Friday, September 15, 2017

विठ्ठला शप्पथ या चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी वेबसाइट, १५ सप्टेंबर २०१७

दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवरील मराठी सिनेकट्टा या सेगमेन्टसाठी `विठ्ठला शप्पथ' या चित्रपटाचे मी १५ सप्टेंबर २०१७ रोजी केलेले परीक्षण. त्या मजकूराची वेबलिंकही सोबत दिली आहे.                           http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-vitthala-shappath-5696001-PHO.html
-----
विठ्ठला शप्पथ - कल्पनाशून्यतेचा अजून एक अविष्कार
----
चित्रपट - विठ्ठला शप्पथ
----
- समीर परांजपे
---
रेटिंग - एक स्टार
--
कलाकार - मंगेश देसाई, अनुराधा राज्याध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, विजय निकम, राजन ताम्हाणे, प्रणव रावराणे, राजेश भोसले, विजय साईराज, कृतिका गायकवाड
कथा, पटकथा, दिग्दर्शक -चंद्रकांत पवार
संवाद – चंद्रकांत पवार, कौस्तुभ सावरकर, भानुदास पानमंद
संगीत – चिनार-महेश
निर्माते - गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी
श्रेणी - फॅमिली ड्रामा
--
मराठी चित्रपटांमध्ये विविध प्रयोग होत आहेत हे जसे खरे आहे तसेच या क्षेत्रात वाईट दर्जाचे चित्रपटही तितकेच निर्माण होत आहे. किंबहुना वाईट दर्जाच्या मराठी चित्रपटांची संख्या चांगल्या मराठी चित्रपटांपेक्षा नक्कीच जास्त आहे. पुरेसे भांडवल हाती असले की चित्रपट निर्माण करण्यासाठी पुढे सरसावायला निघालेले लोक आपल्या हातात जी कथा आहे ती नेमकी कोणत्या दर्जाची आहे, त्यातून काही चांगला चित्रपट निर्माण होणार आहे का, याचा सारासार विचारही करीत नाही. होते काय की काही कोट्यवधी रुपये खर्चून एखादा मराठी चित्रपट तर तयार होतो, त्यातून कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक व इतर आघाड्यांवरील लोक यांना रोजगार मिळतो. पण अंतिमत: हा मराठी चित्रपट न चालल्याने त्यातील कलाकारांच्या कारकिर्दीत एका अपयशाची नोंद तर होतेच शिवाय निर्माता बुडित खात्यात जातो. काही हौशी निर्माते असतात ज्यांना चित्रपट चालला काय नाही चालला काय याने काहीच फरक पडत नाही, पण काही निर्माते असेही असतात त्यांना या क्षेत्रात काही वेगळे करायचे असते त्यांची पार दैना होते चित्रपटाच्या अपयशामुळे. सध्या जे मराठी चित्रपट येत आहेत त्यामध्ये सरधोपट पण नाही तर विषय आपटून आपटून धोपटलेल्या विषयांवरच बनविलेले चित्रपट येत आहेत त्यामध्ये विठ्ठला शप्पथ हा चित्रपट अग्रक्रमावर राहिल. या चित्रपटाला सुरुवात तर आहे पण कथा इतकी भरकटत जाते की काही म्हणजे काही कळत नाही. सगळे ढोबळ चित्रण...प्रेक्षकाकडे चित्रपट पाहाताना डोक्याला हात लावण्याशिवाय पर्याय उरत नाही.
