Tuesday, October 24, 2017

ताजमहालवरुन रणकंदन हे आठवे आश्चर्यच! - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी दि. २४ आँक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. २४ आँक्टोबर २०१७च्या अंकात ताजमहालवरुन उठलेल्या वादंगाविषयी मी लेख लिहिला आहे. त्या लेखाची जेपीजी फाइल, वेबपेज लिंक व मजकूर पुढे देत आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/241/24102017/0/10/
----
ताजमहालवरुन रणकंदन हे आठवे आश्चर्यच!
--
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
आग्रा येथील ताजमहालचा जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश होतो. पण त्यानंतर एक आठवे आश्चर्यही घडले. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विराजमान होऊन सहा महिनेही पूर्ण झाले नाहीत, तितक्यातच या राज्याच्या पर्यटन विभागाच्या माहितीपुस्तकातून ताजमहाल वगळण्यात आला. गेल्या ऑक्टोबरमधील ही घटना आहे. तेव्हापासून ताजमहाल हा जो काही वादाचा विषय बनला आहे, तसा ताजमहाल बांधणाऱ्या शहाजहान बादशहाच्या काळातही कदाचित वादग्रस्त बनला नसेल. असे होण्याला एक पार्श्वभूमीही आहे. गेल्या जूनमध्ये योगी आदित्यनाथ वदते झाले, `ताजमहाल हे भारतीय संस्कृतीचे प्रतिक नाही.' आता आपले मुख्यमंत्रीच जर असे म्हणू लागले तर त्यांच्या हाताखालचे उत्तर प्रदेशी नोकरशहा त्यांचेच ऐकणार की नाही? त्यांनी वगळून टाकले ताजमहालला माहितीपुस्तकातून. योगी व नोकरशहांना वाटले चला, जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य तर गायब केले! पण त्यांचे प्रयत्न वृथा ठरले. ताजमहाल सगळ्यांना पुरुन उरला. अगदी दशांगुळे उरला. तेव्हापासून दर चार पाच दिवसांनी कोणी ना कोणी ताजमहालविषयी एक तर भारतीय संस्कृतीच्या बाजूने(?) किंवा भारतीय संस्कृतीच्या विरोधात (?) वक्तव्ये करीत आहे. उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाच्या माहितीपुस्तिकेतून जसे ताजमहालला हटविले तसे भाजपचे उत्तर प्रदेशातील एक आमदार संगीत सोम यांनी एक विधान केले आहे. `ताज महालच्या बनविणाऱ्याने उत्तर प्रदेश आणि भारतातील हिंदूंचे उच्चाटन करण्याचेच काम केले. तो एक देशद्रोही होता. त्यामुळे ही वास्तू देशाला लागलेला एक कलंक आहे.' भाजपाचे एक वरिष्ठ नेते विनय कटियार यांनी तर `ताजमहालच्या आधी तिथे तेजोमहाल हे शंकराचे मंदिर होते. त्याचे शहाजहानने मकबऱ्यात रुपांतर केले. असे असले तरी ते पाडून टाकण्याची गरज नाही. कारण जगातील सात आश्चर्यांपैकी ते एक आहे.' 
