्कार समन्वय संस्थेने निर्मिला होता. त्याचा दिग्दर्शक होता संदेश कुलकर्णी. त्यात निखिल अफलातून परफाँर्मन्स द्यायचा. त्यातील अभिनेत्याचा कस लागायचा तेव्हा. पुण्यामधील नाट्यक्षेत्रामध्ये काही एक कामगिरी बजावल्यानंतर कोणत्याही कलाकाराला मुंबईचे वेध लागतात. तसे निखिलला लागले यात नवल नाही. एक व्यावसायिक अभिनेता म्हणून कारकिर्द करण्यासाठी तो या शहराच्या रोखाने निघाला. मुंबईत एका जाहिरीतीची संकल्पना विकसित करत असताना जाहिरातीच्या निर्मात्यांना त्यात काम करण्यासाठी हवा तसा कलाकार मिळत नव्हता. त्यावेळी त्यांच्या मनात निखिल भरला. त्याने या जाहिरातीत काम केले. तिथून सुरु झाला त्याचा मुंबईतील व्यावसायिक कलाकार म्हणून खर्या अर्थाने प्रवास. सर्वाधिक जाहिरातींत झळकलेला मराठी कलाकार म्हणून निखिलची नोंद घ्यावी लागेल. थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे १५० जाहिरातींमध्ये निखिलने काम केले आहे. तो दिसायलाही गोंडस आहे म्हणून बहुतेक सार्या जाहिरात निर्मात्यांचा तो लाडका असावा. तो जाहिरातींतील लाडके व्यक्तिमत्वच बनला. कालांतराने महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्वही त्याला चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर साकारायला मिळाले. जाहिरातींसाठीच बनलाय निखिल अशी त्याची प्रसिद्धी होऊ लागली. त्याची दुसरी बाजू अशी की, जाहिरातींमध्ये खूप व्यस्त झाल्यामुळे त्याने व्यावसायिक नाटके तशी खूप कमी केली.
त्याने केलेले पहिले व्यावसायिक नाटक म्हणजे रत्नाकर मतकरी लिखित आम्हाला वेगळ व्हायचयं. या नाटकाचे निर्माते होते सुयोग संस्था. त्या नाटकानंतर तो बराच काळ व्यावसायिक नाटकांकडे वळला नाही. कारण साधे होते. तो जाहिरातींमध्ये व्यस्त होता अत्यंत.
निखिलला लेखणीचीही देणगी आहे. तो एक असा कलाकार आहे की ज्याला नाटक लिहिता येत, ते कस साकारायचे हे तो दिग्दर्शक म्हणून पाहू शकतो. आणि प्रत्यक्ष रंगमंचावर तो त्या नाटकातील भूमिकाही उत्तम वठवू शकतो. हे थ्री इन वन पॅकेज त्याने सर्वप्रथम वापरले ते टाँम अँड जेरी या नाटकात. त्याने हे नाटक लिहिले. दिग्दर्शित केले व त्यात भूमिका करुन प्रेक्षकांनाही रिझविले.असा बहुगुणी अवलिया बर्याच वर्षांनी रंगभूमीला लाभलाय. अगदी हेच त्याने पुन्हा सगळे केलेय बेगम मेमरी आठवण गुलाम या नाटकात. तो या नाटकात सर्व पात्रांबरोबर प्रेक्षकांसमोर येतो, दिग्दर्शक म्हणून स्वत:सह सर्व कलाकारांना रंगमंचावर वावरायला लावतो व लेखक म्हणून नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधतो. हे नाटक विनोदी असले तरी नाटकाचा बाज खूप वेगळा आहे असे माझ्या मित्रपरिवारातील ज्यांनी ज्यांनी बघितले त्यांनी आवर्जून सांगितले आहे. मी एक दुर्देवी जीव ज्याला हे नाटक बघण्याची संधीच अजून मिळत नाहीये.
निखिल रत्नपारखी याने काही चित्रपटांत कामे केली. त्यामध्ये ओ माय गाँड, मोड, घो मला असला हवा, तेरे बिन लादेन, नारबाची वाडी, गोळाबेरीज असे काही चित्रपट आहेत. ते बहुतेक चित्रपट मी बघितलेले आहेत.
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावरच असलेल्या गोळाबेरीज या चित्रपटात पु. ल. देशपांडे यांची भूमिका निखिल रत्नपारखीनेच साकारली होती. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यापेक्षाही हा विनोदी चित्रपट झाला होता. या चित्रपटात नेमके कधी काय घडत राहाते याची गोळाबेरीज व्हायच्या ऐवजी गोळावजाबाकी होऊन या चित्रपटाचे क्षितिज आक्रसले आणि हा चित्रपट झारापकन (क्षमस्व झपकन) आपटला. पु. ल. देशपांडे यांचे साहित्य कधी असे पडले नव्हते इतका त्यांच्यावरचा चित्रपट अपयशाच्या खोल दरीत पडला. नायकाच्या भूमिकेत असलेल्या निखिल रत्नपारखीच्या या चित्रपटाविषयी नेमक्या भावना काय आहेत माहित नाही पण अशा चित्रपटांमध्ये पुन्हा त्याने काम करु नये ही विनंती. हा चित्रपट बघण्याच्या भीषण अनुभवाला सामोरे जाऊन जो सुखरुप पुन्हा चित्रपटगृहाबाहेर आला होता तो खरा भाग्यवान प्रेक्षक...मी प्लाझामधून सहीसलामत बाहेर पडलो होतो हा चित्रपट पाहून....म्हणून आज हे लिहू शकतोय...
निखिलच्या समग्र कलाकारकिर्दीचा आलेख इथे मांडणे शक्य नाही. पण तो एक मनस्वी कलाकार आहे व यशस्वी आहे. त्याच्या या यशामागे नाट्यभक्ती आहे. म्हणजे नाट्यही आहे आणि भक्ती (त्याची पत्नी) जिला आपण अभिनेत्री भक्ती रत्नपारखी म्हणून ओळखतो ती. भक्ती ही पुण्यातलीच. त्यामुळे पुणेकर मुलालाच तिची पहिली पसंती असणे स्वाभाविक होते. निखिलला वरल्यानंतर ती देखील आता मुंबईत त्याच्या समवेत येऊन आपली कलाकारकिर्द उजळ करीत आहे. मुळात भक्तीने पुण्यातील महाराष्ट्र कल्चरल सेटर या प्रायोगिक नाट्यसंस्थेतून तिने काही नाटकांत कामे केली. त्याआधी स्पर्धांमध्ये काही एकांकिकांत कामेही केली, आणखी एका नाट्यसंस्थेतून भक्तीने विजय तेंडुलकर मित्राची गोष्ट या कथेवर आधारित एकांकिकेत काम केले. होते. सवाईच्या स्पर्धेत चेतन दातारच्या नाटकातही तिने भूमिका केली. आसक्त ही संस्था आहे ना त्यांच्याबरोबर फक्त तू नावाचे नाटक एक नाटक तिने केलेल. मोहित टाकळकरने हे नाटक दिग्दर्शित केले होते. खुप वेगळा अनुभव होता हा तिच्यासाठी...भक्ती रत्नपारखीचे पहिले व्यावसायिक नाटक म्हणजे दुर्गाबाई जरा जपून. हे नाटक विजय केंकरेनी दिग्दर्शित केले होत टाँम अँड जेरी नाटकात तिने निखिलला असिस्ट केले होते. आता तिचे नवेकोरे नाटक बेगम मेमरी आठवण गुलाम हे रंगभूमी गाजवते आहे. त्या शिवाय भक्ती रत्नपारखीने कंपनी, ओ माय गाँड, देऊळ अशा काही चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.माझी अभिनय कारकिर्द खूप मोठी नाही असे ती सांगत असली तरी तो तिचा विनम्रपणा आहे.
पुण्यातला कलावंत इतका नम्र असतो यावर विश्वासच बसत नाही. नाट्य, चित्रपट, मालिका क्षेत्रात अखिल स्तरावरचा कलाकार म्हणून निखिल रत्नपारखी भविष्यात आणखी पुढे यावा व त्याने जसे जाहिरात क्षेत्र व्यापले आहे (व्यापले आहे असे निखिलच्या शारीरव्यापकतेकडे बघून लिहिलेले नाही) तशी अभिनयकलेची बाकीची क्षेत्रेही आपल्या कसदार लेखन, दिग्दर्शन, अभिनयाने व्यापून टाकावीत हीच सदिच्छा. त्याची नाट्यभक्ती व सहचारिणी भक्ती या त्याच्यावर प्रसन्न आहेतच. अभिनयातील या दोन रत्नांवर पारखी नजर ठेवून लिहिल्याचा आव जरी मी आणलेला असला तरी तो काही खरा नाही....हे या दोन रत्नपारखींना बरोबर लक्षात येईल. भक्तिभावाने त्यांचा आता निरोप घेतो. नाहीतर ते माझी पारख एक रत्न (व्यंगात्मक अंगाने) अशी करतील,,,,,हाहाहा
- समीर परांजपे.
paranjapesamir@gmail,com

Tuesday, December 2, 2014

सूर्व्या उगवलाय ....म्हणजे समीर रमेश सुर्वे....श्री पार्टनर चित्रपटाचा गाजलेला दिग्दर्शक...



सूर्व्या उगवलाय ....म्हणजे समीर रमेश सुर्वे....श्री पार्टनर चित्रपटाचा गाजलेला दिग्दर्शक...त्याच्या सहवासाच्या या माझ्या काही अघळपघळ नोंदी...अपयशाला आईबाप नसतात, यशाला असतात असे सांगणार्यांना सूर्व्या कळण्यासाठी,,,,,,
----------------
किती पण कोंबडे झाका, सूर्व्या उगवलाय असे गावात कधी कधी ऐकायला मिळायचे. अर्थ नाही लागायचा तेव्हा. त्यासाठी शहराचाच दरवाजा खुला व्हावा लागला. दादर पश्चिमेला बबन चहावाला नावाचे एक मोठे प्रकरण २००७ सालापर्यंत असायचे. त्यांचे साम्राज्य रात्री नऊ ते सकाळी सात पर्यंत चालायचे. त्यांच्या साम्राज्यातले चहा प्यायला येणारे मानकरी म्हणजे नाना पाटेकर, सतीश पुळेकर आणि पत्रकारितेतले दिग्गज अंबरीष मिश्र आणि असे असंख्य मान्यवर. त्यात मी आपला कोपर्यात कुठेतरी अंग चोरुन. बबनरावांकडे चहा प्यायला संवेदना परिवार या नाटकग्रुपचे बरेचसे सदस्य यायचे. त्यांची ओळख १९९५ साली झाली. त्यात एक त्यावेळी हडकुळा असलेला, दाढीचे खुंट वाढलेला, पौराणिक नाटकात ठेवतात तसे कानावर येतील इतके डोईवरचे केस राखलेला पोरगाही होता. मराठी भाषा लालबाग, परळच्या बोलीशी जवळीक साधणारी, पण डोळे, शारीरभाव खूप काही सांगू पाहाणारे. सांगण्याचा आशय अर्थवाही होता की निरर्थक इतका काही मी त्याच्या जवळ गेलो नव्हतो. तो एकांकिका, लिहितो, दिग्दर्शित करतो, भूमिका करतो असे हळुहळु त्याच्याशी बोलायला लागल्यानंतर कळायला लागले. कधीमधी तो त्याच्या दोस्तांबरोबर रुईया काँलेजच्या नाक्यावर यायचा तेव्हा तिथेही आमच्या भेटीगाठी व्हायच्या. कारण आँफिसनंतर रात्रीपर्यंत मी नाक्यावर पडीक. आताही कधीकधी असतो...
आता एकदम ट्रान्सफर सीन.......
श्री पार्टनर हा चित्रपट...तो मी पाहिला...त्याच्या दिग्दर्शकाचे नाव पाहिले समीर रमेश सुर्वे...नाव वाचले आणि आठवू लागले हाच तो पोरगा...मी व तो बबन चहावाल्यांकडे कधीमधी भेटायचो. काहीबाही बोलायचो. मग तो संवेदना परिवारात मश्गुल, मी माझ्या नादात...होय हाच तो समीर रमेश सुर्वे. प्रख्यात साहित्यिक व. पु. काळे यांच्या प्रसिद्ध पार्टनर या कादंबरीवर श्री पार्टनर हा चित्रपट दिग्दर्शित करणारा. श्रीपार्टनर हा चित्रपट त्यातील अभिनय, कथेचा गर आणि सुज्ञ दिग्दर्शन यामुळे गाजला. आणि मग या मराठी चित्रपटसृष्टीने दखल घेतली...
सूर्व्या (म्हणजे समीर रमेश सुर्वे) उगवलाय....उपेक्षेने प्रशंसेचे कोंबडे कितीही झाकून ठेवायचे येथील अनेकांनी ठरविले तरी सूर्व्या उगवलाच...
समीर सुर्वेला बघून हा सरळमार्गी असेल असे वाटतच नाही. कायम वाकड्या मार्गाने जाणार...म्हणजे वाकड्यात नाही शिरणार. पण सरधोपट सरळ मार्ग त्याला आवडतच नाही. तो वाकड्या मार्गाने जाऊन सरळ यश खेचून आणतो पण त्यासाठी मोठी किंमतही मोजतो. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी आपल्या घरातील सोनेनाणे प्रसंगी गहाण ठेवून चित्रपट काढले इतकी त्यांना या गोष्टीची असोशी होती. फाळके यांची असोशी माहिती आहे सगळ्यांना पण सर्वस्व पणाला लावून जे चित्रपट उभे करतात त्या पूर्वजांचा समीर हा खरा वारसदार आहे. श्री पार्टनर हा चित्रपट बनविण्यासाठी सगळ्या प्रकारचे सहकार्य देऊ अशी आश्वासने देणार्यांपैकी बरेचजण मध्येच हात सोडून निघून गेले. पण समीर आपली वाट चालत राहिला. कर्जाचे मोठे डोंगर खांद्यावर पेलून त्याने श्री पार्टनर हा चित्रपट पूर्ण केला. व झळकवलाही. या चित्रपटाला जे यश मिळाले ते त्यातील कलाकार, तंत्रज्ञांचे होतेच पण यशाच्या या गौरीशंकराच्या शिखरावर बसण्याचा मान फक्त समीर सुर्वेलाच आहे.
आता तो चार्ली या ब्लँक हाँरर काँमे़डी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणात गुंतलाय... .भरत जाधव. नेहा पेंडसे. विजय पाटकर असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत....हा चित्रपट करताना येणार्या समस्यांनाही समीर हसत हसत सामोरा जातोय. हा चित्रपटही खूप वेगळा होणार आहे हे मी त्याचे चित्रीकरण, प्रोमो बघून आत्ताच सांगतो....
मराठी असो वा हिंदी चित्रपटसृष्टीचा एक उसुल आहे. अपय़शाला आईबाप नसतात, यशाला असतात...श्रीपार्टनर जोवर पूर्ण होत नव्हता तोवर समीर रमेश सुर्वे हा अश्वत्थाम्यासारखा भळभळती जखम घेऊन फिरायचा. पार्टनर पूर्ण झाला तेव्हा समीरचा आत्मा शांत झाला. चित्रपट बनविण्यासाठी काढलेल्या कर्जाचे डोंगर चढत असतानाही हा पुन्हा चार्ली चित्रपटात गुंतला. शेवटी चित्रपट करणे, बघणे, काढणे ही एक नशा आहे. त्या नशेच्या अमलात प्रेक्षक म्हणून मी राहाणार आहेच. त्याचबरोबर रसिकांवर समीर रमेश सुर्वे याचा सुरु असलेला दिग्दर्शकीय अमलही असा बराच काळ टिकू दे. समीर सुर्वे व मी काहीवेळा रुईया काँलेज नाका किंवा दादर स्टेशनला उभे राहूनही गप्पा मारल्या आहेत भररात्री. पण त्या अंधारातही माझ्या डोळ्यासमोर काजवे नव्हे तर हा सुर्व्याच चमकायचा....
मी काय लिहिणार आहे हे त्याला आधी सांगण्याचा प्रश्न नाही.. समीर रमेश सुर्वे हा मराठीतला प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक आहे...त्याच्याकडे मराठी, हिंदी चित्रपटांतील मान्यवरांनी, वितरकांनी, फायनान्सरनी बारीक लक्ष द्यायला हवे. समीर सुर्वे प्रसिद्धीच्या मागे धावत नाही म्हणून चित्रपटसृष्टीतील इतर लोकांनी अशा गुणवानांच्या मागे स्वत:हून धावणे सोडून द्यायचे असा याचा अर्थ होत नाही.....या लोकांनी किमान एवढे तरी करावे, उगवलेल्या सूर्व्याकडे बघावे....
- समीर परांजपे

शेखर सरतांडेल की शेखरसर तांडेल? ---------- (जोशी की कांबळे, निर्माल्य, माय डिअर यश या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल याच्या व्यक्तित्वाचा वेध या पोस्टमध्ये घेतला आहे.)


