Wednesday, June 29, 2016

माझी प्रसिद्ध झालेली सात इ-बुक्स डेलिहंट या मोबाइल अॅपवर उपलब्ध आहेत. त्या अॅपची लिंक. इथे मराठी विभागात क्लिक केल्यानंतर व पुस्तकाचे किंवा लेखकाचे नाव टाइप केल्यानंतर तुम्हाला या पुस्तकाचा संदर्भ मिळेल.
लिंक. -
http://m.dailyhunt.in/Ebooks/?redirect=1




















Monday, June 27, 2016

‘स्टँडिंग ओवेशन’चा ‘कोडमंत्र’! नाटक. दै. दिव्य मराठी रसिक पुरवणी २६ जून २०१६



दै. दिव्य मराठीच्या २६ जून २०१६ रोजी प्रसिद्ध झालेल्या रसिक या रविवार पुरवणीत कोडमंत्र या नवीन मराठी नाटकाविषयी प्रसिद्ध झालेला हा माझा लेख. त्याची लिंक, टेक्स्ट लिंक, टेक्स्ट व जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-samir-paranjape-article-in-marathi-5358209-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/26062016/0/6/
----
"कोडमंत्र' हे गुजराती नाटक मराठी रंगभूमीवर आणणे हे भरतभाई ठक्कर, दिनू पेडणेकर, मुक्ता बर्वे या तिघांचेही ड्रीम प्रोजेक्ट बनले होते. नाटक संपताना टाळ्यांचा कडकडाट आणि स्टँडिंग ओवेशन यासारखी प्रेक्षकांकडून मिळणारी दुसरी दाद नाही. ‘कोडमंत्र’च्या पहिल्या, दुसऱ्या व त्यानंतर सर्वच प्रयोगांना हा अनुभव निर्मात्यांसह सर्व कलाकारांनी घेतला आहे व घेत आहेत...
----
‘स्टँडिंग ओवेशन’चा ‘कोडमंत्र’!
------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
-----
र्वतराजीचे भव्य नेपथ्य... त्यातच सैनिकी छावणीमधील बैठकींचा बाज समाविष्ट... नाटकात वावरणारे ११ कलाकार व त्यांना एकाच वेळी तेवढीच मोलाची साथ देणारे एनसीसीचे अठरा ते वीस कॅडेट... या कॅडेट‌्सनी साकारलेली श्वास रोखून धरायला लावणारी, थरार निर्माण करणारी युद्धदृश्ये, त्यांचे रंगमंचावर होणारे शिस्तबद्ध संचलन, नाट्यगृहात घुमणारे लष्करी इशारे, जयहिंदचा टिपेचा जयघोष या गोष्टींनी वातावरणात चैतन्य निर्माण होतेच, परंतु इतक्या कलाकारांसह नाटक नव्हे तर एक लक्षवेधी चित्रपटच पाहतो आहोत, असा भव्यदिव्य आणि मराठी रंगभूमीवर दुर्मीळ म्हणता येईल असा अनुभव आपण घेत असतो. ‘कोडमंत्र’च्या निमित्ताने आलेली ही भव्यता क्षणोक्षणी रसिकांना सुखावत राहते...
तसे पाहता मराठी रंगभूमी ही आदानप्रदानाची भूमी आहे. गुजराती, पारशी, उर्दू, हिंदी भाषांमध्ये होणारी काही उत्तम नाटके जशी पूर्वी मराठी रंगभूमीवर अनुवादित करून साजरी झाली, त्याचप्रमाणे मराठी व्यावसायिक रंगमंचावरील लोकप्रिय नाटकं गुजराती व अन्य भाषांतील रंगमंचावर नेहमीच येत राहिली आहेत. गुजराती नाटकांचे सर्वात जास्त प्रयोग अहमदाबादमध्ये नव्हे तर मुंबईत होतात. याचे कारण मुंबई ही बहुसांस्कृतिक पैलूंनी घडलेली आहे. इथे मराठीबरोबरच अनेक भाषांतील कलांनाही आपला विकास साधण्याची संधी मिळाली आहे.
गुजराती रंगमंचावर अलीकडच्या काळात जी नाटके सादर झाली, ती पाश्चात्त्य नाटकांची रूपांतरे आहेत. ऑक्टोबर २०१५ पासून गुजराती रंगमंचावर सादर होणारे ‘कोडमंत्र’ हे नाटकदेखील ‘ए फ्यू गुड मेन’ या अॅरॉन सोर्किन लिखित इंग्रजी नाटकावर बेतलेले आहे.
दोन अमेरिकन सैनिकांवर खुनाचा आरोप दाखल झाल्यामुळे त्यांचा बचाव करण्यासाठी कोर्टमार्शलच्या दरम्यान दोन वकील या प्रकरणाच्या मुळाशी जातात. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी या सैनिकांना आरोपी ठरविण्यासाठी रचलेले कारस्थान हे वकील उघडकीस अाणून न्यायालयासमोर सत्यस्थिती सादर करतात, असे ‘ए फ्यू गुड मेन’ या नाटकाचे कथानक आहे. ‘ए फ्यु गुड मेन’वरून गुजरातीत ‘कोडमंत्र’ हे नाटक लिहिताना लेखिका स्नेहा देसाई यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्य घेत काही बदलही केले. भरत ठक्कर यांची निर्मिती व राजेश जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘कोडमंत्र’ या नाटकाने गेले वर्षभर गुजराती रंगभूमी दणाणून सोडली आहे. हे नाटक मराठीत कधीतरी येणार, हे नक्कीच होते. भरत ठक्कर, दिनू पेडणेकर, मुक्ता बर्वे या तिघांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘कोडमंत्र’ हे नाटक आता मराठी रंगभूमीवरही अवतरले आहे. या नाटकातील महिला वकिलाची महत्त्वाची भूमिका मुक्ता बर्वे करीत आहे.
इथे सहज एक आठवण झाली की, ‘कानजी व्हर्सेस कानजी’ हे गुजराती नाटक काही वर्षांपूर्वी सुयोग नाट्यसंस्थेने ‘कृष्णकन्हैया’ या नावाने मराठीत आणले होते. त्यात मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत होता. त्याही आधी गुजराती नाटककार मधु राय यांच्या ‘कोई भी फुल का नाम ले लो’ या नाटकाचे मराठी रूपांतर ‘आणि म्हणून कुणीही’ या नावाने मराठीत सादर झाले होते. त्या वेळी त्याचे दिग्दर्शन दिलीप कुलकर्णी यांनी केले होते. अलीकडेच पुन्हा मधु राय यांच्या ‘कोई भी फुल का नाम ले लो’ याच नाटकावरून ‘हा शेखर खोसला कोण आहे?’ नावाने नवीन मराठी नाटक भद्रकाली प्रॉडक्शनने आणले असून त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
‘कोडमंत्र’ या मराठी नाटकाचेही रसिकांनी स्वागत केले आहे. हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणे हे दिनेश उर्फ दिनू पेडणेकर, मुक्ता बर्वे, भरत ठक्कर यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट बनले होते. त्यापैकी दिनू पेडणेकर यांनी सांगितले, “कोडमंत्र या मराठी नाटकाचा पहिला प्रयोग बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात गेल्या १८ जून रोजी झाला. नाटक संपताना टाळ्यांचा कडकडाट आणि स्टँडिंग ओवेशन यासारखी प्रेक्षकांकडून मिळणारी दुसरी मोठी दाद नसते. ‘कोडमंत्र’च्या पहिल्या प्रयोगाला हा अनुभव माझ्यासकट सर्व कलाकारांनी घेतला. मी तर दुहेरी आनंदात आहे, एक स्टँडिंग ओवेशनचा आणि दुसरा स्वप्नपूर्तीचा... भरतभाई ठक्कर हे गुजराती भाषेतील ‘कोडमंत्र’चे निर्माते. ऑक्टोबर २०१५मध्ये या नाटकाचा शुभारंभ झाल्यापासून मी हे नाटक पाहावं यासाठी भरतभाई आठवड्यातून एक तरी फोन करायचेच, पण काही कारणांमुळे नाटक पाहण्याचा योग येत नव्हता. अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘कोडमंत्र’ पाहिलं आणि मी भारावूनच गेलो. मुक्ताला नाटकाच्या मध्यंतरातच फोन करून आपण हे प्राॅडक्शन मराठीत करणार आहोत, असं सांगून तिला नाटक लवकरात लवकर पाहायला सांगितलं. त्यानंतर हे नाटक पाहिल्यानंतर मुक्ताचीही सेम रिअॅक्शन.”
दिनू पेडणेकर म्हणाले, “कोडमंत्र नाटकाची निर्मिती करण्याचं निश्चित झाल्यानंतर भरतभाईंनी आम्हाला फक्त एकच अट घातली ती म्हणजे, नाटकाचं दिग्दर्शन ज्यांनी गुजराती ‘कोडमंत्र’चं दिग्दर्शन केलंय, ते राजेश जोशीच करतील. मी आणि मुक्ताने या विषयावर कोणतीही चर्चा न करता राजेश जोशी यांच्या नावाला लगेच मान्यता दिली. गुजराती भाषेतील लेखिका स्नेहा देसाईने लिहिलेलं एक दमदार नाटक ज्या दिग्दर्शकाने फक्त तीस बाय वीस फुटाच्या रंगमंचावर ब्रॉडवेवर दाखवल्या जाणाऱ्या नाटकांसारखं बसवून दाखवलं असेल, त्या दिग्दर्शकाच्या नावाला नाकारायचं काही कारणच नव्हतं. राजेशसरांनी किमान दोन महिने तालीम करून नाटकाचा आरंभ करायचं, असं सांगितलं. पहिला अंक बसवला की सेट लावून चार दिवस आणि दुसरा अंक झाला की परत सेट लावून चार दिवस. यानंतर परत छोट्या तालीम हाॅलमध्ये आणि शेवटचे पाच दिवस एखाद्या नाट्यगृहातील रंगमंचावर रंगीत तालीम. यात राजेशसरांची शेवटची पण महत्त्वाची अट होती, निर्मितीमूल्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही. भरतभाईंना गुजराती ‘कोडमंत्र’च्या निर्मितीचा अनुभव असल्यामुळे आणि आम्हीही निर्मितीच्या बाबतीत कोणतीही तडजोड करण्यास तयार नसल्यामुळे राजेशसरांच्या सर्व अटी मान्य करून मिटिंग संपवली...”
कर्तव्य आणि कर्तव्याचा अतिरेक ह्यामधील पातळ सीमारेषा असलेल्या ‘कोडमंत्र’मध्ये अजय पुरकर कर्नल निंबाळकर, तर मुक्ता बर्वे महिला वकील अहिल्या हिच्या भूमिकेत आहेत. लष्करातील नियम, त्या लोकांची विचारसरणी, जीवनपद्धती, कोर्टमार्शलची यंत्रणा या सगळ्याचे दर्शन या नाटकातून प्रेक्षकांना घडते. हे नाटक गुजरातीतून मराठीत आणताना काही बदल करण्यात आले. गुजराती नाटकात राजपूत रेजिमेंटचा उल्लेख आहे, त्या ऐवजी मराठा रेजिमेंटचा उल्लेख करण्यात आला. पात्रांची नावे मराठमोळी करण्यात आली. मात्र नाटकाच्या कथानकात काहीच बदल करण्यात आलेला नाही. लष्करी नियम हे सारखेच असल्याने नाट्यरूपांतर करताना भाषेचा अडसर येण्याचा प्रश्नच नव्हता. गुजरातीप्रमाणेच मराठीतील `कोडमंत्र' नाटकात एकही ब्लॅकआऊट नाही. नाटकातील दृश्यांचा प्रवाह सलग सुरू राहतो. म्हटले तर मराठी नाटकांत हा एक आगळावेगळा प्रयोगही आहे.
----
एन.सी.सी.कॅडेट्सचाही सहभाग
‘कोडमंत्र’ नाटकाच्या मराठी आवृत्तीत ११ कलाकारांसोबत डोंबिवलीच्या के. व्ही. पेंढारकर कॉलेजमधील एन.सी.सी.चे १८ ते २० कॅडेट‌्सही काम करत आहेत. ‘कोडमंत्र’ची तालीम सुरू झाल्यानंतर विलेपार्ले येथील एका कॉलेजमधील एनसीसी विभागातील मुलांनी या नाटकात भूमिका करावी, म्हणून निर्मात्यांनी बोलणे केले होते. पण काही कारणाने ते बोलणे पुढे सरकू शकले नाही. आयत्या वेळी उद‌्भवलेल्या या प्रश्नावर मात करण्यासाठी मिलिंद अधिकारी पुढे सरसावले. त्यांनीच पेंढारकर कॉलेजमधील एनसीसीचे प्रमुख लेफ्टनंट उदय नाईक यांच्याशी संपर्क साधून तेथील काही कॅडेट‌्स नाटकात काम करतील, अशी व्यवस्था करून दिली.
----

