Monday, November 7, 2016

रावणबाबा की जय! - समीर परांजपे - दै. दिव्य मराठी - रसिक पुरवणी - ३० ऑक्टोबर २०१६



दै. दिव्य मराठीच्या ३० अॉक्टोबर २०१६च्या रसिक पुरवणीमध्ये मिथक या संकल्पनेभोवती फिरणारे तीन लेख मी लिहिले. त्यापैकी हा एक लेख...त्याची लिंक पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-rasik-araticle-temple…
--
रावणबाबा की जय!
-----------
- समीर परांजपे
---

जुने -नवे पौराणिक चित्रपट, मालिका यांमध्ये संस्कृतप्रचुर हिंदी बोलणारे देव तसेच दानवही दिसतात. देव या शब्दाला पर्यायी शब्द ईश्वर, भगवंत असे अनेक आहेत. दानवांनाही राक्षस, असुर, दैत्य असे बरेच काही पर्यायी शब्द आहेत. इतके सारे साम्य असूनही एक मोठा ढोबळ फरक म्हणजे, देव हे सद‌्गुणांचे पुतळे तर दानव म्हणजे दुर्गुणांचा नुसता चिखल. त्यामुळे मालिकांमधील देव एकजात सारे चिकनेचुपडे आणि दानव काळेकभिन्न, कल्ले, केस घनदाट वाढविलेले, लालभडक ओठांचे आणि डोळ्यांचे... दानवांचे सगळेच उग्र... दानव हा शब्द जरा वापरताना अवघडच जातो. आपण त्यांना राक्षस नाहीतर असुर म्हणू... असुर हा त्यातल्या त्यात बरा शब्द. म्हणजेच सुर अर्थातच देव.
पश्चिम बंगालमधील जलपायगुडीतील कॅरॉन टी इस्टेटमध्ये राहणारा बार्गी असुर. तो आहे असुर या अादिवासी जमातीतील. त्यांची असुरी नावाची भाषा असून बार्गी ती भाषा आता रोमन लिपीत लिहितो, असे कळल्यानंतर तर अजून एक धक्का बसलेला असतो. बार्गी हा आदिवासी जमातीतला. त्याचाच सहकारी चाम्रू असुर सांगतो की, आम्ही आजवर कधीच दुर्गापूजा केलेली नाहीये. झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील सखुआपानी गावातील एका वृद्धाची प्रतिक्रिया तर भलतीच वेगळी. तो म्हणतो, ‘नवरात्रीच्या दिवसांत आम्ही काहीही पूजाअर्चा करत नाही. मात्र नववा दिवस संपला की, आमच्या पूर्वजांना नैवेद्य दाखवितो. त्यांचे आभार मानतो की, आम्हाला या दिवसांतही तुम्ही सुरक्षित ठेवलेत.’
असुर जमातीची वस्ती काही राज्यांत आढळते. झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल व अन्य काही राज्यांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे. सखुआपानीचा जो वर उल्लेख झाला तिथे असुर जमातीतले सुमारे दोन हजार लोक राहतात. २०११च्या जनगणनेत स्पष्ट दिसले की, झारखंडमध्ये २२,४५९; तर बिहारमध्ये ४,१२९ असुर राहतात. पश्चिम बंगालमधील बीरा येथे महिषासुर स्वर्ण सभा या संघटनेद्वारे महिषासुर दिनाचे आयोजन केले जाते. थाटात उत्सव होतो या दिवशी.
‘महिषासुराचे वंशज आम्ही’ असे गौरवगीत गाताना असुर जमातीचे लोक आढळतील.
