Saturday, June 28, 2014

कुस्तीपटूंच्या सेक्युलर तालमी - पी. साईनाथ यांचा मी अनुवादित केलेला लेख - दै. दिव्य मराठी २९ जून २०१४



  पी. साईनाथ या प्रख्यात पत्रकाराने लिहिलेला व मी अनुवादित केलेला महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेविषयीचा लेख दै. दिव्य मराठीच्या २९ जून २०१४च्या अंकात प्रसिद्ध झाला अाहे. त्या लेखाच्या दोन लिंक्स व जेपीजी फाईल.
divyamarathi.bhaskar.com/article/MAG-p-sainath-article-about-kushti-4662959-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/29062014/0/4/
---
कुस्तीपटूंच्या सेक्युलर तालमी
-------
पी. साईनाथ
----
ती आहे कुस्तीचे प्रशिक्षण मिळण्याची जागा. त्या वास्तूच्या प्रवेशद्वारावरील फलकावर लिहिलेले असते, ‘तालीम’ (शिक्षणाला उर्दूतील प्रतिशब्द) आणि कुस्तीगिरांचे आराध्यदैवत असलेल्या हनुमानाची प्रतिमाही दिसते. यातून घडते, संस्कृतीच्या बहुढंगी पैलंूचे दर्शन. जिथे कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते, त्या स्थानाला पश्चिम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ‘आखाडा’ नव्हे तर ‘तालीम’ म्हणतात. त्यातून थेट नाळ जुळते, ती फाळणीपूर्व पंजाब प्रांतातील शंभर वर्षांपूर्वीच्या तालमींशी. या नात्याची वीण विशेष घट्ट झाली ती, कोल्हापूर संस्थानचे महाराज व अग्रणी समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या राजवटीत. फाळणीपूर्व भारतामधील विविध भागांतून विशेषत: पंजाब प्रांतातील कुस्तीगिरांना शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सन्मानाने बोलावले होते व त्यांना आश्रय दिला होता.
तेव्हापासून आजपावेतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणार्‍या कुस्ती स्पर्धांमध्ये पाकिस्तान, इराण, तुर्कस्थान तसेच आफ्रिका खंडातल्या काही देशांमधील कुस्तीगीरही सहभागी होतात. या कुस्ती स्पर्धा बघायला येणार्‍या पुरुष प्रेक्षकांमधील अनेक जण पाकिस्तान व इराणमधील कुस्तीगिरांचेही चाहते आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील आमदार विनय कोरे म्हणाले, ‘विदेशांतील कुस्तीगिरांना आमच्या भागात मोठी पसंती आहे.’ वारणानगर येथे देशातील सर्वात मोठे कुस्तीचे मैदान आहे. येथे दरवर्षी 13 डिसेंबरला कुस्तीची जंगी स्पर्धा होते. मॅटवर खेळली जाणारी कुस्ती दोन मिनिटांतही निकाली निघू शकते, पण मातीत खेळली जाणारी कुस्ती तब्बल 25 मिनिटांपर्यंत सलग चालू शकते.
महाराष्ट्रातील तालमींमधल्या गुरूंना वस्ताद म्हणतात. कुस्तीच्या प्रशिक्षणाबरोबरच आपल्या शिष्यांना ते देत असलेली नैतिक शिकवण ही आध्यात्मिक व सेक्युलर स्वरूपाची असते. अनेक वस्ताद आपल्या शिष्यांना गामा या कुस्तीगिराचा (आयुष्यात एकाही कुस्ती स्पर्धेत न हरल्याने गामा हा जगातला सर्वश्रेष्ठ कुस्तीगीर ठरला.) आदर्श डोळ्यासमोर ठेवायला सांगत असतात. पंजाब प्रांतातील रहिवासी असलेला गामा फाळणीनंतर पाकिस्तानातच राहिला. फाळणीच्या वेळी दंगे उसळलेले असताना, गामा आपल्या शेजारील हिंदू कुटुंबांच्या रक्षणासाठी एखाद्या पहाडासारखा दंगेखोरांसमोर उभा ठाकला होता. कोणताही कुस्तीगीर गामासारखाच निधड्या छातीचा असला पाहिजे, ही भावना कुस्तीप्रेमींमध्ये खोलवर रुजली ती तेव्हापासून.
कोल्हापूर शहरातल्या एका तालमीतले प्रख्यात वस्ताद आप्पासाहेब कदम यांनी सांगितले की, ‘कुस्तीगिरांना देण्यात येणारे नैतिकतेचे धडे त्यांच्या प्रशिक्षणाचे आवश्यक अंग आहे. नीतिमूल्यांचे धडे न मिळालेला कुस्तीगीर बिघडण्याची शक्यता अधिक असते.’ त्यामुळे महाराष्ट्रातील कुस्तीगिरांची प्रतिमा इतर राज्यांतील कुस्तीगिरांपेक्षा नक्कीच चांगली आहे. खेळांबद्दल असलेले प्रेम व आदरातिथ्याचे संस्कार महाराष्ट्राच्या मातीत रुजले आहेत. मग ते कुंडल असो वा वारणानगर येथे होणार्‍या कुस्तीच्या महास्पर्धा. लोकांच्या वागण्यातून आपल्याला त्यांचे क्रीडाप्रेम जाणवत राहते. तालमींमधील वस्ताद, कुस्तीगीर हे सारे ग्रामीण भागातील शेतकरी किंवा मजूर कुटुंबातून आलेले असतात. निदान पश्चिम महाराष्ट्रापुरते तरी हे खरे आहे, असे माजी ऑलिम्पिक कुस्तीगीर व कुस्ती क्षेत्रातील गुरुवर्य गणपतराव आंधळकर यांनी सांगितले. एशियाड, कॉमनवेल्थ, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये कुस्तीत पदके जिंकलेले काका पवार म्हणाले की, कुस्ती, उसाचे मळे व तमाशा यांचे अतूट असे नाते आहे. काका पवार यांची पुण्यामध्ये तालीम आहे.
तमाशा आणि कुस्तीसाठी शिस्तबद्ध अदाकारी व लोकाश्रय आवश्यक असतो. कुस्ती पाहायला येणारे बहुसंख्य प्रेक्षक हिंदूधर्मीय असतात. पूर्वीपेक्षा कुस्तीमध्ये आता अधिक वैविध्य आले आहे. पूर्वी कुस्तीमध्ये मराठा समाजातील कुस्तीगीरांचे वर्चस्व होते. मात्र, आता धनगर समाजातील कुस्तीगीरही आपला ठसा उमटवत आहेत. सोलापूर जिल्ह्यात सध्या मुस्लिम समाजातील कुस्तीगिरांनाही मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत आहे. महाराष्ट्रामध्ये कुस्तीला सध्या कमी महत्त्व देण्यात येत असल्याबद्दल बहुतांश वस्ताद चिंता व्यक्त करतात. आम्ही ज्या ज्या तालमींना भेटी दिल्या, तिथे या चिंतेचे सावट दिसले. ‘मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झालेल्या महाराष्ट्रापेक्षा पंजाब, हरयाणामध्ये कुस्तीकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाते. पंजाब व हरियाणामध्ये कुस्तीगिरांना पोलिस व सुरक्षा दलांमध्ये मोठ्या पदांवर नियुक्त केले जाते. महाराष्ट्रात मात्र कुस्ती खेळातून बाहेर पडल्यानंतर कुस्तीगिरांना मजुरी करणे नशिबी येते. महाराष्ट्रात काही नामवंत कुस्तीगिरांना पोटापाण्याकरिता सरतेशेवटी साखर कारखान्यांमध्ये रखवालदाराची नोकरी पत्करावी लागली होती.’ अशी करुण कहाणीही कुस्ती क्षेत्रातील वस्तादांनी ऐकविली. राजकीय नेते हे संधीसाधू असतात. ‘कुस्ती पाहण्यासाठी लाखो लोक गर्दी करतात. तो जनाश्रय पाहून राजकारण्यांचे पायही कुस्तीच्या मैदानाकडे वळतात. काही राजकीय नेते कुस्ती संघटनांचे प्रमुख आहेत. तरीही या खेळाला त्याचा काहीही फायदा झालेला नाही. मा
जी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे राज्यातील कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. पण आपण त्या पदावर आहोत, हे त्यांना आठवत तरी असेल का?’ असे उपहासाने विचारून एका वस्तादाने सांगितले की, कुस्तीचे मैदान पूर्वी गाजविलेले दोन कुस्तीगीर आता विद्यमान आमदार आहेत. पण त्यांचेही कुस्ती व कुस्तीगीरांकडे लक्ष नाही.
समाजामध्ये झालेले बदल, संस्कृतीचे बदललेले रुपडे, पाण्याची तीव्र टंचाई, तसेच राज्यपातळीवर होत असलेला कानाडोळा यामुळे कुस्ती खेळाची सध्या परवड सुरू आहे. गणपतराव आंधळकर म्हणतात, ‘कुस्तीगिरांचे आयुष्य हे अदृश्य तपश्चर्येप्रमाणेच असते. क्रिकेटपटूला छोटीशी जरी जखम झाली, तरी प्रसारमाध्यमे त्याचा प्रचंड गवगवा करतात. पण एखादा कुस्तीगीर निधन पावला, तर त्या घटनेची साधी दखलही घेतली जात नाही.’ कुस्ती व कुस्तीगिरांचे आयुष्य सध्या महाराष्ट्रात खडतर आहे ते असे...
psainath@gmail.com
(अनुवाद - समीर परांजपे)

