Monday, August 8, 2016

अनंताचि पीएच.डी. सदा पाहे... - डॉ. अनंत गुरव याच्या वरील माझा लेख.


अनंताचि पीएच.डी. सदा पाहे...
----
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
(या लेखासोबत अनंत गुरव याचे छायाचित्र व त्याचे पीएच. डी. प्रमाणपत्र यांची छायाचित्रे दिली आहेत.)
----
प्रबोधनकार ठाकरे हे संपादक असलेल्या `प्रबोधन' या नियतकालिकावर देशात पहिल्यांदा ज्याने पीएचडी केली तो माणूस...
या गोष्टीमुळे विद्वत्तेच्या क्षेत्रात आता तो खूपच महत्वाचा झालाय असा माणूस...
तरीही तो मित्र आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाचा....
आश्चर्य वाटते कधी कधी...
त्याचे नाव अनंत गुरव.
तो आहे एका गिरणी कामगाराचा मुलगा...
त्याचे लहानपण व थोडे जाणतेपण गेले डिलाइल रोडवरील सोराबजी चाळीत.
त्याच्या त्या घरी मी गेलोय.
सुमारे अडीचशे फुटांची खोली. खोलीत वर एक माळा...
त्या खोलीत स्वयंपाकघराचा ओटा डावीकडे. त्याच्या पुढे मोरी.
उजव्या अंगाला एक खाट, कपाट.
भिंतींना पोपटी रंग दिलेला. तोही काही ठिकाणी उडालेला.
मी अनंत गुरवच्या या घरी तीन-चारदा राहिलो असेन. दोनदा रात्री मुक्कामाला. एकदा सकाळी गेलेलो व एकदा दुपारी.
म्हणजे सारे प्रहर बघितले या खोलीचे.
अनंतचे वडील महादेवराव गिरणीकामगार. अनंतची आई सौजन्यमूर्ती होती.
नऊवारी पातळ ल्यालेली. कपाळावर मोठे कुंकु, गव्हाळ वर्णाची, कुडी बारीक.
तिच्या हातच्या पदार्थांना न्यारी चव होती. भाकरी, ठेचा वगैरे हे पदार्थ मला तसे दुर्मिळच. ते सगळे पदार्थ मी अनंतच्या आईच्या हातचे खाल्लेत त्याच्या घरी.
अनंत मला भेटला रुईया महाविद्यालयात.
तेव्हा तो एम. ए. करीत होता. मुळात तो प्रिटिंग टेक्नॉलॉजी या विषयात डिप्लोमा केलेला.
इंडियन एक्स्प्रेसच्या छापखान्यात काम करताना त्याच्या मनाने घेतले की, आपणही पांढऱ्यावर काळे करायचे म्हणजे वर्तमानपत्रात लिहायचे.
त्याला ग्रॅज्युएट व्हायचे होते. आला पठ्ठा रुइयामध्ये. तो इथे आला तेव्हा त्याचे वय उलटून गेले होते पदवीधर झालेल्या मुलाइतके.
तरीही अनंतने मनाचा हिय्या केला. कॉलेज करायला लागला व नंतर नोकरीही.
बी.ए. झाला. एम. ए. झाला....
रुइयामध्ये शिकत असताना उत्तम वक्ता म्हणून त्याचे नाव गाजू लागले.
भूषण गगरानी जेव्हा आय. ए. एस. झाले तेव्हा त्यांच्या आयुष्यातील पहिली जाहीर मुलाखत झाली रुईया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर.
मुलाखतकार होता अनंत गुरव.
अनंतचे त्याच्या विशी-तिशीतले फोटो बघितले तर तो थेट अमोल पालेकरसारखा दिसतो.
त्याला तसे अनेक जण बोलतातही. मी ही बोलून घेतो.
अनंतचा एक किस्सा भन्नाट आहे.
तो रुइयाच्या एका हाइकला येण्यासाठी आला. हाइकसाठी जमा झालेले बाकीचे सारे लोक चक्रावले. कारण अनंत आला होता सफारी सुटात-बुटात आणि हातात प्रवासाला निघतात तशी बॅग घेऊन...
गंमतीचा भाग सोडा. पण हाइक असो वा कॉलेज जीवन हे सारे पहिल्यांदाच त्याला महद्कष्टाने अनुभवायला मिळत होते.
त्यामुळे त्याच्यात प्रत्येक अनुभवानंतर बदल होत होता.
हे सारे मुंबईतलेच वातावरण आहे. तो ही मुंबईतलाच.
पण हे अनुभवविश्व वेगळे होते पूर्णपणे त्याच्यासाठी.
त्याला माझ्यासारखेच अखेर भिकेचे डोहाळे लागले...हाहाहा
अनंत गुरव पत्रकार झाला. दै. सामना, लोकमत अशा अनेक वृत्तपत्रांत विविध ठिकाणी त्याने नोकरी केली.
आता तो दै. सामनाच्या मुंबई कार्यालयात संपादकीय विभागात कार्यरत आहे.
तो मला आवडतो कारण तो मुळातून अभ्यासू आहे.
१९९५-९६ची गोष्ट असेल. तो मुंबई व महाराष्ट्रातील विविध ग्रंथालयांवर विश्व ग्रंथालयांचे नावाचा स्तंभ दै. सामनाच्या उत्सव पुरवणीत लिहित होता. त्याचे पुढे त्याच नावाने पुस्तक डिंपल प्रकाशनने प्रसिद्ध केले.
अनंत गुरवचे हे पहिले पुस्तक. आणि त्याच्या अख्ख्या खानदानात पुस्तक लिहिणारा तो पहिलाच.
तसेच त्याच्या अख्ख्या खानदानात पीएचडी करणाराही तो आता पहिलाच आहे.
`केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन या नियतकालिकाचा अभ्यास' या विषयावर अनंत गुरवने डॉ. विद्यागौरी टिळक या अनुभवी शिक्षक व गाईडच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठातून नुकतीच पीएच.डी. मिळवली.
त्याचा अभिमान त्याच्यापेक्षाही मला अधिक वाटला.
गिरणीकामगाराचा मुलगा हे काही कमी पात्रतेचे लक्षण नाही.
तसेच पीएचडी कोणीही करतो पण अत्यंत गहन विषयावर समाजाला उपयोगी पडेल अशा अंगाने पीएच.डी. करणारे खूप कमी लोक असतात.
अामचा डॉ. अनंत गुरव त्यापैकी एक आहे.
अनंतबद्दल अजून एक गोष्ट मला नुकतीच कळलीये ती डॉ. हरि नरके यांचे तरुणपणीचे छायाचित्र बघून.
नरके यांनी फेसबुकवर आपले हे छायाचित्र अपलोड केले तेव्हा मी त्याखाली लिहिले की अमोल पालेकरांसारखे दिसता.
अनंत गुरवही अमोल पालेकरसारखाच दिसायचा त्या वयात. आता तो पन्नाशीला येऊन ठेपलाय.
हे दोन्ही अमोल पालेकर अतिशय कठीण परिस्थितीतून वर आलेले आहेत. दोन्ही डॉक्टर झाले आहेत. पीएच.डी. वाले!
पुण्यात ते दोघे एकमेकांना जेव्हा भेटतीलही तेव्हा हे दोन अमोल पालेकर एकमेकांशी भाई-भाई (बडा भाई- छोटा भाई) म्हणून भेटावेत अशी इच्छा.
ठेविले अनंते तैसेचि राहावे.
ही अभंगातील एक ओळ. ती आपल्यासाठीच असावी असे आळशी माणसांना वाटते असे म्हणतात.
आमचा डॉ. अनंत गुरव तर आहे कोणतीही परिस्थिती स्वप्रयत्न व स्वकष्टाने बदलणारा.
त्याच्यासाठी दुसऱ्या एका ओळीत बदल करावासा वाटतो.
अनंताचिया सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे...
त्यामध्ये बदल करुन
अनंताचि पीएच.डी. सदा पाहे असा समीर बोरिवलीत आहे....
असे म्हणावेसे वाटते...
अनंताचे झाड असेच बहरो...
सिनिअर अमोल पालेकर डॉ. हरि नरके तुम्ही हे सारे वाचले आहेत ना?
(या लेखासोबत अनंत गुरव याचे छायाचित्र व त्याचे पीएच. डी. प्रमाणपत्र यांची छायाचित्रे दिली आहेत.)

