Friday, July 28, 2017

`शेंटिमेंटल' या मराठी चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी वेबसाइट - २८ जुलै २०१७.

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवर मराठी कट्टा या सेगमेंटमध्ये शेंटिमेंटल या नव्या मराठी चित्रपटाचे मी दि. 28 जुलै 2017 रोजी केलेले परीक्षण. त्याची लिंक व मूळ मजकूर पुढे दिला आहे.
---
`शेंटिमेंटल' - पोलिसांच्या जीवनशैलीचा क्लिअर एक्स-रे
----
- समीर परांजपे
---
चित्रपट - शेंटिमेंटल
-
रेटिंग - ३ स्टार
--
कलावंत - अशोक सराफ, उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुवीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर,उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी. 
निर्माता - अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके
कथा, पटकथा , संवाद, दिग्दर्शन – समीर पाटील
संगीत – मिलिंद जोशी
श्रेणी - फॅमिली ड्रामा 
---
पोलिसांच्या जीवनावर आधारित `शेंटिमेंटल' हा नवा मराठी चित्रपट पाहाताना काही गोष्टी आठवल्या. चित्रपटांमध्ये पोलिसांना एकतर भ्रष्ट दाखविले जाते. किंवा पोलिस किती चांगले काम करतात याचे आदर्शवादी चित्रण मराठी, हिंदी वा अन्य भाषांतील चित्रपटांमध्ये केले जाते. शेंटिमेंटल चित्रपटामुळे गतकाळातील पांडू हवालदार या चित्रपटाची आठवण होणे स्वाभाविक आहे. १९७५ साली झळकलेल्या व दादा कोंडके यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात पांडू हवालदाराची भूमिका दादा कोंडके व त्यांच्या पोलिस सहकाऱ्याची भूमिका अशोक सराफ यांनी केली होती. त्यात अशोक सराफ यांनी साकारलेला पोलिस हवालदार लाचखोर दाखविला होता. शेंटिमेंटलमधील अशोक सराफ यांनी साकारलेला पोलिस उपनिरीक्षक हा थोडाफार हात मारणारा पण दिलदार मनाचा व सर्वांची काळजी करणारा आहे. 
कथा - पोलिसांच्या जीवनशैलीचे दर्शन घडविणारी, त्यांच्या व्यथांवर भाष्य करणाऱ्या शेंटिमेंटल चित्रपटाची कथा फिरते आहे मुंबई पोलिसांभोवती. चित्रपटाची सुरुवात छान केली आहे. मुंबई पोलिस दलामध्ये ४० हजारांहून अधिक पोलिस असले तरी त्यातील सुमारे २१ हजार पोलिस व्हीआयपी लोकांच्या सुरक्षेत गर्क असतात. बाकीचे पोलिस सव्वा कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असतात. त्यातून कामादरम्यान येणारे प्रचंड ताणतणाव, पोलिसांना रजा मंजूर करुन घेताना करावी लागणारी यातायात, पुरेसा पगार नसल्याने पोलिसांमध्ये बळावलेली हप्ताखोर वृत्ती, त्यातून वरपासून खालपर्यंत होणारा प्रचंड भ्रष्टाचार. असे पोलिसांच्या जीवनपद्धतीचे एकेक दर्शन छोट्याछोट्या प्रसंगातून प्रारंभीच घडवत हा चित्रपट आपल्याला घेऊन जातो अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर पोलिस ठाण्यामध्ये. तिथे आपल्याला प्रल्हाद घोडके (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक), दिलीप ठाकूर (सहाय्यक पोलीस निरीक्षक), सुभाष जाधव – (पोलीस निरीक्षक), सुनंदा साळोखे, डी. एन. नगर पोलीस चौकीचे मुख्य पोलिस अधिकारी दणाईत असे सारे त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यानूसार भेटतात. त्यातील प्रल्हाद घोडके हे सहाय्यक पोलिस निरीक्षक सेवेतून निवृत्त व्हायला फक्त दोन वर्षे शिल्लक आहेत. एमपीएससी परीक्षा देऊन अगदी नव्याने पोलिस निरीक्षक बनलेला सुभाष जाधव हा पोलिसी खात्यातला अनुभवांना अजून सरावलेला नाही. त्यामुळे त्याच्यातला नवथरपणा कामातही जाणवतो. सुभाष जाधव सुनंदा साळोखे ही महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या एकमेकांच्या प्रेमात आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर हा अतिशय व्यवहारी अधिकारी. हप्तेही चलाखीने