Tuesday, October 31, 2017

कमल हासन - आय एम द पीपल - श्रीधर तिळवे - शब्दांकन- समीर परांजपे - दै. दिव्य मराठी २९ ऑक्टोबर २०१७ रसिक पुरवणी



दै. दिव्य मराठीच्या रसिक या रविवार पुरवणीत दि. 29 आँक्टोबर 2017 रोजी प्रसिद्ध झालेला ज्येष्ठ कवी व चित्रपट पटकथाकार श्रीधर तिळवे यांचा हा लेख. या लेखाचे शब्दांकन मी केले असून त्या लेखाची वेबपेज लिंक व जेपीजी फाइल व मजकूर इथे सोबत दिला आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/rasik/244/29…/0/1/
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/…/rasik/244/29…/0/2/
-----------------------
कमल हासन - आय एम द पीपल
----------------------
- श्रीधर तिळवे
shridhar.tilve1@gmail.com
------------------------
(शब्दांकन - समीर परांजपे)
-----------------------
‘आय एम नॉट जस्ट द मॅन, आय एम द पीपल' अशी गर्जना करत कमल हासन तामिळनाडूच्या राजकीय क्षितिजावर अवतरला तेव्हा, ही गर्जना एका सुपरस्टारने केली आहे की, खरोखरच कमल हासन राजकारणाबाबत गंभीर झालाय, असा संभ्रम त्याला ओळखणाऱ्या अनेकांमध्ये निर्माण झाला. गेली कित्येक वर्षे कमल हासन अनेक प्रसंगात सामाजिक व राजकीय वक्तव्ये करत आलेला आहे. त्यावरुन वेळोवेळी वादही झडले आहेत. पण प्रथमच राजकारणाविषयी एक ठोस भूमिका असल्यासारखा तो बोलताना दिसतोय. त्यामुळे त्याची सर्व विधाने अत्यंत गांभीर्याने घेण्याची वेळ मीडिया आणि राजकारणी लोकांवर आलेली दिसतेे.
तामिळनाडूत जयललितांचा मृत्यू झाला आणि एक राजकीय पोकळी निर्माण झाली. या पोकळीत शशिकला स्थिरावतील, असे वाटत असतानाच भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्या साइडलाइन झाल्या. अण्णाद्रमुक विरुद्ध द्रमुक ही आतापर्यंतची द्विध्रुवीय राजकीय स्थिती संपुष्टात येते की काय, अशी शंका निर्माण झाली. साहजिकच एका सुपरस्टारच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी दुसरा सुपरस्टार आणावा, ही भावना प्रबळ होत गेली आणि रजनीकांत व कमल हासन या दोघांमागे त्यांनी राजकारणात प्रवेश करावा म्हणून त्यांच्या काही फॅन्सनी वैयक्तिक पातळीवर तगादा लावायला सुरुवात केली. मात्र आरोग्याच्या समस्यांमुळे रजनीकांतच्या राजकारण प्रवेशाच्या शक्यता मावळत गेल्या. सगळा झोत कमल हासनच्या दिशेने वळला. यात भरीस भर म्हणून भाजपची आतापर्यंतची तामिळनाडूमध्ये मर्यादित असलेली ताकदही विस्तारत गेली. अर्थात, भाजपची कर्मठ भूमिका जोवर राजकारणापर्यंत मर्यािदत होती, तोवर तामिळ चित्रपटसृष्टीला तिच्याशी काही देणेघेणे नव्हते. पण अचानक सुपरस्टार विजयच्या ‘मर्सल’ या चित्रपटावरून भाजपने वादळ उठविले. चित्रपटात जीएसटीवर नव्हे तर पंतप्रधान मोदींवर टीका आहे, या कारणास्तव हा चित्रपट रिसेन्सॉर करावा, अशी बालीश मागणी केली गेली. एवढा आक्षेप घेऊनही भाजप कार्यकर्त्यांचा आत्मा थंडावला नाही. आपल्यातला जोश दाखण्यासाठी त्यांनी ‘मर्सल’चा नायक विजय हा ख्रिश्चन असल्याने त्याने हे मुद्दाम केले असा बिनबुडाचा आरोपही केला.