Thursday, June 19, 2014

यादवीचे चरक - दै. दिव्य मराठीच्या १५ जून २०१४च्या अंकातील रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख.



आफ्रिकेतील कोंगो या देशात सुरु असलेल्या यादवी संघर्षाचे विश्लेषण करणारा माझा लेख दै. दिव्य मराठीच्या १५ जून २०१४च्या अंकातील रविवारच्या रसिक पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाच्या पेज व टेक्स्ट लिंक्स व जेपीजी फोटो.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-samir-paranjpe-about-africa-congo-4647455-PHO.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/15062014/0/4/
-----
यादवीचे चरक
-------
- समीर परांजपे
----
गेली अनेक दशके यादवी युद्धाच्या चरकात पिळून निघालेला आफ्रिका खंडातील कोंगो हा देश. दुसर्‍या महायुद्धानंतर ते आजवरच्या काळात यादवी युद्धामुळे सगळ्यात जास्त मानवी संहार जिथे झाला तोच हा देश. आजपावेतो तेथील 54 लाख लोक या संघर्षात ठार झाले आहेत.
रवांडामध्ये झालेल्या यादवी युद्धानंतर भयभीत झालेल्या हजारो नागरिकांनी स्थलांतर करून शेजारच्या कोंगोमध्ये आश्रय घेतला. रवांडातील हुतू व तुत्सी यांच्या संघर्षात 1994मध्ये सुमारे 80 हजार तुत्सींची कत्तल झाली. रवांडातील हुतू राज्यकर्त्यांचे पाठबळ लाभलेली एक सशस्त्र संघटना, रवांडा लष्कर यांचा यामागे हात होता. 1994मधील जून-जुलै महिन्यात रवांडाची राजधानी किगालीवर तुत्सी जमातीच्या रवांडा पेट्रिऑटिक फ्रंट या संघटनेचा वरचश्मा निर्माण झाला. त्यांनी हुतू यांच्यावर सूड उगवायला सुरुवात केली. त्यामुळे हजारो हुतू रवांडातून परागंदा होऊन कोंगोच्या आश्रयाला गेले. हुतू जमातीचे निर्वासित मग कोंगोच्या भूमीतून रवांडातील तुत्सींच्या विरोधात कारवाया करू लागले. कोंगोमध्ये ज्या भागात हे हुतू निर्वासित स्थायिक झाले, तो भाग आधीपासूनच हिंसाचारग्रस्त होता. त्यामुळे कोंगोमध्ये तुत्सी, हुतू यांच्यात यादवी सुरू झाली. याची परिणती म्हणजे कोंगोतील सुमारे 38 हजार तुत्सी रवांडामध्ये आश्रयाला गेले. कोंगो, रवांडामधील वांशिक संघर्षाचे चटके अंगोला, नामिबिया, झिम्बाब्वे यांनाही बसले आहेत.
वांशिक हिंसाचार, लोकांचे विस्थापित होणे, साथींनी घातलेले थैमान या संकटाच्या घेर्‍यात अडकलेल्या कोंगोमध्ये सगळ्यात जास्त धूळधाण उडाली आहे ती तेथील महिलांची. तिथे आजवर हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आले, प्रसंगी ठारही मारण्यात आले. यादवी युद्धाला या देशात जी लैंगिक अत्याचारांची काळी किनार आहे, ती कोणाचेही मन सुन्न करणारी आहे. कोंगोमध्ये मौल्यवान खनिज संपत्तीचे प्रमाण लक्षणीय आहे. विविध खनिजांच्या खाणी आपल्या कब्जात कशा राहतील, यासाठी कोंगोचे लष्कर, तेथील सत्ताधारी, तसेच परस्परविरोधी गट यांच्यात साठमारी चालते, एकमेकांवर सूड उगवण्यासाठी विरोधी गटातल्या बायकांना पळवले जाते. कोंगोमध्ये दर तासाला किमान 48 महिलांवर बलात्कार होतात. लैंगिक अत्याचारांना आजवर या देशातील चार लाख महिला बळी पडल्या आहेत. ही आकडेवारी व स्थिती कोणाही सुबुद्ध माणसाला हादरवून सोडेल. लैंगिक अत्याचार करताना ती महिला लहान मुलगी आहे की वृद्धा, हे काहीही पाहिले जात नाही. अशा भयंकर दुर्दशेतून जावे लागलेल्या महिलांपैकी अनेक जणी मनोविकारग्रस्त झाल्या आहेत.
ज्या महिलांवर बलात्कार होतो, त्यांना आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून सहकार्य मिळणे दूरच; पण अवहेलनेचे क्षणच अधिक वाट्याला येतात. आपल्या कुटुंबातील महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याने आपली प्रतिष्ठा बुडीत खाती गेली आहे, अशी कोंगोतील बहुतांश कुटुंबांची विचारसरणी असते. अशा पीडित महिलेला पुन्हा कुटुंबात सामावून घेतले गेले तरी तिला एक तर हलक्या दर्जाची वागणूक दिली जाते किंवा तिच्या नवर्‍याने केलेला पुनर्विवाह तिला नाइलाजाने सोसावा लागतो. बलात्कार झालेल्या अविवाहित मुलींची अवस्था तर त्याहूनही वाईट असते. जगात मातृदिन उत्साहाने साजरा होतो. पण असे अनेक दिवस येतात, जातात; कोंगोमधील मातांच्या ललाटी असलेला दुर्दशेचा शाप काही पुसला जात नाही.
बाईला बाईपण निभवणेही या देशात कठीण होऊन बसले आहे. महिलांच्या प्रगतीची ऐशीतैशी झालेलीच आहे. त्याशिवाय कोंगोतील पुरुषप्रधान संस्कृतीने माता बनू इच्छिणार्‍या महिलांच्या मार्गातही अनेक काटे पसरलेले आहेत. कोंगोतील फक्त सहा टक्के महिलाच संततिनियमनाची आधुनिक साधने वापरतात. महिलांना कुटुंब नियोजनासंदर्भातील उपचार करून घेण्यासाठी आपल्या नवर्‍याची परवानगी घ्यावी लागते. महिलांच्या स्वत:च्या इच्छेला काडीचीही किंमत देण्यात येत नाही. या देशातील 64 टक्के महिलांना हिंसाचाराची या ना त्या कारणाने झळ लागलेली आहे. या महिलांच्या हक्करक्षणासाठी कार्यरत असणार्‍यांवरही हल्ले चढवण्यात येतात. कोंगोतील सरकार वांशिक हिंसाचार आटोक्यात आणण्यात जसे अयशस्वी ठरले आहे, तसेच आपल्या देशातील महिलांवर होणारे अनन्वित अत्याचार रोखण्यातही...जगात कुठेही संघर्षाची ठिणगी पडली की पहिला बळी जातो तो महिला व लहान मुलांचा... कोंगोसह आफ्रिकेतील काही देश तोच कित्ता दशकानुदशके गिरवताना दिसत आहेत.
(sameer.p@dainikbhaskargroup.com)