Thursday, August 4, 2016

रेल्वेच्या खासगीकरणाचा मंदावलेला वेग - दै. दिव्य मराठी ४ ऑगस्ट २०१६ - मी लिहिलेला लेख.



दै. दिव्य मराठीच्या ४ ऑगस्ट २०१६च्या अंकात संपादकीय पानावर प्रासंगिक या सदरात मी लेख लिहिला आहे. त्या लेखाची वेबपेज, टेक्स्ट लिंक, मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-article-about-railway-privatisation-by-samir-paranjape-5388228-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/04082016/0/6/
---
रेल्वेच्या खासगीकरणाचा मंदावलेला वेग
----
- समीर परांजपे
paranjapesamir.gmail.com
------
जगातील सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक असलेली भारतीय रेल्वे ही केंद्र सरकारतर्फे संचालित केली जाते. २०१४-१५ या वर्षात भारतीय रेल्वेने ८ अब्जांहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली. म्हणजेच रेल्वेने रोज सरासरी २ कोटी ३० लाख प्रवाशांची ने-आण केली. (त्यातील निम्मे प्रवासी मुंबईतील अन्य भागांतील लोकल सेवेने प्रवास करणारे आहेत.) जगात कोणत्याही रेल्वेला प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतूक करून जास्त नफा मिळतो. भारतीय रेल्वेच्या महसुली उत्पन्नातील वाढ गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वात कमी प्रमाणात झाली ती २०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये. रेल्वेच्या महसुली उत्पन्नामध्ये तीन पंचमांश वाटा हा मालवाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आहे. २०१४-१५ मध्ये मालवाहतुकीतून मिळणाऱ्या महसुलात ४ ते ५ टक्के वृद्धी झाली होती. ती २०१५-१६ मध्ये तितकीशी होऊ शकली नाही. या सगळ्या गोष्टी भारतीय रेल्वेमध्ये अनेक बदल करण्याची गरज असल्याचेच सूचना करतात.
जागतिकीकरणाच्या जमान्यात खासगीकरण हा एक सशक्त पर्याय उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेचे खासगीकरण करण्यास मोदी सरकारमधील काही घटक नक्कीच अनुकूल आहेत, मात्र या प्रक्रियेला जनतेतून मोठ्या प्रमाणावर विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई-अहमदाबाद यादरम्यान २०२३ पर्यंत बुलेट ट्रेन धावेल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. बुलेट ट्रेन यायची तेव्हा येईल, पण सध्या देशातील सर्वात जलद गाडीचा मान टॅल्गो ट्रेन मिळवू पाहत आहे. दिल्लीवरून ‘ट्रायल’च्या ट्रॅकवर धावत मुंबईत दाखल झालेल्या या ट्रेनचा प्रतिताशी वेग १५० पर्यंत जाऊ शकतो. पण प्रवासाच्या अडथळ्यांच्या शर्यतीत तो १३० किमीपर्यंत मर्यादित राखावा लागला. तरीही तो वेग राजधानी एक्स्प्रेसपेक्षा जास्त होता. जगातील कोणतीही खासगी कंपनी भारतात खासगी रेल्वे चालवू शकेल. मात्र ही रेल्वे असेल अत्याधुनिक लॅटिव्हेशन तंत्रज्ञानाने (मॅग्लेव्ह रेल्वेप्रमाणे) चालणारी. खासगीकरणाला होणारा विरोध लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने हा वेगळा मार्ग शोधून काढला. लॅटिव्हेशन तंत्राने चालणाऱ्या रेल्वेसाठी गाड्या, फलाट, रूळ, सिग्नल, कर्मचारी वर्ग, यंत्रणेची देखभाल, व्यवस्थापन यासाठी येणारा सारा खर्च हा खासगी कंपनीनेच करायचा अाहे. प्रवासी भाडे इतक्या प्रमाणात आकारण्यात येईल की ज्याने प्रवाशांची आर्थिक पिळवणूकही होणार नाही व खासगी कंपन्यांना पुरेसा फायदाही मिळेल. असे प्रस्ताव असतात चांगले, पण ती यंत्रणा प्रत्यक्षात अस्तित्वात आल्यानंतर त्याच्यात जे गुंते निर्माण होतात ते सोडविण्यासाठीही आपल्या यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे सुरू झाली, पण तिच्याबाबतचे काही घोळ अजूनही संपलेले नाहीत. दुसऱ्या बाजूला मुंबईतील लोकल रेल्वे यंत्रणेवर प्रचंड प्रवासी संख्येचा जो ताण पडतो तो हलका करण्यासाठी रेल्वेने नव्हे, तर एमएमआरडीएने खासगी कंपन्यांच्या सहकार्याने दोन वर्षांपूर्वी मेट्रो रेल्वे सुरू केली. तिला पहिल्या दिवसापासून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मुंबई मेट्रो रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालकीची अाहे. या रेल्वेच्या तिकिटांचे दर जी पावले उचलायला हवीत त्याबाबत दिरंगाई होत आहे. याच्या परिणामी मुंबई मेट्रोला दरवर्षी ३०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. कोलकाता, दिल्ली, मुंबई, बंगळुरू जिथे जिथे मेट्रो रेल्वे सुरू झाली किंवा काही ठिकाणी मोनो रेल्वे सुरू झाली तिथे तिथे सरकारी यंत्रणेतील शुक्राचार्यांमुळे खूप अडचणी निर्माण झाल्या. ही उदाहरणे वेगळ्या रेल्वे यंत्रणांची असली तरी देशातील खरी स्थिती दाखविण्यासाठी पुरेशी प्रातिनिधिक आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आपली जमीन किती भुसभुशीत आहे याचा अाधी अंदाज घेणे गरजेचे आहे. रेल्वे यंत्रणेच्या कामांमध्ये खासगी कंपन्यांना केंद्र सरकारने २०१२ पासून मोठा वाव दिला असला तरी रेल्वेचे आवश्यक असलेले संपूर्ण खासगीकरण हे खूपच दूरदृष्टीने करायला हवे. कारण त्यात काही लाख कर्मचाऱ्यांचे भवितव्यही गुंतलेले आहे.
(लेखक दै. दिव्य मराठीच्या मुंबई कार्यालयात उपवृत्तसंपादक आहेत.)

