Tuesday, January 10, 2017

माणदेशातल्या महिलांच्या जिद्दीची गोष्ट - समीर परांजपे - मधुरिमा, दै. दिव्य मराठी १० जानेवारी २०१७



मुंबईत ५ ते ८ जानेवारी २०१७ या कालावधीत भरलेल्या माणदेशी महोत्सवाबद्दल दिव्य मराठी या वृत्तपत्रात मधुरिमा या महिलाविषयक पुरवणीमध्ये दि. १० जानेवारी २०१७ रोजी मी लिहिलला हा लेख. त्या लेखाचा पूर्ण मजकूर, जेपीजी फाइल, वेब आणि टेक्स्ट लिंकही पुढे दिली आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/…/MAG-sameer-paranjape-writ…
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/m…/246/10012017/0/1/
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/…/m…/246/10012017/0/7/
---------------------------------
माणदेशातल्या महिलांच्या जिद्दीची गोष्ट
-------------------------------------------
-समीर परांजपे
-------------
‘झाड येलाचं,झाड बेलाचं,झाड सुरूचं,झाड पेरूचं
करकरा लवं बाई मोगरा जाई’
जात्यावरील या ओवीचे सुस्वर निघत होते केराबाई सरगर यांच्या मुखातून.त्या गात असलेल्या ओव्या रेकॉर्ड करून घेण्यासाठी सात-अाठ जण आपले स्मार्टफोन त्यांच्यासमोर घेऊन उभे तेही अदबीने.लहानपणापासून ऐकलेल्या या ओव्या केराबाईंच्या मनीमानसी होत्याच,पण आता त्यांचा हा स्वर गुंजतो आहे माणदेशी फाउंडेशनने सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावी सुरू केलेल्या माणदेशी तरंग वाहिनी म्हणजे कम्युनिटी रेडिओ स्टेशनवरून.त्या या रेडिओ केंद्राच्या आरजे म्हणून प्रसिद्ध आहेत!आता वय वर्षे ५५ असलेल्या केराबाई सरगर लहानपणापासून पुणे,मुंबई रेडिओ केंद्र ऐकायच्या.त्यांनाही असे वाटायचे की,आपला आवाज रेडिओत आला पाहिजे.तो आवाज सरतेशेवटी माणदेशी तरंग वाहिनीतून ऐकायला मिळाला.हा चमत्कार होता,माणदेशी फाउंडेशनने त्या भागात महिला सक्षमीकरणासाठी जे प्रयत्न केले त्यातून घडलेला.माणदेशी फाउंडेशनच्या वतीने मुंबईतील रवींद्र नाट्यमंिदर संकुलामध्ये नुकताच माणदेशी महोत्सव आयोजिण्यात आला होता.त्यात केराबाई सरगर यांचा टेराकोटा भांड्यांचा स्टाॅल होता.त्या स्टॉलवरच‘जात्यावरच्या ओव्यांची ध्वनिमुद्रण परिषद’भरली होती!
केराबाईंशी संवाद साधताना त्या जुन्या आठवणींत रमल्या.‘सातारा जिल्ह्यातील माण तालुका म्हणजे सदानकदा दुष्काळी भाग.जे पेरले त्यातूनच जितके उगवले त्यातच भागवले,अशी अवस्था.या भागात ग.दि.माडगूळकर,व्यंकटेश माडगूळकर असे मोठमोठे लेखक होऊन गेले.व्यंकटेश माडगूळकरांनी‘माणदेशी माणसं’हे पुस्तक लिहून हा प्रदेश अमरच केला आहे.मात्र माण अजूनही दुष्काळी आहे.मी माण तालुक्यातील म्हसवडची.लहानपणापासून स्वत:चे काही करावे,अशी जिद्द होतीच.सामाजिक कार्यकर्ते चेतना व विजय सिन्हा यांनी स्थापन केलेल्या माणदेशी महिला बँकेने मला सहकार्याचा,कर्जाचा हात देऊ केला.त्यातून टेराकोटा भांड्यांचा व्यवसाय आम्ही अधिक वाढविला.हा आमचा परंपरागत व्यवसाय.आधी गाव,फार तर सातारा जिल्हा बाजारापर्यंत जाऊन विक्री करण्याची मजल होती.आता आम्ही महाराष्ट्रात व राज्याबाहेरही विक्रीसाठी जातो,’केराबाईंच्या डोळ्यांत हे सारे सांगताना कृतज्ञता दाटून आली होती.केराबाईंच्या टेराकोटा भांड्यांच्या स्टॉलवर त्यांचा मुलगा व सूनही होते.ही भांडी बनविण्यात केराबाई माहीर आहेत,हे सांगताना त्यांना विलक्षण अभिमान वाटत होता.ही एकाच स्टॉलवरची कथा नव्हती.या माणदेशी महोत्सवात सुमारे २० स्टॉल मांडलेले होते.प्रत्येक स्टॉलवर अशी कर्तृत्वगाथा व कर्तृत्वशालिनी ठळकपणे दिसत होती.माणदेशी फाउंडेशन व माणदेशी महिला बँकेचे काम आता फक्त सातारा जिल्ह्यापुरते नाही तर महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यांत व गुजरातमध्येही विस्तारले आहे.विविध महिला तसेच बचत गटांना आर्थिक साहाय्य करून त्यांना स्वत:चा उद्योग उभारण्यास प्रोत्साहन देणे,त्यांना तंत्रज्ञानकुशल बनविणे अशी मुख्य उद्दिष्टे या संस्थांनी आपल्या कामातून साध्य केली आहेत.