यानंतर मात्र, तामिळ चित्रपटसृष्टीत प्रचंड नाराजी पसरली. वास्तविक तामिळ चित्रपटसृष्टीने आजवर कधीही जातपात व धर्मबिर्म बघितलेला नाही. ही भारतातील कदाचित एकमेव चित्रपटसृष्टी असेल, जिथे तब्बल ८० टक्के अभिनेते ब्राह्मणेतर आहेत आणि त्यातील पन्नास टक्के चक्क अनुसुचित जाती-जमातींतले (शेड्युल कास्ट) आहेत. अशा वेळी अभिनेता विजयचा धर्म काढणे, हे कोणालाच मानवणारे नव्हते. नेमका याचवेळी कमल हासनने विजयला जाहीर पाठिंबा दिला. याचे कारण उघड आहे. कमल हासन ब्राह्मण असला, तरी त्याच्या जातीचा विचार ना कमल हासनने केला, ना चित्रपटसृष्टीने केला ना, त्याच्या चाहत्यांनी. राजकारणातही त्याच्या पूर्वी जयललिता या ब्राह्मण असूनही, त्यांचे ब्राह्मण्यत्व कधीही राजकारणाच्या आणि लोकपाठिंब्याच्या आड आले नव्हते. त्यामुळे कमल हासनला ब्राह्मण असल्याचे कसलेच नुकसान होणे शक्य नाही. शिवाय जात आणि धर्माच्या कॉलमात कायमच ‘नास्तिक’ असा उल्लेख करत आल्याने कमल हासन हा ब्राह्मण्यत्वाचा त्याग केलेला पुरोगामी नट अशीच प्रतिमा तामिळनाडूमध्ये रुजली आहे. साहजिकच सेक्युलर वातावरण जिवंत ठेवण्यासाठी भाजपचा पाडाव झाला पाहिजे, असे मानणारे लोक कमल हासनमागे उभे राहायला सुरुवात झाली.
यात कमल हासनची पंचाईत अशी आहे की, तो द्रमुक व अण्णाद्रमुकमध्ये जाऊ शकत नाही. याचे कारण, त्याचे स्वत:चे व्यावसायिक हितसंबंध! दुसरी गोष्ट, त्याच्या दोन्ही मुली विशेषत: अक्षरा ही बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी धडपडते आहे. त्यामुळे स्वत:ची राष्ट्रीय प्रतिमा जपणे कमल हासन कुटुंबाला व्यावसायिक पातळीवर विशेष आवश्यक आहे. अण्णा द्रमुक, द्रमुक हे दोन्ही पक्ष द्रविड तामिळ अस्मितेचा कट्टर पुरस्कार करत असल्याने, प्रादेशिक अस्मितेशी जुळवून घेणे कमल हासनला तसेही शक्यच नाही. साहजिकच या पार्श्वभूमीवर कमल हासनपुढे चारच पर्याय उपलब्ध होते. एक,कम्युनिस्ट. दोन, काँग्रेस. तीन, भाजप आणि चार, आप. परंतु, कमल हासन सेक्युलरवादाचा कट्टर पुरस्कर्ता असल्याने, भाजपशी त्याचे जमणे शक्यच नव्हते आणि आपण डावे नाही आहोत, हे तर तो १९८० पासूनच सांगतो आहे. त्यामुळे कम्युनिस्ट पक्ष हा पर्यायही बाद झाला. काँग्रेस ही कमल हासनसाठी एक उत्तम शक्यता होती. पण काँग्रेसला तामिळनाडूमध्ये पक्का बेस नाही. त्यामुळे काँग्रेसच्या सोबत गेल्याने कमल हासनची मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता नाही. साहजिकच हा पर्यायही रद्दबातल आहे. मग शेवटी, ‘आप’च उरतो. कमल हासनला तामिळनाडूचा मुख्यमंत्री बनविण्यात ‘आप’ची कसलीच आडकाठी नाही, असे केजरीवाल यांनी स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगितले आहे. केजरीवाल हे काँग्रेसपेक्षा शब्दांचे अधिक पक्के आहेत, या भरवशावर कदाचित कमल हासन ‘आप’कडून रिंगणात उतरु शकतो. किंवा काँग्रेस-आपला पाठिंबा देणारा नवा पक्ष वा संघटना जन्माला घालू शकतो. पण हेही तितकेसे सोपे नाही. कारण, कमल हासनची आर्थिक स्थिती. 
