Friday, September 15, 2017

‘तुला कळणार नाही’ला मात देत 'बॉईज' ठरला वरचढ व बॉइज चित्रपटाचे परीक्षण - समीर परांजपे - १२ सप्टेंबर २०१७, दिव्य मराठी वेबपेज

BOX OFFICEवर ‘तुला कळणार नाही’ला मात देत 'बॉईज' ठरला वरचढ, वाचा फिल्मचे प्लस पॉईंट्स व चित्रपटाचे परीक्षण
- समीर परांजपे | Sep 12, 2017, 13:20 PM IST
८ सप्टेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर 'तुला कळणार नाही' आणि 'बॉईज' हे दोन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बॉईज' या चित्रपटाने कमाईत तुला कळणार नाही या चित्रपटाला मागे टाकले आहे. रिलीजच्या पहिल्या तीन दिवसांत ‘बॉइज’ने तब्बल 3 कोटी 72 लाखांचा गल्ला जमवला असून, ‘तुला कळणार नाही’ने 1 कोटी 10 लाखांची कमाई केली आहे. त्यामुळे ‘बॉइज’ने ‘तुला कळणार नाही’ला बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर दिल्याचे दिसत आहे. स्वप्ना वाघमारे-जोशी दिग्दर्शित 'तुला कळणार नाही' या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, रसिका सुनील, सुशांत शेलार, निथा शेट्टी हे कलाकार आहेत. तर विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज'मध्ये पार्थ भालेराव, प्रतिक लाड आणि सुमंत शिंदे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
लहान तसेच किशोरवयीन मुलांच्या भावभावनांचे, त्यांच्या शालेय ‌विश्वाचे चित्रण करणारे बरेच मराठी चित्रपट येऊन गेले आहेत. अभिनेता पुष्कर श्रोत्री याने दिग्दर्शित केलेल्या 'उबुंटू' या चित्रपटात शालेय वयातील मुलांचे भावविश्व पाहायला मिळणार आहे. शालेय वयातील कथा म्हटली त्यात या वयात कुठच्याही तरी मुलीबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाची कहाणीही आपसूक येतेच. त्याप्रमाणे 'शाळा' ही आपल्या शिक्षणासाठी किती महत्त्वाची असते हेही या चित्रपटांतून सांगण्याचा प्रयत्न होत असतो. काका मुथाई या तामिळ चित्रपटाचा मराठी रिमेक असलेल्या 'हाफ तिकीट' या मराठी चित्रपटात लहान मुलांच्या भावविश्वावर सुंदर भाष्य केले होते. 'शाळा', 'सहा गुण', 'एलिझाबेथ एकादशी', 'किल्ला', 'माझी शाळा', 'यारी दोस्ती', 'टाइमपास', 'बालक पालक' अशा विविध चित्रपटांतून लहान मुले, किशोरवयीन मुलांच्या भावविश्वाचे दर्शन घडविलेले आहे. मराठी चित्रपटांमध्ये मुलांच्या भावविश्वावर चित्रपट काढण्याचा (बालचित्रपट नव्हे) एक प्रवाह गेल्या काही वर्षांत छान रुळलेला आहे. याच प्रवाहाचा एक हिस्सा आहे 'बॉइज' हा चित्रपट. किशोरवयीन मुलाचे अनेक पैलू मांडण्यात आले आहे. त्याच किशोरवयीन मुलांच्या गमतीजमती, त्यांचा प्रत्येक गोष्टींमध्ये बघण्याचा आयाम या सर्व गोष्टींवर बॉइजमधे हलकेफुलके भाष्य करण्यात आले आहे.
