Monday, July 6, 2015

डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट - - समीर परांजपे. दै. दिव्य मराठीच्या दि. ५ जुलै २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या रसिक या रविवार पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा हा लेख,



दै. दिव्य मराठीच्या दि. ५ जुलै २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या रसिक या रविवार पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा हा लेख, त्या लेखाची टेक्स्ट व इ-पेपर वेबलिंक व जेपीजी फाईल सोबत दिली आहे. 
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-book-analysis-by-same…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/05072015/0/5/
---
डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट
---
- समीर परांजपे
sameer.p@dbcl.co.in
---
भारतीय लष्कराला जगाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. मात्र चीनबरोबर झालेल्या पराभवामुळे भारतीय लष्करासाठी तो कलंक ठरला. भारतीय लष्कर शौर्यामध्ये कुठे कमी पडले असे त्यावेळी झाले नाही. तर राजकीय स्तरावर घेतले गेलेले काही चुकीचे निर्णय या पराभवाच्या मुळाशी होते. भारताला चीनपासून जो धोका होता त्याची तीव्रता लक्षात येऊनही तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन व त्यांच्यावर विसंबून राहिलेल्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी त्याकडे कानाडोळा केला.
--
१९६२च्या युद्धाची समग्र मीमांसा करणाऱ्या मराठी पुस्तकाची उणीव मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी लिहिलेल्या `न सांगण्याजोगी गोष्ट' या पुस्तकाने भरुन काढली आहे. 
---
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताची शेजारी राष्ट्रांशी जी युद्धे झाली त्यापैकी फक्त एका युद्धात आपल्याला पराभव पत्करावा लागला तो म्हणजे १९६२ साली चीनशी झालेल्या युद्धात. हा पराभव तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी खूपच मनाला लावून घेतला होता. ही हार पत्करावी पं. जवाहरलाल नेहरु, त्यावेळचे संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांच्यामुळेच पत्करावी लागली असा आरोप विरोधकांनी केला होता. `काँग्रेसमुक्त' भारत करण्याच्या नरेंद्र मोदींच्या घोषणाकाळात सध्या या आरोपाचे पडसाद जास्त तीव्रतेने ऐकायला मिळतात. चीन विरुद्ध भारत या युद्धाचे िवश्लेषण करणारी पुस्तके तुलतेने इंग्रजीत जास्त असली तरी मराठीमध्ये या विषयावर फारच तुरळक ग्रंथ आहेत. १९६२च्या युद्धाची समग्र मीमांसा करणाऱ्या मराठी पुस्तकाची उणीव मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी लिहिलेल्या `न सांगण्याजोगी गोष्ट' या पुस्तकाने भरुन काढली आहे. 
भारत विरुद्ध चीन युद्धाचा आढावा घेताना पित्रे त्याआधीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून सुरुवात करुन दोन्ही देशांतील सध्याच्या संबंधांपर्यंत या विषयाचा पट पुस्तकामध्ये िवस्तारत नेतात. तुम्ही महाराष्ट्रीय म्हणजे..., सीमावादाचा मागोवा, रुंदावणारी दरी, कलहाचा उगम, युद्धाचे पडघम, एकदाचा भ्रमनिरास, मानखंडनेची परिसीमा, लडाखचा रणयज्ञ, पाच दशकांची वाटचाल या दहा प्रकरणांतून भारत व चीनमधील युद्ध, तणाव, संबंधांबद्दल आजवर मराठीत न आलेली खूप वेगळ्या प्रकारची माहिती वाचकासमोर येते. ब्रिटिशांनी भारतामध्ये आपले साम्राज्य स्थापन केले असले तरी त्यांच्या मनात रशिया, चीनबद्दल कायम साशंकता होती. त्याच्या परिणामी चीनबरोबर ब्रिटिश इंडियाच्या सीमांची आखणी करण्याचे ब्रिटिशांचे प्रयत्न तडीस गेले नाहीत. याबाबत शशिकांत पित्रे यांनी नोंदविलेले िनरीक्षण खूपच मार्मिक आहे. ते म्हणतात की, `१९१४मध्ये आखलेल्या मॅकमहॉन रेषेतही संदिग्धता निर्माण झाली. आपले पत्ते कधीच न उलगडणाऱ्या बेरकी चिनी राजनीतीच्या हे पथ्यावर पडणे स्वाभाविकच होते. १९४७मध्ये या अधांतरी सीमा स्वतंत्र भारताच्या पदरात वारसाहक्काने पडल्या. १९५०मध्ये चीनमध्ये नव्याने सत्तेवर आलेल्या साम्यवादी सरकारने तिबेटचा ताबा घेतला. त्यापश्चात आरंभ झाला एकाधिकारवादी बेरकी चिनी राजकारणी आणि आदर्शवादाने झपाटलेले लोकशाहीवादी भारतातील राज्यकर्ते यांच्यातील सारीपाटावरील बुद्धिबळाचा खेळ. १९६२च्या युद्धाची सारी पाळेमुळे या परिस्थितीत आहेत.'
१९५६मध्ये जमीन सुधारणेचा कायदा चीनने तिबेटमध्ये लागू केला. त्यानंतर चिनी विरुद्ध तिबेटी हा संघर्ष अधिक तीव्र झाला. १९५८ मध्ये तिबेटी लोकांनी पुकारलेली क्रांती चेचून काढण्यासाठी चीनने राक्षसी कारवाईला सुरुवात केली. अखेर १७ मार्च १९५९ रोजी तिबेटींचे धर्मगुरु दलाई लामांनी आठ अनुयायांसह गुप्तपणे ल्हासा सोडले व ३१ मार्च रोजी तवांगमध्ये प्रवेश केला. दलाई लामा व त्यांच्या सहकाऱ्यांना भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी प्रथम मसुरी व नंतर हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे वास्तव्यासाठी परिसर उपलब्ध करुन दिला. तिबेट हे सार्वभौम राष्ट्र असल्याचे दलाई लामा यांनी भारतात राहून केलेले वक्तव्य चीनला अजिबात पसंत पडले नव्हते. अशा अनेक गोष्टींचा राग मनात धरुन चीन भारताच्या विरोधात एक एक पाऊल टाकत होता.
