प्रख्यात राजकीय विचारवंत रजनी कोठारी यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांचा
कार्याचा आढावा घेणारा लेख मी दै. दिव्य मराठीच्या ३ फेब्रुवारी २०१५च्या
अंकात मी लिहिला आहे. त्या लेखाची जेपीजी फाईल, टेक्स्ट व वेबपेज लिंक व
मजकूर खाली दिला आहे.
----
http://divyamarathi.bhaskar.com/…/EDT-sameer-paranjape-arti… http://epaperdivyamarathi.bhaskar.com/auran…/…/03022015/0/6/ ----
भारतीय मुशीतला राजकीय विचारवंत
--------
-समीर परांजपे
sameer.p@dbcorp.in
---
स्वातंत्र्यपूर्व भारत व स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय स्थिती तसेच
राजकीय प्रवाहांची अचूक जाण असणारे जागतिक कीर्तीचे राजकीय विश्लेषक रजनी
कोठारी यांच्या निधनामुळे या अभ्यास क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. विविध
जाती, पंथ, धर्म यांच्यात विभागला गेलेला अन् तरीही एकसंध असलेला भारतीय
समाज ही राजकीय विषयांचे अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार यांच्या
दृष्टीने खूप अजब अशीच गोष्ट आहे. कोणत्याही समाजवर्तनाला एकच एका सूत्रात
बांधणे शक्य होत नाही. विविध क्षेत्रांतील घटनांची प्रतिक्रिया व परिणाम
होऊन समाजाचे मत तयार होत असते.
बर्याचदा समाज हिणकस व उदात्त असे
दोन्ही मतप्रवाह उराशी बाळगून मार्गक्रमण करीत असतो. या वर्तनाला भारतीय
समाजही अपवाद नाही. मात्र भारतीय समाजाच्या प्रगतीत वा अधोगतीत येथील विविध
जात, धर्म, पंथ असे अनेक घटक आपापली भूमिका बजावत असतात. त्यामुळे भारतीय
मुशीचे राजकारण अमेरिका, युरोपीय देशांपेक्षा वेगळे आहे.
भारतीय
समाजाच्या राजकीय वर्तनाचे नेमके आकलन रजनी कोठारी यांना झालेले होते.
हस्तिदंती मनोर्यात बसून सखोल विचार करणार्या विचारवंतांचे एक जग आहे आणि
त्यांचा पवित्रा काही प्रमाणात बरोबरही आहे. याचे कारण लोकांत फार
मिसळल्याने आपल्या विचारांतील तटस्थता गमावण्याचा धोका अशा मनोवृत्तीच्या
विचारवंतांना नेहमी वाटत असतो. लोकांत मिसळणारे व लोकांपासून विलक्षण
अलिप्त राहणारे या दोन्ही प्रकारच्या विचारवंतांमधील मध्यममार्ग राजकीय
तज्ज्ञ रजनी कोठारी यांना पसंत होता. केवळ लोकानुनयी धोरणे, लोकभावना
यांचाच अभ्यास करून कोणताही राजकीय सिद्धांत मांडता येत नाही, तर विविध
कालखंडात साधर्म्य वाटणार्या परिस्थितीत समाज राजकीयदृष्ट्या त्याच त्याच
पद्धतीने वागला का, त्यातून राजकारणाने कुठले वळण घेतले याचा अभ्यास करून
निष्कर्ष काढणे रजनी कोठारी यांना महत्त्वाचे वाटत असे.
राजकीय प्रवाह व
समाजाचा विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने त्यांचा एकत्रित
अभ्यास व्हावा, असेही त्यांचे मत होते. त्यातूनच रजनी कोठारी यांनी ‘सेंटर
फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ (सीएसडीएस) ही संस्था स्थापन केली होती.