Tuesday, June 21, 2016

डॉक्टरांना जाहिरात करु द्या! (दै. दिव्य मराठीच्या २१ जून २०१६च्या अंकात प्रसिद्ध)



दै. दिव्य मराठीच्या २१ जून २०१६च्या अंकामध्ये संपादकीय पानावर प्रासंगिक या सदरात मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाची वेबपेज लिंक व टेक्स्ट, जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/21062016/0/6/
--------
डॉक्टरांना जाहिरात करु द्या!
-------
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
वैद्यकीय व्यवसाय हा व्यापार नव्हे तर सेवाभावी स्वरुपाचा व्यवसाय समजला जातो. त्यामुळे वैद्यकीय व्यवसाय करताना डॉक्टरांनी अव्वाच्या सव्वा पैसे कमावू नयेत, रुग्णसेवेकडे सर्वाधिक लक्ष द्यावे अशी आजपर्यंतची धारणा होती. मात्र आता बदलत्या काळानूसार डॉक्टरांना ही बंधने मान्य नाहीत. डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात करण्याची परवानगी द्या असे मत देशामध्ये नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ७० टक्के डॉक्टरांनी नोंदविलेले आहे. १९५६च्या इंडियन मेडिकल कौन्सिलच्या कायद्याद्वारे या कौन्सिलचे सदस्य असलेल्या डॉक्टरांना काही विशिष्ट प्रसंग वगळता अन्य वेळी स्वत:ची जाहिरात करण्यास बंदी आहे. या कायद्यात २००१ सालापर्यंत तीन दुरुस्त्या झाल्या पण ही बंदी हटविली गेली नाही. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही अॅलोपथी डॉक्टरांची संघटना आहे. होमिओपथी व आयुर्वेद डॉक्टरांच्या संघटना वेगळ्या आहेत. आता कायदेशीर गुंता असा आहे की, एमसीआयचे सदस्य नसलेल्या व इतर पथीच्या डॉक्टरांना १९५६चा वैद्यकीय कायदाच लागू होत नाही. त्यामुळे इतर पथीचे डॉक्टर प्रसारमाध्यमांतून स्वत:ची बिनदिक्कतपणे जाहिरात करताना दिसत आहेत. यातील काही जाहिराती या बोगस उपचार पद्धतींच्या असून त्यामुळे रुग्णांची दिशाभूल होत असते. पण त्याविरोधात कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. अॅलोपथीच्या डॉक्टरांपैकी ज्याने नव्याने प्रॅक्टिस सुरु केली असेल अथवा विशिष्ट कारणामुळे काही काळ त्याला प्रॅक्टिस बंद ठेवायची असेल, प्रॅक्टिसची वेळ किंवा पद्धत बदलली असेल तर ठराविक नमुन्यामध्येच हे डॉक्टर प्रसारमाध्यमांत स्वत:ची जाहिरात करु शकतात. मात्र अन्य वेळी स्वत:ची जाहिरात करण्यास त्यांना १९५६च्या कायद्याद्वारे बंदी आहे. नेमकी हीच बाब अॅलोपथी डॉक्टरांना खटकत असल्याने त्यांनी सदासर्वकाळ स्वत:ची जाहिरात करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे. विविध पथीच्या मोठमोठाल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या जाहिरातीही प्रसिद्ध होताना दिसतात. ही हॉस्पिटल्स एमएसीआयचे सदस्य नसल्याने त्यांनाही जाहिरात करण्यापासून कायद्याने रोखता येणे कठीण आहे. मात्र डॉक्टर मालक असलेल्या नर्सिंग होमने जाहिरात केल्यास ते बेकायदेशीर ठरते. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत असतात. पण त्यांच्या कौशल्याची माहिती रुग्णांना न होता फक्त हॉस्पिटलचा ब्रँड मोठा होत जातो. हे देखील आपल्या क्षेत्रात असाधारण कौशल्य मिळविलेल्या डॉक्टरांना खटकू लागले आहे. त्यातूनच अॅलोपथीच्या डॉक्टरांनी जाहिरातींच्या बाजूने चढा सुर लावला आहे. विशिष्ट आजार व त्यावरचे उपाय याबाबत कौशल्य वाढविलेल्या डॉक्टरांपैकी सगळेच डॉक्टर हे काही मोठमोठाल्या हॉस्पिटलशी संलग्न नसतात. काहीजणांचे स्वत:चे रुग्णालय व प्रॅक्टिस असते. आपला ब्रँड मोठा करावा ही प्रत्येकालाच इच्छा असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विशिष्ट आजारावरील उपायांबाबतची कौशल्यवृद्धी करण्यात तसेच स्वत:चा दवाखाना थाटून प्रॅक्टिस सुरु करण्यापर्यंत मजल गाठेपर्यंत डाॅक्टर वयाची पस्तीशी नक्की गाठतो. दवाखाना सुरु करण्यासाठी येणारा भांडवली खर्चही खूप मोठा असतो. मोठमोठाल्या रुग्णालयांच्या नावाखाली स्वत:चे अस्तित्व झाकून टाकण्यापेक्षा स्वतंत्रपणे व स्वबळावर वैद्यकीय व्यवसायात पाय रोवू इच्छिणाऱ्या डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात करु देणे हे उपकारक ठरु शकेल. या जाहिरातीत आपल्या वैद्यकीय कौशल्यासंदर्भात डॉक्टर जी माहिती देईल त्यातून रुग्णांना नेमके कोणत्या डॉक्टरकडे उपचारांसाठी जावे याचेही वाढीव भान येईल. त्याशिवाय जाहिरातीत नमुद केलेल्या कौशल्याप्रमाणेच डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार न केल्यास डॉक्टरांवर कारवाई करणे अधिक सुलभ होईल. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये दशकापूर्वी झालेल्या सर्वेक्षणानूसार एकुण ५२ मेडिकल स्पेशालिटिज होत्या. आता या स्पेशालिटिजमध्ये खूपच वाढ झाली आहे. त्यातून अचूक निदान व उपायांची शक्यताही वाढली आहे. वाढलेल्या स्पेशालिटिजमुळे वैद्यकीय क्षेत्रात स्पर्धाही निर्माण झाली. सुपरस्पेशालिटिज हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढू लागला. या बदललेल्या मानसिकतेकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया तसेच संसद सदस्यांना कानाडोळा करता येणार नाही. अॅलोपथी डॉक्टरांनी स्वत:ची जाहिरात केली तर तिचा खर्च ते रुग्णांच्या फीतून वसूल करतील अशीही भीती व्यक्त होते. पण या जाहिरातींमुळे रुग्णांना डॉक्टरांचे कौशल्य समजण्यास जी मदत होते तीही नजरेआड करुन चालणार नाही. त्यामुळे अॅलोपथी डॉक्टरांना स्वत:ची जाहिरात सर्वका‌ळ करु देण्यास परवानगी देण्याचे पाऊल आता संबंधितांनी उचलायला हवे.
----

