Wednesday, June 4, 2014

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्राचे संभाव्य राजकीय चित्र.

गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्राचे संभाव्य राजकीय चित्र.
----
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर महाराष्ट्रामध्ये जननेता म्हणावा असा एकही नेता दिसत नाही. विनोद तावडे, देवेंद्र फडवणीस, नितीन गडकरी हे नेते जननेते नव्हेत, ते दिवाणखानी राजकारण करणारे नेते म्हणून अधिक ओळखले जातात जसे शिवसेनेचे मनोहर जोशी. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा लौकिकही दिवाणखानी राजकारण्याचाच आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना राज्य भाजपाचे छत्र शोभावे असे मुंडेंचे नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने त्यांच्या ऐवजी आता महाराष्ट्रात भाजपचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उद्भवला आहे. माझ्या मते नितीन गडकरी यांना लवकरच विधानसभा निवडणुकांमध्ये राज्य भाजपचे नेतृत्व करा असा संदेश नरेंद्र मोदींकडून दिला जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात भाजपमध्ये नितीन गडकरी यांचे नेतृत्व जुनेजाणते आहे. पण गडकरी यांना विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागात फारशी लोकप्रियता नाही. मुंडे यांच्या जाण्याने विरोधी पक्षांच्या रिंगणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे भरुन काढू शकतात. राज ठाकरे स्वत:च विधानसभा निवडणुकीस उभे राहाणार आहेत. ते बहुधा नाशिक किंवा दादर विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवितील असा माझा प्राथमिक अंदाज आहे. राज ठाकरे हे वेगळ्या पक्षातील असले तरी ते गर्दी खेचणारे नेते अाहेत. त्यांच्या भाषणांना मिळणारा प्रतिसाद हा जननेत्याला जसा मिळतोच तसाच असतो. मुंडे हे ग्रामीण भागातून पुढे आलेले नेतृत्व आहे तर राज ठाकरे हे अस्सल शहरी नेतृत्व आहे. ग्रामीण भागातील मतदारांना अापलेेसे वाटावे असे मुद्दे मांडण्यावर राज ठाकरे यांनी येत्या चार महिन्यांत भर दिल्यास त्यांचे नेतृत्व काही उभारी घेऊ शकेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही संपूर्ण शहरी तोंडवळा असलेला राजकीय पक्ष आहे. ही त्याची मर्यादाच या पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तम यश मिळवून देण्यात अडसर आहे. राज ठाकरे यांनी शहरी व ग्रामीण मतदारांना जवळचे वाटतील असे मुद्दे प्रचारात घेऊन या दोन्ही भागांतील जनतेला आपल्याबरोबर आणायला हवे. तरच त्यांना या निवडणुकीत काही भवितव्य आहे. शिवसेना व भाजप आघाडीमध्ये अजून जागावाटपाची बोलणी व्हायची आहेत. मात्र या पक्षांनी विधानसभा निवडणुकीत मनसेबाबत गाफील राहून पुन्हा मोदी लाटेची अपेक्षा करु नये. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मोदी लाट येईल असे दिसत नाही. शिवाय विधानसभा या स्थानिक प्रश्नांवर जास्त लढल्या जातात. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे गड उदध्वस्त करायचे असतील तर शेतकरी, कामकरी यांचे गावगाड्यातील प्रश्न शिवसेना, भाजपने येत्या चार महिन्यांत लावून धरायला हवेत. तरच त्यांना काही आशा आहे. येत्या निवडणुकीत शिवसेना -भाजपला काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळतील पण बहुमतासाठी त्यांना मनसेचा पाठिंबा घ्यावा लागेल. मुंडे यांच्या जाण्याने मराठवाडामध्ये सहानुभूतीची लाट भाजप-सेेनेच्या बाजूने जाऊन तिथे काँग्रेसचे पतन होईल असे दिसते. महाराष्ट्र विधानसभेच्या २८२ जागांपैकी किमान १२४ जागा भाजप-शिवसेना युतीला मिळतील व मनसेला ५० जागा मिळतील, ८० काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळतील तसेच बाकीच्या जागा अपक्ष व इतर पक्ष जिंकतील असा माझा अंदाज आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतरचे महाराष्ट्राचे राजकीय चित्र साधारणपणे असे असेल.
- समीर परांजपे

No comments:

Post a Comment