Tuesday, March 14, 2017

थुकरटवाडीची रंगीबेरंगी हवा... दै. दिव्य मराठीच्या १२ मार्च २०१७च्या रसिक पुरवणीत चला हवा येऊ द्या या मालिकेतील कलाकारांची डॉ. नीलेश साबळे यांनी शब्दांनी रंगविलेली अर्कचित्रे..

 डॉ. नीलेश साबळे

 ---
 सागर कारंडे


 ---
 श्रेया बुगडे



 ---
भारत गणेशपुरे व कुशल बद्रिके
 ----
भाऊ कदम
-----
चला हवा देऊ द्या या मालिकेची यशस्वी टीम
--







दै. दिव्य मराठीच्या १२ मार्च २०१७च्या रसिक पुरवणीत चला हवा येऊ द्या या मालिकेतील कलाकारांची डॉ. नीलेश साबळे यांनी शब्दांनी रंगविलेली अर्कचित्रे..

थुकरटवाडीची रंगीबेरंगी हवा...


शब्दांकन - समीर परांजपे

प्रथेप्रमाणे वर्षातून एकदाच होळी-रंगपंचमी साजरी होते, मात्र झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षभर हास्याची धुळवड रंगत असते. डॉ. निलेश साबळेकृत या कार्यक्रमात प्रत्येक कलावंत निराळा, त्याची अिभनयाची खासियत निराळी. पण, त्यांना एका सूत्रात बांधण्याचे अवघड कार्य दर कार्यक्रमागणिक साबळे साधत असतात. डॉ. साबळेंच्या नजरेला प्रत्यक्षात हे कलावंत दिसतात तरी कसे, त्यांची कोणती स्वभाववैशिष्ट्ये त्यांना भावून जातात आणि त्यातून त्यांचे म्हणून कसे आगळे अर्कचित्र आकारास येत जाते, याचीच ही होलिकोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारी शाब्दिक गोळाबेरीज. खास ‘रसिक’च्या वाचकांसाठी...
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-rasik-team-writes-about-chala-hawa-yeu-dya-show-5548748-PHO.html?seq=1
‘चला हवा येऊ द्या, चला हवा येऊ द्या...डोक्याला शॉट नको, हवा येऊ द्या...हे टायटल साँग खरं तर याच नावाच्या विलक्षण लोकप्रिय मालिकेचं. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ असं काही रसिकांच्या मनात घर करून बसलंय, की त्यातील थुकरटवाडी हे गाव जणू काही आपलंच गाव आहे, असाच समस्त प्रेक्षकवर्गाचा पक्का विश्वास आहे. थुकरटवाडीतील सरपंच, त्यातील गावकरी असे सारे सारे लोक म्हणजे, मोहात पाडणारी अर्कचित्रेच आहेत.. ती शब्दांच्या माध्यमातून चितारली डॉ. निलेश साबळे याने. तोच तर या थुकरटवाडीचा खरा कर्ताधर्ता आहे. तोच या वाडीचा, त्यातील वाडीकरांचा खरा दिशादर्शक आहे. त्यामुळे एकदा का भट्टी जमली की, विनोदाचे चौकार, षटकार हाणले जातात ते याच थुकरटवाडीतून. मैदानातला रसिक मग जल्लोश करतो, त्यातल्या एकेक अदांवर. भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे असे एकेक कसलेले खे‌ळाडू आणि त्यांचा कर्णधार निलेश असे मिळून जो काही धुमधडाका लावतात, त्याचे नाव ते. हा सगळा सामना जिथे नेहमी रंगतो ती जागा म्हणजे, मुंबईच्या वेशीवरच्या मीरारोड उपनगरातला एक स्टुडिओ. तिथे अवतरलेल्या थुकरटवाडीत ‘दिव्य मराठी’ जाऊन पोहोचला तेव्हा लगबग सुरू होती, होळीनिमित्त सादर होणाऱ्या रंगीबेरंगी विशेष कार्यक्रमाची. सेटच्या आजूबाजूच्या खोल्या एकदम फुल होत्या. प्रत्येक कलाकारासाठी राखीव खोली. तिच्या दारावर या कलाकाराचे नाव डकवलेली कागदी पट्टी. एका खोलीतून एखादा असिस्टंट हातातून विविध प्रकारचे विग घेऊन दुसऱ्या खोलीत जातोय... तर कपडेपटवाला शूटिंगसाठी लागणाऱ्या कपड्यांना इमानेइतबारे ‘इस्तारी’ करतोय. तर बाकीचे असिस्टंट सारखे काही ना काही कामात गुंतलेले. अशी सगळी धावपळ-पळापळ सुरू असताना अचानक एका खोलीतून भाऊ कदम बाहेर आला. इथे-तिथे डोकावून पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळाने भारत गणेशपुरे आपल्या वऱ्हाडी बोलीत कोणाला तरी काही सूचना देऊन घाईघाईने सेटच्या दिशेने मार्गस्थ झाला. पण श्रेया बुगडे मात्र अभ्यासू मुलीसारखी आपल्या खोलीत संवाद पाठ करत बसलेली. थुकरटवाडीची चावडी अजून फुलायची होती. पण त्यातील सगळ्याच गावकऱ्यांचे लक्ष होते, स्टुडिओतील एका खोलीकडे... ती खोली होती, निलेश साबळेची. नुकताच एका आजारातून बरा झालेला निलेश पूर्वीच्याच उत्साहाने कामाला लागल्याचे सेटवर दिसतच होते. पण दुसरीही गोष्ट जाणवत होती. जगात सगळीकडे डॉक्टर इतरांची काळजी घेतात, इथे इतर लोक एका डॉक्टरची मनापासून काळजी घेत होते...
१८ ऑगस्ट २०१४ रोजी ‘चला हवा येऊ द्या’चे प्रसारण सुरू झाले. ‘फू बाई फू’च्या यशानंतर निलेश साकारत असलेला हा दुसरा कार्यक्रम. कार्यक्रमाचा आत्मा फक्त आणि फक्त निखळ विनोदाचा. यात सादरीकरण करण्याआधी काही तालमी होतातच, पण जास्त भर उत्स्फूर्ततेवरच. लेखी स्क्रीप्टपेक्षा अलिखित हावभावांचे महत्त्व अधिक. त्यामुळे पहिल्या काही भागांनंतर या कार्यक्रमाने कधीच मागे वळून बघितले नाही. आतापर्यंत ‘हवा’चे २७८ भाग प्रक्षेपित झालेत. हा म्हटला तर सुखद चमत्कारच.
असे सगळे मनात साठवत निलेश साबळेला आम्ही गाठले. हेतू हा की, ‘रसिक’च्या होळी विशेषांकासाठी थुकरटवाडीत धमाल उडवणाऱ्यांची शाब्दिक अर्कचित्रे त्यांनी रंगवावी. मग काय, ‘चला हवा येऊ द्या’चा एकेक मोहरा... त्यांच्या गमतीजमती, आठवणी, अभिनयाच्या लकबी याबद्दल निलेश भरभरून बोलला आणि त्यातूनच आकारास येत गेली, ‘चला हवा येऊ द्या’ची कुणाच्याही नजरेस न पडणारी अर्कचित्रात्मक दुनिया...
--------------
झोपाळू भाऊ अभिनयाला जागतो!
भाऊची रात्रीची झोप नीट झालेली असली तर सकाळी भाऊ एकदम फ्रेश असतो. मग दिवसभर तो अभिनयाचे असे लाजवाब फटके मारतो की, एखाद्या ग्रेट बॅट‌्समनशीच त्याची तुलना होईल. पण जेव्हा कधी अशी बिकट स्थिती असेल,  त्या दिवशी तो स्टुडिअोत सेटला लागून एखाद्या खोलीत जाऊन तास-दोन तास तरी झोप काढतोच काढतो...
रंगाने सावळा, चेहऱ्यावर निष्पाप भाव असलेला भालचंद्र उर्फ भाऊ कदम भूमिका साकारायला उभा राहिला, की टाळ्यांचा कडकडाट हा ठरलेलाच. पण हा भाऊ प्रचंड विसराळू आहे. भाऊची रात्रीची झोप नीट झालेली असली तर सकाळी भाऊ एकदम फ्रेश असतो. मग दिवसभर तो अभिनयाचे असे लाजवाब फटके मारतो की, एखाद्या ग्रेट बॅट्समनशीच त्याची तुलना होईल. पण जर त्याची झोप झाली नसेल, तर मग भाऊचा हाच उत्साह कुठे गायब होतो माहीत नाही. जेव्हा कधी अशी बिकट स्थिती असेल, त्या दिवशी तो स्टुडिअोत सेटला लागून एखाद्या खोलीत जाऊन तास-दोन तास तरी झोप काढतोच काढतो. त्यामुळे बराच वेळ तो दिसला नाही की समजायचे, भाऊ झोपी गेलेला आहे. अशीच एक दिवस गंमत करायची म्हणून आम्ही त्याला अजिबात झोपू दिले नाही. काही ना काही कारण काढून जागे ठेवण्याचा प्रयत्न केला, पण पठ्ठा निर्धाराचा पक्का. त्याने कोणीही हुडकून काढू नये, म्हणून आमच्या नकळत जागा बदलली. सेटच्या पाठी अंधाऱ्या जागेत ठेवलेल्या एका टेबलावर भाऊ ढाराढूर झोपी गेला. इतर वेळी हा झोपप्रिय भाऊ एखाद्या माणसाला समोर बसवून त्याला सलग अर्धा तास हसवत ठेवू शकतो. सोप्पे नाही हे. त्याची विनोदाची कपॅसिटी प्रचंड आहे. मी तुम्हाला सांगतो, थुकरटवाडीतले आमचे सगळे कलाकार वाटतात प्रथमदर्शनी लोककलाकार, पण इंग्रजी कॉमेडीच्या पुढेही जायची त्यांची ताकद आहे.
भाऊने १९९१मध्ये अॅक्टिंग करिअरला सुरुवात केली. नाटकांतून तो पुढे आला. ‘फू बाई फू’मधून भाऊला मिळाली खरी ओळख... भाऊ तसा साधा सरळ अभिनय करणारा इसम. त्याला विनोदी भूमिका कशा जमतील, असा प्रश्न तेव्हा अनेकांच्या मनात असायचा. पण भाऊच्या अभिनयक्षमतेवर गाढा विश्वास होता माझा. म्हणूनच ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमासाठी जुळवाजुळव सुरू झाली तेव्हा त्यात भाऊ पाहिजेच, ही खूणगाठ मी मनाशी बांधली होती. भाऊचे वैशिष्ट्य हे की, त्याला दोन ओळींच्या मध्ये अभिप्रेत असलेला विनोद बरोबर कळतो. हे जे ‘बिटविन द लाइन’ आहे, ते भाऊने जास्तीत जास्त पडद्यावर साकारावे, म्हणून माझे प्रयत्न असतात. त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावातून तो विनोद विलक्षण बोलका करतो. त्यामुळे दोन ओळींतील विनोद पकडू शकेल, असेच संवाद मी भाऊसाठी लिहितो. ती फार मोठी मोठी वाक्य नसतात. एखादे वाक्य संपले की, पुढे कंसात आता भाऊ अमुक अमुक पात्राकडे नुसते बघतो, असे मी लिहून ठेवतो. ते वाचून भाऊला बरोबर कळते, की त्या जागी आपल्याला नेमके काय करायचे आहे ते. अगदी खरं सांगायचं, तर ‘चला हवा येऊ द्या’मधील सर्व कलाकारांत मला भाऊ कदमचा अभिनय अधिक भावतो. कोणत्याही भागाचे एडिटिंग करताना भाऊच्या भूमिकेचा भाग मी पुन:पुन्हा रिवाइंड करून बघतो, त्याच्या विनोदाची मजा लुटतो. विनोदी कलाकार म्हणून भाऊला ‘चला हवा येऊ द्या’ने उदंड प्रसिद्ध केले, हे जगाला ठाऊक आहे; पण सेटवर वावरतानाही भाऊच्या वागण्यातून विनोद होतात, हे आमचे आम्हीच जाणतो...
----------------
हास्याचे 'कुशल'-'भारत' अभियान...
‘चला हवा येऊ द्या’मधील कोणत्या कलाकारात खऱ्या अर्थाने लहान मूल दडलेले आहे, असा सर्व्हे झालाच तर उत्तर एकच येईल, कुशल बद्रिके! आणि समोरच्या कलावंताकडून लाफ्टर नाही आला की, जाम टेन्शनमध्ये येऊन पाय फैलावून उभा राहतो तो म्हणजे भारत गणेशपुरे. दोघांचे दोन ढंग,
दोन तऱ्हा...
‘चला हवा येऊ द्या’मधील कोणत्या कलाकारात खऱ्या अर्थाने लहान मूल दडलेले आहे, असा सर्व्हे झालाच तर उत्तर एकच येईल, कुशल बद्रिके! कुशल बद्रिके!! कुशल बद्रिके!!! कुशलला शारीर हावभावांतून विनोदनिर्मिती करणे उत्तम जमते. तेही अभिनयाचा आब व रुबाब राखून. पण तो आहे प्रचंड धसमुसळ्या. पाठीच्या दुखण्यातून बरा झालाय नुकताच; पण तरीही सतत धडपडत राहील, छोटे छोटे फ्रॅक्चर करून घेत राहील, याची फुल गॅरंटी. कुशलला विनोद कुठून नि कसा बाहेर काढावा, हे नीट कळते. आता हा एक प्रसंग बघा. एका कार्यक्रमात गायक आदर्श शिंदेला बोलावले होते. अँकरिंग करताना माझ्या लक्षात आले की, आदर्शसारखाच साधारण दिसणारा एक जण प्रेक्षकांत बसलेला आहे. त्या दिवशी भूमिकेची गरज म्हणून प्रेक्षकांत बसलेल्या कुशलला स्टेजवरूनच खुणेने ते सांगितले. तसेच दाढीवर हात फिरवल्यासारखे हावभावही केले. त्यावरून लगेच मला काय म्हणायचे आहे, ते कुशलला कळले. त्या प्रेक्षकाला तो लगोलग मेकअपरुपमध्ये घेऊन गेला. आदर्शसारखे कपडे त्याला कपडेपटातून मिळवून घालायला लावले. दाढी पेन्सिलीने रंगवली. आणि मग शूटिंग सुरू असतानाच एका क्षणी येऊन हात दाखवून ‘ऑल इज रेडी’ असा इशारा मला केला. मी तत्काळ आदर्श शिंदेला सांगितले की, आम्हाला असे कळलेय की, इथे अजून एक आदर्श शिंदे आहेत. त्या वेळी त्या प्रेक्षकाला आम्ही स्टेजवर आणले. त्याला पाहून आदर्श शिंदे अवाकच झाला. त्याला विश्वासच बसेना, की ही सगळी आयत्या वेळची तयारी आहे म्हणून... कुशल हा असा आहे. मला काय हवे, ते त्याला बरोबर कळते. नजरेचा इशारा तो उत्तम जाणतो.  कुशल बद्रिकेची ही तऱ्हा, तर आमच्यातला सिनिअर अभिनेता भारत गणेशपुरेचा अभिनय ही दुसरी तऱ्हा. म्हणजे काय तर, एखाद्या प्रसंगाला सुरुवात झाली आणि त्यात भारतच्या पहिल्या काही संवादांना समोरच्या कलाकाराने योग्य दाद दिली नाही, लाफ्टर आला नाही, की भारतला जाम टेन्शन येेते. आपण जे करतोय ते समोरच्यापर्यंत बरोबर पोहोचते का? हा विचार त्याला सतावू लागतो. मग भारत पाय फैलावून उभा राहतो. तसे दिसले की ओळखू येते की, तो आता सॉल्लिड टेन्शनमध्ये आहे. अगदी ‘फू बाई फू’पासून भारत माझ्याबरोबर काम करतोय. त्याच्या भूमिकेचे संवाद लिहून देताना कधी पल्लेदार वाक्य असली तरी भारत पाठांतराला एकदम बाप आहे. तो ती वाक्ये वाचून काही मिनिटांतच मनात घोळवतो आणि भूमिकेत आरपार शिरतो. मी त्याला लेखकाचा फेवरिट नट म्हणतो.
आपल्या वऱ्हाडी बोलीने तो थुकरटवाडीचा अख्खा माहोलच बदलून टाकतो. उत्स्फूर्त विनोदाची जाण असली तरीही त्याचा तो अतिरेक नाही करत. हीच त्याची दर वेळी खासियत ठरते...
----
रेयाला नाही उपमा आणि सागरला नाही मर्यादा...
श्रेयाला विनोदाचा अफलातून सेन्स आहे. मी तिला एकही संवाद लिहून दिलेला नसतो. फक्त त्या भूमिकेत मला काय अपेक्षित आहे, हे मी थोडक्यात लिहिलेले असते. श्रेया जितकी भन्नाट आहे, तितकाच सागर कारंडेही अफलातून अवलिया आहे. कोणतीही भूमिका हिडीस दिसता कामा नये, असे एक दिग्दर्शक म्हणून माझे मत आहे. या मताचा तो पुरेपूर आदर करतो...
‘अब मै आपसे एक प्रश्न पुछती हूँ’ असे इंग्रजा‌‌ळलेल्या हिंदीत समोरच्या माणसाला मोठ्ठाल्या आवाजात धारेवर धरणारी महिला पत्रकार दिसली की, ‘चला हवा येऊ द्या’चे प्रेक्षक म्हणतात की, आली आली, बरखा दत्त आली. ती ओरिजिनल बरखा दत्त असणे शक्य नसतेच, पण ती असते श्रेया बुगडे. मी म्हणतो, विनोदाची उत्तम जाण असलेल्या अभिनेत्री तशा कमीच आढळतात, पण श्रेयाला विनोदाचा अफलातून सेन्स आहे. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये ती ज्या ज्या भूमिका करते, त्यांचे वैशिष्ट्य काय माहितीये? मी तिला एकही संवाद लिहून दिलेला नसतो. फक्त त्या भूमिकेत मला काय अपेक्षित आहे, हे मी थोडक्यात लिहिलेले असते. ती ते वाचते. स्वत:चे संवाद स्वत:च तयार करते. ते उत्स्फूर्त असतात. पण ते कथानकात चपखलपणे सामावूनही जातात. तिचा हा आग्रह कधीच नसतो की, मला छान छान दिसायचे आहे वगैरे. जी भूमिका येईल ती उत्तमपणे करणे, हे तिचे वैशिष्ट्य. आता ती अधूनमधून महिला पत्रकाराची भूमिका साकारते ती ज्या कुणा व्यक्तीचे निरीक्षण करून तिने बेतली आहे, ते सारे अफलातूनच आहे. म्हणजे, ती जी कोण मूळ महिला पत्रकार आहे, तिच्या बोलण्याचे, हावभावांचे बेअरिंग अचूक पकडून तिचा भास आपल्या भूमिकेतून उभा करणे सोपे नसते. त्यामुळे श्रेयाला तिच्या उत्तम अभिनयाचे श्रेय द्यायलाच हवे.
----
अफलातून अवलिया :
सागर कारंडे
हे झालं श्रेयाचं. ती जितकी भन्नाट आहे, तितकाच सागर कारंडेही अफलातून अवलिया आहे. माझ्या मते, सागर कारंडे हा उत्तम नकलाकार आहे. बऱ्याचदा कलाकार कोणत्याही कार्यक्रमात नकला करायला तयार होत नाहीत. कारण मग त्याच्या स्वत:च्या अभिनयापेक्षा लोक त्याला इतरांची नक्कल करण्याची फर्माईश करतात. त्यात आपली ओळख हरविण्याचा धोका कोणत्याही कलाकाराला वाटणे साहजिक आहे. पण सागर कारंडेला असे अडथळे थांबवू शकत नाहीत. नकला करणे, हे त्याला बिनमहत्त्वाचे वाटत नाही. उत्स्फूर्त कविता करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यातील एका नेत्याची सागर कारंडे करत असलेली नक्कल विलक्षण लोकप्रिय आहे. नकला करणे ही पण खायची गोष्ट नाही. त्यासाठी जबरदस्त निरीक्षणशक्ती लागते. ती सागरकडे आहे. ‘अशी ही बनवाबनवी’ या एकेकाळी लोकप्रिय झालेल्या मराठी सिनेमामध्ये साडी नेसलेली दोन पुरुष पात्र आहेत. अनेक नाटकांत पुरुष स्त्री भूमिका करताना आढळतात. पण सागर कारंडेला जेव्हा प्रथम साडी नेसवून भूमिका करण्यास सांगितले तेव्हा ती कशी साकार होईल, याबद्दल तो स्वत:च साशंक होता. पण जसजसा त्याच्या स्त्री भूमिकेला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद द्यायला सुुरुवात केली, तसतसा त्याचाही आत्मविश्वास बळावला. तो स्त्री भूमिका करताना खूप काळजी घेतो. त्याची भूमिका पातळी सोडून कधीच वाहवत गेली नाही. साडीमध्ये तो स्वत:ला चांगले कॅरी करतो, तसेच दिसतोही चांगला. कोणतीही भूमिका हिडीस दिसता कामा नये, असे एक दिग्दर्शक म्हणून माझे मत आहे. या मताचा तो पुरेपूर आदर करतो.  जोडीला सागर जेव्हा पोस्टमन बनून येतो आणि ख्यातनाम व्यक्तीला उद्देशून अरविंद जगतापने लिहिलेले पत्र वाचतो, त्या क्षणी तो जमलेल्या समस्त प्रेक्षकांना अक्षरश: हेलावून टाकतो. आता खरे तर दोन वर्षांहून अधिक काळ झाला. या कार्यक्रमांतील पात्रांचा लोकांचा कंटाळा यायला हवा होता; पण तसे होताना दिसत नाही. याचा अर्थ, आम्ही त्यातील ताजेपणा टिकविण्यात यशस्वी झालो आहोत, असाच तर असतो...
---
 झपाटलेला निलेश
निलेश एकदम हाडाचा दिग्दर्शक. त्याला बरोबर माहीत असते, कोणत्या कलाकाराला काय द्यायचे, पडद्यावर काय साकारायला सांगायचे ते... प्रचंड कामसू असलेल्या निलेशला सतत काही वेगळे सुचत असते. एकदा मनात संकल्पना आली की, ती कधी पडद्यावर साकारतोय, असे त्याला होऊन जाते. तो जेव्हा कधी शूटिंगला बोलावतो, आम्ही हजर असतो तिथे. तो कामाने झपाटलेला गृहस्थ आहे. त्याला दिग्दर्शन, एडिटिंग असे सगळेच करायचे असते. अशा वेळी प्रकृतीकडेही लक्ष देत नाही तो फारसे...
- भारत गणेशपुरे