Monday, August 1, 2016

नेमेचि येणारे पूर... दै. दिव्य मराठी १ ऑगस्ट २०१६ मधील माझा लेख



दै. दिव्य मराठीच्या १ ऑगस्ट २०१६ रोजीच्या अंकात नेमचि येणारे पूर हा लेख मी लिहिला आहे. त्या लेखाचा मजकूर, टेक्स्ट लिंक, वेबपेज लिंक, जेपीजी फाइल मी सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-article-on-flood-by-sameer-paranjape-5385955-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/01082016/0/6/
---
नेमेचि येणारे पूर...
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
बिहार, आसाम, पश्चिम बंगाल तसेच मेघालय अशा काही राज्यांमध्ये नद्यांना पूर येऊन मोठी जीवित व वित्तहानी होणे हा दरवर्षीच्या पावसाळ्यातील नित्यक्रम झालेला आहे. यंदाही हेच चित्र आहे. बिहारपेक्षा यंदा आसाममध्ये पूरस्थिती गंभीर असल्याने तिचा आढावा घेण्यासाठी साक्षात केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हवाई पाहणी केली. पूरग्रस्त भागातील २८ जिल्हे व तेथील ३० लाख लोकांना या नैसर्गिक संकटाचा तडाखा बसला आहे. या पुरात ज्यांचा बळी गेला त्यांच्या वारसदारांना आसाम सरकारतर्फे प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचीही घोषणा झाली. हे सारे सरकारी उपचारांप्रमाणे पार पडले. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले, “पूर ही राष्ट्रीय आपत्ती आहे असे जाहीर करणे हा काही त्या समस्येवर उपाय नाही. या आपत्ती रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत याचा विचार करणे हे या घडीला अधिक महत्त्वाचे आहे.’ तसे पाहिले तर या मुद्द्यात काहीही नावीन्य नाही. नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्ती आल्यास त्या वेळी त्यात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ)ची २००५मध्ये स्थापना झाली. आसामप्रमाणेच बिहारही पुराच्या तडाख्याने बेजार आहे. २००८ साली बिहारमधील कोसी नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या सुमारे १ लाख लोकांना एनडीआरएफ जवानांनी सुरक्षित स्थळी हलविले. या जवानांच्या कार्याने प्रभावित होऊन बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एनडीआरएफचे केंद्र बिहारमध्ये उभारण्यासाठी सुमारे ६५ एकर जमीन एनडीआरएफला देऊ केली होती. यंदाच्या पावसाळ्यातही पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफचे जवान कामाला लागले आहेत. मूळ प्रश्न हा आहे की, दरवर्षी लष्कराकडून, लोकांकडून आपतग्रस्तांना होणारी मदतही पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करण्याबाबतचा कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही.
२००८ साली बिहारमध्ये कोसी नदीला आलेल्या पुरामुळे ५०० जण मृत्युमुखी पडले होते तर ३५०० लोक बेपत्ता झाले होते. नेपाळमध्ये नदीच्या पुराला रोखण्यासाठी असलेल्या कोसी बॅरेज या यंत्रणेमध्ये अनेक दोष असल्यानेच त्याचा तडाखा थेट बिहारलाही बसला होता. या बॅरेजची वर्षानुवर्षे नेपाळने दुरुस्तीच न केल्यामुळे कोसी नदीला मोठा पूर आला होता. हिमालयामध्ये तिबेट परिसरात उगम पावणारी कोसी नदी ही पुढे नेपाळमधून बिहारमध्ये वाहत येते. बिहारमध्ये नद्यांचे असलेले प्रवाह तसेच सुमारे १६ नद्यांची असलेली खोरी यामुळे या प्रदेशात पूर आला की परिस्थिती गुंतागुंतीची बनते. देशातील अन्य राज्यांतही पूराची समस्या सतावते. नद्यांवर धरणे, कालवे बांधून, वेळप्रसंगी नद्यांचा प्रवाह काही ठिकाणाी बदलून पाण्यासाठी आसुसलेली भूमीही सुजलाम सुफलाम केल्याची उदाहरणे जगात सापडतात. नद्यांना पूर येऊ नये िकंवा पुरापासून फार नुकसान होऊ नये ही दोन्ही उद्दिष्टे व अन्य कल्याणकारी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून भारतातही नद्या जोडणी प्रकल्प हाती घेण्याचा विचार मांडला गेला. अगदी १९ व्या शतकात अॉर्थर कॉटन या अभियंत्याने भारतातील काही प्रमुख नद्या जोडून त्याद्वारे भारताचा दक्षिणपूर्व भाग म्हणजे आताचा आंध्र प्रदेश व ओरिसा येथील दुष्काळग्रस्त भागांपर्यंत या नद्यांचे पाणी पोहोचविण्याची योजना तयार केली होती. त्यानंतर १९७० साली धरणबांधणीतले तज्ज्ञ डॉ. के. एल. राव यांनी नॅशनल वॉटर ग्रीड ही संकल्पना मांडली होती. उत्तर भारतात दरवर्षी नद्यांना पूर येतात. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये काही नद्यांना बाराहीमहिने कमी पाणी असते. ब्रह्मपुत्रा व गंगा नदीचे जादा पाणी हे दक्षिण भारतामध्ये नेण्याच्या दृष्टीने नद्या जोडणी प्रकल्प हाती घ्यावा, असे त्यांनी सुचविले होते. १९८० साली केंद्रीय जलस्रोत खात्याने नद्या जोडणी प्रकल्पाबाबत एक अहवालही तयार केला होता. १९८२ सालीही या दिशेने थोडीशी हालचाल झाली होती. पण त्यानंतर १७ वर्षे हा सारा प्रश्न बासनात पडून होता. १९९९ साली अटलबिहारी वाजपेयींच्या काळात नद्या जोडणी प्रकल्पाला घुगधुगी प्राप्त झाली. आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारने वाजपेयी सरकारची नद्या जोडणीबाबतची भूमिका ध्यानात ठेवून भविष्यात त्याच्याशी सुसंगत पावले टाकली पाहिजेत.
(लेखक दै. दिव्य मराठीच्या मुंबईतील माहिम येथील संपादकीय कार्यालयात उपवृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत.)

