Friday, July 7, 2017

कंडिशन्स अप्लाय : अटी लागू - दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंटसाठी दि. 5 जुलै 2017 रोजी या चित्रपटाचे केलेले परीक्षण. - समीर परांजपे

कंडिशन्स अप्लाय : अटी लागू  - दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी कट्टा सेगमेंटसाठी  दि. 5 जुलै 2017 रोजी या चित्रपटाचे केलेले परीक्षण. 
----
नातेसंबंधांची `तरुण' कहाणी
---
- समीर परांजपे
---
चित्रपट - कंडिशन्स अॅप्लाय : अटी लागू
--
रेटिंग - ३ स्टार
--
कलावंत - सुबोध भावे, दिप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, अतिशा नाईक, मिलिंद फाटक, डॉ. उत्कर्षा नाईक, राजन ताम्हाणे, विनीत शर्मा, रेवती लिमये, राधा कुलकर्णी.
निर्माता - डॉ संदेश म्हात्रे
दिग्दर्शक - गिरीश मोहिते
कथा, पटकथा, संवाद – संजय पवार
संगीत दिग्दर्शक – अविनाश – विश्वजीत
श्रेणी - कौटुंबिक चित्रपट
--
सध्या लग्न या विषयाभोवती अनेक मराठी चित्रपट येत आहेत. तुझं तू माझं मी हा त्या प्रकारचा अगदी ताजा चित्रपट. पण कंडिशन्स अल्पाय हा मराठी चित्रपट या लग्नपटांपेक्षा वेगळा आहे. लग्न करावे किंवा करु नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु जर लग्न करायचे नसेल तर आपल्याला जो कम्पॅनियन म्हणून अतिशय जवळचा वाटतो त्याच्याबरोबर एकत्र राहाताना लिव्ह इन रिलेशनशिपसारखेही काही पर्याय उपलब्ध आहेत. मात्र त्यातील एखादा पर्याय स्वीकारला की आपल्याला त्यातील खाचाखोचा कळू लागतात. नेमके याच गोष्टीच्या अंतरंगात कंडिशन्स अॅप्लाय : अटी लागू हा चित्रपट डोकावून पाहातो.
कथा - अभय केळकर हा एका प्रख्यात मोटार कंपनीचा जनरल मॅनेजर असतो. आजच्या पिढीतील हा युवक त्याची पहिली निष्ठा ही त्याच्या कामावर असते. त्याला ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये काही वेगळे करुन दाखवायचे असते. त्याने आयुष्यात एक गोष्ट ठामपणे ठरविलेली असते ती म्हणजे कधीही लग्न करायचे नाही. त्याला कारणही तसेच आहे. अभय पाच वर्षांचा असताना त्याचे हवाई दलात पायलट असलेले वडिल युद्धामध्ये शहीद होतात. हा अभय व त्याच्या आईसाठी मोठा हादरा असतो. परंतू त्याची आई कालांतराने पुर्नविवाह करते. लहानग्या अभयच्या मनावर त्यामुळे अजून एक ओरखडा उमटतो. आपली आई ही आपलीच असावी अशी त्याची धारणा असते. त्याला सावत्र वडील कधीही आवडत नसतात. तो त्यांच्या बरोबर राहात असला तरी तो स्वत:च्या मनाप्रमाणे जगण्याची व निर्णय घेण्याची सवय लावून घेतो. तो मोठा होईपर्यंतच्या काळात त्याची आई व सावत्र वडील यांच्याजवळ तो राहात असला तरी मनाने तो दोघांपासून लांबच असतो. दुसऱ्या बाजूला आरजे स्वराची समांतर जीवनकहाणी आहे. तिचे वडील रघुनाथ हळदणकर हे गायक तर आई गृहिणी. स्वरा ही आरजे बनते. मुळ मध्यमवर्गीय कुटुंबातील या मुलीचे एक वेगळे विश्व तयार होते. तिलाही कधी लग्न करायचे नसते. ती तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची, व्यक्तिमत्वाची जपणूक करण्यात कायम दंग असते. एक वर्तमानपत्र व रेडिओ चॅनेल यांच्या एका स्पर्धेच्या निमित्ताने स्वरा व अभय पहिल्यांदा समोरासमोर येतात. पण अभय स्वराची फारशी दखलही घेत नाही. ही गोष्ट स्वराला खूप लागते. एकदा आपल्या रेडिओ शोमध्ये फोनवर अभयशी बोलताना एक नाटकी प्रसंग घडवून ती त्याची फटफजिती करते. ही गोष्ट अभयच्या मनाला खूप लागते. तो त्या रेडिओ चॅनेलवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याच्या हालचालीत आहेत. त्याचवेळी स्वरा त्याला भेटून त्याती मनापासून माफी मागते. या प्रसंगानंतर त्या दोघांच्या भेटीगाठी सुरु होतात. दोघांनाही लग्न करायचे नसते त्यामुळे मामला खूपच साफ असतो. ते एकमेकांच्या जेव्हा जास्त जवळ येतात तेव्हा ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाण्यास सुरुवात करतात. त्या दोघांनाही कोणतीच जबाबदारी नको असते त्यासाठी लिव्ह इन रिलेशनशिप हा पर्याय उत्तम आहे असे त्यांचे मत असते. अभय हा तसा लहानपणापासून सुखवस्तू घराण्यात वाढलेला. तो एकत्र राहाताना घरातील कोणत्याही कामाला हात लावत नाही. हळुहळू घरातल्या काही जबाबदाऱ्या स्वरावर येऊन पडतात. त्यामुळे तिची चिडचिड होते. अशा अनेक प्रसंगांमुळे त्यांच्यातील मतभेद वाढत जातात व अखेर अभय केळकर स्वराबरोबर राहात असलेले घर सोडून दुसरीकडे राहायला जातो. लौकिकार्थाने ते लिव्ह इन रिलेशनशिपमधून मोकळे तर होतात पण परस्परांपासून लांब गेल्याने त्या दोघांच्या मनात भावनिक पोकळी निर्माण होते व ती त्यांना नेहमी खात राहाते. दरम्यान स्वराचे गायक असलेले वडील रघुनाथ हळदणकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन होते. त्यानंतर अभय व स्वरा पुन्हा एकमेकांना भेटू लागतात. परस्परांना ओढ आहे हे या दोघांना त्याक्षणी तीव्रतेने जाणवते. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणे हे अयशस्वी ठरले. आता एकत्र आल्यानंतर सहजीवनाचा कोणता पर्याय निवडायचा याचा विचार आता त्यांना करायचा असतो. अभय व स्वरा पुन्हा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागतात की लग्नाचा पर्याय स्वीकारतात याचे उत्तर पाहाण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. 
अभिनय - या चित्रपटाच्या बाजावरुन तो युवकांचा चित्रपट अाहे असे जाणवत असले तरी पडद्यावर दिसणारा अभय केळकर व स्वरा हे तिशीच्या आसपास पोहोचले असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यामुळे एकदम युवा नाही तर त्याहून अधिक मॅच्युरिटी असलेल्या तरुण लोकांची ही गोष्ट आहे. अभय केळकरच्या भूमिकेत सुबोध भावे अत्यंत संयत अभिनय केला आहे. वीस वर्षे जिच्याकडे दुर्लक्ष केले, तिला वाटेल तसे वागवले त्या आपल्या आईची माफी जेव्हा अभय मागतो तेव्हा सुबोधने केलेला अभिनय कमाल आहे. लग्न या संस्थेवर विश्वास नसलेला अभय, िलव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला तयार झालेला अभय, लिव्ह इन रिलेशनशिप अयशस्वी ठरल्यानंतर व स्वराच्या सहवासाची पुन्हा ओढ लागलेला अभय जेव्हा परत तिच्याकडे जातो हे अभयच्या व्यक्तिमत्वातील सारे बदल सुबोध भावे अत्यंत बारकाईने दाखविण्यात यशस्वी ठरला आहे. दिप्ती देवी हिने स्वराची भूमिका केली आहे. तिने जी आरजे स्वरा रंगविली आहे, ती स्वरा जेव्हा रेडिओ माइकसमोर बोलते ते बोलणे बरेचसे नाटकी वाटते. आरजेच्या बोलण्यात जी उत्स्फुर्तता व हजरजबाबीपणा पाहिजे तो सूर पकडणे दिप्ती देवीला जमलेले नाही. त्याचप्रमाणे एक स्वतंत्र अस्तित्व असलेली मुलगी असे तिने जे साकारणे अपेक्षित होते तो जाॅनरही ती नीट हाताळू शकलेली नाही. दिप्ती देवीची कामगिरी जेमतेम आहे. अभय व स्वरामधील काही भावनिक प्रसंग मात्र छान जमले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप अयशस्वी होणे असो वा पुन्हा एकत्र येणे असो स्वरा अभयपेक्षा फारच हळवी दाखविली आहे. त्यामुळे या दोन्ही सहजीवनशैलीमध्ये पुन्हा स्वरालाच दुय्यम भूमिका स्वीकारावी लागते की काय असे वाटू लागते. ते काही अंशी खरेही ठरते. सुबोध भावे, दिप्ती देवी या कलाकारांना अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, अतिशा नाईक, मिलिंद फाटक, डॉ. उत्कर्षा नाईक, राजन ताम्हाणे, विनीत शर्मा, रेवती लिमये, राधा कुलकर्णी या कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे.
दिग्दर्शन - गिरीश मोहिते याने हा कौटुंबिक बाजाचा व काहीसा युथफूल असलेला चित्रपट उत्तमरित्या हाताळला आहे. फाट्यावर मारणे वगैरे बिनधास्त भाषा या चित्रपटात आहे पण ती कानाला खटकत नाही. कारण ती कथेशी एकरुप होऊन येते. गिरीश मोहितेने चित्रपट दिग्दर्शित करताना तो सतत प्रवाही कसा राहिल याची दक्षता घेतली आहे. त्यामुळे त्या चित्रपटातील कोणतेही दृश्य विजोड वाटत नाही. कुटुंबपद्धती, नाती यांच्याबद्दल आजचा युवक ज्या पद्धतीने विचार करतो त्याचे प्रतिबिंब गिरीशला आपल्या या चित्रपटातून दाखवायचे होते. त्यात तो काही अंशी यशस्वी झाला आहे. दिग्दर्शक म्हणून त्याची कामगिरी या चित्रपटात नक्कीच उजवी आहे.
संगीत - या चित्रपटाला अविनाश-विश्वजीतने दिलेले संगीत श्रवणीय आहे. त्यात चार गाणी आहेत. काही कळेना, तुझेच भास, मै तो हारी, मार फाट्यावर अशी चार गाणी आहेत. त्यातील काही कळेना व मै तो हारी ही दोन गाणे प्रेक्षकांच्या मनात काही दिवस नक्की रुंजी घालतील हे नक्की.

No comments:

Post a Comment