Monday, September 25, 2017

अनान या चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे. दै. दिव्य मराठी वेबसाईट २२ सप्टेंबर २०१७

अनान या चित्रपटाचा दिव्य मराठी ऑनलाइनच्या मराठी कट्टा सेगमेंटमध्ये दि. 22 सप्टेंबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेला रिव्ह्यू. सोबत त्याची वेबपेज लिंकही दिली आहे.
----
प्रार्थना बेहरेचा निराशा करणारा चित्रपट `अनान'
----
चित्रपट - अनान
----
- समीर परांजपे
---
रेटिंग - दोन स्टार
--
कलाकार - प्रार्थना बेहरे, ओमकार शिंदे, सुखदा खांडकेकर, सुयोग गोरे, उदय नेने, शिल्पा तुळसकर, यतिन कार्येकर, उदय सबनीस, स्नेहा रायकर, राजेंद्र शिसतकर, प्राजक्ता माळी
दिग्दर्शक - राजेश कुष्टे
पटकथा- संवाद - राजेश कुष्टे, मुकेश जाधव
निर्माते - हेमंत भाटिया
संगीतकार - सौरभ-दुर्गेश
चित्रपट प्रकार - फॅमिला ड्रामा
--
लोकांना काहीसे आडवळणी वाटू शकतील असे शब्द निवडून त्या शब्दांची शीर्षके चित्रपटांना देण्याचा प्रवाह सध्या मराठी चित्रपटसृष्टीत सुरु आहे. त्याच प्रवाहातील अनान हा चित्रपट आहे असे कोणालाही वाटू शकते. पण प्रत्यक्ष िचत्रपट बघितल्यानंतर ते एका शब्दाचे लघुरुप असल्याचे लक्षात येते. अर्धनारीनटेश्वर या शब्दाचे लघुरुप म्हणजे अनान. अर्धनारीनटेश्वर ही संकल्पना शंकराशी जोडली गेली आहे. त्यामुळे अनानमधे शंकराचे महत्व वर्णन केलेले आहे, त्याचे तांडवनृत्य आहे व असे अजून बरेच काही आहे. पण या चित्रपटात एक महत्वाची गोष्ट नाही ती म्हणजे त्याच्या कथेमध्ये प्राणच नाही. चारही चाकांमधली हवा गेल्यानंतर जशी गाडी दिसेल तसा हा चित्रपट आहे. कथाच धड नाही तर मग चित्रपट विधड होणारच. हे सारे लक्षात घेऊनच प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहायचा धोका पत्करायला हवा. माणसाला कंगाल झाल्यामुळे जेवायलाही त्याच्याकडे पुरेसे पैसे नसतात, साहजिकच त्याची उपासमारही होते. या स्थितीला अन्नानदशा असे म्हटले जाते. चित्रपटाचे उत्तम भरणपोषण करु शकणारी कथा व दिग्दर्शन यांचा अभाव असल्याने अनान चित्रपटाची `अनान'दशा झाली आहे.