पं. नेहरु यांचे पंचशील धोरण, त्यांचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरील प्रभाव हे १९५०-६०च्या दशकात विशेषत्वाने जाण‌वत होता. भारताचे शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले असावेत असे पं. नेहरुंचे प्रयत्न होते. त्यातूनच हिंदी चिनी भाई भाई या घोषणेचा उगम झाला होता. चीनबरोबर उत्तम संबंध राखण्यामागे नेहरुंची तात्विक व व्यावहारिक दृष्टी होती. मात्र त्यांच्या या धोरणाला स्वप्नाळू म्हणून हिणविले गेेले. चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर पहिले दोषाचे धनी बनले ते पं. नेहरु. या घटना नेमक्या कशा घडत गेल्या याचे सविस्तर विश्लेषण या पुस्तकात शशिकांत पित्रे यांनी केले आहे. 
भारतीय लष्कराला जगाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. मात्र चीनबरोबर झालेल्या पराभवामुळे भारतीय लष्करासाठी तो कलंक ठरला. भारतीय लष्कर शौर्यामध्ये कुठे कमी पडले असे त्यावेळी झाले नाही. तर राजकीय स्तरावर घेतले गेलेले काही चुकीचे निर्णय या पराभवाच्या मुळाशी होते. भारताला चीनपासून जो धोका होता त्याची तीव्रता लक्षात येऊनही तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी त्याकडे कानाडोळा केला. काही साम्यवादी नेत्यांनी बहकवल्यामुळेही मेनन असे वागले असावेत असा विश्लेषकांचा होरा आहे. मेनन यांच्या मताला नेहरुंनी महत्व दिल्याने तेही अडचणीत आले. चीन अत्यंत आक्रमक पावले टाकत असून त्यापासून संरक्षण करण्यासाठी भारताने शस्त्रसज्जता तसेच इतर राजकीय बाबींकडे लक्ष द्यायला हवे असे आपल्या अहवालात लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांनी केंद्र सरकारच्या गृहखात्याला त्यावेळी दिलेल्या अहवालात नमुद केले होते. पण त्यांच्या अहवालाकडे मेनन यांनी साफ दुर्लक्ष केले. या अहवालानूसार पावले उचलली गेली असती तर चीनविरुद्धच्या युद्धात कदाचित भारताची कमी प्रमाणात हानी झाली असती. २० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने लडाख, आताच्या उत्तराखंडचा सीमाभाग, नेफा (आताचा अरुणाचल प्रदेश) या भागात हल्ले चढविले. युद्धसज्जतेत कमतरता असल्याने भारतीय लष्कराला या प्रत्येक आघाडीवर मार खावा लागला. भारतीय लष्कराचे तत्कालीन प्रमुख देखील या ढिलाईस तितकेच जबाबदार होते. चीनविरुद्धच्या युद्धानंतरच्या काही अहवालांत या अधिकाऱ्यांवरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. 
माओ झेडाँग व जवाहरलाल नेहरु यांच्यातील संवादांचा आधार घेतला तर भारत चीनच्या बाबतीत खूपच गाफील राहिला असे म्हणता येईल. १९६२च्या युद्धामध्ये भारतीय हवाई दलाला शत्रूवर हल्ले चढविण्याची परवानगी राज्यकर्त्यांनी नाकारली. लष्कराला अन्न, पाणी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे इतक्या पुरतेच हवाई दलाची कामगिरी मर्यादित ठेवण्यात आली होती. भारताचे हवाई दल चीनच्या हवाई दलाच्या तुलनेत काही बाबतीत सरस होते असे त्यावेळच्या काही संरक्षणतज्ज्ञांचे मत होते. भारतीय लष्कराला चीन युद्धादरम्यान अन्नपाणी, संरक्षणविषयक सामुग्री यांची रसद ज्या नियमितपणे मिळायला हवी होती तशी ती मिळू शकली नव्हती. शस्त्रास्त्रांपासून अनेक गोष्टींचा तुटवडा होता. जवाहरलाल नेहरु यांचे कृष्ण मेनन यांच्यावर प्रमाणापेक्षा जास्त िवसंबून राहाणे हे साऱ्या देशाच्याच मुळावर आले. या युद्धानंतर चीनने भारताचा गिळलेला भूभागही अजून आपण परत मिळवू शकलेलो नाही. त्याशिवाय भारताच्या काही भूभागावर चीन अजूनही हक्क सांगतोच आहे.
१९६२च्या चीन युद्धामध्ये अशा अनेक घडामोडी घडल्या की ज्याचे सविस्तर विश्लेषण `न सांगण्याजोगी गोष्ट' या पुस्तकामध्ये आले आहे. मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी लष्करी, राजकीय अशा साऱ्या बाजू तपासून चीन युद्धाची सांगितलेली गोष्ट डोळ्यात अंजन घालणारी आहे...त्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे...
पुस्तकाचे नाव - न सांगण्याजोगी गोष्ट, 
लेखक - मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे, 
प्रकाशक - राजहंस प्रकाशन,
पृष्ठसंख्या - ४०२,
मुल्य - ३७५ रुपये.