समाजशास्त्र व मानव्यशास्त्रांमध्ये प्रगत संशोधन करण्यासाठी ही संस्था
त्यांनी उभारली होती. रजनी कोठारी यांचा पिंड हा कार्यकर्ता विचारवंताचा
होता. अभ्यासकाच्या विचारमांडणीला एक शिस्त व परीघ असतो. त्या परिघाच्या
बाहेरही अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांचा विचार अभ्यासकाने निराळ्या अंगाने
करणे अपेक्षित असते. तिथे त्याचे कार्यकर्तापणही कामाला येते. रजनी कोठारी
यांनी स्थापन केलेल्या सीएसडीएस या संस्थेने अशाच प्रकारचे काम उभे केले
होते. सामाजिक चळवळींचे बहुशाखीय दृष्टिकोनातून विश्लेषण करणे ही
सीएसडीएसची खासियत आहे. आपल्या संस्थापकाच्या गौरवार्थ लोकशाहीच्या
अभ्यासासाठी सीएसडीएसने २००४ मध्ये रजनी कोठारी अध्यासनाची स्थापना केली.
२० नोव्हेंबर २०१२ रोजी सीएसडीएसला तेव्हा पन्नास वर्षे पूर्ण झाली.
सीएसडीएसच्या माध्यमातून या कालावधीत रजनी कोठारी यांनी राजकीय विश्लेषणाला
नवा आयाम देण्याचे जे मोठे कार्य केले होते त्याचा संस्थेच्या
सुवर्णमहोत्सवात धांडोळा घेण्यात आला. रोमिला थापर, टी. एन. मदन, घनश्याम
शहा, जी. एस. ओबेरॉय, सुरेश शर्मा, हरबन्स मुखिया, आशिष नंदी, सुधीरचंद्र
यांसारख्या जाणत्या अभ्यासकांची प्रभावळ सीएसडीएसशी जोडली गेली ती केवळ
रजनी कोठारी यांच्या विजिगीषू वृत्तीमुळेच.
रजनी कोठारी हे उजव्या
विचारसरणीचे पाईक होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचे राजकारण हे डावी व
समाजवादी विचारसरणी यांच्या मिश्रणाला प्रमाण मानून करण्यात येत होते.
नेहरूवाद हा याच विचारांचा अाविष्कार होता. नेहरूवादाने भारलेल्या पिढीचे
रजनी कोठारी हे प्रतिनिधी होते, परंतु त्यांचा नेहरूंबद्दल आंधळा भक्तिभाव
नव्हता. पं. नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत ज्या उत्तम गोष्टी
घडल्या त्यांचे रजनी कोठारी यांनी जसे कौतुक केले आहे तसे नेहरूंच्या
घोडचुकांचे कोठारी यांनी कधीही समर्थन केले नाही. देशाचा कारभार हा एकाच
राजकीय घराण्याच्या हातात असू नये अशी त्यांची आग्रही भूमिका होती. मात्र
असेच मत मांडत असलेल्या संघ परिवार किंवा भाजपच्या विचारसरणीशी कोठारी
यांची नाळ कधीही जुळली नाही.
रजनी कोठारी यांनी बडोदा येथील महाराजा
सयाजीराव विद्यापीठामध्ये अध्यापक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली.
तेथे कार्यरत असताना कोठारी यांनी ‘फॉर्म अँड सबस्टन्स इन इंडियन
पॉलिटिक्स' ही सहा मुद्द्यांवर आधारित राजकीय मीमांसा करणारी निबंधमाला
‘इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकली’मध्ये लिहिली होती. हे वर्ष होते १९६१. हे
त्यांचे लेखन त्या काळात खूप गाजले होते. रोमेश थापर संपादित करीत असलेल्या
सेमिनार या नियतकालिकातही कोठारी पुढे लिहीत असत. राजकीय विश्लेषणातील
त्यांची ही सखोलता बघून प्रा. श्यामाचरण दुबे यांनी रजनी कोठारी यांना
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट या संस्थेत सहायक प्राध्यापक
म्हणून बोलावले. मात्र त्यानंतर ते दिल्लीला परतले. सेंटर फॉर स्टडी ऑफ
डेव्हलपिंग सोसायटीज या संस्थेची स्थापना केल्यानंतर रजनी कोठारी
यांच्यातील कार्यकर्ता विचारवंताच्या आगळ्यावेगळ्या प्रवासाला खर्या
अर्थाने सुरुवात झाली. सामाजिक शास्त्रांतील मूलभूत संकल्पनांचा परिघाबाहेर
जाऊन विचार करून लेखन करणे ही या सीएसडीएसची खासियत होती. काँग्रेस हा एक
पक्ष नसून ती पद्धती आहे, असा दृष्टिकोन घेऊन १९७० मध्ये रजनी कोठारी यांनी
लिहिलेले ‘पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक वस्तुनिष्ठ अभ्यासाचे मोठे
उदाहरण आहे. कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स, फुटस्टेप्स इन टू द फ्यूचर या
त्यांच्या पुस्तकांतून भारतीय राजकारणातील धुमारे वाचकांना विश्लेषक नजरेने
पाहता आले.
