Tuesday, October 31, 2017

कमलाबाई गोखले ते विक्रम गोखले या तीन पिढ्यांनी जपलाय समाजकार्याचा `वसा' - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी ३१ आँक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या ३१ आँक्टोबर २०१७च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली व मी केलेली ही विशेष बातमी. या बातमीची वेबपेज लिंक, मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/beed/251/311…/0/5/
----
कमलाबाई गोखले ते विक्रम गोखले या तीन पिढ्यांनी जपलाय समाजकार्याचा `वसा'
- महाराष्ट्राच्या अभिनयक्षेत्रातील एक आगळी घटना
विक्रम गोखले यांनी सोमवारी वाढदिवसाच्या दिवशी दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपये
- समीर परांजपे
मुंबई, दि. 31 ऑक्टोबर - ख्यातनाम अभिनेते विक्रम गोखले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आज एक लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्द केले. विक्रम गोखले यांचा सोमवारी होता वाढदिवस. त्या दिवशी त्यांनी हे पुण्यकार्य केले. त्यांची आजी कमलाबाई गोखले, वडील चंद्रकांत गोखले व स्वत: विक्रम गोखले अशा गोखले यांच्या तीन पिढ्यांनी कोणताही गाजावाजा न करता समाजकार्याचा आपला वसा सुरु ठेवला आहे. अभिनयाचा आपला व्यवसाय निष्ठेने करतानाच समाजासाठीही आपल्या परीने झटणारे गोखले घराणे हे महाराष्ट्राच्या चित्रपट, नाटक, मालिका क्षेत्रातील एक दुर्मिळ उदाहरण आहे.
विक्रम गोखले यांच्या आई कमलाबाई गोखले. कमलबाईंची आई दुर्गाबाई कामत ही भारतीय चित्रपटातील पहिली नायिका समजली जाते. रघुनाथराव गोखले यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर कमलाबाई गोखले यांना तीन पुत्र झाले. त्यात चंद्रकांत गोखले यांचा समावेश होता. चंद्रकांत गोखले यांचे पुत्र म्हणजे विक्रम गोखले. कमलाबाई गोखले या चार वर्षांच्या असताना त्यांनी दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासूर या चित्रपटात काम केले होते. कमलबाई गोखले यांनी सुमारे ३५ िचत्रपटांत कामे केली. संगीत उ:शाप या हरिजनांच्या उद्धार हा विषय घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या नाटकात कमलाबाई यांनी भूमिका केली होती. तेव्हापासून गोखले घराण्याच्या तीनही पिढ्या या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या अनुयायी राहिलेल्या आहेत. कमलबाई गोखले यांना वयाच्या २५ व्या वर्षी वैधव्य आले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात अबला, त्याचप्रमाणे लष्करातील सैनिक यांना आपल्या परीने जेवढी मदत किंवा सहकार्य करता येईल तेवढे केले होते.
कमलबाई गोखले यांच्याकडून नेमका हाच वसा त्यांचे पुत्र व अभिनेते चंद्रकांत गोखले यांनी घेतला. चंद्रकांत गोखले पूर्वी एक लाख रुपये दरवर्षी, युद्धात परावलंबी झालेल्या सैनिकांना देत असत. त्यासाठी त्यांनी बँकेत काही रक्कम ठेवली होती. पण बँकेचा व्याजदर कमी झाल्यानंतर वर्षाला लाखभर रुपये मिळेनासे झाले. चंद्रकांत गोखले यांनी सैनिकांना एक लाख रुपये देता यावेत म्हणून आपले एका वेळचे जेवण शेवटच्या श्वासापर्यंत बंद केलं. अर्धपोटी राहिले ते. घरात काही दिसत नाही, अंधार पडला, आता दिवा लावलाच पाहिजे, अशी वेळ येईपर्यंत ते दिवे लावेनासे झाले. आवश्यक तेवढंच पाणी वापरलं. अांघोळीसाठी पाणी तापवणे बंद केलं. वाचवता येतील तसे पैसे वाचवले, पण सैनिकांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचा संकल्प त्यांनी मोडला नाही. त्यांनी कधीही रिक्शा केली नाही. बसने प्रवास केला, पायी गेले. साधे कपडे घातले. असे करून जमतील तेवढे पैसे वाचवले आणि अनेक संस्थांना देणगी म्हणून दिले.
चंद्रकांत गोखले यांचे पुत्र विक्रम गोखले यांनी पंचवीस वर्षापूर्वी आपली आजी कमलबाई गोखले यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन केला असून त्याच्या माध्यमातून ते आदिवासी मुलांच्या कल्याणासाठी कार्य करतात. त्याचप्रमाणे अपंग मुलांच्या पुर्नवसनासाठी देखील या ट्रस्टमधून काही मदत उपलब्ध करुन दिली जाते. तुरुंगातील कैद्यांसाठीही विक्रम गोखले यांनी काही सेवाकार्य केले आहे. दुर्गाबाई भागवत यांच्यावर अंजली किर्तने यांनी जो लघुपट तयार केला त्यासाठी पहिली देणगी दिली ती विक्रम गोखले यांनी म्हणून तो लघुपट तयार होऊ शकला. कमलाबाई गोखले, चंद्रकांत गोखले ते विक्रम गोखले अशा गोखलेंच्या तीन पिढ्यांनी अभिनयाबरोबरच समाजकार्यात आपला ठसा उमटवला आहे ही या क्षेत्रातील एक आगळीच घटना आहे.
चंद्रकांत गोखले यांची त्यागी वृत्ती
प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी चंद्रकांत गोखले यांची आठवण सांगताना म्हटले होते की, ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले व आम्ही एखा नाटकाच्या दौऱ्यासाठी परदेशात गेलो होतो. तिथे दररोज आम्हाला जेवणासाठी पैसे मि‌ळत असत. परंतु चंद्रकांत गोखले दिवसातून फक्त एकदाच जेवत असत. एका वेळच्या जेवणाचे पैसे त्यांनी साठवून ठेवले होते. चंद्रकांत गोखले जेव्हा परदेशातून भारतात परत आले तेव्हा त्यांनी आपल्याकडचे साठवलेले सुमारे हजार आठ डॉलर सहकाऱ्यांकडे दिले. गोखले केवळ एक वेळ जेवण करत. एका वेळच्या जेवणाचे पैसे त्यांनी साठवले होते. ते संपूर्ण पैसे मुंबई येथील सावरकर निधीला चंद्रकांत गोखले यांनी दिले होते. या गोष्टीचा कुठेही गाजावाजा कधीही चंद्रकांत गोखले यांनी केला नाही. दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ते स्वकमाईतील विशिष्ट रक्कम सैनिक कल्याण निधीलाही देत असत.

No comments:

Post a Comment