Saturday, August 16, 2014

डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांच्या आधारेच पुढची वाटचाल - डाॅ. हमीद दाभोलकर - शब्दांकन - समीर परांजपे. - दै. दिव्य मराठी- १७ अाॅगस्ट २०१४. रसिक पुरवणी.



पुरोगामी महाराष्ट्राने स्वत:चे तोंड काळे करावे, अशी क्रूर घटना 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात भरदिवसा घडली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली! या घटनेला येत्या बुधवारी एक वर्ष पूर्ण होईल. डॉ. दाभोलकर यांच्या नसण्याने या वर्षभराच्या कालावधीत आपण नेमके काय गमावले, याचा ताळेबंद मांडत आहेत त्यांचे सुपुत्र डॉ. हमीद दाभोलकर. या लेखाचे शब्दांकन मी केले अाहे. डॉ. दाभोलकरांचे व्यक्तित्व व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील स्वानुभव यांचा ऊहापोह करणारी अंनिस चळवळीचे एक प्रणेते प्रा. श्याम मानव यांची मुलाखत आणि दाभोलकरांच्या हत्येमुळे अंनिस चळवळीचे भवितव्य आता काय असेल, याबद्दल लिहिते झाले आहेत अविनाश पाटील. या सर्व लेखांच्या लिंक्स व डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विषयीच्या लेखांचे रसिक पुरवणीचे पहिले पान यांची जेपीजी फाईल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-articles-on-death-annieversary-of-dr-4715053-PHO.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/17082014/0/1/
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-about-anis-divya-marathi-rasik-4715108-NOR.html
---
विचारांच्या आधारेच पुढची वाटचाल