Sunday, July 31, 2016

निरुप्पुडा! निरुप्पुडा!! (रजनीकांत - कबालीवरील माझा लेख), दै. दिव्य मराठी ३० जुलै २०१६, रसिक पुरवणी



सुपरस्टार रजनीकांत याचा कबाली हा चित्रपट झळकला त्या पहिल्या दिवशी मुंबईतील अरोरा टॉकिज येथे सकाळचा सहाचा शो पाहून मी तेथील वातावरणावर एक लेख दै. दिव्य मराठीच्या ३१ जुलै २०१६च्या अंकातील रसिक या रविवार पुरवणीत लिहिला. त्या लेखाची टेक्स्ट, वेबपेज व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjpe-artic…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/31072016/0/6/
----
स्लग : टॉक ऑफ द टाऊन
------------------
हेडिंंग : निरुप्पुडा! निरुप्पुडा!!
------------------
बायलाइन : समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
------------------
इंट्रो : चमत्काराचे सगळे पेटंट बहुधा एकट्या रजनीकांतच्या नावावर जमा आहेत. म्हणूनच १००-२०० कोटींच्या कमाईसाठी बॉलीवूड धडपडत असताना पहिल्या चार दिवसांतच बहुचर्चित ‘कबाली’ने तब्बल ४०० कोटींची कमाई केली...या चमत्कारापुढे दिपून जाऊनच कदाचित विधानसभा अधिवेशन काळात रजनीकांतला महाराष्ट्रभूषण हा मानाचा पुरस्कार देण्याची मागणी पुढे आली...पाठोपाठ भारतरत्नचा आग्रह लावून धरला गेला... खरं तर "कबाली' प्रदर्शित होऊन आठवड्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेलाय, तरी "रजनीमॅनिया' ओसरायचं काही नाव घेईना... पण प्रत्यक्षातलं रजनीवेड असतं तरी कसं, याचा पहाटेच्या शोला हजेरी लावून टिपलेला हा सांग्रसंगीत इितवृत्तांत...
------------------
ब्लर्ब : बाल्कनीतला प्रेक्षक हा स्टाॅलच्या प्रेक्षकापेक्षा अधिक महागडे कपडे घालणारा, उंची मोबाइल वापरणारा, आपापल्या गाड्यांतून आलेला आहे, हे स्पष्टपणे डोळ्यांना िदसत होते. पण थलैवाच्या अॅक्शनला आणि संवादांना दाद देताना हे स्टाॅल, बाल्कनीचे झंजटच मिटले होते...
------------------
मुंबईतील माटुंगा पूर्व येथे द्रुतगती महामार्गाच्या वाटेतच एका गोलात वसलेलं महेश्वरी उद्यान... या उद्यानाहून थोडे पुढे गेले की, शीवच्या दिशेने उजव्या अंगाला आहे, सिंगलस्क्रीन अरोरा सिनेमा. नाव ‘अरोरा’ पण इथे मक्तेदारी दाक्षिणात्य चित्रपटांची. पहाटे तीन वाजल्यापासून या ‘अरोरा’च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाक्षिणात्य वाद्ये धुमधडाक्यात वाजवली जात होती... उत्साही तरुणांचा घोळका जिवाची कुर्वंडी करून नाचत होता... अंतराअंतराने दणक्यात फटाके फुटत होते...सोबत रोशणाई... फटाके... जणू दोन महिने आधीच दिवाळी आली होती... मध्येच कोणीतरी आरोळी ठोकायचा... थलैवा, थलैवा... मग तरुणांचा घोळकाही चित्कारायचा, थलैवा... थलैवा... ‘थलैवा’ या तामीळ शब्दाचा अर्थ आहे नेता, महानायक... गेल्या तीन दशकांपासून हा शब्द तामिळींसह सारे दाक्षिणात्य प्रजानन एकाच व्यक्तीसाठी वापरतात आणि तो म्हणजे, नन अदर दॅन रजनीकांत... द बाॅस...!
रजनीकांतचा बहुप्रतीक्षित ‘कबाली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, त्या पहाटेचे हे आख्यान. अरोरा टॉकीजच्या मुख्य प्रवेशद्वारावर डाव्या हाताला ‘कबाली’मधील सुटाबुटातल्या रजनीकांतचा तब्बल ५५ फुटी कटआऊट‌ लावलेला... त्या भव्य कटआऊटला सॉलीड लायटिंग केलेली... त्यावरून सकाळी पाच वाजता एका चाहत्याने पुष्पवृष्टी केली. तशी प्रवेशद्वारासमोर बेभान नाचणाऱ्या चाहत्यांच्या डोक्यात ही फुले पडली... त्यांनाही धन्य वाटले. एकाने या या कटआऊटला साष्टांग नमस्कार केला. ‘जय थलैवा’, ‘निरुप्पुडा’ (हे कबालीतलं गाजलेलं गाणं. निरुप्पुडा याचा अर्थ, आग) असे जवळजवळ ओरडतच त्याने त्या कटआऊटसमोर सोबत आणलेला नारळ फोडला. त्यातील पाणी कटआऊटच्या चारी अंगाला फेरून, मग नारळाचा नैवेद्य दाखविला. कटआऊटला निरांजनाने ओवाळले... आपल्या भक्ताची ही निर्मम भक्ती पाहून कटआऊटरूपी तो रजनीकांत देव प्रसन्न झालेला, तिथे उपस्थित असलेल्या साऱ्यांनाच जाणवला बहुतेक. त्यामुळेच की काय, दाक्षिणात्य वाद्यांचे आवाज अधिकच दणक्यात घुमू लागले... लोकही नाचता नाचता घुमू लागले, रजनीकांतच्या प्रेमात...
रजनीकांतवर त्याच्या चाहत्यांचे जे प्रेम आहे, ते काही वेळेस वेडाच्या सीमारेषेला स्पर्श करून येते. दाक्षिणात्य संस्कृतीत सारेच भडक... कपड्याचे रंगही, वागण्याची तऱ्हाही आणि चित्रपटही... पण त्यातही एक लोभस आक्रस्ताळेपणा भरलेला असतो, त्यांच्या जगण्यात. ‘कबाली’चा पहिला खेळ बघायला आलेले जे सात-आठशे चाहते होते, ते असेच भडक रंगात न्हालेले... रामुलू नावाचा प्रेक्षक त्यातलाच एक. त्या दिवशी सकाळच्या सहाच्या खेळाचे काढलेले तिकीट तो सर्वांना दाखवत होता. तो म्हणाला, ‘मी मूळचा तामीळनाडूचा. शिर्डीत कामाला असतो. थलैवाचा कबाली बघायचाच, म्हणून खास शिर्डीहून आलोय मुंबईत. आज सहाचा खेळ बघणार, मग नऊचा, मग बाराचा... तीन खेळ लागोपाठ बघितले की, माझे कान, डोळे तृप्त! हवा तेवढा रजनीकांत मनात साठवून घेणार... आणि पुन्हा शिर्डीत माझ्या कामावर हजर होणार... आज खास सुट्टीच काढलीये...’ तो हे बोलत असतानाचा त्याचा मित्र रामकृष्णन तिथे आला... त्या दोघांचेही तामीळमध्ये काही बोलणे झाले. तो मित्रही मग तिन्ही खेळांची तिकिटे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवू लागला...
पण हेच कशाला, ‘अरोरा’बाहेर त्या िदवशी पहाटे तीनपासूनच रजनीकांतप्रेमींची लगबग सुरू होती. त्यातील अतिउत्साही प्राण्यांनी एका फ्लेक्सवर मधोमध रजनीकांतला विराजमान करून त्याच्या भोवती आपल्या छायाचित्रांची रांगोळी काढली होती. त्यावर ‘वेलकम रजनीकांत अँड हिज फॅन्स’ असे लिहिलेले होते. काही फ्लेक्स जरा वेगळे होते. फॅन्सच्या जागी धारावी भागातील तामीळ संघटनांच्या स्थानिक नेत्यांची नावे व फोटो त्या फ्लेक्सवर होते. त्यांनीही रजनीकांत व चाहत्यांना वेलकम केलेले होते. रजनीकांतचा चित्रपट बघायला जाणे म्हणजे, सत्यनारायणाच्या पूजेसारखा किंवा एखाद्या देवाच्या उत्सव-महोत्सवासारखा माहोल करून टाकला होता या फॅन मंडळींनी... मराठी, हिंदी चित्रपट पाहायला येणाऱ्यांना हे सारे वातावरण अगदीच नवीन...त्यामुळे काही जण नाक मुरडत होते, तर काही जण नाक खुपसत होते.