कथा - पोर्णिमेची रात्र आहे. निबिड जंगलातून एक माता आपल्या पोटाशी बाळाला कवटाळून धावत आहे. त्या मातेचा व तिच्या बाळाचा जीव घेण्यासाठी तीन क्रुरकर्मा सुरे, कुऱ्हाडी परजून त्यांच्या मागे धावत आहेत. त्यांच्या मते हे बाळ म्हणजे पापाचे फळ आहे. त्यामुळे त्यांना या बाळाला संपवायचे आहे. मात्र त्या मातेला आपल्या बाळाचा जीव वाचवायचा आहे. ती त्यासाठी जीवाच्या आकांताने वाट फुटेल ितथे जात आहे. तिच्या मागे लागलेले तीन हल्लेखोर तिला गाठणारच इतक्यात तिला रस्त्याच्या कडेला एक मंदिर दिसते. त्या मंदिराच्या ओसरीवर ती आपले बाळ ठेवते व तिथून निघून जाते. निबिड जंगलात हे सारे घडत असताना जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून एक कार चालली असल्याचे दृश्य दिसते. त्यामध्ये एक प्रसिद्ध गायिका-नृत्यशिक्षिका वसुधा व त्यांचे सहकारी नारायण असे दोघे असतात. या कारमध्ये काही बिघाड होतो. गाडीमध्ये काय बिघाड झाला आहे हे पाहाण्यासाठी नारायण आपली कार नेमके या मंदिरापाशी थांबवितात. त्यावेळी त्यांना मंदिरातून एका बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकायला येतो. वसुधा व नारायण या बाळाला उचलून आपल्या सोबत घेतात. त्याचवेळी नेमके ते तीन हल्लेखोर या गायिकेला व नारायणला पाहातात व त्यांच्या रोखाने शस्त्रे परजून चाल करुन येतात. वसुधा व नारायण दोघेही घाईघाईने गाडीत बसतात व गाडी भरधाव वेगाने हाकतात. हल्लेखोरांच्या हातून ते बाळ अशा रितीने वाचते पण या बाळाची आई हल्लेखोरांच्या हाती सापडते. ते तिला ठार मारतात. या घटनेनंतर एकदम २१ वर्षानंतरचा घटनाक्रम दाखविला आहे. त्या बाळाचे नाव नील ठेवण्यात आले असून वसुधाने उत्तमरित्या वाढविलेले आहे. नील ही नृत्यात तरबेज झाली आहे. ती दिसायलाही देखणी आहे. मात्र तिच्या आयुष्यात एक शारिरिक शल्य आहे. ती हरमॅफ्रोडाइट म्हणजे द्विलिंगी आहे. त्यामुळे तिच्या मनात एकाच वेळेला पुरुष व स्त्रीच्या भावना आहेत. तिच्या वाट्याला हे जे जगणे आले आहे त्यामुळे ती दु:खी देखील आहे. लहानपणी आपल्याला ठार मारायला काही हल्लेखोर आले होते ही माहितीही तिचे पालन केलेल्या वसुधाकडून तिला ती मोठे झाल्यावर मिळते. त्यामुळेही ती काही प्रमाणात धास्तावलेली असते. हरमॅफ्रोडाइट असणाऱ्यांचे प्रमाण समाजात तसे कमी आहे. पण ज्यांच्या वाट्याला हे जीणे येते ते त्या व्यक्तीला अस्वस्थ करणारे असते. त्यामुळेही नीलला वसुधा खूप जपत असते. दुसऱ्या बाजूला क्रिस देव नावाची एक मुलगी आपल्या एका प्रॉजेक्टसाठी जर्मनीहून भारतात येते. ती भगवान शंकरावर संशोधन करणार असते. अर्धनारीनटेश्वर हे शंकराचेच एक रुप. क्रिसला भगवान शंकरावर एक म्युझिकल प्ले देखील करायचा असतो. ती भारतातील तिच्या जय नावाच्या मित्राच्या आठ महिन्यांपासून संपर्कात असते. भारतात आल्यानंतर क्रिस जय व त्याच्या मित्रांना भेटते. त्यात जयचा मित्र युवराज देखील असतो. युवराज हाच या चित्रपटाचा नायक आहे. युवराजचे वडिल हे उद्योगपती असतात. त्यांचा व्यवसाय फार चांगला चाललेला नसतो. ते कर्जात बुडालेले असतात. त्यातून बाहेर निघण्याचा त्यांना एकच मार्ग दिसत असतो तो म्हणजे आपला कॅनडा येथे स्थायिक झालेला मित्र दिक्षित याच्या मुलीशी युवराजचा विवाह लावून देणे. युवराजने दिक्षितांच्या मुलीशी लग्न केल्यास