शेखर सरतांडेल की शेखरसर तांडेल?
----------
(जोशी की कांबळे, निर्माल्य, माय डिअर यश या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल याच्या व्यक्तित्वाचा वेध या पोस्टमध्ये घेतला आहे.)
-----
शेखर सरतांडेल किंवा शेखरसर तांडेल
तुम्ही शेखरच्या नावाचा असा दोन्ही प्रकारे उच्चार केलात तरी तो तुम्हाला सारखाच वाटेल.
कारण शेखर सरतांडेल म्हटले की नजरेसमोर येतो अव्वल चित्रपट दिग्दर्शक
शेखरसर तांडेल म्हटले की आठवतो रचना संसद या महाविद्यालयात फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रम स्वत:च्या मेहनतीतून, निढळ्या घामातून उभा करुन विद्यार्थी घडविणारा शिक्षक.
तुम्हाला जसा तो दिसत असेल तसा तुम्ही त्याला त्या त्या प्रमाणे उच्चार करुन हाक मारु शकता.
महेश मांजरेकर यांच्या सोबत निदान, वास्तव अशा सुमारे आठ हिंदी व आई या मराठी चित्रपटांमध्ये चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून कामगिरी बजावणारा शेखर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील माहोलला एकदम सरावलेला.
इतक्या समृद्ध अनुभवानंतर शेखर स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनात उतरला.
त्याने स्वत:;च्या बळावर दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट म्हणजे जोशी की कांबळे...चित्रपटाच्या शीर्षकातच सामाजिक धग आहे. अत्यंत ज्वालाग्रही विषय पण त्या चित्रपटाची कथा अतिशय नेमकेपणाने लिहिली होती प्रख्यात समीक्षक श्रीधर तिळवे यांनी. या कथेला चित्रपटाच्या रुपात आकार देताना अतिशय संयत हाताळणी शेखरने केली होती. जातीवर आधारित आरक्षण व्यवस्था हा म्हटले तर खूप चर्चेचा विषय. त्या विषयाच्या बाजूने आणि विरोधात बोलणारे यांची संख्या सम असेल. पण जातीव्यवस्थेतून निर्माण झालेल्या विषमतेवर जोशी की कांबळे चित्रपटात खूप मार्मिक भाष्य करण्यात आले होते. या चित्रपटाची कथा काय हे रहस्य येथे उलगडण्यापेक्षा तो मिळवून बघणे हे जास्त सकस अनुभव देणारे आहे. जोशी की कांबळे या चित्रपटाने अनेकांच्या डोक्याला चांगल्या अर्थाने झिणझिण्या आल्या. आणि शेखर सरतांडेल प्रगल्भ दिग्दर्शक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत प्रस्थापित झाला.
शेखर सरतांडेल आणि माझी ओळख १९८९ साली झाली. ती ही रुईया नाक्यावर. त्यावेळी मी काँलेजमध्ये शिकत होतो. आणि शेखर हा प्युअर नाकाईट झालेला होता. तो मुळचा सिडनहँम काँलेजचा. तेथून बी. काँम. ची पदवी घेतल्यानंतर तो जे. जे. स्कूल आँफ आर्टस् मध्ये पार्टटाईम पेंटिंग व फोटोग्राफीच्या कोर्ससाठी दाखल झाला. तेथून त्याच्यातील विविध कलांना बहर आला. जे.जे. तसेच रुईयासाठी त्याने अनेक एकांकिका स्पर्धांना संगीत देण्याचे काम केले. त्यानंतर तो काही एकांकिकाच्या दिग्दर्शनातही गुरफटला. एखाद्या एकांकिकेत त्याने कामही केले. त्याची दोस्ती कँमेर्याशीही होतीच. नाटकाच्या माहोलमधून त्याने बाहेर पडून दुरदर्शनवर कँमेरामन म्हणूनही दीड एक वर्ष काम केले. त्यानंतर काही जाहिरात एजन्सीमध्येही कँमेरा हाताळला. मालिकांच्या काही कामातही तो गुंतला होता. तो सविस्तर तपशील इथे महत्वाचा नाही. महत्वाचे हे आहे की, शेखर स्वत:ला सतत तपासत होता. आपला अवकाश नेमका कुठे आहे याचा धांडोळा घेत होता.
त्यातूनच पुढे त्याला महेश मांजरेकर भेटले. व वास्तव, अस्तित्व, निदानसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्ये महेश यांचा चीफ असिस्टंट डायरेक्टर बनून शेखर स्वत:लाच सापडत गेला.
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची देवकी ही कथा. या चित्रदर्शी कथेवर चित्रपट बनविण्यासाठी काही मान्यवरांनी कर्णिक यांच्याकडे कथा मागितली होती. पण काही कारणाने त्या कथेवर चित्रपट होण्याचे योग येत नव्हते. शेखर सरतांडेलला ही कथा भावली. त्याने या कथेचा स्क्रीनप्ले तयार करुन तो कर्णिक यांना दाखविला. तो पाहून कर्णिकांनी अत्यंत मोकळ्या मनाने या कथेवर चित्रपट बनविण्यास शेखरला परवानगी दिली. देवकी या कथेचे शीर्षक चित्रपट बनविताना झाले निर्माल्य. मामी इंटरनँशनल फेस्टिव्हलमध्ये निर्माल्य या चित्रपटाने जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाने आणखी काही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माननीय उपस्थिती लावली. हा चित्रपट रसिकांनाही सुखावून गेला.
शेखर त्यानंतर वळला आँटिस्टिक मुले व त्यांना निगुतीने वाढविणार्या त्यांच्या पालकांच्या मनोविश्वाकडे. आँटिस्टिक मुलगा व त्याचे आईबाबा हे चित्र रंगविताना बाबा अशा मुलाची जबाबदारी कदाचित सहजी टाळू शकतो. पण आपला असा हा मुलगा वाढविण्याचे आव्हान आई पेलते व त्या मुलाला चांगले दिवस दाखविते हा गाभा असलेला माय डिअर यश शेखर सरतांडेलने दिग्दर्शित केला. तो चित्रपट पाहून अनेकांना आँटिस्टिक या विकाराचे स्वरुप खर्या अर्थाने कळले. या चित्रपटात लोकेश गुप्ते, सुखदा यश यांच्या भूमिका टची होत्या. आँटिस्टिक असलेल्या लहान मुलाचे काम अथर्व बेडेकरने केले होते. त्याच्यावर मानसोपचार करणार्याचे काम उमेश कामतने केले होते. या चित्रपटाने शेखरला अधिक प्रगल्भ दिग्दर्शकाच्या यादीत नेऊन बसविले.
शेखर सरतांडेलवर मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक व अभिनेता म्हणून जो अमीट ठसा आहे तो राजा परांजपे यांचा. त्यांच्या जगाच्या पाठीवर, ऊन-पाऊससारख्या चित्रपटांवर बोलताना शेखर अजिबात थकत नाही. राजा परांजपे हे त्याचे आवडते दिग्दर्शक हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. कारण राजाभाऊ यांचे माझ्या पत्नीच्या माहेरुन नाते आहे. त्यांच्या पुण्यातील घरी मी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा स्वर्गीय राजाभाऊंना विविध चित्रपटांसाठी मिळालेले पुरस्कार, मानपत्रे तेथे एका शोकेसमध्ये ठेवली आहेत ते पाहून मन सुखावते. राजाभाऊ यांच्या पु्ण्यातील घरात ग.दि. माडगुळकर, सुधीर फडके यांच्या मैफली होऊन अनेक गाणी लिहिली गेली आहेत. त्यांना तिथेच चाली दिल्या गेल्या आहेत. त्या सगळ्या आठवणी समोर उभ्या राहातात. शेखर जेव्हा राजाभाऊंबद्दल बोलतो तेव्हा मलाही राजाभाऊंची पुण्यातील ही वास्तू आठवायला लागते. शेखर हा उत्तम लेखकही आहे. त्याने आपल्या आयुष्यात वर्तमानपत्रासाठी पहिल्यांदाच लेख लिहिला होता तो म्हणजे दै. दिव्य मराठीसाठी. मराठी चित्रपटांना सरकारने दिलेल्या अनुदानासंदर्भातील हा परखड लेख होता.
रामदास बोट बुडाल्याच्या दुर्घटनेला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त काय लिहायचे असा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी शेखरच मदतीला धावून आला. शेखर सरतांडेलचे काका हे दर्यावर्दी हे खास मच्छिमारांसाठी मासिक चालवायचे. त्या दर्यावर्दी मासिकाने रामदास बोट बुडाल्यानंतर काही अप्रतिम लेख छापले होते. त्या जिवंत लेखांचा आधार घेऊन मी माझा लेख दै. दिव्य मराठीत लिहिला होता. व तसे लेखाखाली नमुदही केले होते.
शेखर सरतांडेल हा बोलण्यात खूप मिश्किल आहे. कधी कोणाची टोपी उडवेल सांगता येत नाही. माझीही तो कळत-नकळत गंमत करत असतो. शेखर आहे स्वभावाने उमदा...त्यामुळे तो व त्याच्या चित्रपटांबद्दल खूप उत्सुकता असते लोकांमध्ये.
शेखरबद्दल अनेक उत्तम गोष्टी सांगता येतील पण कुठेतरी थांबायला हे हवेच. शेखर आता काही दिवसांत एका महत्वाच्या प्रकल्पात सक्रिय होणार आहे. तो नेमका काय आहे हे प्रसारमाध्यमांतून आपल्याला योग्य वेळी कळेलच. शेखर तू विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेस. हे गुण तुझ्यात आलेत ते पेशाने शिक्षक असलेल्या आईवडिलांकडून. तुझे वडील नाटकात मुंबईत काम करायचे. तो कलेचा वारसा शेखर सरतांडेल याच्याकडे आलेला आहे. ती कला आता त्याच्या अंगवळणी पडली आहे.
त्यामुळे तुम्ही त्याला शेखर सरतांडेल म्हणा किंवा शेखरसर तांडेल, डोळ्यापुढे मूर्ती उभी राहाते ती एका कसलेल्या दिग्दर्शकाची...तीच ओळख तर त्याला प्रिय आहे आणि आम्हा त्याच्या फँन्सनाही... शेखरची गेली अनेक वर्षे ज्याच्याशी नाळ जुळली आहे तो रुईया काँलेजचा नाकाही या ओळखीला साक्षी आहे....त्या वास्तूलाच विचारा ती शेखरबद्दल अनेक किस्से सांगू लागेल...शेखर, तुझ्या भावी कारकिर्दीस माझ्या शुभेच्छा......
- समीर परांजपे
---------

चळवळ्या नार्वेकर (रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक चळवळ्या श्रीनिवास नार्वेकर याच्याबद्दल काहीबाही....)



चळवळ्या नार्वेकर
(रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक चळवळ्या श्रीनिवास नार्वेकर याच्याबद्दल काहीबाही....)
----
हवेत च कर आणि हवे तेच कर
अशा दोन जमाती असतात, काही तरी करु पाहाणार्यांच्या.
त्यापैकी पहिली जमात नुसती हवेतच इमले बांधत असते.
दुसरी जमात आपल्याला हवे तेच व तसेच करतानाही जमिनीशी नाते घट्ट ठेवून आपले मेणाचे किंवा शेणाचे जे काही असेल ते घर बांधते.
या हवे तेच कर जमातीमध्ये श्रीनिवास नार्वेकर मोडतो.
तो मुंबईतील गिरगावचा असला तरी वयपरत्वे सावंतवाडीमध्ये गेला...माणूस मोठा झाला की, कोकणात जातो. कोकणात तसा प्रत्येक माणूसच मोठा पण हा त्यांच्यातही मोठा...स्वकर्तृत्वाने..हे शेवटचे जास्त महत्वाचे आहे.
निखळ कलारसिक असलेल्या, सिनेमा, नाटक यांची उत्तम पारख व जाणकारी राखणार्या रमाकांत नार्वेकर यांचे हे सुपुत्र लहानपणी भयंकर भूमिकांमध्ये वावरायचे.
दरो़डेखोर, जुलुम अशा कुलदीप पवार नायक असलेल्या चित्रपटांमध्ये नायकाच्या बालपणीची भूमिका श्रीनिवासने केलेली. त्यामुळे त्या भूमिका मोठ्या होऊन किती भयंकर कामे करतात हे सांगायला नको...
पण हा लहानपणी भयंकर भूमिका करणारा मुलगा पुढे अभ्यंकर चुकलो अभयंकर झाला.
एका ध्येयाने पछाडलेला ( अखिल जगात कोकणातच सर्वात जास्त संख्येने विविध प्रकारची भूते-खेते आहेत. त्यातील कोणत्याने याला पछाडले माहित नाही.) श्रीनिवास मग सावंतवाडीच्या कर्मभूमीत विविध रंग उधळू लागला म्हणजे नाट्यरंगांबद्दल बोलतोय मी...
सावंतवावाडीला असताना त्याने तिथे अर्धवेळ वार्ताहर म्हणून पत्रकारिता केली. (आणि आता त्याच्यावर हे लिहिणारा तर अर्धवट पत्रकार आहे.)
त्यानंतर नाट्यविलास नावाची संस्था काढून एकांकिकांचा संसार मांडला. त्या एकांकिका तो वेळप्रसंगी लिहित होता. दिग्दर्शित करीत होता. किंवा इतरांनी लिहिलेल्या एकांकिकांना दिग्दर्शनाचा साज चढवत होता.
सावंतवाडीसारख्या मुंबईपासून लांब असलेल्या ठिकाणी राहून नाट्यविलास वगैरे करणे तसे सोप्पे नाही.
अस्सल कोकण्याचे स्वप्न असते मुंबईत येऊन काहीतरी करणे....
पण या श्रीनिवासला ही स्वप्ने पडली नाहीत इतका तो तिथल्या जांभा दगडाशी व लाल मातीशी एकरुप झाला होता.
नाट्यहौस पुरवता पुरवता त्याने बालरंग नावाची संस्था काढली. लहान मुलांसाठी बालनाट्ये, तसेच शिबिरे असे भले जंगी उपक्रम सुरु केले. त्यानंतर बालरंग नावाचे मासिक काढून दीड-दोन वर्षे चालविले.
त्यानंतर गुढकथा लिहिण्याचा त्याला नाद लागला. या दाढी राखणार्यांचे तसेही सगळे गुढ असते. मग तो श्रीनिवास असेल, समीर सुर्वे असेल नाहीतर नरेंद्र मोदी...ही माणसे मोठी आहेत हे आपल्याला कळत असते, पण तरीही ती आपल्यासारखीच वाटत राहातात.
श्रीनिवासला दाढी असली तरी तिच्यात तिनका वगैरे काही नाही. सगळे सरळसोट...कोकणी माणूस...काय होणार दुसरे? गुढकथा लिहिण्यात प्रगती इतकी की त्याचे पुस्तक आले. रत्नाकर मतकरी खुश या कथांमुळे श्रीनिवासवर....
त्यानंतर त्याची नऊ इ-बुक्स आली. बुकगंगा यांनी दोन प्रकाशित केली तर विक्रम भागवत यांच्या सृजन पोर्टलवर ७ इ-बुक्स प्रसिद्ध झाली आहेत आजवर त्याची....श्रीनिवासला कार्यकर्ता तसेच लेखक म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. धडपड्या रंगकर्मीचा असा गौरव होणे उचितच असते. वर्तमानपत्र, मासिके, इ-मासिकांमधून जागतिक चित्रपट, राजकीय-सामाजिक विषयांवर श्रीनिवासने सटायरिकल स्तंभ लेखन केले आहे. त्याने लोकमत वृत्तपत्रात चालविलेल्या सदराचे सृजन'तर्फे इ-बुक प्रकाशित झाले.
कविता, साहित्य सर्वांपर्यंंत पोहोचावे यासाठी अभिवाचनाचे कार्यक्रमही करतो तो...
असे बरेच काही त्याच्या पोतडीत आहे. अरे हो सांगायचे राहिले जादूगार बनून त्याने जादूचे खेळही रसिकांसमोर सादर केले होते....
त्याच्या पोतडीत काय काय आहे याचा सगळाच तपशील इथे सांगत बसत नाही...त्यातील आशय व विषय महत्वाचा...
हा दाढीवाला मला २००२ सालानंतर भेटायला लागला. दादर पूर्वेच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मी काहीबाही वाचायला जायचो. तर तिथे श्रीनिवास खूप सारे वाचत बसलेला असायचा.
रामायण मालिकेतील साधूची भूमिका करणारा कलाकार रोज ग्रंथसंग्रहालयात येऊन बसतो असे त्यावेळी मी कोणाला तरी सांगितले होते.
संघर्षाचे दिवस असूनही त्याबाबत कधीच कटुता दिसली नाही त्याच्या तोंडी...
कोकणी माणूस...सहनशील असणारच...
मुद्दा हा की, आपल्या अटीवर तो नाटके, एकांकिका, चित्रपट, मालिका करीत राहिला....तद्दन व्यावसायिक होणे, पाणी घालून कलाकृती पातळ करणे त्याला जमले नाही....म्हणून मोठे यश जे व्यावहारिक दुनियेला हवेहवेसे वाटते ते मिळण्यास वेळ लागतोय याची त्याला खंतही नाही.
मस्तमौला आहे तो....
त्याची अलीकडेच गाजलेली मालिका म्हणजे भेटी लागी जीवा
त्याच्याशी गप्पा मारताना तो अशा काही जीवघेण्या गप्पा मारतो की त्या भेटीत या गोष्टी मनाला लागतातच...
त्याला सिनेमा, नाटक, मालिंकामधील खोटेपणाची चीड आहे. तो कोकणी माणूस म्हणजे गुणसूत्रांमधूनच घेऊन आलेल्या वैशिष्ट्याप्रमाणे चळवळ्या असल्याने सतत नाटकाविषयी वेगळा विचार करत बसतो. सध्या आवाजाची संस्कृती सर्वांना नीट कळावी व त्यांनी ती अंगिकारावी म्हणून व्हाँइस कल्चरचे उत्तम प्रशिक्षणवर्गही घेतो...
मेडिकलपासून ते लिगल पर्यंत अनेक कंपन्यांच्या मजकूराचा अनुवाद करणे, अनेक जाहिरातींसाठी काँपीरायटिग करणे हे कुटिरोद्योग चालू असतात जगण्यासाठी ज्या दिडक्या लागतात त्यासाठी...महाराष्ट्रातील जे इंग्रजीतून मराठी किंवा मराठीतून इंग्रजी सहजसुंदर अनुवाद करणारे अव्वल दर्जाचे अनुवादक आहेत त्यात हे नार्वेकर महाशय आहेत. सध्या महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता वृत्तपत्रात अनेक बिल्डिंग प्राँजेक्टच्या जाहिराती येतात. त्यात त्या प्रकल्पांचा माहिती देणारा सुंदर मजकूर असतो. त्या मजकुराचे लेखन म्हणजे काँपीरायटिंग श्रीनिवासनेच केलेले असते.
बाकी उरलेला वेळ त्याचा कुटीलउद्योगात जातो. ते म्हणजे चित्रपट, नाटक. मालिका वगैरेंचे लेखन करण्यात...
त्याच्या आजवरच्या वाटचालीतील महत्वाचे मार्गदर्शक म्हणजे नाटककार प्र. ल. मयेकर...मुंबईच्या व्यावसायिक कलाक्षेत्रात नार्वेकरांचा श्रीनिवास नंतर कधीतरी प्रवेशता झालाच असता पण मयेकरांमुळे त्याचा हा प्रवेश लवकर झाला. मयेकरांबद्दल बोलताना तो हरखून जातो....ते त्याच्या डोळ्यातही दिसते.
एकांकिका, नाटक, चित्रपट, मालिका अशी विविध माध्यमे हाताळणारा श्रीनिवास नार्वेकर हा तत्ववादी आहे. त्यामुळेच त्याला परखडपणाचे वैभव लाभले आहे. त्या बळावरच ज्ञान मिळवून तो जागतिक चित्रपटांविषयी काँलम लिहू शकतो. असे दोन-तीन काँलम त्याने आधी वर्तमानपत्रात लिहिले आहेत.
अशा अनेक गोष्टी एकाचवेळी करुनही तो मनाने जितका नाटकाचा राहिला आहे. तेवढाच मालिका. चित्रपटांचाही राहिला आहे. चळवळ्या श्रीनिवास नार्वेकरला स्वस्थ बसवत नाही. अकाली पांढरी झालेली दाढी, डोक्यावरचे पांढरे केस यामुळे तो खूप स्काँलर वाटतो. मला बोलायला भ्या वाटते आणि त्याच्या विषयी अधिक लिहायला....
पण श्रीनिवास तू असाच चळवळ्या राहा...कारण असे लागते कुणीतरी धाक दाखविणारे...
तुझे उत्कर्षाचे दिवस आता सुरु झालेत (त्याच्या सहचारिणीचे नाव उत्कर्षा असे आहे). त्याची पत्नी डॉ. उत्कर्षा बिर्जेचे त्याच्याविषयीचे खास मत तिने ही पोस्ट वाचल्यानंतर दिले ते असे `ऑलटाईम परफ़ॉर्मर आहे तो ! कथा कविता गीत संगीत चित्र शिल्प ...काही असूदे त्याला रंगमंचीय अविष्कारच दिसत असतो !(तोही गिमिक्स विरहित !!)...पंतप्रधानांना पत्र ,Hana ची सूटकेस यांची रंगावृत्ती... कोकणी कवितांवर सादर केलेले रंगाविष्कार , voice culture .. यातली त्याची 'व्हिजन' मीही सहकर्मी म्हणून अनुभवलीय...अनुभवतेय म्हणून सांगावं वाटलं इतकंच !`. श्रीनिवासला या उत्कर्षांच्या दिवसात अधिक यश त्याच्या कामाच्या मेहनतीतून नक्कीच मिळणार यात शंकाच नाही.
श्रीनिवास तू आहेस तसाच मला आवडतोस. अशीच नाटके करत राहा...म्हणजे नाटकी वागणार्यांना त्यात कोणतीही भूमिका मिळणार नाही....चळवळ्या नार्वेकर असे तुला गावात म्हणत असतील...ते मी तुला इथे म्हणून घेतो. तुला शुभेच्छा.
- समीर परांजपे