Saturday, March 11, 2017

पेनड्राइव्हतून पुस्तके वाचकांपर्यंत नेण्याचा बहरला नवा प्रवाह - दै. दिव्य मराठी दि. ११ मार्च २०१७- समीर परांजपे



दै. दिव्य मराठीच्या दि. ११ मार्च २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेली विशेष बातमी
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAH-MUM-news-about-encycl…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/11032017/0/4/
----
पेनड्राइव्हतून पुस्तके वाचकांपर्यंत नेण्याचा बहरला नवा प्रवाह
विश्वकोशाच्या २० खंडांच्या प्रयोगानंतर मिळाली चालना
- समीर परांजपे
मुंबई, दि. ११ मार्च
महाराष्ट्र राज्य मराठी िवश्वकोश निर्मिती मंडळाने बुकगंगा डॉट कॉमच्या सहकार्याने मराठी भाषा दिनी विश्वकोशाचे वीस खंड पेन ड्राइव्हमध्ये उपलब्ध करुन दिले. त्यामुळे हायस्पीड इंटरनेट सातत्याने उपलब्ध नसलेल्या राज्यातील अनेक ठिकाणच्या वाचकांना एक नवी सोय उपलब्ध झाली आहे. पेन ड्राइव्हमध्ये पुस्तके साठवून ती वाचकापर्यंत नेण्याचा एक नवा प्रवाह यानिमित्ताने सुरु झाला असून आगामी काळात त्याचे मोठ्या प्रमाणावर अनुकरण होईल.
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडे २० खंडांचा मजकूर तयार आहे. पण वीस खंडांपैकी काही खंड अद्याप पुस्तकरुपात प्रसिद्ध झालेले नाहीत. तसेच विश्वकोशाचे खंड जाडजूड असल्याने ते हाताळायलाही काहीसे अवघड होते. त्यामुळे या वीस खंडांच्या सहा सीडींचा संच मंडळाने तयार करुन घेतला होता. त्याचे वजन अवघे ४५० ग्रॅम इतके होते. तसेच या खंडांचा सर्व मजकूर https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/ या मंडळाच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. गावोगावीच्या लोकांकडे आता संगणकांची संख्या वाढत असली तरी हायस्पीड इंटरनेट सातत्याने उपलब्ध असेलच याची अजूनही खात्री नाही. त्यामुळे सीडी उपलब्ध असल्या तरी विश्वकोशाच्या वेबसाइटवर जाऊन ते खंड पाहाणे ग्रामीण भागांतील विद्यार्थी व इतर वाचकांना शक्य होत नव्हते.
यासंदर्भात बुकगंगा डॉट काॅमचे संचालक मंदार जोगळेकर यांनी सांगितले की, िवश्वकोशाच्या वीस खंडांचा मजकूर युनिकोड स्वरुपात चार जीबी क्षमतेच्या एका पेन ड्राइव्हमध्ये साठविण्यात आला असून तो वाचकाला ८०० रुपयांना देण्यात येतो. या पेन ड्राइव्हची एक वर्षाची गॅरेंटी असून तो एका वेळेस एका संगणकावर वापरता येतो. विश्वकोश मंडळाकडून ग्रंथालीमार्फत बुकगंगाला या पेनड्राइव्हचे तंत्रज्ञान विकसित करण्याचेम व वितरणाची जबाबदारी मिळाली आहे. या पेनड्राइव्हतील मजकूराची कोणी कॉपी करु नये किंवा पायरसी होऊ नये म्हणून बुकगंगाने त्यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. नव्या संगणकांमध्ये पेन ड्राइव्ह जोडण्याची तांत्रिक सोयही असते. तसेच सीडी, डीव्हीडीपेक्षा आता पेन ड्राइव्हमध्ये साठविलेल्या गोष्टी पाहाण्याकडे संगणक वापरकर्त्यांचा कल असल्याने विश्वकोशाचा प्रसार या नव्या माध्यमातून वाचकांपर्यंत अजून वेगाने होईल. भविष्यात संस्कृती कोश व अन्य प्रकाशनांची पुस्तके पेन-ड्राइव्हच्या माध्यमातून नेण्याचा बुकगंगाचा मानस आहे.
विश्वकोश साठविलेल्या पेनड्राइव्हला महाराष्ट्रातील अलिबाग, विदर्भ, कोकण, खानदेश, सांगली, सातारा व अमेरिकेतूनही मागणी आली अाहे. अलिबागमधील एका व्यक्तीने शाळेच्या मुलांकरिता विश्वकोशाचे शंभर पेनड्राइव्ह विकत घेतले आहेत. मराठवाड्यातूनही या पेनड्राइव्हबाबत विचारणा होत आहे. मराठी भाषा दिनी अनावरण झाल्यानंतर आजवर विश्वकोशाच्या सुमारे ४०० पेनड्राइव्हची विक्री झाली आहे. आपली पुस्तके अशाच प्रकारे पेनड्राइव्हतून गावोगावीच्या वाचकांपर्यंत नेता येतील का याची चाचपणी काही प्रकाशकांनीही बुकगंगा डॉट कॉमकडे केली आहे.

Sunday, March 5, 2017

उलट्या चश्म्याचा सरळ लेखक - तारक मेहता यांच्यावरील मी लिहिलेला लेख - दै. दिव्य मराठी दि. ६ मार्च २०१७ रसिक पुरवणी - समीर परांजपे


तारक मेहता या प्रख्यात गुजराती लेखक महोदयाचे अलीकडेच निधन झाले. त्यांचे साहित्यचित्र रेखाटणारा मी लिहिलेला हा लेख दै. दिव्य मराठीच्या दि. ५ मार्च २०१७च्या अंकातील रसिक या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. या लेखाची वेबपेज, टेक्स्टलिंक तसेच जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
---
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-sameer-panjape-article-about-writer-tarak-mehata-5543154-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/05032017/0/4/
----
उलट्या चश्म्याचा सरळ लेखक
----
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही विनोदी दैनंदिन मालिका प्रक्षेिपत होऊ लागली सब टीव्ही या वाहिनीवर. ती तारीख होती २८ जुलै २००८. या घटनेला येत्या जुलै महिन्यात होतील तब्बल नऊ वर्षे. विशेष म्हणजे आजवर या मालिकेतील विनोद ना कधी शिळा झाला, ना ही मालिका बघणारा रसिकवर्ग आटला. मालिका आहे हिंदीमध्ये. त्यात गुजराती कुटुंब मध्यवर्ती भूमिकेत असले तरी त्याच्या सोबतीला मराठी, शीख, दाक्षिणात्य अशी अठरापगड कुटुंबे आहेत. त्यांच्या संमिश्र जगण्यातून मालिकेचे मुख्य पात्र जेठालाल व त्याच्या आयुष्याचा गोफ विणला जातो. या लोकांचे सारे भावविश्व एकवटलेले आहे ते मुंबईमध्ये. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे आजवर अकराशेहून अधिक भाग प्रक्षेपित झाले, हेही एक भारीच प्रकरण आहे. तरीही मनात राहून राहून एक प्रश्न येतोच, की कोण आहेत तारक मेहता?
या प्रश्नाचे उत्तर अधिक ठळकपणे पुढे आले ते, १ मार्च रोजी. या दिवशी गुजरातीतील प्रख्यात साहित्यिक असलेल्या तारक मेहता यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. त्यांनी देहदान केलेले असल्याने मरणानंतरही ते समाजरूपातच मिसळून गेले. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका ज्यावर आधारलेली आहे ती गोष्ट म्हणजे, तारक मेहता यांचा एक स्तंभ. १९७२मध्ये ‘चित्रलेखा’ या गुजराती साप्ताहिकात तारक मेहता यांचा ‘दुनियाने उंधा चश्मा’ हा विनोदी स्तंभ सुरू झाला. रोजच्या जगण्यात आपल्या आजूबाजूला जी माणसे दिसतात, त्यांचे बारकाईने निरीक्षण करून ती माणसे आपल्या या स्तंभातून तारक यांनी पुन्हा एकदा चितारली. त्यांच्या वागण्यातले ताणेबाणे अचूक टिपताना त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदाचा सुखद शिडकावाही या स्तंभातून वाचकांवर होत असे. त्यामुळ‌े आपल्याच गोष्टी जरा उपरोधिक नजरेने मेहता जेव्हा सांगतात, तेव्हा त्या भलत्याच रोचक होतात, असा विश्वास वाचकांच्या मनातही जागा झाला. ‘दुनियाने उंधा चश्मा’मध्ये जेठालाल नावाचे एक पात्र येते. हे पात्र ज्यावरून बेतलेय, ती जेठालाल नावाची व्यक्ती वास्तवात आजही आहे.
‘चित्रलेखा’ या गुजराती साप्ताहिकाचे ज्येष्ठ प्रतिनिधी केतन मिस्त्री हे तारक मेहता यांच्या आठवणी सांगू लागले. ‘गुजरातीत अनेक नामवंत साहित्यिक होऊन गेले. गुलाबदास ब्रोकर यांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा बाज वेगळा होता. लघुकथा व इतर काही साहित्यप्रकार त्यांनी हाताळले. तारक मेहता हे नुसतेच विनोदी लेखक नव्हते, तर बुद्धिचातुर्याची झालर त्यांच्या लिखाणाला होती. त्यांचा विनोद ‘इंटेलिजण्ट ह्युमर’ या वर्गात मोडणारा होता. त्याची जातकुळी चार्ली चॅप्लीनच्या कारुण्याची झालर असलेल्या विनोदासमान होती. किंबहुना एकाकी बालपणात चॅप्लिन हाच त्यांचा सखासोबती आणि आदर्श होता. म्हणूनही समाजाच्या भाव-भावनांचा आदर राखण्याचा संस्कार त्यांच्या लेखणीवर होता. त्याचमुळे गरिबीपासून नोटाबंदीपर्यंत कितीतरी ज्वलंत विषय हाताळले, पण एकदाही त्यांच्या लेखनाने कुणा व्यक्ती वा समूहाच्या भावना दुखावल्या नाहीत. चित्रलेखातील स्तंभावर बेतलेली हिंदी मालिका निर्मिली गेली, तिचे एक खास वैशिष्ट्य आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही टेलिव्हिजनच्या इतिहासातील एकमेव अशी मालिका, जिच्या शीर्षकात लेखकाचे नाव आहे. तब्बल ४५ वर्षे मेहतांनी ‘दुनियाने उंधा चश्मा’ हा स्तंभ लिहिला. आता त्यावरची मालिका कदाचित त्याहून अधिक वर्षे लोकप्रियता टिकवून ठेवेल!’
तारक मेहता मुंबईत फिल्म्स डिव्हिजनमध्ये खूप मोठ्या पदावर कार्यरत होते. अतिशय कलासक्त माणूस. त्यांनी अनेक गुजराती नाटके लिहिली. पारशी रंगभूमीवरही त्यांनी मोलाचे योगदान दिले. किंबहुना पारशी रंगभूमीनेच त्यांचा दृष्टिकोन घडवला. त्यांचा मूळ पिंड नाटककाराचा होता. मॉलमॉलिएर-कॉफमन-बर्नाड स्लेड आदी युरोपीय नाटककारांच्या विनोदी शैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता, आणि सरळसरळ प्रभाव टाळून नवनिर्मितीची विलक्षण क्षमताही होती. त्याचमुळे त्यांच्या हातून लफरा सदन, मौसम छालके, सखा सैयारा आदी जबरदस्त विनोदी नाटके लिहून झाली. यातल्या "लफरा सदन'ने (लफडा सदन) मराठी रंगभूमीवर तुफान धुमाकूळ घातला होता. म्हणूनच नदीचा जसा प्रवाह तसा मेहता यांच्या लेखणीचा प्रवाहदेखील कायम ओघवता राहिला. त्यामुळे त्यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १९९५मध्ये ते निवृत्त झाले आणि मुंबईहून अहमदाबादला कायमचे राहायला गेले. मुंबईहून दूर गेले खरे, पण तिचे बहुपेडी बहुसांस्कृतिक रूप त्यांच्या मनात इतके ठसलेले व रुजलेले होते की, ते अहमदाबादमध्ये राहून मुंबईतील दुनिया रंगवू लागले.
तारक मेहता यांचे निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली. याचे कारण तारक मेहता हे मोदी यांचे अत्यंत आवडते लेखक होते. मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा विराजमान झाले, त्या वेळी त्यांची तारक मेहता यांनी चित्रलेखा साप्ताहिकासाठी अत्यंत सविस्तर मुलाखत घेतली होती. एक विनोदी लेखक मोदीसारख्या राजकारण्याची मुलाखत घेतो, इथपासूनच तिच्या आगळ्या वैशिष्ट्याला सुरुवात झाली होती. या मुलाखतीत मोदींना आवडणारी पुस्तके, संगीत, अन्य ललित कला, त्यांचे छंद अशा अनेक गोष्टींबाबत मेहतांनी त्यांना प्रश्न विचारले होते. मोदींमधील कलाप्रेमी माणूस शोधण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून केला गेला होता.
मेहता यांच्या ‘दुनियाने उंधा चश्मा’ या स्तंभामध्ये विविध पठडीची पात्रे होतीच. या स्तंभावर आधारित ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सुरू झाली तेव्हा तिच्यात आणखी पात्रांची भर पडली. त्यात मूळ रत्नागिरीचा पण मुंबईत स्थायिक झालेला आत्माराम तुकाराम भिडे व त्याची बायको, त्याशिवाय बिहारचा डॉ. हंसराज हाथी, जालंदरचा सरदार रोशनसिंग हरजितसिंग सोधी, चेन्नईचा कृष्णन सुब्रमणियम अय्यर व त्यांची बंगाली पत्नी, भोपाळचा अविवाहित पत्रकार पोपटलाल अशी विविध पात्रे जन्माला आली. सुंदरलाल, अब्दुल, रिपोर्टर रिटा श्रीवास्तव, नटवरलाल प्रभाशंकर उधईवाला, बागेश्वर दधुख उधईवाला, बावरी धोंडुलाल कानपुरिया, बबिता अशी अजून काही पात्रे. या साऱ्या पात्रांच्या परस्पर वर्तन व व्यवहारातून जी धमाल उडते, आयुष्याची मौज होते, कधी करुणामय प्रसंग येतात, ते सारे या मालिकेत चितारण्यात आले आहेत.
केतन मिस्त्री चित्रलेखामध्ये रुजू झाले, १९९८ रोजी. तेव्हापासून ते तारक मेहता यांच्या संपर्कात होते. मिस्त्री यांनी आजवर ‘चित्रलेखा’साठी सुमारे दीडशे व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यातील निवडक ३० उत्कृष्ट मुलाखतींचा समावेश असलेले ‘व्यक्तिविशेषनु शेषविशेष’ हे मिस्त्री यांचे पुस्तक अहमदाबादमध्ये २०१५मध्ये प्रकाशित झाले. आपल्या पुस्तकाची एक प्रत भेट देण्यासाठी मिस्त्री तारक मेहता यांच्या अहमदाबादमधील घरी गेले होते. त्या वेळी तारक मेहता यांनी अत्यंत उदारपणे मिस्त्री यांना सांगितले की, ‘माझा ग्रंथसंग्रह ठेवलेल्या खोलीत जा, तुम्हाला हवी ती पुस्तके घ्या.’ मिस्त्री यांनी मेहतांच्या ग्रंथसंग्रहातील आठ ते दहा पुस्तके निवडली व ही अमूल्य भेट मोठ्या आनंदाने घेऊन ते तेथून निघाले.
अगदी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातही ‘चित्रलेखा’मध्ये तारक मेहता यांनी आपला स्तंभ लिहिला होता. लेखकाचे वय कितीही झाले तरी मन तरुण लागते, तरच ते सतेज विचार करू शकते. तारक मेहता यांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय ८८ वर्षांचे होते, पण त्यांची विनोदी तैलबुद्धी मात्र अखेरपर्यंत तेजतर्रार होती. जगण्याची शैली अत्यंत सकारात्मक होती. तारक मेहता यांनी जसे सातत्यपूर्ण ‘चित्रलेखा’साठी लिखाण केले, तसेच भास्कर समूहाच्या दैनिक ‘दिव्य भास्कर’साठीही तितक्याच आपुलकीने काही काळ स्तंभलेखन केले.
२०१५मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. २०११मध्ये गुजराती साहित्य अकादमीचा साहित्य गौरव पुरस्कार, तसेच अलीकडेच रमणलाल नीलकंठ हास्य पारितोषिक प्रदान करून मेहतांना गौरवण्यात आले. प्रतिभावंताला पुरस्कार मिळणे हे त्याचा लौकिक वाढवतेच, पण त्याला मिळणारे लोकांचे प्रेम हे या सर्वाहूनही अधिक मोलाचे. आपल्या आजूबाजूच्या दुनियेकडे उपरोधिक चश्म्यातून बघून त्याचा नर्मविनोदी शैलीत वाचकांना उलगडा करून देणाऱ्या तारक मेहता यांचे अख्खे आयुष्य वाचकांनी भरभरून केलेल्या प्रेमाने भारून व भारावून गेले. तारक मेहतांनी जन्माला घातलेल्या या लोकविलक्षण दुनियेचे प्रतिरूप विश्वामित्रालाही निर्माण करता येऊ नये, इतके ते दुर्मीळ होते.

