Thursday, September 28, 2017

बापजन्म या चित्रपटाचे दै. दिव्य मराठीच्या वेबसाइटवर २८ सप्टेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेले परीक्षण - समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या वेबसाईटवरील मराठी सिनेकट्टा या सेगमेंटमध्ये दि. २८ सप्टेंबर २०१७ रोजी बापजन्म या नवीन मराठी चित्रपटाचे मी लिहिलेले हे परीक्षण प्रसिद्ध झाले आहे. त्या परीक्षणाचा मजकूर व त्याच्या मजकूराची वेबलिंकही पुढे दिली आहे.
---
बापजन्म - पितृप्रेमातील ओलाव्याचे हृदयस्पर्शी चित्रण
----
चित्रपट - बापजन्म
----
- समीर परांजपे
---
रेटिंग - तीन स्टार
--
कलाकार - सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपूटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन, अकर्श खुराणा
पटकथा, लेखन, दिग्दर्शक - निपुण धर्माधिकारी
निर्माते - सिक्स्टिन बाय सिस्क्टी फोर प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सुमीतलाल शाह
संगीत आणि पार्श्वसंगीत - गंधार संगोराम
चित्रपट प्रकार - फॅमिली ड्रामा
--
पुण्यातील निपुण धर्माधिकारी याने पटकथा, लेखन व दिग्दर्शन अशा तीनही जबाबदाऱ्या सांभाळलेला बापजन्म चित्रपट औत्सुक्याचा िवषय नक्कीच होता. कारण निपुण हा युवा रंगकर्मी व प्रयोगशील दिग्दर्शक त्याने आजवर केलेल्या कामगिरीने लक्ष वेधून घेत होता. ‘फोर्ब्स इंडिया थर्टी अंडर थर्टी’ अंतर्गत देशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या युवांपैकी ‘आश्वासक ३०’ युवक-युवतींच्या यादीमधेही निपुण धर्माधिकारीच्या नावाचा समावेश झालेला होता तो त्यामुळेच. ‘नाटक कंपनी’ या स्वत: स्थापन केलेल्या युवा रंगकर्मींच्या नाट्यसंस्थेमार्फत निपुण धर्माधिकारी याने ‘दळण’, ‘लुज कंट्रोल’, ‘सायकल’ या एकांकिकांसह ‘एक दिवस मठाकडे’ या दीर्घांकाचे दिग्दर्शन केलेले होते. केले आहे. युवा गायक राहुल देशपांडे याच्यासमवेत ‘संशयकल्लोळ’, ‘मानापमान’ आणि ‘सौभद्र’ ही संगीत नाटके वेगळ्या पद्धतीने दिग्दर्शित केली व युवा पिढीला त्या नाटकांकडे आकर्षित केले होते. प्रभाकर पेंढारकर यांच्या ‘रारंगढांग’ या कादंबरीचे व प्रकाश नारायण संत यांच्या ‘वनवास’ या कथासंग्रहाचे ऑडिओबुक करण्यातही त्याचा मोलाचा वाटा आहे. ‘नौटंकी साला’ या चित्रपटाचे लेखन केले असून आता त्याने बापजन्म हा चित्रपटही दिग्दर्शित केला. इतकी उत्तम पार्श्वभूमी असलेल्या निपुणने बापजन्मतील मुख्य भूमिकेसाठी सचिन खेडेकर या चतुरस्त्र अभिनेत्याची केलेली निवड अचुक होती हे हा चित्रपट बघितल्यानंतर लक्षात येते. सचिन खेडेकर यांनी बापजन्ममध्ये साकारलेल्या पात्राचे नाव भास्कर पंडित आहे. एक योगायोग असा आहे की, अस्तित्व या मराठी िचत्रपटात सचिन खेडेकर यांनी साकारलेल्या पात्राचे नाव श्रीकांत पंडित होते. कच्चा लिंबू या चित्रपटातही मी साकारलेल्या पात्राचे नाव श्रीकांत पंडित आहे. हा `पंडित'योग लक्षात ठेवून बापजन्म चित्रपट बघायला सुरुवात केल्यानंतर खेडेकर हे अभिनयपंडित आहे हे जाणवते.