नेहरूंपेक्षा इंदिरा गांधी यांचे राजकारण रजनी कोठारी
यांना अधिक भावले होते. १९७० च्या दशकाच्या प्रारंभी इंदिरा गांधी
पंतप्रधान असताना गुजरातमध्ये भ्रष्टाचाराविरोधातील नवनिर्माण आंदोलनाने
उसळी घेतली होती. त्या वेळी गुजरातचे तत्कालीन राज्य व केंद्र सरकार
यांच्यामध्ये बोलणी घडवून आणण्यासाठी रजनी कोठारी यांनी महत्त्वाची भूमिका
बजावली होती. पण अखेर इंदिरा गांधी यांनी गुजरातचे सरकार बरखास्त केले.
इंदिरा गांधी यांच्या राजकारणात कालांतराने संजय गांधी यांचा प्रवेश झाला.
संजय गांधी यांच्या अनेक उद्योगांनी अस्वस्थ झालेल्या इंिदरा गांधी
निकटवर्तीयांत रजनी कोठारीही होते.
कोठारी यांनी काँग्रेसशी नाळ तोडून
जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाची कास धरली. आणीबाणीच्या
काळात मात्र कोठारी राजकारणापासून अलिप्त होऊन कार्यकर्त्याच्या भूमिकेत
स्थिरावले. कार्यकर्ता, विचारवंत, बुद्धिमंत यांच्यात सहज संवाद घडावा या
उद्देशाने रजनी कोठारी यांनी १९८० मध्ये ‘लोकायन’ नावाच्या संस्थेची
स्थापना केली. धर्म, राजकारण, आरोग्य, शेती, शिक्षण यांच्यातील सकारात्मक
बदलांबाबत या संस्थेत झालेली चर्चा खूपच मोलाची आहे. सिटिझन्स फॉर
डेमोक्रसी, पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थांशीही ते संलग्न
होते. या सार्वजनिक जीवनातील आठवणी त्यांनी आपल्या ‘मेमॉयर्स : अनइझी इज द
लाइफ ऑफ माइंड’ या पुस्तकात ग्रंथित केल्या आहेत.
भारतीय राजकारणाचा
बाज ज्याला समजून घ्यायचा आहे त्याने रजनी कोठारी यांनी लिहिलेल्या
पुस्तकांपैकी पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ डेव्हलपमेंट, टुवर्ड्स ए जस्ट वर्ल्ड,
रिथिंकिंग डेव्हलपमेंट : इन सर्च ऑफ ह्यूमन अल्टरनेटिव्हज, ट्रान्सफॉर्मेशन
अँड सर्व्हायव्हल : इन सर्च ऑफ ह्यूमन वर्ल्ड ऑर्डर आदी पुस्तके मिळवून
वाचायला हवीत. भारतीय राजकारण कोणत्या मातीतून घडलेय याचे चौफेर भान जितके
रजनी कोठारी यांच्या लिखाणात दिसायचे तितके खूपच कमी लोकांमध्ये दिसते.
म्हणूनच रजनी कोठारी हे अस्सल भारतीय मुशीतले राजकीय विचारवंत होते असे
म्हणायचे ते त्याचसाठी.