Monday, February 27, 2017

महाराष्ट्र, गोवा सहित ११ प्रमुख विद्यापीठांतील मराठी विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागात मराठी भाषेच्या विकास, संवर्धनाबाबत २०१७मध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत लिहिलेले ११ लेख - दै. दिव्य मराठी २६ फेब्रुवारी २०१७. (समन्वय-संकलन : समीर परांजपे) - शाेध मराठीचा...

महाराष्ट्र, गोवा सहित ११ प्रमुख विद्यापीठांतील मराठी विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागात मराठी भाषेच्या विकास, संवर्धनाबाबत सुरु असलेल्या संशोधनाबाबत चिकित्सक लेख लिहिले, ते दै. दिव्य मराठीच्या इंटरनेट आवृत्तीवर दि. २६ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झाले. ते सर्व लेख इथे एकत्रित दिले आहेत. वाचकांना ते लेख आवडतील ही आशा.
(समन्वय-संकलन : समीर परांजपे)
-----
स्लग : शाेध मराठीचा...
भाषा आणि भाषेतले शब्द पहिल्यांदा कानी पडतात, ते आईच्या मुखातून म्हणून ती मातृभाषा. या मातृभाषेचं खऱ्या अर्थाने शास्त्रशुद्ध जतन-संवर्धन होतं, ते शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून. विद्यापीठे ही भाषेची राखणदार आणि पालकही. या पालकांनी भाषाशास्त्राच्या अंगाने तिचं रक्षण करण्याबरोबरच सातत्यपूर्ण शोध घेण्यावर आणि संशोधन करण्यावर तिचं भवितव्य अवलंबून. म्हणजेच, भाषेच्या भवितव्याची दोरी या विद्यापीठांच्या हाती. ती जितकी मजबूत तितकं तिचं भवितव्य उज्ज्वल. अशा प्रसंगी राज्यातल्या विद्यापीठांत सध्या कशा स्वरूपाचं मराठी भाषाविषयक शोध-संशोधन सुरू आहे, याचा खास मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेला हा विशेष आढावा...
------------------
हेडिंंग : उपेक्षितांमध्ये संशोधनाची उर्मी मोठी
-----------------------------
- डॉ. अविनाश सांगोलेकर
avinashsangolekar@unipune.ac.in
-----------------------------
ब्लर्ब : पीएच.डी. पदवीचे सर्वप्रथम मानकरी डॉ. द. न. गोखले (१९५२) हे ठरतात. त्यानंतर गेल्या ६५ वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण ५१८ व्यक्तींनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. विभागामध्ये १९८२ ते नोव्हेंबर २०१६ या गेल्या ३४ वर्षांच्या कालावधीमध्ये ४१२ व्यक्तींनी प्रबंधिका सादर करून एम. फिल. ही पदवी प्राप्त केली आहे...
-----------------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी भाषा आणि साहित्य या दोहोंवर मराठी विभागातून झालेले आजवरचे संशोधन हे संशोधनाच्या क्षेत्रामध्ये नावाजले गेले आहे. १९९० नंतर मराठी समाजात, साहित्यात जे बरेवाईट बदल झाले; ते मुळात जाऊन धुंडाळण्याचा प्रयत्न एम. फिल. व पीएच.डी.च्या माध्यमातून सध्याचे विद्यार्थी करीत आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर आजचे आघाडीचे कवी प्रा. संतोष पद्माकर पवार (मंचर/श्रीरामपूर) हे ‘नव्वदोत्तरी मराठी कविता ः स्वरूप, संकल्पना आणि वाटचाल’ या विषयावर पीएच.डी.साठी प्रबंधलेखन करीत आहेत.
अर्थात, मराठी भाषेच्या किंवा तिच्या बोलीभाषेच्या अंगाने फारसे संशोधन होताना दिसत नाही. आमच्या विभागामध्ये केवळ दोनच अभ्यासक या विषयावर संशोधन करीत आहेत. भानुदास कुलाल हे ‘लोकराज्य नियतकालिकाचे वाङ‌्मयीन कार्य’ (संतविषयक, लेखकविषयक, नाट्यविषयक, भाषाविषयक विशेषांकांच्या संदर्भात) या विषयावर संशोधन करीत आहेत, तर पुरुषोतम तायडे हे ‘वऱ्हाडी आणि अहिराणी बोलींमधील म्हणींचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर संशोधन करीत आहेत. तौलनिक अभ्यासाकडे मात्र आजच्या अभ्यासकांचा कल काहीसा वाढलेला दिसतो आहे. हे अभ्यासक भाऊ पाध्ये आणि सआदत हसन मंटो, भालचंद्र नेमाडे आणि एंगुगी वा थियोन्गो, संत सेनामहाराज आणि संत रविदास यांचा तुलनात्मक अभ्यास करीत आहेत.
मध्यपूर्व आशियातील साहित्य, भारतीय लेखिकांच्या कादंबऱ्या, डॉ. यु. आर. अनंतमूर्तींचे साहित्य हे सर्व मराठीत अनुवादित झाले असून त्याचाही धांडोळा काही अभ्यासक आपल्या प्रबंधांमधून घेत आहेत. दोन अभ्यासक हे ‘दै. सकाळ’ आणि ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ यांचे कार्य आपल्या प्रबंधांमधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गौतम बुद्ध, अहिल्याबाई होळकर, सयाजीराव गायकवाड, म. फुले, डॉ. आंबेडकर, डॉ. गोविंद गारे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, नामदेव ढसाळ, सतीश आळेकर यांच्याशी संबंधित विषय घेऊन पीएच.डी.साठी प्रबंधलेखन करीत आहेत. मुस्लिम समाज आणि आदिवासी समाजही आता पुढे येत चालला आहे. अभ्यासकांचेही लक्ष या समाजाच्या साहित्याकडे वेधले जात आहे. आमच्या विभागामध्ये या विषयांशी संबंधित विषयांवर संशोधनकार्य काही अभ्यासक करत आहेत.
सध्या एम. फिल. आणि पीएच. डी. करणाऱ्यांमध्ये ग्रामीण पार्श्वभूमी असलेले अधिक दिसतात. शिवाय ते दलित, भटके-विमुक्त, आदिवासी, मुस्लिम अशा उपेक्षित समाजघटकांतूनही आलेले दिसतात. पुष्कळदा ते त्यांच्या घराण्यातील पहिलेच उच्चविद्याविभूषित ठरत आहेत.
डॉ. अविनाश सांगोलेकर
(मराठी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे )
avinashsangolekar@unipune.ac.in
-----------
स्लग - शोध मराठीचा...
हेडिंग - गोमांतकात नांदते मराठी...
-----
बायलाइन - डॉ. बाळकृष्ण कानोळकर
-----
इंट्रो - गोवा िवद्यापीठातील हे सारेच्या सारे संशोधन "चिकित्सक अभ्यास' या पठडीतले असल्याचे जाणवते. येथे कुठेही समाजशास्त्रविषयक वा तौलनिक अभ्यासाचा प्रयत्न दिसून येत नाही. त्याचप्रमाणे भाषावैज्ञानिक व तत्सम अत्याधुनिक व शैलीशास्त्रीय अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास इत्यादी संशोधनाचे नवे प्रवाह वा नव्या वाटा आता हा अभ्यास स्पर्श करताना आढळून येत नाहीत, असे सखेद नोंदवावे लागते. हे भूषणावह नाही, हे मान्य करूनही मुख्य धारेपासून दूर असलेल्या माझ्या गोमंतकात मराठी साहित्याच्या संशोधन क्षेत्रात चाललेले हे काम नाकारण्यासारखेही खचितच नाही...
-----
कोणत्याही विद्यापीठाच्या ज्ञानशाखांचे कार्य हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असते. एक अध्यापन आणि दुसरे संशोधन. गोवा विद्यापीठाच्या कला विभागात भाषा आणि साहित्य उपविभागांतर्गत मराठी भाषा विभागही याला अपवाद नाही. विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच म्हणजे १९८५ पासून संशोधनाचे कार्य या विभागामध्ये चालत आलेले आहे. गेल्या काही वर्षांत त्यात संख्यात्मक वाढ झालेली आहे. परंतु गुणात्मक वाढीचे काय? असा प्रश्न साहजिकच कुणाही अभ्यासकाच्या मनात निर्माण होणे अपरिहार्य आहे.
आजमितीला या विभागातून सुमारे १२ संशोधक विद्यार्थी पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेले आहेत. सध्या असा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या कार्यात १४ विद्यार्थी कार्यरत आहेत. त्यांचे संशोधन विषय असे आहेत : मराठी एकांकिकेचा रूपबंध आणि आशय : एक चिकित्सात्मक अभ्यास, अरुण हेबळेकर यांचे कथानक साहित्य - एक चिकित्सात्मक अभ्यास, संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या साहित्याचा वाङ‌्मयीन व भाषिक अभ्यास, एकोणीसशे नव्वदोत्तरी मराठी कविता : स्वरूप आणि शैली, एकोणीसशे नव्वदोत्तरी मराठी ललित निबंधाचा चिकित्सात्मक अभ्यास, मराठीतील क्रौर्यनाट्य : एक चिकित्सक अभ्यास, दक्षिण कोंकण प्रदेशातील लेखकांनी लिहिलेल्या कादंबरीतील कथनाचा सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या चिकित्सक अभ्यास, गोमंतकीय लेखकांचे मराठी प्रवासवर्णन : एक चिकित्सक अभ्यास, १९९० नंतरच्या मराठी कादंबरीचा चिकित्सक अभ्यास, गोमंतकीय मराठी आत्मचरित्रात्मक लेखनाचा चिकित्सक अभ्यास (प्रारंभ ते २०१०), शांता शेळके, सुनीता देशपांडे, इंदिरा संत, प्रतिमा इंगोले, अरुणा ढेरे या साठोत्तरी लेखिकांच्या विशेष संदर्भात ललित निबंधाचा चिकित्सक अभ्यास. गोमंतकीय ख्रिस्ती मराठी साहित्याचे संशोधन व संशोधक : एक चिकित्सक अभ्यास, डॉ. वि. बा. प्रभुदेसाई यांचे मराठीतील संशोधन कार्य : एक चिकित्सक अभ्यास, गोमंतकीय लोकनाट्य : रणमाले याचा चिकित्सक अभ्यास.
उपरोक्त अभ्यास/संशोधन विषयक सूचीवर एक नजर टाकली असता, गोवा िवद्यापीठातील हे सारेच्या सारे संशोधन "चिकित्सक अभ्यास' या पठडीतले असल्याचे जाणवते. येथे कुठेही समाजशास्त्रविषयक वा तौलनिक अभ्यासाचा प्रयत्न दिसून येत नाही. त्याचप्रमाणे भाषावैज्ञानिक व तत्सम अत्याधुनिक व शैलीशास्त्रीय अभ्यास, सांस्कृतिक अभ्यास इत्यादी संशोधनाचे नवे प्रवाह वा नव्या वाटा आता हा अभ्यास स्पर्श करताना आढळून येत नाहीत, असे सखेद नोंदवावे लागते. हे भूषणावह नाही, हे मान्य करूनही मुख्य धारेपासून दूर असलेल्या माझ्या गोमंतकात मराठी साहित्याच्या संशोधन क्षेत्रात चाललेले हे काम नाकारण्यासारखेही खचितच नाही. येणाऱ्या काळात इथले संशोधक छात्र संशोधन क्षेत्रातील नव्या तंत्राचा अभ्यास करून नव्या व उपेक्षित वाटा व दिशांचा धांडोळा आपल्या संशोधनकार्याचा विषय बनवतील, अशी अपेक्षा आहे.
विद्यापीठातील सर्वच संशोधक विद्यार्थ्यांची मातृभाषा कोंकणी/ मराठी असून एकतर ते खुद्द गोव्यातील वा दक्षिण कोकणातील असून एक-दोन देशावरचे आहेत. अगदी मोजक्याच विद्यार्थ्यांच्या संशोधन अभ्यासविषयाच्या निवडीवर परिसर-प्रभाव असलेला जाणवतो.
आंतरविद्यापीठीय आदानप्रदान आवश्यक
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागातील विद्यापीठीय संशोधनाचा विद्यमान दर्जा आणि त्याची मराठीचा प्रसार-प्रचार आणि वृद्धी-समृद्धीच्या अंगाने असलेली उपयुक्तता याबाबत खरे तर मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. कारण या विद्यापीठातील अध्यापक वा संशोधक विद्यार्थ्यांशी माझा व्यक्तिश: कधी संबंध आलेला नाही. भाैगोलिक दूरता हे याचे एक प्रमुख कारण असू शकते. नाही म्हणायला, गेल्याच वर्षी एका प्रबंधाचे मूल्यमापन करण्याविषयी मला विचारले होते. परंतु विषय होता, संत गाडगेबाबा यांचे साहित्य. संत गाडगेबाबा यांच्या साहित्याचा माझा सखोल अभ्यास नसल्याने साहजिकच ही निवड मी सखेद नाकारली. या निमित्ताने जाता जाता एक सुचवावेसे वाटते ते म्हणजे, मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या विषयक संशोधनाची व्याप्ती आणि दर्जा वाढवायचा असेल तर विविध विद्यापीठांतर्गत आदानप्रदान वाढविण्याच्या दृष्टीने काही उपक्रम राबवावे लागतील. अधिक काय सांगणे?
(मराठी विभागप्रमुख, गोवा विद्यापीठ)
hodmar@unigoa.ac.in
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : डॉ. भारती निरगुडकर
-------------------
हेडिंंग : बोलीभाषांच्या संशोधनावर भर
----
इंट्रो : मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाला भाषा व साहित्य संशोधनाची ८० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. प्राचीन साहित्याच्या संशोधनापासून ते आधुनिक, उत्तरआधुनिक साहित्याच्या अभ्यासापर्यंत संशोधनाची विविधता त्यात आहे. कथनमीमांसा, संरचनावाद, स्त्रीवाद, मानसशास्त्रीय; आदिबंधात्मक समीक्षादृष्टी इ.च्या परिप्रेक्ष्यात हे अभ्यास सिद्ध झाले आहेत.
------------------
मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये मराठी भाषा आणि साहित्य यांचे अध्यापन व संशोधन सातत्याने सुरू आहे. मराठी विभागाला भाषा व साहित्य संशोधनाची ८० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. पीएच. डी. व एम. फील. पदव्यांसाठी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अनेक तज्ज्ञ व व्यासंगी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंध तयार केले आहेत. प्राचीन साहित्याच्या संशोधनापासून ते आधुनिक, उत्तरआधुनिक साहित्याच्या अभ्यासापर्यंत संशोधनाची विविधता त्यात आहे. साहित्याच्या अभ्यासामध्ये विशिष्ट आधुनिक ज्ञानदृष्टीचा अवलंब सातत्याने करण्यात आलेला आहे. कथनमीमांसा, संरचनावाद, स्त्रीवाद, मानसशास्त्रीय; आदिबंधात्मक समीक्षादृष्टी इ.च्या परिप्रेक्ष्यात हे अभ्यास सिद्ध झाले आहेत.
साहित्याबरोबरच भाषा व बोलींचे संशोधन विभागात गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे. या संदर्भांत ‘मराठी भाषेचा भाषाशास्त्रीय विचार’ या विषयावर शं. गो. तुळपुळे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनातून महाराष्ट्री, प्राकृत व मराठी भाषा यासंबंधी प्राकृत अपभ्रंश भाषेचा दुवा मांडण्यात आला. त्यातून मराठीच्या ऐतिहासिक अभ्यासाला नवी दिशा मिळाली. पेशवे दप्तरातील १८व्या शतकातील मराठीचे स्वरूप (ग. ब. ग्रामोपाध्ये), मराठी गद्याचा विकास (श्री. दि. परचुरे) अशा काही मान्यवर संशोधकांनी पूर्ण केलेले महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प उल्लेखता येतील. ही प्रमाण मराठीच्या संदर्भातील संशोधन परंपरा आजही सुरू आहे. प्रशासनिक मराठीची घडण, प्रसारमाध्यमातील मराठीचे स्वरूप, राज्यव्यवहारातील मराठी भाषेचे उपयोजन, मराठी शुद्धलेखन परंपरा इ. विषयांवर मौलिक संशोधन अलीकडेच झालेले आहे. या विषयांबरोबरच मुंबईतील व मुंबईबाहेरील अनेक जाती, जमातींच्या बोलींचे अभ्यास झालेले आहेत. सुरू आहेत. मराठीच्या अनेक बोलींची वैशिष्ट्ये भाषावैज्ञानिक अभ्यासाद्वारे मांडण्यात आलेली आहेत. उदा. मालवणी, ठाकरी, आगरी, शिंदी भंडारी, वसई परिसरातील सामवेदी आणि वाडवळ इ. बोलीवरील संशोधन सिद्ध झाले आहे. मुंबईतील कोळी बोली, मुंबईजवळ असलेल्या ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील विविध बोली यांवर भाषावैज्ञानिक अंगाने संशोधन पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.
आज मराठी विभागात संशोधनासाठी प्रवेश घेणारा विद्यार्थी मुंबई शहरातील व त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनही येतो. साहजिकच ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, नंदुरबार, पुणे या जिल्ह्यांबरोबरच मुंबईबाहेरील खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागातूनही विद्यार्थी सातत्याने येत आहेत. या विद्यार्थ्यांकडून त्या त्या प्रदेशातील लोकसाहित्य संकलित करण्यात येते, आणि त्या आधारे लोकसंस्कृतीबरोबरच बोलींचा अभ्यासही होत असतो. एम. फिल. व पीएच. डी. पदवीसाठी ठाकरी, कातकरी, वारली व भिल्ली आदिवासी बोली व बोलीसाहित्याचा अभ्यास घडत आहे. याशिवाय मांगेला, कादोडी, मल्हारकोळी, धनगरी, कुणबी, वाडवळी ख्रिश्चन, अहिराणी, उत्तर कोंकणी या बोलींच्या अभ्यासाचे प्रयत्न चालू आहेत. विविध बोलींचे व त्यातील लोकसाहित्याचे दस्तऐवजीकरण होत आहे. त्याच्या आधारे या बोलींचे जतन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बोलींचे व्याकरण लिहिणे, लोकसाहित्य प्रकाशित करणे यांसारखे भविष्यातील उपक्रम व्यवहारभाषा म्हणून मराठीला संपन्न करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. मराठी ज्ञानभाषा म्हणून घडवताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठीदेखील हे उपक्रम नक्कीच उपकारक ठरू शकतील, असा माझा विश्वास आहे.
सद्यःस्थितीत आतापर्यंत झालेल्या व सुरू असणाऱ्या संशोधनाचा दर्जा समाधानकारक असून मराठी विभागप्रमुख या नात्याने भविष्यात मराठी भाषा व साहित्य वेगवेगळ्या भाषांच्या अभ्यासाशी जोडले जावे, तसेच आज नव्याने उदयास आलेल्या ज्ञानशाखा मराठीतून उपलब्ध व्हाव्यात व व्यावसायिक दृष्टीनेही मराठीत संशोधन व अभ्यास घडावा, अशी भूमिका व धोरण विभागप्रमुख म्हणून आमच्या विभागात राबविण्याचा माझा प्रयत्न आहे.
विभागप्रमुख, मराठी विभाग.
मुंबई विद्यापीठ, मुंबई
bharatinirgudkar@yahoo.in
-------------
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : डॉ. राजन गवस
-------------------
हेडिंंग : निखळ संशोधन व्यवहाराचा आग्रह
------------------
इंट्रो : चंदगडी बोलीचा अभ्यास, श्रद्धा व अंधश्रद्धेची भाषिक संरचना, मराठी कवितेवरील बुद्ध विचाराचा प्रभाव, कोल्हापूर जिल्ह्यातील बलुतेदारांच्या बोलीचा अभ्यास हे बृहद प्रकल्प विद्यापीठ अनुदान आयोग व भारतीय विज्ञान व सामाजिक शास्त्रे संशोधन संस्था यांच्या सहकार्याने सुरू आहेत... शिवाजी विद्यापीठाचे वैशिष्ट्य ठरले आहे...
------------------
शिवाजी विद्यापीठात मराठी विभागाची स्थापना १९७९मध्ये झाली. या विभागात सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील गोरगरीब मुले शिक्षणासाठी येत असतात. यांची जडणघडण खेड्यापाड्यांत झाल्यामुळे आपापल्या मौखिक परंपरा, बोली यांसह ही मुले विभागात वावरत असतात. या मुलांच्या पाचवीलाच दारिद्र्य पुजलेले असते. तरीही परिस्थितीशी चिवट झुंज देत त्यांचे अध्ययन सुरू असते. मुलांना संशोधनाची गोडी लागावी, म्हणून एम. ए. भाग १ व २ मध्येच क्षेत्रीय अभ्यासाची सवय लावण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये लोकगीते, लोककथा, दैवतकथा, बोलीतील म्हणी, बोलीतील संपत चाललेले शब्द संकलित करून त्याबाबत स्वतःचे अनुभव मांडण्याची संधी दिली जाते. एम. फिल. व पीएच. डी. साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठीचे अध्यापन, बोलींचा अभ्यास, लोककलांचा अभ्यास याकडे विशेष आस्थापूर्वक वळविण्याचे काम सुरू असते. विभागात आजमितीस ६३ विद्यार्थी एम. फिल. करत असून पीएच. डी. पदवीसाठी १०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. परंपरागत विषय टाळून अभ्यासाच्या नव्या क्षेत्राकडे त्यांनी वळावे, यासाठी विभागात विशेष प्रयत्न केले जात आहेत.
वाहन व्यवहारातील मराठीचा वापर, वाड्या-वस्तीतील दलित समाजाची वाचन अभिरुची, महाविद्यालयीन स्तरावरील मराठीचे अध्यापन, मराठी अध्यापनाच्या नव्या पद्धती, संशोधन व्यवहारातील समस्या, मराठीतील कोश वाङ‌्मय इत्यादी विषयांवर सध्या विद्यार्थ्यांचे विशेष संशोधन सुरू आहे. विभागात मोडी व देवनागरी लिपीबाबतही संशोधन सुरू असून छत्रपती घराण्यातील मोडी दस्तऐवज भाषेच्या दृष्टीने अभ्यासण्याचे कामही विद्यार्थ्यांनी हाती घेतले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकवाद्यांच्या संकलनाचे कामही विद्यार्थ्यांनी हाती घेतले असून प्रत्येक वाद्याच्या वाजविण्याच्या विविध पद्धती ध्वनिमुद्रित करून वाद्यखोली तयार करण्याचा प्रकल्प विद्यार्थ्यांनी पूर्णत्वास नेण्यास सुरुवात केली आहे. याबरोबरच या तिन्ही जिल्ह्यातील दैवतकथांवर वेगवेगळे प्रबंध सिद्ध झालेले आहेत.
