Monday, November 7, 2016

द्रौपदीचे वाण - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी - रसिक पुरवणी ३० ऑक्टोबर २०१६



दै. दिव्य मराठीच्या ३० अॉक्टोबर २०१६च्या रसिक पुरवणीमध्ये मिथक या संकल्पनेभोवती फिरणारे तीन लेख मी लिहिले होते. त्यापैकी हा एक लेख...त्याची लिंक पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-rasik-article-of-drop…
--
द्रौपदीचे वाण...
---
- समीर परांजपे
---
असे म्हणतात की, सारे रामायण घडले ते सीतेचे रावणाने अपहरण केल्यामुळेच... महाभारतही घडले, त्यामागील महत्त्वाच्या कारणांपैकी द्रौपदीचा कौरवांनी केलेला अपमान हेदेखील एक कारण होतेच. पांचाल देशाचा राजा द्रुपद याची द्रौपदी ही मुलगी. यज्ञसेनी, सैरंध्री, महाभारती, कृष्णा अशा अन्य नावांनीही द्रौपदीला ओळखले जात असे. द्रौपदीचा विवाह पाच पांडवांशी झाला. बहुपती प्रथेचे प्राचीन काळापासून भारताला माहीत असलेले हे अतिशय परिचित उदाहरण. बहुपती प्रथा ही काही केवळ प्राचीन काळाचीच मिरासदारी नाही. आजच्या आधुनिक जगातही डोळ्यांना सहज दिसू शकतात द्रौपदी... मग त्या ग्रामीण भागातील असोत वा शहरी भागातील... त्यांच्यातील समान धागा एकच की, परंपरेच्या जोखडात त्या पुरत्या अडकलेल्या आहेत. २१व्या शतकात भारत सज्ज होतोय महाशक्ती बनण्यासाठी, पण त्याच्या मातीत अशाही गोष्टी आहेत अजून, हे सत्य नाकारता कसे येईल?
हिमाचल प्रदेशसारखे राज्य हे निसर्गसौंदर्याने नटलेले नंदनवनच. दरवर्षी हजारो पर्यटक येतात या राज्यात हिमालयाच्या कुशीतील आल्हाददायकतेचा अनुभव घेण्यासाठी. काश्मीर धगधगते असल्याने हिमाचल प्रदेशला पर्यटकांची पसंती ही कायमच असते. या राज्यातील सांगला खोरे हा भाग मधुचंद्रासाठी आसुसलेल्या नवदांपत्यासाठी तर स्वप्नसृष्टीच. शिवाय सफरचंदांच्या बागांनी या भागाला आलेली खुमारी वेगळीच. शिमला ही हिमाचलची राजधानी. तेथून सुमारे २०० कि.मी. अंतरावर असलेल्या किन्नोर जिल्ह्यात असलेल्या सांगला खोऱ्यामधील जनजीवन हे पुराणकथांतील पात्रांची जीवनशैली, वर्तन, आदर्श यांच्याशी जोडलेले. रणजीत सिंग व चंदरप्रकाश हे दोन सख्खे भाऊ. त्यांच्यात विलक्षण प्रेम आणि जिव्हाळा. पण अजूनही एक बंध त्यांना एकमेकांशी जोडून ठेवतो, ते म्हणजे या दोन भावांची बायको एकच आहे ती म्हणजे सुनीतादेवी... या दोन भावांपैकी एकाशी तिचे आधी लग्न झाले. त्यानंतर पाच वर्षांनी तिने आपल्या नवऱ्याच्याच सख्ख्या भावाशी लग्न केले. दोन दादल्यांबरोबर एकत्र नांदणे सुरू झाले. सुनीतादेवीशी तिच्या दोन्ही नवऱ्यांनी ज्या रीतीने विवाह केले, तो हिंदू विवाह कायद्यानुसार गुन्हा आहे.
भारतात ब्रिटिशांच्या राजवटीत व नंतरही बरेच कायदे केले गेले. काही कायद्यांचे सकारात्मक परिणाम नक्कीच झाले; पण काही कायद्यांमधून अशा पळवाटा काढण्यात आल्या की, मती गुंग व्हावी. काही वेळेस कायदा असूनही उपयोग होत नाही, कारण कायदाबाह्य गोष्ट संबंधित व्यक्ती, त्यांचा समाज यांनी मान्य केलेली असते. त्यांच्या लेखी तो गुन्हा नव्हे तर योग्य कृती असते. सुनीतादेवीलाही त्यामुळे बहुपती प्रथेचा भाग होताना फार काही अपराधी वाटले नसावे... तिचे तसे बरे चाललेय. तिला या दोन पतीराजांपासून दोन मुली झाल्या आहेत. आपल्यावर प्रेम करणारे दोन नवरे लाभल्याबद्दल ती उलट परमेश्वराचे आभारच मानते.
परंपरेचा प्रवाह तिच्या घरातून असा वाहात राहतो. तिचे घर ज्या ठिकाणी आहे, त्यापासून जवळच बास्पा नदी वाहते. नदीकिनारी सफरचंदाच्या बागा आहेत... या नदीचा ओघ कमी झाला नाही. तसाच सुनीतादेवीच्या जीवनाचा प्रवाहही खळाळता आहे. त्याला बहुपतीत्वामुळे बांध पडलेला नाही.