वास्तूलाही मन असते असे म्हणतात. त्यामुळे आपल्यावरुन एवढे वादंग का माजत आहेत याचे कदाचित ताजमहाल या वास्तूलाही आश्चर्य वाटले नसेल. कारण ही सगळी विधाने देशात जातीय वातावरण निर्माण करण्यासाठीच सुरु आहेत याची त्या ऐतिहासिक वास्तूलाही जाण असावी. ताजमहालशी संबंधित पर्यटनखात्याच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत्या २६ ऑक्टोबरला आग्रा येथे दौरा करणार आहेत. ताजमहालवरुन उत्तर प्रदेश व देशातील वातावरण भाजपच्या लोकांकडून मुद्दामहून तापले व तापविले जात आहे याचे भान नसण्याइतपत आदित्यनाथ दुधखुळे नक्कीच नाही. ही आग लागल्यानंतर ते ती विझवायला बंब घेऊन आले. ताजमहालवरुन चाललेल्या वादाविषयी इतके दिवस धारण केलेले मौन सोडून योगीराज बोलते झाले ` ताजमहाल हा भारतीय मजूरांनी आपला घाम गाळून बांधला आहे. ताजमहाल हा अतिशय महत्वाचा आहे, विशेषत: पर्यटनाच्या अंगाने त्याला खासे महत्व आहे. त्यामुळे ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा मिळाव्या, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जावी यासाठी आमचे सरकार नक्कीच योग्य पावले उचलेल.' आदित्यनाथांचे हे विधान चलाखीचे आहे. ताजमहाल हा शहाजहान या मुस्लिम बादशहाने बांधला त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या ती वास्तू हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने किती महत्वाची आहे किंवा नाही याविषयी आदित्यनाथांनी बोलायचे टाळले. त्याचबरोबर ताजमहालमुळे मोठा महसुल मिळत असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने त्यांना ही वास्तू टाळता येणेही अशक्य आहे. त्यामुळे पर्यटनासाठीच ताजमहाल चांगला असा कळत पण नकळत भाव आणत त्यांनी सूर लावला. मुळात आदित्यनाथ, विनय कटियार किंवा संगीत सोम यांच्या कोणत्याही फटकळ आणि फुटकळ विधानांनी ताजमहालचे ऐतिहासिक महत्व किंचितही कमी होणार नाही. ताजमहाल बांधताना जी सौंदर्यदृष्टी त्या कारागिरांनी ठेवली होती, त्यातील एक सहस्त्रांशही नजर या भगव्या लोकांकडे नाही. त्यांना प्रत्येक ठिकाणी धर्माशिवाय दुसरे काही दिसत नाही. अयोध्येमध्ये रामजन्मभूमीवरील वादग्रस्त बाबरी मशिद ज्यांनी पाडली, ते कोण आहेत ते सर्वांनाच माहित आहे. त्या धर्तीवर अजून काही प्रयोग होऊ शकतात का याची आसूरी भूक असुरांना लागलेली असते. ताजमहाल वाद जेव्हा सुरु झाला त्यावेळी ती एक मुस्लिम वास्तू आहे असे तिच्याकडे पाहाणाऱ्यांची तुलना फक्त तालिबानी प्रवृत्तींशीच होऊ शकते. 
आपल्या खोटारड्या युक्तिवादांसाठी इतिहास खोटा करुन सांगणाऱ्यांना ऐतिहासिक दाखला देऊनच त्यांचे कान उपटले पाहिजेत. अफगाणिस्तानातील हझरत भागातील बमियान येथे चवथ्या व पाचव्या शतकात डोंगरामध्ये गौतम बुद्धाची भव्य पूर्णाकृती शिल्पे कोरण्यात आली होती. गांधार शैलीतील ही शिल्पे होती. २००१ साली धर्मांध व नादान तालिबान्यांनी आपला नेता मुल्ला मोहम्मद ओमर याच्या आदेशानूसार बमियानमधील बुद्धाच्या या भव्य मूर्ती सुरुंग लावून तसेच तोफांचे बार उडवून उद्ध्वस्त केल्या. बुतशिकन प्रवृत्ती ती हिच. त्यामुळे या मूर्तींचे बरेच नुकसान झाले. त्या मूर्तींचे पुन्हा नीट जतन करण्यासाठी आता युनेस्कोने कंबर कसली आहे. या सगळ्या जतनीकरणाला जपान, स्वित्झर्लंड या देशांनीही सहाय्य केले