विभागामार्फत कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरातील लेखक सूची बनविण्याचा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पात प्रत्येक खेड्यात लिहिणाऱ्या लेखकाची नोंद संकलित केली आहे. आयुर्वेद, खगोलशास्त्र, शेती, हवामानशास्त्र, आहारशास्त्र, पोवाडे, पाळणे, दैवतकथा, कथा, कादंबरी, कविता, नाटक, निबंध, तमाशांचे वग इत्यादी लिहिणाऱ्यांची नोंद या सूचीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे काळाआड गेलेल्या अनेक लेखकांचे साहित्य या निमित्ताने प्रथमच वाचकांसमोर येत आहे. या प्रकल्पाचा उपभाग म्हणून विद्यापीठ संलग्न महाविद्यालयातील सर्व विषयांच्या लेखकांचे प्रकाशित ग्रंथ विभागात संकलित केले जात आहेत. आजवर १,२१३ ग्रंथ उपलब्ध झाले असून संकलनाचे काम अजूनही सुरू आहे. यामुळे विभागात संपन्न ग्रंथालयही निर्माण होत आहे.
विभागात चंदगडी बोलीचा अभ्यास, श्रद्धा व अंधश्रद्धेची भाषिक संरचना, मराठी कवितेवरील बुद्ध विचाराचा प्रभाव, कोल्हापूर जिल्ह्यातील बलुतेदारांच्या बोलीचा अभ्यास हे बृहद प्रकल्प विद्यापीठ अनुदान आयोग व भारतीय विज्ञान व सामाजिक शास्त्रे संशोधन संस्था यांच्या सहकार्याने सुरू आहेत. राज्य साहित्य संस्कृती मंडळामार्फत गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर यांचे साहित्य प्रकाशित केले जाणार आहे. या प्रकल्पाचे कामही या विभागात सुरू आहे. याबरोबरच ‘तृतीयपंथीयांच्या बोलीचा अभ्यास’ हा बृहद प्रकल्प विभागामार्फत घेतलेला आहे. उपरोक्त प्रकल्पांव्यतिरिक्त मराठी अध्यापनांबाबत संशोधन गरजेचे असल्यामुळे याबाबतचे प्रकल्पही हाती घेण्यात आलेले आहेत.
अलीकडच्या काळात खेड्यापाड्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी धुमाकूळ घातल्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. या परिस्थितीशी मुकाबला करता यावा, म्हणून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना विभागाने स्वतःशी जोडून घेतले आहे. या शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग त्यांच्या त्यांच्या गटविभागात घेतले जात आहेत. यासाठी या शिक्षकांना सततच्या संपर्कात ठेवले गेले आहे. माध्यमिक शाळांतील सर्व विषयांच्या शिक्षकांना मराठीबाबत साक्षर करण्याचा कार्यक्रमही हाती घेण्यात आलेला आहे. प्राथमिक व माध्यमिक स्तरावर मराठीबाबत प्रत्येक मराठी विभागाने भरीव काम केले तर इंग्रजी शाळांचे वाढते वर्चस्व कमी करण्यात यश मिळणार आहे, अशा निष्कर्षाला हा विभाग आलेला आहे.
विभागातील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यशाळा, चर्चासत्रे सातत्याने घेतली जात आहेत. या वर्षीपासून विद्यापीठ परिसरात सर्जनशील लेखन करणाऱ्या लेखकांची कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी या विद्यापीठ क्षेत्रातील ६० नवोदित लेखकांची कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यात आली. याबरोबरच विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयातील लिहिणाऱ्या मुलांना मार्गदर्शन व्हावे म्हणून विद्यार्थी-लेखक कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. वाचनविकास कार्यशाळाही घेण्यात आली. वाचनाभिरुची वाढविणे, वाचनाचे दृष्टिकोन समजावून देणे व वाचन ही गंभीर प्रक्रिया आत्मसात करण्यासाठी घ्यावयाचे परिश्रम याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. अशा स्वरूपाच्या कार्यशाळांमध्ये स्थानिकांचा सहभाग वाढावा, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.
विभागामार्फत ग्रंथ प्रकाशनाचे प्रयत्नही गंभीरपणे केले जात आहेत. ज्येष्ठ लेखक दत्ता देसाई यांनी विभागात ‘आधुनिकता व उत्तरआधुनिकता’ या विषयावर दिलेली तीन व्याख्याने विभागामार्फत प्रकाशित केली जात आहेत. याबरोबरच ‘समकालीन भारतीय साहित्य’ या विषयावर विभागात झालेली व्याख्याने ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. विभागात महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे आधुनिक मराठी साहित्य हे ज्ञानमंडळ कार्यान्वित झाले असून ‘नोंद लेखनाचा प्रशिक्षण वर्ग’ लवकरच घेण्यात येणार आहे.
संशोधन व्यवहार निखळ राहावा, यासाठी शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग सततच आग्रही राहिला आहे. विभागाची कामगिरी वेगवेगळ्या प्रकारे उल्लेखनीय असली तरी, अलीकडे मराठी विषयाची निवड बुद्धिमान विद्यार्थी कमी करत असल्यामुळे, विविध अडचणी निर्माण होत आहेत. बुद्धिमान मुलांना मराठी विषयाकडे वळविण्यासाठीच्या प्रयत्नांचा शोध सुरू आहे. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरच यासाठी भरीव श्रम घेण्याची गरज असल्यामुळे विभाग त्यासाठी प्रयत्नशील आहे.
-----------------------------
साहित्यातले समाजअंग उजळले...
१९८२मध्ये पॉप्युलर प्रकाशन व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चर्चासत्रात डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी ‘मराठी कादंबरी ः प्रेरणा व स्वरूप’ हा निबंध सादर केला. आणि मराठी समीक्षेतील केंद्र, परीघ ही संकल्पनाच बदलून गेली. या चर्चासत्रातील निबंधांचे एकत्रीकरण करून ‘मराठी वाङ‌्मय प्रेरणा व स्वरूप’ हा ग्रंथ सिद्ध झाला. हे नोंदविण्याचे कारण असे की, यानंतरच मराठी साहित्यात सामाजिक दृष्टीने अभ्यासाची परंपरा निर्माण झाली. विभागाने आजवर दिलेले योगदान महत्त्वाचे ठरलेले आहे.
(विभाग प्रमुख, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
इमेल आयडी : rajan.gavas@gmail.com
शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : डॉ. अरुणा दुभाषी,
-------------------
हेडिंंग : समाजाभिमूख संशोधनाचा वसा
------------------
इंट्रो : १९७१ मध्ये विद्यापीठात प्रा. गं. बा. सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी स्तोत्रवाङ््मय’ या विषयावरील पहिला प्रबंध सादर झाला. त्यानंतर विभागात अनेक साहित्यिक, साहित्यप्रकार, रचनाप्रकार यांच्यावर संशोधन झाले आहे. डॉ. स. गं. मालशे, डॉ. भीमराव कुलकर्णी, डॉ. मीना जोशी, डॉ. चंद्रकांत वर्तक, डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. अनंत देशमुख, डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे अशा अनेक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना मिळाले आहे...
------------------
५ जुलै १९१५ रोजी सुरू झालेल्या श्रीमती ना. दा. ठाकरसी उर्फ एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठामध्ये मराठी हा विषय प्रारंभापासूनच शिकवला जात होता. मराठीतील थोर तत्वज्ञ साहित्यिक वामन मल्हार जोशी हे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सहकारी होते. पुढे १९५६ मध्ये पदव्युत्तर मराठी विभाग सुरू झाला, तेव्हापासून आजपर्यंत पदव्युत्तर अभ्यास आणि संशोधन विभागात सुरू आहे.
१९७१ मध्ये विद्यापीठात प्रा. गं. बा. सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मराठी स्तोत्रवाङ््मय’ या विषयावरील पहिला प्रबंध सादर झाला. त्यानंतर विभागात अनेक साहित्यिक, साहित्यप्रकार, रचनाप्रकार यांच्यावर संशोधन झाले आहे. डॉ. स. गं. मालशे, डॉ. भीमराव कुलकर्णी, डॉ. मीना जोशी, डॉ. चंद्रकांत वर्तक, डॉ. विजया राजाध्यक्ष, डॉ. अनंत देशमुख, डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे अशा अनेक मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींना मिळाले आहे.
सध्या विभागामध्ये १५ विद्यार्थिनींचे पीएच.डी.करिता संशोधन सुरू आहे. विद्यार्थिनींना संशोधनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांची पूर्वतयारी चांगली व्हावी या हेतूने एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाने एम.ए.च्या अभ्यासक्रमात संशोधन विषयाच्या तीन अभ्यासपत्रिकांचा समावेश केला आहे. संशोधन प्रक्रियेविषयीचा तत्वविचार विद्यार्थिनी दुसऱ्या सत्रात शिकतात. तिसऱ्या सत्रात त्या प्रक्रियेचे उपयोजन करायचे असते आणि चवथ्या सत्रात त्यांना प्रबंधिका सादर करायची असते. एम.फिल. व पीएच.डी. पदवीकरिता जी संशोधन प्रक्रिया राबवली जाते ती या विद्यार्थिनी एम.ए. करतानाच आत्मसात करतात. त्यामुळे त्यापुढे जेव्हा एम. फिल वा पीएच.डी करण्यासाठी येतात तेव्हा त्यांचा दृष्टिकोन तयार असल्यामुळे विषयाच्या निवडीपासून सूची, ग्रंथालयाचा वापर, टिपणी इ. बाबतीत त्यांची तयारी दिसून येते.
सध्या विभागात गझल, गीतकाव्य, रूपककथा या साहित्यप्रकारांवर आणि भालचंद्र नेमाडे, द. मा. मिरासदार, प्रतिमा इंगोले यांसारखे लेखक आणि ना. घ. देशपांडे, ना. धों. महानोर यासारखे कवी यांच्या साहित्यकृतींवर संशोधन सुरू आहे. या शिवाय वि.दा. सावरकर आणि नरेंद्र दाभोळकर यांसारख्या विचारवंत साहित्यिकांवरही संशोधनपर कार्य सुरू आहे.
(मराठी विभागप्रमुख, एस.एन.डी.टी. विद्यापीठ मुंबई )
Aruna.dubhashi@gmail.com
----
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : प्रा. हनुमंत मते
hbmate70@gmail.com
-------------------
हेडिंंग : परंपरेची बूज राखणारे संशोधन
------------------
इंट्रो : सोलापूर विद्यापीठात शब्दभंडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती यासंदर्भात स्पर्धेचे आयोजन केले जाते. मराठीतील म्हणी, वाक्यप्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवरती सोलापूर विद्यापीठात मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिसंवादांचे आयोजन केले जाते. बोलीभाषांची विविध रुपे उलगडून दाखविणारे कार्यक्रम सोलापूर विद्यापीठाने नेहमीच हाती घेतले आहेत. त्याला जोडूनच होणाऱ्या चर्चासत्र व परिसंवादात नामांकित भाषातज्ज्ञ सहभागी होऊन या कार्यक्रमांची बौद्धिक उंची वाढवतात.
------------------
एक जिल्हा एक विद्यापीठ या योजनेनुसार सोलापूर येथे ऑगस्ट २००४मध्ये विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात विविध प्रकारची ११६ महाविद्यालये आहेत. त्यातील तीसहून अधिक महाविद्यालये सोलापूर शहरात आहेत. सोलापूर जिल्ह्यातून मराठवाड्यातील काही भागांतून तसेच कर्नाटकातूनही अनेक विद्यार्थी सोलापूरच्या महाविद्यालयांत शिकायला येतात. मराठी मायबोलीचा उगम, विकास, समृद्धी आणि भवितव्य यांचा विचार करुन सोलापूर विद्यापीठातर्फे विविध उपक्रम नेहमी राबविले जातात. मराठी भाषेचा विविध पैलूंनी विचार करून, या भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकडून लेख लिहून घेऊन, ते विकिपिडियावर प्रसिद्ध केले जातात. मातृभाषेची महती आणि माहिती तसेच मातृभाषेचे व्यक्तिगत व समाजजीवनातील स्थान आणि मातृभाषेचे मानसशास्त्रीय व शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्व या विषयांवर विचारमंथन करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाच्या वतीने काही कार्यक्रमांचे सहआयोजन केले जाते. समाजप्रचार माध्यमातील मराठी, माहिती तंत्रज्ञान व मराठी या विषयांवरील व्याख्यानेही आयोजिली जातात. सोलापूर विद्यापीठात शब्दभंडार आणि नवीन पर्यायी शब्दनिर्मिती यासंदर्भात स्पर्धेचे आयोजन केले जाते. मराठीतील म्हणी, वाक्यप्रचार, प्राचीन शब्द यांची व्युत्पत्ती या विषयांवरती सोलापूर विद्यापीठात मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परिसंवादांचे आयोजन केले जाते. बोलीभाषांची विविध रुपे उलगडून दाखविणारे कार्यक्रम सोलापूर विद्यापीठाने नेहमीच हाती घेतले आहेत. त्याला जोडूनच होणाऱ्या चर्चासत्र व परिसंवादात नामांकित भाषातज्ज्ञ सहभागी होऊन या कार्यक्रमांची बौद्धिक उंची वाढवतात.
मराठी भाषा साहित्य कोश वाडमय या संदर्भातील नावीन्यपूर्ण गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले जाते. प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांच्या रेट्यामुळे व संगणकाच्या चोवीस तास वापरामुळे हाताने लिहिणे ही गोष्ट खूपच कमी होऊ लागली आहे. त्याची जागा संगणकाच्या की बोर्डने घेतली आहे. मात्र मराठी हाताने लिहिता येणे, हा वेगळा आनंद असतो. त्यासाठी मराठी सुलेखन, सुंदर मराठी हस्ताक्षर अशा स्पर्धाही सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजिल्या जातात. मराठी कथा, कविता, नाटक यांची कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना लेखनाच्या दृष्टीकोनातून सक्षम बनविण्याचे प्रयत्न केले जातात. सोलापूर विद्यापीठात प्रामुख्याने कन्नड, तेलुगू आणि मराठी या भाषांमध्ये संशोधन सुरु असते. एम. फील. आणि पीएचडी या स्तरावर हे संशोधन होते. एका प्राध्यापक मार्गदर्शकाच्या हाताखाली दरवर्षी एमफीलचे सहा व पीचएचडीचे सहा विद्यार्थी या संशोधनकार्यात गुंतलेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात जन्मलेल्या संतांमध्ये सावता माळी, संत चोखामेळा, कान्होपात्रा, संत दामाजीपंत, स्वामी समर्थ अशा नावांचा समावेश आहे. ‘कांदा, मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ असे म्हणणारे संत सावता माळी हे प्रत्येकालाच प्रात:स्मरणीय आहेत. दुष्काळात बादशहाची धान्याची कोठारे जनतेला खुली करणारे संत दामाजीपंत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचेच. शाहीर राम जोशीही सोलापूर जिल्ह्यातीलच. साहित्यसम्राट न.चि. केळकर यांचा जन्म जिल्ह्यातील मोडनिंब या गावी झाला, तर नवकवितेचे प्रवर्तक बा. सी. मर्ढेकर जिल्ह्यातील मर्ढे या गावचे होते. युद्धकाळात रुग्ण सैनिकांची सेवा करून भारताचे नाव जगभर उज्ज्वल करणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचे जन्मगाव सोलापूर असून, येथे त्यांचे स्मारकही आहे. तसेच पंचागकर्ते दातेही सोलपूरचेच. कवी कुंजविहारी, शाहीर अमर शेखांपासून ते निर्मलकुमार फडकुले, ‘अक्करमाशी’ या कादंबरीतील वास्तवदर्शी लेखनातून महाराष्ट्राला हादरवून टाकणारे शरणकुमार लिंबाळे; साहित्य अकादमी पुरस्कार विजेते अनुवादक प्रा. निशिकांत ठकार, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली, समीक्षक गो. मा. पवार, राणा पवार, त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्यापासून ते प्रख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन व ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातलेच. अशा सगळ्या नामवंतांनी, प्रतिभवंतांनी मराठी भाषेची जी सेवा केली आहे, तिच्या विकासासाठी जो मोलाचा हातभार लावला आहे त्याचे पांग फेडणे अशक्य आहे. या थोर परंपरेची बूज राखत सोलापूर विद्यापीठ मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील आहे, तेही संशोधन व प्रत्यक्ष कार्याच्या माध्यमातूनही.
प्रा. हनुमंत मते
संचालक,
विद्यार्थी कल्याण विभाग,
सोलापूर विद्यापीठ
-----------
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : प्रा. केशव देशमुख
-------------------
हेडिंग : सार्थ संशोधन पुष्कळसे अल्प
------------------
ब्लर्ब : संशोधन म्हटले की त्याला चिंतनमूल्य, समाजमूल्य, संदर्भमूल्य, वाङ‌्मयमूल्य ही चार मूल्ये किंवा यापैकी एखादे तरी ठळक मूल्य असणे अभिप्रेतच असते. तर मग या श्रेणीचा मूल्य शोध कमीच गवसतो. या न्यायाने मराठी संशोधनाचा विद्यमान दर्जा हिरमोड करतो.
------------------
एखादे बीज स्वत:ला आधी गाडून घेते आणि उद्या रोपटे होऊन वर येते, असा हुन्नर संशोधकांत हल्ली अपवादाने आढळतो. त्यामुळे ‘मराठी’त एम. फिल. काय अथवा पीएच.डी. काय, या उभय वर्गातील संशोधन ‘अप्रतिम’ या शब्दांत समाविष्ट करावे, असे नक्कीच नाही. बहुतांश विद्यापीठांत मराठी विषयनिष्ठ संशोधनाचा झपाटा आणि सपाटा वेगवान असा असतो, याला आमचेही विद्यापीठ अपवाद नाही. पण सार्थ (मिनिंगफूल) संशोधन पुष्कळसे अल्प आहे. संशोधन म्हटले की त्याला चिंतनमूल्य, समाजमूल्य, संदर्भमूल्य, वाङ‌्मयमूल्य ही चार मूल्ये किंवा यापैकी एखादे तरी ठळक मूल्य असणे अभिप्रेतच असते. तर मग या श्रेणीचा मूल्य शोध कमीच गवसतो. या न्यायाने मराठी संशोधनाचा विद्यमान दर्जा हिरमोड करतो.
मुळात संशोधन ही फावल्या वेळेची (लिझर) गोष्ट नव्हे. डोक्यात लोभ ठेवून पार पाडावयाचे हे कार्यपण नव्हे! तर उलट ज्ञानात्मक (कॉग्निटिव) असे बिरूद स्वीकारलेले पीएच.डी. कार्य आहे. मी इथे एक दाखला मुद्दाम नमूद करेन की, ‘बदलते ग्रामीण वास्तव आणि मराठी कादंबरी’ या विषयावर आसाराम लोमटे आमच्याकडे पीएच.डी. पदवी प्राप्त झाले! संशोधन कसे पाहिजे, याचा अप्रतिम नमुना म्हणून या प्रबंधाकडे बघता येईल. लोमटेंचा प्रबंध आमच्या विद्यापीठाच्या मराठी विभागाचे मी गौरवचिन्ह मानतो!
‘भाषा’ हा शब्द केंद्रस्थानी ठेवून त्या दृष्टीने म. जोतिराव फुले, संत तुकाराम, डॉ. आंबेडकर, वारकरी कीर्तन परंपरा किंवा दादा कोंडकेंच्या मराठी चित्रपटांची लोकभाषा, कृषी-संस्कृतीतील स्त्रिया-पुरुष यांची भाषा किंवा शाहीर आणि लोककलावंताची एक खास असलेली ‘ढंगदार-जोरदार भाषा’ आदींचा अभ्यास म्हणूनच कळीचा ठरायला हवा. यासाठी विद्यार्थीशोध आणि विद्यार्थी ‘घडविण्यासाठी’ आमचा सर्वतोपरी प्रयत्न असतो. संशोधनात रोगटपणा (मॉरबॅडिटी) मूळ धरू नये, याचाही यत्न आम्ही करतो. शक्यतोवर नावीन्यपूर्ण, जरा आव्हानात्मक पण दमछाक करणारे आणि शेवटी समाधान देणारे मराठी भाषेचे, साहित्याचे नूतन विषय आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. भालचंद्र नेमाडे किंवा भुजंग मेश्राम, विश्वास पाटील, अथवा आदिवासी विश्वातील मौलिक काव्यलेखन आणि याशिवायही नरेंद्र दाभोलकरांचे विचार वाङ‌्मय, भाषांतर, लोकसाहित्य, संत साहित्य असे विषय निवडत एम. फिल, पीएच. डी. प्रबंधलेखन करून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तरीही व्याकरण विद्या, विज्ञानवाङ‌्मय, मराठी आणि सिनेमा, बोलीविज्ञान, भाषा, समाज, मराठी आणि साहित्य या धाटणींचे विषय निवडून त्यावर काही एक मौलिक संशोधन मराठीची ध्वजा उंच करायला साहाय्य करील, असा आमचा समकाल दृष्टिकोन आहे. समकालीन (कंटेम्पररी) स्वरूपाचे विषय निवडतानाच अन्वर्थक (रेलेव्हन्ट) स्वरूपाच्या विषयांचे वेध मराठी संशोधनाला लगडले पाहिजे. या दृष्टीने विद्यार्थीशोध विभाग घेत असतो. अशा संशोधनातच मला वाटते की, मराठीची समृद्धी सामावलेली आहे.
‘मराठी’ म्हणून आणि ‘भाषा’ म्हणून संशोधनाची पत व प्रत या दोन्ही गोष्टी सांभाळण्याची जबाबदारी विद्यार्थी-शिक्षक या दोघांचीही असतेच! पण या पलीकडेही १) बिनमुद्द्यांचे (पॉइंटलेस) संशोधन होऊ नये.
२) संशोधनाच्या मुळाशी मूलाधार (ओरिजनल सोर्स) हा असायलाच हवा.
३) संशोधनात अभिरुचीची अनेकता (प्ल्यूरॅलिटी) जपणे व तिचे संवर्धन व्हायला हवे.
४) आपले हे संशोधन विचारसाहचर्य (असोसिएशन ऑफ आयडियाज) जपणारे असावे.
५) मराठीच्या या सांप्रत संशोधनातून मताभिनिवेशाचा (डॉग्मॅटिक) दर्प न येता मूल्यविधानाची (व्हॅल्यू जजमेन्ट) अनुभूती यायला हवी.
६) भाषिक विश्लेषण (व्हर्बल अॅनालिसिस) म्हणून तसेच अधिकृतता (ऑथेन्टिसिटी) म्हणून मराठीच्या या संशोधनाची प्रत आणि किंमत सदोदित जपताच आली पाहिजे.
वर निर्देश केलेल्या सहा सूत्रांचा विचार करूनच आम्ही पावले टाकतो. परिश्रम, प्रतिभा आणि नावीन्य हे तीन परवलीचे शब्द मराठीच्या संशोधनात आम्ही शक्यतोवर नजरेआड होऊ देत नाही. इतरांनीही होऊ देऊ नये.