महाभारतातील द्रौपदीशी आपले काही नाते आहे का? असा प्रश्न येत असेल का सुनीतादेवीच्या मनात? त्याबद्दल खरंच काही सांगता येणे कठीण आहे. तिच्या दोन पतींपैकी रणजीत हा अर्धवेळ पोस्टमनचे काम करतो, तर दुसरा पती चंदन हा किराणा मालाचे दुकान चालवतो. पाच पतींची पत्नी म्हणून द्रौपदीला ‘पांचाली’ म्हटले जात असे. दोन पतींची पत्नी म्हणून सुनीतादेवीला ‘द्विपती’ म्हणायला हरकत नसावी. पण तिच्या पंचक्रोशीत अशा अजून काही द्विपती स्त्रिया आहेत. एक तर सुनीतादेवीच्या नात्यातच आहे. रणजीत, चंदन यांचे दोन मोठे सख्खे भाऊ अमरजीतसिंग व सोवनसिंग. या दोघांनीही एकाच मुलीशी विवाह केला आहे. अशा प्रकारचे विवाह झालेली सुमारे १५ कुटुंबे सांगला परिसरात आहेत. रणजीत, चंदन, अमरजीतसिंग व सोवनसिंग या चौघांना तर काही गोष्टी वारसाहक्कानेच मिळाल्या आहेत. जसे या चौघांना दोन वडील आहेत आणि आई आहे एकच...
किन्नोर जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात बहुपती प्रथा ही तेथील जनजीवनाचा अविभाज्य भागच आहे. पण अशी प्रथा का पडली असावी? केवळ महाभारतात द्रौपदीने पाच पांडवांशी लग्न केले म्हणून... पण तसे बिल्कुल नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक समाजकारण, अर्थकारण हे असतेच... किन्नोरमध्ये बहुपती प्रथा रुजली, त्यामागे वारसाहक्काने मिळालेल्या शेतीचे िवभाजन होऊ नये, हा विचार प्रबळ आहे. किन्नोर जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्येचे एकही प्रकरण सापडणार नाही. या जिल्ह्यातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ८५७. बहुपती प्रथेला पोषक अशीच ही आकडेवारी आहे. आपल्याला वारसाहक्काने मिळालेली शेतजमीन ही मौल्यवान संपत्तीच आहे, अशी धारणा आदिवासींमध्ये असणे अगदी स्वाभाविक आहे. किन्नोर जिल्ह्यातील आदिवासी जमाती त्याला कशा अपवाद असणार? त्यामुळेच शेतजमिनींचे वाटप होऊन शततुकडे होऊ नयेत, म्हणून जागरूक असलेल्या या लोकांनी बहुपती प्रथेला जवळ केले. दोन पुरुषांनी एकाच स्त्रीशी विवाह करणे, याचा पुढचा टप्पादेखील काही जणांनी गाठलेला दिसतो. किन्नोर जिल्ह्यातील पुह व यांगथांग या अतिदुर्गम भागात चार-पाच भावांनी एकाच महिलेशी सामायिक विवाह केल्याची काही उदाहरणे आहेत. पण या प्रथेमध्येही थोडी सुधारणा होऊन कालांतराने दोन भावांसाठी एक सामायिक पत्नी असे प्रमाण स्थिर झाले आहे.
हमने घर छोडा है...
बहुपती प्रथेचेही काही नियम, गुपिते असतात. जर बहुपतींपैकी एखादा पती सामायिक पत्नीबरोबर रतिक्रीडेत मग्न असेल तर ते इतरांना कळावे, म्हणून तो आपली किन्नोरी टोपी घरातील बेडरुमच्या बाहेर टांगून ठेवतो. ती पाहून इतर पतीराजांना आतील परिस्थितीचा लगेच अंदाज येतो. मग कोणीही त्या खोलीत रममाण झालेल्या दोन जिवांना त्रास द्यायला तिथे जात नाही! बहुपतीत्व आनंदाने स्वीकारणाऱ्या स्त्रियांना काही गोष्टींची मोकळीकही आहे. जसे आपला पती किंवा सहचर कोण असावा, हे निवडण्याचे तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. बहुपती विवाहाला संबंधित महिलेची संमती असली तरच पुढचे पाऊल उचलले जाते. शतकानुशतके या भागात अजून एक प्रथा चालत आली आहे. दारोच फिमू असे तिचे नाव. गावच्या जत्रेतून किंवा सार्वजनिक ठिकाणाहून प्रौढ मुलगा आपल्याला आवडणाऱ्या प्रौढ मुलीला सोबत घेऊन पलायन करतो. त्या मुलाचे नातेवाईक मग त्या मुलीच्या घरी जाऊन लग्नाचा औपचारिक प्रस्ताव देतात. त्या वेळी मुलीच्या नातेवाइकांना फासूर या पेयाने भरलेली एक बाटली दिली जाते. या समारंभाला बोतल पूजा असे नाव आहे. हे सर्व होण्याआधी पळालेल्या जोडप्याने शारीरिक संबंधही प्रस्थापित केलेले असतात. अगदी ‘हमने घर छोडा है’ स्टाइलने...

No comments:

Post a Comment