कथा - भास्कर पंडित हे निवृत्त झालेले गृहस्थ. ते असतात भारतीय गुप्तचर यंत्रणेमध्ये सिक्रेट एजंट. मात्र त्यांना आपली खरी ओळख कोणालाच देता येत नाही. सेवेत त्यांनी तशी शपथही घेतलेली असते. आपल्या कामाचे खरे स्वरुप कोणालाही कळू नये म्हणून सेवेत असताना व नंतरही ते मुग्धता पाळून असतात. ते सिक्रेट एजंट (गुप्तचर) आहेत हे त्यांची पत्नी रजनी, एक मुलगा, एक मुलगी, नातेवाईक, शेजारीपाजारी यांनाही माहित नसते. ते कधीही कोणालाही आपल्या कामाबद्दल सांगताना मी ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कार्यरत आहे असे सांगत असतात. भास्कर पंडितांना खरेतर लग्न करायची इच्छाही नसते परंतु गुप्तचर यंत्रणेतील त्यांचे वरिष्ठ अधिकारी सांगतात की, `लग्न केलेस, मुलेबाळे झाली की लोकांच्या दृष्टीने आपण सामान्य आयुष्य जगतोय असे सिद्ध होते. ते आपल्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. लग्न हे आपल्याला एक चांगले कव्हर म्हणून उपयोगी येते.' त्यामु‌ळे ते पहिल्यांदा याच विचाराने लग्न करतात. पण जसजशी मुलेबाळे होतात, संसार वाढतो ते आपल्या कुटुंबाविषयी ते अजून काहीसे हळवे होतात. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्यातील कर्तव्यकठोर गुप्तचर जागा असतो. त्यामुळे मनात खूप असूनही ते आपल्या कुटुंबाबरोबर एकत्र राहात असूनही आपण तुमच्या फार जवळ नाही असे वर्तनातून मुद्दामहून दाखवत असतात. त्यामुळे होते काय की, त्यांचा एक मुलगा व मुलगी यांच्या मनात त्यांच्या विषयी फारसे प्रेम उरत नाही. आपले वडिल आपल्याला फारसा वेळ देत नाहीत, खूप कोरडेपणाने वागतात हे त्या मुलांना दिसत असते. त्याचा या मुलांना त्रास होत असतो. त्याचबरोबर भास्कर पंडितांची पत्नी रजनी तिला देखील आपल्या नवऱ्याचा सहवास फार लाभत नसतो. त्यांच्यातील संवाद खूप कमी झालेला असतो. किंबहुना भास्कर पंडितांनीच तो मुद्दामहून कमी केलेला असतो. वर्षामागून वर्षे उलटतात. भास्कर पंडित आता सेवानिवृत्त आहेत. त्यांची पत्नीही स्वर्गवासी झालेली आहे. ते, त्यांचा नोकर माऊली व टायगर नावाचा कुत्रा यांच्यासमवेत ते एका बंगल्यात राहात असतात. त्यांच्या दोन मुलांपैकी मुलगा विक्रम लंडनला आहे. तर मुलगी वीणा लग्न होऊन दुसऱ्या शहरात राहायला गेली आहे. भास्कर पंडित एकटे राहात असले तरी ते माणुसघाणे नाहीत. ते रोज सकाळी मॉर्निंग वॉक करतात, आपल्या बंगल्यासमोर राहाणाऱ्या व अल्झायमर ग्रस्त असलेल्या आपटे नावाच्या वृद्ध गृहस्थांबरोबर वेळ घालवितात. खूप काही चांगली कामे रोज करतात. त्यांचे स्वत:चे एक शेड्युल ठरलेले आहे. पण तरीही हल्ली त्यांना आपल्या मुलाबाळांची आठवण तीव्रतेने होऊ लागली आहे. मुलांच्या मनात आपल्याविषयी तिरस्कार आहे हे माहित असूनही त्यांनी आपल्याला घरी येऊन भेटावे असे सतत त्यांना वाटते आहे. पंडितांचे