कथा - बॉइज चित्रपटाची कथा सगळी कथा मुख्यत्वे फिरते ती कबीर या मुलाभोवती. कबीर हा शाळेत जाणारा मुलगा. त्याच्या आईचे नाव गायत्री. कबीरला सतत आपल्या आईला एक विचारत असतो की, माझ्या वडिलांचे नाव काय? गायत्री त्याला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नेहमी टाळत असते. आपल्याला वडिलांचे नाव आई का सांगत नाही हा प्रश्न कबीरला छळत असतो व त्यामुळे तो आईवर नाराजही असतो. त्यामुळे आईबरोबर राहूनही तो तिच्याशी फारसे बोलत नसतो. त्या दोघांत तुटक संवाद असतो असे म्हटले तरी चालेल. गायत्री व कबीर यांचे अजिबात पटत नाही हे कबीरच्या मावशीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ती गायत्रीला सांगून तसेच कबीरलाही समजावून त्याला बोर्डिंग स्कूलमधे पाठविते. अशा शाळेत पाठविण्याचा उद्देश हाच असतो की कबीरचे अभ्यासात संपूर्ण लक्ष लागेल तसेच त्याच्या मनात आपल्या वडिलांविषयीचे जे प्रश्न निर्माण झाले आहेत त्याचा काही प्रमाणात तरी विसर पडेल. कबीर बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल होतो. तो अभ्यासात हुशार असतो. विविध आंतरशालेय व शालेय स्पर्धांमध्ये तो हिरिरीने सहभागी होतो. त्या स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावून पारितोषिकेही मिळवतो. शा‌ळा, अभ्यास हे च त्याचे जग बनून जाते. तो फारसा बोलकाही नसतो. तो कोणाशीही कामापुरतेच बोलायचा. त्याला शा‌ळेत फारसे मित्रही नसतात. अशा कबीरच्या शालेय जीवनात एक खूप मोठा बदल होतो. त्याच्या बोर्डिंग स्कूलमधे दोन मुले प्रवेश घेतात. त्यांची टोपणनावे डुंग्या आणि ढेऱ्या अशी आपल्याला चित्रपटात दिसतात. डुंग्या व ढेऱ्या ही दोन मुले हॉस्टेलमधे कबीरचीच रुम पार्टनर असतात. डुंग्या व ढेऱ्या ही दोघेही ग्रामीण भागातील मुले आहेत. ते दोघेही बेरकी आहेत. अभ्यासात फारसे हुशार नसतील परंतु त्यांना लहानपणापासूनच जगाचे उत्तम व्यवहारज्ञान आहे. ढेऱ्या व डुंग्या यांना लोकांशी बोलायला आवडते. ते अतरंगी देखील आहेत. आयुष्य धमाल करत जगावे असे त्यांना वाटत असते. कबीर नेहमी अबोल का असतो याचा हे दोघे विचार करतात. कबीरने इतरांत मिसळावे, त्याने आयुष्य रसरसून व समरसून जगावे असे डुंग्या व ढेऱ्या या दोघांनाही वाटत असते. ते कबीरला आपला चांगला मित्र बनवतात. अर्थात या तिघांत लगेचच घट्ट मैत्री होत नाही. ती मैत्री हळुहळू फुलते. प्रत्येक मुलाच्या मनात कोणत्या कोणत्या मुलीविषयी आकर्षण हे असतेच. किशोरवयात तर ही भावना अधिक फुलते. कबीरलाही ग्रेस नावाची एक मुलगी आवडत असते. पण त्याच्या एकुणच अबोल व एकलकोंड्या स्वभावामुळे तो आपली प्रेमभावना तिच्याकडे कधीच व्यक्त करण्याची शक्यता नसते. इथे डुंग्या व ढेऱ्या या मुलांचे कबीरला `मार्गदर्शन' लाभते! कबीर ग्रेसकडे पुढे तशा भावना व्यक्त करतो देखील. बोर्डिंग स्कूलमध्ये आल्यापासून कबीरमध्ये असे अनेक बदल झालेले आहेत. तो मनमोक‌ळा होत चालला आहे. त्यात होणारे बदल हे त्याच्या मावशीच्याही लक्षात आलेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला कबीर व त्याची आई गायत्री यांच्यातील संवाद तुटकच आहे. बोर्डिंग स्कूलच्या हॉस्टेलमध्ये मोबाइल फोन वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे गायत्री जेव्हा जेव्हा हॉस्टेलमधील कॉमन फोनवर कबीरला फोन करते त्या त्या वेळी तो काही कारणे काढून तिचा फोन घेण्याचे टा‌ळत राहातो. कबीरच्या मनात अद्यापही आपल्या वडिलांचे नाव काय हा प्रश्न रुतून बसलेलाच आहे. ज्या वडिलांना त्याने कधी पाहिलेही नाही त्यांच्यासाठी कबीर तळमळतो पण त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईपासून तो स्वत:ला लांब ठेवतो. एक सत्य असे असते जे कबीरला माहित नसते. त्याच्या आई गायत्रीला ब्रेस्ट कॅन्सर झालेला असतो. तिला काही काळानंतर रुग्णालयात दाखल केलेले असते. तिच्यावर केमोथेरपीसारखे उपचार सुरु असतात. हे कळल्यानंतर कबीरच्या पायाखालची जमीन सरकते. तो आपल्या आईला भेटायला जातो. आपण आईशी ज्या तुटकपणे वागलो त्याचा त्याला पश्चाताप होतो. या वळणावर काही प्रश्न निर्माण होतात. कबीरला त्याची आई त्याच्या वडिलांचे नाव सांगते का? कबीरची आई ब्रेस्ट कॅन्सरच्या दुखण्यातून बरी होते का? कबीरला त्याचे वडिल भेटतात का? आपल्या बरोबर असलेल्या लोकांबरोबर हसत खेळत आयुष्य घालवायचे असते, कोणाशीही संबंध विनाकारण तोडून टाकता कामा नये हा धडा कबीरला मिळतो का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी बॉइज हा चित्रपट बघायलाच हवा.