कथा - एक गावासारखे गाव असते. तिथे चांगली व वाईट अशा दोन्ही प्रवृत्तीची माणसे नांदत असतात. त्या गावामध्ये रामचंद्र म्हणजे तात्या हे विठ्ठलभक्त असतात. तो सत्प्रवृत्तीचा माणूस असतो. रामचंद्र यांचा मुलगा कृष्णा हा उनाडटप्पू. या गावचा सरपंच नागेश्वर याचा खल प्रवृत्तीचा मुलगा मन्या याच्याबरोबर दिवसभर जे तरुणांचे टोळके उनाडक्या व गुंडगिरी करत फिरायचे त्यामध्ये कृष्णा पण सामील असतो. कृष्णा हा मन्याला जिगरी दोस्त मानत असतो. आपल्यासाठी मन्या जीवाचीही बाजी लावेल असा विश्वास कृष्णाला असतो. गावातील किंवा पंचक्रोशीतील जमिनजुमला, मालमत्ता यांच्या खरेदीविक्रीच्या प्रकरणात बिल्डरांना मदत करणे, जमिनीचे व्यवहार बिल्डरांच्याच बाजूने कसे होतील यासाठी जमीन, मालमत्ता विकणाऱ्यांना धाकदपटशा दाखविणे असले उद्योग मन्या व त्याचे मित्र करीत असतात. कृष्णाही त्यात सामील असतो. या गुंडगिरीतून जो पैसा मिळायचा त्यातून जीवाची मुंबई करण्यापासून अनेक ऐषोआराम मन्या, त्याचे साथीदार मिळवत असतात. कृष्णालाही हे सारे आवडत असते. आपण अपमार्गाने पैसे कमावतो आहोत याची यापैकी कोणालाही लाज नसते. रामचंद्र व त्यांची पत्नी जानकी हे भाविक वृत्तीचे असतात. विठ्ठलभक्तीत कायम रंगलेले असतात. आपला मुलगा कृष्णाने चांगल्या मार्गाला लागून हळुहळू घराची सारी जबाबदारी अंगावर घ्यावी असे त्यांना वाटत असते. पण कृष्णा बेदरकार असतो. त्याला आईवडिलांचे मन अजिबात कळत नसते. गावामध्ये एक जमिन असते. ती असते गावकीची. या जमिनीवर जुन्या काळामध्ये एक विठ्ठल मंदिर असते. काळाच्या ओघामध्ये हे मंदिर पडलेले असते. त्याचे भग्नावशेषही जमिनीवर कुठे दिसत नसतात. पण पिढ्यानपिढ्या ही माहिती पुढे संक्रमित झालेली असते की या जमिनीवर पूर्वी कधीकाळी एक विठ्ठलमंदिर होते. ही जमिन गावकीची असली तरी ती असते सरपंच नागेश्वर याच्या ताब्यामध्ये. ही जमिन आपलीच आहे असा त्याचा दावा असतो. तो त्या जमिनीकडे कोणालाही फिरकूही देत नसतो. रामचंद्र व त्यांच्या काही सहकाऱ्यांना असे वाटत असते या गावकीच्या जमिनीवर पूर्वीच्या काळी जसे विठ्ठल मंदिर होते तसे आता नव्याने विठ्ठल मंदिर बांधले जायला हवे. त्यासाठी सरपंचाकडे जातात पण त्यांना तेथून हाकलून देण्यात येते. अपमानित झाले असले तरी रामचंद्र विठ्ठल मंदिर बांधण्यासाठीचा प्रयत्न सुरु ठेवण्याचा निर्धार करतात. ते व काही गावकरी सरपंचाने हडपलेल्या गावकीच्या जागेवर विठ्ठल मंदिर बांधण्यासाठी हालचाली सुरु करतात, त्यामध्ये सरपंच त्यांच्या वाटेत अनेक अडथळे निर्माण करतो. याच वेळेस एक घटना घडते. जोशीकाका नावाच्या गृहस्थांची मालमत्ता त्यांनी आपल्यालाच विकावी अशी अग्रवाल बिल्डरची इच्छा असते. मात्र प्रत्यक्षात जोशीकाका हे ती मालमत्ता दुसऱ्यालाच विकणार असल्याचे कळल्यावर अग्रवाल खवळतो. ही मालमत्ता कोणत्याही परिस्थितीत आपल्यालाच विकावी यासाठी