अखेर पावणेसहा वाजता अरोराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील लोखंडी जाळी हलली आणि बाहेर इतका वेळ दबा धरून बसलेला थलैवाप्रेमी जमाव तीराच्या वेगाने आतमध्ये शिरला. ज्याच्याकडे त्या खेळाचे तिकीट होते, तो प्रत्येक जण दहा एक मिनिटांत आपापल्या जागेवर चित्रपटगृहात स्थिर झाला. माहोल इतका भारावलेला की, मीडियाच्या प्रतिनिधींनाही ‘अरोरा’च्या व्यवस्थापनाने सहाच्या खेळाला चित्रपटगृहात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला... सहा वाजायला काही सेकंदच उरले होते... आतापर्यंत फक्त पांढराफटक असलेला समोरचा पडदा विविध रंगांनी उजळू लागला. चित्रपटाची श्रेयनामावली सुरू झाली... तामीळ चित्रपट पाहात होतो... पडद्यावर काय अक्षरे व संवाद उमटतात, काहीच कळत नव्हते. पण श्रेयनामावलीत रजनीकांतचे नाव आल्यावर प्रेक्षकांनी त्याच्या नावाने जो गिल्ला केला, त्याला तोड नव्हती. श्रेयनामावली संपली... मलेशियाच्या तुरुंगातून सुटका झालेला माफिया म्हणजे, रजनीकांत पडद्यावर अवतरण्याचा तो क्षण जवळ आला... आधी तो पाठमोरा दिसला, मग त्याचे हात, मग त्याच्या चेहऱ्याचा थोडासाच भाग... आणि हा हा म्हणता अख्खा रजनीकांत पडद्यावर अवतरला... आणि चित्रपटगृहामधल्या वेड्यापिशा प्रेक्षकांमध्ये जो उन्माद संचारला, तो अवर्णनीय होता... टाळ्या, शिट्ट्यांनी चित्रपटगृह दणाणून गेले... रजनीकांतने पहिला संवाद म्हणताच पुन्हा जोरजोरात शिट्ट्या. ही अशी शिट्ट्याबिट्ट्यांची उधळण पिटातील प्रेक्षकांची मक्तेदारी, असे आम्हा पामरांना वाटत होते... पण रजनीकांतचे सगळेच निराळे... त्याचा पिटातील (पक्षी : स्टॉलमधील) व बाल्कनीतील प्रेक्षक फक्त तिथल्या खुर्चीत बसतो म्हणून तो त्या श्रेणीतला प्रेक्षक म्हणायचे, बाकी या प्रेक्षकाची प्रतवारी एकच ती म्हणजे, रजनीवेडे... बाल्कनीतला प्रेक्षक हा स्टाॅलच्या प्रेक्षकापेक्षा अधिक महागडे कपडे घालणारा, उंची मोबाइल वापरणारा, आपापल्या गाड्यांतून आलेला आहे, हे स्पष्टपणे डोळ्यांना िदसत होते. पण थलैवाच्या अॅक्शनला आणि संवादांना दाद देताना हे स्टॅाल, बाल्कनीचे झंजटच मिटले होते... या प्रेक्षकांत महिलावर्गही लक्षणीय संख्येने होता, तेही सकाळी सहाच्या शोला. मुंबईमधील चित्रपटखेळांच्या माहोलमध्ये हे चित्र आक्रित वाटावे असेच...
अरोरा हे मुंबईत दाक्षिणात्य चित्रपट झळकण्याचे माहेरघर... या चित्रपटगृहाची इमारत जुनीपुराणी... इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या दुकानांची अवस्था न्यायालयीन खटल्यांमुळे जीर्णशीर्ण झालेली... पण ‘कबाली’ लागणार म्हटल्यावर चित्रपटगृहाच्या आतील भिंतीवर रंगांचे दोन हात फिरले, मोडक्या आसनांची डागडुगी झाली... स्क्रीन नवीन बसविण्यात आला... इतके दिवस दुर्लक्षित असलेली म्हातारी, तिला लॉटरी लागताच घरातल्या सगळ्यांची लाडकी व्हावी, तसे झाले अगदी ‘अरोरा’चे. ‘कबाली’चा सकाळी सहाचा खेळ सुरू असताना पडद्याच्या पुढे जी थोडी मोकळी जागा असते, तिथेच डाव्या अंगाला कोपऱ्यात एक साठीचा गृहस्थ प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसला होता. कोणीतरी खास असावा. त्याला चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांपैकी कोणी मध्येच चहा आणून देत होते, तर कोणी समोसा... उत्सुकतेने पुढे जाऊन विचारले की, तुम्ही चित्रपटगृहाच्या मालकांपैकी आहात का? ते गृहस्थ ‘नाही’ म्हणाले. ते एवढेच म्हणाले, “मी डिस्ट्रिब्युटर आहे...’
त्यांना विचारले की, ‘कबाली कसा वाटतोय?’
ते म्हणाले, ‘पैसा वसूल’...
वितरक असो वा प्रेक्षक, रजनीकांतच्या बहुतेक चित्रपटांना तो हेच म्हणतो... पैसा वसूल...!!!
तीन तासांचा तो चित्तचक्षुचमत्कारिक रजनीखेळ पाहून बाहेर आल्यानंतर ‘अरोरा’च्या बाहेर पहाटे पाचला पाहिली होती तशीच गर्दी नऊच्या खेळाला जमलेली दिसली. सहाचा खेळ पाहून बाहेर पडलेल्या प्रेक्षकांपैकी एकेकाला धरून प्रतिक्रियेच्या विटेवर उभे करण्याची घाई न्यूज चॅनेल, न्यूज वेबसाइट व वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींना लागलेली दिसली. त्या गर्दीतून वाट काढत चित्रपटगृहाबाहेर येत असतानाच अरोराचे मालक नंबीराजू भेटले. इतर वेळेला तुळतुळीत दाढी केलेले हे गृहस्थ त्या दिवशी ‘कबाली’मध्ये सुटाबुटातला पांढरी दाढीधारी रजनीकांत जसा दिसतो, अगदी तशा वेषात चित्रपटगृहात हजर होते... शहाणा वेडा म्हणतात तो हाच... येत्या दोन आठवड्यांचे सारे शो फुल आहेत, असे ते खूप अभिमानाने सांगत होते...
नंबी राजन सांगत होते, ‘रजनीकांत ज्या स्टाइलने डायलॉग म्हणतो, ज्या वेगाने-आवेगाने अभिनय करून शत्रूला चारीमुंड्या चीत करतो, ते प्रेक्षकांना भावतेच; पण रजनीकांतचा सोशल कनेक्ट जबरदस्त आहे. प्रेक्षकांशी त्याची नाळ इतकी घट्ट जुळली आहे की, ते त्याला देवच मानतात. म्हणून तर त्याच्या कटआऊटवर दुधाचा अभिषेक होतो, त्याची आरती केली जाते... त्याची ‘लार्जर दॅन लाइफ’ प्रतिमा प्रेक्षकांनीच निर्माण केली व त्यांनीच ती जपून ठेवली. अख्ख्या ‘कबाली’ चित्रपटात तू एक तरी असे दृश्य बघितलेस का की, रजनीकांतला दुसऱ्या खलनायकाने थोबाडीत मारली आहे किंवा जीवघेणी मारहाण केली आहे... असे एक जरी दृश्य चित्रपटात दिसले ना तर रजनीकांतला मारणाऱ्या कलावंताला प्रेक्षक वास्तवात इतका बुकलतील की, तो खलनायक पुन्हा चित्रपटात काम करूच शकणार नाही.’
‘रजनीकांतचा एखादा चित्रपट तोट्यात गेला तर तो आपल्या मानधनात कपात करून ती उरलेली रक्कम त्या चित्रपटाच्या वितरकाला देतो व जगवतो. अनेकांच्या लग्न, घरच्या इतर कार्यांमध्ये रजनीकांतकडून गाजावाजा न करता मदत पोहोचती झालेली असते. आपल्या ६५ वर्षांच्या आयुष्यात रजनीकांतने अशी हजारो, लाखो घरे जोडली, म्हणूनच तो अशा सुपरसुपरस्टारपदी विराजमान झालाय की ते स्थान अढळच आहे.’ नंबी राजन यांना किती सांगू, किती नको, असे होत होते...
सकाळी सहाच्या खेळाला उपस्थित राहून निघालो. नंतर दिवसभर बातम्या येतच राहिल्या की, प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकरही ‘अरोरा’मध्ये कबाली बघून गेला वगैरे वगैरे...वस्तुत: ‘कबाली’ची पटकथा ही कोणत्याही सर्वसामान्य मारधाडपटासारखीच. रजनीकांतचा अभिनयही चालू कॅटॅगरीतला... पण तरीही ‘अरोरा’मध्ये रजनीकांत जो काही दशांगुळे वर उरलेला बघायला मिळाला त्याला अक्षरश: तोड नव्हती...
--------------