Monday, June 6, 2016

अखेरचे दोन वार - रामन राघववरील लेख ( दै. दै. दिव्य मराठीच्या दि. ५ जून २०१६ रोजीच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध)



दै. दिव्य मराठीच्या दि. ५ जून २०१६ रोजीच्या रसिक पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा हा लेख. त्याची लिंक सोबत दिली आहे. शिवाय रामन राघव या विषयावर माझ्या सहकार्यांचे आज प्रसिद्ध झालेले लेखही दिले आहेत.
रसिक स्पेशल - एक होता रामन राघव...
-----------------------------------------------------
अखेरचे दोन वार
- समीर परांजपे
Jun 05, 2016, 00:51 AM I
------------------------------
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjpe-artic…
२५ ऑगस्ट १९६८ची ती रात्र. मुंबईतल्या मालाड उपनगरातील चिंचोली नाक्याजवळ असलेला डॉ. पुरुषोत्तम वासुदेव उर्फ पी. व्ही. मंडलिक यांचा ‘हिरा-माणिक’ बंगला. त्या लगत असलेल्या त्यांच्याच मालकीच्या म्हशींच्या गोठ्यामध्ये झोपलेल्या दोन उत्तर भारतीय कामकऱ्यांचा एका अज्ञात व्यक्तीने खून केला होता. मंडलिक यांच्या मालकीच्या वास्तूत भाडेकरू म्हणून राहात असलेल्या इनामदार कुटुंबातील किरण हे १९६८मध्ये अवघे तेरा वर्षांचे होते. त्यांना आजही तो दिवस लख्ख आठवतो आहे... किरण म्हणाले, ‘डॉ. मंडलिक हे प्रजा समाजवादी पक्षाचे नेते. त्यांच्याच म्हशींच्या गोठ्यात दोन खून झाल्याने साऱ्या मालाडभर हा चर्चेचा विषय झालेला. लालचंद जगन्नाथ यादव व दुलार जग्गी यादव अशी दोघा मृतांची नावे. वय साधारण २० ते ३५ वर्षे दरम्यानचे. ते गोठ्यातील सारी कामे करायचे. गोठ्यातच एका मोठ्या बाजेवर झोपायचे. तेथेच त्यांचा खून करण्यात आला. २६ ऑगस्ट १९६८ रोजी या दोन्ही यादवांचे मृतदेह पंचनाम्यासाठी सकाळी नऊ-दहापर्यंत तसेच तिथे होते. एक मोठे पोलिस अधिकारी तपासासाठी आले होते. मी त्यांच्याबरोबर गोठ्याच्या परिसरात गेलो होतो. गोठ्यातून दोन माणसांच्या अस्फुट किंचाळण्याचा आवाज बाबू बापू शिंदे व त्यांचा मुलगा रमेश या दोन पहारेकऱ्यांना रात्री आला होता. त्यांनी त्या जागी धाव घेतली, तेव्हा एक माणूस तिथून घाईघाईने नाला ओलांडून पळाल्याचे त्यांनी पाहिले. आणि गोठ्यात जाऊन पहारेकऱ्यांनी बघितल्यावर सारा भीषण प्रकार समोर आला होता. पुढे जी चर्चा कानावर पडली, त्यावरून हे लक्षात आले होते की, मुंबईत एक मनोविकृत माणूस फिरतोय, जो धारदार शस्त्राने व विशिष्ट पद्धतीने माणसांचे खून पाडतो. त्याच प्रकारे मंडलिकांच्या तबेल्यातही दोघांचे खून करण्यात आलेत.’
किरण इनामदार जणू तो काळच डोळ्यांपुढे आणून पुढे झरझर सांगू लागले. ‘२७ ऑगस्ट १९६८ रोजी रामन राघव नावाच्या विकृत माणसाला पकडल्याची बातमी त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत झळकली होती... मंडलिकांच्या मालकीच्या गोठ्यात केलेले दोन खून हे रामनने केलेले शेवटचे खून. त्यानंतर तो लगेचच पकडला गेला. म्हणजे त्याचे खूनसत्र याच तबेल्यात संपले होते.’ किरण इनामदार बोलत असताना समोरच नीला पटवर्धन बसलेल्या होत्या. डॉ. पी. व्ही. मंडलिक ट्रस्टच्या त्या प्रमुख आहेत. त्यांची दुसरी ओळख म्हणजे, मुक्ता दाभोलकर या प्रख्यात सामाजिक कार्यकर्तीच्या त्या सासूबाई. त्या म्हणाल्या, ‘रामन राघवने मंडलिकांच्या गोठ्यात जे दोन खून केले त्या वेळी मी मुंबईतच होते. पुढे मी जळगावला गेले. मात्र १९६८मध्ये खूनसत्र झाले तेव्हा मालाडमधील या जागेत मात्र आम्ही राहात नव्हतो, इतके पक्के आठवते.’ कृष्णाकाठी कुंडल ते उरले नाही असे म्हणतात, त्या प्रमाणेच मंडलिकांच्या त्या जागेत कोणे एकेकाळी असलेला म्हशींचा गोठा, तिथे रामन राघवने घातलेले रक्तथैमान या साऱ्या साऱ्या गोष्टी काळाने जणू पुसून टाकलेल्या आहेत. मंडलिकांच्या गोठ्याच्या जागी आता सोनमर्ग नावाची भलीमोठी इमारत उभी आहे. मात्र मंडलिकांच्या बंगल्याजवळ आजही एक मोठी विहीर आहे. खोल खोल विहीर, जिचा तळ पटकन िदसत नाही. पण खून करण्यासाठी आसुसलेल्या रामन राघवने या विहिरीत त्या वेळी डोकावून पाहिले असेल का? त्याला स्वत:चे हिंसक प्रतिबिंब या पाण्यात दिसले असेल का? असेही विचार मनात येऊन गेले. मंडलिकांच्या बंगल्यावरून पुढे आलो, ते चिंचोली नाक्यावर. समोर एक पेट्रोल पंप दिसत होता. त्याच्या शेजारी प्रशस्त हनुमान मंदिर होते. रामन राघव खटल्याच्या कागदपत्रांमध्ये वाचले होते की, या पेट्रोलपंपाच्या समोर त्या वेळी म्हणजे १९६८च्या सुमारास जय हनुमान नावाचे एक उडुपी हॉटेल होते. आता तिथे वृंदावन नावाचा रेस्टॉरंट बार सुरू आहे. मात्र रामन राघव पूर्वीच्या या जागी असलेल्या जय हनुमान हॉटेलमध्ये नेहमी चहा प्यायला यायचा. रामनला पकडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या ओळख परेडमध्ये जय हनुमान हॉटेलच्या संजीवा शेट्टी या मालकाने त्याला बरोबर ओळखले होते. पुढे या शेट्टीने तशी साक्षही न्यायालयात दिली होती...
मालाडच्या चिंचोली नाक्याहून रेल्वे स्टेशनकडे परतताना मंडलिकांचा बंगला, ते वृंदावन हॉटेल असे सारे डोळ्यासमोर तरळून गेले. रामन राघवचा चेहरा तेवढा आ‌ठवत नव्हता. तसेही त्याला कधी पाहिलेही नव्हते. एरवी हिंसक, रक्ताळलेले वास्तव कुणाला आठवायला आवडेल?
paranjapesamir@gmail.com
-----------
वन टाइट स्लॅप !
- विनोद तळेकर
‘रामन राघव २.०’ येतोय... दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि गुणाढ्य नट नवाजुद्दिन सिद्दिकी त्याचे रुपेरी पडद्यावरचे कर्ता-धर्ता आहेत...
आजची पिढी एक थ्रीलर म्हणून हा सिनेमा एन्जॉय करील, पण १९६०च्या दशकाच्या अखेरीस राघव हे मुंबई शहरातलं थरकाप उडवणारं वास्तव होतं...
एका पाठोपाठ एक ४२ खून करणारा राघव मुंबई पोलिसांसाठी सर्वार्थाने आव्हान ठरला होता. त्याची केस पोलिस दल आणि कायद्याच्या दृष्टीने ‘लँडमार्क’ केस ठरली होती. आज जवळपास ५० वर्षांनंतर या सिनेमाच्या निमित्ताने जुन्या पिढीतल्या अनेकांच्या या मनोरुग्ण गुन्हेगाराशी जोडलेल्या आठवणी जाग्या झाल्या आहेत...
या पार्श्वभूमीवर रामनला जेरबंद करणारे आणि आता वयाच्या नव्वदीत असलेले निवृत्त अधिकारी अॅलेक्स फियालो, त्या वेळी बचाव पक्षाचे वकील असलेले अॅड. एस. आर. चिटणीस, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद पाटकर आणि राघवने केलेल्या शेवटच्या दोन खुनाच्या आठवणी मनात आजही ताज्या असलेले किरण इनामदार, नीला पटवर्धन यांना भेटून रामन राघवचा भूूतकाळ नव्याने जिवंत करणारी, ही स्पेशल कव्हरस्टोरी...
ते दिवसच असे होते की, फक्त पोलिसच नव्हे तर सर्वसामान्य लोकही चोवीस तास या एका सिरियल किलरचाच विचार करत. नाक्यावर-घरात-ऑफिसात लोकांच्या शिळोप्याच्या गप्पांमध्येही त्याचाच विषय असे. कुणी म्हणे त्याच्याकडे मायावी शक्ती आहे, तर कुणी म्हणे तो प्राण्याचे रूपही घेतो, आणखी कुणी तरी त्याला उंच झाडावर झोप घेताना पाहिल्याचे सांगे. एका अनामिक भीतीने संध्याकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यावर सामसूम होई. आया आपल्या मुलांना लवकर झोपा नाहीतर ‘तो’ येईल, अशी भीती घालत. तरणीताठी पोरं हातात लाठ्याकाठ्या घेऊन रात्री-बेरात्री रस्त्या-रस्त्यांवर गस्त घालत. सोबतीला शहरभरात तब्बल दोन हजार पोलिस रोज डोळ्यात तेल घालून त्याचा शोध घेत, पण पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डमधल्या फोटोतला तो काही हाती लागत नव्हता. मात्र, कुणी त्याच्याचसारखा दाढीधारी संशयास्पद हालचाली करताना आढळला की, पोलिस त्याला पोलिस ठाण्यात आणून चोप देत...
त्याने लोकांचे चश्मे चोरले, कुणाच्या तरी बिड्या चोरल्या, इतकंच नव्हे तर हातशिलाई करताना सुई टोचून इजा होऊ नये म्हणून बोटावर लावण्याची टोपणं म्हणजे अंगुस्तानंही त्याने चोरली... असा हा भुरटा चोर मरेपर्यंत तुरुंगात होता. विशेष म्हणजे, त्याला पकडणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यालाही त्याची केस आपल्या पोलिस कारकिर्दीतली सर्वात मोठी कामगिरी असल्याचे वाटत होते... कारण काय, तर या चोराने या भुरट्या चोऱ्या करताना निर्घृणपणे खून केले होते. थोडेथोडके नव्हे तर चक्क ४२ खून... आणि त्या आरोपीचे नाव होते, रामन राघव... ज्याने सत्तरच्या दशकात मुंबईची झोप उडवली होती, तोच हा सिरियल किलर रामन राघव उर्फ सिंधी दलवाई उर्फ थंबी...
“माझ्या पोलिस कारकिर्दीत मी हाताळलेल्या केसेसपैकी ही सर्वांत बेस्ट. कारण ज्याच्या मागे संपूर्ण पोलिस खाते लागले होते, त्या सिरियल किलरला मी पकडले होते...’ वयापरत्वे सुरकुतलेल्या चेहऱ्यावरील सोनेरी चश्म्याआडच्या हसऱ्या आणि चमकदार डोळ्यांचे अॅलेक्स फियालो सांगत होते... वय नव्वद वर्षे. बरेचसे विरळ झालेले पांढरे केस... ओठांच्या शेवटाकडे उतरत जाणाऱ्या पांढऱ्या मिशा... काळा-पांढरा चेक्सचा शर्ट आणि राखाडी रंगाची ट्राऊझर घातलेल्या फियालोंच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता...
२७ अॉगस्ट १९६७ची ती एक पावसाळी सकाळ होती... दक्षिण मंुबईच्या भेंडी बाजार नाक्यावर सकाळची नेहमीची वर्दळ... कामावर जाणाऱ्यांच्या गर्दीतच फूटपाथवरच्या ठेलेवाल्यांची दुकान मांडण्याची लगबग सुरू होती. ताज्या फुलांचा, गरमागरम भजीचा, कोऱ्या वर्तमानपत्रांचा, दुकानांमधील अगरबत्त्यांचा आणि कसल्याशा धुराचा, असे सगळे गंध एकमेकांमध्ये मिसळून सकाळचे वातावरण तयार झाले होते... मधूनच अंडी आणि पाववाल्यांच्या सायकलची ट्रिंग ट्रिंगही ऐकू येत होती आणि गर्दीतून वाट काढणाऱ्या हातगाडीवाल्यांचे किनाटी आवाजही…