विद्यापीठातल्या पीएच. डी. प्रबंधांवर जेव्हा बारीक-सूक्ष्म नजर टाकतो, तेव्हा घागरभर पाण्यातून मला समाधान देऊ पाहणारे काही थेंबच हाताशी लागतात, पण ही बाब खंतावणारी नाही. कारण, हे माझे म्हणणे नकारघंटेचे नसून वास्तवभेद सांगू पाहणारे आहे.
मी वर्षभरातील मागच्या प्रबंधविषयांवर या निमित्त दृष्टी टाकली, तेव्हा ‘मराठी गूढकथा’, ‘स्त्री नाट्यलेखक’, मराठी कादंबरीतील धरणग्रस्त-भूकंपग्रस्त यांचे चित्रण, ‘जाहिरातलेखन’, अथवा ‘मराठी सामाजिक नाटकातील वैद्यकीय वास्तव’, ‘मराठी साहित्यातील तमाशा कलावंतांचे चित्रण’, ‘दि. बा. मोकाशी’ किंवा ‘सुबोध जावडेकर’ यांच्या निराळ्या विषयावर संशोधन झालेले पाहायला मिळाले. ‘कविता-रती’, ‘विचारशलाका’ यांसारख्या वाङ‌्मय आणि विचार परंपरा सशक्त चालविणाऱ्या अनियतकालिकांवरही संशोधन झाले आहे. इतकेच नव्हे तर दलित - आदिवासी - ग्रामीण - महानगरी आणि विविध नवप्रवाहांच्या मौलिक साहित्यावर, चळवळींवर संशोधन झालेले आहे. काही नवे संशोधन सुरू आहे. भालचंद्र नेमाडेंच्या कादंबरी, कविता, समीक्षा, मुलाखती (‘हिंदू’ या नेमाडेकृत बृहत कादंबरीवर विनायक येवले नावाच्या विद्यार्थ्याचे संशोधन दखलपात्र ठरावे!) यांचा धांडोळा घेणारे संशोधन विद्यार्थी करत आहेत. याचबरोबर विज्ञान साहित्यावर मौलिक संशोधन झाले आहे. भविष्यात अलक्षित अशा बाल-कुमार साहित्य, बोलीवाङ‌्मय, अनुवादित साहित्य, आजची उत्तम मराठी दूरदर्शन मालिका आणि मराठी किंवा मराठी आणि दादा कोंडके ते नागराज मंजुळे किंवा जगदिश खेबुडकर ते गुरू ठाकुर या संबंधाने नवे संशोधन मराठीत करता येईल का, याविषयी मंथन व त्यासंबंधीची चाचपणी आम्ही करत आहोत.
भाषाविज्ञान, वाङ‌्मयेतिहास, साहित्यसिद्धांत, व्याकरण-रचना, मराठी छंद, वारकरी आणि महानुभाव साहित्य अथवा चळवळींचे साहित्य उदा. आदिवासी साहित्यातील आत्मकथने, मराठवाड्यातील सण-उत्सवांतील गाणी, वामनदादांची गाणी, महात्मा बसवेश्वरांचे वाङ‌्मय, आंबेडकरी विचारप्रवाह किंवा मराठी कादंबरीतील शेतमजुरांचे चित्रण, संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, तौलनिक साहित्य : मराठी आणि इतर भाषा, वारकरी वाङ‌्मयातील लौकिक जीवन, मराठी कादंबऱ्या आणि समस्याप्रधानता, मराठी वैचारिक साहित्य आणि भटक्या-विमुक्तांचे चित्रण आदी. हे तर मराठीच्या संशोधनात ‘मध्यवर्ती’ आहेच. पण त्यातील पुनरावृत्ती टाळून, एकच गोष्ट पुन:पुन्हा न मांडण्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. मराठी भाषा व इतिहास म्हणून आदिम (प्रिमिटिव्ह) विषययुक्त म्हणून उत्खनन व उत्कर्ष हा तर सतत मांडला जावाच, पण याशिवाय ‘नवे’, ‘आव्हानात्मक’ आणि मराठीजागर बुलंद करणारे पण संशोधन व्हावे, हा ध्यास आम्ही जपू पाहात आहोत.
(रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
इ-मेल - keshavdeshmukh74@gmail.com
----
स्लग : शोध मराठीचा
-------------------
बायलाइन : प्रा. डॉ. महेंद्र पगारे
-------------------
हेडिंंग : भाषा विकास हेच ध्येय
------------------
ब्लर्ब : मराठी भाषा आणि साहित्याचा अभ्यास हा निव्वळ चाकोरीबद्ध राहू नये, तर तो विश्वात्मक पातळीवर प्रसरण पावणारा असला पाहिजे. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे, आमचा ‘मुख्य दरवाजा’ हा मराठी भाषेचा असला पाहिजे, परंतु त्याबरोबरच विविध भाषांच्या खिडक्यादेखील आमच्या साहित्य संशोधनाला असल्या पाहिजेत...
------------------
जळगाव, धुळे व नंदुरबार या एकूण तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यकक्षेत अहिराणी ही प्रमुख बोली बोलली जाते. त्यामुळेच अहिराणी बोली व अहिराणी साहित्याच्या अनुषंगाने महाविद्यालय व विद्यापीठीय स्तरावर लक्षवेधी काम झालेले आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयपत्रिकेच्या शीर्षकासाठी ‘संशोधन प्रकल्प’ दिला जातो. या संशोधन प्रकल्पाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना आपल्या ग्रांथिक क्षेत्रापुरते मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांशी सर्वेक्षणदृष्ट्या व संदर्भ नोंदवण्याच्या दृष्टीने जोडून घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. सर्वेक्षण कसे करावे? संदर्भ कसे नोंदवावेत? यासह संशोधनाच्या निष्कर्षाप्रत पोहोचण्यासाठी संशोधन कसे करावे, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले जाते. संशोधन काटेकोरपणे व्हावे, म्हणून स्वतंत्रपणे संशोधनपद्धती हा एक पेपरच अभ्यासक्रमासाठी निश्चित करण्यात आला आहे.
मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषा आणि साहित्याचा अभ्यास हा निव्वळ चाकोरीबद्ध राहू नये, तर तो विश्वात्मक पातळीवर प्रसरण पावणारा असला पाहिजे. इंग्रजी, हिंदी, उर्दू, संस्कृत, पारशी, अरबी, जर्मनी अशा अनेक भाषांसोबत व साहित्यासोबत तुलना होत चांगल्या गोष्टींचे आदान-प्रदान करीत मराठी भाषेची समृद्धी अधिकाधिक भक्कम झाली पाहिजे. कुसुमाग्रजांनी म्हटल्याप्रमाणे, आमचा ‘मुख्य दरवाजा’ हा मराठी भाषेचा असला पाहिजे, परंतु त्याबरोबरच विविध भाषांच्या खिडक्यादेखील आमच्या साहित्य संशोधनाला असल्या पाहिजेत. कारण त्यामुळे हवा खेळती राहते. ज्ञान, विवेक, संस्कार आणि संस्कृती यांचे सक्षम आदान-प्रदान होते. या आदान-प्रदानातून मराठी भाषेचा आणि साहित्याचा खूप चांगला विकास होऊ शकतो. अशा व्यापक पटलावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठी विभाग संशोधनाची विकसनशील भूमिका रुजवण्याचा प्रयत्न करीत आहे.
उ. महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘भिलोरी लोकगीतांचा अभ्यास’, ‘आदिवासी लोकसाहित्याचा अभ्यास’, ‘मावची’, ‘गावीत', ‘पावरा’ इ. भाषांचा अभ्यास, ‘लोकसाहित्याचे स्वरूप’, ‘लोकसाहित्यातील लोकतत्त्वे’, ‘समाजभाषेचे स्वरूप’, ‘ग्रामीण साहित्याचे स्वरूप’, ‘ग्रामीण-दलित साहित्याची तुलना’, ‘दलित साहित्याची प्रेरणा’, ‘ग्रामीण साहित्याची प्रेरणा’, ‘दलित-आदिवासी साहित्याची प्रेरणा’, ‘दलित साहित्यविषयक चळवळी’, ‘दलित कार्यकर्त्यांच्या चळवळी’, ‘आदिवासी अभ्यासकांच्या मुलाखती’, ‘ग्रामीण लेखकांची माहिती’, ‘नाट्यविषयक चळवळ’, ‘प्रायोगिक नाटक रंगभूमी’, ‘व्यावसायिक रंगभूमीचे स्वरूप’, ‘प्रबोधनाची चळवळ’, ‘महात्मा फुलेंच्या साहित्याचा अभ्यास’, ‘सार्वजनिक सत्य धर्माचे स्वरूप’, ‘आंबेडकरी जलसे’, ‘इहवादाचे स्वरूप’, ‘तमाशा’, ‘वगनाट्य’, ‘लळीत’ इत्यादीचे स्वरूप, ‘संतांच्या साहित्यातील सामाजिकता’, ‘शाहिरांच्या काव्यातील सौंदर्यानुभव’, ‘तुकाराम व कबीर यांच्या कवितेतील साधर्म्य-वैधर्म्य’ अशा अनेक विषयांवर संशोधन करण्यास प्राधान्य दिले आहे.
(संचालक व मराठी विभाग प्रमुख, भाषा अभ्यास प्रशाला व संशोधन केंद्र, जळगाव)
इ-मेल : dr.mspagare@gmail.com
---------------
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : डॉ. मनोज तायडे
-------------------
वऱ्हाडी खाक्या
------------------
ब्लर्ब : राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ठेवलेल्या प्रस्तावानुसार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाने व­ऱ्हाडी भाषेचा शब्दकोश तयार करण्याचे आव्हान स्वीकारले. या प्रकल्पाची फलश्रुती म्हणजे, त्यातून ‘वऱ्हाडी शब्दकोश’, ‘वऱ्हाडी म्हणींचा कोश’ आणि ‘वऱ्हाडी वाक्प्रचार कोश’ असे तीन स्वतंत्र कोश तयार झाले. ..
------------------
बदलत्या काळानुरूप आदिवासी संस्कृतीवर शहरीकरणाचे आक्रमण होत आहे. त्यातली कोरकू संस्कृतीसुद्धा आक्रमणाच्या विळख्यात आहे. तिचे मूळ रूप हरवत चालले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाने डॉ. मनोज तायडे यांचा ‘मेळघाटातील कोरकू आदिवासींची भाषा, त्यांचे साहित्य व संस्कृती’ जतन करण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प मंजूर केला. प्रकल्पांतर्गत कोरकू जनजीवनाचा (अचलपूर येथील स्व. मूलजीभाई कढी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. काशिनाथ बहाटे यांनी डॉ. मधुकर वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरकू भाषेचा भाषावैज्ञानिक अभ्यास केला. हे संशोधन एवढे मूलगामी आहे की, डॉ. गणेश देवी यांच्यासारख्या भाषावैज्ञानिकाने त्याची दखल घेतली आहे.) जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास चित्रित करून रीती-रिवाज, घटना-प्रसंग यांचे विश्लेषण करून अभिलेख जतन करून ठेवला आहे.
विभागातर्फे दुसरा पूर्ण झालेला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे, ‘वऱ्हाडी बोलीचा शब्दकोश’. या प्रकल्पात सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी-लेखक डॉ. विठ्ठल वाघ यांनी मुख्य संशोधकाचे कार्य स्वीकारले. या कामी संशोधकांनी अमरावती विभागातील पाच आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा पिंजून काढला. ‘शब्दयात्रा’ हा उपक्रम राबवून खेड्यापाड्यातील शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून, बायाबापड्यांकडून, शेतकरी-शेतमजुरांकडून शब्द गोळा केले. डॉ. वाघांनी त्याचे वर्गीकरण केले. अर्थ लिहिले. या प्रकल्पाची फलश्रुती म्हणजे, त्यातून ‘वऱ्हाडी शब्दकोश’, ‘वऱ्हाडी म्हणींचा कोश’ आणि ‘वऱ्हाडी वाक्प्रचार कोश’ असे तीन स्वतंत्र कोश तयार झाले. हे तिन्ही कोश महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडे प्रकाशनार्थ देण्यात आले.
संशोधनाच्या नव्या दिशा धुंडाळणे ही विद्यापीठातल्या संशोधकांची सहज प्रवृत्ती ठरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून     मेळघाटातील कोरकू लोकसंस्कृतीचा शोध घेणारा ‘कोरकू लोकगीतांचे संकलन आणि लिप्यंकन’ (डॉ. सुखदेव ढाकणे), ‘मराठी विज्ञान कथात्म साहित्य आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम’ आणि ‘अनुवादित मराठी विज्ञान कथात्म साहित्य आणि त्याचा मराठी कथात्म साहित्यावर होणारा प्रभाव’ (डॉ. मोना चिमोटे) असे दोन प्रकल्प पूर्ण करताना मूळ मराठीतून निर्माण झालेले विज्ञानसाहित्य आणि मराठीत अनुवाद झालेले विज्ञानसाहित्य या दोन्ही प्रकाराचा अभ्यास मांडला गेला. याशिवाय ‘अर्वाचीन मराठीतील काव्यविचार’ (डॉ. हेमंत खडके) हा विद्यापीठ अनुदान आयोगाने साहाय्य केलेला प्रकल्प पूर्ण करून साहित्य-सौंदर्यशास्त्र विचारात मोलाची भर घातली गेली. कृषीतील अनेक संकल्पना आज कालबाह्य ठरत आहेत. यांत्रिकीकरणामुळे कित्येक अवजारे आज तयारही होत नाहीत. अशा प्रसंगी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने ‘कृषी साधनांचा कोश’ आणि ‘महाराष्ट्रातील शेती व्यवसाय संकल्पना कोश’ (डॉ. माधव पुटवाड) असे दोन कोश तयार केले.