Sunday, November 9, 2014

जातिव्यवस्थेचे आंतरविच्छेदन - दै. दिव्य मराठीच्या ९ नोव्हेंबर २०१४च्या अंकातील रसिक पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख.





ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ हिरा सिंग यांच्या रिकास्टिंग कास्ट : फ्रॉम द सेक्रेड टू द प्रोफेन या पुस्तकाची समीक्षा मी दै. दिव्य मराठीच्या ९ नोव्हेंबर २०१४च्या अंकातील रसिक या रविवार पुरवणीत केली होती. त्या लेखाची टेक्स्ट वेबलिंक, जेपीजी फाईल व त्या पानाची वेबलिंक सोबत दिली आहे. तो लेखही खाली दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-article-on-book-revie…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/09112014/0/4/
--------
जातिव्यवस्थेचे आंतरविच्छेदन
---
- समीर परांजपे
sameer.p@dbcorp.in
---
जातिव्यवस्था हे हिंदू धर्माचे व्यवच्छेदक लक्षण ठरले आहे. जातींमुळेच हिंदू धर्मातील एकजीवत्वाला तडे गेलेले आहेत. सहिष्णू म्हणून गौरवल्या जाणा-या हिंदू धर्मात जातिव्यवस्थेमुळे जे सामाजिक, आर्थिक, राजकीय, वैचारिक स्तर निर्माण झाले, त्यामुळे धर्मात एक प्रकारचा ताठरपणा आला आहे. त्यातून हिंदू धर्मात कट्टरपंथी, समाजविद्वेषी विचारांनाही धग मिळाली आहे. जातिव्यवस्थेच्या या विविध पैलूंचे योग्य प्रकारे आंतरविच्छेदन ‘रिकास्टिंग कास्ट : फ्रॉम द सेक्रेड टू द प्रोफेन’ या पुस्तकात करण्यात आले आहे. हे पुस्तक लिहिणारे हिरा सिंग हे ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ आहेत. कॅनडातील टोरंटो येथील यॉर्क विद्यापीठामध्ये समाजशास्त्र हा विषय शिकवितात. त्यांनी याआधी दिल्ली विद्यापीठ, तसेच कॅनडातील विलफ्रिड, व्हिक्टोरिया, न्यू ब्रुन्सविक या विद्यापीठांमध्येही समाजशास्त्र विषयाचे अध्यापन केले आहे. जमिनीवरील हक्क व राजकीय सत्ता नेमकी कोणाकडे असावी, हे ठरविण्याच्या संघर्षातून जातिव्यवस्थेचा उगम झालेला आहे, असा हिरा सिंग यांचा दृष्टिकोन आहे. तर मुख्य प्रवाहातील समाजशास्त्रज्ञ हे जातिव्यवस्थेचा अभ्यास करताना हिंदू धर्मातील धार्मिक रूढी, परंपरांवर अधिक भर देतात. आंतरजातीय असमानता त्यांना फार महत्त्वाची वाटत नाही. नेमकी याच ठिकाणी हिरा सिंग यांच्या वेगळ्या प्रतिपादनास सुरुवात होते. जातिव्यवस्थेची पाळेमुळे आर्थिक आणि राजकीय अनुक्रमाच्या पार्श्वभूमीवर तपासून घेणे आवश्यक आहे. जातिव्यवस्था ही हिंदू धर्माची निर्मिती नाही, असे ठोस प्रतिपादन या पुस्तकात करून हिरा सिंग मुख्य प्रवाहातील समाजशास्त्रज्ञांच्या मतांना सुरुंग लावू पाहतात. आपले समान वर्गहित साध्य होत नसेल, तर एखाद्या जातसमूहातील लोक नीटसपणे संघटित होताना दिसत नाहीत. मात्र विविध जाती, तसेच उपजातींतील लोक आपले वर्गहेतू साध्य होत असतील तर राजकीयदृष्ट्या तुलनेने लवकर संघटित होताना दिसतात. अशा सामाजिक वर्तनामुळे जातींमधील जागृती ही वर्गजागृतीचेच दुसरे रूप असते, हा भारतात बाळगण्यात येणारा समज खोटा ठरतो. या पुस्तकामध्ये (१) जातींचा अभ्यास - संकल्पना, भौतिक स्थिती आणि इतिहास (२) पुरोहित आणि राजा : स्थिती आणि सत्तेतील गैरव्यवस्था (३) वर्ण ते जात : राजकीय, आर्थिक, धार्मिक वाटचाल (४) जात आणि तळागाळातील समाजाचा अभ्यास - अभिजन वर्गाची विचारसरणी (५) भूमी, जात, वंश यांच्या दृष्टिकोनातून जातींमधील असमानता (६) करारनामा, धर्म आणि जात - हिंदू धर्म आणि जातीविषयीची दोन मिथके अशी एकूण सहा प्रकरणे आहेत. त्यातून हिरा सिंग यांनी आपली वैचारिक मांडणी केली आहे.
जात म्हणजेच वर्ग, अशी मांडणी डाव्या विचारांच्या समाजशास्त्रज्ञांकडून होत असली तरी त्यातून काही ठोस हाती लागेल, असे हिरा सिंग यांना वाटत नाही. जात हा भारतीय समाज व इतिहासासाठी महत्त्वाचा घटक आहे. या विषयावर बुर्झ्वा तसेच स्युडो डाव्या विचारवंतांनी उदंड चर्चा केली आहे. मात्र जातीविषयी मुख्य प्रवाहातील समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या विश्लेषणाला हिरा सिंग यांनी सैद्धांतिक किंवा तात्त्विकतेचे लेबल लावलेले नाही. हिरा सिंग या संदर्भात असे म्हणतात की, ऐतिहासिक जडवाद व द्वंद्वात्मकता यांचा सिद्धांत मार्क्स व एंगल्सने मांडला. त्याच्या आधारे श्रमिक वर्गाने क्रांतिकारी आचरण कसे करावे, याचे विश्लेषण ‘कम्युनिस्ट पक्षाच्या जाहीरनाम्यात’ या दोघांनी केलेले आहे. या विश्लेषणावर विचारवंतांनी चौफेर हल्ले चढविले. मार्क्सच्या विचारांचा जगभरातील श्रमिकवर्गात होणारा प्रसार रोखता न आल्याने, या विचारवंतांनी मार्क्सच्या विचारांना आतून सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले. त्यासाठी बुर्झ्वा विचारवंतांनी काही सैद्धांतिक संकल्पनांचा आधार घेतला होता.
जातिव्यवस्थेविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या विचारांतही मूलभूत फरक होताच. या दोन महापुरुषांच्या जातीविषयक दृष्टिकोनापेक्षा डाव्या विचारवंतांचे विश्लेषण हे अगदी निराळे आहे. हिंदू धर्म जिवंत राहण्यासाठी जातव्यवस्था आवश्यक ठरत गेली, अशी मांडणीही काही उजव्या विचारवंतांनी केली. हिरा सिंग यांना उजव्या विचारवंतांची ही विधाने मान्य नाहीत. हिंदू धर्म हा जातींना जन्म किंवा पुनर्जन्म देऊ शकत नाही, असे हिरा सिंग यांना वाटते. वर्गाचा अंत केल्याशिवाय जातीचा अंत होणार नाही, अशी धारणा या पुस्तकात प्रकट होताना दिसते. राजकीय, आर्थिक, धार्मिक अधिकारांचे असमान वाटप ही कल्पनारम्यता आहे. जाती व वर्गाची आर्थिक पाळेमुळे व त्यांचे राजकीय महत्त्व हे ओळखूनच भारतीय समाजाचा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक स्रोतांचे जात व वर्गांना असमान वाटप झाले आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर मध्यमवर्गीयांच्या जाणिवांचा अंत म्हणजे जातिव्यवस्थेचा अंत नाही. त्यामुळे जातिव्यवस्थेचा अंत हा घटक मानसिक नसून ती भौतिक घटना आहे, हे मार्क्स व एंगल्सचे विधान हिरा सिंग यांना पटत नाही.
मार्क्सवादाची एक तात्त्विक बाजू अशी आहे की, जी बहुतांश डावे विचारवंत लक्षात घेताना दिसत नाहीत, किंवा त्या पैलूला फार महत्त्व देत नाही. उत्पादन तसेच त्याच्याशी संबंधित प्रक्रियेमध्ये श्रम‌विभागणीच्या दृष्टिकोनातून जातिव्यवस्था ही वैचारिक अभिव्यक्तीचे रूप घेते. त्यामुळे सरंजामशाही समाजामध्ये जातिव्यवस्थेचा प्रश्न सोडविणे हे वाटते तितके सोपे काम नाही. मार्क्सच्या विचारांमधील ही जाणीव डाव्या विचारवंतांनी लक्षात न घेतल्यानेच त्यांनी जात व वर्ग यांचा अन्योन्यसंबंध लावण्यात नेहमीच गल्लत केली आहे, असा नेमका सूर हिरा सिंग यांनी या पुस्तकात लावला आहे. वर्ग हा सामाजिक संबंधांचा भाग असतो. त्यात उत्पादनविषयक सामाजिक संबंधही गुंतलेले असतात. वर्ग आणि वर्गसंघर्ष हा पूर्णपणे आर्थिक स्वरूपाचा असतो. मॅक्स वेबरने वर्ग, स्थिती, पक्ष यांचे सुंदर वर्गीकरण आपल्या लिखाणात करून ठेवले आहे. जात हा वर्गाच्या विरोधात उभा ठाकलेला घटक आहे, असे त्याचे मत आहे. वर्गसंघर्ष हा सामाजिक प्रश्नांपेक्षा आर्थिक स्वरूपाचा अधिक असतो. फ्रेंच राज्यक्रांती तसेच इंग्लंडमधील चळवळी या वर्गसंघर्षांचा परिपाक होत्या. ब्रिटिशांच्या गुलामीत असलेल्या भारतातील संस्थानांमध्ये १९१० ते १९४० या कालावधीत झालेल्या शेतक-यांच्या चळवळी या आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्वरूपाच्या होत्या. हे शेतकरी जमिनीसाठी, राजकीय प्रतिनिधित्वासाठी, उच्च सामाजिक दर्जासाठी, तसेच सांस्कृतिक समानतेसाठी चळवळी करीत होते. जात व वर्ग यांच्या भौतिक व प्रतीकात्मक सीमारेषा नष्ट करण्यासाठी या सामाजिक चळवळी झाल्या. ही सर्व वस्तुस्थिती लक्षात घेतली की, जात-धर्म यांच्यातील अन्योन्यसंबंध तसेच जातिअंताचा विचार सुस्पष्टपणे वाचकासमोर येतो. जातिव्यवस्थेची यापूर्वी पुरेशी न आकळलेली ही रूपे जाणून घेण्यासाठी हिरा सिंग यांचे हे पुस्तक आवर्जून वाचायलाच हवे.
* पुस्तकाचे नाव - रिकास्टिंग कास्ट : फ्रॉम द सेक्रेड टू द प्रोफेन
* लेखक - हिरा सिंग
* प्रकाशक - सेज पब्लिकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड
* पृष्ठसंख्या - २८७
* मूल्य - ७९५ रुपये

Sunday, August 24, 2014

कोंडीत सापडलेले शरीफ सरकार ! - दै. दिव्य मराठीच्या २४ अाॅगस्ट २०१४च्या रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद झालेला लेख.