गेल्या काही दिवसांपासून डोके दुखते आहे. म्हणून ते डॉक्टरकडे जातात. वैद्यकीय तपासण्यांतून पंडितांना ब्रेन ट्यूमर झाल्याचे निदान होते. मात्र या कर्करोगावर वैद्यकीय इलाज करुन घ्यायला ते राजी होत नाहीत. असेच सुरु राहिले तर फारतर एक वर्ष जगाल असे डॉक्टर भास्कर पंडितांना सांगतात. मात्र त्यामुळे पंडित हबकत नाही. आपण जोवर जिवंत आहोत तोवर आपल्या मुलाबाळांनी एकदातरी भेटावे यासाठी काहीतरी युक्ती ते शोधू लागतात. एकदा ते रात्री असेच आपल्या बंगल्यात बसले आहेत. त्यांनी आपल्या दैनंदिनीत आपल्या मृत्यूबद्दल लिहून ठेवले आहे. ते सहज आदल्या दिवशीच्या दैनंदिनी नोंदीवर लक्ष केंद्रित करतात. त्यानंतर त्याच्या आधीच्या दिवसाची नोंद वाचतात...मग त्याच्याही आधीच्या दिवसाची. असे करत करत ते संपूर्ण एक वर्ष मागे जातात. त्यांच्या असे लक्षात येते की आपण रोज तेच ते जगतो आहेत. त्यांना आता काही वेगळे करायचे आहे. आपल्या मुलाबाळांना पुन्हा आपल्या जवळ आणण्यासाठी ते मग एक योजना आखतात. आपला नोकर माऊलीला भरीला पाडून त्याला आपली मुलगी वीणा व मुलगा विक्रम यांना फोन करायला लावतात. भास्कर पंडित यांचे निधन झाले असून तुम्ही ताबडतोब निघून या असा निरोप माऊली या दोघांना देतो. त्यामुळे भास्कर पंडितांच्या मुलांपैकी विक्रम अापल्याला येणे शक्य नाही असे सांगतो. तर दुसऱ्या शहरात राहाणारी मुलगी वीणा ही आपल्या छोट्या बाळाला घेऊन वडिलांच्या घरी मोठा प्रवास करुन येते. घरात भास्कर पंडितांचे पार्थिव ठेवलेले असते. शेजारपाजारचे तसेच ज्येष्ठ नागरिक मित्रांपैकी अनेक जण जमा झालेले असतात. भास्कर पंडितांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना स्मशानभूमीत नेले जाते. पण भास्कर पंडित काही मेलेेले नसतात. ते नाटक करत असतात. त्या नाटकामध्ये त्यांनी गुप्तचर यंत्रणेतील आपल्या जुन्या सहकाऱ्याला व माऊलीला सहभागी करुन घेतलेले असते. भास्कर पंडित आखलेल्या योजनेप्रमाणे स्मशानातून कोणाच्याही नकळत व्यवस्थित सुंबाल्या करतात. सर्वांना डोळ्यासमोर हेच दिसते की विद्युतदाहिनीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत पण तसे काही झालेले नसते. ते आपटे या आपल्या शेजारच्या बंगल्यामध्ये लपून राहातात. आपटेंचा मुलगा हा आपटेंच्या शेजारच्याच बंगल्यात राहात असतो. पण आपल्या वडिलांना तो सोबत ठेवत नसतो. आपल्या वडिलांवर देखभालीच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी त्याने आपटेंच्या घरात सीसीटीव्ही लावलेले असतात. पण एकाच ठिकाणी कॅमेरा नसतो तो म्हणजे आपटेंच्या अडगळीच्या खोलीत. भास्कर पंडितही आपल्या बंगल्यात असेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतात. आपण मेल्याची बातमी कळल्यानंतर आपली मुले घरी आली तर ती कोणत्या पद्धतीने वागतात, त्यांना खरच वडिलांविषयी जिव्हाळा