घेतो व पोलिसाच्या नोकरीचे फायदेही. या डी. एन. नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी संदीपान जांभळे यांच्या हाताखाली बाकीचे पोलिस कर्मचारी कार्यरत असतात. व या पोलिस ठाण्याचा प्रमुख अधिकारी असतो ते म्हणजे दणाईत साहेब. या सगळ्यांची एक उतरंड ठरलेली असतात. वरच्या पदावरील माणसाने आदेश द्यायचा व कनिष्ठ स्तरावरील माणसाने तो आदेश पाळताना चाकराला पडचाकर शोधायचा. पोलिसांच्या रोजच्या दिवसाची सुरवात होते कोणाच्या तरी खूनाच्या बातमीने व दिवस सरतो कुणावर तरी झालेल्या बलात्काराच्या बातमीने. त्यामुळे त्यांची मने पार बधीर झालेली असतात. पोलिसांमधील माणूसकी कमी होऊन त्याची जागा प्रत्येकावर संशय घेणे याच मनोवृत्तीने घेतलेली असते. पोलिस क्वार्टर्समधील घरे ही वाईट स्थितीत आहेत. पोलिसांच्या अपुऱ्या उत्पन्नामुळे त्यांचे कुटुंबिय सुखी नाहीत, कितीही हप्ते खाल्ले तरी नोकरीतील तणावामुळे तब्येतीही ठीक नाहीत अशा कात्रीत सापडलेल्या पोलिसांचे प्रतिनिधी आपल्याला या चित्रपटातील डी. एन. नगर पोलिस ठाण्यात दिसू लागतात. काही ज्वेलर्सकडे झालेल्या चोरी प्रकरणी पोलिस तपास सुरु असतो. दिलीप ठाकूर, प्रल्हाद घोडके, सुभाष जा‌धव ही पोलिस मंडळी मनोज पांडे या मूळचा बिहारी पण आता विरारमध्ये राहात असलेल्या गुंडाचा माग काढत असतात. मनोज पांडेला अटक करण्यात तसेच त्याच्याकडून चोरी केलेल्यापैकी अर्धा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश येते. पण बाकीचा अर्धा मुद्देमाल मनोज पांडे याने बिहारमधील मोतीहारी या आपल्या गावच्या घरी लपवून ठेवलेला असतो. हे सत्य चौकशीतून पुढे येताच डी. एन. नगर पोलिस ठाण्यातून एक पथक बिहारला जायला निघते. पोलिसांच्या रोजच्या ताणतणावाच्या कामातून थोडी मोकळीक या दृष्टीने दिलीप ठाकूर, प्रल्हाद घोडके, सुभाष जा‌धव हे तिघे बिहारच्या दौऱ्याकडे पाहू लागतात. सोबत मनोज पांडे या चोरालाही साहजिकच घेतलेले असते. हे चौघे ट्रेनने बिहारला रवाना होतात. मनोज पांडे चोर का बनला याची कहाणीही या तिघा पोलिसांना या प्रवासातच तो सांगतो. मनोजच्या ओळखीचे लोक गाडी जशी बिहारच्या हद्दीत प्रवेश करते तसे भेटू लागतात. मोतीहारी येथे मनोज पांडेच्या घरी गेल्यानंतर त्याचे आजोबा म्हणजे ताऊजी या चौघांचे उत्तम स्वागत करतात. आपल्या घरातील मुलीचे लग्न असून ते आटपल्यानंतरच तुम्ही सर्वांनी मुंबईला परत जायचे असा प्रेमळ आग्रह ताऊजी दिलीप ठाकूर, प्रल्हाद घोडके, सुभाष जा‌धव यांना करतात. मनोज पांडे चोर असून त्याच्याबरोबर आलेले तिघेजण हे पोलिस आहेत हे सत्य ताऊजींपासून हे सगळेजण लपवून ठेवतात. मनोज हा उच्चशिक्षित पण परिस्थितीमुळे चोर बनलेला असतो. तो आपल्या बरोबरील पोलिसांना गुंगारा न देता त्यांना आपल्या घरात लपविलेला चोरीचा बाकीचा दाखवतो. ते दागिने ताब्यात घेऊन मनोज पांडेसह तीनही पोलिस अधिकारी मोतीहारीवरुन मुंबईत परत येण्यासाठी सज्ज होतात. पण त्या आधीच अनेक घटना घडतात. इतके दिवस आपल्या घरात राहिलेले तीन जण हे पोलिस अधिकारी आहेत हे ताऊजींना कळते का? मनोज पांडेकडून सर्व दागिने मिळविल्यानंतर या तीनही पोलिसांचा त्यांच्या खात्याकडून गौरव होतो की त्यांना तुच्छतेची वागणूक दिली जाते? असे काही प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे मिळविण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय - `शेंटिमेंटल' या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण आहे ते म्हणजे अशोक सराफ यांनी साकारलेला प्रल्हाद घोडके हा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. अशोक सराफ यांनी ही भूमिका ज्या सहजतेने केली आहे त्यामुळे या चित्रपटात प्रसन्नता