Monday, November 7, 2016

शेवटच्या आर्यांची विस्मयकथा - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी - रसिक पुरवणी - ३० ऑक्टोबर २०१६



दै. दिव्य मराठीच्या ३० अॉक्टोबर २०१६च्या रसिक पुरवणीमध्ये मिथक या संकल्पनेभोवती फिरणारे तीन लेख मी लिहिले. त्यापैकी हा एक लेख...त्याची लिंक पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-rasik-article-end-of-…
--
शेवटच्या आर्यांची विस्मयकथा
---
- समीर परांजपे
- Oct 30, 2016, 08:33 AM IST
---
भारताचा प्राचीन किंवा वैदिक काळापासूनचा इतिहास आर्य व अनार्य यांच्या भोवतीच फेर घालताना िदसतो. अनार्य हे मूळ भारतातलेच, हे नक्की झाल्याने त्याबद्दल कोणी प्रश्न विचारताना दिसत नाही. आर्यांच्या मूळ वसतिस्थानाबद्दल मात्र प्रकांडपंडितांची विविध मतांतरे आहेत. हिटलरला आपण आर्यवंशीय असल्याचा विलक्षण अभिमान होता. त्या अभिमानापायी त्याने लाखो ज्यूंचा नरसंहार घडवून आणला. थोडक्यात काय, तर आर्य या शब्दाने आधुनिक काळापर्यंत सर्वांनाच पुरते जखडून ठेवले आहे. आर्य हे युरेशियातून भारतात आले होते, की ते मूळ भारतातलेच होते, असा खल सदासर्वदा चाललेला असतो. डॉ. भीमराव आंबेडकरांनी आर्यांच्या मूळ स्थानाबद्दल १९४६मध्ये मांडलेली मते महत्त्वाची वाटतात. ज्यांनी वैदिक वाङ‌्मय तयार केले ते लोक आर्य वंशाचे असून ते मूळचे भारताबाहेरचे होते. पण त्यांनी भारतावर स्वारी केली. आर्यांचा रंग गोरा होता, अशी काही निरीक्षणे डॉ. आंबेडकरांनी नोंदविली आहेत. मानववंशशास्त्रज्ञांनीही आर्यांबद्दलच्या चर्चेत बरीच भर घातली आहे. या सगळ्याचे सार हेच की, आर्य शब्दामागचे कुतूहल काही केल्या संपत नाही व शमत नाही.
हेच कुतूहल घेऊन अनेक विदेशी पर्यटक, संशोधक यांचे पाय वळतात, जम्मू-काश्मीरचा भाग असलेल्या लडाखमध्ये. लडाखची राजधानी लेहपासून १६३ कि.मी. अंतरावर आहेत धा आणि हानू तसेच दारचिक, गहानू ही गावे... या गावांची वस्ती जेमतेम पाच हजारांचीही नसेल. तेथे राहणारे लोक ओळखले जातात ब्रोगपा किंवा ड्रोगपा या नावाने. भारतात कोणे एके काळी असलेल्या आर्यांचे ते अखेरचे उरलेले वंशज आहेत, असे म्हटले जाते. त्यामुळे ही चार गावेही आर्यांची गावे म्हणूनच जगभरात प्रसिद्ध आहेत... हे लोक आता तिबेटियन बुद्धधर्माचे अनुयायी आहेत. पण त्यांचा भूतकाळ काही अभ्यासकांना व आर्यप्रेमींना स्वस्थ बसू देत नाहीये. कोणी म्हणतात, सातव्या शतकात ते गिलगिट (हा भाग आज पाकिस्तानात आहे) भागातून भारतात आले. कोणी म्हणतो की, भारतावर स्वारी करायला आलेल्या अलेक्झांडरच्या सैनिकांचे ते वंशज आहेत... सर्वसामान्य लडाखी माणसापेक्षा या ब्रोगपा लोकांची चेहरेपट्टी अगदी वेगळी आहे, हे वेगळे सांगायला नकोच.
शुद्ध आर्यवंशाचे लोक शोधण्याच्या वेडाने संजीव सिवन या लघुपटकारालाही झपाटले होते... ‘द अचतुंग बेबी - इन सर्च ऑफ प्युरिटी’ या सिवनच्या लघुपटात त्याचा कॅमेरा ब्रोगपांच्या घराघरांत व मनामनांत शिरला आहे. शुद्ध आर्यवंशापासून आपल्याला अपत्य हवे, असा एक विचार पाश्चिमात्य देशांमध्ये विशेषत: जर्मनीमध्ये प्रचलित आहे. या विचाराने झपाटलेल्या जर्मन युवती मग त्यासाठी ब्रोगपा यांच्या गावी येतात. सिवनच्या लघुपटातही अशाच जर्मन युवतीचे चित्रण केलेले आहे. तिचा चेहरा कुठेही दिसत नाही आपल्याला पडद्यावर. पण तिने ज्या ब्रोगपा पुरुषाशी संग केला, तो दिसतो ठळकपणे. त्याचे नाव सेवांग ल्हुनडुप. दारचिक गावात राहणारा. सेवांग म्हणतो, मला तिला मूल द्यायचे आहे शुद्ध आर्यवंशाचे... त्यात मला काहीच खर्च नाही... एक दिवस माझ्यापासून झालेले मूल जर्मनीहून इथे येईल. आणि मला जर्मनीला घेऊन जाईल... सिवनचा लघुपट जगभर प्रदर्शित झाला. तसे सेवांगचे नाव झाले. त्याच्याप्रती लोकांना असलेला आदरही वाढला. ही जी जर्मन युवती होती तिने सेवांगला मोबदला पैशांत दिला नाही. तर सेवांगच्या कुटुंबीयांना तिने खूप वेगवेगळ्या भेटी आणल्या होत्या. त्यांनाही खूश ठेवण्याचा तिचा प्रयत्न होता!