Wednesday, July 13, 2016

रेल्वेच्या इतिहासाचे साक्षीदार - दै. दिव्य मराठीच्या १३ जुलै २०१६च्या अंकात लेख प्रसिद्ध.


दै. दिव्य मराठीच्या १३ जुलै २०१६च्या अंकात संपादकीय पानवर प्रासंगिक या सदरात मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची टेक्स्ट व वेबपेज लिंक तसेच मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurang…/…/13072016/0/6
http://divyamarathi.bhaskar.com/…/EDT-sameer-paranjape-arti…
---
रेल्वेच्या इतिहासाचे साक्षीदार
-----------------
- समीर परांजपे
--------------
हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी मनाचाही वेग मोडी, मग कैची हत्ती घोडी... भारतात आगगाडीच्या आगमनाचे स्वागत करणारी एक कविताच गोविंद नारायण माडगावकर यांनी ‘मुंबईचे वर्णन’ या आपल्या पुस्तकात ‘कटाव’ या शीर्षकाखाली उद््धृत केली आहे. ब्रिटिशांनी भारतातील आपले साम्राज्य अधिक मजबूत होण्यासाठी तसेच दळणवळण वेगाने होण्यासाठी आगगाडी म्हणजेच रेल्वेचे जाळे विणले. १६ एप्रिल १८५३ रोजी बोरिबंदर ते ठाणे यादरम्यान भारतातील पहिली रेल्वेगाडी धावली. ती जीआयपीआरचीच होती. ब्रिटिश संसदेने मंजूर केलेल्या कायद्यानुसार ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेची (जीआयपीआर) स्थापना १ ऑगस्ट १८४९ रोजी करण्यात आली होती. या घटनेला येत्या १ ऑगस्टला १६७ वर्षे पूर्ण होतील. जीआयपीआर रेल्वेच्या रूपाने भारताला दळणवळणाची जी नवसंजीवनी मिळाले त्या रेल्वेचे महत्त्व आजतागायतही तितकेच कायम आहे. पुढे जीआयपीआरचे १९५१ मध्ये मध्य रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात आले. पण जीआयपीआरचा इतिहास हे भारताच्या विकासातील लखलखीत पान आहे. या इतिहासाशी निगडित दुर्मिळ कागदपत्रे, दस्तऐवज व्यवस्थित जतन करून ठेवणे आवश्यक होते. याची नेमकी जाण असल्याने जीआयपीआरशी निगडित सुमारे १०० ऐतिहासिक व दुर्मिळ कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. देशातील पहिली गाडी जिथून प्रथम धावली त्या बोरीबंदर स्थानकाचे पुढे व्हिक्टोरिया टर्मिनस (व्ही.टी.) असे नामकरण झाले. काही वर्षांपूर्वी व्ही.टी.चे छत्रपती शिवाजी टर्मिनस (सी.एस.टी.) असे पुनर्नामकरण झाले. त्या स्थानकात साजरा करण्यात आलेल्या हेरिटेज आठवड्यादरम्यान अलीकडेच ही १०० कागदपत्रे मध्य रेल्वेने महाराष्ट्र राज्याच्या मुंबईतील पुराभिलेखागाराकडे जतनासाठी सुपूर्द केली. मुंबईतील फोर्ट विभागातल्या एल्फिन्स्टन काॅलेज इमारतीमध्ये हे पुराभिलेखागार आहे. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जीआयपीआरने देशाच्या विकासात कोणती महत्त्वाची भूमिका बजावली याचे दर्शन या कागदपत्रांतून होते. त्याचप्रमाणे जीआयपीआरने घेतलेले महत्त्वाचे निर्णय, या रेल्वेने महसूल मिळवण्यासाठी त्या वेळी प्रकाशित केलेल्या नियतकालिकांचे अंक, अशा गोष्टींचा या कागदपत्रांमध्ये समावेश आहे. जीआयपीआरच्या अधिकाऱ्यांनी लंडनच्या अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रांतून अनेक ऐतिहासिक संदर्भाचाही उलगडा होत जातो. या कागदपत्रांतील जी अगदी जुनी आहेत त्यांचे लॅमिनेशन केले जाईल. जी कागदपत्रे, नियतकालिके अगदीच जीर्ण झाली आहेत, त्यांना स्पर्श न करता त्यांचे विशेष स्कॅनरद्वारे स्कॅनिंग व डिजिटलायझेशन करण्यात येईल. म्हणजे या कागदपत्रांचे अजून तुकडे पडणार नाहीत. दस्तऐवज किंवा जुनी हस्तलिखिते, पुस्तके यांच्या जतनीकरणासंदर्भात आपल्या देशामध्ये तसा आनंदीआनंद आहे. त्यामुळे जीआयपीआरच्या दस्तऐवजांचे योग्य जतन होणार, ही घडामोड म्हणजे थंड वाऱ्याच्या झुळुकेसमानच अाहे. याआधीही मध्य रेल्वेने १२ मार्च १९९७ रोजी जीआयपीआरच्या संदर्भातील सुमारे पंधरा हजारांवर पृष्ठसंख्या असलेली कागदपत्रे मुंबईतील पुराभिलेखागार कार्यालयाकडे जतनासाठी सुपूर्द केली होती.
जीआयपीआरच्या आगगाडीने अलम मराठी साहित्यिकांना ही प्रेरणा दिली असून तो सांस्कृतिक दस्तऐवजही महत्त्वाचा आहेच. आगगाडी या विषयावर मराठीतील सर्वात पहिले पुस्तक ‘लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन’ हे होय. डाॅ. लाॅर्डनर यांच्या ‘रेल्वे इकाॅनाॅमी’ या इंग्रजी पुस्तकातील निवडक भागाचे कृष्णशास्त्री भाटवडेकर यांनी मराठी भाषांतर करून त्यातून ‘लोखंडी रस्त्याचे संक्षिप्त वर्णन’ हे पुस्तक १८५४ मध्ये म्हणजे आगगाडी धावू लागल्यानंतर लगेचच एक वर्षाने प्रसिद्ध करण्यात आले. मुंबईचे आद्य इतिहासकार गोविंद नारायण माडगावकर यांनी युनायटेड स्टुडंट्स असोसिएशन या संस्थेपुढे ‘आगगाडी’ या विषयावर १५ मार्च १८५८ रोजी दिलेले भाषण लोखंडी सडकांचे चमत्कार या नावाने पुस्तकरूपाने त्याच वर्षी प्रकाशित झाले. त्यानंतरही अनेकांनी रेल्वेवर मराठी पुस्तके व कविता लिहिल्या. आगगाडीला ‘चाक्या म्हसोबा’ म्हणून संबोधण्यात येत असे. १८५३ मध्ये आगगाडी सुरू झाल्यानंतर तिचे महत्त्व जनमानसात रुजायला लागले. अनेक जातींचे लोक, स्त्री-पुरुष हे सर्व एकत्रितपणे प्रवास करू लागले. आगगाडीने भारतीय समाजजीवनात अबोलपणे जणू क्रांतीच घडवली. रेल्वे जाळ्यात भारताचे समग्र दर्शन होते असे म्हणतात ते सर्वार्थाने खरे आहे. आधुनिक भारताला साजेशी बुलेट ट्रेन आता येऊ घातली आहे, पण जीआयपीआरचे ऐतिहासिक महत्त्व हे कायमच राहणार आहे.
(लेखक दिव्य मराठी मुंबई कार्यालयात उपवृत्तसंपादक म्हणून कार्यरत आहेत.)
paranjapesamir@gmail.com