पाकिस्तानातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करणारा मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या २४ अाॅगस्ट २०१४च्या रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाची लिंक व टेक्स्ट पुढे दिले आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/.../MAG-article-on...
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/.../244/24082014/0/4/


------------
कोंडीत सापडलेले शरीफ सरकार !
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-------
पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ (पीएमएल-एन) या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळून त्या पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ पंतप्रधानपदी विराजमान झाले. ही पहिलीच निवडणूक अशी होती की, आधी पाच वर्षे कारभार केलेल्या सरकारने लोकशाही मार्गाने नव्या सरकारकडे सत्तासूत्रे सोपविली. शरीफ यांचा विजय डोळ्यात खुपणारे दोन असंतुष्ट आत्मे पाकिस्तानात सध्या धुमाकूळ घालत आहेत. त्यातील एक आहे पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचा प्रमुख व माजी क्रिकेटपटू इम्रान खान व दुसरे आहेत पाकिस्तानी अवामी तहरीक (पीएटी) या पक्षाचे प्रमुख मौलवी ताहिर-अल- काद्री.
शरीफ यांना सत्तास्थानावरून हुसकावून पाकिस्तानला ख-या अर्थाने ‘आझादी’ मिळवून देण्यासाठी पीटीआय व पीएटी या दोन पक्षांनी स्वतंत्रपणे दोन मोर्च्यांचे आयोजन केले होते. त्यामुळे इस्लामाबादमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती कायम राहण्यासाठी ते शहर लष्कराच्या ताब्यात गेल्या 1 ऑगस्टपासून पुढील तीन महिने देण्याचा निर्णय नवाझ शरीफ सरकारने घेतला होता. त्याची निर्भर्त्सना पाकिस्तानी पीपल्स पार्टी (पीपीपी) या प्रमुख विरोधी पक्षाने केली होती. नवाझ शरीफ यांच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी गेल्या 18 ऑगस्टपासून पाकिस्तानातील सर्व विरोधी पक्ष व नागरिकांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करावी, असे आवाहन इम्रान खान याने केले होते. पण त्याचा पक्ष वगळता पाकिस्तानातील एकाही विरोधी पक्षाने त्याला प्रतिसाद न दिल्याने इम्रान खान एकाकी पडला. त्यातच आपले स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी इम्रान खान राज्यघटनेचा भंग होईल अशी कृत्ये करण्यासाठी पाकिस्तानी जनतेला भडकवत आहे, असा आरोप पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी करून इम्रान खान याला अपशकून केला होता. मौलवी ताहिर-अल-काद्री हे नवाझ शरीफ यांचे एक महत्त्वाचे विरोधक. त्यांचे वास्तव्य असते कॅनडामध्ये, पण ते सध्या पाकिस्तानमध्ये परत आले आहेत. त्यांच्या पीएटी पक्षाचे चौदा कार्यकर्ते लाहोर पोलिसांबरोबर जून महिन्यामध्ये झालेल्या चकमकीत ठार झाले होते. या कार्यकर्त्यांचा खून केल्याच्या आरोपावरून नवाझ शरीफ यांना अटक करण्यात यावी व शरीफ यांची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी करून पाकिस्तानात हंगामी सरकार स्थापन करण्यात यावे, अशी मागणी या काद्री महाशयांनी केली होती. या संदर्भात न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणी प्रसंगी लाहोर सत्र न्यायालयाने पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांचे बंधू व पंजाबचे मुख्यमंत्री शहाबाझ व अन्य 19 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याला लाहोर उच्च न्यायालयात पंजाब सरकारने आव्हान दिले आहे. दुस-या बाजूस आपले उद्योगसाम्राज्य विस्तारण्यासाठी नवाज शरीफ हे राष्ट्रीय संपत्तीचा गैरवापर करत आहेत, असा इम्रान खानने आरोप केला. 2013मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनेक गैरप्रकार करून नवाझ शरीफ यांनी विजय मिळवला असल्याचा आक्षेप इम्रान खान व मौलवी ताहिर-अल-काद्री हे वारंवार घेत असून शरीफ सरकारविरोधात दोघांनीही 14 ऑगस्ट रोजी लाहोरपासून इस्लामाबादच्या दिशेने दोन स्वतंत्र मोर्चे काढले. 17 ऑगस्ट रोजी हे मोर्चे इस्लामाबादमध्ये धडकले. जितका गाजावाजा झाला होता तितक्या प्रचंड संख्येने दोन्ही पक्षांचे समर्थक आपापल्या मोर्च्यांत सहभागी झाले नव्हते. इम्रान खान याच्या पीटीआय पक्षाचा मोर्चा लाहोरहून निघाल्यावर इस्लामाबादच्या दिशेने येत असताना पंजाब प्रांतातील गुजरनवाला या भागात नवाझ शरीफ यांच्या पीएमएल(एन) या पक्षाच्या सुमारे 400 पक्ष कार्यकर्त्यांनी या मोर्चावर दगडफेक केली, तसेच इम्रान खान याच्या गाडीच्या दिशेने गोळीबारही केला. या घटनेचाही इम्रान खान याने शरीफविरोधी वातावरण तापवण्यासाठी व्यवस्थित उपयोग करून घेतला होता. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) व पाकिस्तानी अवामी तहरीक (पीएटी) या दोन्ही पक्षांना पाकिस्तानी जनतेमध्ये फारसा पाठिंबा नाही. इम्रान खान आपला राजकीय दबदबा वाढविण्यासाठी गेली काही वर्षे प्रयत्नशील आहे, पण त्याला त्यात यश आलेले नाही. मौलवी ताहिर-अल-काद्री यांचीही तीच कथा आहे. नवाझ शरीफ यांना सत्तेवरून घालविणे वाटते तितके सोपे नाही. आपल्या राजकीय कारकीर्दीतील पूर्वीच्या टप्प्यात केलेल्या चुका पुन्हा न करण्याचे राजकीय शहाणपण शरीफ यांनी गेल्या एक वर्षात दाखविले आहे. पाकिस्तानी लष्कराशी वितंडवाद होईल इतकी परिस्थिती ताणू न देता ते सावधपणे आपला कारभार हाकत आहेत. भारत-पाकिस्तानचे संबंध फारसे सलोख्याचे नसल्याबद्दल नवाझ शरीफ यांनी अलीकडेच पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये बोलताना खंत व्यक्त केली होती. हे संबंध सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत, असेही ते म्हणाले होते. पाकिस्तानात सत्ता हाती असलेले पक्ष भारताशी सलोखा राखण्याची भाषा करतात व ज्यांना सत्ता मिळवायची असते ते भारतद्वेषाची भाषा करून पाकिस्तानी जनमानस भडकावतात, असा आजवरचा अनुभव आहे. नवाझ शरीफ हे विरोधात असताना त्यांनीही भारताविरोधात विखारी प्रचार केला होता. असे वर्तन करणा-यांत बेनझीर भुत्तो, आसिफ अली झरदारी यांचाही समावेश आहे. इम्रान व काद्री हेही आपल्या भाषणांना भारतविरोधाची फोडणी देण्यास चुकलेले नाहीत. नवाझ शरीफ सरकार हे भारताच्या कलाने वागते, असा आरोपही इम्रान खान याने अलीकडेच केला होता!
पाकिस्तानमध्ये समोरासमोर युद्ध करण्याची हिंमत नसल्यानेच त्याने भारताविरुद्ध छुपे युद्ध आरंभले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केला. कारगिलच्या दौ-यादरम्यान त्यांनी केलेल्या भाषणातील हे वक्तव्य आहे. त्यानंतर काही दिवसांतच काश्मीरमधील फुटीरतावादी गटांच्या नेत्यांची पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी भेट घेतली होती. त्याचा निषेध म्हणून भारत-पाकिस्तान या देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये 25 ऑगस्टपासून सुरू होणारी चर्चा भारताने रद्द केली. त्यामुळे नवाझ शरीफ यांच्यापुढील समस्यांमध्ये आणखी भर पडली आहे. प्रसारमाध्यमे जितका बागुलबुवा करत आहेत तितकी नफरत नवाज शरीफ यांच्याविषयी आज तरी पाकिस्तानी जनतेत दिसत नाही, हे वास्तव आहे. इम्रान खान व मौलवी ताहिर-अल-काद्री यांचा उल्लेख पाकिस्तानच्या राजकीय अवकाशातील अशनी, असा केला जातो. त्यांनी पाकिस्तानच्या राजकीय भूमीवर जोरदार टक्कर देऊन आपले मोठे राजकीय नुकसान होऊ नये, यासाठी नवाझ शरीफ काही डावपेच लढवत आहेत. दुस-या बाजूस पाकिस्तानचे भारताशी संबंध आणखी ताणले जाऊ नयेत, म्हणून शरीफ यांना सतर्कही राहावे लागणार आहे. नवाझ शरीफ यांच्यापुढील ही आव्हाने खचितच सोपी नाहीत.

Saturday, August 16, 2014

डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांच्या आधारेच पुढची वाटचाल - डाॅ. हमीद दाभोलकर - शब्दांकन - समीर परांजपे. - दै. दिव्य मराठी- १७ अाॅगस्ट २०१४. रसिक पुरवणी.



पुरोगामी महाराष्ट्राने स्वत:चे तोंड काळे करावे, अशी क्रूर घटना 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात भरदिवसा घडली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली! या घटनेला येत्या बुधवारी एक वर्ष पूर्ण होईल. डॉ. दाभोलकर यांच्या नसण्याने या वर्षभराच्या कालावधीत आपण नेमके काय गमावले, याचा ताळेबंद मांडत आहेत त्यांचे सुपुत्र डॉ. हमीद दाभोलकर. या लेखाचे शब्दांकन मी केले अाहे. डॉ. दाभोलकरांचे व्यक्तित्व व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील स्वानुभव यांचा ऊहापोह करणारी अंनिस चळवळीचे एक प्रणेते प्रा. श्याम मानव यांची मुलाखत आणि दाभोलकरांच्या हत्येमुळे अंनिस चळवळीचे भवितव्य आता काय असेल, याबद्दल लिहिते झाले आहेत अविनाश पाटील. या सर्व लेखांच्या लिंक्स व डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विषयीच्या लेखांचे रसिक पुरवणीचे पहिले पान यांची जेपीजी फाईल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-articles-on-death-annieversary-of-dr-4715053-PHO.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/17082014/0/1/
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-about-anis-divya-marathi-rasik-4715108-NOR.html
---
विचारांच्या आधारेच पुढची वाटचाल

------
डॉ. हमीद दाभोलकर | Aug 17, 2014, 05:00AM IST
---------
डॉ. नरेंद्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली! या घटनेला येत्या बुधवारी एक वर्ष पूर्ण होईल. दाभोलकर यांची हत्या झाल्याच्या घटनेला येत्या बुधवारी, 20 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होईल. डॉ. दाभोलकर यांच्या नसण्याने आम्ही कुटुंबीय, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), साधना अशा आमच्या सर्वच परिवाराने नेमके काय गमावले, याचा शोध घेत असताना काही गोष्टी समोर येतात. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व हे समाजकेंद्री होते. त्यांच्या कुटुंबातील माणसे असोत वा कार्यकर्ते; ही सारी माणसे डॉक्टरांशी समाजकेंद्री दृष्टिकोनातून जोडलेली होती. आपला फुरसतीचा वेळ कुटुंबीयांसाठी द्यावा, असे डॉ. दाभोलकरांचे प्रयत्न असायचे. पण गेली 25 वर्षे ते महाराष्ट्र अंनिस, साधना व अन्य चळवळींच्या कामात इतके गुंतलेले असायचे की, त्यांना हे फारसे शक्य होत नसे. गेल्या काही वर्षांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्र अंनिस व साधनामध्ये कामे पुढे नेऊ शकणारी सक्षम दुसरी फळी निर्माण केली होती. त्यामुळे आता त्यांना थोडे फुरसतीचे क्षण मिळतील, असे आम्हाला वाटत होते. वडील-मुलगा, वडील-मुलगी, पती-पत्नी अशा नात्यांमध्ये डॉ. दाभोलकर आता आमच्या वाट्याला अधिक येतील, असेही दिसू लागले होते. तसा बदल घडविण्यासाठी त्यांचेही जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू होते. पण त्यांच्या हत्येमुळे दाभोलकर कुटुंबीयांच्या वाट्याला अधिक वेळ देऊ इच्छिणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आता आम्ही कायमचे गमावले आहेत, ही खंत यापुढे कायमच राहील. डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून असंख्य माणसे प्रसंगी स्वत:च्या जिवाला धोका पत्करून आम्हा कुटुंबीय व चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी गेली पंचवीस वर्षे जे सुसंघटित काम उभे केले, त्याचीच ही फलश्रुती होती. या कार्यकर्त्यांच्या आधारामुळे डॉ. दाभोलकरांचे नसणे सहन करण्याचे बळ येते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर आम्हाला समाजातील प्रवृत्तींची तीव्र टोके अनुभवायला आली. सध्या समाजातील वातावरण कलुषित झालेले आहे. धर्माच्या नावावर जातीय शक्ती अधिकाधिक संघटित होताना दिसत आहेत, तर दुसर्‍या बाजूला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून असलेले सत्ताधारी शासक धर्मांध शक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास कचरत आहेत. राज्यघटनेतील तत्त्वांना अनुसरून विवेकवादाने वागण्याचा आग्रह धरणार्‍यांची गळचेपी कशी होईल, हे जास्तीत जास्त पाहिले जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी गेली 25 वर्षे महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून अथकपणे प्रयत्न केले. त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साधना परिवाराला मोठा धक्का बसणे हे साहजिकच होते. मात्र त्यामुळे आमची चळवळ खचली नाही.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंनिस या सगळ्यातून सावरली. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा झालाच पाहिजे, यासाठी आम्ही गेल्या वर्षभराच्या काळात अधिक जोमाने चळवळ चालविली. त्याच्या परिणामी या राज्यात आता तसा कायदा अस्तित्वात आला आहे. असाच कायदा राष्ट्रीय स्तरावर व्हायला हवा, अशासाठीही आम्ही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंनिससह ज्या चळवळी उभ्या केल्या, त्यामध्ये सर्व निर्णय हे लोकशाही पद्धतीने होत असत. सामूहिक नेतृत्वाची संकल्पना त्यांनी या चळवळींमध्ये राबविली होती. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या नंतरही या चळवळींचे कार्य व्यवस्थितपणे सुरू आहे. याचे कारण या चळवळींना त्यांच्या विचारांचा भक्कम पाया आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही काही स्वयंसेवी संस्था नाही. स्वयंसेवी संस्थांमध्ये अनेकदा एकखांबी तंबू असतो. मुख्य प्रवर्तक गेल्यानंतर या संस्थांमध्ये फूट पडते किंवा त्यांचा हळूहळू अस्त व्हायला सुरुवात होते.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतरच्या एक वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र अंनिस वा साधनाबाबत असे काहीही घडलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या चळवळींमध्ये जी सामूहिक नेतृत्वाची संकल्पना रुजविली, त्यामुळेच पुढच्या फळीचे कार्यकर्ते तयार झाले व त्यांच्याच बळावर महाराष्ट्र अंनिससह आमच्या इतर संस्था भविष्यातील वाटचाल करणार आहेत. महाराष्ट्रातील चळवळींच्या इतिहासातील ही वेगळी घटना असून त्याच्याकडे सामाजिक विश्लेषकांनी जितके लक्ष द्यावे तितके दिलेले दिसत नाही. सामाजिक चळवळी यशस्वी होण्याच्या दृष्टीने सभोवताली तसा व्यापक राजकीय अवकाश असणेही आवश्यक असते. पण सध्याची दुरवस्था ही आहे की, हा राजकीय अवकाश आक्रसत चालला आहे. चळवळींच्या दृष्टीने ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. 1970-80च्या कालखंडात सामाजिक चळवळींचे स्वरूप, त्याविषयीचे आकलन श्रेष्ठ दर्जाचे होते. चळवळींमध्ये झोकून काम करण्यासाठी मध्यमवर्गातून अनेक जण पुढे यायचे. आपली आयुष्यं त्यांनी या कार्याला वाहून घेतली होती. पण सध्या असे चित्र दिसत नाही. समाजातील मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग व अन्य घटकांची सामाजिक चळवळींविषयीची जाणीव कमी झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सामाजिक चळवळी चालविताना अनेक अडचणी उभ्या राहतात.
डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे, ‘सामाजिक कार्य करताना उभ्या राहिलेल्या अडचणींमुळे अस्वस्थ होऊ नका. या अडचणी ही आपले सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी मिळालेली सुसंधी आहे, असे समजून त्यांच्यावर मात करा व पुढे जात राहा.’ डॉ. दाभोलकर यांच्या या विचारांना अनुसरूनच आम्ही आमचे काम सुरू ठेवले आहे व भविष्यात ते अधिक विस्तारणार आहोत. महाराष्ट्र अंनिस ही महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यांत विस्तारलेली असून तिचे कार्यकर्ते समाजाच्या तळागाळातून आलेले आहेत. डॉ. दाभोलकरांच्या मार्गदर्शनाखाली काही जिल्ह्यांमध्ये अंनिसचे उत्तम नेतृत्व तयार झाले आहे. अंनिसचे काम हे केवळ बुवाबाबांची ढोंगे उघडकीस आणणे इतकेच नसून समाजाला विवेकवादाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणे, हा आमच्या कामाचा आत्मा आहे. त्याच तत्त्वाच्या आधारे गेली 25 वर्षे वाटचाल करीत आलेली अंनिसची चळवळ यापुढेही त्याच मार्गाने जाणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यामध्ये भरदिवसा हत्या झाली. जिथे हत्या झाली तेथपासून 50 फुटांच्या अंतरावर दोन पोलिस ठाणी आहेत. दाभोलकरांच्या हत्येनंतरच्या पहिल्या चोवीस-अठ्ठेचाळीस तासांत पोलिसांनी तपासात खूपच ढिलाई दाखविली. नाकाबंदी नीटप्रकारे करण्यात आली नाही. या गोष्टींचा परिणाम डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर नक्कीच झालेला आहे. ही दुर्दैवी घटना घडून एक वर्ष पूर्ण होत आले तरी अजून आरोपी सापडू शकलेले नाहीत. डॉ. दाभोलकरांची हत्या ही वैचारिक हत्या होती. एका सामाजिक कार्यकर्त्याचा विचार संपविण्यासाठी केले गेलेले हे कृत्य होते, हे लक्षात ठेवून महाराष्ट्रातील पोलिसांनी तपास करायला हवा होता; तसा तो झाला नाही. आता या हत्या प्रकरणाची सूत्रे सीबीआयकडे आहेत. मात्र सीबीआयदेखील विशेष लक्ष देऊन तपास करण्यापेक्षा अन्य गुन्ह्यांचा जसा तपास केला जातो त्याच पद्धतीने काम करताना दिसत आहे. त्याबद्दल समाजातून ज्या पद्धतीने तीव्र प्रतिक्रिया उमटायला पाहिजे, तशी ती आता दिसेनाशी झाली आहे.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर जो जनक्षोभ उसळला होता, त्याचे अस्तित्व काही महिने जाणवत राहिले होते. पण अनेक गोष्टी काही काळाने विस्मृतीत घालविण्याची आपल्या समाजाला सवय आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे प्रकरणही समाज विसरत चालला आहे का, असे वाटण्यासारखी सध्या स्थिती आहे. डॉक्टरांची हत्या करणारे मारेकरी अजून कसे सापडत नाहीत, याबाबत समाजाने सत्ताधार्‍यांवर प्रचंड दबाव आणणे आवश्यक आहे, तरच ही यंत्रणा हलेल. परंतु समाजातून असे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. समाजात धर्मवादी शक्तींचा जोर वाढत आहे. त्यातून हिंसाचारही वाढत चालला आहे. आज हा हिंसाचार आमच्या दारापर्यंत आला. तो उद्या अन्य कोणाच्याही दारात उभा राहू शकतो, याचे भान समाजाने ठेवणे आवश्यक आहे. डॉ. दाभोलकरांनंतरच्या एक वर्षाच्या कालावधीतील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साधना, परिवर्तन यांच्या कार्याचा आढावा घेतला तर असे आढळेल की, जात पंचायतींच्या अन्याय्य वर्तणुकीविरोधात जे काम डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी काही वर्षांपूर्वी सुरू केले होते, त्या कामाला गेल्या वर्षभरात महाराष्ट्र अंनिसने अधिक गती दिली आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये गारपीट झाल्यानंतर तेथील बाधित लोकांना मदत करण्यासाठी आम्ही हाती घेतलेल्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ऑनर-किलिंगच्या विरोधात अहमदनगरमध्ये आम्ही जी परिषद घेतली, तिला प्रचंड समर्थन लाभले होते. त्याशिवाय दिवाळी, गणपतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसतर्फे जे उपक्रम गेल्या काही वर्षांपासून राबविले जात आहेत, ते आता निव्वळ संघटनेचे उरले नसून समाजाचे उपक्रम झाले आहेत. हे उपक्रम असेच यापुढेही सुरू राहणार आहेत. गेल्या वर्षभरात जे गमावले त्याचा ताळेबंद मांडतानाच जे हाती उरले आहे त्याचाही विचार सतत समोर असतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्याने आम्ही आमचा खंदा मार्गदर्शक जरूर गमावला आहे, पण त्यांच्या विचारांच्या आधारेच यापुढेही आमची अविचल वाटचाल सुरू राहील.
खंदा मार्गदर्शक गमावला
डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे, ‘सामाजिक कार्य करताना उभ्या राहिलेल्या अडचणींमुळे अस्वस्थ होऊ नका. या अडचणी ही आपले सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी मिळालेली सुसंधी आहे, असे समजून त्यांच्यावर मात करा व पुढे जात राहा.’ गेल्या वर्षभरात जे गमावले त्याचा ताळेबंद मांडतानाच जे हाती उरले आहे, त्याचाही विचार सतत समोर असतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्याने आम्ही आमचा खंदा मार्गदर्शक जरूर गमावला आहे; पण त्यांच्या विचारांच्या आधारेच यापुढेही आमची अविचल वाटचाल सुरू राहील.
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस आहेत.)
शब्दांकन - समीर परांजपे.