अलीकडील काळात डॉ. पंकज वानखडे यांनी ‘संत गाडगेबाबा यांचे जीवन व कार्य' या संदर्भात प्रकाशित झालेल्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ डॉ. राजेंद्र मुंढे यांनी ‘उत्तम कांबळे यांच्या समग्र साहित्याचा चिकित्सक अभ्यास’, डॉ. शीला लोखंडे यांनी ‘तुकारामांच्या काव्याची स्वातंत्र्योत्तर समीक्षा’ या विषयावर संशोधन करून आचार्य पदवी प्राप्त केली आहे.    सध्या विभागात लोककला व लोककलावंत यांच्या माहितीचे संकलन व संशोधन करणारा प्रकल्प सुरू आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाकरिता हे कार्य डॉ. प्रणव कोलते आणि डॉ. काशीनाथ बहाटे, डॉ. टी. एस. राठोड, डॉ. सीमा साठे, डॉ. चंदू पाखरे, प्रा. अतुल सारडे, डॉ. श्रीकृष्ण काकडे, डॉ. रावसाहेब काळे हे त्यांचे सहकारी करत आहेत.
-----------------------
(मराठी विभागप्रमुख, पदव्युत्तर मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती)
इमेल- manojtayade1563@gmail.com
-----------
शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : प्रा. डॉ. सतीश बडवे
-------------------
हेडिंधुनिक विचारधारेशी सुसंगत संशोधन
------------------
ब्लर्ब : ग्रंथपरीक्षण, लेखनतंत्र, कथालेखन तंत्र या स्वरूपाच्या कार्यशाळा विद्यापीठात आयोजित केल्या जातात. अलीकडे राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने ही कार्यशाळा घेतली गेली. मॉरिशसहून महात्मा गांधी इन्स्टिट्यूटचे डॉ. बिद्दन अब्बा यांचे व्याख्यानही दूरवरचा मराठी संबंध कसा असतो, याचे दर्शन घडविणारा ठरला.
------------------
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ‌्मय विभागाची पूर्वपरंपरा नि:संशय अध्यापन आणि संशोधनाशी निगडित आहे. त्यामुळे समीक्षा, संतसाहित्य, आधुनिक वाङ‌्मयीन प्रवाह, लोकसाहित्य, भाषाविज्ञान वाङ‌्मयेतिहास अशा अनेकविध क्षेत्रांमध्ये संशोधन करण्याचे प्रयत्न प्रारंभापासूनच आढळतात. अलीकडच्या काळात कालसुसंगत अशा भाषिक कौशल्य व सर्जनशील लेखनाचा विभागाच्या अभ्यासक्रमात समावेश केला गेला. याचबरोबर मराठवाड्यातील साहित्य, ग्रामीण-दलित स्त्रीवादी-आदिवासी यांच्या वाङ‌्मयीन चळवळी, साहित्याचे माध्यमांतर अशा आधुनिक विचारधारेला अभ्यासक्रमात स्थान दिले गेले आहे. तौलनिक साहित्याभ्यास, अनुवाद, मराठी लेखन, व्यावहारिक व उपयोजित मराठी, भारतीय संविधान, संशोधनाची तोंडओळख असे पूरक विषयही मराठीच्या अभ्यासक्रमात आले. स्पर्धा परीक्षा (एम.पी.एस.सी./ यू.पी.एस.सी.) नेट, सेट, पेट यांसारख्या पात्रता परीक्षांना उपयुक्त ठरतील, अशा आशयविषयाचा समावेशही त्यात अंतर्भूत करण्यात आला आहे. जीवनजाणिवा आणि वाङ‌्मयीन जाणिवा विकसित होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची आखणी केली गेली आहे. अभ्यासक्रमाच्या या पायाभरणीतून तयार झालेला विद्यार्थी जेव्हा संशोधनाच्या क्षेत्रात उतरतो, तेव्हा भाषेचे व साहित्याचे सूक्ष्म विश्लेषण करू शकतो, असा दृष्टिकोन या पाठीमागे आहे.
सद्य:स्थितीत मराठी भाषा व वाङ‌्मय विभागात अनेकविध विषयांवर संशोधन चालू आहे. हे संशोधन केवळ ललित वाङ‌्मय प्रकारांशी निगडित न ठेवता, भाषेशी संबंधित असणारे विषयही या संशोधनकार्यात अंतर्भूत आहेत. त्यातही ललित साहित्य, वाङ‌्मय प्रकार, लोकसाहित्य या संदर्भातील विषय अभ्यासकांनी निवडले तरी त्यातही भाषिक अंगाने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जातो. अलीकडच्या काळात संशोधनासाठी जे विषय आहेत, ते असे ः साठोत्तरी नाटकातील भिन्न प्रवाह, मराठी कथेतील स्थित्यंतर व प्रयोगशीलता, महानुभाव व वारकरी यांचे रचनाप्रकार, कादंबरीचे निवेदन तंत्र, संतसाहित्यातील कृषी व पर्यावरणविषयक जाणिवा, नियतकालिकांची वाङ‌्मयीन कामगिरी, काव्यसमीक्षा, साहित्यकृतींचे माध्यमांतर, लोकगीतांचा समाजभाषा विज्ञानाच्या अंगाने अभ्यास, कादंबरीचा रूपबंध, म्हणी-उखाणे-वाक्प्रचार यांतून घडणारे लोकजीवनदर्शन, मराठी-हिंदीमधील दलित स्त्री आत्मकथने, मराठीतील (निवडक) वैचारिक लेखन, वाचनाभिरुची, आदिवासींच्या बोली, भटक्या विमुक्तांच्या बोली, विज्ञानसाहित्य, बालसाहित्य या विषयांवर संशोधन केले जात आहे. यातील काही विषयांवर संशोधन प्रबंध सिद्ध झाले आहेत.
संशोधनासाठी जे विषय निवडले गेले आहेत, ते वाङ‌्मयीन प्रवाहांशी, वैचारिक लेखनाशी, वाङ‌्मयप्रकार व प्रवाहांच्या समीक्षेशी, संतसाहित्यातील अलक्षित राहिलेल्या विषयांशी, लोकसाहित्यातील शाब्दआविष्काराशी, बोली अभ्यासाशी, तौलनिक दिशेशी, स्थित्यंतरे व प्रयोगशीलतेशी निगडित आहेत. मराठी साहित्य व भाषेशी संबंधित असणारे येथील विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या पिचलेले असतात. अभावग्रस्त वातावरणातून ते येतात. परंतु आनंदाची बाब म्हणजे, अलीकडच्या काळात सातपुड्याच्या परिसरात राहणारे आदिवासी विद्यार्थीही विभागात संशोधन करत आहेत. त्यांची बोली भिन्न आहे. तेही त्यांच्या बोलीची परंपरा, इतिहास, त्यांचे बोलीवाङ‌्मय यावर संशोधन करत आहेत.
प्रा. डॉ. सतीश बडवे
(मराठी भाषा व वाङ‌्मय विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
इमेल - dr.satishbadwe@gmail.com
-----
स्लग : शोध मराठीचा...
-------------------
बायलाइन : डॉ. शैलेंद्र लेंडे
-------------------
हेडिग : नवसाहित्यप्रवाहकेंद्री संशोधन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विषयातील प्रामुख्याने महानगरांच्या केंद्रापलीकडील साहित्यव्यवहारासंबंधांतील संशोधनामुळे मराठी भाषा व साहित्याच्या संबंधात एक प्रकारची जागरुकता व जाज्वल्यता आकारास आलेली आहे...
------------------
भाषाव्यवहार हा जीवनाच्या विविध पातळ्यांवरून चालणारा व जीवनाला सर्व अंगांनी व्यापून टाकणारा व्यवहार असतो. कोणताही भाषिक समाज त्यांच्या भाषेतून केवळ लोकव्यवहार व समाजव्यवहार करीत नाही, तर तो त्या भाषेतून ज्ञानव्यवहार व बौद्धिक व्यवहारही करीत असतो. त्यामुळे कोणत्याही भाषेचा विचार करताना भाषेच्या संबंधात सुरू असलेल्या तत्संबंधित विविधांगी क्रिया-प्रक्रियांचा, तसेच त्यातील ज्ञानात्मकतेचा विचार करणे आवश्यक ठरते. मराठी भाषेचाही विचार याच प्रकारच्या ज्ञानव्यवहारात्मक दृष्टीतून करणे गरजेचे ठरते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विषयातील प्रामुख्याने महानगरांच्या केंद्रापलीकडील साहित्यव्यवहारासंबंधांतील संशोधनामुळे मराठी भाषा व साहित्याच्या संबंधात एक प्रकारची जागरुकता व जाज्वल्यता आकारास आलेली आहे. विशेषतः ग्रामीण, दलित, आंबेडकरवादी, आदिवासी व स्त्रीनिर्मित साहित्यप्रवाहांतील साहित्य व साहित्यिकांसंबंधी आस्थेवाईक आकलन पुढे येत आहे. साहित्य आणि समाजवास्तव, साहित्य आणि सामाजिक भान आणि साहित्यातून होणारे सामाजिक अभिसरणदेखील या संशोधनातून पुढे येत आहे.
सद्यःस्थितीत सुरू असलेल्या मराठीतील संशोधनाला विषयवैविध्याचे व लेखनाविष्काराचे विवक्षित स्वरूपाचे मूल्य आहे. मात्र अलीकडे विशेषतः संशोधनाच्या गुणात्मकतेच्या संबंधात विविध प्रकारच्या समस्यादेखील निर्माण झालेल्या आहेत. या समस्या विद्यार्थ्यांशी संबंधी, विभागातील अपुऱ्या मनुष्यबळासंबंधी, विद्यार्थ्यांच्या संशोधनदृष्टीसंबंधी, संशोधनाच्या साधनसामग्रीविषयी, संशोधनाच्या अभ्यासपद्धतीसंबंधी, संशोधकांच्या पुनरावलोकनासंबंधी, एकूण संशोधनप्रक्रियेसंबंधी, संशोधनातील एकंदर ज्ञानव्यवहारासंबंधी, संशोधकांच्या रोजगारासंबंधी, संशोधकांच्या भवितव्यासंबंधी तसेच संशोधनाच्या मौलिकतेसंबंधी, अशा विविधांगी स्वरूपाच्या आहेत. या विविध पातळ्यांवरील संशोधनविषयक समस्यांवर सकारात्मक उपाययोजना करता आली व सामूहिकपणे मात करता आली, तर भाषा व साहित्यविषयक संशोधनाला तसेच समग्र मानव्यविद्या शाखेतील संशोधनाला मौलिकता मिळू शकेल. अंतिमतः समग्र ज्ञानव्यवहार खऱ्या अर्थाने अधिक समृद्ध व अधिक सकस आणि अधिक अर्थपूर्ण होऊ शकेल.
संशोधनाचा भर कविता आणि कादंबऱ्यांवर...
सद्यःस्थितीत कविता आणि कादंबरी हे दोन ठळकसंशोधनविषय आहेत. जागतिकीकरणाचा मराठी कवितेवर पडलेला प्रभाव, तसेच देशीवादाचा मराठी कादंबरीवर पडलेला प्रभाव, या विषयावर विभागात संशोधनकार्य सुरू आहे. त्याचबरोबर नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, शरणकुमार लिंबाळे, भुजंग मेश्राम, महादेव मोरे, सदानंद देशमुख, योगेंद्र मेश्राम, उर्मिला पवार या साहित्यिकांच्या साहित्यावर लेखकनिष्ठ संशोधनकार्य विभागामध्ये सुरू आहे. संत तुकाराम आणि संत कबीर यांच्या साहित्यातील प्रबोधनपरतेचाही तुलनात्मक अभ्यास विभागात सुरू आहे. युजीसीच्या कनिष्ठ संशोधन छात्रवृत्ती व मनोहर सप्रे यांच्या साहित्यावर संशोधनकार्य सुरू आहे. विद्यापीठाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संशोधन छात्रवृत्ती या दोन्ही छात्रवृत्तींच्या अंतर्गत आदिवासी कविता, अर्वाचीन संत कविता व समकालीन कथा-कादंबरी यांच्या संबंधात विशेषत्वाने संशोधन सुरू आहे. या संशोधनामध्ये विनायक तुमराम, ह. मो. मराठे, मनोहर सप्रे या लेखकांवरील संशोधनाचा समावेश आहे. सद्यःस्थितीमध्ये मराठी विभागाच्या संशोधनकेंद्रामध्ये जवळपास १०० संशोधनकर्ते विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. संशोधनकर्त्यांमध्ये विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. इ.स. २००० ते २०१० या कालखंडात नागपूर विद्यापीठामध्ये मराठी विषयात पीएच. डी. करण्यासाठी एकूण ५२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे दिसून येते. इ.स. २०११ ते २०१५ या काळातील नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्यादेखील मोठीच आहे.
( प्राध्यापक व मराठी विभागप्रमुख, रा. तु. म. नागपूर विद्यापीठ, नागपूर )
इमेल - shailendra.rtmnu@gmail.com
-------------------

मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाला भाषा व साहित्य संशोधनाची ८० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. प्राचीन साहित्याच्या संशोधनापासून ते आधुनिक, उत्तरआधुनिक साहित्याच्या अभ्यासापर्यंत संशोधनाची विविधता त्यात आहे. कथनमीमांसा, संरचनावाद, स्त्रीवाद, मानसशास्त्रीय;…
divyamarathi.bhaskar.com

अनुवादाच्या निमित्ताने शब्दगंध अनुभवला - मिलिंद चंपानेरकर, दै. दिव्य मराठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रसिद्ध झालेली मुलाखत - समीर परांजपे



लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या अनुवादित पुस्तकाबद्दल साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा 2016 सालचा पुरस्कार मिळालेले लेखक मिलिंद चंपानेरकर यांची मी घेतलेली मुलाखत दि. 27 फेब्रुवारी 2017 रोजीच्या दै. दिव्य मराठीच्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे. त्याची ही जेपीजी फाइल व वेबपेज लिंक सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/27022017/0/4/
-----
अनुवादाच्या निमित्ताने शब्दगंध अनुभवला
--
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला २०१६चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळाला आहे. सईद अख्तर मिर्झा यांच्या `अम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर' या मुळ पुस्तकाचा 'लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ हा मिलिंद चंपानेरकर यांनी मराठीत केलेला अनुवाद खूपच गाजला. वाचकप्रिय झाला. या पुस्तकाचा अनुवाद करताना मिलिंद चंपानेरकर यांनी आपल्या मनात एक निश्चित भूमिका ठरविली होती. त्याची उकल त्यांच्या या मुलाखतीत झाली आहे.
प्रश्न - या पुस्तकाच्या अनुवादामागील नेमक्या प्रेरणा काय होत्या? अनुवादक-लेखक म्हणून सईद मिर्झाच्या मुळ पुस्तकातल्या कोणत्या घटकाने तुमच्यातल्या अनुवादकाला आव्हान दिले होते?
मिलिंद चंपानेरकर - ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ ही प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सईद मिर्झा यांची पहिलीच इंग्रजी साहित्यकृती. हे पुस्तक अनुवािदत करण्याआधी मी ए. आर. रेहमान याच्या एका पुस्तकाचा अनुवाद केला होता. त्याशिवाय मी काही अनुवादित पुस्तकांचे संपादनही केले होते. मात्र सईद मिर्झा यांचे पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक मराठीत अनुवादित करायलाच पाहिजे अशी प्रेरणा मिळाली. त्यातून त्या पुस्तकाचे `लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र' हा अनुवाद मी सिद्ध केला. सईद मिर्झा यांचे हे पुस्तक रुढार्थाने आत्मचरित्र नाही. त्या पुस्तकाचे नेमके स्वरुप काय हेच चिमटीत पकडता येत नाही. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे. मी कॉलेजमध्ये असताना ‘द ग्रेप्स ऑफ राॅथ’ (Grapes of Wrath) ही जॉन स्टाइनबेक यांनी लिहिलेली इंग्रजी कादंबरी वाचनात आली होती. त्या कादंबरीने मी झपाटून गेलो होतो. त्यानंतर ३० वर्षांनी सईद मिर्झा यांचे पुस्तक वाचून असाच झपाटून गेलो. हे पुस्तक मराठीत अनुवादित करायचेच हे मी मनाने घेतले. मिर्झा यांच्या पुस्तकाचा मी केलेला अनुवाद २०११ साली प्रसिद्ध झाला. त्या पुस्तकावर विविध वयोगटातल्या वाचकांच्या प्रतिक्रिया येत राहिल्या. स्त्रीवाचकांनी दिलेला प्रतिसाद तर मोठा होता. ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या घटना येतात. १९३०च्या दशकातीलही वर्णनापासून ते समकालीन २००२च्या घटनांपर्यंत या पुस्तकात भाष्य केलेले आहे. आपण आईस पत्र लिहितो तेव्हा त्यात मार्दव असते. अनेक राजकीय-सामाजिक घटना वा भाष्य कितीही कटू असले, तरी एखादा आपल्या आईला त्याबाबत मार्दवानेच सांगतो – हीच कल्पना डोक्यात ठेवून लेखकाने अनेक गोष्टींचा उहापोह करण्यासाठी खास दीर्घपत्राच्या आकृतिबंधाची योजना केली आहे..जेणेकरून अत्यंत क्लिष्ट व कटू गोष्टींबाबत आईशी आणि पर्यायाने वाचकांशी मार्दवाने संवाद साधला जावा. या पुस्तकात दोन पात्रे कल्पिलेली असून सईद मिर्झा यांनी या पात्रांवर आपल्या आईवडिलांचे आरोपण केलेले आहे. पुस्तकाची लेखनशैली आईला दीर्घपत्र लिहिण्याची असून त्यामुळे त्यातील भाषेत अत्यंत मार्दव आहे. हे पुस्तक भाषांतरित करताना त्यातील मार्दव मराठीतही तसेच यावे म्हणून मी खूप काळजीपूर्वक शब्दांची निवड केली आहे आणि वाक्य रचनाही तो परिणाम साधला जाईल दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रश्न - `लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र' हे पुस्तक पुरोगामीत्व, शास्त्रीय दृष्टीकोन आणि सेक्युलॅरिझम हा सहज स्थायीभाव असलेल्या एका आईची, तिच्या कुटुंबाची गोष्ट आहे. या गोष्टीला वैश्विक मुल्य आहे, ते अनुवादातून पुढे आणताना आपण वावरतो त्या आसपासच्या समाजाशी मनातल्या मनात तुलना होत गेली का? त्यातून जे हाती लागले ते काय होते?
मिलिंद चंपानेरकर - ग्रामीण बोलीभाषांमध्ये मार्दव असते. प्रमाण मराठी भाषा एेकताना, बोलताना एकप्रकारची करकर जाणवते. या भाषेत शब्दांची गोलाई खूप कमी असते. लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या पुस्तकाचा अनुवाद करताना असे गोलाई असलेले शब्द आवर्जून निवडले व वापरले आहेत. सईद मिर्झाच्या मुळ इंग्रजी पुस्तकातील मार्दव मराठीत उतरावे यासाठी प्रयत्न करताना या अनुवादाचे पाच-पाच मसुदे तयार झाले. मु‌ळ पुस्तकात उर्दू-पश्तू अशा भाषांतलेही शब्द होते. त्यांचे नेमके अर्थ मित्रांच्या मदतीने जाणून घेतले. या शब्दांचा जो शिडकावा मुळ कलाकृतीत आहे ते सौंदर्य अनुवादातही टिकवून ठेवण्यासाठी मी खास परिश्रम घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मियांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. विस्मृतीत गेलेल्या वा दडपल्या गेलेल्या सांस्कृतिक ‘अवशेषां’चा सूक्ष्मतेने मागोवा घेता घेता ते समकालीन घटनांचीही चर्चा साधतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात. भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणाऱ्या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं! त्यामुळे ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र’ ही व्यापक जनजीवनाच्या अनेक पैलूंच्या दर्शनाद्वारे वाचकाला अलगद हिंदोळे देत आगळा मानसिक प्रवास घडवणारी एक आगळीच साहित्यकृती ठरते.
लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या अनुवादित पुस्तकाबद्दल साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा 2016 सालचा पुरस्कार मिळालेले लेखक मिलिंद चंपानेरकर यांची मी घेतलेली मुलाखत दि. 27 फेब्रुवारी 2017 रोजीच्या दै. दिव्य मराठीच्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे. त्याची ही जेपीजी फाइल.अनुवादाच्या निमित्ताने शब्दगंध अनुभवला--- समीर परांजपेparanjapesamir@gmail.com---व्यापक जनजीवनाचे घडले दर्शन--लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या मिलिंद चंपानेरकर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाला २०१६चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार मिळाला आहे. सईद अख्तर मिर्झा यांच्या `अम्मी : लेटर टु अ डेमोक्रॅटिक मदर' या मुळ पुस्तकाचा 'लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ हा मिलिंद चंपानेरकर यांनी मराठीत केलेला अनुवाद खूपच गाजला. वाचकप्रिय झाला. या पुस्तकाचा अनुवाद करताना मिलिंद चंपानेरकर यांनी आपल्या मनात एक निश्चित भूमिका ठरविली होती. त्याची उकल त्यांच्या या मुलाखतीत झाली आहे.प्रश्न - या पुस्तकाच्या अनुवादामागील नेमक्या प्रेरणा काय होत्या? अनुवादक-लेखक म्हणून सईद मिर्झाच्या मुळ पुस्तकातल्या कोणत्या घटकाने तुमच्यातल्या अनुवादकाला आव्हान दिले होते?मिलिंद चंपानेरकर - ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ ही प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सईद मिर्झा यांची पहिलीच इंग्रजी साहित्यकृती. हे पुस्तक अनुवािदत करण्याआधी मी ए. आर. रेहमान याच्या एका पुस्तकाचा अनुवाद केला होता. त्याशिवाय मी काही अनुवादित पुस्तकांचे संपादनही केले होते. मात्र सईद मिर्झा यांचे पुस्तक वाचल्यानंतर ते पुस्तक मराठीत अनुवादित करायलाच पाहिजे अशी प्रेरणा मिळाली. त्यातून त्या पुस्तकाचे `लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र' हा अनुवाद मी सिद्ध केला. सईद मिर्झा यांचे हे पुस्तक रुढार्थाने आत्मचरित्र नाही. त्या पुस्तकाचे नेमके स्वरुप काय हेच चिमटीत पकडता येत नाही. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे. मी कॉलेजमध्ये असताना ‘द ग्रेप्स ऑफ राॅथ’ (Grapes of Wrath) ही जॉन स्टाइनबेक यांनी लिहिलेली इंग्रजी कादंबरी वाचनात आली होती. त्या कादंबरीने मी झपाटून गेलो होतो. त्यानंतर ३० वर्षांनी सईद मिर्झा यांचे पुस्तक वाचून असाच झपाटून गेलो. हे पुस्तक मराठीत अनुवादित करायचेच हे मी मनाने घेतले. मिर्झा यांच्या पुस्तकाचा मी केलेला अनुवाद २०११ साली प्रसिद्ध झाला. त्या पुस्तकावर विविध वयोगटातल्या वाचकांच्या प्रतिक्रिया येत राहिल्या. स्त्रीवाचकांनी दिलेला प्रतिसाद तर मोठा होता. ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या घटना येतात. १९३०च्या दशकातीलही वर्णनापासून ते समकालीन २००२च्या घटनांपर्यंत या पुस्तकात भाष्य केलेले आहे. आपण आईस पत्र लिहितो तेव्हा त्यात मार्दव असते. अनेक राजकीय-सामाजिक घटना वा भाष्य कितीही कटू असले, तरी एखादा आपल्या आईला त्याबाबत मार्दवानेच सांगतो – हीच कल्पना डोक्यात ठेवून लेखकाने अनेक गोष्टींचा उहापोह करण्यासाठी खास दीर्घपत्राच्या आकृतिबंधाची योजना केली आहे..जेणेकरून अत्यंत क्लिष्ट व कटू गोष्टींबाबत आईशी आणि पर्यायाने वाचकांशी मार्दवाने संवाद साधला जावा. या पुस्तकात दोन पात्रे कल्पिलेली असून सईद मिर्झा यांनी या पात्रांवर आपल्या आईवडिलांचे आरोपण केलेले आहे. पुस्तकाची लेखनशैली आईला दीर्घपत्र लिहिण्याची असून त्यामुळे त्यातील भाषेत अत्यंत मार्दव आहे. हे पुस्तक भाषांतरित करताना त्यातील मार्दव मराठीतही तसेच यावे म्हणून मी खूप काळजीपूर्वक शब्दांची निवड केली आहे आणि वाक्य रचनाही तो परिणाम साधला जाईल दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला आहे.प्रश्न - `लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र' हे पुस्तक पुरोगामीत्व, शास्त्रीय दृष्टीकोन आणि सेक्युलॅरिझम हा सहज स्थायीभाव असलेल्या एका आईची, तिच्या कुटुंबाची गोष्ट आहे. या गोष्टीला वैश्विक मुल्य आहे, ते अनुवादातून पुढे आणताना आपण वावरतो त्या आसपासच्या समाजाशी मनातल्या मनात तुलना होत गेली का? त्यातून जे हाती लागले ते काय होते?मिलिंद चंपानेरकर - ग्रामीण बोलीभाषांमध्ये मार्दव असते. प्रमाण मराठी भाषा एेकताना, बोलताना एकप्रकारची करकर जाणवते. या भाषेत शब्दांची गोलाई खूप कमी असते. लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र या पुस्तकाचा अनुवाद करताना असे गोलाई असलेले शब्द आवर्जून निवडले व वापरले आहेत. सईद मिर्झाच्या मुळ इंग्रजी पुस्तकातील मार्दव मराठीत उतरावे यासाठी प्रयत्न करताना या अनुवादाचे पाच-पाच मसुदे तयार झाले. मु‌ळ पुस्तकात उर्दू-पश्तू अशा भाषांतलेही शब्द होते. त्यांचे नेमके अर्थ मित्रांच्या मदतीने जाणून घेतले. या शब्दांचा जो शिडकावा मुळ कलाकृतीत आहे ते सौंदर्य अनुवादातही टिकवून ठेवण्यासाठी मी खास परिश्रम घेतले आहेत. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मियांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. विस्मृतीत गेलेल्या वा दडपल्या गेलेल्या सांस्कृतिक ‘अवशेषां’चा सूक्ष्मतेने मागोवा घेता घेता ते समकालीन घटनांचीही चर्चा साधतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात. भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणाऱ्या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं! त्यामुळे ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र’ ही व्यापक जनजीवनाच्या अनेक पैलूंच्या दर्शनाद्वारे वाचकाला अलगद हिंदोळे देत आगळा मानसिक प्रवास घडवणारी एक आगळीच साहित्यकृती ठरते.प्रश्न - अनुवाद ही केवळ भाषेशी संबंधित प्रक्रिया नसते, तर या प्रक्रियेचा संबंध दोन समुहातले सौहार्द, सामंजस्य वृद्धिंगत करण्याशी असतो. अनुवादाने परस्परभिन्न संस्कृती परंपरांचे सेतू जुळतात. एक लेखक-अनुवादक म्हणून तुम्ही या प्रक्रियेकडे कसे पाहाता? अनुवादाच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षमतांबाबत काय निरीक्षण नोंदवाल विशेषत: आजच्या संदर्भात?मिलिंद चंपानेरकर - सईद मिर्झा हे चित्रपट दिग्दर्शक तसेच उत्तम पटकथाकार. मात्र हे पुस्तक लिहिताना त्यांनी एकच एक साचा स्वीकारलेला नाही. या पुस्तकात अफगाणिस्तान, बलुचिस्तानचे (क्वेट्टा) संदर्भ आहेत. त्या प्रांतातून १९३०च्या दशकात मिर्झा यांचे आईवडील मुंबईत आले. त्यावेळी त्यांनी मुंबईतील आधुनिकतेकडे कसे पाहिले असेल याचेही दर्शन पुस्तकातून होते. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरुप्रणित धर्मनिरपेक्षतेच्या वातावरणाने हा देश भारलेला होता. त्या वातावरणात या दोघांनी आणि त्यांच्यासारख्या अनेकविध धर्मांच्या लोकांनी या धर्म निरपेक्ष नाव-लोकशाही देशाकडे कसे पहिले, कशा अपेक्षा ठेवल्या आणि निष्ठेने अशा नव्या देशाची राज्य घटनेत अभिप्रेत असलेली मुली स्वीकारली त्याच सूक्ष्म कथन या पुस्तकातून प्रतीत होते. `लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र'मध्ये रुपकात्मक लेखनशैली मिर्झा यांनी वापरलेली आहे. सर्वच धर्मांच्या भावभावनांचे चित्रण त्यांनी केलेले आहे. स्वातंत्र्याआधी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या घटनांवर जसे या पुस्तकात भाष्य आहे तसेच बाबरी मशिद पडल्यानंतर त्या घटनेकडे कसे पाहिले गेले याचाही धांडोळा त्यात आहे. या साऱ्या घटनांची एकच एक सलग कथा नाही. काही ठिकाणी संवाद आहेत. काही ठिकाणी स्वगत. अशा विविध लेखनपद्धतीतून हे पुस्तक पुढे पुढे जात राहाते. मी मुळ पुस्तक किमान ११ वेळा वाचलेले असल्याने त्यातील हे सारे बारकावे आता नीटसपणे सांगू शकतो. नेहरुप्रणित सेक्युलॅरिझमच्या पलीकडच्याही सेक्युलॅरिझम यातून ध्वनित होतो, असे माझे मत आहे. सईद मिर्झा म्हणतात की, आपण आधुनिक झालो आहोत काय ही गोष्ट जाणून घेण्यासाठी मला खूप उत्खनन करायचे आहे. ते या पुस्तकात त्यांनी केले अाहे. सईद मिर्झा यांनी लिहिलेले पुस्तक हे नक्कीच एका अर्थाने पॉलिटकल आहे. अगदी श्यामची आई हे या पुस्तकाला आईच्या मायेेचे अवगुंठन असले तरी तेही पुस्तक विशिष्ट हेतूने पॉलिटिकलच असते. किंबहुना प्रत्येक गोष्टीमागे असे काही हेतू असतातच. सईद मिर्झा मुळ पुस्तकामध्ये सांस्कृितक वेधही उत्तम प्रकारे घेताना दिसतात. आठव्या ते बाराव्या शतकात मुस्लिम व अन्य पौर्वात्य देशांतील विद्वान, कवी, लेखक, संत, शास्त्रज्ञ यांनी जे विचारधन मांडले त्यांचा मागोवा घेतानाच या विचारांतून कशी प्रगती झाली हेही मिर्झा पुस्तकात नमुद करतात. पाश्चात्य विचारवंतांपैकी जे साम्राज्यवादी होते त्यांनी या प्रगतीत मोठ्या प्रमाणावर अडथळे आणले. त्यावर कोरडे ओढायला मिर्झा मागेपुढे पाहात नाही. भारत स्वतंत्र झाला तेव्हा नेहरुप्रणित धर्मनिरपेक्षतेवर मिर्झा यांच्या अम्मीची विलक्षण श्रद्धा होती. आईवडिलांचे तरुणपण तसेच त्यानंतर जहाँआरा या तरुण जोडप्यावर आपल्या आईवडिलांच्या व्यक्तिरेखांचे केलेले आरोपण हे त्यांच्या मानसिकतेचा आलेख वाचकांसमोर उभा करते. सईद मिर्झांच्या पुस्तकाचा बाज हा निखळ निधर्मी आहे. प्रश्न - लेखन ही अंतिमत: एक राजकीय कृती असते. त्या दृष्टिकोनातून पाहता, तुमच्या अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकाचं वर्णन तुम्ही कस कराल?मिलिंद चंपानेरकर - गेल्या काही वर्षांत मराठीत अनुवादित पुस्तकांची संख्या खूप वाढली आहे. मुळ पुस्तकाच्या लेखकाच्या अनुभवविश्वाच्या जवळ गेल्याशिवाय त्या पुस्तकाचे सार अनुवादात पूर्णांशाने उतरणार नाही. त्या पुस्तकाचा इसेन्स अनुवादात तितक्याच परिणामकारक रितीने उतरला तर त्याचा परिणाम खूपच गहिरा होतो. लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र हा अनुवाद सिद्ध करताना मी या गोष्टींचे पुरेपूर भान बा‌ळगले आहे. या पुस्तकाचे मोल पुरेसे समजून ‘रोहन प्रकाशन’चे प्रदीप चंपानेरकर यांनी हा तसा व्यावसायिक न ठरणारा प्रकल्प करण्यास स्वीकृती दिली, म्हणूनच हे अनोखे पुस्तक मराठी वाचकांसमोर येऊ शकले आणि म्हणून मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि अर्थातच या प्रयोगशील पुस्तकाची ‘साहित्य अकादमी’ने दखल घेतली व त्याला सन्मान दिला म्हणून मला त्याचा अर्थातच मोठा आनंद आहे. ---माजिक, सांस्कृतिक क्षमतांबाबत काय निरीक्षण नोंदवाल विशेषत: आजच्या संदर्भात?
मिलिंद चंपानेरकर - सईद मिर्झा हे चित्रपट दिग्दर्शक तसेच उत्तम पटकथाकार. मात्र हे पुस्तक लिहिताना त्यांनी एकच एक साचा स्वीकारलेला नाही. या पुस्तकात अफगाणिस्तान, बलुचिस्तानचे (क्वेट्टा) संदर्भ आहेत. त्या प्रांतातून १९३०च्या दशकात मिर्झा यांचे आईवडील मुंबईत आले. त्यावेळी त्यांनी मुंबईतील आधुनिकतेकडे कसे पाहिले असेल याचेही दर्शन पुस्तकातून होते. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरुप्रणित धर्मनिरपेक्षतेच्या वातावरणाने हा देश भारलेला होता. त्या वातावरणात या दोघांनी आणि त्यांच्यासारख्या अनेकविध धर्मांच्या लोकांनी या धर्म निरपेक्ष नाव-लोकशाही देशाकडे कसे पहिले, कशा अपेक्षा ठेवल्या आणि निष्ठेने अशा नव्या देशाची राज्य घटनेत अभिप्रेत असलेली मुली स्वीकारली त्याच सूक्ष्म कथन या पुस्तकातून प्रतीत होते. `लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र'मध्ये रुपकात्मक लेखनशैली मिर्झा यांनी वापरलेली आहे. सर्वच धर्मांच्या भावभावनांचे चित्रण त्यांनी केलेले आहे. स्वातंत्र्याआधी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या घटनांवर जसे या पुस्तकात भाष्य आहे तसेच बाबरी मशिद पडल्यानंतर त्या घटनेकडे कसे पाहिले गेले याचाही धांडोळा त्यात आहे. या साऱ्या घटनांची एकच एक सलग कथा नाही. काही ठिकाणी संवाद आहेत. काही ठिकाणी स्वगत. अशा विविध लेखनपद्धतीतून हे पुस्तक पुढे पुढे जात राहाते. मी मुळ पुस्तक किमान ११ वेळा वाचलेले असल्याने त्यातील हे सारे बारकावे आता नीटसपणे सांगू शकतो. नेहरुप्रणित सेक्युलॅरिझमच्या पलीकडच्याही सेक्युलॅरिझम यातून ध्वनित होतो, असे माझे मत आहे. सईद मिर्झा म्हणतात की, आपण आधुनिक झालो आहोत काय ही गोष्ट जाणून घेण्यासाठी मला खूप उत्खनन करायचे आहे. ते या पुस्तकात त्यांनी केले अाहे. सईद मिर्झा यांनी लिहिलेले पुस्तक हे नक्कीच एका अर्थाने पॉलिटकल आहे. अगदी श्यामची आई हे या पुस्तकाला आईच्या मायेेचे अवगुंठन असले तरी तेही पुस्तक विशिष्ट हेतूने पॉलिटिकलच असते. किंबहुना प्रत्येक गोष्टीमागे असे काही हेतू असतातच. सईद मिर्झा मुळ पुस्तकामध्ये सांस्कृितक वेधही उत्तम प्रकारे घेताना दिसतात. आठव्या ते बाराव्या शतकात मुस्लिम व अन्य पौर्वात्य देशांतील विद्वान, कवी, लेखक, संत, शास्त्रज्ञ यांनी जे विचारधन मांडले त्यांचा मागोवा घेतानाच या विचारांतून कशी प्रगती झाली हेही मिर्झा पुस्तकात नमुद करतात. पाश्चात्य विचारवंतांपैकी जे साम्राज्यवादी होते त्यांनी या प्रगतीत मोठ्या प्रमाणावर अडथळे आणले. त्यावर कोरडे ओढायला मिर्झा मागेपुढे पाहात नाही. भारत स्वतंत्र झाला तेव्हा नेहरुप्रणित धर्मनिरपेक्षतेवर मिर्झा यांच्या अम्मीची विलक्षण श्रद्धा होती. आईवडिलांचे तरुणपण तसेच त्यानंतर जहाँआरा या तरुण जोडप्यावर आपल्या आईवडिलांच्या व्यक्तिरेखांचे केलेले आरोपण हे त्यांच्या मानसिकतेचा आलेख वाचकांसमोर उभा करते. सईद मिर्झांच्या पुस्तकाचा बाज हा निखळ निधर्मी आहे.
प्रश्न - लेखन ही अंतिमत: एक राजकीय कृती असते. त्या दृष्टिकोनातून पाहता, तुमच्या अकादमी पुरस्कारप्राप्त पुस्तकाचं वर्णन तुम्ही कस कराल?
मिलिंद चंपानेरकर - गेल्या काही वर्षांत मराठीत अनुवादित पुस्तकांची संख्या खूप वाढली आहे. मुळ पुस्तकाच्या लेखकाच्या अनुभवविश्वाच्या जवळ गेल्याशिवाय त्या पुस्तकाचे सार अनुवादात पूर्णांशाने उतरणार नाही. त्या पुस्तकाचा इसेन्स अनुवादात तितक्याच परिणामकारक रितीने उतरला तर त्याचा परिणाम खूपच गहिरा होतो. लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र हा अनुवाद सिद्ध करताना मी या गोष्टींचे पुरेपूर भान बा‌ळगले आहे. या पुस्तकाचे मोल पुरेसे समजून ‘रोहन प्रकाशन’चे प्रदीप चंपानेरकर यांनी हा तसा व्यावसायिक न ठरणारा प्रकल्प करण्यास स्वीकृती दिली, म्हणूनच हे अनोखे पुस्तक मराठी वाचकांसमोर येऊ शकले आणि म्हणून मी त्यांचा खूप आभारी आहे. आणि अर्थातच या प्रयोगशील पुस्तकाची ‘साहित्य अकादमी’ने दखल घेतली व त्याला सन्मान दिला म्हणून मला त्याचा अर्थातच मोठा आनंद आहे.
---