हे कर्ज फेडण्यासाठी दिक्षित युवराजच्या वडिलांना मदत करणार असतात. एक प्रकारे युवराजच्या वडिलांनी त्याचा सौदाच केलेला असतो. युवराज हा उत्तम नर्तक आहे. त्याने नृत्याच्या प्रचार व प्रसारासाठी आपले आयुष्य वाहून घ्यायचे ठरविले आहे. त्यामुळे तो या लग्नासाठी राजी नसतो. क्रिस देव ही अापल्या प्रोजेक्टसाठी युवराज, जय व त्यांच्या आणखी एका मित्राला घेऊन भारतातील विविध शिवमंदिरांमध्ये जाते. तिथे ती वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेते. शंकराच्या विराट स्वरुपाविषयी माहिती जमविण्याचे तिचे काम जोरात सुरु असते. तिच्या संशोधनाला वेग आलेला असतो. हे सारे घडत असताना नीलच्या घरी वेगळेच नाट्य सुरु असते. नीलचे संगोपन केलेली वसुधा दरवर्षी १५ दिवस कोणालाही न सांगता अज्ञात स्थळी जात असते. तशी ती यावेळीही जाते. कथेच्या ओघात ती गोष्टही नंतर स्पष्ट होते. वसुधावर मनापासून प्रेम करणारा कोणी एक चाहाता असतो. तो आता स्वर्गवासी झाला आहे. पण तो व वसुधा जिथे जिथे भेटले त्या सर्व स्थळांना ती दरवर्षी पंधरा दिवसांच्या भ्रमंतीत भेटी देऊन आपल्या गतस्मृती जाग्या करत असते. ती याच कारणासाठी पंधरा दिवस बाहेर गेलेली असताना वसुधाच्या घरी ज्या नृत्य प्रशिक्षण घेणाऱ्या मुली असतात त्यातील एका मुलीसोबत लैंगिक भावना उद्दिपित होऊन नील नको ते कृत्य करताना पाहून नारायण संतप्त होतो. तिला खूप रागावतो. त्यामुळे दु:खी झालेली नील वसुधाचे घर सोडून निघून जाते. ती रस्त्यातून चाललेली असताना काही गुंड तिची छेड काढतात. आणि नेमका तिथे युवराज पोहोचतो व तिची सुटका करतो. युवराज नीलला घेऊन क्रिसकडे येतो. त्याच्या विनंतीवरुन क्रिस नीलला आपल्या घरी राहू देते. क्रिसचा रिसर्च प्रोजेक्ट सुरु असताना त्यातून तिला जो म्युझिकल प्ले साकारायचा आहे त्याची तयारीही सुरु असते. या म्युझिकल प्लेमध्ये शंकराचे तांडव साकारण्याची कल्पना पुढे येतेे. शंकर केवळ संतप्त असताना तांडव करतो असे नाही तर आनंदी असतानाही तो तांडव करतो. हे सारे लक्षात घेऊन युवराज व क्रिस हे उत्तम नृत्यांगनेच्या शोधात असतात. युवराजने पूर्वी नीलचा नृत्याविष्कार पाहिलेला असल्याने ती त्याच्या लक्षात असते. तिने या म्युझिकल प्लेमध्ये काम करावे अशी त्याची इच्छा असते. पण तिचा ठावठिकाणा माहित नसल्याने युवराज तिचा शोध घेत असतो. पण ती अचानक एका क्षणी त्याला गवसल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. आता म्युझिकल प्लेची तयारी जोरात सुरु होते. दरम्यान नीलला लहानपणी ज्याने ठार मारण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या दाजी नावाच्या हल्लेखोराला नीलची खरी ओळख पटते. नीलच्या पाठीवर जन्मापासून एक विशिष्ट खूण आहे. तशी खुण असलेली मुलगी म्हणजे नीलच असल्याची माहिती त्याला गोंदण करणाऱ्या एका माणसाकडून मिळते. तेव्हापासून तो नीलला ठार मारण्यासाठी तिच्या मागावर आहे. मात्र त्याचे प्रयत्न काही वेळेस अयशस्वी ठरतात. म्युझिकल प्लेच्या तयारी दरम्यान युवराज हा नीलच्या प्रेमात पडतो. नीलच्या मनातही ही भावना आहेच पण हरमॅफ्रोडाइट असल्याने आपल्यात पुरुष व स्त्री या दोघांची लक्षणे आहेत त्यामुळे हे प्रेम सत्यात साकार होणे कठीण आहे हे तिला माहित असते. नील त्यामुळेही द्विधा मनस्थितीत असते. क्रिसबरोबर