Sunday, August 14, 2016

श्वान संहितेची आवश्यकता - दै. दिव्य मराठी १३ ऑगस्ट २०१६. माझा प्रसिद्ध झालेला लेख.



१३ ऑगस्ट २०१६च्या दै. दिव्य मराठीच्या संपादकीय पानावरील प्रासंगिक सदरासाठी मी पुढील लेख लिहिला होता. त्याचा मजकूर, टेक्स्ट लिंक, वेबपेज लिंक व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-sameer-paranjpe-write-editorial-columns-on-dog-issue-in-maharashtra-5395047-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/13082016/0/6/
-----
 श्वान संहितेची आवश्यकता
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
मुंबईसह राज्यातील लहान मोठ्या शहरांमधील भटक्या कुत्र्यांच्या समस्येची कारणे शोधणे व उपाययोजना सुचविणे या दोन हेतूंसाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने राज्यस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. यासंदर्भातील राष्ट्रीय आकडेवारी लक्षात घेतली तर देशात दर साठ माणसांमागे एक कुत्रा असे प्रमाण आहे. गाव असो वा शहर तेथे पा‌ळीव व भटके अशा दोन्ही प्रकारचे कुत्रे आढळतात. पाळीव कुत्र्यांमुळेही सर्वसामान्य नागरिकांना त्रास भोगावा लागतो परंतु त्याचे प्रमाण भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाइतके भीषण नाही. पिंपरी-चिंचवडसारख्या औद्योगिक शहरात सुमारे ३५ हजार भटकी कुत्री असावीत असा एक अंदाज आहे. नाशिक, अकोला, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, कोल्हापूरसारख्या अन्य शहरांतही भटक्या कुत्र्यांची संख्या काही हजारांमध्ये आहे. पुणे शहरामध्ये हीच संख्या ५० हजाराच्या आसपास आहे. मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या २ लाखांच्या पुढे गेली असावी असा अंदाज आहे. २०१२ च्या अहवालानुसार, भारतात किमान २० हजार रेबिजची प्रकरणे समोर येतात तर, मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे.मुंबईत २०११ पासून २०१४च्या एप्रिलपर्यंत तब्बल २ लाख ७५ हजार ६३२ जणांना या भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी ६७ जण मरण पावले. शहरे असो वा गावे तेथे अनेकवेळा पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडतात. नाशिकमध्ये लहान मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने तो मरण पावल्याची घटना अलीकडेच घडली आहे. भटक्या कुत्र्यांना ठार न मारता त्यांचे निर्बिजीकरण करुन त्यांची संख्या आटोक्यात अाणा असा आदेश न्यायालयाने िदला. त्यामुळे विविध महापालिका, नगरपालिकांमधील भटकी कुत्री पकडणाऱ्या विभागांची अवस्था दात काढलेल्या सिंहासारखी झाली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेमधील डॉग स्क्वॉड विभागाकडे कशी अपुरी साधनसामुग्री व मनुष्यबळ आहे याची कहाणी दिव्य मराठीनेच प्रसिद्ध केली होती. प्राणीप्रेमी केंद्रीय मंत्र्यांना भटक्या कुत्र्यांची झळ खूप कमी लागते. त्यांचा खरा त्रास सामान्य माणसांना भोगावा लागतो. पुण्यात पीएपी या संस्थेने २०१४ ते २०१६ दरम्यान १३९२७ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. मात्र ही कुत्री माणसांना चावणारच नाहीत याची खात्री ब्रह्मदेवही देऊ शकत नाही. त्यामुळे भटकी कुत्री ही सामाजिक तणावाचेही कारण बनत आहेत. या कुत्र्यांमुळे जशी भूतकाळात समस्या उद्भवली होती तशी भविष्यातही ती उदभवू शकते.
मुंबई सरकारच्या दप्तरी अधिकृतपणे मुंबई शहरातील ज्या पहिल्या दंग्याची नोंद झाली तो दंगा १८३२ साली घडला. कारण होते भटकी कुत्री! कंपनी सरकारने मुंबईतील सर्वच बेवारशी कुत्री ठार मारण्याचा आपल्या गोर्या सैनिकांना हुकुम दिला. या कामी बक्षिसादाखल प्रत्येक कुत्र्यामागे आठ आणे देण्याचेही जाहीर करण्यात आले. प्रारंभी मारलेली कुत्री पोलिस ठाण्यात दाखवून त्यांच्या संख्येनूसार बक्षिसी गोऱ्या शिपायांना दिली जात असे. पण पुढे मारलेली कुत्री वाहून आणणे जिकिरीचे होऊ लागले. त्यामुळे मारलेल्या कुत्र्यांची केवळ कापलेली शेपटी दाखवून बक्षिसी देण्याचे धोरण कंपनी सरकारने अमलात आणले. पण गोरे सोजिर भलतेच हुशार! ते बेवारशी कुत्र्यांना न मारता केवळ त्यांच्या शेपट्या कापून पोलिस ठाण्यात हजर करु लागले व खिसे गरम करुन घेऊ लागले! अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच ही `शेपटी’ची सवलतही बंद करण्यात आली! तत्कालीन हिंदू व पारशी समाजात गोऱ्या शिपायांच्या श्वान हत्या मोहिमेने संतापाची लाट उसळली. पारशी हे धार्मिकदृष्ट्या कुत्र्यांना पवित्र मानतात, तर हिंदु लोक हे भूतदयावादी. त्यामुळे १८३२ च्या एप्रिल महिन्याच्या सुमारास फोर्टातल्या (कोटातल्या) हिंदू व पारशी संमिश्र लोकवस्तीच्या भागात दोन गोरे सोजिर बेवारशी कुत्र्यांना मारण्याच्या मोहिमेवर हिंडत असताना हिंदू व पारशी जमातीतील तरुणांचा या गोष्टीमुळे इतके दिवस मनात दबलेला राग अचानक उफाळून आला व त्यांनी दंगल सुरु केली. इतिहासातील अशा घटनांमधून सर्वांनीच शिकायचे असते. भटक्या कुत्र्यांची समस्या संपवायची असल्यास तत्वांचा बागुलबुवा न करता व्यवहारी उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत.
(लेखक उपवृत्तसंपादक आहेत.)
----

No comments:

Post a Comment