Friday, July 7, 2017

कोण हे बालगंधर्व? - - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी २८ जून २०१७



दै. दिव्य मराठीच्या २८ जून २०१७च्या संपादकीय पानावरील प्रासंगिक सदरात मी लिहिलेला हा लेख. सोबत या लेखाची जेपीजी फाइल व टेक्स्ट, वेबपेज लिंक दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/28062017/0/5/
---
कोण हे बालगंधर्व?
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
--
विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकापासून मराठी मनाला स्वप्न पडले होते ते होते बालगंधर्वांच्या लडिवाळ अभिनयाचे. त्यांच्या स्त्रीभूमिकांचे. राम गणेश गडकरी, नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्यासारख्या प्रतिभावंत नाटककारांच्या लेखणीतून साकारलेल्या नाटकांतून बालगंधर्वांनी ज्या भूमिका केल्या त्या तत्कालीन नाट्यरसिकांनी मनात कोरुन ठेवल्या. बालगंधर्व यांचे पुण्यात १५ जुलै १९६७ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या घटनेला यंदा १५ जुलै पन्नास वर्षे पूर्ण होतील. गेल्या २६ जूनला बालगंधर्वांची जयंती होती. पुण्यामध्ये २६ जून १९६८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर उभारले गेले त्या वास्तूच्या सुवर्णमहोत्सवी वर्षास सुरुवात झाली आहे. या साऱ्या घटना एकत्रित आल्याने बालगंधर्वांची आठवण होणे साहजिकच होते. पण दुर्दैव असे आहे की, ही आठवण महाराष्ट्रातील सर्वच भागातील रसिकांना व महाराष्ट्र सरकारलाही झाली नाही. बालगंधर्वांवरील कार्यक्रम पुणे व बाकीच्या काही ठिकाणांपर्यंतच मर्यादित राहिले. १५ जुलैला त्यांच्या निधनाला पन्नास वर्षे पूर्ण होतील त्यावेळी आजच्या पेक्षा चित्र काही वेगळे नसेल. याचे महत्वाचे कारण असे की बालगंधर्व यांच्या अभिनयावर एकेकाळी सरस्वती व लक्ष्मी प्रसन्न होती. पण बालगंधर्व यांच्यावर आता कोणताही कार्यक्रम केला तर मोठमोठ्या जाहिराती किंवा प्रायोजक मिळणे दुरापास्त असल्याने राज्यातील तमाम सांस्कृतिक चळवळ्यांना बालगंधर्वांमध्ये रस नसणे हे साहजिकच आहे. बालगंधर्व यांना उत्तरायुष्यात जी विपन्नावस्था आली त्याला ते स्वत: जबाबदार होते. परंतु त्यांनी एकेकाळी नाट्यरसिकांना जो अवर्णनीय आनंद दिला होता, निदान त्याकडे पाहून महाराष्ट्र सरकारने त्यांना काही पेन्शन देणे आवश्यक होते. त्यांना आयुष्याच्या अखेरीस प्रतिमहिना आठशे रुपयांचे पेन्शन सरकारकडून मिळत होते. पण ते पुरेसे नव्हते. बालगंधर्व यांची अखेर विपन्नावस्थेतच झाली. त्यांच्या निधनानंतर पुण्यात बालगंधर्व रंगमंिदर उभे रािहले. तेवढी एक वास्तू वगळता बालगंधर्वांच्या साऱ्या अस्तित्वखुणा आता पुसल्या गेल्यातच जमा आहेत. बालगंधर्वांना मुंबई व पुणे या दोन शहरांनी भरभरुन प्रेम दिले. गंधर्व नाटक मंडळीमध्ये घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटना या दोन शहरांत घडलेल्या आहेत. बालगंधर्व अखेरीच्या काळात माहिमला ज्या घरात राहात होते, ते घरही आता काळाच्या रेट्यात अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक महान पुरुष ज्या घरात राहातो ते ताब्यात घेऊन तिथे त्याचे राष्ट्रीय स्मारक करा अशी आततायी मागणी कोणीच करता कामा नये. पण प्रत्येक शहराचा एक इतिहास असतो. तो इतिहास पुढील पिढ्यांना कळण्यासाठी ऐतिहासिक वास्तू, ठिकाणे इथे माहितीचे नीलफलक लावता येतात. पुण्यात असा प्रयोग झालेला आहे. दादरला शिवाजी पार्कला सी. रामचंद्र, संगीतकार वसंत देसाई आदी नामवंत जिथे राहायचे त्यांच्या इमारतींच्या बाहेर असे फलक स्वयंसेवी संस्थेने लावले आहेत. नेमकी ही अक्कल महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका यांना ना बालगंधर्व राहात असलेल्या वास्तूबाबत सुचली ना इतर मान्यवरांच्या बाबत. याचे कारण ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत आपल्याकडे विलक्षण अनास्था आहे. दादर पूर्व येथील पाम व्ह्यू या इमारतीत रुइया महाविद्यालयाचे जे पूर्वी हॉस्टेल होते तिथे तसेच अखेरीच्या काळात काही दिवस रुइयापाठी असलेल्या फडके नर्सिंग होममध्ये बालगंधर्वांना उपचारांसाठी दाखल केले होते अशा वास्तूंच्या जवळ बालगंधर्वांची स्मृति राखणारे नीलफलक अजूनही लावता येतील. दुसऱ्या बाजूला बालगंधर्वांवर पूर्वी रत्नाकर मासिक, लोकराज्य, मराठी नाट्य परिषद अशा काही संस्था, प्रकाशकांनी जे विशेषांक प्रसिद्ध केले होते, बालगंधर्वांवर जी पुस्तके प्रकाशित झाली, त्यांच्या समकालीन नटांनी जी आत्मचरित्रे लिहिली त्यात बालगंधर्वांवरही लििहिले आहे हे सगळे साहित्य एका छत्राखाली मिळेल अशी व्यवस्था अलम महाराष्ट्रात सध्या कुठेही नाही. बालगंधर्वांनी अनेकांना लिहिलेली अस्सल पत्रे, त्यांच्याविषयीची सरकारी कागदपत्रे, त्यांना इतरांनी लिहिलेली पत्रे हे सारे बालगंधर्वांवर संशोधन करणाऱ्यांसाठी अस्सल संदर्भसाधने आहेत. हे सारे एकत्रित करुन मुंबई किंवा पुणे येथे एक सुसज्ज संदर्भदालन उघडावे असे ना महाराष्ट्र सरकारच्या मनात आले ना रसिकजनांच्या. बालगंधर्व रंगमंदिराचा कायापालट होणार अशा बातम्या झळकत आहेत मात्र जो या साऱ्याचा नायक आहे त्याच्या स्मृति जपण्याचे प्रामाणिक प्रयत्न स्मृतिपटलाआड गेले आहेत. कोण हे बालगंधर्व ? असा प्रश्न अजूनतरी विचारला जात नाही हे सुदैवच म्हणायला हवे.
(लेखक, उपवृत्तसंपादक, मुंबई)

No comments:

Post a Comment