घरात राहात असताना नीलमधील पुरुषी भावना जाग्या होतात. दोघांमध्ये संबंध प्रस्थापित होतो. त्यातून क्रिसला नील ही हरमॅफ्रोडाइट असल्याचे कळते व ती तसे पुढे युवराजलाही सांगते. पण युवराजला त्याने काहीच फरक पडत नाही. युवराजच्या वडिलांची कर्जे फेडण्याची ऐपत नसल्याने ते दिक्षितांच्या मुलीशी युवराजने लवकरात लवकर लग्न करावे या मागे लागलेले असतात. दिक्षितांची मुलगी युवराजबद्दल पझेसिव्ह झालेली असते. युवराजच्या आयुष्यात नील आल्याने ती अस्वस्थ असते. शेवटी वडिलांनी खूप दडपण आणल्याने युवराज दिक्षितांच्या मुलीबरोबर साखरपुडा करण्यास राजी होतो. नेमके त्याच वेळेला क्रिसच्या घरातून नील कुठेतरी निघून गेल्याचे कळते. तिचा जीव धोक्यात आहे हेही लक्षात येते. दाजी नावाचा तो हल्लेखोर नीलच्या मागे हात धुवून लागलेला असतो. नीलला एकटे गाठून तो तिला ठार मारणार इतक्यात नीलमधील पुरुषी अंश जागा होतो. ती अंगात बळ एकवटते व दाजीलाच त्याच्याकडील सुऱ्याने खलास करते. हे सगळे झाल्यानंतर पुढचे दृश्य हे म्युझिकल प्लेचे आहे. त्यामध्ये युवराज व नील उत्तम तांडवनृत्य करतात. क्रिस देव करीत असलेला संशोधन प्रकल्प अशा रितीने पुर्णत्वाला जातो. युवराज दिक्षितांच्या मुलीशी साखरपुडा झालेला असला तरी आपल्या नीलवरील प्रेमापायी ती सारी बंधने झुगारतो. नील ही हरमॅफ्रोडाइट असली तरी युवराज तिला आपला जीवनसाथी म्हणून स्वीकारतो. नीललाही युवराजच्या खऱ्या प्रेमाची अनुभूती मिळते. नीलला पूर्ण स्त्री म्हणून जगायची आस असते ती देखील अशा रितीने पूर्ण होते.
अभिनय - एखादी व्यक्ती हरमॅफ्रोडाइट दुसऱ्या शब्दांत द्विलिंगी आहे अशी व्यक्तिरेखा मराठी चित्रपटांत खूपच अभावाने आली असेल. त्यामुळे नील या हरमॅफ्रोडाइट व्यक्तीची भूमिका साकारणाऱ्या प्रार्थना बेहरे हिला अभिनयासाठी खूप वाव होता. प्रार्थना ही स्वत: उत्तम शास्त्रीय नृत्यांगना आहे. या चित्रपटाचा नायक ओमकार शिंदे हा उत्तम शास्त्रीय नर्तक आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर चित्रपटात उत्तम संगीत, शास्त्रीय नृत्य या गोष्टींना खूपच वाव होता. कथेचा बाज बरा असला तरी तिची एकुण मांडणी इतकी ढोबळ व ढिसाळ आहे की, नील व युवराज यांच्या व्यक्तिरेखा अतिशय कमकुवत झाल्या आहेत. त्यांच्या तोंडी असलेले संवाद हे मराठीला हिंदीची फोडणी दिल्यासारखे आहेत. हिंदी वळणाने या चित्रपटातील सगळे कलाकार मराठी बोलत राहातात. एक दोन गाण्यांत ओमकार शिंदे व प्रार्थना बेहरे यांनी उत्तम शास्त्रीय नृत्य केले आहे. पण ते त्यांचे कौशल्य वगळता अभिनयात त्यांचा काहीही प्रभाव पडत नाही. हरमॅफ्रोडाइट व्यक्तीची जी तगमग आहे ती देखील प्रार्थना बेहरेच्या अभिनयातून नीटशी व्यक्त होत नाही. चित्रपटात युवराजचे आईवडील, दिक्षित ही व्यक्तिरेखा, दिक्षितांची मुलगी, क्रिस देव ही संशोधक ही सारी पात्रे कचकड्याच्या बाहुल्या वाटू लागतात, इतका त्यांचा अभिनय व पडद्यावर वावरणे कच्चे आहे. त्यातील एक म्हणजे युवराजचे वडिल. या भूमिकेसाठी यतीन कार्येकरसारखा दिग्गज अभिनेता उगीचच खर्ची घातला आहे. वसुधा या गायिकेच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर आहे. पण तिच्याही अभिनयाला निदान या चित्रपटात तरी फारसा वाव नाही. सुमार दर्जाचा चित्रपट असेच त्याचे वर्णन करावे लागेल.