जोशीकाकांना येनेकेनप्रकारेण वठणीवर आणण्यासाठी तो मन्याला सुपारी देतो. मन्या व त्याचे गुंड मित्र हे जोशीकाकांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना धमकावितात. जोशी यांनी अग्रवाल िबल्डरला मालमत्ता विकली आहे अशी कागदपत्रे तयार करुन त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी मन्या व त्याचे साथीदार काही दिवसांनी त्यांच्या बंगल्यावर जातात पण ते आत जात नाहीत. मन्या बंगल्याच्या आतमध्ये फक्त एकट्या कृष्णाला जोशीकाकांशी बोलायला पाठवितो. कृष्णा आतमध्ये जातो तेव्हा त्याच्या लक्षात येते की तो तिथे येण्यापूर्वी जोशीकाकांचा कोणीतरी खून केलेला आहे. पण जोशीकाकांच्या मृतदेहावरील रक्त कृष्णाच्या हाताला लागते. कृष्णाचा रक्ताळलेला हात व जोशीकाकांचा मृतदेह त्या बंगल्यातील नोकर एकत्र पाहातो व त्याला असे वाटते कृष्णानेच हा खून केला आहे. कृष्णाला जोशीकाकांच्या खूनाच्या आरोपाखाली अटक होते. इथे खून झाला आहे कळल्यानंतर मन्या व त्याचे साथीदार कृष्णाची साथ सोडून देतात. त्याचा संपर्कही टाळतात. दुसऱ्या बाजूला कृष्णाचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये म्हणून सरपंच हा आपल्या गावातील व पंचक्रोशीतील सर्व वकिलांना धमकावतो. त्यामुळे कृष्णाला वकीलही मि‌ळत नाही. पण त्याच वेळेला वाघमारे हे डॅशिंग वकील मात्र कृष्णाचे वकीलपत्र घेतात. न्यायालयामध्ये बिनतोड युक्तिवाद करुन, सारे पुरावे सादर करतात. जोशीकाकांच्या खऱ्या खुन्यांना पकडण्यात येते. त्यामुळे साहजिकच कृष्णाची खूनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता होते. हे सारे घडत असताना कृष्णाचे वडील रामचंद्र व आई जानकी हे मानसिकदृष्ट्या खूप खचलेले असतात. तरीही आपल्या मुलाला काहीही करुन या आरोपाच्या बालंटातून सोडवायचेच या निर्धाराने रामचंद्र उभे राहातात. प्रसंगी जमिन, राहाते घर विकेन पण मुलाला सोडवून आणेन असे ठरवून ते न्यायालयाची पायरी चढतात. सरतेशेवटी कृष्णावरील सावट दूर झाल्याने आता रामचंद्र पुन्हा गावकीच्या जमिनीवर विठ्ठलमंदिर बांधण्याच्या आपल्या जुन्या मनसुब्याकडे परत वळतात. तुरुंगातून बाहेर आलेला कृष्णा आता खूप बदललेला असतो. आता कायम चांगल्या व कायद्याच्या मार्गानेच चालायचे हे त्याने ठरविलेले असते. तो मन्याबरोबर पूर्वी गुंडगिरी करत असताना त्याची नैना नावाच्या मुलीबरोबर दोनदा तीनदा भेट झालेली असते. नैनाची छेड काढल्याने तिने कृष्णाच्या मित्रांना खूप झापलेले असते. त्यामु‌ळे कृष्णा हा एक टपोरी मुलगा आहे हीच प्रतिमा तिच्या मनात असते. कृष्णा तुरुंगातून सुटून आल्यानंतर आपल्या वडिलांच्या विठ्ठल मंदिर उभारणीच्या कामामध्ये त्यांना साथ द्यायचे ठरवितो. कायद्याचा आधार घेऊन यासाठी काय करता येईल याची विचारणा करण्यासाठी तो एका स्वयंसेवी संस्थेत आलेला असताना त्याला तिथे नैना भेटते. ती या