Tuesday, July 12, 2016

हवामान बदलाचा फटका - दै. दिव्य मराठीच्या १२ जुलै २०१६च्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख



दै. दिव्य मराठीच्या १२ जुलै २०१६च्या अंकात संपादकीय पानवर प्रासंगिक या सदरात मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची टेक्स्ट व वेबपेज लिंक तसेच मजकूर व जेपीजी फाइल पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/EDT-sameer-paranjape-arti…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/12072016/0/6/
---
हवामान बदलाचा फटका
---
- समीर परांजपे
----- 
नैसर्गिक व मानवी कारणांमुळे हवामानात झालेले बदल व ग्लोबल वॉर्मिंग या दोन्ही गोष्टींचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील जीवसृष्टीवर होणे अटळच आहे. हवामानात झालेल्या बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती ओढवतात, त्याबरोबरच अनेक रोगांचा फैलावही होत असतो. जगभरात मलेरिया, डायरिया तसेच भयंकर उष्म्यामुळे निर्माण होणारे विकार यांनी ग्रस्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय झाली आहे. हवामानातील बदलामुळे २०३० सालापर्यंत जगभरात बळी पडणाऱ्यांच्या संख्येत दरवर्षी अडीच लाखांनी वाढ होत जाईल, असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच प्रसिद्ध केला आहे. भारतालाही या परिस्थितीचा मोठा फटका बसणार आहे. हवामान बदलामुळे भारतात नेमकी काय परिस्थिती उद््भवेल याचा स्वतंत्रपणे अभ्यास ऑक्सफर्ड विद्यापीठाने केला होता. त्यानुसार २०५० या वर्षी भारतात हवामान बदलामुळे सुमारे १ लाख ३० हजार लोक मरण पावतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबद्दलचा लेख “लॅन्सेट’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वैद्यकीय नियतकालिकामध्ये या वर्षीच्या प्रारंभी प्रसिद्ध झाला आहे. जगभरात विविध उद्योगांतून जे विषारी वायू वातावरणात उत्सर्जित केले जातात, त्यामुळे हवामानात बदल होत असतात. १९९० मध्ये विषारी वायूंच्या उत्सर्जनाचे जे प्रमाण होते त्यात निम्म्याहून जास्त कपात २०५० पर्यंत करण्यात आली तरच हवामानामध्ये घातक बदल होण्याच्या प्रक्रियेवर योग्य नियंत्रण राखता येईल. या आव्हानाचा तातडीने मुकाबला करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेसह अन्य आंतरराष्ट्रीय संस्थांनी तशी पावलेही उचलली. परंतु या प्रयत्नांना सर्वच देशांनी संपूर्ण सहकार्य केले आहे असे झालेले नाही. प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले असून जगातील प्रदूषणामध्ये हे देश मोठी भर घालत असतात. विकसनशील देशांमध्ये प्रदूषणाविरोधात पुरेशी जागृती अजूनही झाली नसल्याने तेथील उद्योगांतूनही विषारी वायू वातावरणात उत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रदूषणाबाबत प्रगत देशांनी सातत्याने विकसनशील देशांकडे आरोपी म्हणून बोट न दाखवता प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही प्रकारच्या देशांकडून कशी होईल याचा विचार केला पाहिजे. त्यासाठीच जागतिक आरोग्य संघटनेने हवामान बदलाच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालातील निष्कर्ष अधिक गांभीर्याने घेतले पाहिजेत.
हवामान बदलामुळे समुद्रपातळी वाढणे, सातत्याने येणारे पूर व चक्रीवादळे या नैसर्गिक आपत्तींचा धोकाही वाढतो. त्याचा परिणाम साहजिकच शेतीवर होत असतो. अन्नधान्याचा दर्जा घसरला तर त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होणे अटळ आहे. हवामान बदलामुळे रोगराईचा प्रसार होतो. ही रोगराई रोखण्यासाठी प्रत्येक देशाची आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्षम असतेच असे नाही. भारतासारख्या देशांत शहरी भाग वगळता ग्रामीण भागांमध्ये अजूनही पुरेशा अारोग्यविषयक सुविधा नाहीत. रोगराईचे संकट हे केवळ विकसनशील देशांप्रमाणेच अमेरिकेसारख्या प्रगत देशालाही छळते आहे. मात्र तेथील आरोग्य यंत्रणा प्रगत असल्याने या रोगांमुळे बळी पडणाऱ्यांचे प्रमाण इतर देशांपेक्षा तुलनेने कमी आहे. काही प्रदूषणे अशी असतात की त्यांचा थेट विपरीत परिणाम लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध मंडळी तसेच अल्प उत्पन्नामुळे दोन वेळचे पोटभर अन्न मिळू न शकणाऱ्या लोकांवर होत असतो. ही संख्या भारतातही मोठी आहे. रोगराईचा सामना करण्यासाठी माणसांची प्रतिकारशक्ती वाढणे हेही गरजेचे आहे. त्यासाठी चांगला दर्जा असलेले अन्नधान्य पिकवणे व लोकांना ते उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. हवामानात होत असलेले बदल लक्षात घेऊन जगभरातच शेती करण्याच्या पद्धतीत बदल झाले पाहिजेत, असे शास्त्रज्ञांचे आग्रही मत आहे. या दृष्टीने भारतानेही आपल्या राष्ट्रीय कृषी धोरणात वेळोवेळी योग्य बदल करीत राहायला हवेत. हवामान बदलामुळे जगभरात पटकीसारख्या रोगांनी दरवर्षी काही लाख लोक मरण पावतात. डेंग्यू रोगाचा प्रसार कितीही उपाययोजना केल्या तरीही रोखता येणे शक्य झालेले नाही. हवामान बदलामुळे मानवी जीवनात जी उलथापालथ होते, ती एक प्रकारे राष्ट्रीय संपत्तीचीही हानी असते. संभाव्य महाशक्ती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भारतासारख्या देशांनी हवामान बदलामुळे होणारे दुष्परिणाम हे राष्ट्रीय संकट मानून त्याच्या निवारणासाठी व्यवहार्य पावले उचलावीत. तसे करण्यासाठी नागरिकांमध्येही जागृती निर्माण करावी.
paranjapesamir@gmail.com
(लेखक उपवृत्तसंपादक आहेत.)

