Tuesday, October 24, 2017

मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास मांडला जाणार अकरा खंडांतून! - समीर परांजपे. दिव्य मराठी २३ ऑक्टोबर २०१७


दै. दिव्य मराठीच्या दि. २३ आँक्टोबर २०१७च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या व मी केलेल्या विशेष बातमीची वेबपेज लिंक व जेपीजी फाइल, मजकूर पुढे दिला आहे.
---
मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास मांडला जाणार अकरा खंडांतून!
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी या प्रकल्पाचे प्रमुख संपादक व डॉ. अजय देशपांडे आहेत संपादक
- कथा, कविता, कादंबरी, ललित वाङ््मय, वैचारिक गद्य, शास्त्रीय लेखन, नाटक व उरलेले साहित्येतर लेखन या वाङ््मय प्रकारांचा आहे समावेश
- समीर परांजपे
मुंबई, दि. 22 ऑक्टोबर - मराठी वाङ््मयाचा इतिहास हा मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर अशा काही भागांपुरताच केंद्रित झाला असून राज्याच्या अन्य भागात लिहिले गेलेले वाङ््मय व लेखक यांच्याबद्दल चिकित्सक अभ्यास होणे ही महत्वाची गरज आहे. परंतु अशा प्रकारचे काम फारसे होत नसल्याने जी एक प्रकारची कोंडी निर्माण झाली होती ती आता विदर्भातील काही वाङ््मय अभ्यासकांनी हाती घेतलेल्या प्रकल्पामुळे फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विदर्भातील विविध साहित्य प्रकारांमध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत जे काम झाले आहे त्याची चिकित्सक मांडणी करणारा `मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास' हा प्रकल्प आता आकाराला आला असून त्या इतिहासाचे दोन किंवा तीन खंड नजिकच्या काळात प्रकाशित होणार आहेत.
या प्रकल्पाचे प्रमुख संपादक, मराठीतील ज्येष्ठ कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी `दिव्य मराठी'ला यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मराठी वाङ््मयाचा इतिहास हा काही प्रदेशांपुरताच लिहिला गेला आहे. विदर्भामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत विविध प्रकारचे मराठी वाङ््मय लिहिले गेले आहे. मात्र विदर्भातील चार-पाच मोजकी नावे सोडली तर या भागातील इतर साहित्यिकांविषयी महाराष्ट्रात फारसे कोणाला माहित नसते. ही फारशी भुषणावह गोष्ट नाही. ही उणीव दूर करण्यासाठी विदर्भातील वाङ््मयाचा समग्र इतिहास लिहिण्याबद्दलचा एखादा प्रकल्प हाती घ्यावा अशी संकल्पना माझ्या मनात आली. अशा प्रकल्पांसाठी सरकार निधी उपलब्ध करुन देईल अशी आशाच नाही. तसेच ज्या साहित्य संस्थांनी असे प्रकल्प राबवायचे त्या अशा गोष्टींत सहभाग घेताना दिसत नाहीत. त्यामुळे विदर्भातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था विजय प्रकाशनचे संचालक सचिन उपाध्याय यांना ही कल्पना सांगितल्यावर त्यांनी मराठी वाङ््मयाच्या वैदर्भीय इतिहासाचे खंड प्रकाशित करण्याचे ठरविले.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी पुढे सांगितले की, प्रकाशकांच्या संमतीनंतर मग मी एक बैठक घेऊन त्यात या प्रकल्पामध्ये सहभागी होऊ शकणाऱ्या ३० लेखकांची एक यादी तयार केली. `मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास' या प्रकल्पाचा मी प्रमुख संपादक आहे तर वणी येथील प्राध्यापक डॉ. अजय देशपांडे हे संपादक आहेत. विदर्भामध्ये कथा, कविता, कादंबरी, ललित वाङ््मय, वैचारिक गद्य, शास्त्रीय लेखन, नाटक व उरलेले साहित्येतर लेखन अशा अनेक प्रकारांत लेखन झाले आहे. त्या प्रत्येक वाङ््मय प्रकारात िवदर्भामध्ये जे जे लेखन झाले आहे त्याचा साद्यंत इतिहास त्यासंदर्भातील खंडात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा जो वाङ््मयीन इतिहास लिहिला जातो आहे त्यामध्ये स्थानिक पातळीवरील नोंदीचा अभाव असतो. ती उणीव या प्रकल्पात भरुन काढली जाईल. विदर्भातील कविता, कथा, नाटक या तीन वाङ््मय प्रकारांच्या इतिहास लेखनाचे काम मार्गी लागले असून त्यांचे खंड नजिकच्या काळात विजय प्रकाशनतर्फे प्रसिद्घ होतील.`मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास' हा एकुण ११ खंडांमध्ये प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. त्यातील प्रत्येक खंड अडीचशे पानांचा असणार आहे असेही डॉ. श्रीपाद जोशी यांनी पुढे सांगितले.
महाराष्ट्रातील विविध भागांत वाङ््मय इतिहास लेखन प्रकल्प सुरु करण्यास मिळेल प्रेरणा
`मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास' हा प्रकल्प येत्या तीन ते चार वर्षांत पुर्ण व्हावा अशी अपेक्षा आहे असे सांगून डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी पुढे म्हणाले की, हे खंड प्रसिद्ध झाले की, अशा प्रकारच्या प्रकल्पाचे एक रोल मॉडेल तयार होईल. `मराठी वाङ््मयाचा वैदर्भीय इतिहास' या प्रकल्पातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागांमधेही तेथील मराठी वाङ््मय प्रकारांच्या इतिहासाच्या लेखनाचे प्रकल्प हाती घेण्यासाठी संशोधकांना प्रेरणा मिळेल.

No comments:

Post a Comment