Sunday, February 12, 2017

सावट 'सखाराम'चे! - - मिलिंद शिंदे - शब्दांकन - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी १२ फेब्रुवारी २०१७च्या रसिक पुरवणीतील लेख (दोन लेख)





 मुक्ता बर्वे व तिचे सहकारी सखाराम बाइन्डर नाटकाच्या सध्या करीत असलेल्या पाच निवडक प्रयोगांच्या पार्श्वभूमीवर दै. दिव्य मराठीच्या दि. 12 फेब्रुवारी 2017च्या रसिक पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रख्यात अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या लेखाची ही जेपीजी पाइल. मिलिंद शिंदे यांच्या लेखाचे शब्दांकन मी केले आहे. त्या लेखाची टेक्स्टलिंक, वेबपेज लिंक व लेखाचा संपूर्ण मजकूर सोबत दिला आहे.
वेबपेज लिंक व लेखाचा संपूर्ण मजकूर सोबत दिला आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-milind-shinde-writes-…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/12022017/0/1/
----
नाटककार विजयतेंडुलकरांनी त्यांच्यानाटकांमधून माणसामध्ये दडलेल्या हिंस्र वृत्तीचा जाणीवपूर्वक शोध घेतला. त्या शोधातला एक टप्पा होता - सखाराम बाइन्डर. पुरुषी वर्चस्वाच्या भावनेने फुसफुसणारा, स्त्रीदेहावर मालकी हक्क सांगणारा असा हा सखाराम. त्याचा दंश जहरी, त्याची वाणी विखारी. चार दशकांपूर्वी आलेल्या या नाटकाने समाजातल्या ‘सभ्य नि सुसंस्कृत’ पुरुषांना अक्षरश: नागडं केलं होतं. पण आजचा समाज तरी बदललाय का? त्यातली सखाराम प्रवृत्ती लोपलीय का? याचा अंतर्मुख होऊन एक समाज म्हणून पुनर्विचार करायला लावणारी घटना मराठी रंगभूमीवर घडते आहे. चतुरस्र अभिनेत्री-निर्माती मुक्ता बर्वे आणि दिग्दर्शक जयंत जठार ‘सखाराम बाइन्डर’चे मुंबई आणि पुण्यात निवडक पाच प्रयोग करत आहेत. या निमित्ताने नाटकाच्या आशयाचे समकालीनस्त्री-पुरुष वर्तनाशी असलेले संबंध अधोरेखित करण्याच्या हेतूने लिहिलेला हा विशेष लेख...
------
सावट 'सखाराम'चे!
-----------
- मिलिंद शिंदे
milindrshinde@gmail.com
-----
शब्दांकन - समीर परांजपे
-----
प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले "सखाराम बाइन्डर' हे काळाच्या पुढे असणारे नाटक. हे नाटक रंगभूमीवर आले तेव्हा, त्याविरोधात अनेकांनी खूप गहजब माजविला नाटकाची कथा, त्यातील भाषा यावरुन प्रखर टीका झाली. कोर्टबाजीही करण्यात आली. पण अखेर या साऱ्यांना हे नाटक पुरुन उरले.
तेंडुलकर हे भविष्याचा वेध घेणारे नाटककार होते. सखाराम बाइन्डर नाटकामध्ये रंजनाची मूल्ये आहेत, तसेच समाजस्थितीची चिरफाडही तेंडुलकरांनी अत्यंत भेदक शैलीत केलेली आहे. या नाटकाचा मुख्य नायक, सखाराम बाइन्डर. त्याचे वर्तन पाहून तो कोणालाही खलनायकच वाटेल. तो दारु पितो, तो बायकांचा वापर करतो. जे जे काही वाईट आहे तो ते करतो. पण तो भयंकर खरे बोलतो. सखारामचा हा खरे बोलण्याचा गुण आपल्याला साऱ्या नाटकभर दिसत राहतो.
सखाराम हा समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक आहे. चार दशकापूर्वी हे नाटक लिहिलेले असले तरी ते आजही तितकेच सुसंगत आहे. कारण त्यात सखाराम ज्या पद्धतीने वागतो, त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूला- घरांत पुरुष वागताना दिसतच असतात. फरक एवढाच असतो की, बदचालीने वागणाऱ्यांपैकी अनेक पुरुष आपले दुर्गुण लपवतात. सखारामचा सगळा उघड मामला आहे. पण, ‘सखाराम बाइन्डर’ मधली खरी खलनायक परिस्थितीला शरण जाताना आपला स्वार्थ जपणारी लक्ष्मीच आहे, असाही निष्कर्ष निघू शकतो. देवाचे सतत नाव घेणारी, देवपूजा करणारी लक्ष्मी नाटकाच्या शेवटी ज्या प्रकारे वर्तन करते, ते पाहून प्रेक्षकांना धक्का बसतो.
तेंडुलकरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांच्या नाटकांतील व्यक्तिरेखा विलक्षण बोलक्या असतात. प्रेक्षकांशी निराळ्या पातळीवर जाऊन संवाद साधतात. एरवीसुद्धा नाटककाराला काही गोष्टी नाटकातून सांगायच्या असतात. त्या गोष्टी मग नाटककार नाटकातील पात्रांच्या तोंडी असलेल्या संवादातून सांगतो. "सखाराम बाइन्डर'च्या माध्यमातून समाजातील पुरुषप्रधान व्यवस्थेतील त्रुटी, विखारीपण तेंडुलकर प्रेक्षकांना सांगतात. तेंडुलकरांची गिधाडे, कन्यादान, सखाराम बाइन्डर अशी सारी नाटके वेगळे काही सांगू पाहाणारी होती. त्यामुळेच या नाटकांविषयी वादंग निर्माण केले गेले. पण तेंडुलकरांची नाटके आग्रहाने करणारी एक फळीही मराठी रंगभूमीवर त्यावेळी होतीच की. सत्यदेव दुबे यांनी अट्टाहासाने तेंडुलकरांची नाटके केली. अगदी आग्रहाने केली. कमलाकर सारंग, लालन सारंग यांनीही तेंडुलकरांची नाटके करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. सखाराम बाइन्डर नाटक करताना वादळे उठली, राळ उडाली. या नाटकाबाबत सेन्सॉर बोर्डाबरोबर झालेला वादही खूप गाजला.
कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केलेले ‘सखाराम बाइन्डर’चे प्रयोग बघण्याची मला संधी मिळाली नाही. त्यात निळुभाऊ फुले यांनी साकारलेला सखाराम प्रचंड गाजला होता. मी जे ऐकले, वाचले आहे, त्यावरुन सांगतो की, सखारामचे तेरा-चौदा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने त्यावेळेस या नाटकाचे प्रयोग बंद करण्याचा आदेश जारी केला होता. मात्र, नाटकावरील या बंदीविरोधात न्यायालयात जाऊन लढा द्यायचा, हे कमलाकर सारंग यांनी मनाशी निश्चित केले. साधारण नऊ-दहा महिन्यांपर्यंत ही न्यायालयीन लढाई चालली. हा खटला कमलाकर सारंग जिंकले. एका मोठ्या दिव्यातून ते बाहेर पडले. एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई ते जिंकले होते.
हे घडू शकले कारण, त्या वेळेस मूल्यांची बूज राखणारी, ती मूल्ये जतन करणारी माणसे मराठी रंगभूमीवर सक्रीय होती. आजच्या काळात व्यावसायिक नाटक करायचे म्हटल्यानंतर पहिल्यांदा विनोदी नाटकाची मागणी केली जाते. गंभीर नाटक करताना नफा-तोट्याचा विचार पहिला मनात येतो. अशा प्रकारचे नाटक चालले तरच, त्या नाटकावर अवलंबून असलेल्यांच्या हाताला रोजगार मिळणार, त्यांची पोटे भरणार हा त्यामागचा विचार असतो. सध्या व्यावसायिक नाटके करताना अशी अनेक व्यवधाने बाळगावी लागतात. कारण काळाचे संदर्भ, नाट्यरसिकांचा पोत हे सारेच बदलले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या ललित कला केंद्राचे अभिनेत्री-निर्माती मुक्ता बर्वे ,संदीप पाठक, सुहास शिरसाट, हिमानी निलेश, पुंडलिक धुमाळ आदी माजी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना साथ देणारे निर्माते दिनू पेडणेकर यांचे धाडस विलक्षण कौतुकास्पद आहे. ‘सखाराम बाइन्डर’ हे प्रत्येक पिढीतील रंगकर्मींना करावेसे वाटते, यातच त्या नाटकाचे आगळेपण दडलेले आहे. नाटकातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही आजच्या परिस्थितीतही तितकीच सुसंगत आहे.
२००५ सालातील गोष्ट आहे. त्यावेळी मुंबईत माझे घर नव्हते. मी नगरला राहात असे. काही काम असेल, तरच मुंबईत मुक्कामाला असे. असाच एक िदवस नगरला असताना मला अमृता सुभाषचा फोन आला. ती म्हणाली की, तुझ्याशी एका व्यक्तीला बोलायचे आहे. तिने मला नाव न सांगता, त्या व्यक्तीच्या हाती फोन दिला. ती व्यक्ती पलीकडून बोलू लागली. ‘मी तेंडुलकर बोलतोय. तुमचे ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या सिनेमातील काम मी पाहिले. तुम्ही खूप चांगले काम करता. तुम्ही मुंबईत आलात की भेटूया'. साक्षात तेंडुलकर माझ्याशी बोलत होते, या कल्पनेनेच मला विलक्षण आनंद झाला होता. मी मुंबईत गेल्यावर विलेपार्ले येथे त्यांच्या घरी गेलो. गप्पा झाल्या. त्यावेळी टीव्हीवर झहिरा शेख प्रकरणाच्या बातम्या दाखविल्या जात होत्या. त्या बघता बघता तेंडुलकर मला म्हणाले की ‘या झहिरा शेखवर मला नाटक लिहायचे आहे.' त्यानंतर काही दिवसांनी मला फोन आला की, ‘सखाराम बाइन्डर’ची व्हीडिओ सीडी करण्याचा प्रकल्प सुरु होतोय. त्यात मला फौजदार शिंदे ही भूमिका करायची होती. सखारामच्या भूमिकेत सयाजी शिंदे होते. हे नाटक संदेश कुलकर्णी दिग्दर्शित करणार होता. हे नाटक करताना मला खूप काही शिकायला मिळाले. सखाराम बाइन्डरची भूमिका निळूभाऊ फुलेंनी इतक्या उंचीवर नेऊन ठेवली होती की, ती भूमिका त्यांच्यानंतर जो करायचा त्याच्या कामगिरीची तुलना निळुभाऊंच्या कामगिरीशी केली जाणे, अगदी साहजिकच होते. सखारामची भूमिका करणाऱ्या सयाजी शिंदेला या अनुभवातून जावे लागले आहे. खरे तर माझ्या अनेक भूमिकांचा बाज खलनायकी असतो. पण अगदी मनातले सांगायचे म्हणजे, मला आजही सखाराम बाइन्डर करायला नक्की आवडेल.
मी दिल्लीत एनएसडीमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत असताना, तिथे मराठीतून हिंदीमध्ये अनुवादित झालेली नाटके पाहायला मिळाली. मराठीतील विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आ‌ळेकर यांची हिंदीत अनुवादित झालेली नाटके विलक्षण लोकप्रिय आहेत. हे तीनही लेखक हिंदीत सुपरिचित आहेत. धर्मवीर भारती, राकेश मोहनसारख्यांनी हिंदीत नाटके लिहिली. पण हिंदीतून लिहिली गेलेली मूळ नाटके एकुणातच कमी आहेत. ‘सखाराम बाइन्डर’चा हिंदी प्रयोग मला कधीही पाहाता आला नाही. पण एक जाणवले की, तेंडुलकर, विजयाबाई मेहता हे लोक आपल्या कलाकृतीतून जे सांगायचे, ते थेटपणे सांगत असतात. तेंडुलकरांचा सखारामही असाच थेट बोलतो. आपल्या वर्तनाबद्दल, आपल्या सवयींबद्दल. आपल्या संपर्कात येणाऱ्या बायकांनी कसे वागावे, याचे त्याचे काही नियम आहेत. त्या नाटकात एक संवाद आहे ‘नवरे पावणे आठ असतात. मूल होत नाही, म्हणून बायकांना मारतात' हे किती विदारक सत्य आहे. अशी बाईला मारहाण करणारे पुरुष आपल्याला आजही आजूबाजूला दिसतात. सखाराम बाइन्डर हा असा कळीकाळाला पुरुन उरला आहे. कारण आजचा, समाज कितीही मॉडर्न झालेला असला, तरीही या समाजाची पुरुषप्रधान घडी अजूनही तशीच आहे. आणि असा समाज जोवर अाहे. तोवर सखाराम बाइन्डर दृश्य-अदृश्य रुपात आपल्या आजूबाजूला नेहमीच दिसत राहाणार आहे. सखाराम बाईंडर हे नाटक कालातीत आहे ते या अर्थानेच.

------------------------------



मुक्ता बर्वे व तिचे सहकारी सखाराम बाइन्डर नाटकाच्या सध्या करीत असलेल्या पाच निवडक प्रयोगांच्या पार्श्वभूमीवर दै. दिव्य मराठीच्या दि. १२ फेब्रुवारी २०१७च्या रसिक पुरवणीमध्ये प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांच्या लेखाची जेपीजी फाइल, टेक्स्टलिंक, वेबपेज लिंक व लेखाचा संपूर्ण मजकूर सोबत दिला आहे.

http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-satish-alekar-writes-…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/12022017/0/1/
----
"सखाराम बाइन्डर'मधील लक्ष्मी स्वत: शोषित आहेच, तरी वेळ येताच चंपाचे शोषण करायला ती मागेपुढे पाहात नाही आणि शेवटी पुन्हा स्वत:चे शोषण करणाऱ्यालाच शरण जाताना दिसते. ही मानसिकता फक्त तेंडुलकरच रंगवू शकतात...
----
क्रूर,निष्ठूर नि निर्दयी...पण माणसेच!
---
- सतीश आळेकर
-----
१९७०चे दशक स्त्रीमुक्ती चळवळीच्या संदर्भात जागतिक महत्त्वाचे होते. पारंपरिक विचारसरणीला शरण जाऊन शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक... अशा सर्व पातळ्यांवर स्त्रियांचे होणारे शोषण, हे वास्तव या जागतिक चळवळीच्या पृष्ठभूमीवर होते. राजकीय पातळीवरही घुसळण सुरू होती. या सर्व घटकांच्या एकत्रित पार्श्वभूमीवर तेंडुलकरांच्या "सखाराम बाइन्डर'सह अन्य काही महत्त्वाच्या नाटकांचा उल्लेख आणि संदर्भ मला महत्त्वाचा वाटतो. "घाशीराम कोतवाल', "गिधाडे' आणि "अशी पाखरे येती', ही ती अन्य नाटके. या प्रत्येक नाटकात कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या रूपात शोषक-शोषित संघर्षाची वेगवेगळी रूपे दिसतात. नुसती दिसत नाहीत, तर सुन्न करतात. उदाहरणार्थ, "सखाराम बाइन्डर'मधील चंपाचे सखारामकडून होणारे शोषण सुस्पष्ट दिसते, पण लक्ष्मीकडून चंपाचे शोषण सूक्ष्म पातळ्यांवर नाटकभर वावरते. वाचक-प्रेक्षकाला सुन्न करते. तेंडुलकर एकाच वेळी विभिन्न पातळ्यांवरच्या शोषणाच्या, क्रूरतेच्या, दुष्टतेच्या छटा किंवा अंश त्यांच्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून दर्शवतात आणि त्यामुळेच तेंडुलकरांच्या व्यक्तिरेखा संमिश्र, करड्या (फक्त चांगल्या-वाईट, सुष्ट-दुष्ट या ढोबळ) फरकाच्या पल्याड जातात.
तेंडुलकरांच्या आधीचे फडके-खांडेकर युग या संदर्भात कधी आले आणि मावळले, याचा पत्ताही लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, तेंडुलकरांची वेगवेगळी नाटके, त्यांचे आशय, व्यक्तिरेखा. यातील वैविध्य पाहिले तर ही सारी तेंडुलकर नावाच्या एकाच नाटककाराची नाटके आहेत का, असा प्रश्न पडतो. एकाच वेळी इतक्या विभिन्न टोकाची ही नाटके आहेत. हाच मुद्दा दुसऱ्या शब्दांत मांडायचा तर मी असे म्हणेन, की कानेटकर-कोल्हटकरांची सर्व नाटके एका फटक्यात ‘ही कानेटकरी-कोल्हटकरी नाटके’ अशी खात्रीशीरपणे ओळखू येतात. तेंडुलकरांची केस अशी नाही आणि हेच त्यांचे असाधारण वैशिष्ट्य आहे.
"सखाराम बाइन्डर'मधील लक्ष्मी स्वत: शोषित आहेच, तरी वेळ येताच चंपाचे शोषण करायला ती मागेपुढे पाहात नाही आणि शेवटी पुन्हा स्वत:चे शोषण करणाऱ्यालाच शरण जाताना दिसते. ही मानसिकता फक्त तेंडुलकरच रंगवू शकतात. दुसरी बाब म्हणजे, तेंडुलकर सर्व ठिकाणी आपली मते बेदिक्कतपणे मांडत जातात. नाटककार म्हणून कोणत्याही प्रकारची प्रेक्षकशरणता त्यांनी स्वीकारलेली दिसत नाही. "सखाराम बाइन्डर'बद्दल वाद उद्भवणार, टीका होणार, संघर्ष करावा लागणार, याची पूर्वकल्पना असूनही तेंडुलकर कुठल्याही तडजोडी स्वीकारत नाहीत. "गिधाडे'नाटकाच्या बाबतही ते ठाम राहिलेले दिसतात आणि "घाशीराम कोतवाल"बाबतही त्यांची ही भूमिका स्पष्ट होती.
"सखाराम बाइन्डर'सह इतरही नाटकांच्या बाबतीत तेंडुलकरांचे आणखी एक वेगळेपण अधोरेखित करायला हवे. ते म्हणजे, नाटककार म्हणून ते नाटकातल्या कुणाचीच बाजू उचलून धरताना दिसत नाहीत. नाटकाची जी कथावस्तू आणि आशयद्रव्ये आहेत, त्याला सुसंगत अशीच त्यांची पात्रे वागत जातात. ती क्रूर वागतात, निष्ठुर होतात, निर्दय बनतात. पण ‘माणसे’च राहतात. त्यांचे कुठलेही उदात्तीकरण तेंडुलकर करत नाहीत. तडजोडी न करण्यावर जे ठाम राहू शकतात, तेच असे वागू शकतात. तेंडुलकरांनी हे त्यांच्या प्रत्येक नाटकांतून दाखवून दिले आहे.
(शब्दांकन : जयश्री बोकील)