बरेच दिवस पावसाने दडी मारल्याने सकाळी आठ वाजताही वातावरणात उष्मा जाणवत होता... अशा बाष्पयुक्त वातावरणात त्या वेळी वयाच्या चाळिशीत असणारे डोंगरी पोलिस ठाण्यातले डे पीएसआय म्हणून अॅलेक्स फियालो आपल्या बीटमध्ये सकाळच्या गस्तीला एकटेच चालत निघाले होते... एसव्हीपी रोडच्या नाक्यावरून ते मुख्य रस्त्याच्या दिशेने ‌‌वळले, तोच समोरून निळा शर्ट आणि खाकी हाफ पँट घातलेला, हातात लांबलचक छत्री धरून चाललेला इसम त्यांच्या दृष्टीस पडला. त्याने तपकिरी रंगाचे कॅनव्हास शूज घातले होते. एरवी, त्या माणसाकडे पाहिल्या न पाहिल्यासारखे करत कदाचित फियालो पुढे गेले असते; पण त्याच्या हातातील छत्रीमुळे त्यांचे कुतूहल चाळवले. गेले पंधरा-वीस दिवस पावसाने दडी मारलेली असतानाही हा इसम छत्री घेऊन का बाहेर पडला, अशी सहज शंका त्यांच्या डोक्यात येऊन गेली. आता तो अगदी दहा-बारा पावलांच्या अंतरावर येऊन ठेपला. जवळ येताच त्याची शरीरयष्टी चांगलीच मजबूत असल्याचे फियालोंच्या लक्षात आले. अखेर त्या माणसाची आणि फियालोंची नजरानजर झाली.
काही पावले पुढे भेंडीबाजार जंक्शनच्या दिशेने निघून गेलेल्या त्या माणसाकडे वळून फियालाेंनी हाक मारली... ‘अरे, भाईसाब जरा रुको’ त्यांच्या या वाक्यावर तो माणूस जागीच थबकला.. ‘जरा इधर आओ’ किंचत दरडा‌वणीच्या सुरात फियालो पुन्हा बोलले. तसा तो माणूस फियालोंच्या जवळ आला. तो ज‌वळ येताच त्याच्या शर्टवरील खांद्याच्या वर मघाशी लांबून न दिसलेला रक्ताचा एक डाग फियालोंंच्या दृष्टीस पडला. ‘चलो जरा मेरे साथ, तुमसे काम है’ असे उद‌्गारत फियालो जवळच असलेल्या आपल्या पोलिस क्वार्टर्सच्या दिशेने चालू लागले. तो माणूसही पाऊलभर अंतर ठेवून त्यांच्या मागोमाग येऊ लागला. चालता चालता फियालोंच्या मनात पुन्हा विचारांचे थैमान सुरू झाले. हा तोच आहे का? ज्याने तमाम पोलिसांची झोप उडवलीय... सिरियल किलर रामन राघव…पण त्याला तर दाढी होती… विचारांच्या तंद्रीत असताना ते आपल्या घराच्या इमारतीच्या खाली पोहोचलेसुद्धा... पाठोपाठ तो माणूसही...
कुलाब्याच्या नाजू मेन्शनमधील घराच्या प्रशस्त दिवाणखान्यात बसून फियालो आपल्या आयुष्यातील सर्वात थरारक, रोमांचक नि यशस्वी दिवसाचे वर्णन करत होते. उत्साहपूर्ण आवाजात ते पुढची कहाणी सांगू लागले... ‘माझ्या घराखाली त्या वेळी एक टेलिफोन बुथ होता. त्याच्या मागच्या बाजूला उभे करून मी त्याची अंगझडती घेतली. त्याच्या अंगझडतीनंतर त्याच्याकडे छत्री वगळता दुसरे कोणतेही हत्यार नाही, अशी माझी खात्री पटली आणि मी निश्चिंत झालो. खरे तर रामन राघवचा फोटो त्या वेळी माझ्या युनिफॉर्मच्या वरच्या उजव्या खिशात होता. तो पडताळून मी खात्री करून घेऊ शकलो असतो; पण मी त्याला अोळखले आहे, हे मी त्याला जाणवू देऊ इच्छित नव्हतो... म्हणून तसे न करता मी त्याचे नाव विचारले, त्यावर तो उत्तरला, ‘साब मेरा नाम सिंधी दलवाई है...’ बस्स... त्याने हे शब्द उच्चारताच माझी खात्री पटली... आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. मग मी त्याच टेलिफोन बुथवरून डोंगरी पाेलिस ठाण्यात फोन लावला. पोलिस व्हॅन आल्यानंतर रामन राघवला गाडीत घातला. एव्हाना रामन राघव पकडल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने पोलिस ठाण्याभोवती हजारो लोक जमले होते. आत जाताच मी ड्युटी ऑफिसरला पोलिस ठाण्याची दोन्ही गेट बंद करण्याचे आदेश दिले. कारण ठाण्याबाहेर जमलेले लोक रागाच्या भरात आत येण्याचा धोका होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ताबडतोब फिंगर प्रिंट एक्सपर्टला फोन केला. काही वेळातच एक्सपर्टने पडताळणी करत सांगितले की, ‘फियालो साब यू हॅव गॉट द राईट मॅन... हा रामन राघवच आहे.’
२७ अॉगस्ट १९६७च्या त्याच सकाळी रामन राघवला अटक केल्याच्या दोन तासानंतर दहाच्या सुमारास तत्कालीन पोलिस आयुक्त मोडक यांच्या कार्यालयातील दूरध्वनी खणाणला. क्षणाचाही वेळ न घालवता त्यांनी रामन राघव केसवर काम करणाऱ्या वाकटकर आणि पेंडसे या आपल्या दोन अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तडक डोंगरी पोलिस ठाणे गाठले. तेव्हा एका लाकडी बाकड्यावर बसलेल्या रामन राघवला एक फोटो दाखवत पीएसआय फियालो काही प्रश्न विचारत होते… बोल इसको पैचानता है तुम? खरं तर तो त्याचाच फोटो होता. पण तरीही आपण त्या व्यक्तीला जणू ओळखतच नसल्याच्या आविर्भावात रामन राघव उत्तरला, पैचानता नही, मगर अपुनके माफिकीच दिखताय… हे उत्तर संपतंय ना संपतं तोवर फियालोंनी त्यांचा पोलिसी खाक्या दाखवत, ‘वन टाइट स्लॅप’ म्हणजेच खाडकन एक थप्पड त्याच्या मुस्काटीत ठेवून दिली. हा असा बोलणार नाही, हे लक्षात येताच मोडक साहेब पुढे सरसावले आणि रामन राघवच्या पुढील चौकशीसाठी त्याला सीआयडीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले… साधारण वर्षभरापूर्वी भुरट्या चोऱ्यांच्या आरोपांखाली रामन राघवला घाटकोपर पोलिसांनी तडिपार केले होते. त्या वेळी काढलेले त्याचे फोटो आणि हातांचे ठसे पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये होते. त्या फोटोत रामन राघवला दाढी होती, आता मात्र त्याने दाढी कापली होती.
मुख्यालयात येताच पुण्यातल्या जोशी अभ्यंकर खून खटल्याचा यशस्वी तपास करणाऱ्या वाकटकर-पेंडसे जोडीने रामन राघवचा ताबा घेतला. ‘हे सर्व खून तू केलेस हे आम्हाला माहीत आहे. आता ते कसे केलेस, हे सांगण्यासाठी तुला आमच्याकडून काय हवे ते सांग.’ वाकटकर यांच्या या काहीशा अडनिड्या प्रश्नावर, ‘मला एक कोंबडी हवीय खायला’ असे तितकेच चमत्कारिक उत्तर त्याने दिले. कोंबडी खाऊन झाल्यावर आता मला बाई हवीय; पण तुमचा कायदा कदाचित या गोष्टीला परवानगी देणार नाही, असे स्वत:च सांगत त्याने मग केसाला लावण्यासाठी तेल, एक कंगवा आणि आरसा मागवला. मग काही वेळ त्याने साग्रसंगीत केसांना तेल लावले, बराच वेळ केस विंचरले आणि शेवटी पोलिसांकडे वळून तो म्हणाला, ‘आता बोला काय विचारायचेय तुम्हाला? मी सगळे सांगतो...’ रामन राघवच्या अटकेनंतर मुंबईतील हत्यांचे सत्र आपोआप थांबले. सोबतच ‘रामन राघवला कधी पकडणार’ अशी पोलिसांना पाहून सर्वसामान्य करत असलेली शेरेबाजीही थांबली... या धाडसी कामगिरीसाठी फियालोंना पोलिस अायुक्त मोडक यांनी त्या वेळी तब्बल एक हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले. तसेच पोलिस खात्याचे बायबल समजले जाणाऱ्या पोलिस जर्नलमध्ये एक माईलस्टोन केस म्हणून रामन राघव केसचा आणि फियालाेंच्या कामगिरीचा समावेश केला गेला...
talekarvinod@gmail.com
घटनाक्रम
१९६५ ते १९६८ :
बहिनिचा आणि एका मित्राचा खुन केल्यानंतर रामन राघवने जवळपास चाळीसएक खून हे मुंबई आणि उपनगरात केले
२५ ऑगस्ट - २६ ऑगस्ट १९६८ :
चिंचोली फाटक (मालाड-मुंबई) येथे रामन राघवकडून दुहेरी खून.
२७ ऑगस्ट १९६८ :
भेंडीबाजार येथे अॅलेक्स फियालो, पोलिस उपनिरीक्षक यांनी अटक केली.
१३ ऑगस्ट १९६९ :
गिरगाव कोर्टाने देहदंडाची शिक्षा ठोठावली. आणि या शिक्षेच्या confirmation करिता उच्च न्यायालयात पाठविले.
ऑक्टोबर १९६९ :
उच्च न्यायालयाने मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक केली आणि पॅरॉनॉइड स्किझोफ्रेनियाचे निदान झाले. आरोपीच्या विरोधात सुरू असलेला खटला आणि त्याची कार्यवाही कळत नसल्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी आरोपीची येरवडा येथे रवानगी.
१९ फेब्रुवारी १९७५ :
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचे म्हणणे ग्राह्य धरले व सरकारचे अपील फेटाळले.
४ ऑगस्ट १९८७ :
सत्र न्यायालयाचा रामन राघव याच्या फाशीचा निर्णय रद्दबादल करण्यात आला. त्याऐवजी आजन्म कारावास ठोठावण्यात आला.
१९९५ :
रामन राघव याचा पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू.
क्रूरतेचा कळस
१९२९मध्ये तामीळनाडूच्या एका छोट्याशा शहरात जन्मलेल्या रामनला लहानपणापासूनच भुरट्या चोऱ्या करण्याची सवय जडली होती. क्रोबार म्हणजे सब्बल नामक ‘एल’ आकाराच्या लोखंडी भरीव रॅाडने तो झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर आठ ते दहा प्रहार करत असे. त्याने आपल्या कबुलीजबाबात एका तिहेरी खुनाचे केलेले वर्णन त्याची क्रूरता स्पष्ट करण्यास पुरेसे आहे. त्या जबाबात राघव म्हणतो, ‘ एके दिवशी मी एक नवीन झोपडी पाहिली. आत डोकावून पाहिले तर एक बाई आणि तिचे मूल झोपले होते. बाईच्या गळ्यात सोन्याची माळ दिसली. मग मी तिच्यावर नियमित नजर ठेवून राहिलो. एके रात्री तिच्या झोपडीच्या दाराची दोरी कापून मी आत घुसलो. ती, तिचा पती आणि तिचे मूल झोपले होते. मी सब्बलने तिच्या पतीच्या डोक्यावर प्रहार करू लागलो. पाच-सहा फटक्यांत तो मेला. पण झालेल्या झटापटीमुळे ती महिला आणि तिचा मुलगा उठून आरडाओरड करू लागले. मग मी त्या दोघांनाही त्याच पद्धतीने खलास केले...
रामन राघवचे वकील...
रामन राघव तुरुंगात असताना तब्बल १९ वर्षानंतर कारागृह प्रशासनाच्या मानसिक आरोग्य केंद्राच्या अधिक्षकांनी त्याच्या मानसित स्थितीबाबत एक अहवाल दिला. ज्यात रामन राघव हा आता मानसिकदृष्ट्या ठीक असून त्याचावर उच्च न्यायालयात खटला चालवण्यास हरकत नसल्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयात पुन्हा खटला उभा राहिला. बचाव पक्षाचे म्हणजे रामन राघवचे वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एस. आर. चिटणीस यांची नियुक्ती झाली. पहिल्या मुलाखतीत तो अगदी सामान्य वाटला. आपण केलेल्या सर्व हत्यांबाबत त्याने न अडखळता सर्व माहिती सांगितली. पण दुसऱ्या मुलाखतीत मात्र तो मनोरुग्ण असल्यासारखा जाणवला