Sunday, June 8, 2014

मेट्रो रेल्वे मुंबईत सुरु झाली त्यामुळे काय काय होईल?

(१) याच महिन्यात दादरच्या छबिलदास शाळेत किंवा वनमाळी हाॅलमध्ये शंभर एक मराठी माणसे जमून मुंबई मेट्रो रेल्वे प्रवासी संघाची स्थापना करतील. त्याच्या पुढच्या जुलै महिन्यात या शंभरामधील चाळीस मराठी माणसे या संघटनेतून तत्वनिष्ठेशी तडजोड करणार नाही असे सांगत बाहेर पडतील अाणि महामुंबई मेट्रो रेल्वे प्रवासी संघाची स्थापना करतील
(२) आमच्यासाठी स्वतंत्र महिला स्पेशल मेट्रो सकाळी आठ वाजता व संध्याकाळी सहा वाजता सोडलीच पाहिजे अशी मागणी महिला प्रवासी करतील.
(३) मेट्रो रेल्वेमध्ये बसण्यासाठी अासने खूप कमी असतात. मात्र अपंग, वृद्ध, कॅन्सरग्रस्त, महिला यांच्यासाठी राखीव अासने ठेवा अशी मागणी झाल्यास ती पूर्ण कशी करायची ही चिंता मेट्रो चालक कंपनीला सतावेल
(४) मेट्रोमध्ये भीक मागणारी मुले, गाणी गाऊन, एकतारी वाजवून पैसे मागणारे वादक यांना आपल्या पारंपारिक वेषात शिरता येणार नाही. मग ते बर्यापैकी कपडे घालून एअरकंडिशण्ड मेट्रो रेल्वे डब्यांमध्ये चढतील. आपल्या बॅगेमधून कटोरा, एकतारी वगैरे साहित्य काढून आपल्या पारंपारिक धंद्याला सुरुवात करतील.
(५) हिजड्यांसाठी तर मोठी समस्याच आहे. मेट्रोमध्ये स्त्री-पुरुष असे वेगळे डबेच नसल्याने त्यांना सर्रास कुठेही संचार करायला मिळेल. पण त्यांना आपले अस्तित्व काही लपविता येणार नसल्याने त्यांना आधी मेट्रोमध्ये चढून देतील का हा प्रश्न सतावतो आहे.
(६) मेट्रो रेल्वेमध्ये लगेजचा डबा नाही त्यामुळे वर्सोव्याच्या मासळी घेऊन जाणार्यांची पंचाईत होईल. मासे नेताना टोपलीतले खारट पाणी सांडून सांडून लोकलचे पत्रे सडविणार्यांना मेट्रोमध्ये प्रवेश माशांविनाच करावा लागेल. त्यामुळे मेट्रोची प्रवासींसंख्या घटेल असा अंदाज आहे.
(७) मेट्रो रेल्वेमध्ये सध्या वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावरच वाहतूक सुरु राहाणार आहे. गुजराती बंधू जसे चर्नीरोडपासून उलटे बसून चर्चगेट ते बोरिवली-विरारपर्यंत लोकलने राजेशाही प्रवास करतात तसे ते इथेही वर्सोवा वा घाटकोपरच्या आधी्च्या स्टेशनला उलटे बसून आपल्याला जिथे जायचे तिथपर्यंत प्रवास करण्याचा बेत एव्हाना आखत असतील. व मराठी माणूस नेहमीप्रमाणे उभ्या उभ्याच प्रवास करत जात राहिल.
(८) मेट्रो रेल्वेमध्ये गर्दी इतकी होईल की, तिचे आपोअाप उघडमीट करणारे दरवाजे काढून लोकल ट्रेनसारखे सताड उघड दरवाजे बसवावे लागतील. या ट्रेनच्या फुटबोर्डावर उभे राहून लटकता येत नाही, स्टेशनवरच्या फुलपाखरांना बघून शिट्या मारत हवेवर डोईवरचे केस सावरायची सवलत मिळत नाही तो काय प्रवास झाला?
(९) मेट्रो रेल्वेच्या खिडक्यांना संपूर्ण काच आहे. तिथे खिडक्यांना जाळ्या नाहीत. त्यामुळे जलारामबापा, आणि कोणकोणते संत-महंत यांचे फोटो तात्पुरते लटकाविण्याची सोय नाही. या संतांची भजने म्हणताना जोरजोरात गाडीचा पत्रा बडवायची सोय नाही. ही असली काय ट्रेन असते का, त्यामुळे डोकेबाज भक्त काहीतरी युक्ती काढून कुठेतरी बाप्पांचे फोटो लटकावतील आणि झांजा वगैरे घेऊन मेट्रोमध्ये जोरजोरात भजने सुरु करतील. त्यांच्या शेजारी पत्तेवाले बँग मध्ये धरुन आपला गेम साजरा करतील.
(१०) पान, गुटका खाणार्यांसाठी मेट्रोमध्ये पिकदाणी ठेवा अशी सूचनाही पुढे येईल...
(११) बंगाली बाबा, कमी व्याजावार कर्ज मिळेल, भूतखेत प्रेत पिच्छा सोडविणार अशा जाहिरातींसाठी मेट्रो रेल्वेमध्ये नक्कीच चांगली जागा मिळेल. कारण प्रत्येक डब्यात जाहिरातींचे फलक लावण्याची चांगली सोय आहे. तरीही गनिमी काव्याने या जाहिरातींची पोस्टर कोणी ना कोणी मेट्रोमध्ये चिटकवूनच जाईल व मेट्रोवाल्यांना काम वाढवून ठेवेल.
असे बरेच काय एका मेट्रोरेल्वेच्या मुंबईतील अागमनाने घडू पाहातेय..
मोनो रेल सध्या हार्बरला एकांतवासात धावत असल्याने अजून तिला हा जाच सुरु झालेला नाही. पण ज्यांच्या ज्यांच्या नावापुढे रेल्वे हा शब्द लागलेला आहे त्यांना हा वनवास काही चुकलेला नाही.....

- समीर परांजपे

Wednesday, June 4, 2014

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्राचे संभाव्य राजकीय चित्र.