भाभांचे कलासमृद्ध अवकाश! - वृंदावन दंडवते - शब्दांकन - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी १७ अाॅगस्ट २०१४. रसिक पुरवणी


मी शब्दांकन केलेला वृंदावन दंडवते यांचा लेख अाज दै. दिव्य मराठीच्या १७ अाॅगस्ट २०१४च्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाच्या दोन लिंक्स व जेपीजी फाईल. वृंदावन दंडवते हे ज्येष्ठ साहित्यिक व एनसीपीए या संस्थेचे माजी असिस्टंट डायरेक्टर (प्रोग्रॅम) असून एनसीपीएचे प्रवर्तक जमशेद भाभा यांच्या २१ अाॅगस्ट रोजी असलेल्या जन्मशताब्दी दिनानिमित्त त्यांनी हा लेख लिहिला अाहे. वृंदावन दंडवते हे विख्यात चित्रकार, साहित्यिकही असून त्यांनी तीन पुस्तके प्रकाशित झाली अाहेत. माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते यांचे ते कनिष्ठ बंधू अाहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-of-vrindavan-jogdand-about-jamshed-bhabha-divya-marathi-rasik-4715072-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/17082014/0/2/
------

स्मरणगाथा : भाभांचे कलासमृद्ध अवकाश!
- ------------
वृंदावन दंडवते | Aug 17, 2014, 05:00AM IST
---
भारतातील विविध भाषांतील नाटके, भारतीय नृत्य, संगीत, चित्रकला यांचे कार्यक्रम एनसीपीएमध्ये करण्याबरोबरच पु. ल. देशपांडे यांनी आपल्या कारकीर्दीत मराठी मनाची नाळ एनसीपीएशी जुळावी म्हणूनही खास प्रयत्न केले...
जमशेद भाभा. भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक डॉ. होमी भाभा यांचे हे धाकटे बंधू. पण जमशेद भाभा यांची याहून रेखीव व ठळक ओळख आहे ती म्हणजे, मुंबईतील नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) या राष्ट्रीय स्तरावरील ख्यातकीर्त संस्थेचे प्रवर्तक म्हणून. टाटा उद्योगसमूहाच्या विविध कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषवत असतानाच समूहाच्या माध्यमातून समाजात कलात्मकतेचा, सामाजिक जबाबदारीचा दृष्टिकोनही जपला जावा, यासाठी जमशेद भाभा कमालीचे आग्रही होते. त्यांच्या या मताला जे. आर. डी. टाटा यांचा संपूर्ण पाठिंबा व सहकार्य होते. त्यातूनच एनसीपीए या संस्थेची कल्पना सत्यात उतरली.
जमशेद भाभा हे स्वत: उत्तम चित्रकार होते. भारतीय तसेच पाश्चात्त्य कलांचे भोक्ते होते. भारताच्या प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक नृत्य, नाटक, संगीत आदी कलांचे योग्य प्रकारे जतन, संवर्धन, सादरीकरण लोकांसमोर झाले पाहिजे, या विचाराने त्यांना झपाटलेले होते. 1969चा तो काळ होता. ऑल इंडिया रेडिओचे तत्कालीन डायरेक्टर जनरल डॉ. नारायण मेनन यांना भाभांनी आग्रहाने बोलावून एनसीपीएच्या संचालकपदी नियुक्त केले होते. त्याशिवाय एनसीपीएच्या सल्लागार मंडळावर पु. ल. देशपांडे, विजया मेहता, डॉ. कुमुद मेहता, सत्यजित रे, रविशंकर यांच्यासारख्या कलाक्षेत्रातील एकाहून एक दिग्गजांना आमंत्रित केले होते. मुंबईतील वॉर्डन रोड येथील भुलाभाई देसाई मेमोरियलची वास्तू पाडून तिथे ‘कांचनजुंगा’ इमारत उभी राहिली होती. त्याच इमारतीत ‘एनसीपीए’ ही संस्था बाळसे धरू लागली. कांचनजुंगाच्या दुसर्‍या मजल्यावर सुमारे सव्वाशे माणसांची आसनव्यवस्था असलेले मिनीऑडिटोरियम होते. तेथे गायन, नृत्य, नाटके असे कार्यक्रम होऊ लागले. कांचनजुंगा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील जागेत ‘रंगायन’ या संस्थेच्या नाटकांची तालीम होत असे. ‘रंगायन’मध्ये मी सक्रिय असल्याने ओघाने अगदी सुरुवातीपासून ‘एनसीपीए’च्या वाटचालीचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले. फिल्म अर्काइव्हजच्या सहकार्याने ‘एनसीपीए’ संस्थेने फिल्म सोसायटी सुरू केली होती. परंतु गायन, नृत्य, नाटके या परफॉर्मिंग आटर््सचे माहेरघर बनलेल्या एनसीपीएला आता स्वत:च्या भव्य वास्तूचे वेध लागलेले होते.
1972मधली ही गोष्ट आहे. सरकारने मुंबईतील नरिमन पॉइंट येथे एनसीपीएला सात एकरांचा भूखंड द्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर एनसीपीएने समुद्रात स्वखर्चाने भराव टाकून त्यातून निर्माण झालेला सरकारमान्य भूखंड संपादित केला. या भूखंडावर एनसीपीएने सर्वात प्रथम एक मिनीथिएटर बांधले. ‘कांचनजुंगा’ येथे जे कलाविषयक कार्यक्रम होत असत, ते आता एनसीपीएच्या मालकीच्या स्वत:च्या जागेत होऊ लागले. या मिनीथिएटरनंतर एनसीपीएच्या प्रांगणात टाटा थिएटर उभारणीस सुरुवात झाली. अमेरिकेतील जगद्विख्यात वास्तुविशारद फिलिप जॉन्सन यांनी टाटा थिएटरचा आराखडा बनविला होता. या थिएटरचे अ‍ॅकॉस्टिक डिझाइन सिरिल हॅरिस या अमेरिकी तज्ज्ञाने केले होते. टाटा थिएटरची रचना खूपच वेधक होती. अर्धवर्तुळाकार असलेल्या या सभागृहामध्ये पडदा नव्हता. तसेच प्रेक्षकांसाठी कमळाकृती आसनव्यवस्था होती. टाटा थिएटरच्या उद्घाटन समारंभाला मोगुबाई कुर्डीकरांचे गाणे रंगले होते.
1980 मध्ये मी एनसीपीएमध्ये कार्यक्रम अधिकारी (प्रोग्रॅम ऑफिसर) म्हणून रुजू झालो. या संस्थेतर्फे ‘एनसीपीए जर्नल’ हे कलाविश्वातील घडामोडींना वाहिलेले नियतकालिक प्रसिद्ध केले जात असे. डॉ. कुमुद मेहता या नियतकालिकाच्या संपादक होत्या. मी स्वत: गाणे शिकत होतो, चित्रकार होतो, नाटकांमध्ये सक्रिय होतो. हे माहीत असल्याने कुमुद मेहता यांनी मला एनसीपीएमध्ये कार्यक्रम अधिकारी होण्याबद्दल सुचविले होते. या पदासाठी माझी मुलाखत साक्षात जमशेद भाभा यांनीच घेतली होती. एनसीपीएतील 1980 ते 1996 पर्यंतच्या माझ्या सेवाकाळात पु. ल. देशपांडे, डॉ. विजया मेहता यांनी संस्थेचे कार्यकारी संचालक म्हणून केलेले कार्य मला खूप जवळून पाहता आले. कालांतराने मी एनसीपीएतून असिस्टंट डायरेक्टर (प्रोग्रॅम) या पदावरून सेवानिवृत्त झालो. एनसीपीएमध्ये होणार्‍या कार्यक्रमांचा समाजातल्या सर्व स्तरांतील कलासक्त लोकांना आस्वाद घेता आला पाहिजे, यावर जमशेद भाभा यांचा प्रारंभापासून कटाक्ष होता. संचालक डॉ. नारायण मेननही त्याच मताचे होते. भारतातील विविध भाषांतील नाटके, भारतीय नृत्य, संगीत, चित्रकला यांचे कार्यक्रम एनसीपीएमध्ये करण्याबरोबरच पु. ल. देशपांडे यांनी आपल्या कारकीर्दीत मराठी मनाची नाळ एनसीपीएशी जुळावी म्हणूनही खास प्रयत्न केले. लावणीपासून ते मराठी काव्यवाचन, देवगाणी कार्यक्रम, नाट्यसंगीत, मराठी नाटकांचे प्रयोग आवर्जून संस्थेत सादर होऊ लागले. पुढे डॉ. विजया मेहता या कार्यकारी संचालक असताना ही परंपरा तितक्याच समर्थपणे सुरू राहिली. संगीताच्या कार्यक्रमांना डॉ. अशोक रानडे यांच्या अमूल्य संशोधनाचा स्पर्श झालेला होता. त्या काळी आम्ही दर महिन्यात होणार्‍या विविध कार्यक्रमांची पत्रिका तयार करीत असू. ही पत्रिका जमशेद भाभा नेहमी डोळ्याखालून घालत. त्यातील कार्यक्रमांविषयी संबंधित पदाधिकार्‍यांशी चर्चा करीत. कार्यक्रमात त्यांना काही बदल हवे असतील, तर तशा सूचनाही करीत. पाश्चात्त्य व पौर्वात्य कलाप्रकारांचा आस्वाद एनसीपीएच्या माध्यमातून कलारसिकांना घेता यावा, म्हणून जमशेद भाभा यांनी ‘ईस्ट-वेस्ट एन्काउंटर’ ही संकल्पना मॅक्समुल्लर भवनच्या सहकार्याने सलग चार वर्षे राबविली. जमशेद भाभा यांना पाश्चिमात्य संगीतातही रुची होती. त्यामुळे इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स या संस्थेच्या माध्यमातून देशोदेशीचे उत्तम गायक, वादक हे आपली कला सादर करण्यासाठी एनसीपीएमध्ये आवर्जून येत असत. जमशेद भाभा सुमारे पाच वर्षे संगीत नाटक कला अकादमीचे अध्यक्षही होते. कलाविषयक कार्यक्रमांच्या सादरीकरणाबरोबरच जतनाकडेही जमशेद भाभा यांचे विशेष लक्ष होते. त्याचसाठी त्यांनी परफॉर्मिंग आर्ट्सचे खास ग्रंथालय एनसीपीएमध्ये स्थापन केले. या ग्रंथालयात अनेक गायक, वादकांची ध्वनिमुद्रणे तसेच व्हिडिओ चित्रफिती संग्रह करून ठेवलेल्या आहेत. देश-विदेशातील कलांचा संगम भारतात व्हावा, असे स्वप्न घेऊन जगणारे जमशेद भाभा 30 मे 2007 रोजी कालवश झाले. एक समृद्ध सांस्कृतिक वारसा मागे ठेवून एका कलाध्यायाची समाप्ती झाली...
शब्दांकन : समीर परांजपे
ashavrinda@gmail.com