Wednesday, May 25, 2016

दिल्लीतील पाव व ब्रेडमध्ये कर्करोगकारक घटक असल्याचा आक्षेप सीएसई या संस्थेने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर दै. दिव्य मराठीच्या दि. २५ मे २०१६च्या अंकात मी लिहिलेल्या लेखाची ही फाइल



दिल्लीतील पाव व ब्रेडमध्ये कर्करोगकारक घटक असल्याचा आक्षेप सीएसई या संस्थेने घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर दै. दिव्य मराठीच्या दि. २५ मे २०१६च्या अंकात मी लिहिलेल्या लेखाची ही फाइल व मुळ लेखाचा मजकूर व वेब पेज लिंक.
----
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/25052016/0/6/
---
दर्जा ठरविण्याची आलेली `सुसंधी'
---
दिल्लीतील ब्रेड व पावाच्या नमुन्यांमध्ये कर्करोगकारक रसायने सापडल्याचा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयरमेन्ट (सीएसई) या स्वयंसेवी संस्थेने एका पाहाणीतून काढल्यामुळे खळबळ माजणे स्वाभाविकच आहे. केएफसी, डॉमिनोज, स्लाइस ऑफ इटली, हार्वेस्ट गोल्ड, ब्रिटानिया, पिझ्झाहट, मॅकडोनाल्डसह एकुण ३८ कंपन्यांच्या पाव, बन, ब्रेड यांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक पॅकबंद पावांमध्ये पॉटॅशियम आयोडेट, पोटॅशियम ब्रोमेट ही कर्करोगकारक रसायने सापडली या सीएसइने केलेल्या दाव्याची केंद्रीय आरोग्य खाते सर्वंकष चौकशी करणार आहे. त्यातून जे निष्कर्ष सरकारच्या हाती येतील ते त्वरित जनतेच्या माहितीसाठी जाहीर झाले पाहिजेत. सीएसईने आक्षेप घेतलेल्या पाव, ब्रेडच्या उत्पादनांमधील अनेक ब्रँड हे बहुराष्ट्रीय आहेत. त्यांच्या उत्पादनांविरुद्ध सीएसईने केलेला दावा जर खरा ठरला तर या कंपन्यांविरोधात भारतामध्ये वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मात्र या दाव्यात फारसे तथ्य न आढळल्यास बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नजरेत भारताबद्दलची प्रतिमा अजून खालावण्याची शक्यता आहे. सीएसईने ज्यांच्या उत्पादनांवर आक्षेप घेतला आहे त्यांत देशी उत्पादकही अाहेत. त्यांच्यावरील आक्षेप खोटे ठरले तर, तेही सरकारला घरचा आहेर देऊ शकतात. नेस्टले कंपनी बनवत असलेल्या मॅगी नूडल्सबाबत केंद्र सरकार व विविध राज्ये कशी तोंडावर आपटली होती हा इतिहास तर ताजा आहे. मॅगीच्या नूडल्सच्या उत्पादनात शिसे व अन्य घटकांचे मानवी आरोग्यास अपायकारक ठरु शकेल इतके प्रमाण असल्याचा दावा उत्तर प्रदेशच्या अन्न व औषधी नियंत्रण प्राधिकरणाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये केला होता. उत्तर प्रदेशमध्ये मॅगी नूडल्सची दोन लाख पाकिटे विक्रीप्रक्रियेतून माघारी बोलावण्याचा आदेश नूडल्स कंपनीला या प्राधिकरणाने दिला होता. त्यानंतर मॅगी नूडल्सच्या विरोधात जे वादळ उठले त्याचे लोण संपूर्ण देशभर पसरले. विदेशी कंपन्यांची नूडल्स कशी विषारी असतात असा प्रचार करत एका अध्यात्मिक बाबाने आपली स्वदेशी नूडल्स बाजारात आणली. मॅगी नूडल्सच्या वादात दिल्ली, उत्तर प्रदेशपासून विविध प्रयोगशाळांचे अहवाल हे काही वेळेस परस्परभिन्न आल्याने आपल्याकडे वस्तुंच्या दर्जा ठरवण्याबाबत समान धोरण नसल्याचेही लक्षात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी नूडल्सवरील िवक्री बंदी हटविल्यानंतर या उत्पादनाच्या विक्रीमध्ये भारतात आणखी वाढ झाली. याचा अर्थ स्पष्ट होता की, मॅगीच्या विरोधात काही संस्था किंवा प्रयोगशाळांनी घेतलेले आक्षेप सामान्य जनतेने फारसे मनावर घेतले नव्हते इतका या ब्रँडच्या दर्जाबाबत तिच्या मनात विश्वास निर्माण झालेला आहे. भारतात सध्या वातावरण असे आहे की, कोणतीही व्यक्ती, संस्था उठते व नावडत्या उत्पादनांच्या दर्जाबाबत आक्षेप घेते. भारतात विकल्या जाणाऱ्या स्वदेशी व विदेशी ब्रँडच्या सर्व लहानमोठ्या वस्तू, खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर जी मानके आहेत ती आपल्या देशातही अत्यंत काटेकोरपणे पाळली जातील याची दक्षता सरकारने घेतली पाहिजे. किंवा अशी मानके स्वत: तयार केली पाहिजेत की ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मि‌‌‌ळेल. पण यापैकी फारसे काही करण्यास केंद्र सरकार उत्सुक नसल्याने व राज्य सरकारेही आंधळेपणाने निर्णय घेत असल्याने मॅगी प्रकरणात जी नाचक्की झाली त्याचीच पुनरावृत्ती ब्रेड, पाव यांच्या दर्जाबाबत जे आक्षेप घेतले जात आहेत त्याबाबतही होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. पिठावर प्रक्रिया करण्यासाठी पोटॅशियम आयोडेट तर पाव लुसलुशीत करण्यासाठी पोटॅशियम ब्रोमेट वापरले जाते. या दोघांच्याही वापरावर जगातील अनेक देशांत बंदी आहे. हे घटक आपण पाव बनवताना वापरत असल्याचा दावा मॅकडोनाल्ड, ब्रिटानिया आदी उत्पादकांनी केला आहे. मॅगीच्या प्रकरणात तोंडघशी आपटलेली भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएअाय) ही केंद्र सरकारची संस्था पाव, ब्रेड उत्पादनांबाबत सीएसइने घेतलेल्या आक्षेपांबाबत नेमकी काय भूमिका घेते हेही महत्वाचे ठरणार आहे. पाव, ब्रेड यांच्याबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची मानके निश्चित करण्याची मोठी संधी सरकार व एफएसएसएआयकडे चालून आली आहे. या दोघांनीही ही संधी वाया दडवू नये.

Monday, May 2, 2016

१ मे २०१६ रोजी दै. दिव्य मराठीच्या पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा लेख - सफाईदूत