संस्थेत सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असते. ती कृष्णा आरटीआयद्वारे त्याच्या गावातील गावकीच्या जमिनीचे सारे तपशील तहसीलदारांकडून मागविता येईल असे सांगते. त्यानूसार अर्ज केल्यानंतर तहसीलदार ही जमिन गावकीची असल्याचे ग्रामपंचायतीला कळवितात. त्यामुळे सरपंच नागेश्वरच्या अंगाचा ति‌ळपापड होतो. तो ही जमिन गावकऱ्यांना विठ्ठल मंदिर बांधण्यासाठी मिळू नये म्हणून अजून कारस्थाने रचू लागतो. हे सारे घडत असताना कृष्णा व नैना यांच्यामध्ये प्रेम फुलू लागते. या सगळ्याला कथानकाला कलाटणी मिळते ती आमदार सूर्यभान जाधवराव यांच्यामुळे. नैना ही त्यांची मुलगी असते. तिचे कृष्णावर असलेले प्रेम आमदारसाहेबांना मान्य नसते. त्यांच्या लेखी कृष्णा हा अत्यंत गरीब घरातला मुलगा असतो. आपल्या ऐश्वर्यात वाढलेल्या मुलीला हा मुलगा कसा सांभाळणार ही चिंता असते. मग ते एक डाव टाकतात. कृष्णाला खिंडीत गाठतात. ते कृष्णाला असा पेच टाकतात की, `गावकीच्या जमिनीवर विठ्ठल मंदिर व्हावे ही तुझ्या वडिलांची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यात मध्ये येणारे सारे प्रशासकीय अडथळे, सरपंचाची दादागिरी मी एका क्षणात हटवतो. हे विठ्ठल मंदिर बांधून पूर्ण झाल्यावर त्या मंदिरावर सोन्याचा कळसही माझ्या खर्चाने चढवितो पण त्या बदल्यात कृष्णाने नैनापासून दूर निघून गेले पाहिजे. हे मंदिर बांधून झाल्यानंतर लगेचच कृष्णाने हे गावही सोडून जायला पाहिजे.' आता कृष्णा द्विधा मनस्थितीत सापडतो...एका बाजूला वडिलांची इच्छा तर दुसऱ्या बाजूला नैनाचा प्रेमळ सहवास...नक्की कोणाला दूर लोटायचे? कृष्णा या स्थितीत नेमका काय निर्णय घेतो? गावात विठ्ठल मंदिर गावकीच्या जमिनीवर बांधले जाते का? असे काही प्रश्न निर्माण होतात. त्यांची उकल होण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय - या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत विजय साईराज आहे. दाक्षिणात्य चित्रपटांत जसे नायक असतात तसे व्यक्तिमत्व विजय साईराज यांना लाभले आहे. गावातला मुलगा जसा बोलतो, वागतो तसेच हुबेहुब साकारु शकेल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. पण कृष्णा हा नायक साकारताना विजय साईराज यांनी ती व्यक्तिरेखा भीषण स्वरुपात साकार केली आहे. त्यांची संवाद म्हणताना होणारी गडबड, त्यांना अभिनयाचा फारसा नसलेला गंध हे सारे पडद्यावर जाणवत राहाते. ते अर्धा चित्रपटभर गॉगल घालून वावरतात. त्यावरुन ते या चित्रपटाचे नायक असावेत अशी मनात प्रेक्षक खूणगाठ बांधतो. पण त्यांच्या भूमिकेला कसलाच आकार उकार नाही. सगळा सपाट, धोपट मामला. त्यांची नायिका नैना हिची भूमिका साकारलेली कृतिका गायकवाड हिला अभिनयाची पार्श्वभूमी असल्याने तिने ही भूमिका काहीतरी बरी केली आहे. अर्थात दिग्दर्शकाच्या सांगण्याप्रमाणेच चित्रपटात अभिनय करायचा असल्याने