अभिनय - कबीर या मुलाची भूमिका सुमंत शिंदे याने केली आहे. आपल्या वडिलांचे नाव काय आहे हे आईने का दडवून ठेवलेय या विचाराने संत्रस्त झालेला, अबोल असणारा, आपल्या आई विषयी मनात अढी असलेला कबीर सुमंत शिंदे याने चांगला वठविला आहे. त्याचे अभ्यासात हुशार असणे, स्पर्धांमध्ये बक्षिस मिळविणे हा भाग आपल्याला चित्रपटातून कळत जातो पण त्याचे लोकांमध्ये फारसे न मिसळणे, खूप कमी बोलणे हा व्यक्तिमत्वाचा एक कंगोरा कबीरने कसदार अभिनयातून पडद्यावर व्यक्त केला आहे. कबीरचे शिक्षक मंदार सर यांच्या भूमिकेत संतोष जुवेकर आहे. कबीरला समजून घेत त्याच्या आयुष्याला एक चांगला आकार देण्यासाठी मंदार हे शिक्षक धडपडत असतात. कबीर मनमोकळा होतो, आयुष्याची खरी मजा घेतो ती ढेऱ्या व डुंग्या या शाळेतील मित्रांमुळे. ढेऱ्याची भूमिका पंकज लाड व डुंग्याची भूमिका पार्थ भालेराव यांनी केली अाहे. ग्रामीण भागातून आलेली इरसाल मुले त्यांनी जी काही रंगविली आहेत ती लाजवाबच आहेत. कबीरच्या आईच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर आहे. आपला मुलगा कबीर आपल्याशी फारच तुटक बोलतो याची सल तिच्या मनात आहे. ती दूर करायचा ती प्रयत्न करते व त्याच बरोबर कबीरच्या वडिलांचे नाव त्याला न सांगण्याच्या आपल्या निर्धारावरही ती कायम असते. तिच्या आयुष्यातील काही घटना कबीरला त्याच्या किशोरवयात कळू नयेत असेही तिला वाटत असावे. गायत्रीची ही सारी तगमग तिने अभिनयातून व्यवस्थित व्यक्त केली आहे. शर्वरी जमेनीस ( कबीरची मावशी), वैभव मांगले (नाम्या शिपाई), झाकीर हुसैन (फर्नांडिस सर), ग्रेस (रितिका श्रोती), भाऊ कदम यांच्या भूमिका चोख झालेल्या आहेत.
दिग्दर्शन - विशाल देवरुखकरनेच या चित्रपटाची कथा लिहिली आहे व त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. िवशालने दिग्दर्शित केलेला पहिला मराठी चित्रपट म्हणजे बॉइज. दिग्दर्शनाचा त्याचा हा पहिलाच प्रयत्न असूनही त्याने बाजी मारली आहे हे मोकळेपणाने सांगायला पाहिजे. कबीर, डुंग्या, ढेऱ्या यांच्या यारी दोस्तीत विशालने जे रंग भरले आहेत त्यामुळे या चित्रपटात हलकेफुलकेपणा आला आहे. त्याचबरोबर किशोरवयीन मुलांच्या भावविश्वात त्यांच्या पालकांचे स्थान नेमके काय असते हेही थेटपणे दाखविले आहे. लहान मुलांच्या मनावर कोणत्या घटनेने ओरखडे येतील काही सांगता येत नसते. त्याचबरोबर आपले पालक आपल्यासाठी किती करतात याचे भान या मुलांना काही प्रसंगातूनच येते. नेमके हेच बॉइज चित्रपटातील अनेक घटनांतून सारखे दिसत राहाते. आपल्याबरोबर जे लोक नाहीत त्यांच्या आठवणीचे कढ काढत बसण्यापेक्षा आपल्यासोबत जे लोक आहेत, जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात त्यांच्यासोबत हसतखेळत आयुष्य घालविणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे आपणही आनंदी राहातो हाच कळतनकळत संदेश या चित्रपटातून विशाल देवरुखकरने दिला आहे. सफाईदार दिग्दर्शनामुळे विशाल देवरुखकरच्या पुढील चित्रपटांकडे रसिकांचे नक्कीच लक्ष राहिल. आनंदी आयुष्य कसे जगावे याचा कानमंत्रच मुलांपासून थोरांपर्यंत हसतखेळत या चित्रपटातून मिळतो. हा संपूर्ण कुटुंबाने जाऊन बघावा असा चित्रपट असला तरी या चित्रपटातील संवाद काहीवेळेलेला व्हल्गॅरिटीच्या सीमारेषेपर्यंत जातात. तेवढे टाळता आले असते तर बरे झाले असते. चित्रपटाचे छायाचित्रण, संकलन या बाबी नेटक्या झाल्या आहेत.
संगीत - बॉइज चित्रपटातील गाणी ही अवधूत गुप्ते व वैभव जोशी यांनी लिहिली आहेत. तर या गाण्यांना अवधूत गुप्ते यानेच संगीत दिले आहे. अवधूतचे संगीत हे युथफूल असते तसे ते इथेही आहे. या चित्रपटातील एक लग्नाळू हे गाणे खूप गाजते आहे. सनी लिओनीने या चित्रपटात आयटम सॉंगवर डान्स केलेला असला तरी तिच्या अदाकारीपेक्षा अवधूत गुप्तेचे संगीत जास्त लक्षात राहाते. ते एका अर्थी बरेही आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-3-days-box-office-collection-of-marathi-films-boys-and-tula-kalanar-nahi-5692884-PHO.html

No comments:

Post a Comment