महिषासुराला दुर्गादेवीने मारल्याबद्दल नवरात्रीचा उत्सव हिंदू धर्मीय साजरा करतात; पण असुर जमातीसाठी हा कालावधी शोककळेचा असतो. चाम्रू असुरने सांगितले की, मी लहानपणापासून लोकांच्या श्रद्धा व अंधश्रद्धांचे सारे पदर बघत आलोय. पण त्यांच्या आहारी जाऊन कोणी असुर जमातीच्या लोकांवर हल्ले चढविले आहेत, असे आजवर कधीही बघितलेले नाही. पूर्वी जमीनदारी प्रबळ होती. आमच्याकडच्या विष्णुपूर गावचेच उदाहरण घ्या. दुर्गापूजेसाठी लाकडे, विशिष्ट झाडांची पाने आपल्याला आणून द्या, असा जमीनदाराचा सांगावा आम्हाला यायचा. आम्ही जंगलातून हे साहित्य गोळा करून ती तसेच आमची काही हत्यारे पूजेसाठी जमीनदाराला देत असू. नवरात्रौत्सवातील ही दुर्गापूजा सुरू होण्याअगोदरच आम्ही तेथून आमच्या गावात परतायचो.’
चाम्रू असुर राहतात, त्या ठिकाणाहून जवळच आहे बॉक्साइटची खाण. तिथे अिनल असुर हा मजूर म्हणून काम करतो. तोही आपल्या बालपणीच्या आठवणी सांगण्यात रमला, ‘सखुअापानी गावापासून सुमारे दहा किमी लांब असलेल्या जोभी पाथ भागात दुर्गापूजेचा मंडप असायचा. मात्र तिथे जाऊ नको, असे माझ्या वडिलांनी मला बजावले होते. मी कारण विचारले तर आपल्या पू्र्वज महिषासुराला दुर्गादेवीने कसे मारले वगैरे कथा त्यांनी सांगितली. त्यांनी मलाच प्रतिप्रश्न केला होता, ‘तुझी बहीण, भाऊ असे कोणी मारले गेले तर तो दिवस तू उत्सव म्हणून साजरा करशील का?’ मी ‘नाही’ असे उत्तर दिले होते. पण असुर जमातीतील जी किशोरवयीन मुले आहेत, त्यांना या जुन्या कहाण्यांविषयी फारसे माहीत नाही. ममत्वही नाही. सखुआपानी गावापासून जवळच सरकारी शाळा आहे. तिथे असुर व कोरवा जमातीतील सुमारे अडीचशे मुले शिकतात. त्यांनाही या जुन्या गोष्टींशी काही देणेघेणे नाही.’
असुरांमधील अजून एक ठळक नाव म्हणजे रावण. रावण हा प्रत्यक्षात दशग्रंथी व वेदाभ्यासी होता. महान तपस्वी होता. त्याला दुर्बुद्धी झाली आणि त्याने सीतेला पळवून नेले व त्यातून सारे रामायण पुढे घडले. अशी जी कथा सांगितली जाते, ती जनमानसात इतकी रुजलेली आहे की, रामलीलेच्या शेवटी दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते, तेही हिंदी भाषिक राज्यांत अग्रक्रमाने. दक्षिणेतील राज्यांत मात्र द्रविड लोक रावणाला पूज्य मानतात. त्याची पूजा करतात.
हाच प्रकार उत्तर प्रदेशमधील बिसराख या गावात होतो. आपल्या गावात रावणाचा जन्म झाला, असे गावकरी मानतात. तिथे रावणाचे एक मंदिरही आहे. त्या मंदिराच्या मालकाची गाडी बाहेरच उभी असते. तिच्यावर गुज्जर व रावण या दोघांचीही मोठी स्टिकर चिटकवलेली आहेत. बिसराख गावातील लोक रावणाला खलनायक मानत नाहीत. आपल्या गाड्यांच्या काचांवर ते रावणाचे स्टिकर चिटकवतात, त्याचे नाव लिहितात. तसेच रावण हे नाव व त्याचे िचत्र असलेले टी शर्ट गावकऱ्यांनी बनवून घेतले आहेत. गावात क्रिकेट स्पर्धा होतात, त्या वेळी पोरेटोरे हे टीशर्ट घालून झोकात वावरत असतात. या गावात रामलीला सादर होत नाही. ती एकदा-दोनदा केली गेली तेव्हा गावातील कोणी ना कोणी तरुण दगावतो, असा गावकऱ्यांचा अनुभव आहे. यात अंधश्रद्धेचाही भाग अाहेच, पण त्याकडे गावकरी फार लक्ष देत नाहीत. महिषासुराचा गुणगौरव केल्याच्या प्रकरणावरून गदारोळ माजलेला होता, त्याच्याशी या गावातील लोकांना काही देणेघेणे नव्हते. रावण हा आमच्या दृष्टीने देवताच होता. या श्रद्धेपासून आम्ही कधीच फारकत घेणार नाही, असे बिसराख गावच्या सरपंचानेही ठामपणे सांगितले. गावात रावणाचा एक पुतळा आहे. तो एक महान शिवभक्त होता, असेही गावकऱ्यांचे मत आहे. बिसराख गावातील शिवमंदिरातही रावणाला मानाचे स्थान आहेच. तेथील शिवलिंगाजवळ रावणाच्या वडिलांनीही तपश्चर्या केली होती, असे ते मानतात. भारतातील बहुसंख्य आदिवासी जमाती रावणाला अापला पूर्वज मानतात.