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्राचे संभाव्य राजकीय चित्र.
----
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये जननेता म्हणावा असा एकही नेता दिसत नाही. विनोद तावडे, देवेंद्र फडवणीस, नितीन गडकरी हे नेते जननेते नव्हेत, ते दिवाणखानी राजकारण करणारे नेते म्हणून अधिक ओळखले जातात जसे शिवसेनेचे मनोहर जोशी. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा लौकिकही दिवाणखानी राजकारण्याचाच आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना राज्य भाजपाचे छत्र शोभावे असे मुंडेंचे नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांच्या ऐवजी आता महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उद्भवला आहे. माझ्या मते नितीन गडकरी यांना लवकरच विधानसभा निवडणुकांमध्ये राज्य भाजपचे नेतृत्व करा असा संदेश नरेंद्र मोदींकडून दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात भाजपमध्ये नितीन गडकरी यांचे नेतृत्व जुनेजाणते आहे. पण गडकरी यांना विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागात फारशी लोकप्रियता नाही. मुंडे यांच्या जाण्याने विरोधी पक्षांच्या रिंगणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे भरुन काढू शकतात. राज ठाकरे स्वत:च विधानसभा निवडणुकीस उभे राहाणार आहेत. ते बहुधा नाशिक किंवा दादर विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवितील असा माझा प्राथमिक अंदाज आहे. राज ठाकरे हे वेगळ्या पक्षातील असले तरी ते गर्दी खेचणारे नेते अाहेत. त्यांच्या भाषणांना मिळणारा प्रतिसाद हा जननेत्याला जसा मिळतोच तसाच असतो. मुंडे हे ग्रामीण भागातून पुढे आलेले नेतृत्व आहे तर राज ठाकरे हे अस्सल शहरी नेतृत्व आहे. ग्रामीण भागातील मतदारांना अापलेेसे वाटावे असे मुद्दे मांडण्यावर राज ठाकरे यांनी येत्या चार महिन्यांत भर दिल्यास त्यांचे नेतृत्व काही उभारी घेऊ शकेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संपूर्ण शहरी तोंडवळा असलेला राजकीय पक्ष आहे. ही त्याची मर्यादाच या पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम यश मिळवून देण्यात अडसर आहे. राज ठाकरे यांनी शहरी व ग्रामीण मतदारांना जवळचे वाटतील असे मुद्दे प्रचारात घेऊन या दोन्ही भागांतील जनतेला आपल्याबरोबर आणायला हवे. तरच त्यांना या निवडणुकीत काही भवितव्य आहे. शिवसेना व भाजप आघाडीमध्ये अजून जागावाटपाची बोलणी व्हायची आहेत. मात्र या पक्षांनी विधानसभा निवडणुकीत मनसेबाबत गाफील राहून पुन्हा मोदी लाटेची अपेक्षा करु नये. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मोदी लाट येईल असे दिसत नाही. शिवाय विधानसभा या स्थानिक प्रश्नांवर जास्त लढल्या जातात. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे गड उदध्वस्त करायचे असतील तर शेतकरी, कामकरी यांचे गावगाड्यातील प्रश्न शिवसेना, भाजपने येत्या चार महिन्यांत लावून धरायला हवेत. तरच त्यांना काही आशा आहे. येत्या निवडणुकीत शिवसेना -भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळतील पण बहुमतासाठी त्यांना मनसेचा पाठिंबा घ्यावा लागेल. मुंडे यांच्या जाण्याने मराठवाडामध्ये सहानुभूतीची लाट भाजप-सेेनेच्या बाजूने जाऊन तिथे काँग्रेसचे पतन होईल असे दिसते. महाराष्ट्र विधानसभेच्या २८२ जागांपैकी किमान १२४ जागा भाजप-शिवसेना युतीला मिळतील व मनसेला ५० जागा मिळतील, ८० काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळतील तसेच बाकीच्या जागा अपक्ष व इतर पक्ष जिंकतील असा माझा अंदाज आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्राचे राजकीय चित्र साधारणपणे असे असेल.
- समीर परांजपे

गोपीनाथ मुंडेजी,....




गोपीनाथ मुंडेजी,
धक्कातंत्र हा तुमची खास शैली होती. तुमच्या निधनाची बातमी हा बहुधा या धक्कातंत्राचा अखेरचा अविष्कार असावा. बातमी ऐकल्यानंतर काही क्षण सुन्न झालो. तुम्ही नुकतेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री झालात, त्याबद्दल अभिनंदनाचा दूरध्वनी केला असताना दिल्लीत यायचे निमंत्रण दिले होते. हा खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामीण विकासाच्या कोणत्या नवीन योजना राबविता येतील याविषयी तुमच्या मनात विचार घोळत होते. त्यातल्या काही गोष्टी तुम्ही दूरध्वनीवर सांगितल्यातही. महाराष्ट्राचे दिल्लीत प्रतिनिधीत्व कायम कमी असते. तुमच्या पक्षाचे सरकार केंद्रात अाल्यानंतर मंत्री म्हणून तुम्ही दिल्लीत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व बुलंद किल्ल्यासारखे कराल यात कोणालाच शंका नव्हती. अगदी शरद पवारांनाही याबाबत विश्वास होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने तुमचे अर्धे लक्ष राज्यात व अर्धे लक्ष केंद्रात असणे स्वाभाविक होते. राज्य विधानसभा निवडणुका तुमच्या नेतृत्त्वाखालीच भाजप लढणार होता. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अाहात अशी चर्चाही प्रसारमाध्यमांनी सुरु केली होती. हा सारा डाव सुरु होऊन रंगण्याअाधीच तुम्हाला मृत्यूने गाठून हा सारा पटच उधळून लावला. मृत्यू हा किती क्रूर, निर्दयी असतो याचे भयाण दर्शन याहून अधिक ते कोणते असेल? गोपीनाथजी तुमच्या तमाम चाहत्यांना सोडून कायमचे निघून जाण्याचे वय तरी होते का तुमचे? अवघे नव्वदीचे वयोमान असे म्हणत सत्तेला चिटकून राहाण्याचा सोस असलेल्या लोकांच्या तुलनेत तुम्ही तरुणच होतात. दिल्लीत आपल्या कार्यशैलीने आगळे स्थान निर्माण करण्याची अालेली सुवर्णसंधी काळाने तुमच्यावर झडप घालून हिरावून घेतली. तुम्ही सत्तेत असा वा नसा तुमच्या उमद्या स्वभाव नेहमी तजेलदार होता. कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय नेते, सामान्य माणसे यांच्याशी समभावाने वागणारा नेता म्हणून तुमची ओळख होती. गावपातळीच्या राजकारणात रुजून देशपातळीवर स्वकर्तृत्वाने फुलारलेला नेता, अांदोलनातील भाजपला महाराष्ट्रव्यापी करणारा नेता म्हणून तुमची ओळख ही भाजपच्या संस्कृतीसाठीही नवीन होती. केंद्रात भाजप सत्तेवर अाल्यानंतर हे कर्तृत्व अधिक वृद्धिंगत झाले असते पण अाता ते होणे नाही. फार वैयक्तिक अाठवणी इथे लिहिवत नाही. ती मानसिक स्थितीही अाता नाही. एक अाठवण फक्त सांगावीशी वाटते. तुम्ही कोणाशीही बोलताना ऐका ना...असे म्हणायची तुम्हाला सवय होती. तसेच बोलताना हातातील कोणतीही वस्तू टेबलावर आदळत बोलायची तुमची लकब होती. मग तो तुमचा चष्मा असो वा चष्म्याचे घर. एकदा विधिमंडळाच्या तुमच्या दालनात तुमच्यासमोर गप्पा मारायला बसलेलो असताना, डोळ्यात काहीतरी गेले म्हणून चष्मा काढून मी तो तुमच्या टेबलावर ठेवला व डोळे चोळून अात काही कचरा गेलाय का बघत होतो. ते झाल्यानंतर मी पुन्हा चष्मा उचलून तो घालायला गेलो तर तो ठेवल्या जागी सापडेना. तेव्हा तुमच्याकडे बघितले तर माझा चष्मा तुमच्या हातात. अाणि ऐका ना म्हणत तो चष्मा हलकेच टेबलावर अादळला जात होता. मी हे लक्षात अाणून देताच ते खळाळून हसले. चष्मा परत दिला व पुन्हा ऐका ना म्हणत बोलणे सुरु केले. अाज सकाळी तुमच्या निधनाची बातमी ऐकताना तोच चष्मा मी खणातून काढून बघितला. अाता नवीन फ्रेम असल्याने हा जुना चष्मा वापरत नाही. पण तो जुना चष्मा पाहाताना या गंमतीदार प्रसंगाची मला आठवण झाली. त्या जुन्या चष्म्यातून मला दिसलेले गोपीनाथराव तुम्ही, अाजही तसेच होतात. चष्मा बदलला होता पण समोरचा माणूस तोच होता....पण अाता निष्टेच मृतदेहाच्या रुपात होता...डोळ्याच्या कडा पाणावल्या माझ्या....राजकारणी नेत्यापेक्षा माणूस अधिक मोलाचे होतात तुम्ही...फार लिहिवत नाही...तुमच्या स्मृतिंना भावांजली.
- समीर परांजपे