दिग्दर्शन - नटरंग, आयना का बायना, डब्बा ऐसपैस यासारख्या सिनेमांमधून आपले योगदान दिलेले राजेश कुष्टे यांनी अनान या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल टाकले आहे. गेली १५ वर्ष नाटक, टेलिव्हिजन आणि चित्रपटविश्वाशी ते निगडीत आहेत. आता एवढी उत्तम पार्श्वभूमी असल्याने त्यांच्याकडून निश्चितच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार. पण ती अनानचे दिग्दर्शन करताना पूर्ण झालेली नाही. या चित्रपटाची पटकथा- संवाद - राजेश कुष्टे, मुकेश जाधव यांनी मिळून लिहिले आहेत. या चित्रपटाची गाणीही राजेश कुष्टे यांनी लिहिली आहेत तसेच एक गाणेही त्यांनी गायले आहे. म्हणजे चित्रपटाच्या प्रत्येक अंगावर कुष्टे यांचे नियंत्रण होते. आपला चित्रपट कसा बनतोय याचीही त्यांना संपूर्ण जाणीव असणारच. पण असे असूनही रटाळ होण्यापासून या चित्रपटाला वाचवू शकले नाहीत. हरमॅफ्रोडाइट व्यक्तिची गोष्ट सांगणे हेच या चित्रपटाचे वेगळेपण होते. पण त्यात प्रेमापासून सगळा इमोशनल मसाला भरल्याने ती व्यक्ती बाजूलाच राहाते व पडद्यावर वेगळेच काही सुरु होते. या चित्रपटाची फोटोग्राफी, साऊंड इफेक्ट्स उत्तम आहेत पण दिग्दर्शन कमजोर असल्याने व्यक्तिरेखा सपाट झाल्या आहेत. काही वेळा दृश्यांची, घटनांची संगतीच लागत नाही. 
संगीत - अनान चित्रपटाला सौरभ-दुर्गेश या जोडीने संगीत दिले आहे. जाहिरातींसाठी संगीत देणाऱ्या या जोडीने अनान चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून पदार्पण केले आहे. या चित्रपटात एकुण पाच गाणी आहेत. दिग्दर्शक राजेश कुष्टे यांनी यातील गाणीही लिहिली असून त्यातील नारनशिली हे गाणे ते स्वत: गायले आहेत. अनान चित्रपटात (१) `गंधी सुगंधी'-(गायक - सोनू निगम, आनंदी जोशी), (२) `एक सूर्य तू' (गायक - सौरभ शेट्ये, आनंदी जोशी), (३) ‘काहे तू प्रित जगायी’ – (गझलगायक – पूजा गायतोंडे), (४) `तांडव' (गायक - रवींद्र साठे), (५) ‘नारनशिली’ (गायक – राजेश कुष्टे) ही पाच गाणी आहेत. त्यापैकी काहे तू प्रित जगायी ही गझल झाली आहे. तांडव गाणेही छान जमले आहे. मात्र इतर गाणी फार लक्षात राहातील अशी शाश्वती नाही. सौरभ-दुर्गेश जोडीने आपल्या पहिल्याच मराठी चित्रपटात जी कामगिरी बजावली आहे ती खूप चमकदार नसली तरी दुर्लक्षित करण्याइतकी देखील खचितच नाही.                            https://googleweblight.com/i?u=https%3A%2F%2Fm.divyamarathi.bhaskar.com%2Fnews%2FBOL-MB-movie-review-of-marathi-film-annan-5701650-PHO.html%3Fref%3Dht&hl=en-IN

No comments:

Post a Comment