आहे का हेही त्यांना पाहायचे असते. स्मशानभूमीतून सुंबाल्या केल्यानंतर भास्कर पंडित आपट्यांच्या अडगळीच्या खोलीत जाऊन लपतात व तिथून लॅपटॉपवर आपल्या घरात नेमके काय चालले आहे हे सीसीटीव्हीच्या मदतीने पाहू लागतात. वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकूनही आधी यायला तयार नसलेला विक्रम परदेशातून पुण्यामध्ये अंत्यसंस्काराच्यावेळी हजर होतो. तो त्याच्या मुलीबरोबर आलेला असतो. वडिल आता या जगात नाहीत या जाणीवेने विक्रम व वीणा दु:खी झालेले असतात पण तसे ते एकदम दाखवत नाहीत. कारण त्यांच्या पासून लांब लांब राहात आलेले वडिलच त्यांच्या मनात घर करुन बसलेले असतात. विक्रम व वीणाच्या भावभावनांचे दर्शन भास्कर पंडित आपट्यांच्या अडगळीच्या खोलीत राहून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून लॅपटॉपवर ऑनलाइन पाहाताना त्यांना या मुलांच्या मनात माजलेली खळबळ कळू लागते. भास्कर पंडित यांनी रचलेले हे नाटक अखेरीस उघडकीस येते का? त्यांची मुले भास्कर पंडितांच्या जवळ येतात का? पंडित कर्करोगाचे बळी ठरतात का? असे काही प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी बापजन्म हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय - बापजन्म या चित्रपटाचे खरे नायक आहेत ते सचिन खेडेकर. सिक्रेट एजंट म्हणून कर्तव्यकठोर असलेल्या पण पत्नी व मुलांच्या आठवणीने कातर होणाऱ्या भास्कर पंडितांची भूमिका सचिन खेडेकर यांनी अप्रतिम साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेला काही नकारात्मक गोष्टींची झालर आहे. वीणा या मुलीचा प्रेमविवाह होतो. पण तिचा नवरा हा पंडित यांना हवा तसा उच्चशिक्षित व उच्चपदस्थ नसल्याने त्यांना मुलीची का‌ळजी वाटते. त्यांचा या प्रेमविवाहाला विरोध असतो. परंतु प्रेमविवाह झाल्यानंतरही ते मुलीच्या नवऱ्याला कोणालाही कळू न देता परस्पर भेटून चार शब्द सुनावून येतात. आपली मुले लहान असताना त्यांना फारसा वेळ देता येत नाही याची खंत बाळगून पंडित ज्या देशात सिक्रेट मिशनवर असतील तेथून परतताना मुलांसाठी खेळणी, भेटवस्तू घेऊन येतात. मात्र त्यांचे पितृप्रेम हे नेहमी त्यांच्या कठोर वागण्यामुळे झाकोळले जाते व मुले त्यांच्यापासून अजून दूर जातात. कॅन्सर झाल्याचे कळल्यानंतर जे उरलेसुरले आयुष्य आहे त्यात मुलाबा‌ळांना पुन्हा आपल्या जवळ आणण्यासाठी पित्याची जी धडपड चालते ती सचिन खेडेकर यांनी उत्तम प्रकारे दाखविली आहे. त्यांचा अभिनय हाच या चित्रपटाचा यूएसपी आहे. त्यांचे सहकलाकार सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपूटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन, अकर्श खुराणा यांनी आपल्याला दिलेल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. हा चित्रपट अभिनयदृष्ट्या कुठेही कमी पडत नाही.