Monday, May 12, 2014

बेहाल नायजेरिया - दै. दिव्य मराठी - ६ एप्रिल २०१४


बेहाल नायजेरिया


- समीर परांजपे
sameer.p@dainikbhaskargroup.com


नायजेरियाच्या उत्तर भागातील बोर्नो, योबे व अदमावा हे तीन धगधगते प्रांत आहेत. उत्तर नायजेरियामध्ये स्वतंत्र इस्लामी देश निर्माण करण्याचे ध्येय उराशी बाळगून बोको हराम या अतिरेकी संघटनेने या भागात 2009 सालापासून नायजेरियाच्या सरकारी यंत्रणा तसेच स्थानिक लोकांविरोधात मोठय़ा प्रमाणावर घातपाती कारवाया सुरू केल्या. त्यामुळे आजवर तेथील लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.





आफ्रिका खंडातील काही देशांचा अपवाद वगळता बाकीचे देश शापिताचे आयुष्य जगत आहेत. त्यात नायजेरियाचाही समावेश आहे. निसर्गाची अवकृपा ही कोणत्याही देशाच्या प्रगतीला बाधा आणणे स्वाभाविक असते. मात्र मानवनिर्मित आपत्तींमुळेही देश कसा भकास होऊ शकतो, याचे नायजेरिया हे जिवंत उदाहरण आहे. नायजेरियाच्या उत्तर भागातील बोर्नो, योबे व अदमावा हे तीन धगधगते प्रांत आहेत. उत्तर नायजेरियामध्ये स्वतंत्र इस्लामी देश निर्माण करण्याचे ध्येय उराशी बाळगून बोको हराम या अतिरेकी संघटनेने या भागात 2009 सालापासून नायजेरियाच्या सरकारी यंत्रणेविरोधात मोठय़ा प्रमाणावर घातपाती कारवाया सुरू केल्या. या तीन प्रांतातील हजारो इस्लामेतर धर्मियांना तेथून हुसकावून लावण्याचे सत्रही या अतिरेकी संघटनेने सुरू केले. त्याच्या परिणामी आजवर बोर्नो, योबे व अदमावा या प्रांतातून लाखो लोक विस्थापित होऊन नायजेरियाच्या अन्य भागांमध्ये आश्रयाला आले आहेत. ही मानवनिर्मित आपत्ती इतकी भीषण आहे की, गेल्या वर्षीपासून या तीन प्रांतांमध्ये नायजेरियाचे विद्यमान अध्यक्ष गुडलक जॉनाथन यांनी आणीबाणी लागू केली. बोको हरामचे दहशतवादी उत्तर नायजेरियातील गावे-शहरांवर रॉकेट हल्ले चढवितात. तेथील इस्लामेतरांची घरेदारे जाळून राख करतात. या महिन्यात बोको हराम अतिरेक्यांच्या हल्ल्यातून मैदुगरी येथील लष्करी छावण्याही सुटल्या नाहीत. बोको हराम अतिरेक्यांच्या तावडीत सापडूनही सहीसलामत सुटका झालेल्या लितू या युवतीने केलेले कथन अंगावर काटा आणणारे आहे. लितूने म्हटले आहे, ‘गेल्या वर्षी बोको हराम अतिरेक्यांनी माझ्यासह दोन युवतींना पळवून नेले. 11 दिवस डांबून ठेवल्यानंतर त्यांनी मला एका माणसाकडे नेले. त्या माणसाने मी मुस्लिम आहे की ख्रिश्चनधर्मीय, याबद्दल चौकशी केली. त्यानंतर त्याने मला इस्लाम धर्म स्वीकारण्याची गळ घातली. त्याला मी आवडले होते. मुस्लिम धर्म स्वीकारल्यास माझ्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती.’ लितूला काही दिवसांनी बोर्नो प्रांतातील सांबियाच्या जंगलक्षेत्रात अतिरेक्यांची जी छावणी होती, तिथे नेण्यात आले. या भागात बोको हरामच्या अतिरेक्यांनी अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले आहेत. एकाही मुस्लिम धर्मियाने सरकारी नोकरी करायची नाही, असा या अतिरेक्यांचा फतवा आहे. सरकारी नोकरीत असलेल्या मुस्लिम धर्मियाला अत्यंत निर्घृणपणे ठार मारले जाते. या अतिरेक्यांसाठी काम करण्यास नकार देणाऱयांचे धारदार शस्त्रांनी गळे चिरले जातात. बायका-मुले यांचाही अपवाद केला जात नाही. बोको हराम अतिरेक्यांच्या तावडीत लितू 15 दिवस होती. तिच्यासह सहा बंदिवानांनी सुटकेसाठी एक भन्नाट युक्ती केली. अतिरेक्यांकडे असलेल्या वाहनांपैकी एका व्होल्क्स वॅगनमध्ये बसून त्यांनी पलायन केले. बोको हराम अतिरेक्यांना हे लक्षात येताच त्यांनी वॅगनचा पाठलाग केला व पलायन करणाऱया सहा जणांवर ते गोळीबार करीत होते. व्होल्क्स वॅगन बामा शहराच्या सीमेजवळ आल्यावर अतिरेकी मागे फिरले. वॅगन सुरक्षित ठिकाणी पोहोचली त्या वेळी लितू, वॅगन चालवणारा माणूस व अजून एक व्यक्ती असे तिघेच जिवंत उरले होते! लितू सुदैवी होती म्हणून जिवंत राहिली; पण जे हजारो अश्राप जीव बोको हरामच्या दहशतवादाला बळी पडले, त्यांची तर गणतीच नाही. बोर्नो, योबे व अदमावा या तीन प्रांतातून जे विस्थापित नायजेरियाच्या अन्य भागांत निर्वासित छावण्यांमध्ये राहात आहेत त्यांचे हाल तर कुत्रा खात नाही, अशी अवस्था आहे. पिण्याचे पाणी, शौचालय अशा मूलभूत सुविधांची या छावण्यांमध्ये तोकडी व्यवस्था आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत बोर्नोमधून 13 लाख, योबेमधून 7 लाख 70 हजार, तर अदामावामधून दहा लाख लोक विस्थापित झालेले आहेत. मुळात हे तिन्ही प्रांत नायजेरियातील सर्वात अविकसित भाग आहेत. पोटाची खळगी भरण्याइतकाही रोजगार मिळत नसल्यामुळे तेथील लोकांमध्ये असंतोष धुमसत होता. त्यातच त्यांची माथी विषारी धर्मप्रचार करून भडकावली गेली. असंतुष्ट लोकांनी शस्त्रZ हाती धरून दहशतवादाचा मार्ग पत्करला. बोको हराम संघटनेला नेमके हेच हवे होते. धर्म ही अफूची गोळी आहे, हे कार्ल मार्क्सचे विधान नायजेरियातील या तीन प्रांतांच्या स्थितीकडे पाहून पटते. नायजेरियातील ज्या भागांत बऱयापैकी विकास झालेला आहे, तेथेही उत्पात घडवण्याचा बोको हराम अतिरेक्यांचा डाव आहे. नायजेरियात उद्योगधंदा, नोकरीसाठी अनेक भारतीय गेलेले आहेत. त्यात अनेक मराठी माणसांचाही समावेश आहे. काही भारतीय नागरिकांच्या तीन-तीन पिढय़ा नायजेरियात राहिलेल्या आहेत. बोको हराम अतिरेक्यांच्या कारवायांमुळे नायजेरियात भविष्यात प्रचंड उलथापालथी झाल्या तर त्याची भारत सरकारलाही गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. नायजेरियाचे विद्यमान अध्यक्ष गुडलक जॉनाथन हे बोको हराम अतिरेक्यांचा मुकाबला किती खंबीरपणे करतात, यावरच त्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे

Sunday, May 4, 2014

एव्हरेस्ट चढाईचा जीवघेणा धंदा - दै. दिव्य मराठीची रसिक रविवार पुरवणी - ४ मे २०१४.

लेखाचा मूळ भाग



लेखाचा उर्वरित भाग



एव्हरेस्टवरील कचरा हटविण्याच्या प्रयत्नांत शेर्पांची बहुमोल मदत असूनही नेपाळ सरकारला त्याची फारशी कदर नाही असे शेर्पांना वाटतेधंदेवाईक वृत्तीच्या दुश्चक्रात सापडलेल्या एव्हरेस्ट मोहिमांमध्ये शेर्पांपासून गिर्यारोहकांपर्यंतचे सारेच घटक सध्या असंतुष्ट आहेतत्यात नैसर्गिक आपत्तीही आपला रंग दाखवून जातातत्या विळख्यातून एव्हरेस्टची सुटका कधी होणार

एव्हरेस्ट चढाईचा जीवघेणा धंदा ( दै. दिव्य मराठी - रसिक पुरवणी - ४ मे २०१४)

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-everest-trekking-by-sameer-paranjape-divya-marathi-4602137-NOR.html
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/magazine/rasik/244/04052014/0/1/


- समीर परांजपे


एव्हरेस्ट. हिमालयाच्या कुशीत विसावलेले जगातील सर्वोच्च उंचीचे शिखर - ८८४८ मीटर. जगातील गिर्यारोहकांनी त्याचा माथा सर करण्याचे १९ व्या शतकापासून पाहिलेले स्वप्न अखेर २९ मे १९५३ रोजी पूर्ण झाले. त्या दिवशी एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग नोरगे यांनी एव्हरेस्टचा माथा सर केला. या घटनेला येत्या २९मे रोजी ६१ वर्षे पूर्ण होतील. या कालावधीत जगभरातील असंख्य कसलेले गिर्यारोहक, साहसी वृत्तीचे व गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतलेले पर्यटक यांनी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यात विविध वयोगटाच्या स्त्राe-पुरुष गिर्यारोहकांचा समावेश आहे. दरवर्षी एव्हरेस्टच्या मोहिमांदरम्यान विविध प्रकारचे विक्रमही नोंदविले जातात. गिर्यारोहण हा साहसी क्रीडाप्रकार आहे की नाही याबद्दल जगभर जरी वाद सुरु आहे. मात्र निसर्गातील प्रतिकुलतेशी गिर्यारोहणात झुंजल्याशिवाय कोणत्याही शिखर किंवा सुळक्याचा माथा सर करताच येत नाही या वस्तुस्थितीबाबत मात्र कोणाचेही दुमत नक्कीच नाही. एव्हरेस्ट शिखरावर दरवर्षी एप्रिल ते जून महिन्याच्या तिसऱया आठवडय़ापर्यंत अनेक चढाई मोहिमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सहभागी होणाऱया गिर्यारोहकांची सरासरी संख्या दरवर्षी तीनशे ते चारशे इतकी असते. त्यातील काही जणांच्या हाती यश किंवा अपयश लागते. काही जणांचा चढाई दरम्यान अपघातात मृत्यू ओढवितो. मात्र एव्हरेस्टचा माथा सर करायचाच ही जिद्द अनेकांच्या मनात अभंग उरते. यंदाच्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमांचा हंगाम सुरु होण्याच्या प्रारंभीच गेल्या १८ एप्रिल रोजी या शिखराच्या पश्चिम धारेवरील एक मोठा हिमनग कोसळून या शिखराच्या कॅम्प एक खाली खुंबु हिमनदीत हिमप्रपात झाला. त्यामुळे बर्फाखाली गाडले जाऊन १६ शेर्पा गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. एव्हरेस्ट शिखराला स्थानिक शेर्पांनी देवत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यामुळे एव्हरेस्टदेव यंदा चढाई मोहिमांना अनुकूल नसल्यानेच हा अपघातरुपी अपशकून झाला अशी धार्मिक समजूत या शेर्पांनी करुन घेतली. त्यातूनच मग यंदाच्या वर्षी नेपाळमार्गे एव्हरेस्ट मोहिमांमध्ये सहभागी होण्यास शेर्पांनी स्पष्ट नकार दिला. धार्मिक कारणांची ढाल या पवित्र्यासाठी पुढे करण्यात आली असली तरी त्यामागे शेर्पांची अनेक आर्थिक कारणेही दडलेली आहेत.
१८ एप्रिल रोजी झालेल्या अपघातानंतर एव्हरेस्टच्या १९ हजार फुट उंचीवर असलेल्या बेसकॅम्पवर सुमारे ४०० शेर्पा जमले होते. त्यांनी शिखर चढाई मोहिमांसाठी देशा-विदेशांतून आलेल्या गिर्यारोहकांबरोबर सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिल्याने अनेक गिर्यारोहक अत्यंत निराश भावनेने माघारी फिरले.
१९९०च्या दशकाच्या मध्यापासून एव्हरेस्ट चढाई मोहिमांचे मोठय़ा प्रमाणावर व्यापारीकरण झाले आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये अशा अनेक गिर्यारोहण संस्था आहेत की ज्या एखाद्या गिर्यारोहकाकडून हजारो डॉलर मानधनाच्या रुपात घेऊन त्याच्या एव्हरेस्ट मोहिमेची संपूर्ण तयारी करुन देतात. ही आखणी करुन देण्यामध्ये नेपाळमधील गिर्यारोहण संस्था वा एखादी व्यक्ती मध्यस्थ म्हणून भूमिका बजावतात. एव्हरेस्टवर चढाई करणाऱया प्रत्येक गिर्यारोहकाकडून नेपाळ सरकार दहा हजार डॉलर इतकी रॉयल्टी आकारत असते. अठरा एप्रिल रोजी झालेल्या अपघातात मरण पावलेल्या शेर्पांच्या अंत्यविधीसाठी नेपाळ सरकारने प्रत्येकी फक्त ४०० डॉलर इतकी तुटपुंजी रक्कम देण्याचे जाहीर केल्याने शेर्पा समुदाय संतप्त झाला होता. दरवर्षी एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांबरोबर मदतनीस व मार्गदर्शकाच्या रुपाने सहभागी होणाऱया शेर्पांना दर हंगामात प्रत्येकी सरासरी दोन ते आठ हजार डॉलरचीच कमाई होत असते. त्याची परिणती म्हणजे एव्हरेस्ट बेसकॅम्पला सुमारे ४०० शेर्पांनी जमून यंदा एव्हरेस्ट चढाई मोहिमांत सहभागी न होण्याचा निर्णय एकमुखाने जाहीर केलाकातावलेल्या शेर्पांपैकी काही जणांनी गेल्या वर्षी एव्हरेस्ट चढाईसाठी गेलेल्या तीन युरोपीयन गिर्यारोहकांच्या तंबूंवर दगडफेक तसेच त्यांना मारहाणही केली होती.