Monday, August 11, 2014

सिरियाची असह्य होरपळ - दै. दिव्य मराठीच्या १० अाॅगस्ट २०१४च्या अंकामधील माझा लेख




दै. दिव्य मराठीच्या १० अाॅगस्ट २०१४च्या अंकात सिरिया या देशासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखाची लिंक.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-sameer-paranjape-article-about-syria-4709022-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/10082014/0/4/
---------
सिरियाची असह्य होरपळ
------
- समीर परांजपे.
paranjapesamir@gmail.com
-----------
इराक आणि सिरिया हे दोन्ही देश ज्वालामुखीच्या तोंडावर आहेत. या स्थितीस कारणीभूत आहे एकच दहशतवादी संघटना- ती म्हणजे आयएसआयएस. तिचे पूर्ण रूप आहे ‘इस्लामिक स्टेट इन इराक अँड सिरिया.’ आयएसआयएसच्या नावातच तिचे उघड उद्दिष्ट आहे. इराकवर चर्चा खूप होते, पण सिरियामधील घडामोडी तितक्याच गंभीर आहेत. सिरियातील सुमारे दहा लाख लोकसंख्या असलेल्या रक्वा प्रांतावर आयएसआयएसने आपली पकड मजबूत केली आहे. हा प्रांत आता इस्लामी राज्य झाल्याचे ही संघटना सांगू लागली आहे. सिरियामधील बुद्धिजीवी वर्गात कट्टरपंथीयांच्या या शिरजोरीमुळे खळबळ माजणे स्वाभाविकच होते. सिरियाला अनेक आर्थिक प्रश्न भेडसावत आहेत. तेथील सामान्य माणसांचे पोटापाण्यापासून पायाभूत सुविधांपर्यंतचे अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे तेथील जनमानस त्रस्त आहे. कावलेल्या मनाला कब्जात घेण्यासाठी आगखाऊ व जातीयवादी धार्मिक विचारांसारखे घातक हत्यार दुसरे नाही. नेमका त्याच हत्याराचा वापर आयएसआयएसने करून सिरियाला विळखा घातला आहे.
हे होण्याआधी रक्वा शहरातील वातावरण खूप मोकळे होते. तेथील अल अमसी चौकामध्ये पूर्वी तरुण जोडपी संध्याकाळी प्रेमगुंजन करताना दिसत. मात्र आता या चौकामध्ये दिसतात आयएसआयएसचे काळे झेंडे... हेच आयएसआयएसचे लोक चोरीचा केवळ आळ असलेल्यांचे जाहीरपणे हात छाटताहेत. महिलांना बुरखा घालण्याची सक्ती केली जातेय. धार्मिक बंधनांच्या नावाखाली स्वातंत्र्यावरच गदा आणली जात असल्याने सिरियातील नागरिकांचे आतल्या आत घुसमटणे होते. पण मन शेवटी कट्टरपंथी विचारांकडेच ओढ घेते. सिरियातून अनेक जण नोकरीधंद्यासाठी विदेशांत स्थलांतर करतात. त्यातून एक नवीन समस्या उद्भवली आहे. हे नागरिक जेव्हा काही काळासाठी मायदेशात परत येतात, त्या वेळी त्यांच्याशी दहशतवादी संपर्क साधतात. त्यातील जे गळाला लागतील त्यांना घातपाती कारवायांचे प्रशिक्षण दिले जाते. असे सिरियाचे नागरिक मग विदेशात गेल्यानंतर तेथे हिंसक कृत्ये घडवतात. अमेरिकेत राहणार्‍या सिरियाच्या नागरिकांकडे तेथील तपासयंत्रणा कायम संशयाने पाहत असतात.
जगात जिथे जिथे दहशतवाद फैलावला आहे, त्यामागे अमेरिकेचा छुपा हात असतो, ही आता उघड गोष्ट आहे. सिरियातील आयएसआयएसच्या कारवायांमागे अमेरिकेचे काही हितसंबंध दडले आहेत का, याचा प्रसारमाध्यमे कायम शोध घेत असतात. सिरियामध्ये गेल्या मे महिन्यात मोनेर मोहंमद अबुसल्हा या 22 वर्षांच्या युवकाने स्फोटकांनी भरलेला ट्रक एका रेस्टॉरंटवर धडकवून भीषण आत्मघाती हल्ला केला. हा मोनेर राहायचा अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये. तेथे उत्तम बास्केटबॉलपटू म्हणून त्याने नाव कमावले होते. असे अचानक काय झाले, की मोनेर दहशतवादी बनला? अमेरिकेतून मोनेर काही महिन्यांसाठी सिरियात परतला होता. त्या वेळी त्याच्याशी नुसरा फ्रंटच्या दहशतवाद्यांनी संधान बांधून त्याला घातपाताचे प्रशिक्षण दिले. बहुतेक अमेरिकेत दहशतवादी कारवाया करणे त्याला शक्य झाले नाही, मग तो पुन्हा सिरियात परतला व तेथे त्याने आपले प्रताप दाखविले. मोनेर मोहंमद अबुसल्हा याच्यावर एफबीआयची करडी नजर होती, असे म्हणतात. पण त्याला जेरबंद करण्यात आले नाही. असे करण्यात अमेरिकेचे काही छुपे हेतू होते का, अशी चर्चा आता दबक्या आवाजात होत आहे.
सिरियात 2000 सालापासून बसर हफीझ अल असाद हे राष्ट्राध्यक्षपदी आहेत. त्यांची राजवट अमेरिका व युरोपीय देशांस फारशी पसंत नाही. असाद यांच्या सरकारच्या विरोधात आयएसआयएसने जो रक्तरंजित संघर्ष चालवला आहे, त्याबद्दल या संघटनेवर आंतरराष्ट्रीय पातळीवर कारवाई करण्याचे अमेरिकेने कधीच फारसे मनावर घेतलेले नव्हते. असाद यांच्या राजवटीत पोलिस खात्यात छायाचित्रकार म्हणून काम करणार्‍या एका गृहस्थाने काही दिवसांपूर्वी आपण काढलेल्या अनेक छायाचित्रांना उजेड दाखविला. अपघात, इमारतींना लागलेली आग, कधी कधी मरण पावलेले कैदी असे त्याच्या छायाचित्रांचे विषय असायचे. मात्र काही वर्षांपूर्वी तुरुंगात मरण पावणार्‍या कैद्यांची संख्या अचानक वाढू लागली. या मृत कैद्यांत लहान मुले, महिला, वयस्क नागरिकांचा समावेश होता. या कैद्यांना अचानक मृत्यूला का सामोरे जावे लागले असेल, त्यामागील कारणांचा हा छायाचित्रकार शोध घेऊ लागला. त्या वेळी असे आढळले की, असाद यांच्या राजवटीत तुरुंगात डांबलेल्या विरोधकांचा पद्धतशीररीत्या काटा काढला जात होता. त्यातूनच तेथील तुरुंगात मरण पावणार्‍यांच्या संख्येत वाढ होऊ लागली होती.
असाद सरकार व आयएसआयएस यांच्या संघर्षात सर्वात अधिक परवड होतेय ती तेथील महिला व लहान मुलांची. ही व्यथा लिस डॉसेट यांनी सिरियावर बनविलेल्या एका लघुपटात अचूकपणे टिपली गेली आहे. सिरियात बालकांच्या हास्यापेक्षा गोळीबार, स्फोटांचे आवाजच वातावरणात भरून राहिलेत. सिरियातील मुलांचे बालपण या हिंसक वातावरणात करपले गेलेय. त्या देशातील किफाह हा तेरा वर्षे वयाचा मुलगा. तो या लघुपटात एकच गोष्ट सतत सांगताना दिसतो... ‘आम्हाला खायला पोटभर अन्न मिळत नाही...’ एका लहान मुलीला आपल्या अभ्यासातील गोष्टींपेक्षा सिरियामध्ये दहशतवाद्यांच्या हातात असलेल्या शस्त्रांची नावे तोंडपाठ आहेत, हे पाहून आपल्याला धक्का बसतो. असाद सरकारच्या राजवटीत सिरियातील मुलांवर जे अत्याचार सुरू आहेत, त्याबद्दल तेथील नागरिकांच्या मनात खंत जरूर आहे. ते असाद सरकारविरुद्ध दबक्या आवाजात तक्रारीचा सूर लावतात, पण आयएसआयएस या संघटनेच्या घातपाती कारवायांविरोधात काहीही बोलत नाहीत. ही विसंगती उबग आणणारी आहे. सिरियाची राजधानी दमास्कसमध्ये असाद यांचे सैनिक व दहशतवादी यांच्यात चकमकी घडत असतात. थोड्याफार फरकाने सार्‍या देशभरातच हे चित्र आहे. असाद यांना अध्यक्षपदावरून हटवून सत्तेचे सुकाणू आपल्या हाती घेण्याची आयएसआयएसची धडपड आहे. कुणीही कुणावर ताबा मिळवला तरीही त्यांचे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत सिरिया जळतच राहणार आहे.


Wednesday, August 6, 2014

स्मिता तळवलकर यांच्या स्मृतिंना आदरांजली, त्यांच्या विषयीच्या तीन वैयक्तिक अाठवणी...




स्मिता तळवलकर यांच्या स्मृतिंना आदरांजली, त्यांच्या विषयीच्या तीन वैयक्तिक अाठवणी...
---------------
प्रख्यात अभिनेत्री व चित्रपट निर्मात्या स्मिता तळवलकर यांचे ५ अाॅगस्ट रोजी पहाटे मुंबईत निधन झाले. त्यांच्या स्मृतिंना आदरांजली. स्मिता तळवलकर यांच्या विषयीच्या तीन वैयक्तिक आठवणी मनात रुंजी घालत अाहेत.
(१) स्मिता तळवलकर या पुण्याच्या हुजुरपागा शाळेच्या माजी विद्यार्थीनी. या शाळेच्या माजी उपमुख्याध्यापिका सुशीलाताई बापट या माझ्या नातेवाईक. त्या १९४०च्या दशकातल्या राष्ट्रीय कबड्डीपटू देखील होत्या. सुशीलाताई यांना अाम्ही एबी मावशी या घरगुती नावाने हाक मारायचो. त्यांना भेटण्यासाठी पुण्यात बापट वाडीतील त्यांच्या घरी मी नेहमी जात असे. ही घटना फार जुनी नाही. २००७ सालातील असेल. असेच एकदा सुशीलाताईंकडे सकाळी गेलो असताना त्या म्हणाल्या, अाता माझी एक माजी विद्यार्थीनी येणार अाहे. थोड्या वेळाने पाहातो तर साक्षात स्मिता तळवलकर अापल्या शिक्षिकेस भेटण्यासाठी अावर्जून अाल्या होत्या. त्या दोघींच्या गप्पा रंगू लागल्या. मी फक्त श्रोत्याचे काम करीत होतो. थोड्या वेळाने सुशीलाताईंनी स्मिता तळवलकर यांच्याशी माझी ओळख करुन दिली. मी स्मिताताईंना पहिल्यांदाच भेटत होतो. त्यावेळी स्मिताताईंनी माझी विचारपूस केली. मी पत्रकार अाहे असे म्हटल्यावर त्या म्हणाल्या तुझे अावडते लेखक कोण? त्यावर मी उत्तरलो, की गो. नी. दांडेकर व त्यांच्या नंतरच्या पिढीतले भालचंद्र नेमाडे. स्मिता तळवलकरांचेही हे दोन्ही लेखक अावडते. तळवलकर यांनी गो. नी. दांडेकर यांच्या विषयी बर्याच अाठवणी मला सांगितल्या. त्यांच्या पुस्तकांची वैशिष्ट्येही त्या मला सांगत होत्या. गो. नी. दांडेकर हे प्रभावी किर्तनकारही कसे होते याविषयी स्मिताताईंनी त्यांच्या अाईकडून ऐकलेल्या आठवणीही त्यांनी समरसून सांगितल्या. आम्ही साधारण एक तास बोलत होतो. त्यानंतर त्या जायला निघाल्या. चतुरस्त्र स्मिताताईंचे त्यावेळी जवळून दर्शन झाले. सुशीला बापट या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या खास मैत्रिण. लतादिदिंच्या आठवणीही या गप्पांमध्ये सुशीलाताई व स्मिताताईंनी मला सांगितल्या. अामच्या नातेसंबंधातले श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे पाहिलेले चित्रपट व त्यांच्याशी झालेली भेट याचीही आठवण स्मिताताईंनी या गप्पांतच आवर्जून सांगितली होती. दिग्गजांच्या सांस्कृतिक जीवनाचा एक नवा पैलू त्यानिमित्ताने मला कळला होता त्यावेळी. स्मिता तळवलकर गेल्या हे वृत्त जेव्हा कानी अाले त्यावेळी मी अाज सकाळी प्रख्यात साहित्यिका तसेच गो.नी. दांडेकर यांच्या सुपूत्री तसेच मृणाल देव-कुलकर्णी हिच्या मातोश्री वीणा देव यांच्याशी दूरध्वनीवर बोललो व त्यांना बापट वाडीतील वर उल्लेखलेल्या गप्पांची अाठवण सांगितली. त्या ही या सर्वांना ओळखत असल्याने त्यांनाही एकदम भरुन अाले. स्मिताताई तुम्ही दिलेल्या सुंदर अाठवणी मी कायम जपून ठेवेन.
(२) स्मिता ताईंशी दुसरी भेट झाली ती रुईया महाविद्यालयाने सादर केलेल्या रुईया नाका या कार्यक्रमाच्या निमित्ताने. स्मिता तळवलकर या रुईया महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी. रुईया नाका हा कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या दिग्गज कलाकारांनी सादर केला. त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी स्मिता तळवलकर महाविद्यालयात अालेल्या असताना अामची भेट रुईया नाक्यावरच झाली. तिथे डीपी हाॅटेलच्या बाहेर असलेल्या झाडाखाली बसून अाम्ही २० मिनिटे पुन्हा गप्पा मारल्या होत्या. त्या गप्पांमध्ये त्यांचे रुईयातील दिवस, पुण्याच्या सुशीला बापट या त्यांच्या शिक्षिका अशा अाठवण निघाल्या. त्यावेळी स्मिता तळवलकर यांच्या चर्येवर अाजारपणाने अालेला थकवा काहीसा जाणवत होता. ते बघून मन चिंताग्रस्त झाले होते. अाणि अाज अखेर ती वाईट बातमी अालीच....
(३) स्मिता तळवलकर दादरला मातोश्री हाईटस या इमारतीत राहात होत्या. दादर पश्चिमेला असलेल्या डी. एल, वैद्य मार्गावर ही इमारत अाहे. याच परिसरात मी लहानाचा मोठा झाल्याने व अामच्याच इमारतीत सतीश पुळेकर हे दिग्गज अभिनेते राहात असल्याने त्यांच्याकडे येणारे कलाकार पाहाण्याची सवय तेव्हापासून होती. स्मिताताई अामच्या इमारतीत एक-दोनदा सतीश पुळेकरांकडे अाल्याचे मला चांगले स्मरते. त्या दादरकर असल्यानेही त्यांच्याविषयी वेगळा जिव्हाळा होताच. स्मिताताई तुमची आठवण सतत ताजी राहिल मनात...

Saturday, July 26, 2014

सनातन हिंसाचाराची गाझापट्टी - दै. दिव्य मराठीच्या २७ जुलै २०१४च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख.