पश्चिम बंगाल, ओदिशा, आसाम, झारखंड येथील सगळ्यात मोठा आदिवासी समूह आहे तो संथाळांचा. त्यांनी तर आपण रावणाचे वंशज आहोत, असे जाहीरच केले आहे. झारखंड-पश्चिम बंगालमध्ये नवरात्र, दसऱ्याच्या दिवसांत रावणोत्सवाचे आयोजन करतात. संथाळ आदिवासी आपल्या मुलाचे नावही ‘रावण’ ठेवतात! झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळण्यास नकार दिला होता.
हिंदू धर्माच्या धारणेपासून आदिवासी परंपरा अनेकदा फटकून वागते. म्हणूनच रावण, महिषासुर आदिवासींच्या दृष्टिकोनातून असुर नसतात, नायक असतात. देशात असेही वैविध्य आहे आणि ते टिकवायलाच हवे.
परंपरा व बदलती जीवनशैली
असुर दिवाळीच्या दिवसांतच सोहराई नावाचा सण साजरा करतात. करंज्याचे तेल पोट, छाती व नाकाला चोळून तसेच काकडी खाऊन ते हा सण साजरा करतात. यामागचे कारण असे की, असुरांचा पूर्वज महिषासुराला जेव्हा दुर्गादेवीने मारले तेव्हा त्याच्या पोट, नाक व छातीतून रक्तस्राव सुरू झाला. म्हणून असुर आपल्या शरीरावरील या अवयवांना करंज्याचे तेल लावतात. काकडी खाल्ली जाते ती मारणाऱ्याचे काळीज आहे, असे मानून. एकेकाळी असुरांच्या गावांमध्ये हत्यारे बनविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर चालायचे. काळाच्या ओघात ते आता रोडावले आहे. असे म्हणतात, मगध साम्राज्यातील सैन्याला असुरांनी बनविलेल्या हत्यारांमुळे अनेक विजय मिळवता आले. असुरांनी बनविलेल्या लोखंडाच्या हत्यारांना गंज लागला, असे कधी झाले नाही. सम्राट अशोकाच्या काळात अनेक लोहस्तंभ देशात उभारले गेले. त्यांना कधीही गंज लागलेला नाही, हेही सर्वविदित आहे. असुरांची कामगिरी ही अशी असामान्य होती. असुर जमातीचे लोक कधीही गाईचे दूध पीत नाहीत. गाईचे सारे दूध तिच्या वासरानेच प्यायला हवे, असा त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळे ते वासरु सशक्त होते. तो बैल असल्यास शेतीकामात त्याचा पुरेपूर उपयोग होतो. गाय असल्यास तिचाही उपयोग असतोच. असुर जमातीच्या गावांमध्ये आजही चहा किंवा दूध खूपच कमी वेळा प्यायले जाते. त्या ऐवजी तांदळापासून बनविलेले मद्य आनंदाने प्राशन केले जाते. आधुनिकीकरणाने असुर जमातीच्या जीवनशैलीतही काही बदल झाले आहेत. ते अपरिहार्यही होते. असुरांची मुले शाळेत जातात तेव्हा हिंदी किंवा त्या त्या राज्यातील स्थानिक भाषेत शिकतात. असुरी भाषेचा त्यांना विसर पडला आहे. असुरांची नावे परंपरेतून आली आहेत. पण शहरात ठेवतात तशी आधुनिक धाटणीची नावे आता असुर आपल्या मुलाबाळांची ठेवू लागले आहेत.

No comments:

Post a Comment