१ मे २०१६ रोजी दै. दिव्य मराठीच्या पुरवणीत प्रसिद्ध झालेला माझा लेख - सफाईदूत
----------
१ मे २०१६ रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिन होता. त्यानिमित्त दै. दिव्य मराठीच्या रसिक या रविवार पुरवणीत १ मे २०१६ रोजी मी सफाई कामगारांच्या स्थितीबद्दल एक रिपोर्ताज लिहिला होता. त्या लेखाची जेपीजी फाइल, तो लेख प्रसिद्ध झालेल्या पानाची तसेच लेखाच्या मजकुराची लिंक पुढे दिली आहे तसेच सविस्तर लेखही....
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-samir-paranjape-about…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/01052016/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/r…/244/01052016/0/6/
----
सफाईदूत
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
---
आनंद व्यक्त व्हावा, पण प्रसंगावधान राखून... या माफक अपेक्षेला "रसिक’च्या संवेदनशील वाचकांचा आक्षेप असू नये. तसा तो असणारही नाही, याची खात्री आहे. याच विश्वासाच्या बळावर यंदाचा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा प्रयत्न आहे. एरवी, ढोल-ताशे बडवून, इतिहासाचे गोडवे गाऊन, रोशणाई आणि आतशबाजी करून दिवस साजरा करता येतो, पण यंदाच्या महाराष्ट्र दिनाला किनार आहे ती, मराठवाडा-विदर्भातल्या भीषण दुष्काळाची आणि कामगार दिनाला संदर्भ आहे तो, वर्षागणिक बेदखल होत चाललेल्या संघटित-असंघटित श्रमिकांचा. याच श्रमिकांमधला सर्वात तळाचा, दर दिवशी जीव धोक्यात घालून शहर-गाव स्वच्छ ठेवणाऱ्यांचा वर्ग आहे, सफाई कामगारांचा. आज प्रातिनिधिक स्वरूपात त्याची दखल घेणे, हे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे आहे. या घटकेला दुष्काळी भागातून उद्याच्या आशेवर शहरांकडे स्थलांतर करणाऱ्या चिंताग्रस्त कुटुंबांची संख्या वाढतेच आहे. महाराष्ट्र दिनाचा आनंद साजरा करताना त्यांच्या कष्टप्रद जगण्याची दखल घेणे, हे सहवेदना जपणे आहेे...
वेळ पहाटे साडेपाचची. रेल्वे स्थानकातून कांदिवली पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर थोडे उजवीकडे वळून कोणा बजाजांचे नाव दिलेली महानगरपालिकेची शाळा. शाळेच्या पुढे एक अरुंद गल्ली. तिथे मुंबई महानगरपालिकेच्या किमान १० ते १२ कचरागाड्या जणू एका शिस्तीत उभ्या. म्हणजे एकदम चिडीचूप उभ्या.
ती चिडीचूप शांतता चिरत गाड्यांच्या दिशेने निघालो. तिथे सुमारे पन्नास एक कामगारांचा घोळका उभा होता. त्यांच्या मधोमध उभा राहून एक जण काहीतरी भाषण केल्यासारखे त्वेषाने बोलत होता. घोळक्याच्या जवळ गेलो. विचारले, अालमुत्तु आहे का? ज्याला विचारले, त्याची नजर माझ्याकडून त्या भाषण करणाऱ्याकडे गेली. तसा निरोपही गेला. आलमुत्तु आमच्या दिशेने आला. येतायेताच आलमुत्तु म्हणाला, ‘मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांपैकी मोटरलोडिंगच्या हंगामी कामगारांनी अाता अचानक काही तासांचा संप सुरू केला आहे.’
आलमुत्तु सांगत होता, ‘मुंबई महानगरपालिकेच्या कायमसेवेत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांचे हाल कुत्रा खात नाही. वर्षातील २४० दिवस जर एखाद्याने काम केले तर त्याला त्या नोकरीत कायम करणे, कायद्याने बंधनकारक आहे. कायद्यातील याच पळवाटेचा फायदा घेत महापालिका हंगामी कामगाराला वर्षभरात २१० दिवस काम देते आणि त्याला कायम हंगामीच ठेवते. आता आता कुठे हंगामी सफाई कामगाराला दर दिवसाची ३५० ते ६०० रुपये मजुरी मिळू लागली आहे. २००४मध्ये मी याच खात्यात हंगामी म्हणून लागलो, तेव्हा दिवसाची ५० रुपये मजुरी मिळायची. आता ती वाढली असली तरी प्रत्यक्ष हंगामी कामगाराच्या हातात किती पैसे पडतात? मधला कंत्राटदार आणि महापालिकेतील अधिकारी पैसे खातो.
आलमुत्तू तामीळ. त्याचे आईवडील तामीळनाडूचे. मात्र त्याचा जन्म मुंबईतील मालवणीतला. तो मुंबईतून तामीळनाडूला शिकण्यासाठी गेला. तेथील त्याची शिक्षणकमाई म्हणजे दहावीत येऊन नापास. या बळावर तो महानगरपालिकेत २००४मध्ये हंगामी सफाई कामगार म्हणून लागला. आलमुत्तू हा कामगार नेते मिलिंद रानडे यांच्या ‘कचरा वाहतूक श्रमिक संघा’चा पहिल्यापासून सदस्य. चळवळ्या व अस्वस्थ. त्यामुळे कांदिवली भागातील हंगामी सफाई कर्मचाऱ्यांचे पुढारपण त्याच्याकडे आपसूकच आले. त्याला नाव विचारले, तर त्याने ठसक्यात पूर्ण नाव सांगितले, ‘आलमुुत्तू दुराईस्वामी हरिजन.’ हसून म्हणाला, हे ‘हरिजन’ नाव म. गांधींनी दिलेले. तामीळनाडूत आमच्या जातीला परायन म्हणतात. तामीळनाडूत आमच्या वाडवडिलांवर अन्याय झाले, म्हणून मुंबईसारख्या शहरांत आलो; पण कचरा, सफाई कामाची साथसंगत काही सुटली नाही. त्याच बरोबर हंगामी कामगार म्हणून होणारी पिळवणूकही टळली नाही. पूर्वी जातीच्या नावावर छळले जायचे, आता पदाच्या आधारे तेच होतेय...’
मुंबई महानगरपालिकेच्या सफाई खात्यात जे हंगामी कामगार आहेत त्यांना हक्कांच्या सुट्ट्यांचे पैसे, वेतनात मिळालेली वाढ, अशा तीन-चार गोष्टींचे पैसे गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेलेच नाहीत. ही रक्कम पालिकेने मंजूर केलेली असली तरी ती त्यांना द्यायची असते, कंत्राटदारांनी. मुंबईतील इतर महापालिका वॉर्डांंमध्ये उशिरा का होईना कंत्राटदारांनी कुंथत कुंथत ही रक्कम हंगामी कामगारांना नुकतेच देणे सुरू केले होते. पण कांदिवली भागातील कंत्राटदार ती द्यायचेही नाव काढेना. त्यामुळेच संपाचे हत्यार कांदिवलीच्या कामगारांनी अचानक उपसले होते. नेमके या संघर्ष प्रतलाभोवती अचानक आम्ही जाऊन पोहोचले होतो.
या हंगामी सफाई कामगारांत एक चुणचुणीत कामगार होता. वय ३५ वर्षे. त्याचे नाव उमाकांत कदम (नाव बदलले आहे.) तो मूळचा रत्नागिरीचा. पण म्हणाला की, माझेही कोणी कोकणात नाही. गाव फक्त सांगायला आहे. माझाही जन्म मुंबईतलाच. दहावी झालो अाणि पालिका सफाई खात्यात कंत्राटदाराकडे हंगामी कामगार म्हणून लागलो. १५ वर्षं झाली आता.’ उमाकांत सांगत होता, ‘पालिकेमध्ये जे कायमसेवेतील सफाई कामगार आहेत, त्यांना आता किमान ३० हजारांपर्यंत वेतन आहे. त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत घेणाऱ्या, मरमर काम करणाऱ्या हंगामी कामगारांना मात्र ९ ते १२ हजार रुपयांपर्यंतच वेतन देऊन गप्प केले जाते? हा कसला न्याय आहे?’