इस्रायल अाणि पॅलेस्टाईनमधील हमास ही दहशतवादी संघटना यांच्यातील संघर्ष पुन्हा टीपेला पोहोचला अाहे. त्याची माहिती देणारा मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या २७ जुलै २०१४च्या अंकात प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाच्या टेक्स्ट व पेज लिंक तसेच जेपीजी फोटो पुढे दिले आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-sameer-paranjpe-article-about-gaza-attack-4694004-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/27072014/0/4/
----------------
सनातन हिंसाचाराची गाझापट्टी
---------------
समीर परांजपे | Jul 27, 2014,
----------------
इस्रायल व पॅलेस्टाइनमधील सनातन संघर्षाला पुन्हा उकळी फुटली. ‘पॅलेस्टाइनमधील हमास संघटनेचे दहशतवादी आमच्या प्रदेशावर क्षेपणास्त्र हल्ले चढवत आहेत. त्यामुळे स्वरक्षणासाठी गाझा पट्टीवर प्रतिहल्ले चढविणे क्रमप्राप्त आहे,’ अशा शब्दांत इस्राएलने स्वसमर्थन केले. गाझा पट्टीवर 15 जुलैच्या रात्रीपासून इस्राएलने क्षेपणास्त्र हल्ले चढविण्यास प्रारंभ केला. त्यानंतर इस्रायली लष्कराच्या पायदळाने आक्रमक कारवाई सुरू केली. गाझा पट्टीतील शौजिया येथे इस्रायली पायदळाने 18 जुलै रोजी आणखी जोरदार चढाई केली. गाझा हे शहर दाटीवाटीच्या लोकसंख्येचे आहे. सुमारे 20 लाख पॅलेस्टाइन नागरिक तिथे राहतात. इस्राएलने गाझा पट्टीवर हल्ले चढविण्याआधी लष्करी विमानांतून काही हजार पत्रके त्या भागात फेकली. त्या पत्रकांत लिहिले होते, ‘गाझा शहरातील काही भागांचा हमास दहशतवाद्यांनी कब्जा केला असून तेथून ते इस्रायली हद्दीत क्षेपणास्त्रे डागतात. ज्या भागात दहशतवादी आहेत, तो भाग सोडून गाझाच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जावे. असे न केल्यास इस्राएलने केलेल्या प्रतिहल्ल्यात जी मनुष्यहानी होईल त्याची जबाबदारी गाझा नागरिकांवरच असेल. आमचे लक्ष्य आहेत फक्त ‘हमास’चे दहशतवादी.’ गाझा पट्टीवर इतका मोठा प्रतिहल्ला इस्राएलने गेल्या पाच वर्षांत केलेला नव्हता. गाझा पट्टीतील भूभागात ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी जमिनीखाली मोठमोठाली भुयारे खणली आहेत. इस्राएलवर हल्ले चढवून दहशतवादी आपल्या संरक्षणासाठी या भुयारांचा आश्रय घेतात. ही भुयारे उद्ध्वस्त करण्यासाठीही इस्राएलने क्षेपणास्त्रांचा मारा केला. गाझा पट्टीवर चढविण्यात आलेल्या हल्ल्यांच्या कारवाईत काही हजार इस्रायली सैनिक सहभागी आहेत. 15 जुलैच्या आधी दहा दिवसांपासून हमास दहशतवाद्यांनी इस्राएलवर क्षेपणास्त्रे डागायला सुरुवात केली होती. इस्राएलनेही त्या हल्ल्यांना उत्तर दिले. मात्र नंतर इस्राएलने प्रतिहल्ले अधिक तिखट केले. हा संघर्ष तुंबळ होऊ लागला. हमास व इस्राएल यांच्यामध्ये शस्त्रसंधी व्हावी म्हणून 2012मध्ये इजिप्तने केलेल्या प्रयत्नांना तेव्हा यश आले होते. पण त्या शस्त्रसंधीचे कंबरडे गेल्या काही दिवसांत मोडले गेले आहे. इजिप्तने पुन्हा दोन्ही बाजंूमध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. इस्राएल व पॅलेस्टाइनमध्ये शस्त्रसंधी पुन्हा होईल किंवा न होईल यापेक्षा तिथे भविष्यात कायमची शांती प्रस्थापित होईल का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तुंबळ संघर्ष किती व्हावा, याला काही प्रमाण नसते. अधिकाधिक हिंसाचार हीच या संघर्षामागची रक्तरंजित कहाणी असते. ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांत इस्रायली प्रांतामध्ये दीड हजार रॉकेटचा तर इस्राएलने गाझा पट्टीत दोन हजारांहून अधिक रॉकेटचा मारा केला. त्यात गेल्या काही दिवसांत गाझा पट्टीमध्ये मोठी मनुष्यहानी झाली. तेथील 700हून अधिक लोक प्राणाला मुकले व 4000हून अधिक जखमी झाले. इस्राएलचा सीमावर्ती भाग व गाझा पट्टीमध्ये मृत्यूचे तांडव अधूनमधून सुुरूच असते. इतिहासातील अनेक दुखणी काढून वर्तमानात माणसे मारली जातात. पुन्हा शांततेच्या नावाखाली दोन्ही बाजू काही काळ गपगार होतात. पुन्हा कोणीतरी कळ काढते. मग एकमेकांची माणसे मारण्याचा क्रूर खेळ सुरू होतो. धुमसत्या प्रदेशांचे असेच असते. दोन आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे. इस्राएलमधील येहूद शहरात द्रोर खेनीन हा 37 वर्षांचा गृहस्थ हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यात मारला गेला. हल्ला झाला तेव्हा तो इस्राएली सैनिकांना जेवण पुरविण्याच्या सेवेत गर्क होता. इस्राएलमध्ये हे दृश्य होते, तर गाझा पट्टीतही वेगळे चित्र नव्हते. इस्राएलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चार निष्पाप पॅलेस्टाइन मुले मारली गेली. गाझा पट्टीतील शाळा, सरकारी कार्यालये, रुग्णालये, महाविद्यालये आदी भरवस्तीतील सार्वजनिक इमारतींच्या आड हमास दहशतवाद्यांनी तळ उभारले आहेत. तेथून हमास दहशतवादी इस्राएलवर रॉकेट हल्ले चढवितात. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्राएलने चढविलेल्या हल्ल्यात या इमारती लक्ष्य ठरणे हे ओघाने आलेच. त्यामुळे हमास दहशतवाद्यांनी कब्जा केलेल्या भागांतून हजारो पॅलेस्टाइन नागरिकांनी गाझा पट्टीतीलच जरा अधिक सुरक्षित जागी स्थलांतर केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी गाझा पट्टीत उभारलेल्या 49 छावण्यांमध्ये 61 हजार विस्थापितांनी आसरा घेतला आहे. इस्राएल-पॅलेस्टाइनमध्ये पुन्हा हिंसाचाराची आग पेटली म्हटल्यावर अमेरिका, संयुक्त राष्ट्रे नेहमीप्रमाणे ती विझवायला धावली. मुळात पॅलेस्टाइनची भूमी बळकावून इस्राएलला जन्माला घालून आग लावली अमेरिकेने. त्या वेळी अमेरिकेच्या दादागिरीसमोर संयुक्त राष्ट्रांची दातखीळ बसली होती. आताही अमेरिकेचे वर्चस्व सोसतच संयुक्त राष्ट्रे हिंसाचाराविरोधात निषेधाचा कणसूर लावत आहेत. अशा इशार्‍यांना इस्राएल जुमानणार नाही आणि इस्राएलला धडा शिकविण्याची हमासच्या दहशतवाद्यांच्या हृदयातील आग लवकर काही विझणार नाही, हे मागच्या हमरीतुमरींवरून दिसून आले आहे. वाद भूप्रदेशाचा, अस्मितेचा... बराच काळ चिघळत राहिलेला.... म्हणूनच तो आता सनातन बनला आहे.
(sameer.p@dbcorp.in)

Saturday, July 12, 2014

वनराजीतील ग्रंथालय - पी. साईनाथ - मी अनुवादित केलेला लेख दै. दिव्य मराठीच्या १३ जुलै २०१४च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख

 

प्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांनी केरळच्या वनक्षेत्रातील एका ग्रंथालयावर लिहिलेला व मी अनुवादित केलेला लेख दै. दिव्य मराठीच्या १३ जुलै २०१४च्या अंकात रसिक या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाच्या लिंक्स व टेक्स्ट फाईल व जेपीजी फोटो पुढे दिले आहेत.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-of-p-sainath-in-rasik-divya-marathi-4677996-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/13072014/0/4/
-----
वनराजीतील ग्रंथालय
- पी. साईनाथ
-------
केरळमधील वनक्षेत्राने वेढलेल्या अतिदुर्गम भागात मुथवन आदिवासी समाजातील चिन्नातंबी यांचे ग्रंथालय आणि त्यांची कार्यप्रवणता पाहून आम्ही कमालीचे प्रभावित झालो. लोकांची वाचनभूक भागावी, यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची चिन्नातंबी यांची धडपड विलक्षण असल्याचेही आम्हाला जाणवले...
केरळमधल्या घनदाट वनक्षेत्राने वेढलेल्या इडुक्की जिल्ह्यातल्या इदमलाकुडी नावाच्या दुर्गम गावात मुथवन आदिवासी समाजाचे 73 वर्षे वयाचे पी. व्ही. चिन्नातंबी एक अनोखे ग्रंथालय चालवतात. ते चालवत असलेल्या या ग्रंथालयामधल्या पुस्तकांची संख्या आहे, एकशेसाठ. अभिजात सदरात मोडणारी ही सगळी पुस्तके स्थानिक मुथवन आदिवासी नियमितपणे घरी वाचायला नेतात. न चुकता परतही आणून देतात. मुळात चिन्नातंबींचे हे ग्रंथालय वसले आहे, ते त्यांनी सुरू केलेल्या चहाच्या दुकानात. मातीच्या भिंतींचा आधार असलेल्या या वास्तूवर एक छोटासा कागदी फलकही आहे. त्यावर हाताने लिहिलेला मजकूर पुढीलप्रमाणे आहे-

अक्षरा आर्ट्स अँड स्पोर्ट्स लायब्ररी
इरुप्पुकल्लाकुडी
इदमलाकुडी
पी. व्ही. चिन्नातंबी, 73, चहा विक्रेता, स्पोर्ट्स क्लब ऑर्गनायझर आणि लायब्रेरियन.

देशातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असलेले राज्य म्हणून ख्याती असलेल्या केरळमधील साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या या भागात मुथवन आदिवासींची फक्त 28 गावे आहेत. परंतु त्यातील या आदिवासींची संख्या जेमतेम अडीच हजारही भरणार नाही. त्यातील काहीशे लोक इदमलाकुडीमध्ये राहतात. केरळमधील सर्वात कमी म्हणजे अवघे दीड हजार मतदार असलेली पहिली आदिवासी ग्रामपंचायत याच गावात आहे. मुन्नारजवळ असलेल्या पेट्टीमुडी येथून इदमलाकुडी येथे पोहोचण्यासाठी सुमारे 18 कि.मी.ची पायपीट करावी लागते. चिन्नातंबींचे ग्रंथालय तर अजून आतल्या ठिकाणी आहे. आम्ही आठ जण चिन्नातंबी यांच्याकडे गेलो
होतो, त्या वेळी त्यांची पत्नी कामावर गेली होती. चिन्नातंबींच्या या चहा विक्रीच्या छोट्याशा दुकानात नानाविध वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. बिस्किट, आगपेटी आणि असे बरेच काही...
...‘तुम्ही बनवलेला छान चहा तर प्यायलो, तुमचे चहाचे दुकानही बघितले. पण तुमचे ग्रंथालय कुठे आहे?’ असे मी विचारताच चिन्नातंबींनी स्मितहास्य केले आणि आम्हाला ते आतल्या छोटेखानी खोलीत घेऊन गेले. तेथील अंधार्‍या कोपर्‍यातून त्यांनी दोन चामडी बॅगा बाहेर काढल्या. या बॅगांमध्येच 160 पुस्तके भरलेली होती. चिन्नातंबींनी पुढे आणलेल्या बॅगांमधील पुस्तके आम्ही चाळायला सुरुवात केली. रहस्यकथा, बेस्टसेलर पुस्तके किंवा बालसाहित्य असे काही त्यात नव्हते. मात्र, अभिजात दर्जाच्या उत्तमोत्तम साहित्यकृती होत्या. राजकीय विचारसरणींवर आधारित काही पुस्तकेही होती. ‘सिलाप्पतीकरम’ या तामिळ काव्याचा मल्याळी भाषेत अनुवाद झालेले पुस्तक होते. वायकोम मुहम्मद बशीर, एम. टी. वासुदेवन नायर, कमला दास यांनी लिहिलेली पुस्तके होती. एम. मुकुंदन, ललितांबिका अंथरजानम आणि इतर काही प्रथितयश लेखकांची पुस्तकेही तिथे नांदत होती. सगळ्यांत आश्चर्य म्हणजे, महात्मा गांधी यांच्या साहित्याबरोबरच थोपिल बासी यांचे ‘यू मेड मी ए कम्युनिस्ट’ हे पुस्तकही आम्हाला तिथे पाहायला मिळाले होते.
इतरांच्या तुलनेत आदिवासींमध्ये गरिबी अधिक व साक्षरतेचे प्रमाण कमी असते. हे वास्तव ध्यानात घेऊन आम्ही चिन्नातंबीला विचारले, ‘इथले लोक खरंच ही पुस्तके वाचतात का?’ त्यावर त्यांनी आम्हाला ग्रंथालयाचे रजिस्टरच काढून दाखविले. ज्यांनी पुस्तके वाचायला नेली आणि परत आणून दिली त्या सगळ्यांच्या नोंदी त्यामध्ये व्यवस्थित केलेल्या होत्या. इल्लांगो यांचे सिलाप्पतीकरम हे पुस्तक एकापेक्षा जास्त वेळा लोकांनी वाचायला नेल्याचे त्यावरून दिसले. इदमलाकुडी या गावामध्ये जेमतेम 25 कुटुंबे राहत असतील, पण गेल्या वर्षी या गावातील वाचकांनी 37 पुस्तके वाचायला नेली होती. या ग्रंथालयाचे आजन्म सदस्यत्वाचे शुल्क फक्त 25 रुपये आहे, तर दर महिन्याचे शुल्क अवघे दोन रुपये आहे. याव्यतिरिक्त वाचकाला एखादे पुस्तक वाचायला नेण्यासाठी अन्य कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. दूध व साखरेविना असलेला चहा या ग्रंथालयात येणार्‍या वाचकाला मोफत दिला जातो. डोंगराळ भागातून पायपीट करीत वाचक ग्रंथालयात येतात, खूप दमतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ही चहाची सोय. मात्र बिस्किट, इतर खाद्यपदार्थ घ्यायचे असतील तर पैसे मोजावे लागतात. कधी कधी वाचकाला जेवूही घातले जाते.
लेखन हेच ज्यांच्या उपजीविकेचे साधन आहे, असे बरेच जण माझ्याबरोबर चिन्नातंबी यांच्या ग्रंथालयाला भेट देण्यासाठी आले होते. केरळ प्रेस अकॅडमीत पत्रकारिता अभ्यासक्रमात शिकत असलेला विष्णू एस. हा विद्यार्थीसुद्धा आमच्यासोबत आला होता. त्याला या ग्रंथालयात एक आगळे साहित्यरत्न गवसले. ती एक वही होती. तिच्या पानांवर हाताने काही मजकूर लिहिला होता. या मजकुराला कोणतेही शीर्षक देण्यात आलेले नव्हते. ते चिन्नातंबी यांचे आत्मचरित्र होते. या आत्मचरित्रावर आपण पुरेसे लेखनसंस्कार अजून केलेले नाहीत, असे चिन्नातंबी यांनी आम्हाला सांगितले. आम्ही आग्रह करून त्या आत्मचरित्रातील काही भाग त्यांना वाचायला सांगितला. चिन्नातंबी यांच्या ठायी असलेली समाजसेवी वृत्ती व राजकीय जागरूकता यांचे दर्शन त्यांच्या या लेखनातून होत होते. महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्या घटनेपासून चिन्नातंबी यांनी आपल्या आत्मचरित्राला प्रारंभ केला होता. गांधीहत्येची घटना घडली त्या वेळी
चिन्नातंबी अवघे नऊ वर्षे वयाचे होते. गांधीहत्येचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता.
‘इदमलाकुडीला ग्रंथालय स्थापन करण्याची प्रेरणा मला मुरली ‘मॅश’ (म्हणजे शिक्षक) यांच्याकडून मिळाली’ असे चिन्नातंबी यांनी सांगितले. मुरली मॅश हे अत्यंत नाणावलेले शिक्षक होते. ते आदिवासी होते, पण मुथवन जमातीचे नव्हते. मुरली मॅश यांनी मुथवन आदिवासींच्या कल्याणासाठी अविरत कार्य केले.
केरळमधील अतिदुर्गम भागात असलेले चिन्नातंबी यांचे ग्रंथालय आणि तेथील त्यांची कार्यप्रवणता पाहून आम्ही प्रभावित झालो. या ग्रामीण भागातील रहिवाशांची वाचनभूक भागावी, यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची चिन्नातंबी यांची चाललेली धडपड विलक्षण असल्याचे आम्हाला जाणवले. आम्हाला आता पुन्हा मोठी पायपीट करून आमच्या मुक्कामाला पोहोचायचे होते. त्या वाटेकडे डोळे लागले होते. पण मनात विचार फक्त पी. व्ही. चिन्नातंबी यांचाच होता... कारण एका असामान्य ग्रंथालयचालकाचे दर्शन आम्हाला त्यांच्यात झाले होते...
psainath@gmail.com
(अनुवाद - समीर परांजपे)

Thursday, July 3, 2014

ब्रिक्स’ देशांचे पुढचे पाऊल - दिव्य मराठीच्या ४ जुलै २०१४च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख.