दिग्दर्शन - बापजन्मची पटकथा, लेखन व दिग्दर्शन हे सारे निपुण धर्माधिकारी यानेच केलेले असल्याने त्याला चित्रपटात नेमके काय मांडायचे आहे याचे उत्तम भान होते. पण ती पटकथा पडद्यावर मांडताना त्याने काही प्रमाणात सिनेमॅटिक लिबर्टीही घेतली. ती मान्य करायला हवी. भास्कर पंडित मेला असल्याचे नाटक करत असूनही व ते जिवंत असल्याचे साध्या निरीक्षणातूनही कोणाला कळू शकले असते असे असतानाही त्यांचे कथित पार्थिव घरात व नंतर स्मशानभूमीत नेल्यावर त्यांची मुले, शेजारीपाजारी कोणालाच कसा संशय येत नाही हा एक प्रश्न मनात डोकावतो. दुसरे स्मशानात मृत व्यक्तीबाबत डॉक्टरने दिलेला मृत्यूदाखला दाखवून स्मशानभूमी कार्यालयात दाखवून त्याची नोंद करावी लागते तो प्रकार भास्कर पंडितांच्या बाबतीत कसा टळला असाही प्रश्न मनात आला. त्याशिवाय आपटेंच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचे दर्शन त्यांच्या घरात लावलेल्या सीसीटीव्हीद्वारे शेजारीच राहाणाऱ्या आपट्यांच्या मुलाला आपल्या टीव्ही स्क्रीनवर होत असते. आपट्यांच्या अडग‌ळीच्या खोलीत सीसीटीव्ही नसेल पण अन्य खोलीत असलेल्या सीसीटीव्हीमुळे आपट्यांच्या मुलाला एकदा तरी भास्कर पंडित सीसीटीव्हीत कैद झालेले दिसले असतील. दिवसभर भास्कर पंडित काही अडग‌ळीच्याच खोलीत लपून राहात नाहीत. असे वास्तववादी प्रश्न मनात येऊन व ते कथेतले कच्चे दुवे आहेत हे लक्षात येऊनही निपुण धर्माधिकारीच्या कुशल दिग्दर्शनाने या सग‌ळ्या शंकांवर मात केली आहे. मातृप्रेमावर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. मात्र पितृप्रेम हाच केंद्रबिंदू घेऊन चित्रपट बनविणे हे तसे तुलनेने सोपे काम नाही. अगदी पुरुषप्रधान समाज असला तरी भावनिकदृष्ट्या पितृप्रेमापेक्षा मातृप्रेमाकडेच लोक अधिक झुकतात. त्यामुळेही अशा विषयावर चित्रपट बनविणे हे चित्रपट चालण्याच्या दृष्टीनेही तसे आव्हानात्मकच होते. हे सारे धोके पत्करून निपुण धर्माधिकारी याने चित्रपटाची मांडणी चांगली केली आहे. भास्कर पंडितांचे पात्र पूर्ण विकसित केले आहे. तसेच सहकलाकारांनाही व्यवस्थित वाव दिला आहे. उगीच पात्रांची भाऊगर्दी केलेली नाही. नर्मविनोदी संवादातून काही प्रसंग छान खुलवले आहेत. वेगळ्या संकल्पनेवरचा बापजन्म हा कौटुंबिक चित्रपट पितृप्रेमाचे महत्व प्रेक्षकांच्या मनावर ठसवून जातो. 
संगीत - बापजन्म या चित्रपटाचे संगीत व पार्श्वसंगीत गंधार संगोराम याने दिले आहे. या चित्रपटात मन शेवंतीचे फुल हे गाणे असून ते दिप्ती माटे हिने गायले आहे. दिप्ती माटे म्हणजे गायक राहुल देशपांडे याची बहिण. प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे यांची नात. दिप्तीने या गाण्याद्वारे चित्रपटाच्या पार्श्वगायनक्षेत्रात पहिले पाऊल ठेवले आहे. मन शेवंतीचे फुल हे गाणे उत्तमच जमले आहे. त्यानंतरचे दुसरे गाणे आहे ते म्हणजे `गंध अजूनही'. ते जयदीप वैद्य याने गायले असून ते देखील श्रवणीय झाले आहे. ही गीते क्षितीज पटवर्धन याने लिहिली असून गीत व संगीत यांचा मेळ चित्रपटात चांगला जमला आहे. गंधार संगोराम याच्या कामगिरीवर भावी काळात प्रेक्षक नक्कीच लक्ष ठेवून असतील.                        http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-movie-review-of-marathi-film-bapjanma-5706953-PHO.html

No comments:

Post a Comment