कमलचे ‘हे राम'पासूनचे कित्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चाललेले नाहीत. त्यामुळे जाणकारांच्या मते, त्याने कमावलेले जवळजवळ ७० टक्के पैसे हे वाया गेलेले आहेत. साहजिकच उरलेले ३० टक्के पैसे राजकारणासाठी पणाला लावण्याची कमल हासनची तयारी नाही. मात्र उद्या जर कोणी त्याच्या स्वतंत्र पक्षाची आर्थिक जबाबदारी घेतो,असे म्हणाला तर कमल हासन आप सोडून स्वत:चा पक्ष काढणार नाही, याचीही खात्री नाही. इथे असा प्रश्न निर्माण होतो की, रजनीकांतप्रमाणे कमल हासनजवळ पैसा का उरला नाही? याचे उत्तर असे की, रजनीकांत हा कधीच प्रचंड पैसे गुंतवणारा निर्माता झाला नाही. स्टारडममुळे मिळणारा पैसा त्याने सामाजिक कार्यात दान केला. कमल हासनने आपला सारा पैसा कायमच चित्रपटसृष्टीत पणाला लावला. त्यामुळे त्याच्या हातात मोठा दानधर्म करायला पैसाच शिल्लक उरला नाही. एकदा तर चित्रपट पूर्ण करण्यासाठी त्याच्या जवळ पैसा नव्हता, तेव्हा रजनीकांतने पैसे पाठवून तो चित्रपट पूर्ण केला. त्यामुळे जे सामाजिक उत्तरदायित्व रजनीकांतबाबत प्रखरपणे पुढे येते, ते कमल हासनबाबत कधीच पुढे आले नाही. त्यामुळे कमलच्या चाहत्यावर्गात चित्रपट फ्लॉप होत गेले, तसे घट होत गेली. त्याउलट रजनीकांतचे चित्रपट चाहते मात्र वाढतच गेले. याचा परिणाम कमल हासनवर नेमका काय होणार आहे?
याही पुढचा प्रश्न असा की, कमल हासन नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार आहे? कमल हासनची गांधीवादी विचारसरणीशी असलेली जवळीक आणि त्यातून निर्माण झालेला ‘हे राम’ हा चित्रपट सर्व तामिळनाडूला माहिती आहे. पण ‘हे राम’ हा चित्रपट गांधीवादाच्या बाजूने आहे की गांधीवादाच्या विरुद्ध आहे, हे सहजासहजी कळत नाही. अशाच स्वरूपाचे एक प्रकारचे अपूर्णत्व, ज्याला इंग्रजीत ‘अनफिनिशिंग’ असे म्हणता येईल ते, कमल हासनच्या आयुष्यात सातत्याने जाणवते. त्यामुळे कमल हसनचा अलिकडचा प्रत्येक चित्रपट हा एखाद्या ‘अनफिनिश्ड प्रॉडक्ट’सारखा असतो. त्याची राजकीय भूमिका ही अशीच ‘अनफिनिश्ड प्रॉडक्ट’ असणार का? कमल हासनने ‘इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत ‘मी डावा पण नाही, उजवा पण नाही. किंबहुना ‘इझम’ची कोणतीच गरज लोकांना वाटत नाही आणि उरलेलीही नाही' असे विधान केले होते. हा पोस्टमॉर्डन स्टान्स आहे. या पोस्ट मॉर्डनिझमने काही वर्षांपूर्वी ‘आयडिऑलॉजी इज डेड' अशी घोषणाही केली होती. त्याच्याशी सुसंगत असाच कमल हासनचा स्टान्स आहे. कमल हासनबाबत गेली कित्येक वर्षे तो स्पष्टवक्ता आहे, की उद्दाम आहे? स्वच्छ दृष्टीचा आहे की केऑटिक आहे? कलानिष्ठ आहे की ओव्हरड्यूअर आहे असा प्रश्न कायमच लोंबकळता राहिला आहे. तेव्हा त्याचे राजकारणही असेच लोंबकळते राहाणार का? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होणे अपरिहार्य आहे. 