“आम्ही मोटरलोडिंग करतो म्हणजे वाड्यावस्ती, सोसायट्यांमधून कचरा गोळा करून कचरा गाड्यांमध्ये भरतो. तो मग डंपिंग ग्राउंडला रवाना होतो. या कचऱ्यात फुटक्या काचांपासून ते प्रसंगी मानवी विष्ठेपर्यंत वाट्टेल ते असते. ही सगळी घाण मनावर साचवत काम करताना टीबी, त्वचारोग असे सगळे सगेसोयरेही आमच्याकडे वस्तीला येतात...लोकांना वाटते, गटारात उतरून घाण उपसणाऱ्यालाच रोग होतात. असे नाहीये... घाण कुठेही असो, उघड्यावर की जमिनीच्या पोटात, ती साफ करणाऱ्याच्या आरोग्याचे बारा वाजतातच. हंगामी कामगार आजारी पडला की, महापालिका कायमसेवेतील कर्मचाऱ्याला जशा सुविधा देते, त्या प्रमाणात आम्हाला सुविधा देत नाही. एखाद्याला उपचार झेपत नसतील तर तो तसाच धडपडत परवडेबल हॉस्पिटल धुंडा‌ळत राहतो...’ उमाकांत बोलतच होता. त्याला बोलताना अडवणे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे होते...
म्हणून एवढेच विचारले की, ‘चांगले बोलतोस... नेतृत्व का करत नाहीस संघटनेत...’ त्यावर दिवसा हंगामी सफाई कामगार आणि संध्याकाळी मुकादम म्हणून काम करणाऱ्या उमाकांतने दिलेले उत्तर काळीज चिरून गेले... म्हणाला, मी लिडरगिरी करायला लागलो तर मुकादमाचे काम पहिले हातातून जाईल.
आणि काम नीट करत नाही, अशी सबब दाखवून कंत्राटदार कधीही कामावरून काढून टाकेल. त्यासाठी तो कायदा नीट राबवतो... म्हणून मी लिडरगिरीत पडत नाही...’ हे सांगताना उमाकांत मिश्कील हसला... त्याच्या तोंडातला एक चांदीचा दात उठून दिसला.
बोलण्याची ही लांबण सुरू असतानाच आलमुत्तू आम्हाला सोडून पुन्हा कामगारांकडे वळला. ते मग घोळक्याने कांदिवली महानगरपालिका विभागीय कार्यालयात आपल्या मागण्यांसाठी चर्चा करण्याकरिता निघून गेले...
दिवस तोच. वेळ दुपारी दोन वाजताची. ठिकाण होते, कांदिवली पश्चिमेला असलेली शंकर गल्ली. तिथे नव्याने बांधलेल्या फुटपाथवरील गटारांची झाकणे उघडून काही हंगामी कामगार आतली घाण बाहेर काढत होते. गटारात डोकावून पाहिले, तर सगळा सुका कचरा होता...आलमुत्तूने माझी नजर ओळखली. म्हणाला, ‘पुढे चल.’ शंकर गल्लीत एक देऊळ आहे. तिथे रस्त्यावरली चार-पाच गटारे उघडून ठेवली होती. आत वाकून बघितले तर आजूबाजूच्या इमारतींमधून वाहून आलेला मैला गटारात पसरलेला. गटारे साफ करणाऱ्या कामगारांपर्यंत पोहोचलो. गटारात उतरलेला प्रत्येक कामगार उघडा होता. पायात काहीही नव्हते. हाफ चड्डीवर असलेला तो हातात फावडे घेऊन आतली घाण गटाराच्या टोकावर ठेवलेल्या घमेल्यात ओतत होता. त्याचा दुसरा साथीदार ते घमेले गटारीच्या बाजूला रिकामे करत होता. घाणीचे छोटे छोटे डोंगर साचत होते... तेवढ्यात गटाराच्या समोरच्या सोसायटीत राहणारी एक बाई कामगारांपाशी आली. म्हणाली, ‘ओ ती तुम्ही घाण बाहेर काढताय ना ती सोसायटीच्या थोडी पुढे नेऊन टाका... आम्हाला त्रास होतो याचा...’ हे ऐकताच गटारात काम करणारा तो कामगार तिला पटकन म्हणाला, ‘ही तुमच्या सोसायटीचीच घाण आहे...’ तशी ती बाई फणकाऱ्याने पुढे निघून गेली.
तो गटारात काम करणारा कामगार तसाच पुढे निर्विकारपणे काम करत राहिला. हातात हँडग्लोव्हज नव्हते, तोंडाला मास्क नव्हता, पायात गमबूट नव्हते. कारण कंत्राटदाराने या कामगारांना ते कधी दिलेलेच नाही. कंत्राटदार वर्षातून एकदाच त्यांना या ‘चैनीच्या’ वस्तू पुरवतो, असेही कळले. ऋतू बदलला की तुम्ही आम्ही लगेच कपड्यांचा पॅटर्नपण बदलतो. उन्हाळ्यात कॉटनचे कपडे, डोक्यावर टोपी, थंडी आली की कानटोपी, स्वेटर आणि पावसाळ्यात नानारंगी छत्री काय आणि विंडशिटर, रेनकोट असे बरेच काहीबाही घालतो आपण... गटारात काम करत असलेला तो कामगार पाहताना माझ्या डो‌ळ्यासमोर सगळे ऋतू झळकून गेले. हा इतका ‘निचले तपके का’ माणूस आहे का जगाच्या दृष्टीने, की याला ऊन, पाऊस, थंडी यापैकी कशाकशाचा म्हणून त्रास होत नाही? ज्या शहर, गावाने केलेली घाण हा नोकरी म्हणून का होईना साफ करतोय, त्याला त्या घाणीपासून वाचण्यासाठी संरक्षक साधने पालिकेने द्यायला नकोत? ती मिळतात की नाही याकडे दक्षतेने पाहणे, हे दक्ष लोकांच्या राजवटीत व्हायला नको? मोठमोठ्या विकासाच्या, तत्त्वाच्या उजव्या-डाव्या गप्पा मारतो, पण या देशात हजारो-लाखो सफाई कामगार जीवावर उदार होऊन रोज आपण केलेली घाण काढत असतात. आपण त्यांना माणूस म्हणून प्राथमिक सुविधाही देत नाही. विकासाच्या दिव्यदृष्टीत या सफाई कामगारांचे स्थान काय, हे सत्ताधारी कधी सांगत नाहीत, असे नाना तऱ्हेचे विचार येत होते मनात. माझ्यासमोरचा तो हंगामी कामगार मात्र निर्विकार होता. गटारात उतरून काम करत असल्याने त्याचे पाय घाणीने माखलेले होते. फक्त पायच का तर जवळजवळ सारे अंगच... घाणीमुळे गंधाशी जोडलेल्या संवेदना हरवलेला तो कामगार मध्येच आजूबाजूला नजर फिरवत होता. कारण घरातले सर्व बाहेर गेले होते म्हणून त्याने आज आपल्या मुलाला कामाच्या ठिकाणी सोबत आणले होते... आपला बाप काय काम करतोय, याकडे त्याच्या पोराचे लक्षही नव्हते. ते त्या गटाराच्या भोवती मस्त हुंदडत, खेळत होते. भूक लागली म्हणून मध्येच बॉनबॉर्न बिस्किटाचा पुडा घेऊन खात होते, गटाराला चकरा मारत होते...आपल्या भविष्याच्या परिघाभोवती ते पोर नकळत घुमत होते का? स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई असे ठळकपणे रंगविलेली एक भिंत आमच्या समोर होती. त्या भिंतीसमोरच पब्लिकने केलेल्या घाणीत हे वेगळे चित्रही उमटले होते...
मुंबईतील असो वा नागपूर-सोलापूरमधील असो, कायमसेवेतील असो वा हंगामी सफाई कामगार असो, त्यांच्या पगारात जो असायचा तो फरक असेल, पण घाणीच्या संपर्काची व त्यामुळे ओढवणाऱ्या आपत्तींची त्यांच्यावरील संकटतीव्रता मात्र एकच आहे. शेवटी, मनुष्यदेह हा कायम व हंगामी सेवा अशी काही फारकत आरोग्याबाबत करत नाही. कामगार दिन, महाराष्ट्र दिन एकाच दिवशी १ मे रोजी येतो. चांगले आहे. पण ज्यांच्या नावाने हा दिवस पाळला जातो, त्यांच्यावर वर्षभर अन्यायच होताना दिसतो आहे. ही अन्यायाची घाण हंगामी नव्हे तर कायमस्वरूपी साफ व्हायला हवी. अर्थात, घाण तर साफ व्हायलाच हवी; पण मनेही साफ व्हायला हवीत... कायमची...!