आहे. आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय) म्हणजे दुसऱ्या शब्दांत भारतीय केंद्रीय पुरातत्व खाते. हा विभाग ब्रिटिश राजवटीत लॉर्ड कनिंग याने ब्राह्मी लिपिचा जाणकार अलेक्झांडर कनिंगहॅमच्या याच्या सहकार्याने स्थापन केला. भारतातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संरक्षण व्हावे यासाठी हा विभाग सुरु करण्यात आला. साम्राज्यवादी गोऱ्या साहेबाला भारतातील वास्तू उद्ध्वस्त झाल्या असत्या तरी काय फरक पडणार होता? पण तरीही त्यांनी सांस्कृतिक नजर दाखवली बाबा! तर अशा या एएसआयने १९६९ व १९७७ साली बमियानमधील बुद्धमूर्तींच्या जतन व संरक्षणासाठी अफगाणिस्तानला खास मदत केली होती. त्याचे भरपूर तपशील उपलब्ध आहेत. ती बौद्धधर्माची शिल्पे होती म्हणून एएसआयने हे पाऊल उचलले होते का? तर असे काही नव्हते. कोणत्याही धर्माच्या, संस्कृतीच्या भारत व भारताबाहेरील ऐतिहासिक वास्तूंचे नीट जतन व संरक्षण व्हायला पाहिजे ही एएसआयची या विभागाच्या स्थापनेपासूनची भूमिका आहे. आग्रा येथील ताजमहालचे जतन व संरक्षण याची जबाबदारी एएसआयवरच आहे. `ताजमहाल हा मुघल बादशहा अकबराचा नातू शहाजहानने आपली राणी अारजूमंद बानो बेगम (मुमताज महल) हिच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधला' असा स्पष्ट उल्लेख आर्किआॅलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांत व या िवभागाच्या वेबसाइटवरही आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने ताजमहालला आपल्या माहितीपुस्तिकेत ठेवो किंवा वगळो त्याने काहीही फरक पडत नाही. ताजमहालच्या मुळ परिसरामध्ये उत्तर प्रदेश सरकारला काहीही ढवळाढवळ करता येणार नाही, कोणतेही अनाठायी बांधकाम करण्याचा अधिकारच नाही. ही जाणीव उत्तर प्रदेश सरकारला असल्यानेच ताजमहालच्या पर्यटनाविषयीच्या योजनांच्या आढाव्याबद्दलच योगी आदित्यनाथ बोलत आहेत. वास्तूबद्दल बोलायचे टाळत आहेत. पण हे भाजप नेत्यांना नीट कळते पण त्यांना फक्त ताजमहालवरुन वातावरण तापवायचे आहे. 
ताजमहाल नव्हे तेजोमहालय असे एक अर्ध्याकच्च्या इतिहासाचे पुस्तक कथित इतिहास संशोधक पु. ना. ओक यांनी चा‌ळीस वर्षांपूर्वी लिहिले. त्यांनी ताजमहालच्या इतिहासाचे पुर्नलेखन केले जावे अशी मागणी करणारी २००० साली केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. पु. ना. ओक यांचा ताजमहालवरील पुस्तकाचा आधार घेऊन ताजमहालाचे तेजोमहाल असे नामकरण करा अशी याचिका २०१५ साली आग्रा जिल्हा न्यायालयामध्ये सहा वकिलांनी संयुक्त याचिकेद्वारे केली होती. ती न्यायालयाने फेटाळून लावली. थोडक्यात काय तर न्यायसंस्थेनेही तेजोमहालवाल्यांना कधीही उभे केले नाही. ताजमहाल मंदिर नव्हे, तर समाधीस्थळ आहे हे एएसआयने न्यायालयात सादर केलेल्या एका प्रतिज्ञापत्रातही म्हटले आहे. यापूर्वी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नोव्हेंबर २०१५ मध्ये लोकसभेत हे स्पष्ट केलं होतं की ताजमहालाच्या जागी मंदिर असण्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. या इतक्या गोष्टी होऊनही ताजमहालवरुन भाजप नेत्यांना देशभर रान पेटवायचे असेल तर त्यांना रोखले पाहिजे. इतिहासाला वेठीला धरुन इतिहास घडत नसतो हे या संस्कृतीरक्षकांना जेवढे लवकर कळेल तितके चांगले

No comments:

Post a Comment