आली आहे. सराफ यांनी साकारलेला पोलिस हा वास्तवातील वाटतो. त्याच्या सांसारिक चिंता, त्याची इतर सर्वांबद्दल असलेली कणव, आत्मीयता हे सर्व अशोक सराफ यांनी उत्तमरित्या दाखविले आहे. दिलीप ठाकूर (सहाय्यक पोलीस निरीक्षक) या पात्राच्या भूमिकेतील उपेंद्र लिमये, सुभाष जाधव – (पोलीस निरीक्षक)च्या भूमिकेतील विकास पाटील या कलाकारांनी अशोकमामांना उत्तम साथ दिली आहे. मुंबई पोलिसांचे पथक तपासासाठी िबहारमधील मोतीहारी या गावी जाते त्यावेळी मनोज पांडे याचे ताऊजी म्हणजे रघुवीर यादव यांनी अस्सल बिहारी माणूस जो काय ठसक्यात उभा केला आहे तो लाजवाबच आहे. बिहारमधील वातावरण, तेथील पोलिस यांचे चित्रपटात झालेले चित्रीकरण हे वास्तवाला धरुन आहे. त्यामुळे काही प्रसंगात हसता हसता पुरेवाट होते. मनोज पांडे या चोराची भूमिका सुयोग गोऱ्हे याने केली आहे. बसस्टॉप हा सुयोगचा पहिला मराठी चित्रपट. त्या तुलनेत त्याची शेंटिमेंटल चित्रपटातील भूमिका मोठी आहे. तिला त्याने योग्य न्याय दिला आहे. सुनंदा साळोखेच्या भूमिकेतील पल्लवी पाटील, रमेश वाणी, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी, माधव अभ्यंकर आदी कलाकारांनी अशोक मामा व त्यांच्यासोबतचे दोन पोलिस अधिकारी यांना अभिनयाच्या कामात उत्तम साथ दिली आहे. चित्रपट कधी गंभीर होतो तर कधी विनोदी वळण घेतो. ते प्रसंग साकारण्यात कलाकार कुठेही कमी पडत नाही हे या चित्रपटाचे मोठे यश आहे.
दिग्दर्शन - या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. पोलिसांचे वास्तव जीवनदर्शन चित्रपटात घडविताना देखील चित्रपटात पुरेपूर मनोरंजन ठासून भरण्याचे कौशल्य पाटील यांना साधले आहे. पोलिसांमधील माणुसकी दाखवितानाच त्यांच्यातील खाबुगिरी वृत्तीही तितक्याच बेधडकपणे समीर पाटील यांनी दाखविली आहे. पोलिस किती वाईट व पोलिस किती चांगला यापैकी कोणतीही एक बाजू न घेता त्यांनी दोन्ही बाजू संयमाने दाखविल्या. हा तोल बऱ्याच जणांना सांभाळता येत नाही. या चित्रपटात बिहारमधील जे प्रत्यक्ष चित्रण आहे तेही खूप महत्वाचे आहे. बिहारमध्ये अशा प्रकारे चित्रीकरण होणारा हा बहुधा पहिलाच मराठी चित्रपट असावा. या चित्रपटाच्या अखेरीस प्रल्हाद घोडके हे पात्र सर्वांनाच उद्देशून जे भाषण करते त्यात पोलिसांच्या व्यथांबरोबरच त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी काय करायला हवे याबद्दल सुंदर चिंतन आहे. त्यात पोलिसांनी नोकरी करत असताना सेंटिमेंटल राहाणेही कितीही गरजेचे आहे हे सांगितलेले आहे. समीर पाटील यांनी हा चित्रपट करताना पोलिसी जीवनशैलीचा खूप बारकाईने विचार केला आहे हे जाणवत राहाते. मनाला आल्हाद देतानाच दुसऱ्या बाजूला चटकेही देणारा हा चित्रपट आहे. त्याचे श्रेय दिग्दर्शकालाही आहेच. त्यामुळेच हा चित्रपट जणू पोलिसांच्या जीवनशैलीचा क्लिअर एक्स-रे बनला आहे.
संगीत - शेंटिमेंटल या चित्रपटाला मिलिंद जोशी यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटातील गीते ही मिलिंद जोशी, दासू वैद्य, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. ती गाणी अवधूत गुप्ते, बेला शेंडे, शान, निहिरा जोशी देशपांडे, पावनी पांडे यांनी गायली आहेत. मिलिंद जोशी यांनी बिहारमधील वातावरणाचा ठसका, झटका एका आयटम साँगमधून बरोबर पकडला आहे. ते गाणे हा या चित्रपटाचा आकर्षणबिंदूच आहे.                                                                                                                         http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-REV-infog-movie-review-of-marathi-film-shentimental-5656473-PHO.html

No comments:

Post a Comment