Tuesday, October 24, 2017

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग तयार होणार - - ‘मुंबई पुणे मुंबई – ३’ - समीर परांजपे, दै. दिव्य मराठी २४ ऑक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. २४ आॅक्टोबर २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेली व मी केलेली बातमी. या बातमीची जेपीजी फाइल, वेबपेज लिंक व मजकूर पुढे देत आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/24102017/0/5/
----
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग तयार होणार 
- ‘मुंबई पुणे मुंबई – ३’मध्ये झळकणार स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे 
- २७ एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार - दिग्दर्शक सतीश राजवाडेंची घोषणा
मुंबई, दि. २३ ऑक्टोबर (विशेष प्रतिनिधी) - पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ने महाराष्ट्रासह इतर राज्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश तर मिळविलेच पण प्रेक्षकांनाही वेड लावले. त्या चित्रपटाचा सिक्वेल ‘मुंबई पुणे मुंबई -२ : लग्नाला यायचंच’ नावाने आला आणि त्याच यशाची पुनरुक्ती झाली. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटाचा तिसरा भागही आणण्याचे जाहीर केले आहे. अभिनेते स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्यासोबत ‘मुंबई पुणे मुंबई–३’ चित्रपट २७ एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याची घोषणाही केली आहे. मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये एखाद्या चित्रपटाचे तीन भाग प्रदर्शित होण्याची हि पहिलीच वेळ आहे.
२ वर्षांपूर्वी दिवाळीच्याच मुहूर्तावर १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई-२ : लग्नाला यायचंच’चे मोठ्या धुमधडाक्यात सिनेमा रसिकांकडून स्वागत झाले. चित्रपटाला महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक आणि अगदी अमेरिकेतूनही प्रचंड प्रतिसाद लाभला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगलाच व्यवसाय केला होता. अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को, ह्युस्टन ,लॉस एन्जेलिस, डेट्रोईट, सॉल्ट लेक सिटी या शहरांमध्ये पण या चित्रपटाचे खेळ झाले होते.
या पार्श्वभूमीवर आणि तिसऱ्या भागाच्या निमित्ताने बोलताना सतीश राजवाडे म्हणाले, मुंबई पुणे मुंबई भाग पहिला करताना हा सिनेमा रसिक प्रेक्षकांना इतका आवडेल ह्याची आम्हाला कल्पना नव्हती, मराठी‘मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाने लव स्टोरीचा एक मोठा व नवा प्रवाह मराठी चित्रपटसृष्टीत आणला. मुंबई पुणे मुंबईमधील गौतम आणि गौरीच्या जीवनामध्ये आता पुढे काय घडते आहे ह्याची उत्सुकता रसिकांना लागली आहे कारण प्रत्येक प्रेक्षकांना गौतम आणि गौरीच्या गोष्टी ही आपली स्वत:ची गोष्ट वाटते.
“मूळ चित्रपट करताना त्याचा सिक्वेल येईल असे काही वाटले नव्हते. ‘मुंबई पुणे मुंबई -2: लग्नाला यायचंच’ हा सिक्वेल करत असताना मात्र आम्ही चित्रपटाचा तिसरा भागही बनवू शकतो हे मात्र जाणवले होते. तिसऱ्या भागाच्या कथानकाबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही, पण पहिल्या दोन भागांप्रमाणेच तिसरा भागही प्रेक्षकांना आवडेल याची आम्ही हमी देऊ शकतो.” असेही दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी पुढे सांगितले.
पाच वर्षांपूर्वी आलेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपपाटाचे अनेक भारतीय भाषांमध्ये ‘रिमेक’ झाले तर जगभरच्या प्रेक्षकांना हा चित्रपट आपला वाटला. चित्रपटाचा पुढील भाग बनावा, अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करत होते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या हिट जोडीला पुन्हा एकदा बघण्याची उत्सुकता रसिकांना होती. रसिकांनी त्यांची पसंती ‘मुंबई पुणे मुंबई’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई –२’च्या तिकीट खिडकीवरील गर्दीतून आधीच व्यक्त केली होती.

No comments:

Post a Comment