त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट अशी की, कमल हासन काही बाबतीत मात्र ठाम दिसतो. उदाहरणार्थ, कमल हासनने आपण नास्तिक आहोत अशी उघडउघड केलेली घोषणा. त्यामुळे साहजिकच त्याची मुलगी अक्षरा हिने माझा ईश्वरावर विश्वास नाही आणि मी हिंदू धर्मापेक्षा बौद्ध धर्माला अधिक जवळचा मानते असे घोषित केले, तेव्हा कमल हासनने तिला पाठिंबाच दिला होता. त्यावरुनही बरीच खळबळ उडाली होती. अर्थात, तामिळनाडूच्या राजकारणात नास्तिक असणे हे परवडू शकते. याला कारण दक्षिणेत विवेकनिष्ठ आणि बुद्धिवादी परंपरेला अवकाश मिळवून देणारे नेते पेरियर ई.व्ही. रामासामी यांचा जनमानसावर असलेला प्रभाव. एका बाजूला वैयक्तिक आयुष्याचा विचार करता कमल हासनचे वैवाहिक जीवन हे कायमच वादळी राहिले. वाणी गणपती, सारिकापासून ते गौतमीपर्यंत अनेक स्त्रिया त्याच्या आयुष्यात आल्या आणि गेल्या. पण यासंदर्भातील त्याची भूमिका त्याने कायमच स्पष्ट स्वरुपात मांडल्यामुळे तो जसा आहे, तसाच चाहत्यांनी त्याला स्वीकारला. किंबहुना, रजनीकांत आणि कमल हासन यांच्यातला फरक परंपरेचे आधुनिक रुप आणि आधुनिकतेचे उत्तर आधुनिक रुप असाच आहे. तरीही दोन्ही अभिनेत्यांना लोकांनी स्वीकारले याचे कारण त्यांचा प्रामाणिकपणा. यातूनच जन्मलेली कमल हासनची दुसरी चांगली गोष्ट म्हणजे, खुल्या मनाने स्वत:च्या चुकांची कबुली देणे. याबाबत तो गांधींना आपला गुरु मानतो. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी जेव्हा नोटबंदी जाहीर केली तेव्हा, त्याने अत्यंत खुल्या दिलाने त्याचे स्वागत केले. या काळात त्याच्या कॉम्रेडस् मित्रांनी तो कसा चुकीचा अाहे, हे त्याला वारंवार सांगितले होते. पुढे जेव्हा नोटबंदीमळे देशभर गोंधळ निर्माण झाला तेव्हा, त्याने हा अंमलबजावणीतला घोळ आहे असे सांगून मोदींनाच पाठिंबा दिला होता. मात्र, जेव्हा रिझर्व्ह बँकेचे रिफंडचे आकडे आले तेव्हा त्याने, स्पष्टपणे व उघडपणे कबुली दिली की, मी चुकलो! माझा पाठिंबा चुकीचा होता!! कमल हासन इतकेच बोलून थांबला नाही, तर गांधीजी जसे आपल्या चुका कबुल करीत, तसे सर्वसामान्य माणसांचे जीणे हराम करणारे डिमॉनिटायझेशन ही आपली चूक होती असे मोदींनी जाहीरपणे कबूल करावे, असे आवाहनही मोदी यांना कमल हासनने दिले. 
कमल हासनचा हा प्रामाणिकपणा त्याच्या चाहत्यांना नेहमीच दिलासादायक वाटला आहे. किंबहुना, रजनीकांत व कमल हासन यांच्या दोस्तीचा मूळ धागा हा प्रामाणिकपणाचाच आहे. त्यामुळे तामिळनाडूत सध्या चर्चिला जाणारा प्रश्न हाच आहे की, रजनीकांत, कमल हासनला पाठिंबा देणार की नाही? किंबहुना, कमल हासनने रजनीकांतला तसे आवाहनही केले आहे. एकीकडे कमल हासन हा भ्रष्टाचार करणार नाही, याविषयी चाहत्यांच्या मनात जराही शंका नाही. देशातल्या अत्यंत प्रामाणिकपणे टॅक्स भरणाऱ्या मोजक्या लोकांपैकी तो एक आहे. मात्र, कमल हासन यानेच म्हटल्याप्रमाणे प्रामाणिक नेता तेव्हाच निवडून येतो, जेव्हा मतदार प्रामाणिक असतात. आता तामिळनाडूमध्ये किती प्रामाणिक मतदार आहेत, आणि त्यातील किती जण कमल हासनला पाठिंबा देतात, यावर त्याचे राजकीय अस्तित्व अवलंबून असणार आहे. अर्थात, ७ नोव्हेंबरला म्हणजेच त्याच्या वाढदिवसाला तो राजकारण प्रवेसासंदर्भातली घोषणा करणार आहे. "आय कॅन सी दॅट ए युथ फोर्स इज वेटिंग टु बी को ऑर्डिनेटेड...' हे त्याचं वाक्य त्याचा इरादा पुरेसा स्पष्ट करणारं आहे.

No comments:

Post a Comment