गोरेगोमटे, निळे डोळे, गालाची हाडे चांगलीच वर आलेली, धारदार नाक, तीव्र बुद्धिमत्ता अशी सारी लक्षणे ब्रोगपा पुरुषांमध्ये आढळतात. जर्मन युवती आशक होतात याच वैशिष्ट्यांवर. येथील पुरुषांशी शरीरसंबंध राखून जर्मन युवती गर्भवती होतात. त्यांना जे अपत्य होते ते त्यांच्या मते असते शुद्ध आर्यवंशीय. या विलक्षण प्रकारातून ब्रोगपांच्या गावांमध्ये ‘प्रसूती पर्यटनालाही’ चालना मिळाली आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न आहेच, शिवाय विदेशी युवतींना माता बनविण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे मोलही ब्रोगपा पुरुषांना डॉलरमध्ये मिळते.
या विचाराबद्दल एका जर्मन तरुणीला लघुपटात सवाल विचारला जातो तेव्हा ती म्हणते, मी अजिबात चुकीचे वागत नाहीये. मला जे हवेय त्याचे पैसे मोजते मी. ब्रोगपा पुरुषांनाही आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांची चांगलीच जाणीव झाली आहे. ते राहतात त्या गावांच्या परिसराला जगभरात आर्यन व्हॅली म्हणून ओळखले जाते. मध्य आशियातून आर्य लोक हजारो वर्षांपूर्वी भारतात आले, असा सिद्धांत मॅक्समुल्लर या जर्मन विचारवंताने मांडला होता... त्याचाही आधार आर्यन व्हॅलीमध्ये येणाऱ्या जर्मन युवतींना असतोच. मात्र या सिद्धांताला पाठबळ देणारा ठोस पुरावाच नाही, हे दिसून आले २०११मध्ये. त्या वेळी भारतातील ३० वंशगटांची जनुकीय पाहणी करण्यात आली. ‘भारतात आर्यांनी आक्रमण करून येथील लोकांना िजंकून आपली संस्कृती इथे रुजविली, तसेच आर्य भारताबाहेरून इथे आले होते किंवा आर्य असा काही वंश होता, हे सिद्ध करणारा एकही पुरावा जनुकीय चाचण्यांतून मिळालेला नाही.’ असे मत शास्त्रज्ञ डॉ. लालजी सिंग यांनी व्यक्त केलेय... म्हणजे पुन्हा आर्यांबाबतचा गुंता वाढला...
ब्रोगपांना रीतसर शालेय व उच्च शिक्षण देण्याचेही प्रयत्न सरकारकडून होत आहेत. काही ब्रोगपांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे जो सांस्कृितक फरक त्यांच्या जीवनात निर्माण झाला आहे, त्याचीही छाया त्यांच्या गावांवर दिसते. या जमातीतील लोकांची डीएनए सँपल एका अभ्यासादरम्यान तपासली गेली. पण त्यावरून ते आर्यांचेच वंशज आहेत, हे ठोसपणे सांगता येईना. कारण आर्य म्हणजे नेमके कोण, हेच अजून जनुकीयशास्त्रदृष्ट्या नीटसे ठरविता आलेले नाही. ते काही का असेना, हे वास्तव किंवा अवास्तव आर्यवंशज व त्यांचे वीर्य जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना भुरळ पाडते आहे. त्यामुळे ब्रोगपा जमातीला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत आहे...
ब्रोगपांची बातच निराळी
ब्रोगपांच्या गावांमध्ये जेव्हा कोणताही पर्यटक प्रवेश करतो, त्या वेळी त्याला आपण निराळ्या चर्येच्या लोकांमध्ये आलोय, ही जाणीव लगेचच होते. एखादा ब्रोगपा पुरुष तुमच्याशी बोलायला येतो. आपल्या मोबाइलमधील ब्रोगपा युवतीचे छायाचित्र दाखवितो. तुम्हीही त्या युवतीच्या निळ्या डोळ्यांचे कौतुक करायला लागता...जर्मनीहून पर्यटक येतातच; पण फ्रान्स, आईसलँड, ऑस्ट्रिया, जपान, कोरिया, पोलंड, इस्राएलमधील लोकसुद्धा शेवटच्या आर्यांच्या गावात पायधूळ झाडतात. हा सगळा भाग सीमावर्ती असल्याने ितथे भारतीय लष्कर तैनात आहे. हे जे विदेशी पाहुणे आर्यांच्या गावात येतात, त्यांची प्रवासात गैरसोय होणार नाही, यासाठी लष्करही दक्ष असते. ब्रोगपांची गाणी मुरली मेनन या संशोधकाने ध्वनिमुद्रित केली आहेत. त्यांच्या नृत्याचेही चित्रीकरण केले आहे. ते खूपच वेगळ्या धर्तीचे आहे, असे निरीक्षण मेननने नोंदविले आहे. ब्रोगपांना हिटलरची विकृत आर्यविचारधारा अजिबात मान्य नाही. ते तसे बोलूनही दाखवितात.

No comments:

Post a Comment