------
डॉ. हमीद दाभोलकर | Aug 17, 2014, 05:00AM IST
---------
डॉ. नरेंद्र महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली! या घटनेला येत्या बुधवारी एक वर्ष पूर्ण होईल. दाभोलकर यांची हत्या झाल्याच्या घटनेला येत्या बुधवारी, 20 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होईल. डॉ. दाभोलकर यांच्या नसण्याने आम्ही कुटुंबीय, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस), साधना अशा आमच्या सर्वच परिवाराने नेमके काय गमावले, याचा शोध घेत असताना काही गोष्टी समोर येतात. डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे व्यक्तिमत्त्व हे समाजकेंद्री होते. त्यांच्या कुटुंबातील माणसे असोत वा कार्यकर्ते; ही सारी माणसे डॉक्टरांशी समाजकेंद्री दृष्टिकोनातून जोडलेली होती. आपला फुरसतीचा वेळ कुटुंबीयांसाठी द्यावा, असे डॉ. दाभोलकरांचे प्रयत्न असायचे. पण गेली 25 वर्षे ते महाराष्ट्र अंनिस, साधना व अन्य चळवळींच्या कामात इतके गुंतलेले असायचे की, त्यांना हे फारसे शक्य होत नसे. गेल्या काही वर्षांमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जाणीवपूर्वक महाराष्ट्र अंनिस व साधनामध्ये कामे पुढे नेऊ शकणारी सक्षम दुसरी फळी निर्माण केली होती. त्यामुळे आता त्यांना थोडे फुरसतीचे क्षण मिळतील, असे आम्हाला वाटत होते. वडील-मुलगा, वडील-मुलगी, पती-पत्नी अशा नात्यांमध्ये डॉ. दाभोलकर आता आमच्या वाट्याला अधिक येतील, असेही दिसू लागले होते. तसा बदल घडविण्यासाठी त्यांचेही जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू होते. पण त्यांच्या हत्येमुळे दाभोलकर कुटुंबीयांच्या वाट्याला अधिक वेळ देऊ इच्छिणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आता आम्ही कायमचे गमावले आहेत, ही खंत यापुढे कायमच राहील. डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून असंख्य माणसे प्रसंगी स्वत:च्या जिवाला धोका पत्करून आम्हा कुटुंबीय व चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभी राहिली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी गेली पंचवीस वर्षे जे सुसंघटित काम उभे केले, त्याचीच ही फलश्रुती होती. या कार्यकर्त्यांच्या आधारामुळे डॉ. दाभोलकरांचे नसणे सहन करण्याचे बळ येते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर आम्हाला समाजातील प्रवृत्तींची तीव्र टोके अनुभवायला आली. सध्या समाजातील वातावरण कलुषित झालेले आहे. धर्माच्या नावावर जातीय शक्ती अधिकाधिक संघटित होताना दिसत आहेत, तर दुसर्‍या बाजूला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून असलेले सत्ताधारी शासक धर्मांध शक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास कचरत आहेत. राज्यघटनेतील तत्त्वांना अनुसरून विवेकवादाने वागण्याचा आग्रह धरणार्‍यांची गळचेपी कशी होईल, हे जास्तीत जास्त पाहिले जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी गेली 25 वर्षे महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा व्हावा म्हणून अथकपणे प्रयत्न केले. त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साधना परिवाराला मोठा धक्का बसणे हे साहजिकच होते. मात्र त्यामुळे आमची चळवळ खचली नाही.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र अंनिस या सगळ्यातून सावरली. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा झालाच पाहिजे, यासाठी आम्ही गेल्या वर्षभराच्या काळात अधिक जोमाने चळवळ चालविली. त्याच्या परिणामी या राज्यात आता तसा कायदा अस्तित्वात आला आहे. असाच कायदा राष्ट्रीय स्तरावर व्हायला हवा, अशासाठीही आम्ही प्रयत्न सुरू ठेवले आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्र अंनिससह ज्या चळवळी उभ्या केल्या, त्यामध्ये सर्व निर्णय हे लोकशाही पद्धतीने होत असत. सामूहिक नेतृत्वाची संकल्पना त्यांनी या चळवळींमध्ये राबविली होती. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या नंतरही या चळवळींचे कार्य व्यवस्थितपणे सुरू आहे. याचे कारण या चळवळींना त्यांच्या विचारांचा भक्कम पाया आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही काही स्वयंसेवी संस्था नाही. स्वयंसेवी संस्थांमध्ये अनेकदा एकखांबी तंबू असतो. मुख्य प्रवर्तक गेल्यानंतर या संस्थांमध्ये फूट पडते किंवा त्यांचा हळूहळू अस्त व्हायला सुरुवात होते.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतरच्या एक वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र अंनिस वा साधनाबाबत असे काहीही घडलेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या चळवळींमध्ये जी सामूहिक नेतृत्वाची संकल्पना रुजविली, त्यामुळेच पुढच्या फळीचे कार्यकर्ते तयार झाले व त्यांच्याच बळावर महाराष्ट्र अंनिससह आमच्या इतर संस्था भविष्यातील वाटचाल करणार आहेत. महाराष्ट्रातील चळवळींच्या इतिहासातील ही वेगळी घटना असून त्याच्याकडे सामाजिक विश्लेषकांनी जितके लक्ष द्यावे तितके दिलेले दिसत नाही. सामाजिक चळवळी यशस्वी होण्याच्या दृष्टीने सभोवताली तसा व्यापक राजकीय अवकाश असणेही आवश्यक असते. पण सध्याची दुरवस्था ही आहे की, हा राजकीय अवकाश आक्रसत चालला आहे. चळवळींच्या दृष्टीने ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. 1970-80च्या कालखंडात सामाजिक चळवळींचे स्वरूप, त्याविषयीचे आकलन श्रेष्ठ दर्जाचे होते. चळवळींमध्ये झोकून काम करण्यासाठी मध्यमवर्गातून अनेक जण पुढे यायचे. आपली आयुष्यं त्यांनी या कार्याला वाहून घेतली होती. पण सध्या असे चित्र दिसत नाही. समाजातील मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग व अन्य घटकांची सामाजिक चळवळींविषयीची जाणीव कमी झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे सामाजिक चळवळी चालविताना अनेक अडचणी उभ्या राहतात.
डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे, ‘सामाजिक कार्य करताना उभ्या राहिलेल्या अडचणींमुळे अस्वस्थ होऊ नका. या अडचणी ही आपले सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी मिळालेली सुसंधी आहे, असे समजून त्यांच्यावर मात करा व पुढे जात राहा.’ डॉ. दाभोलकर यांच्या या विचारांना अनुसरूनच आम्ही आमचे काम सुरू ठेवले आहे व भविष्यात ते अधिक विस्तारणार आहोत. महाराष्ट्र अंनिस ही महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यांत विस्तारलेली असून तिचे कार्यकर्ते समाजाच्या तळागाळातून आलेले आहेत. डॉ. दाभोलकरांच्या मार्गदर्शनाखाली काही जिल्ह्यांमध्ये अंनिसचे उत्तम नेतृत्व तयार झाले आहे. अंनिसचे काम हे केवळ बुवाबाबांची ढोंगे उघडकीस आणणे इतकेच नसून समाजाला विवेकवादाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणे, हा आमच्या कामाचा आत्मा आहे. त्याच तत्त्वाच्या आधारे गेली 25 वर्षे वाटचाल करीत आलेली अंनिसची चळवळ यापुढेही त्याच मार्गाने जाणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यामध्ये भरदिवसा हत्या झाली. जिथे हत्या झाली तेथपासून 50 फुटांच्या अंतरावर दोन पोलिस ठाणी आहेत. दाभोलकरांच्या हत्येनंतरच्या पहिल्या चोवीस-अठ्ठेचाळीस तासांत पोलिसांनी तपासात खूपच ढिलाई दाखविली. नाकाबंदी नीटप्रकारे करण्यात आली नाही. या गोष्टींचा परिणाम डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर नक्कीच झालेला आहे. ही दुर्दैवी घटना घडून एक वर्ष पूर्ण होत आले तरी अजून आरोपी सापडू शकलेले नाहीत. डॉ. दाभोलकरांची हत्या ही वैचारिक हत्या होती. एका सामाजिक कार्यकर्त्याचा विचार संपविण्यासाठी केले गेलेले हे कृत्य होते, हे लक्षात ठेवून महाराष्ट्रातील पोलिसांनी तपास करायला हवा होता; तसा तो झाला नाही. आता या हत्या प्रकरणाची सूत्रे सीबीआयकडे आहेत. मात्र सीबीआयदेखील विशेष लक्ष देऊन तपास करण्यापेक्षा अन्य गुन्ह्यांचा जसा तपास केला जातो त्याच पद्धतीने काम करताना दिसत आहे. त्याबद्दल समाजातून ज्या पद्धतीने तीव्र प्रतिक्रिया उमटायला पाहिजे, तशी ती आता दिसेनाशी झाली आहे.
डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर जो जनक्षोभ उसळला होता, त्याचे अस्तित्व काही महिने जाणवत राहिले होते. पण अनेक गोष्टी काही काळाने विस्मृतीत घालविण्याची आपल्या समाजाला सवय आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचे प्रकरणही समाज विसरत चालला आहे का, असे वाटण्यासारखी सध्या स्थिती आहे. डॉक्टरांची हत्या करणारे मारेकरी अजून कसे सापडत नाहीत, याबाबत समाजाने सत्ताधार्‍यांवर प्रचंड दबाव आणणे आवश्यक आहे, तरच ही यंत्रणा हलेल. परंतु समाजातून असे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. समाजात धर्मवादी शक्तींचा जोर वाढत आहे. त्यातून हिंसाचारही वाढत चालला आहे. आज हा हिंसाचार आमच्या दारापर्यंत आला. तो उद्या अन्य कोणाच्याही दारात उभा राहू शकतो, याचे भान समाजाने ठेवणे आवश्यक आहे. डॉ. दाभोलकरांनंतरच्या एक वर्षाच्या कालावधीतील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, साधना, परिवर्तन यांच्या कार्याचा आढावा घेतला तर असे आढळेल की, जात पंचायतींच्या अन्याय्य वर्तणुकीविरोधात जे काम डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी काही वर्षांपूर्वी सुरू केले होते, त्या कामाला गेल्या वर्षभरात महाराष्ट्र अंनिसने अधिक गती दिली आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये गारपीट झाल्यानंतर तेथील बाधित लोकांना मदत करण्यासाठी आम्ही हाती घेतलेल्या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ऑनर-किलिंगच्या विरोधात अहमदनगरमध्ये आम्ही जी परिषद घेतली, तिला प्रचंड समर्थन लाभले होते. त्याशिवाय दिवाळी, गणपतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसतर्फे जे उपक्रम गेल्या काही वर्षांपासून राबविले जात आहेत, ते आता निव्वळ संघटनेचे उरले नसून समाजाचे उपक्रम झाले आहेत. हे उपक्रम असेच यापुढेही सुरू राहणार आहेत. गेल्या वर्षभरात जे गमावले त्याचा ताळेबंद मांडतानाच जे हाती उरले आहे त्याचाही विचार सतत समोर असतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्याने आम्ही आमचा खंदा मार्गदर्शक जरूर गमावला आहे, पण त्यांच्या विचारांच्या आधारेच यापुढेही आमची अविचल वाटचाल सुरू राहील.
खंदा मार्गदर्शक गमावला
डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणायचे, ‘सामाजिक कार्य करताना उभ्या राहिलेल्या अडचणींमुळे अस्वस्थ होऊ नका. या अडचणी ही आपले सामाजिक कार्य पुढे नेण्यासाठी मिळालेली सुसंधी आहे, असे समजून त्यांच्यावर मात करा व पुढे जात राहा.’ गेल्या वर्षभरात जे गमावले त्याचा ताळेबंद मांडतानाच जे हाती उरले आहे, त्याचाही विचार सतत समोर असतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्याने आम्ही आमचा खंदा मार्गदर्शक जरूर गमावला आहे; पण त्यांच्या विचारांच्या आधारेच यापुढेही आमची अविचल वाटचाल सुरू राहील.
(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस आहेत.)
शब्दांकन - समीर परांजपे.

No comments:

Post a Comment