इथल्या एका स्टॉलवर मेंढीच्या लोकरीपासून तयार केलेल्या विविध वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या.त्यामध्ये जेन,घोंगडी,बसकर,हसन,उशी,टोपी,मोपरेला अशा वस्तूंचा समावेश होता.या वस्तू मुंबईत एरवी दिसणं अशक्य,त्यामुळे अधिक बारकाईने बघितल्या गेल्या.तो स्टॉल होता सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा गावच्या बिबि फातिमा कृषि महिला स्वयंसेवी सहबचत गटाचा.या गटाच्या अध्यक्षा बिस्मिल्ला हारून नदाफ यांचा तो स्टॉल.त्या मेंढीच्या लोकरीपासून बनविलेल्या वस्तूंची माहिती सांगत असताना मुंबैकर महिलांचा भोवती गराडा पडलेला.माहिती सांगून झाल्यावर पटापट विक्रीही झाली.बिस्मिल्ला म्हणाल्या,माणदेशी महिला बँकेने आमच्या बचत गटाला मदत केली व स्वत:च्या पायावर उभे केले.मुंबईत येण्याआधी केरळमध्ये एका प्रदर्शनात स्टॉल लावून या वस्तूंची विक्री केली व मुंबईत आलो,असे आत्मविश्वासाने बिस्मिल्ला यांनी सांगताच त्यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या पतीनेही आनंदाने त्यात आपला स्वर मिसळला.
बुरुड जमातीच्या बेबी हिरा जाधव.त्यांच्या स्टॉलवर बांबूपासून विणलेल्या टोपल्या,फुलदाणी,देव्हारा साफ करायचा साळुला अशा विविध वस्तू विक्रीला ठेवलेल्या होत्या.१५ रुपयांपासून २०० रुपयांपर्यंतच्या वस्तू इथे मांडलेल्या होत्या.नुसत्याच मांडलेल्या नव्हत्या तर त्या प्रत्यक्ष तिथे बनविणे सुरू होते.त्यामुळे वस्तू विकत घेणाऱ्यांना त्या बनविताना बघण्याचाही दुहेरी आनंद.
त्याच्या पुढचा स्टॉल होता तानाजी हनुमंत यादव यांचा.ते बोरीच्या झाडाच्या लाकडापासून बनवत होते रवी,लाटणी,तसेच किचन ओट्यावर आले वगैरे चेचण्यासाठी लागणारे लाकडी उपकरण.बटाटे मॅश करायला,पावभाजी बनवायला लागणारे लाकडी उपकरणही त्यांनी विकायला ठेवले होते.
राधाबाई चौघुले ही पाथरवट व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील महिला.तिच्या स्टॉलवर छोट्या छोट्या आकाराची जाती,पाटा-वरंवटा,खलबत्ते अशा अनेक वस्तू होत्या.मुंबैकर बायका जाती,पाटा-वरवंटा विकत घेत होत्या.जात्याची किंमत १५०० रु.पाटा-वरंवटा ५०० रुपयाला.राधाबाईंचा मुलगा अर्जुनने मस्त माहिती दिली.‘योगगुरु रामदेवबाबा सांगतात की,गरोदर महिलांनी जात्यावर दळले पाहिजे,त्यासारखा चांगला व्यायाम नाही.त्यामुळे गर्भवती महिला ही छोट्या आकाराची जाती विकत घेतात.पाटा-वरवंट्यावर वाटण करणे हेदेखील व्यायामाचा भाग म्हणून पाहिले जाते.या गोष्टींवर बनविलेल्या पदार्थांची चव वेगळीच;पण आता जाते,पाटा-वरवंटा या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे.’माणदेशी महिला बँकेने अर्थसाहाय्य देऊन ज्यांना स्वत:च्या पायावर उभे केले त्यात राधाबाईदेखील होती.या सगळ्या दगडी वस्तू आपल्याला लहानपणापासून तयार करता येतात,हे त्यांनी बोलक्या डोळ्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगावच्या श्रीराम स्वयंसाहाय्यता महिला बचत गटाच्या स्टॉलवर विक्रीला होती मातीची भांडी.मातीच्या तव्यापासून माठापर्यंत अनेक प्रकार.त्यांच्या किमतीही जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत.मुंबईत मातीचा माठ वापरणारे आता कमी उरलेत.त्यामुळे या प्रदर्शनात अशा काही वस्तू दिसल्या की,अजि म्या ब्रह्म पाहिले,अशी अवस्था होते.हे स्टॉल बघत असताना माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा यांची भेट झाली.त्या म्हणाल्या,‘माणदेशातील महिला उद्योजकांना या प्रदर्शनाद्वारे जगापुढे आणण्याचा हेतू होता.त्याशिवाय त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होता.’
या चार दिवसांच्या महोत्सवात अनेक महिला उद्योजक सहभागी झाल्या होत्या. त्यांनी घरगुती पद्धतीने तयार केलेल्या खाद्यपदार्थांपासून विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.माण तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या माणदेशी महिला बँक व सामाजिक कणा असलेल्या माणदेशी फाऊन्डेशनने या भागातील महिलांचे जे सक्षमीकरण केले तेही गाजावाजा न करता.असे प्रयत्न महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात रुजले,वाढले तर महिला विकास अधिक चांगला आकार घेईल.पण त्यासाठी जिद्द हवी.ती शोधायची असेल तर त्यासाठी दुष्काळी
ओळख असलेल्या माणदेशातल्या माणसांना भेटायला हवं.
sameer.p@dbcorp.in

No comments:

Post a Comment