एडमंड हिलरी व शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी एव्हरेस्टचा माथा सर केला, त्या व त्या आधीच्या एव्हरेस्ट चढाई मोहिमांच्या आखणीत साधेपणा होता. हिलरी व नोर्गे यांनी एव्हरेस्ट शिखरावर ज्या साऊथ कोलमधून चढाई केली तो मार्ग आता चढणीच्या दृष्टीने बराचसा सोपा झालेला आहे. त्या मार्गाने चढाई करणाऱया गिर्यारोहकाबरोबर मदतीसाठी प्रशिक्षित गिर्यारोहक सोबत असतात. त्याशिवाय हवामानाचा अचूक अंदाज अत्याधुनिक साधनांद्वारे त्वरित कळतो. एव्हरेस्ट चढाईदरम्यान काही जीवघेणा प्रसंग उद्भवलाच तर मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर त्वरित उपलब्ध असते. संपर्कासाठी सॅटेलाईट फोन तसेच अतिउंचावर प्रकृतीसंदर्भात निर्माण होणाऱया समस्या टाळण्यासाठी प्रभावी औषधे व उपकरणेही गिर्यारोहकांना आता उपलब्ध असतात.
नेपाळ आणि चीनचा प्रांत असलेल्या तिबेटच्या सीमेवर एव्हरेस्ट शिखर उभे असून त्याच्यावरील चढाई मोहिमांत आजवर २७५हून अधिक गिर्यारोहक विविध अपघातांत मरण पावले आहेत. या शिखरावर १९९०च्या दशकात झालेल्या अपघातांमध्ये २०००च्या दशकात मात्र काही प्रमाणात घट झाली होती. ही गोष्टही एव्हरेस्टचा माथा सर करणाऱया गिर्यारोहकांसाठी उत्साहवर्धक ठरली होती. पाश्चिमात्य देशांतील एव्हरेस्ट मोहिम मार्गदर्शक कंपन्या गिर्यारोहकांकडे क्लायंट या दृष्टीनेच बघत असतात. एखाद्या एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकांबरोबर किती शेर्पा व मार्गदर्शक सहभागी होणार आहेत, त्यानूसार त्या गिर्यारोहकांना ४० ते ९० हजार डॉलरपर्यंत शुल्क आकारले जाते. त्यातही स्थानिक शेर्पा मार्गदर्शकांपेक्षा पाश्चिमात्य मार्गदर्शकांचे शुल्क अधिक असते. एव्हरेस्ट मोहिमेत गिर्यारोहकाबरोबर सहभागी होण्यासाठी पाश्चिमात्य मार्गदर्शक १० ते ३५ हजार डॉलरपर्यंत शुल्क आकारु शकतो. एव्हरेस्टवर चढाई करणाऱया व्यक्तीने गिर्यारोहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक समजले जाते. मात्र हाती आलेले गिऱहाईक सहजासहजी सोडावयाचे नाही या धंदेवाईक हेतूने एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या पर्वतारोहणाचा कोणताही अनुभव नसलेल्या व्यक्तींनाही एव्हरेस्ट चढाई मोहिमांत सहभागी करुन घेत असल्याची तसेच एव्हरेस्टवर जाऊ इच्छिणाऱयांपैकी काही लोक आपण प्रशिक्षित गिर्यारोहक असल्याचे खोटे दाखले सादर करीत असल्याचीही उदाहरणे समोर आली आहेत. या गोष्टींकडे कानाडोळा करणाऱया एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या धंदेवाईक वृत्तीवर एडमंड हिलरी यांनीही २००८ साली केलेल्या एका भाषणात कोरडे ओढले होते.
एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या व नेपाळमधील मध्यस्त संस्था यांच्यामध्ये जे एखाद्या चढाई मोहिमेसंदर्भात होणाऱया काँन्ट्रक्टमध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत याकडे बऱयाच गिर्यारोहकांचे बारीक लक्ष नसते. पाश्चिमात्य देशांतील एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्या गिर्यारोहकांकडून मोहिमेसाठी ५० हजार डॉलर इतके शुल्क घेत असतील तर त्यातील फक्त ३५ हजार डॉलर इतकीच रक्कम नेपाळमधील मोहिम आखणी करणाऱया मध्यस्थाला दिली जाते. प्रत्यक्ष मोहिमांत सहभागी होणाऱया शेर्पांना मिळणारा मोबदला तुटपूंजा वाटल्याने काही शेर्पांनी मोहिम आखणीसाठी नेपाळमध्ये मध्यस्थी करणाऱया कंपन्या सुरु केल्या आहेत. या कंपन्या एव्हरेस्ट चढाई मोहिमेसाठी प्रत्येक गिर्यारोहकाकडून सुमारे ३७००० डॉलर मोबदला घेतात. त्यात या गिर्यारोहकाला मोहिमेत आपल्या बरोबर दोन शेर्पा मदतनीस घेऊन जाण्याची सुविधा असते. या कंपन्यांना या व्यवहारात प्रत्येक गिर्यारोहकामागे किमान २ ते ३ हजार डॉलर इतका नफा मिळतो. यात एव्हरेस्टचा माथा सर करु पाहाणाऱया नवख्या गिर्यारोहकांची मानसिकताही काही वेळेस समस्या निर्माण करते. एव्हरेस्ट चढाई मोहिमेसाठी आपण जेवढे जास्त पैसे मोजू तितकी आपली मोहिम यशस्वी होण्याची खात्री अधिक असते असे मनाने घेतलेल्या नवख्या गिर्यारोहकांमुळे या मोहिमांना अधिक बाजारु स्वरुप आले आहे. नेपाळमधील पर्यटन व्यवसायातून मिळणाऱया एकूण उत्पन्नामध्ये गिर्यारोहणातून मिळणाऱया महसुलाचा चार टक्के वाटा आहे. एव्हरेस्टवरील चढाई मोहिमा आयोजित करुन देणाऱया संस्था नेपाळमधील मध्यस्थ संस्थांकडे मोबदला कमी करण्यासाठी तगादा लावतात. जो मध्यस्थ कमी मोबदल्यावर मोहिम न्यायला तयार होईल त्याच्याकडे आपले क्लायंट पाठविण्याकडे एव्हरेस्ट मोहिम आखणी कंपन्यांचा कल असतो. या घासाघीशीच्या प्रवृत्तीमुळे प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी होणाऱया शेर्पांनाही कमी मोबदला मिळतो. या व्यवहारात नेपाळमधील काही स्थानिक उद्योजक गडगंज श्रीमंत झाले. त्यांनी पर्यटकांसाठी हॉटेल उघडली. काहींनी विमाने विकत घेऊन ती गिर्यारोहकांसाठी उपलब्ध करुन दिली. मात्र शेर्पांमधील बहुसंख्य जण मात्र अपुऱया उत्पन्नामुळे नाराज आहेत. यंदाच्या वर्षी एव्हरेस्टच्या माथ्यावर जाण्यासाठी ३३४ गिर्यारोहकांनी नेपाळ सरकारकडे नोंदणी केली होती. त्यांच्याकडून रॉयल्टीच्या रुपात नेपाळ सरकारने तब्बल ३.