Friday, July 7, 2017

ना. धों. महानोर नव्या पुस्तकात उलगडणार `कवितेतून गाण्याकडे' झालेला प्रवास - समीर परांजपे

दै. दिव्य मराठीच्या दि. 28 जून 2017च्या अंकात मी केलेली ही विशेष बातमी. त्या बातमीची वेबपेज लिंक, टेक्स्ट, जेपीजी फाइल सोबत दिली आहे.
http://m.epaperdivyamarathi.bhaskar.com/aur…/…/28062017/0/9/
----
ना. धों. महानोर नव्या पुस्तकात उलगडणार `कवितेतून गाण्याकडे' झालेला प्रवास
येत्या ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी पॉप्युलर प्रकाशन करणार हे पुस्तक प्रसिद्ध
- समीर परांजपे
मुंबई, दि. २५ जून - निसर्ग, शेती, लोकपरंपरा, सामान्य माणसाचे जगणे ज्यांच्या नादमय कवितेतून वेगळे आकार-उकार घेऊन रसिकांसमोर आले ते प्रख्यात कवि ना. धों. महानोर यांनी आपल्या प्रतिभेने सुमारे १५ मराठी चित्रपट तसेच चित्रपटेतर ध्वनिमुद्रिका, कॅसेट, सीडीजसाठी बहारदार गाणीही लिहिली. कविता करता करता गाणी लिहिण्यापर्यंतचा हा शब्दप्रवास कसा झाला याची हकिकत सांगणारे `कवितेतून गाण्याकडे' हे नवे पुस्तक ना. धों. महानोर यांनी लिहिले आहे. पॉप्युलर प्रकाशन हे पुस्तक येत्या ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी प्रसिद्ध करणार आहे. कविता व गाणी यांचे नाते सांगणारी पुस्तके मराठीत खूप कमी असून महानोरांच्या नव्या पुस्तकाने अशा प्रकारच्या पुस्तकांत मोलाची भर पडणार आहे.
यासंदर्भात ना. धों महानोर यांनी `दिव्य मराठी'ला माहिती देताना सांगितले की, जैत रे जैत, एक होता विदुषक, मुक्ता, अबोली, अजिंठा, दोघी अशा सुमारे १५ चित्रपटांना मी गाणी लिहिली. पळसखेड या खेड्याच्या मातीत असलेले लोकपरंपरा, कविता व शेतीचे संस्कार लहानपणीच माझ्यावर झाले होते. पुढे त्यातूनच मला कविता सुचायला लागली. माझ्यासारख्या खेड्यातल्या माणसाची कविता मुंबई, पुणे, देश-विदेशातील रसिकांना आवडली. या कवितेत नाद, लय, छंद होतेच शिवाय माझ्या कवितेला स्वत:ची जन्मजात चाल होती असेही रसिकांचे म्हणणे होते. त्यातूनच कदाचित मला १९७७ साली लतादिदी, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले यांनी जैत रे जैत या चित्रपटाची गाणी लिहिण्याची विचारणा केली. आज ४० वर्षे झाली जैत रे जैतची गाणी लोकांच्या मनात घर करुन आहेत. मी लििहलेली चित्रपट व चित्रपटेतर गाणी तुम्हाला कशी सुचली असे प्रश्न विचारले जातात. त्यावेळी या गाण्यांमागील निर्मितीची कथा मी थोडक्यात तिथे सांगतही असे.
महानोर पुढे म्हणाले की, गेल्या ६ मार्च रोजी माझा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक सत्कार करण्यात आला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री शरद पवार तसेच रसिकांनी तुम्ही कवितेतून गाण्याकडे कसे वळलात याविषयी सविस्तर लिहावे असा आग्रह केला. माझे मित्र व प्रख्यात समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी ही कल्पना माझ्या मनात रुजविली. त्यातूनच मग `कवितेतून गाण्याकडे' हे पुस्तक लिहावे असे मी ठरविले. मी लिहिलेल्या १५ चित्रपटांपैकी १० चित्रपटांची मी निवड केली. या दहा चित्रपटांतील प्रत्येकी दोन दोन गाणी घेऊन त्यांची निर्मिती कशी झाली त्यांच्या कथा मी या पुस्तकात लिहिलेल्या आहेत.
कविता व गाण्यात केला जाणारा भेदभाव मला मान्य नाही.
ना. धों. महानोर यांच्या वयाला येत्या १६ सप्टेंबर रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. महानोर म्हणाले की, `कवितेतून गाण्याकडे' या पुस्तकातच एक उपविभाग आहे तो माझ्या चित्रपटेतर गाण्यांचा. चित्रपटांव्यतिरिक्त मी ध्वनिमुद्रिका, कॅसेट, सीडीजसाठी सुमारे १०० पेक्षा जास्त गाणी लिहिली आहेत. श्रीधर फडके, कौशल इनामदार, शशांक पवार अशा विविध संगीतकारांनी या गाण्यांना संगीत दिले आहे. त्यापैकी काही गाणी निवडली व त्यांची निर्मितीकथाही या पुस्तकात लिहिलेली आहे. काही समीक्षक कवितेला श्रेष्ठ ठरवितात व गाण्यांना दुय्यम दर्जा देतात. मला हे भेद अजिबात मान्य नाही. कविता व गाणे हे सारखेच असते. नेमके हेच सूत्र मी `कवितेतून गाण्याकडे' या माझ्या नव्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे

No comments:

Post a Comment