 

Sunday, July 3, 2016

अभिजाततेचे गानशिल्प...(वीणा सहस्त्रबुद्धे यांच्यावरील लेख - दै. दिव्य मराठी २ जुलै २०१६


दै. दिव्य मराठीच्या दि. २ जुलै २०१६ रोजीच्या अंकामध्ये प्रख्यात गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांच्यावर मी लिहिलेल्या लेखाची ही वेबपेज, टेक्स्टलिंक तसेच मजकूर व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-samir-paranjape-column-on-gualher-family-5363310-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/02072016/0/6/
-------------------------
अभिजाततेचे गानशिल्प...
----------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-----
भारतीय शास्त्रीयसंगीत हा एक वटवृक्ष आहे. शास्त्रीय संगीतातील विविध घराणी ही या वटवृक्षाच्या शाखा आहेत. गेली अनेक शतके शास्त्रीय संगीतातील प्रत्येक घराण्याने आपले वैशिष्ट्य प्राणपणाने जपले आहे. कुमार गंधर्व यांच्यासारख्या गायकाने प्रत्येक घराण्यातील उत्तम ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करून नवतेचा जोरदार पुरस्कारही केला. किराणा घराण्याच्या पं. भीमसेन जोशी यांनी गायनातील पारंपरिकता जपत काही वेगळे प्रयोगही केले. गेली अनेक शतके भारतीय शास्त्रीय संगीत टिकले, वाढले ते अशाच गायकांमुळे. ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचीही नाळ याच परंपरेशी घट्ट जुळलेली होती. देशातील जी जुनी ख्याल घराणी आहेत त्यामध्ये ग्वाल्हेर घराण्याचा समावेश होतो. मुघल सम्राट अकबर याच्या कारकीर्दीत ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीला प्रारंभ झाला. उत्तर भारतातील शास्त्रीय गायकीचा बाज हा दक्षिण भारतातील गायकीपेक्षा काहीसा वेगळा आहे. या उत्तर भारतातील संगीताचे जन्मजात संस्कार वीणा सहस्रबुद्धे यांच्यावर झालेले होते. त्यांचा जन्म कानपूर येथे १४ सप्टेंबर १९४८ रोजी झालेला होता. वीणाताईंचे वडील प्रसिद्ध गायक शंकर श्रीपाद बोडस हे पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते. वीणाताईंनी गायकीचे धडे वडील शंकर बोडस तसेच आपले वडील बंधू काशीनाथ बोडस यांच्याकडून घेतले होते. ख्यालगायकी भजनगायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या वीणाताईंनी आपली गायकी ही निव्वळ ग्वाल्हेर घराण्यापुरतीच मर्यादित ठेवली नव्हती. जयपूर किराणा घराण्यातील गायन पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्या गळ्यातून उतरवण्याचा ध्यासही त्यांनी घेतला होता. पंडित गजाननराव जोशी, पंडित वसंत ठकार, पद्मश्री बलवंतराय भट्ट यांच्या गायनाचा संस्कार वीणाताईंच्या गायनावर होता. त्यांनी आपल्या या गायनकळेची संथा आपल्या शिष्यांनाही दिली. त्यांनी अनेक शिष्य घडवले. त्यापैकी अंजली मालकर, सावनी शेंडे ही काही ठळक नावे. अंजली मालकर या वीणाताईंच्या सहवासात सुमारे वीस वर्षे होत्या त्यांच्याकडून मालकरांनी संगीत शिक्षण घेतले. काही गायक हे उत्कृष्ट सादरकर्ते असतात, परंतु ते उत्तम गुरू बनू शकत नाहीत. वीणा सहस्रबुद्धे या उत्तम गुरूही होत्या. पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठामध्ये त्या संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. सुमारे पाच वर्षे त्यांनी या विद्यापीठात संगीत अध्यापन केलेले होते. त्यांना केवळ गायनीकळाच अवगत होती असे नाही तर लहानपणी त्या कथ्थक नृत्यही शिकल्या होत्या. गायन, नृत्य अशा ललित कलांच्या संगमातून त्यांनी आपले आयुष्य समृद्ध केले होते. त्यांना शास्त्रीय संगीतातील अभिजाततेची विलक्षण ओढ होती. ही गायनी अभिजातता आपल्या गळ्यातून अवतरली पाहिजे या ध्यासाने त्या कायम आपला रियाज करीत असत. संगीतावर अशी निष्ठा असणारे गायक-गायिका नव्या पिढीत तुलनेने कमी आहेत. कारण झटपट पुढे जाण्याच्या स्पर्धेत बाजारू संगीताला आलेले महत्त्व. वीणा सहस्रबुद्धे यांनी कधीही संगीतातील तत्त्ववेत्त्याचा आव आणला नाही. आपल्यावर झालेल्या गायनसंस्कारांचा गवसलेला अर्थ त्यांनी अध्यापनातून गायकीतून आपल्या शिष्यांपर्यंत तसेच गानरसिकांपर्यंत पोहोचवला. १९६९ मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्या संगीत अलंकार झाल्या. पुढे १९७९ मध्ये त्यांनी कानपूर विद्यापीठामधूनच संस्कृत या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. या सगळ्या शिक्षण संस्कारांची जोड देऊन त्यांनी आपली गायकी विकसित केली. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विकासासाठी पं. विष्णू नारायण भातखंडे, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, पं. भास्करबुवा बखले आदींनी मोठे योगदान दिले आहे. जयपूर-अत्रोली घराण्याच्या गायिका श्रुती सडोलीकर-काटकर या सध्या उत्तर प्रदेशातील लखनौच्या भातखंडे संगीत विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून उत्तम कार्य करीत आहेत. उत्तर भारतातील संगीताशी मराठी शास्त्रीय गायकांची नाळ अशी जुळलेली आहे. त्या मालिकेतील वीणा सहस्रबुद्धे या महत्त्वाच्या दुवा होत्या. त्यांना २०१३ मध्ये राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. विविध देशांत त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले होते. संगीतातील अभिजाततेचा ध्यास घेतलेल्या वीणाताईंचे गायन म्हणून चिरस्मरणीय ठरले .
(लेखक उपवृत्तसंपादक आहेत.)