३ दशलक्ष डॉलरचा महसुल यंदा मिळविला. त्या रकमेतील तीस टक्के भाग हा एव्हरेस्ट परिसराच्या विकासासाठी नेपाळ सरकार खर्च करणार आहे. मात्र एव्हरेस्ट मोहिमांचा फळफळलेला व्यवसाय हा नेपाळ सरकारला दुभत्या गायीसारखा वाटतो. मात्र त्या व्यवसायात गुंतलेल्या शेर्पांच्या कल्याणासाठी काही उत्तम योजना राबवाव्यात असे तेथील सरकारला वाटत नाही ही खंत शेर्पांच्या मनात आहे. गेल्या वर्षी एव्हरेस्टवर ज्या दुर्घटना घडल्या त्यानंतर प्रत्येक आरोहण तुकडीसाठी एक लायझन ऑफिसर देण्याचे सरकारने मान्य केले होते. मात्र यंदाच्या वर्षी एव्हरेस्टवर जाणाऱया ३९ मोहिमांसाठी फक्त तीनच लायझन ऑफिसर सरकारने उपलब्ध करुन दिले याबद्दल शेर्पांच्या मनात राग आहे.
नेपाळच्या पूर्व भागात राहाणारे शेर्पा हे एव्हरेस्ट मोहिमांमधील महत्त्वाचा घटक असतात. एव्हरेस्टवर चढाई करणाऱया गिर्यारोहकांचा स्वयंपाक करणे, त्यांचे सामान वाहून नेणे. विविध चढ-उतारांवर दोर बांधणे, शिडय़ा रोवणे ही कामे शेर्पा करतात. त्याचबरोबर मोहिमेमध्ये अचूक दिशादिग्दर्शन करणे, नैसर्गिक आपत्तीत एखादा गिर्यारोहक सापडला तर त्याला मदतीचा हात देणे ही कामे शेर्पा मंडळी करतात. चढाई दरम्यान गिर्यारोहणाची साधने व अन्य सामान एका छावणीतून पुढच्या छावणीमध्ये नेण्यासाठी त्या दरम्यान शेर्पांना अनेक फेऱया माराव्या लागतात. हे लक्षात घेता गिर्यारोहकापेक्षा शेर्पांच्याच जीवाला अधिक धोका असतो. एव्हरेस्टवरील खुंबु हिमनदीतून मार्ग काढत असताना तर संकटे दत्त म्हणून उभी ठाकतात. त्यात अनेकदा पहिला बळी जातो शेर्पांचाच. या सगळ्या अडचणींतून मार्ग काढून मोहिम यशस्वी झाल्यास त्यातून शेर्पांना प्रत्येकी २ ते ८ हजार डॉलर इतकी कमाई होते. अनेकदा पाश्चिमात्य मार्गदर्शकांइतका मोबदलाही अत्यंत कुशल शेर्पांना मिळू शकतो. परदेशी गिर्यारोहक अनेकदा शेर्पांशी नीट वागत नाहीत. १९२२ साली जॉर्ज मॅलरी सहभागी असलेल्या एव्हरेस्ट चढाई मोहिमेदरम्यान हिमप्रपातात ७ शेर्पा मरण पावले होते. त्या दुर्घटनेसंदर्भात एव्हरेस्ट तळछावणीला जो निरोप पाठविण्यात आला होता त्यात म्हटले होते सारे गौरवर्णीय गिर्यारोहक सुरक्षित आहेत!’ असे अनेक प्रसंग ओढवूनही शेर्पा मंडळींनी आपल्या मनमिळावू स्वभावाची कास कधी सोडली नव्हती. पण 18 एप्रिलच्या घटनेनंतर एव्हरेस्टच्या बेसकॅम्पला संतप्त तरुण शेर्पांचा घोळका नेपाळ सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत होता, त्यांना राजकीय फूस असावी अशी शंका या हंगामात आलेल्या अनेक विदेशी गिर्यारोहकांच्या मनात डोकावली होती. यंदा एव्हरेस्ट मोहिमांवर शेर्पांनी घातलेला बहिष्कार मागे जरी घेतला गेला तरी गेल्या तीन आठवडय़ांतील घडामोडींचा विपरित परिणाम मोहिम आखणी व्यवसायावर होणार हे नक्की. त्यातून एव्हरेस्ट मोहिमांसाठी आकारण्यात येणाऱया शुल्कातही भविष्यात मोठी वाढ होण्याचा संभव आहे.
एव्हरेस्ट शिखरावर दरवर्षी जाणाऱया मोहिमांमुळे या शिखरावर कचरा साठण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. सोळा वर्षांचा असलेला अर्जुन वाजपेयी हा २२ मे २०१० रोजी एव्हरेस्टचा माथा सर करणारा सर्वात कमी वयाचा भारतीय गिर्यारोहक ठरला होता. आपल्या या अनुभवांवर आधारित ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड - माय एव्हरेस्ट ऍडव्हेंचरया पुस्तकात वाजपेयीने म्हटले आहे की, एव्हरेस्ट शिखर व त्या परिसरातील पर्यावरणाची नासाडी रोखण्यासाठी तो प्रदेश सागरमाथा नॅशनल पार्ककडे सुपूर्द करण्यात आला. तसेच १९७९ साली हा भाग राष्ट्रीय सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर करण्यात आला. १९९८ साली एव्हरेस्ट पर्यावरण संरक्षक मोहिमेंतर्गत गिर्यारोहकांच्या एका तुकडीने सुमारे दीड टन कचरा एव्हरेस्टवरुन खाली आणला होता. त्यामध्ये गिर्यारोहकांनी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, ऑक्सिजनच्या रिकाम्या नळकांडय़ा, बॅटरी व अन्य प्रकारचा मानवी कचरा होता. या मोहिमेनंतरही अजून बराच कचरा एव्हरेस्टच्या विविध कॅम्पवरती शिल्लक होताच. एव्हरेस्टवर वाढणाऱया कचऱयाची समस्या लक्षात घेऊन नेपाळ सरकारने गिर्यारोहकांकडून चार हजार डॉलर इतकी अमानत रक्कम घेण्यास सुरुवात केली. गिर्यारोहकांनी जेवढी साधनसामुग्री बरोबर नेली असेल ती सर्व सामग्री त्यांनी एव्हरेस्टवरुन खाली येताना आणली तरच त्यांना ही अमानत रक्कम परत दिली जाते. असे उपाय योजूनही अजून एव्हरेस्टवरील कचऱयाची समस्याही दूर झालेली नाही. एव्हरेस्टवरील कचरा हटविण्याच्या प्रयत्नांत शेर्पांची बहुमोल मदत असूनही नेपाळ सरकारला त्याची फारशी कदर नाही असे शेर्पांना वाटते. धंदेवाईक वृत्तीच्या दुश्चक्रात सापडलेल्या एव्हरेस्ट मोहिमांमध्ये शेर्पांपासून गिर्यारोहकांपर्यंतचे सारेच घटक सध्या असंतुष्ट आहेत. त्यात नैसर्गिक आपत्तीही आपला रंग दाखवून जातात. त्या विळख्यातून एव्हरेस्टची सुटका कधी होणार?