Wednesday, March 2, 2016

अणुऊर्जानिर्मिती हाच पर्याय - - समीर परांजपे ( दै. दिव्य मराठी ३ मार्च २०१६)



दै. दिव्य मराठीच्या दि. ३ मार्च २०१६च्या अंकामध्ये मी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याची टेक्स्ट लिंक, मजकूर व जेपीजी फाइल तसेच वेब लिंक सोबत दिल्या आहेत.
http://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-samir-paranjape-article-about-nuclear-power-generation-5263514-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/aurangabad/241/02032016/0/6/
----
अणुऊर्जानिर्मिती हाच पर्याय
---
- समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
----
येत्या दशकभरात देशातील अणुऊर्जानिर्मितीचे प्रमाण तिप्पट करण्याचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवले अाहे. त्या अनुषंगाने २०१६-१७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात अणुऊर्जानिर्मितीसाठी दरवर्षी ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. पुढील वीस वर्षांत दरवर्षी अणुऊर्जानिर्मितीसाठी इतका निधी राखून ठेवण्यात येणार आहे. प्रसंगोपात या निधीत पुढे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा होईल. त्या कालावधीपर्यंत देशात सर्वांनाच चोवीस तास वीज उपलब्ध करून देता येईल अशी धोरणे आखून पावले टाकण्याचे नरेंद्र मोदी सरकारने ठरवले आहे. कागदावर ही घोषणा खूप आकर्षक वाटत असली तरी देशात विजेची असलेली मागणी व होत असलेली वीजनिर्मिती यांच्यात बरीच तफावत आहे. अणुऊर्जानिर्मितीचे महत्त्व पं. नेहरूंनी सर्वप्रथम जाणले. त्यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांमुळेच या क्षेत्रात भारताची वाटचाल सुरू झाली. जगात पारंपरिक स्रोतांतून करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीला काही मर्यादा निश्चितच आहेत. त्यामुळे अणुऊर्जानिर्मितीचे क्षेत्र विस्तारणे हितावह ठरेल हे या क्षेत्रातील तज्ज्ञ वारंवार सांगत असतात. अर्थसंकल्पात अणुऊर्जानिर्मितीसाठी देण्यात आलेला वाढीव निधी हे त्याचेच निदर्शक आहे.
वीजनिर्मितीची आकडेवारी पाहायला मिळते त्यात भारत नेहमीच अग्रेसर दिसतो. २०१३ मध्ये जगातील सर्वात जास्त वीजनिर्मिती करणाऱ्या देशांत भारताचा तिसरा क्रमांक लागला. याबाबत भारताने जपान व रशिया या दोघांनाही मागे सारले आहे. भारतातील एकूण वीजनिर्मितीपैकी रिन्युएबल पॉवर प्लँटमधून २८ टक्के व नॉनरिन्युएबल पॉवर प्लँटमधून ७२ टक्के वीजनिर्मिती होते. भारतामध्ये सध्या १,२५,००० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होते. राष्ट्रीय वीजप्रकल्पांतून ५०,००० मेगावॅट तर राज्यातील वीज प्रकल्पांतून ७५,००० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होते. लहानसहान प्रकल्पांतून ४ ते ५ हजार मेगावॅट वीज तयार होते. पुढील दहा वर्षांचा आढावा घेतल्यास २०२० पर्यंत २ ते अडीच लाख मेगावॅटपर्यंत विजेची गरज पोहोचण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच कोळसा, नाफ्था, बंकर फ्युएल, डिझेल, एलएनजी या वीजनिर्मितीसाठी उपयोगांत येणाऱ्या घटकांच्या किमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरण होऊ लागली होती. या घटकांचा भारतातील वीजनिर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या घटकांच्या किमती अधिक असल्यामुळे वीजनिर्मितीसाठी भारतात कोळसा वापरण्याची प्रथा पहिल्यापासून होती. परंतु आता या घटकांच्या किमती घसरत असल्याने कोळशापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पांना तगडी स्पर्धा निर्माण होऊ शकते. हे खरे असले तरी अणुऊर्जानिर्मितीला पर्याय नाही व या प्रकल्पांची क्षमता वाढवणे निकडीचे झाले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात अणुऊर्जानिर्मितीसाठी वाढीव निधीची तरतूद सरकारने केल्यामुळे काही पावले टाकणे शक्य होणार आहे. पहिले पाऊल म्हणजे अणुऊर्जा कायद्यामध्ये काही सुधारणा करणे आता अपरिहार्य ठरणार आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्राप्रमाणेच खासगी कंपन्यांनाही अणुऊर्जानिर्मिती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे अधिक सुलभ होईल. देशामध्ये ७७०० मेगावॅट वीजनिर्मिती करू शकतील इतक्या क्षमतेच्या १० अणुभट्ट्या कार्यान्वित करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. भारत स्वदेशात बनवणार असलेल्या अणुभट्ट्या उभारण्यासाठी लागणाऱ्या निधीपैकी ३० टक्के निधी समभागांतून तर बाकीचा निधी कर्जरूपाने उभारण्यात येईल. भारतात ज्या विदेशी कंपन्या अणुभट्ट्या उभारतील त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून कर्ज घेण्यात येईल. अणुभट्ट्यांच्या जागा आधी निश्चित केल्याने त्या प्रकल्पांसाठी लागणारा खर्चही कमी होण्यास मदत हाेईल. येत्या २० वर्षांत फास्ट ब्रीडर अणुभट्ट्या उभारण्याचाही भारताचा संकल्प आहे. त्यामुळे जितकी विजेची मागणी आहे त्यापेक्षा जास्त वीजनिर्मिती होऊ शकेल.
भारतात अणुऊर्जानिर्मिती वाढावी असा एक प्रवाह असतानाच त्याला विरोध करणाऱ्या लोकांचा गटही तितकाच प्रभावी आहे. जपानमध्ये तोहोकू येथे झालेल्या भूकंपामुळे व त्यामुळे आलेल्या सुनामीमुळे फुकुशिमा येथील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये ११ मार्च २०११ रोजी पूर्ण यंत्रणा बंद पडली व १२ मार्च रोजी किरणोत्सार होऊ लागला. पुढे त्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. या दुर्घटनेला येत्या ११ मार्च रोजी ५ वर्षे पूर्ण होतील. त्याआधी १९८६ मध्ये रशियातील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातही दुर्घटना घडली होती. या दोन दुर्घटनांचा हवाला देऊन भारतात अणुऊर्जा प्रकल्प नकोत असा आग्रह पर्यावरणवाद्यांकडून धरला जातो. त्यामुळे कोकणात जैतापूर येथे फ्रान्सच्या अरेवा कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांकडून विरोध केला जात आहे. रशियाच्या तांत्रिक सहकार्याने साकारत असलेल्या तामिळनाडूतील कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या विस्तारालाही अशाच विरोधाचा सामना करावा लागत आहे. सहा हजार मेगावॅट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प हरिपूरजवळ उभारू देण्यास पश्चिम बंगाल सरकारनेच विरोध दर्शवला होता. हरिपूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाचा प्रश्न जसा धगधगता होता तसाच जैतापूर व कुडनकुलमचा संघर्ष अजूनही संपण्याची शक्यता दिसत नाही.
केंद्र सरकारच्या नागरी अणुऊर्जा धोरणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही करण्यात आली होती. हे अडथळे पार करून अणुऊर्जानिर्मितीमध्ये वाढ करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारला साध्य करावे लागणार आहे. मात्र असे करताना पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांतील योग्य त्या गोष्टींवर विचार करण्याचा सुज्ञपणाही केंद्र सरकारने दाखवायला हवा. भारत व अमेरिकेमध्ये नागरी अणुसहकार्य करार झाला. तसा करार रशिया व फ्रान्स या देशांशीही भारताने केला आहे. त्यामुळे अणुऊर्जानिर्मितीसाठी लागणारे तंत्रज्ञान व इंधन मिळणे भारताला सोपे जाईल. भारताच्या एकूण वीजनिर्मितीपैकी ३.५ टक्के वीज ही अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे निर्माण होते. हे प्रमाण विस्तारण्यासाठी वाढीव निधीची जी तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, तिचे स्वागतच करायला हवे.