ब्रिक्स देशांची परिषद ब्राझिलमध्ये येत्या १४ ते १६ जुलै रोजी होत असून त्या विषयावर मी लिहिलेला लेख दै. दिव्य मराठीच्या ४ जुलै २०१४च्या अंकात प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाच्या दोन लिंक्स, जेपीजी फोटो पुढे दिले अाहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-sameer-paranjape-article-about-brics-4668276-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/04072014/0/6/
-----‘
ब्रिक्स’ देशांचे पुढचे पाऊल
-------------------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----------
जागतिक राजकारण व अर्थकारणामध्ये भारत, रशिया, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका या पाच देशांनी मिळून स्थापन केलेल्या ‘ब्रिक्स’ या गटाला खास महत्त्व आहे. त्यातील भारत, चीन, ब्राझील हे देश संभाव्य आर्थिक महाशक्ती म्हणून जागतिक क्षितिजावर उदयास येत आहेत. या ब्रिक्स देशांची सहावी परिषद ब्राझीलमधील फोर्टालेझा शहरामध्ये येत्या १४ ते १६ जुलै रोजी आयोजिण्यात आली आहे. ब्राझील व अवघे जग सध्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या रंगात न्हाऊन निघालेले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १३ जुलैला होणार असून त्यामध्ये फुटबॉल स्पर्धेतील विश्वविजेता ठरेल.
एवढ्या मोठ्या प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी ब्राझीलचे अध्यक्ष दिल्मा रौसेफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानपूर्वक आमंत्रण दिले. मात्र या अंतिम सामन्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय मोदी ‘नाट्यपूर्णरीत्या’ घेण्याची शक्यता आहे.
असा निर्णय त्यांनी घेतलाच तर त्यामागची तर्कसंगती न लक्षात येण्यासारखी असेल. लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय राजकारणाचा तोंडवळाच बदलून गेला आहे. सार्क, नाम, ब्रिक अशा राष्ट्रगटांमध्ये काँग्रेसच्या राजवटीत सहभागी होताना भारताची जी भूमिका असे, त्यापेक्षा खचितच थोडी वेगळी भूमिका भाजपप्रणीत केंद्र सरकारची असण्याची शक्यता आहे. ती नेमकी काय असेल याची उत्सुकता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांना आहेच.
परस्परांच्या हितसंबंधांना धक्का न लावता आपली समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी युरोपातील राष्ट्रांनी एकत्र येऊन युरोपीय महासंघ स्थापन केला. जी-२० , जी-आठ, नाटो असेही राष्ट्रगट स्थापन होण्यामागे हीच प्रेरणा होती. ब्रिक्स गटाची उभारणीही याच तत्त्वावर झाली आहे. त्यामागे प्रमुख प्रेरणा आहे ती आर्थिक सहकार्याची.
भारत, रशिया, ब्राझील, चीन या चार देशांचे परराष्ट्रमंत्री २००६ च्या सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्क येथे जमले होते. या गटाला प्रथमत: ‘ब्रिक’ गट असे म्हटले गेले. १६ मे २००८ रोजी रशियातील येकतेरिनबर्ग येथे ब्रिक देशांची खर्‍या अर्थाने म्हणता येईल अशी राजनैतिक बैठक झाली. त्यातूनच ब्रिक गटाची पहिली परिषद येकतेरिनबर्ग याच शहरात १६ जून २००९ रोजी भरली होती. २००८ मध्ये अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीचा फटका अनेक देशांना बसला होता. युरोपातील ग्रीस, पोर्तुगालसारखे देश डबघाईला लागण्याच्या दिशेने वाटचाल करीत होते. भारताला या मंदीचा काही प्रमाणात फटका बसला असला तरी त्याच्या अर्थव्यवस्थेचा पाया मात्र डळमळीत झाला नाही. या आर्थिक मंदीच्या काळात चीननेही स्वत:ला नीट सावरले होते.
भारत, चीन, ब्राझील या मोठ्या बाजारपेठा म्हणूनही विकसित होत आहेत. १९९१ मध्ये सोव्हिएत रशियाचा डोलारा कोसळल्यानंतर अमेरिका हे जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून पुढे आले. रशियाला अंतर्गत समस्यांबरोबरच आर्थिक प्रश्नांनी भंडावून सोडले असून आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी त्यालाही भारत, चीन, ब्राझीलसारख्या मोठ्या बाजारपेठांची गरज आहेच. अशा परस्पर उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ब्रिक देशांनी २००९च्या आपल्या पहिल्या परिषदेत जागतिक अर्थव्यवस्था अधिक सुदृढ करण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करता येतील याची मूलगामी चर्चा केली होती. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावर नवे स्थिर स्वरूपाचे राखीव चलन असणे आवश्यक असल्याचेही प्रतिपादन केले होते. जागतिक स्तरावर अमेरिकेच्या डॉलरचे निर्विवाद वर्चस्व असून त्याच्या तुलनेत अन्य महत्त्वाच्या चलनांचे होत असलेले अवमूल्यन ही चिंतेची बाब ठरत आहे. या वर्चस्ववादाविरोधात ब्रिक राष्ट्रांच्या पहिल्या परिषदेत नाराजीचा सूर निघाला होता. २४ डिसेंबर २०१० रोजी ‘ब्रिक’मध्ये दक्षिण आफ्रिका हा देश सहभागी झाल्यापासून हा गट ‘ब्रिक्स’ या नावाने ओळखला जाऊ लागला.
जागतिक अर्थकारणाला ग्रासणार्‍या समस्या, त्यामुळे या अर्थकारणाच्या वाढीला येणार्‍या मर्यादा, तसेच या अर्थकारणाला गती देण्यासाठी आवश्यक असणारा कौशल्यपूर्ण कारभार या सगळ्यांची परिपूर्ती करण्यासाठी ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. ब्रिक्स गटामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांचे लोकशाहीकरण होण्याच्या प्रक्रियेसही चालना मिळाली आहे. जगातील एकूण भूप्रदेशापैकी ३० टक्के भूप्रदेश व जगातील लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकसंख्या ब्रिक्स देशांमध्ये एकवटलेली आहे. या गटातील देशांच्या अर्थव्यवस्थांचा झपाट्याने विकास होत आहे. त्याचा फायदा जागतिक अर्थव्यवस्थेतील साधनांच्या सुसूत्रीकरणासाठी नक्कीच होऊ शकेल.
जागतिक जीडीपीमध्ये ब्रिक्स देशांचा वाटा २७ टक्के म्हणजे रकमेच्या स्वरूपात १५.४ ट्रिलियन डॉलर इतका आहे. गेल्या दहा वर्षांत या गटातील देशांच्या अर्थव्यवस्थेत सुमारे चार पट वाढ झाली आहे. म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये या देशांचा ५० टक्के इतका वाटा राहिला आहे. गेल्या वर्षी जीडीपीच्या सरासरी वाढीत ब्रिक्स देशांचा वाटा ४ टक्के इतका राहिला आहे. त्या तुलनेत जी-७ देशांचा वाटा अवघा ०.७ टक्के इतका होता.
बलाढ्य अमेरिकेला ब्रिक्स गटातील देश २०१८ पर्यंत आर्थिकदृष्ट्या मागे टाकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. तर २०२० पर्यंत ब्रिक्स गटातल्या प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही कॅनडा या देशापेक्षा मोठी झालेली असेल. गोल्डमॅन सॅच या आर्थिक पाहणी संस्थेने असा अंदाज व्यक्त केला आहे की, ब्रिक्स गटातील पाच देश २०५० पर्यंत जागतिक अर्थव्यवस्था व पतव्यवस्थापनात अग्रणी भूमिका बजावू लागलेले असतील.
दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे २०१३ मध्ये झालेल्या पाचव्या परिषदेमध्ये ब्रिक्स देशांनी १०० अब्ज डॉलरचा सामायिक राखीव चलननिधी उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आर्थिक संकटाच्या काळात हा निधी ब्रिक्स गटांतील देशांना तारणहार ठरू शकेल, ही या निर्णयामागची प्रेरणा आहे. ब्रिक्स गटातील कोणत्याही देशावर आर्थिक दुरवस्था ओढवली तर या निधीतून त्या देशाला तत्काळ मदत करून त्याची अर्थव्यवस्था सावरता येऊ शकेल. विद्यमान काळात आर्थिक पेचप्रसंगात सापडलेल्या देशांना इंटरनॅशनल मॉनिटरी फंड (आयएमएफ) या संस्थेकडून अर्थसाहाय्य केले जाते.
आयएमएफमधील आपल्या अधिकारांत वाढ केली जावी, अशी मागणी वारंवार ब्रिक्स देशांनी केलेली होती. डॉलर, येन, ब्रिटिश पौंड, युरो ही चलने आयएमएफने रिझर्व्ह करन्सी गटात ठेवली असून त्यात युआन या आपल्या चलनाचा समावेश करावा, अशी मागणी चीनने लावून धरली आहे.
ब्रिक्स देशांनी एकत्र येऊन नवी डेव्हलपमेंट बँक स्थापन करण्याचाही विचार आहे. या बँकेने ब्रिक्स देशांमधील विविध प्रकल्पांमध्ये दीर्घकालीन आर्थिक गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. या गटातील देशांना आपापल्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये पुरेशी व दीर्घकालीन थेट परकीय गुंतवणूक मिळविण्यात अनेक अडचणी येतात. त्याकरिता ही डेव्हलपमेंट आंतरराष्ट्रीय राजकारणात सिरियाच्या प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले असून तेथे आंतरराष्ट्रीय लष्करी कारवाई केली जाऊ नये, अशी भूमिका ब्रिक्स देशांनी घेतली होती. इतकेच नव्हे तर लिबिया, सुदान, आयव्हरी कोस्ट, सोमालिया या देशांतील समस्यांबाबतही ब्रिक्स गटांनी सामायिक व समंजस भूमिका घेतली होती.
या गटातील देशांमध्ये आरोग्य, ऊर्जा, शिक्षण, क्रीडा, पर्यटन, दहशतवादाविरुद्ध लढा, माहिती-तंत्रज्ञान विकास, भ्रष्टाचार निर्मूलन, अमली पदार्थांची तस्करी रोखणे, अशा क्षेत्रांमध्ये परस्परांना उत्तम सहकार्य करण्याचेही ठरले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थव्यवस्थेत विशेष भूमिका बजावणार्‍या ब्रिक्स देशांची येत्या १४ ते १६ जुलै या कालावधीत होणारी परिषद सर्वार्थाने लक्षणीय ठरेल.

Saturday, June 28, 2014

कुस्तीपटूंच्या सेक्युलर तालमी - पी. साईनाथ यांचा मी अनुवादित केलेला लेख - दै. दिव्य मराठी २९ जून २०१४



  पी. साईनाथ या प्रख्यात पत्रकाराने लिहिलेला व मी अनुवादित केलेला महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेविषयीचा लेख दै. दिव्य मराठीच्या २९ जून २०१४च्या अंकात प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाच्या दोन लिंक्स व जेपीजी फाईल.
divyamarathi.bhaskar.com/article/MAG-p-sainath-article-about-kushti-4662959-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/29062014/0/4/
---
कुस्तीपटूंच्या सेक्युलर तालमी
-------
पी. साईनाथ
----
ती आहे कुस्तीचे प्रशिक्षण मिळण्याची जागा. त्या वास्तूच्या प्रवेशद्वारावरील फलकावर लिहिलेले असते, ‘तालीम’ (शिक्षणाला उर्दूतील प्रतिशब्द) आणि कुस्तीगिरांचे आराध्यदैवत असलेल्या हनुमानाची प्रतिमाही दिसते. यातून घडते, संस्कृतीच्या बहुढंगी पैलंूचे दर्शन. जिथे कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते, त्या स्थानाला पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ‘आखाडा’ नव्हे तर ‘तालीम’ म्हणतात. त्यातून थेट नाळ जुळते, ती फाळणीपूर्व पंजाब प्रांतातील शंभर वर्षांपूर्वीच्या तालमींशी. या नात्याची वीण विशेष घट्ट झाली ती, कोल्हापूर संस्थानचे महाराज व अग्रणी समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या राजवटीत. फाळणीपूर्व भारतामधील विविध भागांतून विशेषत: पंजाब प्रांतातील कुस्तीगिरांना शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सन्मानाने बोलावले होते व त्यांना आश्रय दिला होता.
तेव्हापासून आजपावेतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणार्‍या कुस्ती स्पर्धांमध्ये पाकिस्तान, इराण, तुर्कस्थान तसेच आफ्रिका खंडातल्या काही देशांमधील कुस्तीगीरही सहभागी होतात. या कुस्ती स्पर्धा बघायला येणार्‍या पुरुष प्रेक्षकांमधील अनेक जण पाकिस्तान व इराणमधील कुस्तीगिरांचेही चाहते आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील आमदार विनय कोरे म्हणाले, ‘विदेशांतील कुस्तीगिरांना आमच्या भागात मोठी पसंती आहे.’ वारणानगर येथे देशातील सर्वात मोठे कुस्तीचे मैदान आहे. येथे दरवर्षी 13 डिसेंबरला कुस्तीची जंगी स्पर्धा होते. मॅटवर खेळली जाणारी कुस्ती दोन मिनिटांतही निकाली निघू शकते, पण मातीत खेळली जाणारी कुस्ती तब्बल 25 मिनिटांपर्यंत सलग चालू शकते.
महाराष्ट्रातील तालमींमधल्या गुरूंना वस्ताद म्हणतात. कुस्तीच्या प्रशिक्षणाबरोबरच आपल्या शिष्यांना ते देत असलेली नैतिक शिकवण ही आध्यात्मिक व सेक्युलर स्वरूपाची असते. अनेक वस्ताद आपल्या शिष्यांना गामा या कुस्तीगिराचा (आयुष्यात एकाही कुस्ती स्पर्धेत न हरल्याने गामा हा जगातला सर्वश्रेष्ठ कुस्तीगीर ठरला.) आदर्श डोळ्यासमोर ठेवायला सांगत असतात. पंजाब प्रांतातील रहिवासी असलेला गामा फाळणीनंतर पाकिस्तानातच राहिला. फाळणीच्या वेळी दंगे उसळलेले असताना, गामा आपल्या शेजारील हिंदू कुटुंबांच्या रक्षणासाठी एखाद्या पहाडासारखा दंगेखोरांसमोर उभा ठाकला होता. कोणताही कुस्तीगीर गामासारखाच निधड्या छातीचा असला पाहिजे, ही भावना कुस्तीप्रेमींमध्ये खोलवर रुजली ती तेव्हापासून.
कोल्हापूर शहरातल्या एका तालमीतले प्रख्यात वस्ताद आप्पासाहेब कदम यांनी सांगितले की, ‘कुस्तीगिरांना देण्यात येणारे नैतिकतेचे धडे त्यांच्या प्रशिक्षणाचे आवश्यक अंग आहे. नीतिमूल्यांचे धडे न मिळालेला कुस्तीगीर बिघडण्याची शक्यता अधिक असते.’ त्यामुळे महाराष्ट्रातील कुस्तीगिरांची प्रतिमा इतर राज्यांतील कुस्तीगिरांपेक्षा नक्कीच चांगली आहे. खेळांबद्दल असलेले प्रेम व आदरातिथ्याचे संस्कार महाराष्ट्राच्या मातीत रुजले आहेत. मग ते कुंडल असो वा वारणानगर येथे होणार्‍या कुस्तीच्या महास्पर्धा. लोकांच्या वागण्यातून आपल्याला त्यांचे क्रीडाप्रेम जाणवत राहते. तालमींमधील वस्ताद, कुस्तीगीर हे सारे ग्रामीण भागातील शेतकरी किंवा मजूर कुटुंबातून आलेले असतात. निदान पश्चिम महाराष्ट्रापुरते तरी हे खरे आहे, असे माजी ऑलिम्पिक कुस्तीगीर व कुस्ती क्षेत्रातील गुरुवर्य गणपतराव आंधळकर यांनी सांगितले. एशियाड, कॉमनवेल्थ, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये कुस्तीत पदके जिंकलेले काका पवार म्हणाले की, कुस्ती, उसाचे मळे व तमाशा यांचे अतूट असे नाते आहे. काका पवार यांची पुण्यामध्ये तालीम आहे.
तमाशा आणि कुस्तीसाठी शिस्तबद्ध अदाकारी व लोकाश्रय आवश्यक असतो. कुस्ती पाहायला येणारे बहुसंख्य प्रेक्षक हिंदूधर्मीय असतात. पूर्वीपेक्षा कुस्तीमध्ये आता अधिक वैविध्य आले आहे. पूर्वी कुस्तीमध्ये मराठा समाजातील कुस्तीगीरांचे वर्चस्व होते. मात्र, आता धनगर समाजातील कुस्तीगीरही आपला ठसा उमटवत आहेत. सोलापूर जिल्ह्यात सध्या मुस्लिम समाजातील कुस्तीगिरांनाही मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये कुस्तीला सध्या कमी महत्त्व देण्यात येत असल्याबद्दल बहुतांश वस्ताद चिंता व्यक्त करतात. आम्ही ज्या ज्या तालमींना भेटी दिल्या, तिथे या चिंतेचे सावट दिसले. ‘मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेल्या महाराष्ट्रापेक्षा पंजाब, हरयाणामध्ये कुस्तीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाते. पंजाब व हरियाणामध्ये कुस्तीगिरांना पोलिस व सुरक्षा दलांमध्ये मोठ्या पदांवर नियुक्त केले जाते. महाराष्ट्रात मात्र कुस्ती खेळातून बाहेर पडल्यानंतर कुस्तीगिरांना मजुरी करणे नशिबी येते. महाराष्ट्रात काही नामवंत कुस्तीगिरांना पोटापाण्याकरिता सरतेशेवटी साखर कारखान्यांमध्ये रखवालदाराची नोकरी पत्करावी लागली होती.’ अशी करुण कहाणीही कुस्ती क्षेत्रातील वस्तादांनी ऐकविली. राजकीय नेते हे संधीसाधू असतात. ‘कुस्ती पाहण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. तो जनाश्रय पाहून राजकारण्यांचे पायही कुस्तीच्या मैदानाकडे वळतात. काही राजकीय नेते कुस्ती संघटनांचे प्रमुख आहेत. तरीही या खेळाला त्याचा काहीही फायदा झालेला नाही. मा
जी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे राज्यातील कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. पण आपण त्या पदावर आहोत, हे त्यांना आठवत तरी असेल का?’ असे उपहासाने विचारून एका वस्तादाने सांगितले की, कुस्तीचे मैदान पूर्वी गाजविलेले दोन कुस्तीगीर आता विद्यमान आमदार आहेत. पण त्यांचेही कुस्ती व कुस्तीगीरांकडे लक्ष नाही.
समाजामध्ये झालेले बदल, संस्कृतीचे बदललेले रुपडे, पाण्याची तीव्र टंचाई, तसेच राज्यपातळीवर होत असलेला कानाडोळा यामुळे कुस्ती खेळाची सध्या परवड सुरू आहे. गणपतराव आंधळकर म्हणतात, ‘कुस्तीगिरांचे आयुष्य हे अदृश्य तपश्चर्येप्रमाणेच असते. क्रिकेटपटूला छोटीशी जरी जखम झाली, तरी प्रसारमाध्यमे त्याचा प्रचंड गवगवा करतात. पण एखादा कुस्तीगीर निधन पावला, तर त्या घटनेची साधी दखलही घेतली जात नाही.’ कुस्ती व कुस्तीगिरांचे आयुष्य सध्या महाराष्ट्रात खडतर आहे ते असे...
psainath@gmail.com
(अनुवाद - समीर परांजपे)