तिने त्या बरहुकुम काम केले आहे. पण कृतिका गायकवाड नायिकेच्या रुपात काही दृश्यांत पडद्यावर खुलून दिसली आहे हे मान्य करावे लागेल. नायकाचाच अभिनय सोसो असल्यामुळे व कथाच कमजोर असल्याने या चित्रपटाचा पत्त्याचा बंगला धाडकन कोसळला आहे. तो सावरण्याची संधीच मिळालेली नाही. एक अलबेलासारख्या उत्तम चित्रपटात मा. भगवान यांची अविस्मरणीय भूमिका साकारणाऱ्या मंगेश देसाई यांनी रामचंद्र यांनी शेंडाबुडखा नसलेली भूमिका का स्वीकारली असावी असा प्रश्न चित्रपट पाहाताना पडत राहातो. अनुराधा राज्याध्यक्ष (पात्राचे नाव - जानकी), उदय सबनीस (नागेश्वर), विद्याधर जोशी (सूर्यभान जाधवराव), संजय खापरे (वाघमारे वकील), अंशुमन विचारे (मन्या), विजय निकम (अग्रवाल बिल्डर), राजन ताम्हाणे, केतन पवार (पका), प्रणव रावराणे, राजेश भोसले आदी कलावंतांच्या भूमिका बेतास बात झाल्या आहेत. निर्जिव आशयाचा रटाळ चित्रपट असेच त्यातील कलाकारांच्या अभिनयाचेही वर्णन करता येईल. त्यात वाघमारे वकील दाखविला आहे तो तर दामिनी या िहंदी चित्रपटात वकील झालेल्या सनी देओलची कॉपी मारतो. तसा थेट उल्लेख नसला तरी कल्पनाशून्यतेला काही मर्यादा आहे की नाही असे ते सारे पाहाताना जाणवत राहाते.
दिग्दर्शन - या चित्रपटाची कथा, पटकथा, िदग्दर्शन हे चंद्रकांत पवार यांनी केले आहे. चित्रपटाच्या संवादलेखनातही ते आहेतच. विठ्ठला शप्पथमधून त्यांना एक दिग्दर्शक म्हणून नेमके काय सांगायचे आहे तेच कळत नाही. मुळात कृष्णाच्या भूमिकेसाठी विजय साईराज यांची त्यांनी केलेली निवड हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा सर्वात मोठा चुकीचा निर्णय. त्यानंतर चित्रपटाच्या कथेमध्ये दाक्षिणात्य चित्रपटाच्या स्टाइलचा मसाला मिसळताना त्यांनी दिग्दर्शक म्हणून जी चित्रपटाची मिस‌‌ळ केली आहे ती सारीच बेचव झाली आहे. विठ्ठला शप्पथमधील एकही पात्र धडपणे विकसित होत नाही. त्यांचे संवादही कधी कधी अगम्य दिशेने जातात. कृष्णा हा नायक तर काही संवाद तोंडातल्या तोंडातच बोलतो. विठ्ठलभक्ती हा चित्रपटाचा केंद्रबिंदू ठेवून केलेली मांडणी अधिक ठोसपणे व आशयघनतेने केली असती तर हा चित्रपट बरा झाला असता. कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन या सगळ्याच आघाड्यांवर कामगिरी करण्याच्या प्रयत्नांत दिग्दर्शकाच्या हातून हा चित्रपट चांगला झालेला नाही. 
संगीत - या चित्रपटाला चिनार-महेश यांनी संगीत दिले असून मंगेश कागणे, क्षितीज पटवर्धन या चित्रपटाची गाणी गायली आहेत. ती राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, आदर्श शिंदे, प्रवीण कुँवर यांच्यासारख्या चांगल्या गायकांनी गायली आहेत. तरीही ती गाणी फार लक्षात राहतील अशी झालेली नाहीत. थोडक्यात विठ्ठला शप्पथ या चित्रपटाच्या कोणत्याच अंगाबद्दल फार चांगले बोलण्याची सोय नाही. 
--

No comments:

Post a Comment